Saturday 4 November 2017

राहुल गांधींनी नेतृत्व सिद्धता...!


 *राहुल गांधींची नेतृत्वसिद्धता...!*

"'राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात' असं प्रशस्तीपत्र शिवसेनेच्या संजय राऊत यांनी नुकतंच जाहीरपणे दिलंय. ज्या राहुल गांधींची आजवर 'पप्पू' म्हणून हेटाळणी केली त्याच पप्पूमध्ये आता नेतृत्वाचे गुण दिसू लागली आहेत. ते देशाचं 'आशादायक' नेतृत्व असल्याचं विरोधकांना वाटू लागलंय. याचं कारण देशातील विरोधी पक्षाकडे भारतीय मतदारांकडे जाण्यासाठीचं स्वच्छ, उमदं आणि तरुण देशव्यापी व्यक्तिमत्व उरलेलं नाही. त्यामुळं राहुलना विरोधीपक्षातून पाठबळ मिळते आहे. राहुलनं देखील आपल्या वागण्यात आणि विशेषतः बोलण्यात आमूलाग्र बदल केलाय. उडवाउडवीची वा उगाच टीकेची वक्तव्ये आताशी करताना दिसत नाही. अमेरिकेतील भाषणापासून गुजरातमध्ये केलेल्या भाषणाकडे लक्षपूर्वक पाहिले तर त्यात परिपक्वता दिसून येतंय. केवळ टीका न करता मुद्देसूद विरोध आणि लोकांच्या भावनांना हात घालण्याचं कसब राहुलनं साधल्याचं जाणवतं. आगामी काळात देशाचं नेतृत्व करतील वा ना करतील पण काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी ते योग्य आणि सिद्ध झालेत हे मात्र निश्चित!"
---------------------------------------------
[11/3, 8:30 PM] Harish Kenchi: *काँ*ग्रेस पक्षांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्षपदावर बसविण्याची तयारी गेल्याकाही वर्षांपासून त्यांच्या समर्थकांनी चालविली होती. पण काही ना काही कारणं निघायची, बहुदा ती सारी नकारात्मकच असायची त्यामुळेच राहुल पक्षाध्यक्षपदावर आजवर आरूढ होऊ शकले नाहीत. पण आता मात्र 'ती' वेळ येऊन ठेपली आहे. लौकरच ते पक्षाध्यक्ष होतील. नेते वारंवार सोनियाजींना विचारत पण त्यांनी कधी त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती पण नुकतेच त्यांनीही या नेत्यांना 'आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ आलीय!' असं म्हटलं आहे. याचाच अर्थ सोनियांनी राहुलना पक्षाध्यक्ष करण्यासाठीची संमती दिलीय.

*परिपक्वता दिसू लागली*
आजवर केवळ विरोधीपक्षातील लोकच नव्हे तर काँग्रेसमधीलही काहीजण राहुल यांच्याबाबतीत नकारात्मक बोलत, किंबहुना ते टिंगलटवाळीच करीत. त्यांना वक्तृत्व नाही, नीटसं बोलताही येत नाही. राजकारणाचा अनुभव नाही त्यामुळे त्यांच्यातला उथळपणा अनेकदा उघडकीला आलाय. असे अनेक आक्षेप घेतले जात होते. पण आता ही परिस्थिती बदलल्याचे जाणवतेय. गेल्या महिन्यात अमेरिकेतील लोकांशी राहुल गांधी यांनी जो संवाद साधला, तिथून परतल्यानंतर गुजरात दौऱ्यात त्यांनी जो प्रचार केला आहे तो पाहता त्यांच्यात खूप बदल झाल्याचं दिसलं. राहुलची भाषा, वक्तृत्वशैली, देहबोली वेगळीच दिसली. त्यांच्यातला उथळपणा आता दूर झाल्याचं आणि त्यांच्यात परिपक्वता आल्याचं जाणवलं. लोकांमध्येही त्यांची प्रतिमा बदलली गेल्याचं जाणवलं. विरोधीपक्ष त्यातही प्रामुख्यानं भाजपेयी राहुल यांची टिंगलटवाळीची, टीकास्त्र सोडण्याची, प्रहार करण्याची एकही संधी सोडत नव्हते. 'बच्चा', 'पप्पू' अशी संभावना भाजपेयी करीत. आताशी बदललेल्या वातावरणात राहुलनी केलेल्या प्रत्येक आरोपांची  टिंगलटवाळी न करता अत्यंत गांभीर्यानं भाजपेयी उत्तरे देताहेत. यात एक विशेष बाब ही की, गुजरातमध्ये काँग्रेसपक्षांची खिंड एकटे राहुल गांधी स्थानिक नेत्यांच्या साथीनं लढविताहेत तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह सर्व राष्ट्रीय नेत्यांची फौज भाजपने आपल्या प्रचारासाठी मैदानात उतरविली आहे.

*संयत पण प्रसंगी आक्रमक*
गुजरातमध्ये झालेल्या गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँगेसपक्ष अत्यंत मरगळलेल्या अवस्थेत होता. त्यांच्यातली जिद्दच संपली होती. निवडणूक लढवायची म्हणून लढविली जायची त्यात विरोध करण्याची ताकद, क्षमता, उत्साह वा सातत्य नसायचे. पण राहुल गांधींचा नुकताच झालेला प्रचाराचा झंझावाती दौरा आणि त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांमध्ये आता आवेश, जोश, जिद्द आणि उत्साह ओसंडून वाहतो आहे. ते त्वेषाने बाहेर पडले आहेत. राहुल गांधी गुजरातच्या वेगवेगळ्या भागात फिरताहेत. गेल्या महिन्यात गुजरातची दोनदा वारी त्यांनी केलीय. या दौऱ्यात त्यांनी लोकांशी थेट संवाद साधला, आपल्या भाषणात त्यांनी त्यांना सामावून घेतलं.  पूर्वी कधी दिसला नाही तो जोश, ठोस आणि ठामपणा यावेळी दिसला. पूर्वीची त्यांची भाषण म्हणजे त्यांचं ते केवळ जोरात आरडाओरड, आकांडतांडव असे, कधी कधी तर ते अगदीच बालिश वाटत. पण सध्याच्या त्यांच्या भाषणात आमूलाग्र बदल झाल्याचं जाणवलं. आता ते संयमाने, शांतपणे, संयतपणे लोकांशी संवाद साधतानाच मध्येच आक्रमक होऊन भाजप सरकारवर टीका करताना दिसले. पूर्वी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप यांना लक्ष्य करताना टोकाची आणि एकांगी टीका करीत. पण आता त्यांनी आपली भाषणशैली पूर्णपणे बदललीय. ते आपल्या भाषणातून मोदींनी घेतलेल्या निर्णयाचं, धोरणाचं वरवर कौतुक, स्तुती करीत त्यातील फोलपणा कसा आहे हे लोकांसमोर मुद्देसुदरित्या मांडताहेत. साधे, सोपे, स्वच्छ आणि माफक शब्द वापरून ते लोकांसमोर जाताना दिसताहेत.

*अकार्यक्षमतेची कबुली*
आपल्या बदललेल्या भाषणशैली बरोबरच राहुल गांधींनी आपल्यामध्येही बदल केलाय, एक नवा गुण अंगीकारलाय जो राजकारणी सहसा स्वीकारत नाहीत, तो म्हणजे गतकाळात पक्षाकडून झालेल्या चुकांची, गैरकारभाराची कबुली! अमेरिकेत केलेल्या भाषणापासून हे प्रामुख्यानं दिसलं. तिथं ते म्हणाले होते की, 'बेरोजगारी, बेकारीबाबत पक्षाचं अक्षम्य असं दुर्लक्ष झालंय, आपण काहीही केलं, कसंही वागलो तरी लोक आपल्यालाच निवडून देतात असा गर्व पक्षातल्या नेत्यांना झाला होता.  त्याशिवाय विरोधीपक्ष विस्कळीत असल्याने आपल्यालाच सत्ता मिळेल अशा भ्रमात पक्षाचे नेते होते.  त्यामुळेच २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसपक्ष प्रचारात आणि प्रसिद्धीत भाजपला सडेतोडपणे उत्तर देण्यासाठी जिंकण्याच्या जिद्दीनं मैदानात उतरलाच नाही. परिणामी लोक काँग्रेसपक्षापासून दूर गेले. अशी कबुली त्यांनी तिथं दिली होती. झालेल्या पराभवातून पक्ष आता खूप काही शिकला आहे आणि झालेल्या चुका सुधारण्यासाठी पक्षानं कंबर कसलीय. निवडणुकीत भाजपनं प्रचारासाठी जी जी आयुधं वापरली ती सारी आयुधं वापरून आम्ही येणाऱ्या या निवडणुकांना सामोरं जातोय. असंही त्यांनी तिथं स्पष्ट केलं.

*सॉफ्ट हिंदुत्वाचा स्वीकार*
पूर्वी भाषण करताना वा प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आपल्या वक्तव्याच्या हेडलाईन्स कशा होतील अशा दृष्टीनं राहुल आरोप करीत. आता ते त्यांनी सोडून दिल्याचं दिसतंय. केवळ टीका न करता त्या योजना कशा साकार होतील हे ते मांडतात. काँग्रेसपक्ष सत्तेवर आल्यास जीएसटी बाबत पुन्हा नव्याने समीक्षा करू, शेतकऱ्यांना, ग्रामीण भागात सेवा सुविधा पुरवू, तरुणांसाठी रोजगार उभा करू अशी आश्वासने ते देताहेत. व्यापारी, शेतकरी, तरुण, महिलांच्या प्रश्नांना हात घालतानाच, ते जिथे जातील तिथल्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करतात. आदिवासींबरोबर नृत्यही करतात.  हे सारं करताना सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून काँग्रेसपक्ष देखील 'सॉफ्ट हिंदुत्व' स्वीकारत असल्याचं दाखवून देतात.

*आत्मविश्वास वाढलाय*
राहुल गांधींमध्ये जो प्रामुख्यानं बदल जाणवतोय तो म्हणजे त्यांच्यात वाढलेला आत्मविश्वास! पूर्वी त्यांच्यात तो फारसा जाणवत नव्हता. सध्याचं देशातलं बदललेलं वातावरण, राजकीय स्थिती आणि वास्तविकता याचं भान त्यांना आल्याचं दिसलं. अमेरिकेत बोलताना त्यांनी  म्हटलं की, 'जर पक्षाची इच्छा असेल तर आपण प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार व्हायला तयार आहोत!' यापूर्वी असं म्हणण्याचं धाडस त्यांनी कधी दाखवलं नव्हतं. त्यांचं हे वक्तव्य त्यांच्यात वाढलेला आत्मविश्वास दाखवतो. काही दिवसांपूर्वी अमेठीत ते म्हणाले होते, 'देशात प्रामुख्यानं ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नावर सरकारनं काम करायला हवंय. मोदी सरकार जर हे करू शकत नसतील तर आम्ही हे सारे प्रश्न सहा महिन्यात सोडवून दाखवू!' हा आत्मविश्वास त्यांच्यात प्रथमच दिसून आला होता. नोटांबंदीवर राहुलनी जेव्हा टीका केली होती तेव्हा भाजपेयींनी त्यांची टिंगलटवाळी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी शांतपणे सांगितलं की, आपण माझी हवी तेवढी टिंगल करा पण मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं तरी द्या ना!

*कार्यकर्त्यांत उत्साह वाढला*
राहुल गांधी हे त्यांना लिहून दिलेलं भाषण वाचतात, अशी टीका भाजपेयी करतात. हे जरी खरं असलं तरी ती लिहून दिलेली स्क्रिप्ट कशी वाचायची, कधी, कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, कोणत्या नाही ते त्यांनाच ठरवावं लागतं. त्यामुळे भाषणात जोश, आवेश आणि स्पष्टता दिसून येते. सगळेच राजकारणी स्क्रिप्टशिवाय बोलू शकतात असं नाही, लिहलेलं वाचणं असू द्या नाही तर ते तोंडपाठ केलेलं असू द्या, वा उस्फूर्तपणे केलेलं भाषण असो, ते तेव्हाच परिणामकारक समजलं जातं जेव्हा ते श्रोत्यांपर्यंत लोकांपर्यंत जाऊन भिडतं! राहुल यांच्या भाषणांना आता लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे याही पेक्षा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे हे ही काही कमी महत्वाचं नाही.

*सोशल मीडियात आगमन*
राहुल गांधींमध्ये आणखी एक बदल झालाय. तो म्हणजे त्यांचं झालेलं सोशल मीडियावर झालेलं आगमन! आतापर्यंत भाजपेयी आणि नरेंद्र मोदींसाठी सोशल मीडिया हे अत्यंत महत्वाचं प्रचार आणि प्रसिद्धीसाठीचं प्रभावी माध्यम राहिलं आहे. आता राहुलनेही मोदींप्रमाणेच ही नीती वापरायचं ठरवलंय. प्रधानमंत्र्यांचा गुजरात दौरा असो, अमित शहांच्या मुलाच्या व्यवसायावर झालेला आरोप असो, पाकिस्तानबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पचं निवेदन असो, वा भूकबळींच्या यादीत भारतातील भूकबळी वाढल्याची नोंद असो, प्रत्येक प्रसंगात राहुलने मोदींना सवाल करीत टीका केलीय. राहुलच्या ट्विटला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि फॉलोअर्सची संख्या सतत वाढत आहे.यात राहुलच्या सोशल मीडियाच्या टीमचा मोठा हात आहेच. पण आता सर्वांनाच ठाऊक आहे की, सर्वच राजकीय नेत्यांच्या सोशल मिडियावरची हजेरी ही त्यांची टीम सांभाळत असतात. राहुलना मिळणारा हा प्रतिसाद मतांमध्ये रूपांतर होईल की नाही हे आगामी निवडणुकीत कळेल!  आता काँगेसची नेते मंडळी म्हणू लागलीत की, 'राहुलने यापूर्वीच पक्षाची धुरा सांभाळायला हवी होती!' ते आज जी परिपक्वता दाखविताहेत यावरून त्यांची पक्षाध्यक्ष होण्याची हीच खरी वेळ आहे.

हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे भ्रष्टाचाराच्या आरोपात गुरफटले आहेत. त्यामुळे तिथली सत्ता गेली तरी त्याला राहुलना जबाबदार धरलं जाणार नाही. गुजरातेत काँग्रेसपक्ष दोन दशकाहून अधिककाळ सत्तेपासून दूर आहे. आणि काँग्रेस सत्ताभ्रष्ट झाल्यापासून गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला बनलाय. तेव्हा इथं जर काँग्रेसचा जय झाला तर ते यश राहुल यांचं असेल. आणि पराभव झालाच तर त्याचं खापर मात्र राज्याच्या पक्ष संघटनेवर फुटेल! त्यामुळे या दोन राज्याच्या निवडणुकीत राहुल गांधींना गमावण्यासारखं काहीच नाही. एवढं मात्र खरं की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींची बदलणारी प्रतिमा ही काँग्रेससाठी संजीवनी ठरेल. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी देशात आगामी दोन वर्षात देशातील अनेक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीसाठी काँग्रेसपक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली उतरू शकेल. विरोधी पक्षातील नेते म्हणत होते की, राहुल अद्यापि बालिश आहे तो 'मोठा' कधी होणार आहे? पण आता तेच नेते समजून गेले असतील की, राहुल आता केवळ आता केवळ मोठेच झाले नाहीत तर त्यांच्यासाठी ते एक आव्हान ठरताहेत!

*विरोधकांचंही आशादायक नेतृत्व*
राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात' असं प्रशस्तीपत्र शिवसेनेच्या संजय राऊत यांनी नुकतंच जाहीरपणे दिलंय. ज्या राहुल गांधींची आजवर 'पप्पू' म्हणून हेटाळणी केली त्याच पप्पूमध्ये आता नेतृत्वाचे गुण दिसू लागली आहेत. ते देशाचं 'आशादायक' नेतृत्व असल्याचं विरोधकांना वाटू लागलंय. याचं कारण देशातील विरोधी पक्षाकडे भारतीय मतदारांकडे जाण्यासाठीचं स्वच्छ, उमदं आणि तरुण देशव्यापी व्यक्तिमत्व उरलेलं नाही. त्यामुळं राहुलना विरोधीपक्षातून पाठबळ मिळते आहे. राहुलनं देखील आपल्या वागण्यात आणि विशेषतः बोलण्यात आमूलाग्र बदल केलाय. उडवाउडवीची वा उगाच टीकेची वक्तव्ये आताशी करताना दिसत नाही. अमेरिकेतील भाषणापासून गुजरातमध्ये केलेल्या भाषणाकडे लक्षपूर्वक पाहिले तर त्यात परिपक्वता दिसून येतंय. केवळ टीका न करता मुद्देसूद विरोध आणि लोकांच्या भावनांना हात घालण्याचं कसब राहुलनं साधल्याचं जाणवतं. आगामी काळात देशाचं नेतृत्व करतील वा ना करतील पण काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी ते योग्य आणि सिद्ध झालेत हे मात्र निश्चित!

*चौकट*

*दोन गुजराथी! देशात साथी!!*

आज देशाची सूत्रं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुर्जर बांधवांकडं आहेत. त्यांनी आपली उपयोगिता आणि उपद्रवता सिद्ध केलीय. त्यांच्या 'काँग्रेसमुक्त भारत' या घोषणेचं साऱ्या भारतानं स्वागत केलं. प्रसिद्धीमाध्यमाची सारी आयुधं वापरीत त्यांनी आपलं। नेतृत्व सिद्ध केलंय. देशात मुशाफिरी करताना आपल्या घराकडं नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्षच झालंय. याची जाणीव त्यांना झालेली दिसतंय म्हणूनच त्यांच्या गुजरातच्या फेऱ्या वाढल्यात. याचा गैरअर्थ विरोधीपक्ष आणि प्रसिद्धीमाध्यमांनी काढलाय. पण गुजराती जनतेला आपला गुजराती माणूस देशावर राज्य करतोय ही त्यांना सुखावणारी, भावणारी गोष्ट आहे. त्यामुळे ही जनता त्यांच्यामागे ठामपणे उभी राहील असं चित्र दिसतंय. पूर्वी स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल या दोघा गुजरातींनी जसे योगदान दिलं आहे.तसं आता सुराज्यासाठी हे दोघे गुजराती झटताहेत असं त्यांना वाटतंय. तसं गुजरातींना वाटावं यासाठी सारे भाजपेयी झटताहेत.
--------------------------------------

- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...