Saturday 11 November 2017

शिवसेना आणि राष्ट्रवादीनं एकत्र यावं!

*शिवसेना अन राष्ट्रवादीनं एकत्र यावं..!*

"महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेनं जाणार आहे याचे काही संकेत मिळताहेत. नुकतंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. दोन्ही नेत्यांनी आपली भेट झाल्याचं प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं, पण या भेटीत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात राहिलंय. पवारांनी राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात बोलताना सांगितलं की, 'उद्धव ठाकरे सत्तेत राहण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यांना पक्ष मजबूत करायचाय!' राज्यातील भाजपच्या सत्तेला पाठींबा देण्याबाबत मात्र त्यांनी शिवसेनेला गुगली टाकलीय. 'आधी पाठींबा काढा मग आम्ही आमचा निर्णय घेऊ!' असं सांगितल्याचं स्पष्ट केलंय. शरद पवार हे एखादं मत व्यक्त करतात तेव्हा त्याला अनेक कंगोरे असतात. त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जातात, पण पवारांना जे काही सुचवायचं असतं ते आगामी राजकारणाची नांदी असू शकते, असं काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे. राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण पाहता, पवारांचं मत गांभीर्यानं घ्यायला हवंय. सत्तासाथीदार असलेली शिवसेना ही बाहेर विरोधीपक्ष म्हणूनच  वावरताना दिसते आहे.त्यामुळं आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सख्य घडलं तर आश्चर्य वाटायला नको."
-------------------------------------------------------------------


*रा*ज्याच्या राजकारणाचा, प्रादेशिक अस्मितेचा, मराठी माणसाच्या प्राधान्याचा विचार करता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनेची तर प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रसंगी भाजपेयींची साथ सोडण्याची तयारी दिसतेय. पूर्वी भाजप हा शहरी पक्ष होता त्याला ग्रामीण भागात जाण्यासाठी शिवसेनेची साथ हवी होती. आज तशी स्थिती राहिलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपेयींची सत्ता आल्याने सत्ताकारणातले सर्वच पक्षातले सटोडीये थेट भाजपात गेले अन त्यामुळं भाजपला ग्रामीण तोंडवळा आलाय. आता गरज संपली असल्यानं भाजपला शिवसेनेची साथ नकोशी झालीय. त्यामुळेच सत्तासाथीदार असला तरी भाजप शिवसेनेला फारशी किंमतच देत नाही. सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेनेनं विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. विरोधीपक्षनेतेपदही मिळविलं होतं. बहुमत सिद्ध करताना 'अदृश्य हाता'ची जी खेळी राष्ट्रवादीनं खेळली त्यानं भाजप खरं तर सत्ताधारी बनला. सत्ताधारी बनल्यानंतर ही टिकावी म्हणून केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी 'मातोश्री' गाठली आणि शिवसेनेला सत्तासाथीदार बनविलं. तांत्रिकदृष्टया शिवसेना आजही विरोधीपक्षातच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्नात भाजपेयींनी शिवसेनेला वापरलं आणि शिवसेनेला झुलवत ठेवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सत्तेतील या साथीदारांनी एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढले त्यामुळे या दोघांच्यात पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जर शिवसेनेनं घेतला तर राष्ट्रवादीचा 'अदृश्य हात' पुन्हा भाजपच्या पाठीशी राहणार तर नाही ना? राष्ट्रवादीचा पूर्वानुभव लक्षात घेता अशी भीती शिवसेनेला वाटत असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी मात्र आपल्या स्वभावानुसार 'ताकास तूर' लागू दिला नाही.

*लोकनेत्यांना एकमेकाविरुद्ध झुंजवलं*
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही तसे राज्यस्तरावरचेच पक्ष आहेत. देशातल्या इतर राज्यात त्यांचं अस्तित्व फारसं नाहीच. तेव्हा महाराष्ट्रातला आपला गड मजबूत करण्याची गरज सध्यातरी दोघांनाही दिसते आहे. तसं पाहिलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही महाराष्ट्राचे लोकनेतेच! आज शिवसेनाप्रमुख हयात नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांचं जबरदस्त वजन होतं, चलनी नाणं होतं. चलनी नाण्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवसेनाप्रमुख हे 'काटा' काढून आपली 'छाप' पाडायचे तर शरद पवार आपली 'छाप' पाडून 'काटा' काढत! तसे दोघे सख्खे मित्र, ते त्यांनी कधी लपवलंही नाही. गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्यावेळी दोघे मांडीला मांडी लावून बसले होते. त्यापूर्वी दोघांनी एकत्र येऊन एक साप्ताहिकही सुरू केलं होतं. पवार कन्या सुप्रिया सुळे जेव्हा राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी सुप्रिया ही माझीच मुलगी आहे असं म्हणत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. अशी त्यांची दोस्ती होती. याच नात्यानं उद्धव ठाकरे पवारांना भेटायला गेले असावेत. शिवसेनाप्रमुख आणि पवार यांच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत होती. या दोघांचा शब्द हा प्रमाण मानला जाई. महाराष्ट्रावर प्रभाव असणाऱ्या या दोघा मित्रांना मात्र भाजपेयींनी कुटील डाव खेळत एकमेकांच्या विरोधात अखेरपर्यंत त्यांना झुंजविलं होतं.

*भाजपेयींचा कुटील डाव*
महाराष्ट्रात अनेकवर्षे प्रयत्न करूनही स्वबळावर ग्रामीण भागात जाणं भाजपला जमत नव्हतं. याचा प्रत्यय येताच भाजपेयींनी शिवसेनेला पद्धतशीररित्या घेरलं. त्यासाठी संघ परिवारातले ग.वा.बेहेरे, विद्याधर गोखले, दि.वा गोखले अशा काही पत्रकार मंडळींना वापरलं.  त्यानंतर 'महाजनी' साथीनं शिवसेनेच्या 'भगव्या'च्या कृपेनं महाराष्ट्राच्या सर्वदूर 'केशरी' भाजपेयी बोट धरून शिरले. सर्वधर्मसमभाव, मानवी एकता-समता यासाठी हिंदू ऐक्य हे गणित मांडलं गेलं. महाराष्ट्राची सत्ता जिंकण्यासाठी सेना-भाजप उभी आहे आणि हे आव्हान परतवून लावण्याची हिंमत, ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्येच आहे, याची पूर्ण कल्पना असल्याने भाजपेयींनी नाना मार्गाने शरद पवारांना बदनाम करण्याचा, त्यांची गुन्हेगारी राजकारणी अशी प्रतिमा जनमानसापुढं आणण्याचा पद्धतशीररीत्या प्रयत्न केला. त्यासाठी नोकरशाहीतल्या आपल्या काही पिलावळींना देखील वापरलं. त्याचबरोबर काँग्रेसमधल्या गटबाजीचाही त्यांनी चाणाक्षपणे वापर केला. सत्तेसाठीच सेनेशी भाजपेयींनी युती केली. उद्या आपल्याला बाजूला ठेऊन शिवसेना शरद पवारांबरोबर आघाडी करून सत्ता राबविल ही भीती तेव्हाही भाजपेयींच्या मनांत होती. तशी आजही आहे. यासाठी शिवसेनाप्रमुख यांच्या मनांत शरद पवारांबद्धल केवळ राजकीय विरोधच नव्हे तर द्वेष भरण्यातही भाजपेयी यशस्वी झाले. भाजपेयींनी या दोघा मित्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभं करण्यात यश मिळवलं. या लढाईत कुणातरी एकाची सफाई होणार हे निश्चित होतं आणि अशी सफाई हीच भाजपची कमाई!  इकडे पवारांनी आपल्या मैत्रीपूर्ण राजकारणानं राज्यातली डावी चळवळ केव्हाच गलितगात्र करून टाकली होती. परंतु त्याचवेळी उजव्या विचाराच्या भाजपनं हिंदुत्वाचा अंगीकार करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वरूपात जबर आव्हान उभं केलं होतं. हे विसरता येणं शक्य नाही.

*राज्याचे तुकडे होण्याची भीती*
हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे मध्यममार्गी, प्रबोधनी विचारांची शिवसेना भाजपच्या दावणीला कशी बांधली गेली त्याचा हा इतिहास! आज बाळासाहेब हयात नाहीत, मात्र शिवसैनिकांनी त्याच हिंमतीनं, उद्धव ठाकरेंच्या साथीनं भाजपेयींना हिसका दाखवलाय. पन्नाशी पार केलेल्या शिवसेनेला आज कधी नव्हे ती राजकीय आधाराची गरज वाटू लागल्याचं सध्यातरी जाणवतंय. भाजपला ताकद देणाऱ्या शिवसेनेला भाजपवर विश्वास राहिला नसल्याचं सिद्ध झालंय भाजपेयींनी ते आपल्या वागण्यानं दाखवूनही दिलंय. पवार हे चाणाक्ष आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात 'शिवसेनेलाच यश मिळेल!' असं वक्तव्य करून त्यांना जो संदेश द्यायचा होता तो त्यांनी त्यावेळी दिला होता. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. मुंबईत भाजपची सत्ता आली तर महाराष्ट्राचे तुकडे पडतील. विदर्भ हा भाजपच्या अजेंड्यावर आहेच, उद्या मुंबईदेखील वेगळी करतील हा धोका असल्याने त्यांनी शिवसेनेला महत्व दिले होते. वडीलकीचा सल्लाही दिला होता.

*शिवसेनेचा अस्तित्वाचा लढा*
राज्यातली सेना-भाजपची सत्ता गेल्यानंतर औरंगाबाद महापालिका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी 'शत प्रतिशत भाजप' असा नारा दिला होता. तेव्हा पासून भाजपने हा शिवसेनेच्या विरोधात सवतासुभा उभा केला त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, अगदी अलीकडच्या मुंबईपासून सोलापूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार मंडळींनी पातळीसोडून शिवसेनेवर टीका तर केलीच शिवाय 'शिवसेनेला गाडून टाका' असं जहरी वक्तव्य केल्यानं शिवसेना आणि शिवसैनिक त्वेषानं उभे ठाकले. भाजपच्या ह्या कुटिल डावाला अप्रत्यक्षरीत्या साथ देण्यासाठी मनसेचे राज ठाकरे आणि काँग्रेसचे नारायण राणे यांनी शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. राज आणि राणे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच, या दोघांनी पवारांचा आशीर्वाद घेऊनच आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. शिवसेनाप्रमुख यांच्याशिवाय होणारी ती निवडणूक होती. उद्धव, आदित्य, शिवसेनेतील परप्रकाशित नेते आणि शिवसैनिकांनी जिद्दीनं मुंबई महापालिका आपल्याकडं राखली. आज राणे भाजपच्या वळचणीला गेलेत, राज चाचपडतोय, काँग्रेस अद्यापि सावरलेली नाही. अशावेळी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला घ्यायला हवीय. हा धूर्त विचार शिवसेनेनं करायला हवाय. कोकणातील माणसं ही शिवसेनेच्या मागे आहेत. तर देशावरची, घाटावरची माणसं राष्ट्रवादी बरोबर आहेत. हे खचितच उद्धव ठाकरे जाणत असतील. पवारांची त्यांनी घेतलेली भेट हे त्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल व्हावं!

*प्रारंभी समाजवादींशी युती*
ज्या प्रबोधनकारांनी शिवसेनेला जन्माला घातलं त्या प्रबोधनकारांचे उद्धव ठाकरे हे नातू आहेत. त्यांचा प्रबोधनी विचार शिवसेनेनं स्वीकारायला हरकत नाही. शिवसेनेची मानसिकता ही पूर्वी कधीच भाजपेयी नव्हती, ती मराठी अस्मितेचीच होती. त्यामुळेच शिवसेनेनं प्रारंभीच्या काळात प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. हा मूळ विचारच विसरल्यानं शिवसेनेची आजची संभ्रमावस्था निर्माण झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यात शिवसेना मूळ विचाराप्रत परतू शकेल. यानं नव्या वाटचालीचा प्रारंभ होईल. पण शिवसेनेतल्या काहींना हे मानवणारं नाही. त्यांचे सारे मतदारसंघ शहरी असल्यानं त्यांना भाजपचाच मेणा उचलायचाय पण भाजपेयींना आता असले भोई नकोसे झाले आहेत. असं असलं तरी शेवटी पक्षप्रमुखांना आणि शिवसैनिकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. कालपर्यंत शरद पवारांचा 'नेणता राजा' असं म्हणत अवहेलना करणाऱ्यांना आज त्यांनाच 'जाणता राजा' म्हणावं लागणार की भाजपेयींची पेशवाई झुल आपल्या अंगाखांद्यावर मिरवायचं हा त्यांच्यापुढचा महत्वाचा प्रश्न आहे.

*शिवसेनेमुळे पवार काँग्रेस सोबत!*
२०००साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुणालाच बहुमत न मिळाल्यानं कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होत नव्हतं. त्या निवडणुकीत सेना-भाजपची युती होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी नव्हती  हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते, त्यापूर्वी पवारांनी सोनिया गांधींचा 'विदेशी' म्हणून तिरस्कार केलं असल्यानं दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यताच नव्हती. सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असताना तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या राणे यांनी सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी भाजप-सेनेनं राष्ट्रवादीशी समझौता करावा असा पर्याय मांडला होता. वेळ पडलीच तर शिवसेनेनं बाहेरून पाठींबा द्यावा असाही विचार होता. शिवसेनेनं हे सारे पर्याय धुडकावून लावले. सत्ता हाती ठेवण्याचं वा सत्तेवर अंकुश ठेवण्याची शिवसेनेची संधी त्यावेळी हुकली. पवारांना सोनियांच्या विरोधात उभं ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न देखील शिवसेनेमुळे फसला. यामुळं एक झालं, पवार पुन्हा काँग्रेसच्या जवळ गेले, सत्ता हाती घेतली आणि केंद्रात सत्ताधारीही बनले ते केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेच!

*एकत्र यावं ही मराठी मनाची मनिषा*
या साऱ्या घडामोडी पवार जाणतात, शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्यास भाजपवर अंकुश राहू शकतो. ते काम शिवसेना आपल्या पद्धतीनं करेल हे जाणूनच पवारांनी शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद दाखवलाय. आता शिवसेना काय करते हे पाहावं लागेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि त्यांचे स्वयंघोषित 'चाणक्य' आणि शिवसैनिक यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. पण मराठी माणसाच्या मनांत जसं बाळासाहेब-शरद पवार यांनी एकत्र यावं असं वाटतं होतं तसंच आता बाळासाहेबांची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यावं अशी मनिषा आहे हे मात्र निश्चित! पाहू या आगामी काळात काय घडतंय ते!

*चौकट*

*...तर राजकारणाला वेगळं वळण!*
चेंबुरच्या 'नाऱ्या'ला महाराष्ट्राचा सर्वसत्ताधीश बनवून 'नारायणराव राणे' असं नांव, प्रतिष्ठा, सत्ता, पैसा आणि वैभव सारं काही शिवसेनेनं मिळवून दिलं. त्याच शिवसेनेला संपविण्याचा विडा राणेंनी उचललाय. हा आपल्या राजकीय जन्मदात्या आईशी केलेला व्याभिचार म्हणावा लागेल! मित्रपक्ष म्हणविणाऱ्या भाजपने शिवसेनेवर शरसंधान साधण्यासाठी राणेंचा खांदा वापरण्याचं ठरवलंय. शिवसेनेसाठी दुखरी नस ठरलेल्या राणेंना सत्तेत सहभागी करून घेतानाच त्यांना मंत्रिपद बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेवर निवडून आणण्याचाही निर्धारही भाजपनं केलाय. हा अंदाज आल्यानेच शिवसेनेने शरद पवारांची भेट घेतली असावी. राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल अशी शक्यता आहे. याचे संकेत काल शिवसेनेचे नेते जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात दिले आहेत. असं घडलं तर राज्यात असलेलं सरकार अल्पमतात येईल. अशावेळी पुन्हा 'अदृश्य हात' धावून येईल की, सरकार गडगडेल हे ठरेल! म्हणजेच 'राणे इन अँड शिवसेना आऊट' असं घडेल अन राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता निर्माण होईल. हे जरी घडलं नाही तरी विधान परिषदेच्या निवडणुकीतुन राणेंना निवडून यावं लागेल त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले तर राणेंचा पराभव होऊ शकतो आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवता येईल. असं झालं अन तीन पक्षाची नवी आघाडी अस्तित्वात आली तर  महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं वळण घेईल....!
------------------

- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...