Saturday 7 October 2017

...तर पक्षाचा कळसच कापून नेतील!

"आज आपल्याला निष्ठावंत शिवसैनिकांची वानवा जाणवतेय. पूर्वी शिवसेनेसाठी वाटेल ते बेधडकपणे करण्याची तयारी असलेले शिवसैनिक होते. आता सगळीकडेच सटोडीये निर्माण झाले आहेत. शिवसेनेत 'रावांचे रंक झाले, भिकाऱ्यांचे बाजीराव बनले' असे दत्ताजी साळवी म्हणत असत. ज्यांचे कर्तृत्व, निष्ठा नांव ठेवायला जागा नाही, त्यांच्याबद्धल कुणी वावगा शब्द उच्चारत नाहीत. ज्यांच्याकडून जनहिताच्या काम होत आहेत, त्यांच्या गैरगोष्टीही पोटात घालण्याएवढे उदार लोक असतात; पण ज्यांनी केवळ स्वार्थच बघितला, ज्यांनी सर्वसामान्य माणसांना छळायचं सोडलं नाही, ज्यांनी सतत नेत्यांना अंधारात ठेवलं आणि चमच्यांचेे ताफे बनवून लोकांची खरी भावना नेत्यांपर्यंत पोहोचू दिली नाही, त्यांना सहजपणे वगळण्याची संधी निवडणुकांच्या काळात असते. पण, चांगल्या कार्यकर्त्याला डावलून नको त्याचीच नेमकी निवड कशी झाली? उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी म्हणून जे काही केलं त्यानं कार्यकर्त्यांचा आवाज चिरडण्यासाठी वापरला की काय? आज खरी गरज आहे ती कार्यकर्त्यांना सांभाळण्याची, त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची, नाही तर यातून शिवसेनेचा कळस कापून नेण्याचा प्रकार होऊ शकतो, उध्दवसाहेब लक्ष द्या पक्षाच्या कळसाकडे...!"
-------------------------------------------


*शि*वसेनेचा दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी दिशादर्शक, मार्गदर्शक आणि पक्षाचं पुढंच राजकारण कसं असेल हे सांगणारं असतं. म्हणूनच लाखो शिवसैनिक या मेळाव्याला आवर्जून उपस्थित असतात. यंदाचा मेळावा हा थोडासा वेगळा म्हणावा लागेल, शिवसेना सत्तेत आहेंही आणि नाहीही! राज्यभर चाललेली महागाईविरोधी आंदोलन, शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठीचं आंदोलन, आमदारांची सतत होणाऱ्या बैठका, वृत्तपत्रातून येणाऱ्या उलटसुलट बातम्या यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याचं औत्सुक्य साऱ्यांनाच होतं. प्रसिद्धी माध्यमे उद्धव ठाकरे राज्यातल्या सत्तेला दिलेला पाठींबा काढून घेतात की असंच सुरू ठेवतात या निर्णयाकडे याकडं लक्ष ठेऊन होते पण शिवसेनेनं 'वेट अँड वोच' अशी भूमिका घेतल्यानं या मेळाव्याला माध्यमांनी फारसे लक्ष दिलं नाही; याउलट नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला मोठी प्रसिद्धी दिली. सध्या शिवसेनेनं सरकारचा पाठींबा काढला तर कोणती व्युहरचना करायची यात भाजपेयी मग्न आहेत तर मध्यावधी निवडणुका झाल्याच तर या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तयारी, मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केलीय. नारायण राणे आणि त्यांचा नवा पक्ष एनडीएत सामील झालाय. राणेंना शिवसेनेच्या अंगावर सोडण्याचा विचार करून भाजपेयींनी जर राणेंना मंत्री केलं तर शिवसेनेची भूमिका या साऱ्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरणार आहे, आणि त्याच बरोबर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

*शिवसेनेला संपवणार कोण?*
शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर पक्षप्रमुखाचं खूप कौतुक झालं पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. तथाकथित 'केशरी झंझावाता'पुढे शिवसेनेचा प्रभाव टिकणार नाही असं मत राजकीय निरीक्षक प्रसिद्धीमाध्यमातून सध्या मांडताहेत. शिवसेनेवर होणारे टीकेचे वार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची होणारी संभावना हे सारं पाहता उद्धव ठाकरे यांनी लिहिलेला २२ मार्च १९९२ च्या दैनिक सामनातील 'शिवसेनेला संपवणार कोण?' या मथळ्याचा लेख आठवला. या लेखात त्यांची वैचारिक मांडणी आणि आवश्यक तेवढी धारदार लेखणी होती. या लेखात उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलं होतं ते खरं आहे. 'निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेचे अस्तित्व कधीच अवलंबून नव्हते आणि नाही!' पण मला वाटतं, निवडणुकीत मिळणारं यश आणि संख्या यावरच त्याचं मूल्यमापन होतं. सध्या कोणत्याच निवडणुका नाहीत. दसऱ्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख सत्तेतील सहभाग काढून घेण्याची शक्यता असल्याचे म्हटलं जातं आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असंही म्हटलं जातंय. पण तांत्रिकदृष्टया याची शक्यता कमीच वाटते कारण शिवसेनेनं भाजपला पाठींबा न देताही भाजप सत्ताधारी बनलीय, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवीय. आजवरच्या निवडणुका ज्या झाल्यात त्यावेळी पक्षाचा उमेदवार देताना मूळ विचार थोडासा बाजूला ठेवला गेला होता. काही करुन झेंडा लावण्याचा ध्यास घेतल्यामुळे 'सिट नक्की आणणार' असा आव आणणाऱ्यांना तिकिटं वाटली गेली. पैसा खर्चायची ताकद बघितली गेलीच, पण गुंडगिरी करण्याची ताकदही बघितली गेली आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इमानदार, निष्ठावान, सरळमार्गी कार्यकर्त्यांना डावलून नको त्यांना तिकिटं दिली. लोकांनी त्यांचे तीनतेरा वाजविले. अनेक ठिकाणी उमेदवार हे लादले गेले! ह्या उमेदवारी मिळालेल्या अनेक महाभागांना नागरिकांच्या हितासाठी लढण्याचा ध्यास नव्हता. सिट जिंकण्याचा होता. ही वृत्ती प्रारंभी शिवसेनेत नव्हती; मात्र सत्तेची ऊब घेतल्यानंतर हे सारं अवतरलं.

*शोध घ्यायलाच हवा*
उद्धव ठाकरे यांनी त्या लेखात बंडखोरीच्या संदर्भात जे रूपक दिलं होतं ते खूपच समर्पक होतं. 'श्रीमंतांची जशी काही दुखणी असतात, काही आजार असतात; तसंच इथं झालं आहे, असं मला वाटतं. बंडखोरी हा सत्तेला मिळालेला शाप आहे!' पण बंडखोरी हे लक्षण आहे, दुखणे नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात घ्यायला हवी. कपाळ दुखतं, पण त्याचं कारण अपचन असू शकत, रक्तदाब असू शकतो वा अन्य काहीही असू शकतं. बंडखोरी हे दुखणं नाही तर लक्षण आहे. लाडबाजी, गटबाजी, पैशाचा प्रभाव, गुंडगिरीचा दबाव या गोष्टी शिवसेनेत एकेकाळी निश्चित नव्हत्या.आज याचा किती प्रभाव आहे याचा शोध उद्धव ठाकरे यांनीच घ्यावा. अगदी स्वतःपासून!

*लोकांनी संघटना वाढवली*
ज्यांना कांहीं साधायचं असतं, अशी माणसं मोठ्या साळसूदपणे कुणाला तरी पुढं करीत असतात. मोगली सत्तेनं मांडीवर खेळणारे अनेक बाळबादशहा पाहिले. त्यांना मांडीवर घेणारे फाजील महत्वाकांक्षी सरदार ना बादशाही बनवू शकले ना बादशहा! शिवसेना आणि तिचं नेतृत्व यांचं बळ लोकमानस हेच आहे. लोकांनी ही संघटना वाढविली. लोकांना बाळासाहेबांना 'जाणता राजा' एवढं मोठं केलं. ते करताना त्यांना पारखून घेतलं. पण लोकांनी त्यांना मानलं. लोकशाहीसाठी हा माणूस लोकनेता व्हावा ही लोकेच्छा होती. लोकशाही समर्थ होण्यासाठी लोकशाहीच्या सध्याच्या स्वरूपावर हल्ला चढवणारा, ठाकून, ठोकून लोकांचा स्वाभिमान, प्रतिकार शक्ती आणि समज वाढवणारा बेधडक नेता हवा असं लोकांनाच वाटत असावं; पण त्याचा अर्थ लोकांना हिटलर हवा आहे असा नक्कीच नव्हता. तसं न मानणाऱ्या मतलबी नेत्यांनी शिवसेनेवर कबजा करुन उद्धव ठाकरेंनाही भ्रामक पातळीवर नेलं. चमत्कार घडविण्याची भाषा, बढाया वाटतील अशा घोषणा आणि वाढवलेलं व्यक्तिस्तोम ही 'प्रबोधनकारां'ची परंपरा निश्चित नव्हे! खुषीकरणाचे सवंग मार्ग वापरून त्यांनी एक मोठं नेतृत्व पुरतं गारद केलं. हे लोक 'शिवसेनेला संपवणार कोण?' या प्रश्नाचं उत्तर कुणाला शोधूच देणार नाहीत. सापडूही देणार नाहीत.

*यशापयशाची छाननी व्हायला हवी*
अत्याचारावर, अन्यायावर वाघाप्रमाणे तुटून पडणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांबद्धल त्यांनी म्हटलं होतं वा बाळासाहेबांच्या तोंडी घालण्यात आलेली उद्विग्नतेची भाषा नाकारतंय कोण? पण उद्धव ठाकरे जे बोलत नाहीत त्याचं काय? 'घाव घाली निशाणी' या प्रबोधनकारांच्या वृत्तीनं शिवसेनेच्या आजकालच्या यशापयशाची छाननी व्हायला हवी, ती त्यांनी अलिप्ततेनं करायला हवी. इतरांना न सांगता येणाऱ्या गोष्टी तेच अनुभवू शकतात. प्रतिष्ठा आणि पैसा हे सर्व पापं झाकणारी पांघरूण आहे, असं मानलं जाण्याचं दिवस आता संपलेत. आपल्या जीवावर प्रतिष्ठा आणि पैसा मिळविणारे आपल्याला हवं ते करत नाहीत असं दिसताच हिशेब चुकते केले जात आहेत. 'आता काही खरं नाही', या बोलण्यात काय दडलंय याचा शोध घ्यायला हवाय.

*निष्ठेवर धंदेवाईक दृष्टीनं मात*
फक्त निष्ठेचं बळच हे राजकारण बदलू शकतं. आणि अशी निष्ठा शिवसेनेनं जागविली होती. या निष्ठेवर धंदेवाईक दृष्टीनं कधी मात केली याचाही शोध घ्यायला हवा. भ्रष्टाचार वरून खाली पाझरतो. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी जेव्हा डोळ्यांत भरण्याएवढ्या ऐश्वर्याचे धनी झाले तेव्हा निष्ठेची वाट जाणणारी पावलं विसावली. मोटारींच्या पावलांना वाटेचं सोयरसुतक नसतं.... हे जाणलं पाहिजे. आज आपल्याला निष्ठावंत शिवसैनिकांची वानवा जाणवतेय. पूर्वी शिवसेनेसाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेले शिवसैनिक होते. आता सगळीकडेच सटोडीये झाले आहेत. शिवसेनेत 'रावांचे रंक झाले, भिकाऱ्यांचे बाजीराव बनले' असे दत्ताजी साळवी म्हणत असत. ज्यांचे कर्तृत्व, निष्ठा नांव ठेवायला जागा नाही, त्यांच्याबद्धल कुणी वावगा शब्द उच्चारत नाहीत. ज्यांच्याकडून जनहिताच्या काम होत आहेत, त्यांच्या गैरगोष्टीही पोटात घालण्याएवढे उदार लोक असतात; पण ज्यांनी केवळ स्वार्थच बघितला, ज्यांनी सर्वसामान्य माणसांना छळायचं सोडलं नाही, ज्यांनी सतत नेत्यांना अंधारात ठेवलं आणि चमच्याचे ताफे बनवून लोकांची खरी भावना नेत्यांपर्यंत पोहोचू दिली नाही, त्यांना सहजपणे वगळण्याची संधी निवडणुकांच्या काळात असते. पण, चांगल्या कार्यकर्त्याला डावलून नको त्याचीच नेमकी निवड कशी झाली? उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी म्हणून जे काही केलं त्यानं कार्यकर्त्यांचा आवाज चिरडण्यासाठी वापरला की काय? आज खरी गरज आहे ती कार्यकर्त्यांना सांभाळण्याची, त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची नाही तर यातून शिवसेनेचा कळस कापून नेण्याचा प्रकार होऊ शकतो, उध्दवसाहेब लक्ष द्या पक्षाच्या कळसाकडे...!


चौकट
---------
*ठणठणीत रुपय्यावाले जमा झाले*
सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये लोकसेवेच व्रत आजही कायम आहे. मात्र नेत्यांचा कल अर्थपूर्ण कामांकडेच झुकलेला आहे. विधायक कामांसाठी सत्तेची वा राजकारणाची गरजच नसते. बाळासाहेबांना हे नक्की ठावूक होतं म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळात राजकारणापासून दूर राहण्याचा निर्धार केला होता. 'राजकारण हे गजकर्णासारखं असतं ते जेवढं खाजवू तेवढं वाढतं' असं ते जाहीरपणे म्हणत. पण शिवसेनेच्या लोकप्रियतेच्या लाटेवर जी अनेक मंडळी वाहून आली त्यांना मतपेट्या दिसू लागल्या. त्यांनी मग लोकसेवेसाठी महापालिका हातात असण्याची गरज असल्याची जाणीव झाली. त्यावेळी राजकारणात न जाता नगरसेवा करण्यासाठी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असं म्हणत महापालिका ताब्यात घेतली. पुढं राज्यकारणाचा प्रारंभ झाला. ठाकरे घराण्यातील चौथ्या पिढीनं तर १०० टक्के राजकारणाची घोषणाच करून टाकली. त्यामुळे राजकारणातले सारे गैरप्रकार इथंही शिरले. निष्ठावन्त दुरावले अन 'ठणठणीत रुपय्या'वाले जमा झाले, त्यांनीच आज विळखा घातलाय.
...............................................
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...