Thursday 5 October 2017

विस्मृतीत गेलेले जॉर्ज फर्नांडिस!

*विस्मृतीत गेलेले जॉर्ज फर्नांडिस...!*

"भारतीय राजकारणात अनेक शोकांतिका पाहायला मिळतात. त्यामुळेच त्याला शक्यतांचा खेळ-गेम ऑफ पोसीबीलिटीज असं म्हटलं जातं असावं. यापूर्वी अनेक समाजवादी त्यांच्या भोंगळपणामुळे कसे करुण रसास पात्र ठरले, हे दिसलं आहे, त्यात सर्वात जास्त वरकड म्हणता येईल असं परस्परविरोधी वर्तन जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून झालं आहे. सध्या ते राजकारणात नाहीत. खरं तर पंधरा वर्षांपूर्वी जॉर्जसाहेबांची राजकारणातून 'एक्झिट' झाली होती. परंतु तेव्हांची राजकीय स्थिती वेगळी होती. ज्या राजकीय नेत्यांनी म्हणजे शरद यादव, नितीशकुमार यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्याच शरद यादव आणि नितीशकुमार यांना जॉर्जना राज्यसभेवर निवडून आणावं लागलं होतं. तेव्हा जॉर्ज भाजपेयींची सत्ता असताना देखील जोमात होते. जॉर्जसारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याला तेव्हा वाटत होतं; काँग्रेसविरोधी स्पेस आपणच वापरत आहोत. पण त्यांना आजवर कळलं नाही की, आपलं सारं राजकारणच नव्हे तर आयुष्यही सतत कुणी ना कुणी वापरलेलं आहे!"
-------------------------------

*अ*टल बिहारी वाजपेयींच्या सरकारात एक वजनदार मंत्री आणि एनडीएचे निमंत्रक राहिलेले लढाऊ कामगारनेते, कुशल राजकारणी आणि धुरंधर समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस आज एक असहाय, गलितगात्र अवस्थेत लाचार जीवन कंठताहेत. राजकारणात नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार घातला जातो. भाजपेयींना सत्तेपर्यंत पोहोचविणाऱ्या त्या मार्गदर्शक व्यक्तीला आज सारेच विसरले आहेत. आणीबाणीच्या काळात एक 'फायर ब्रँड' नेता म्हणून लोकांसमोर आलेला हा नेता आज स्मृतिआड गेलेला जाणवतोय, एक 'गुमनाम जिंदगी' जगतो आहे.
२०१० जून महिन्यातील घटना. जॉर्ज यांच्या घराचा दरवाजा बंद होता आणि दरवाजाबाहेर जया जेटली, मायकेल आणि रिचर्ड फर्नांडिस उभे होते. जॉर्ज यांचे केअर टेकर के.डी. सिंह यांनी त्यांना घरात येण्यापासून रोखले होते. जया यांचं म्हणणं होतं की, त्या आपलं पुस्तकं, पेंटिंग व इतर साहित्य घेण्यासाठी आलेय. जया जेटली यांनी प्रथमच अशाप्रकारे रोखण्यात आलं होतं. २००९ मध्ये लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर जॉर्ज यांची आर्थिक स्थिती खूपच खालावली होती. त्यांना दिल्लीत राहण्यासाठी घरच नव्हतं. याचवेळी जॉर्ज अल्जाइमर या व्याधीनं त्रस्त झाले होते. त्यांच्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी भाड्याच्या घराचा शोध सुरू केला होता. मात्र तीन महिन्यानंतर राजकीय घडामोडी झाल्या अन त्यांची राज्यसभेवर निवड झाली. आणि त्यांचा घराचा शोध थांबला.

*जॉर्ज यांचं प्रेम*
४ ऑगस्ट २००९राजी अलजाईमर पीडित जॉर्ज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेत होते तेव्हा त्यांच्याशेजारी एक महिला उभी होती. त्या होत्या लैला कबीर! जवळपास २५ वर्षांनंतर लैला जॉर्ज यांच्या जीवनात परतल्या होत्या. या त्याच लैला होत्या कुण्या काळी जिच्यावर जॉर्ज यांनी वेड्यासारखं प्रेम केलं होतं.
१९७१ मध्ये दिल्ली ते कलकत्ता या विमान प्रवासात जॉर्ज यांची लैला यांच्याशी प्रथम भेट झाली. हा आणखी एक योगायोग होता की, दोघेही त्यावेळी सुरू असलेल्या बांगला देशात चाललेल्या युद्धाच्या वातावरणातून परतत होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर जॉर्ज यांनी लैलाला तिच्या घरापर्यंत सोडण्याची तयारी दाखविली पण ती तिने नाकारली. पण 'पहलीही नजरमें प्यार हो गया' अशी दोघांची अवस्था झाली. त्यानंतर दिल्लीत ते अनेकदा एकमेकांना भेटले. एका महिन्यातच जॉर्जने लैलाला लग्नाची मागणी घातली. लिफ्ट नाकारणाऱ्या लैलानं जॉर्जना नकार देऊ शकली नाही. २२ जुलै १९७१ रोजी दोघांचा विवाह झाला. या दोघांना कालांतरानं एक मुलगा झाला त्याचं नाव शॉन फर्नांडिस!

 *आणीबाणी ते भूमिगत*
२५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू झाली. तेव्हा जॉर्ज आणि लैला ओरिसाच्या गोपाळपूर इथं सुट्टी साठी गेले होते. तेव्हापासून जॉर्ज भूमिगत झाले. जवळ जवळ २२ महिने जॉर्ज आणि लैला यांच्याशी संपर्क राहिला नाही. दरम्यान लैला आपल्या मुलाला घेऊन अमेरिकेला निघून गेल्या. आणीबाणी संपल्यावर जॉर्जने लैलाचा शोध घेऊन अमेरिकेत संपर्क साधला आणि भारतात परतण्याची विनंती केली. पण काही गोष्टींमुळे त्या परतल्या नाहीत.
*आणखी एक नवं नातं*
कालौघात जॉर्ज आणि जया जेटली यांचं नातं राजकीय वर्तुळात बहरत होतं. दोघांमधलं नातं हे केवळ राजकीय सहकारीच नाही तर त्याहून अधिक काही तरी होतं. याची चर्चा लैलापर्यंत गेली तिनं तिथून जॉर्जला घटस्फोटाची कागदपत्र पाठविली, जॉर्जने मात्र त्याचं उत्तर दोन सोन्याच्या बांगडया पाठवून दिलं.

*नाटकीय मिलन*
लैला यांची जॉर्जच्या जीवनात परतणं देखील तेवढीच मजेशीर गोष्ट आहे. २००७ ची ही घटना आहे, दीर्घ कालावधीनंतर अचानकपणे मुलगा शॉन याची गाठ पडली. तो खूप भावनिक क्षण होता. दोघात जे काही घडलं ते खूपच कौटुंबिक होतं. याचा परिणाम असा झाला की, तब्बल २३ वर्षांनंतर जॉर्जने प्रथमच लैलाशी फोनवर बोलणं झालं. शॉनला आपल्या वडिलांच्या आजाराबाबत इथं आल्यानंतर कळलं. लैलाचं म्हणणं असं झालं की, जॉर्जला कधी नव्हे इतकी आता त्यांची गरज आहे याची जाणीव झालीय. त्यामुळे लैला जॉर्जच्या जीवनात दुसऱ्यांदा परतली.

*जॉर्ज जीवनातील टर्निंग पॉईंट*
२ जानेवारी २०१० च्या दुपारी दोन वाजता लैला जॉर्जच्या घरी पोहोचते. तिच्यासोबत मुलगा शॉन आणि सूनही होती. लैला घरातल्या एका खोलीत जॉर्जसोबत स्वतःला बंद करून घेतलं. ती जेव्हा त्या खोलीतून जॉर्जसह बाहेर पडते तेव्हा जॉर्जच्या अंगठ्यावर शाई लागलेली दिसत होती. त्यानं सारेच आश्चर्यचकित होतात. याप्रमाणे जॉर्जची पॉवर ऑफ ऑटर्नि जी नोव्हेंबर २००९ मध्ये जया जेटलींचा नावे होती ती आता लैलाच्या नावे झालेली होती. हे सारं होतं जॉर्जच्या १३ कोटी रुपयांच्या संपत्तीचं!

*जयाची कोर्टात धाव*
जया जेटली गप्प बसणाऱ्या नव्हत्या त्यांनी २०१० मध्ये लैलाच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यात म्हटलं होतं की जयाला जॉर्ज यांना भेटू दिलं जात नाही. ज्या जॉर्जसोबत त्या तब्बल ३०वर्षे राहिल्या होत्या. २०१२ एप्रिल महिन्यात याचा निकाल दिल्ली हायकोर्टानं दिला जो जया यांच्या विरोधात होता. जया मग या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेल्या. न्या. पी. सदाशिव बेंचने हायकोर्टाचा निर्णय बदलला. त्यानंतर त्या दोघी एकत्र जॉर्ज यांच्या सोबत दिसल्या त्या जॉर्ज यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने. त्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा अज्ञातवासात गेले, कदाचित यालाच राजकारण म्हणतात!


*जिथून प्रारंभ तिथंच शेवट*
राजकारण कधी कुणाचा कायमचा मित्र वा शत्रू असत नाही असं म्हणतात. जॉर्जच्या बाबतीत हे खरं ठरतं. ज्या नितीशकुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर बसविण्यासाठी जॉर्जनं आपली शेवटची खेळी खेळली, त्याच नितीशकुमारांनी जॉर्जच्या राजकारणातील अखेरचे दिवस मोजायला लावले. मुंबईत सुरू झालेलं जॉर्जचं राजकारण खऱ्या अर्थानं बिहारात बहरलं आणि तिथंच अस्तगत झालं. एवढंच नाही तर ज्या जॉर्जला मुजफ्फरपूरवासियांनी सहा वेळा निवडून दिलं तेही आज त्यांना विसरले आहेत.

*राजकारणातला हिरो*
भारतीय राजकारणात अनेक आश्चर्य घडून गेले आहेत. म्हणजे पराकोटीची प्रतिकूल परिस्थिती असताना अनेकांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं आहे. अशा अनेकांपैकी जॉर्ज फर्नांडिस हे ही एक नाव आहे. कर्नाटकात जन्मलेला, मुंबईत वाढलेला, आणि बिहारमधून सहा-सात वेळा निवडून येण्याचं कर्तृत्व असलेला नेता! असं कर्तृत्व आजचा मनसे फॅक्टर कुणाला गाजवू देईल का? पण तरीही जॉर्ज यांनी ते शक्य करुन दाखवलं होतं हे इथं लक्षात घ्यायला हवं. १९६७ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईचे कथित सम्राट स. का. पाटील यांचा केलेला पराभव इतर कोणत्याही नेत्यांच्या पराभवापेक्षा कितीतरी मोठा होता आणि आहे. त्यानंतर जॉर्ज हे भारतीय राजकारणातील अनेकांचे हीरो बनले. काँग्रेसविरोधी आवाज बनले. ते कधीही काँग्रेसच्या कच्छपी लागले नाहीत, ही त्यांची ओळख असेलही. मात्र त्यापलीकडे जाऊन त्यांच्या काँग्रेसविरोधात काही वैचारिक, नैतिक आणि मुख्य म्हणजे सत्तेचं राजकारण संपून उरणारं काही समाजहित दिसतं का? तर या सर्वच प्रश्नांचं उत्तर अर्थातच नाही असंच आहे. जॉर्ज साहेबांच्या आज दिसणाऱ्या राजकीय विफलतेची बीजं तशी खूप जुनी आहेत. त्यांचं शेवटचं ढोंग समजून घ्यायचं, तर पहिली छोटी-छोटी ढोंगं समजून घेऊनच पुढं जावं लागेल.

*स.का.पाटील यांचा पराभव*
भारतीय राजकारणात साठ वर्षांपूर्वी नुकतंच कुठं काँग्रेसविरोधी तत्वज्ञान जन्माला आलं होतं. म्हणजे त्या विरोधाचं सूत्र असं की, काँग्रेस पक्षाला सर्व पातळ्यांवर विरोध करायचा. तो विरोध करताना आपल्याबरोबर कोण आहे, याची शहानिशा करायची नाही. पर्वाही करायची नाही. डॉ. राम मनोहर लोहियांचा समाजवादी पक्ष १९६० च्या दशकात उत्तर भारतात काँग्रेसला अनेक ठिकाणी धडका मारीत होता. त्याच पक्षाच्या पुढाकाराने अनेक समाजवादी साथी आणि जनसंघीय एकत्र आले. जॉर्ज अशांचा एक शिलेदार! हे साहेब मुंबईतून लोकसभेसाठी उभे राहिले. त्यांच्या विरोधात उमेदवार होते, स. का. पाटील. ते मुंबई काँग्रेसचे महत्वाचे पुढारी. मुंबईतल्या थैलीशहांच्या 'बॅगा' काँग्रेस पक्षासाठी खुल्या करण्याचं काम याच पाटील महोदयांकडे होतं. त्यांची ताकद मोठी. पक्षातही त्यांचा शब्द अखेरचा असायचा! त्यांचा पराभव ही त्यावेळी अशक्य कोटीतली वाटणारी गोष्ट! मात्र जॉर्जनी भिंती-भिंतीवर घोषणा लिहिली, 'होय, तुम्ही स.का. पाटील यांचा पराभव करू शकता' ही वाक्यरचना होकारार्थी होती. मात्र त्यात खच्चून नकार भरलेला होता. त्याशिवाय यांची पंधरा-वीस वर्षांची कारकीर्द अशी की, त्यांच्या विरोधात बरीच सत्ताविरोधी भावना समाजात साचलेली. जॉर्ज एक निमित्त ठरलं. ते विजयी झाले. मुंबईच्या फुटपाथवर वाढलेला आणि मुख्य म्हणजे सामान्यांच्या हिताची भाषा बोलणारा माणूस निवडून देताना मुंबईकरांनी कधी आपला हात आखडता घेतला नव्हता. पण ज्या कारणासाठी जॉर्जला निवडून दिलं होतं, ते कारण जॉर्जनी लक्षात ठेवलं का? म्हणजे ज्या स.का.पाटील, मोरारजी देसाई यांच्या भांडवली वर्तनाला त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विरोध होता. तोच मुद्दा त्यांनीं नेटानं लढला का? समाजवादी अर्थव्यवस्था राहू देत; आधी संमिश्र अर्थव्यवस्था कठोरपणे राबविण्यासाठी तरी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून सरकारवर अंकुश ठेवला का? अर्थात नाही! त्यांच्या वैचारिक पंडितांचं आणि ते तत्वज्ञानी हाडामासी भिनवून घेतलेल्या जॉर्ज यांचा एकच ध्यास होता...तो म्हणजे काँग्रेसचा नाश! तो नाश करताच नकळत देशाच्याही मूळ ढाच्याचं काही नुकसान झालं, तरी त्यांना पर्वा नव्हती.

*रेल्वेचे पुढारी*
१९७१ च्या बांगलादेश युद्धानंतर इंदिरा गांधींचा लोकसभेत पुन्हा एकदा मोठा विजय झाला. 'गरिबी हटाव'चा नारा हा त्यावेळचाच! इंदिराजींचा तो विजय त्यांच्या सर्व विरोधकांच्या जिव्हारी लागला. ते चवताळले. असं चवताळणं पहिल्यांदा विवेकाचा बळी घेतं. त्यावेळी संपूर्ण कामगार चळवळीवर साम्यवादी वा समाजवादी साथीचं वर्चस्व होतं. जॉर्ज रेल्वे कामगारांचे पुढारी. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला. 'रेल्वेचा चक्का कसा जाम होतो', हे १९७४ च्या त्या संपाने दाखवून दिला. या संपातूनच पुढे बिहार आणि इतर राज्यात अनेक आंदोलने पेटली. अर्थात, या संपामागचं खरं ईप्सित कामगारांना न्याय देणं हे होतं, की राजकीय डाव साधणं, हे त्यावेळी स्पष्ट झालं नव्हतं. मात्र उद्देश स्पष्ट होता. त्यांचं राजकारण त्यातून साध्य झालं. शक्य तेवढं अराजकही त्यांनी माजवलं. 'दुसरे गांधी' असं ज्यांना म्हटलं जातं, त्या जयप्रकाश नारायण यांनी तर पोलीस आणि लष्कराला बंड करायला सांगितलं. आपली सत्ता राहावी यासाठीच इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. मात्र त्यासाठीची कारणं जॉर्जसारख्या विरोधकांनी तयार करून ठेवली होती. इथून पुढे जॉर्जसाहेबांच्या वैचारिक पतनाने, शोकांतिकेने वेध घेतला.

*निष्ठा बदलत गेल्या*
ज्या स.का.पाटील वा त्यांचे नेते मोरारजी देसाई यांना जॉर्जसारख्यांनी कडवा विरोध केला, त्यांनाच त्यांच्या धोरणासकट जनता पक्षाच्या प्रयोगात त्यांना स्वीकारावं लागलं. जातीयवादी आणि भांडवलवादी हे देशाचे समान शत्रू आहेत. ते आमच्यापासून समान अंतरावर आहेत, असं जे अनेक साथी वा साम्यवादी म्हणत होते, त्यांनी त्यापूर्वी १९६७ मध्ये आणि त्यानंतर ,१९७८ मध्ये त्यांच्या हातात हात घालून जनसंघाला राज्यघटनेद्वारा स्थापित सत्तेची चव चाखू दिली. त्यावेळच्या जनता पक्षात इतर अनेक पक्ष आपापले अस्तित्व विसर्जित करून सामील झाले होते. मात्र जनसंघाचे सदस्य रा.स्व.संघाचेही सदस्य होते. मधु लिमये आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी याच मुद्यावर जनता पक्ष फोडला. पुढे दहा वर्षांनंतर पुन्हा त्याच जनसंघीय व द्विसदस्यत्व   पॉलिसीवालीवाल्या लोकांच्या पाठींब्यावर जॉर्ज फर्नांडिस ज्या पक्षात होते, त्या जनता दलाचे सरकार सत्तेत आलं. ज्या जनता पक्षात असताना त्यांनी कोकोकोला, आयबीएम सारख्या कंपन्यांना उद्योगमंत्री या नात्यानं देशाबाहेर घालावलं होतं, त्यासारख्या हजारो कंपन्यांनी त्यानंतर लगेचच देशात धुमाकूळ घातला. त्यांना इथं रुजण्यापाडून ना जनता पक्ष रोखू शकला, ना त्यांची वाढ रोखण्यास जनता दलाला यश आलं. साथी जॉर्ज अणुबॉम्बच्या विरीधात अखंड भाषण करीत असत. 'राजस्थानच्या वाळवंटात बुद्ध हसला नव्हता; तर बुद्धाचा बाईंनी विध्वंस केला' अस ते म्हणत. मात्र त्याच जॉर्जना, दुसरी अणूुचाचणी करणाऱ्या 'भाजप आघाडीच्या सत्तेत सामील असल्यानं सामुदायिक जबाबदारीचं तत्व म्हणून ते पाप वाहावं लागलं. त्यापूर्वी सारं धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान त्यांनी गंगा-यमुना नदीत फेकून दिलं होतं.


*एकमेव संरक्षणमंत्री*
जॉर्ज फर्नांडिस हे एनडीए या राजकीय आघाडीचे अनेक वर्षे निमंत्रक होते. त्यापूर्वी त्यांनी कितीतरी पक्ष फोडले; स्थापन केले याची गणना नाही. सत्तेवर आल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस विविध खात्याचे मंत्री राहिले. मात्र त्यांची कारकीर्द  लक्षात राहिली ती संरक्षणमंत्री म्हणून. सियाचिनच्या आघाडीवर १८ वेळा ते गेले. आजपर्यंत कोणताही संरक्षणमंत्री तिथे एवढ्यावेळा गेला नव्हता. त्यांनी या खात्याचं काम सैनिकांच्या लक्षात राहील असं केलं. मात्र विष्णू भागवंतांना अडमिरल पदावरून घालवून देण्याचं त्यांचं कृत्य हे त्यांच्या अनेक विसंगत वर्तनापैकी एक होतं. त्यानंतर तहलकाने त्यांचं बिंग फोडलं. त्यांच्या घरातून चालणारे घोटाळे बाहेर आणले. जॉर्ज यांच्या बाकी कुटुंबाचा थांगपत्ता नाही; मग ज्या जेटली या त्यांच्या कोण? आणि त्या काय म्हणून त्यांच्या घरात राहतात? अशी चर्चा-टीका स्वतःच्या हाताने कपडे धुणाऱ्या व साधं वर्तन असणाऱ्या जॉर्ज यांच्यावर त्यावेळी झाली होती. जॉर्ज त्याकाळात प्रचंड बदनाम झाले. अनेक बदमाशांची आणि बदमाशांच्या समूहाची त्यांना कळत नकळत वकिली करावी लागली. १९६० आणि १९७० च्या दशकात त्यांची जी प्रतिमा होती ती जॉर्ज यांनी स्वतःच छिन्नविच्छिन्न करून टाकली. पुढे एनडीएची सत्ता गेली. त्यांच्या समता पार्टीची सत्ता बिहारात आली. मात्र जॉर्ज यांची उपयुक्तता तोवर संपली असल्याचं त्यांच्याच चेल्याचं म्हणजे शरद यादव आणि नितीशकुमार यांचं मत बनलं. त्यांनी जॉर्जना केराच्या टोपलीतच काय ते टाकायचं बाकी होतं. ज्या मुजफ्फरपूरमधून ते सहा वेळा निवडून आले होते, तिथून त्यांच्या चेल्यांनी साधी लोकसभेची उमेदवारीही दिली नाही. एव्हाना जॉर्जना वार्धक्यानं घेरलं होतं. वय ८० च्या आसपास पोहोचलं होतं. जॉर्जच्या सुंभ जळला होता; मात्र पीळ कायम असल्यानं त्या वृत्तीनं त्यांना त्या वयात अपक्ष म्हणून लोकसभेसाठी अर्ज भरायला लावला. जॉर्ज साहेबांची तेव्हा अनामत रक्कमही राहिली नाही. त्यांना पक्षातूनही बाहेर जावं लागलं. जॉर्जच्या राजकीय नाटकाचे तिन्ही अंक संपले होते.पण ती शोकांतिका तेवढयावरच थांबली नाही. राजकीय जीवनाचे तीन अंक संपले तरी ते बाजूला जायला तयार नव्हते. त्यांनी नितीशकुमार सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी, रस्त्यावर उतरण्यासाठी, आरोपांचा भडिमार करण्यासाठी नितीशकुमार यांचे विरोधक आणि पक्षातील मान्यवरांची बैठक दिल्लीत आयोजित केली. नितीशकुमारांनी आपल्या विरोधातलं हे षडयंत्र रोखण्यासाठी जालीम उपाय शोधला. त्यांनी आपल्या दूतामार्फत जॉर्ज यांना बिहारमधून निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या जागेचे उमेदवार म्हणून नियोजित केलं. ज्या जेटलींचा जॉर्जच्या या पुनर्रप्रतिष्ठापनेला विरोध होता. मात्र तोपर्यंत जॉर्ज आपल्या चेल्याला हो म्हणाले होते. चेल्याला एका दगडात अनेक पक्षी घायाळ करायचे होते. जॉर्जचे नवे हनुमान दिग्विजयसिंग, जेटलीताई, आणि शरद यादव यांना परस्पर शह मिळाला. जॉर्ज सर्वांनाच परम आदरणीय! त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले.

*जॉर्जना सगळ्यांनीच वापरलं*
भारतीय राजकारणात अनेक शोकांतिका पाहायला मिळतात. त्यामुळेच त्याला शक्यतांचा खेळ-गेम ऑफ पोसीबीलिटीज असं म्हटलं जातं असावं. यापूर्वी अनेक समाजवादी त्यांच्या भोंगळपणामुळे कसे करुण रसास पात्र ठरले, हे दिसलं आहे, त्यात सर्वात जास्त वरकड म्हणता येईल असं परस्परविरोधी वर्तन जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून झालं आहे. सध्या ते राजकारणात नाहीत. खरं तर पंधरा वर्षांपूर्वी जॉर्जसाहेबांची राजकारणातून 'एक्झिट' झाली होती. परंतु तेव्हांची राजकीय स्थिती वेगळी होती. ज्या राजकीय नेत्यांनी म्हणजे शरद यादव, नितीशकुमार यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्याच शरद यादव आणि नितीशकुमार यांना जॉर्जना राज्यसभेवर निवडून आणावं लागलं होतं. तेव्हा जॉर्ज भाजपेयींची सत्ता असताना देखील जोमात होते. जॉर्जसारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याला तेव्हा वाटत होतं; काँग्रेसविरोधी स्पेस आपणच वापरत आहोत. पण त्यांना आजवर कळलं नाही की, आपलं सारं राजकारणच नव्हे तर आयुष्यही सतत कुणी ना कुणी वापरलेलं आहे.

*इतिहासाची पुनरावृत्ती*
जे राजकारण नितीशकुमार यांनी आपल्या गुरुबरोबर केले दुर्दैवाने तशीच अवस्था नियतीनं त्यांच्यावर आणलीय. लालूंच्या विरोधात जाऊन जॉर्ज, शरद यादव, नितीश कुमारांनी समता पार्टी काढली अन भाजपेयींशी सत्तेसाठी संधान साधलं होतं. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती ही अशी आज जॉर्जच्या चेल्याला लालूंशी घटस्फोट घेऊन भाजपेयींच्या पदराला लटकावे लागले आहे. असो.... आज जॉर्ज गलितगात्र बनले आहेत, त्यांना स्मृतिभ्रम झालाय. विकलांग अवस्थेत ते आहेत नाहीतर जॉर्जना जे ओळखतात त्यांना खात्री वाटली असते की ते आपल्या शोकांतिकेतही पाचव्या अंकाचे आराखडे मांडले असते. आणि आपली उपद्रवमूल्ये दाखवून दिले असते.

हरीश केंची, मो.८७८८२११६८९


No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...