Sunday 23 April 2017

जातिनिर्मूलन हे हिंदुत्वापुढचे आव्हान...!

*जातिनिर्मूलन हे हिंदुत्वापुढचे आव्हान...!*

नुकताच गुढीपाडवा झाला! हिंदू नववर्षाचा प्रारंभ! शालिवाहन शकाचा प्रारंभ! यानिमित्तानं हिंदुधर्मीयांचं संघटन व्हावं यासाठी पुण्यात, ठाण्यात, गिरगावात, डोंबिवलीत, कल्याणात हिंदू संस्कृती दिन, हिंदुत्व दिन साजरा झाला. मिरवणुका निघाल्या, जयघोष झाले. देशात 'नरेंद्रशक्ती' अवतरल्याने काहींना जोर आला आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीतील विजयानंतर तर हिंदुत्वाच्या पुरस्काराच्या बाता मारल्या जाताहेत. पण खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक असं हिंदुत्व अस्तित्वात येईल का? हा खरा प्रश्न आहे. हिंदू आणि हिंदुत्ववादी मंडळी हिंदुधर्मीयांमधील जातीयता जोवर साफ करीत नाहीत तोपर्यंत त्यांना हिंदू आणि हिंदुत्वाला राष्ट्रीयत्वाचा मुकुट घालता येणार नाही. जातीभेद नष्ट करण्याची क्षमता धर्मनेतृत्वात नाही तशी ती आजी माजी हिंदुत्ववाद्यातही नाही. आपली ही नालायकी झाकण्यासाठीच ते मुस्लिम आणि ख्रिस्त्यांच्या कट्टरतावादाकडे बोट दाखवत असतात. ती मुस्लिमांची कट्टरता मोडून काढण्याचीही जरुरी आहे. परंतु त्यासाठी प्रथम हिंदूंमधील जातीभेद मोडून काढावा लागेल. जातीभेद, देववाद, दैववाद यासारखे शक्तिपात करणारे भेद पोटात साठवून भारताच्या अखंडतेला पोखरणाऱ्या हिरव्या, पांढऱ्या किड्यांना साफ करता येणार नाही. त्यासाठी आपल्या धर्माचा अहंकार आणि त्याचा गैरवापर प्रथम खाक करायला हवाय. याचं भान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. केशवराव हेडगेवार यांना होत. म्हणूनच त्यांनी संघाचं नाव निश्चित करताना 'हिंदू' शब्द बाजूला ठेवून 'राष्ट्रीय' शब्दाचा स्वीकार केला. या दृष्टिकोनाचामागचा अचूकपणा सांगणाऱ्या प्रसंगाची नोंद गोळवलकर गुरुजींच्या 'विचारधन' ग्रंथात नमूद केली आहे. डॉ.हेडगेवार यांच्या विचाराने संघाची वाटचाल झाली असती तर आजचे हे संघाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते. दुर्दैवाने डॉ.हेडगेवार यांचे निधन लवकर झाले अन संघावर गोळवलकर गुरुजींच्या विचारांची पकड झाली अन संघ राष्ट्रीय न राहता हिंदूंपुरताच राहिला.

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वबाजूस 'हिंदू कॉलनी' आहे. तिथे राहणाऱ्या काहींना यातील 'कॉलनी' हा परकीय शब्द खटकला. तो बदलण्यासाठी ते एकत्र जमले होते. त्यावेळी मुंबईत आलेल्या हेडगेवारांना त्यांनी मार्गदर्शनासाठी बोलावलं. तेव्हा आपलं मत देताना डॉ. हेडगेवार म्हणाले, " तुम्ही कॉलनी शब्दांपेक्षा हिंदू शब्द प्रथम बदलला पाहिजे". त्याने तिथे जमलेल्यांपैकी कट्टर हिंदूंना धक्का बसला. त्यांनी 'तुम्ही कट्टर हिंदू असतानाही हिंदू शब्दाला तुमचा विरोध का?' असा प्रश्न डॉ.हेडगेवारांना केला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "माझा हिंदू शब्दाला विरोध नाही. परंतु विशिष्ट संदर्भात त्याचा उपयोग करण्यास माझा विरोध आहे. हिंदुस्थानात 'हिंदू कॉलनी' कशी असू शकेल? इथे इंग्रज आले आणि विशिष्ट भागात राहिले अन त्याला 'ब्रिटिश कॉलनी' संबोधलं तर आपण समजू शकतो. तसंच इंग्लंडमध्ये वास्तव्य करणाऱ्या हिंदूंनी तिथल्या विशिष्ट भागाला 'हिंदू कॉलनी'नांव देणं मी समजू शकतो. परंतु इंग्लंडमध्ये ब्रिटिश कॉलनी, अमेरिकेत अमेरिकन कॉलनी आणि हिंदुस्थानात हिंदू कॉलनी या कल्पनाच तर्कविसंगत आहेत" अर्थात त्यांचं म्हणणं कुणी ऐकलं नाही. दादरचा तो परिसर आजही 'हिंदू कॉलनी' म्हणूनच ओळखला जातो तथापि त्यांनी आपल्या संघटनेला 'हिंदू' ऐवजी राष्ट्रीय हे का दिलं हे त्यावरुन स्पष्ट होते.

आपल्या देशाचा 'राष्ट्रीय' या शब्दाचा अर्थ स्वाभाविकपणे हिंदू हाच आहे. म्हणून मुद्दाम हिंदू शब्द उपयोजण्याची गरज नाही. असं डॉ.हेडगेवार यांचं म्हणणं होतं. त्यांनी राष्ट्रीयत्वातच हिंदू आणि हिंदुत्व पाहिलं होतं.त्यांची ही भूमिका हिंदू-अहिंदू हा भेद संपवणारी आहे. पण त्यांचं म्हणणं हिंदू कॉलनीवाल्यांप्रमाणेच गोळवलकर गुरुजींनी स्वीकारलं नाही. त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही भूमिका मांडली. पुढे संघ स्वयंसेवकांनी हेडगेवारांच्या विचारापेक्षा गोळवलकरांच्या विचारांना प्राधान्य दिलं. आज त्याचाच घोषा दिल्लीतील नेत्यांपासून गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत लावला जातो आहे.

शीख, जैन, बौद्ध हे हिंदू धर्माचाच एक भाग असल्याचे संघाचे नेते नेहमी म्हणत. एकदा शिखांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना थेट अल्पसंख्यांक आयोगापुढे उभं केलं आणि शीख हा स्वतंत्र धर्म असल्याचं मान्य करायला लावलं. जैन, शीख, बौद्ध हे अल्पसंख्याक आहेत परंतु त्यांना स्वतंत्र ओळख असली तरी या धर्माच्या निर्मितीची मती आणि माती भारताचीच असल्याने त्यांना विशेष अधिकार नाहीत. या पार्श्वभूमीवर हिंदुधर्मीय भारतात बहुसंख्यांक ठरले पाहिजेत. ताज्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येत ८० टक्के हिंदू आहेत. तथापि हा ८० टक्के हिंदू समाजदेखील अल्पसंख्यांकांचा फाकट पसारा आहे. जाती-जमाती, पोटजाती-उपजाती आणि उच्चनीचतेच्या जातीय कात्रीने हिंदुधर्माच्या चिंधड्या केल्या आहेत. यामुळेच हिंदूंत ब्राह्मण अल्पसंख्यांक आहेत. ब्राह्मणात देवरुखे ब्राह्मण अल्पसंख्यांक तर किरवंत दलित आहेत. हाच प्रकार इतर जातीतही आहे. प्रत्येकाचे देव वेगळे, दैवते वेगळी, रीतिरिवाज वेगळे! फक्त दुसऱ्या जातीच्या , पोटजातीच्या तुच्छ लेखण्याची भावना तेवढी सारखी. कारणपरत्वे या जाती हिंदू म्हणून एकत्र आल्या तरी त्यानं संघटीतपणा नसतो. कारण प्रत्येकजण आपल्या जाती, पोटजातीचा, जमातीचा वेगळेपणा शाबूत ठेवून एकत्र आलेला असतो. जाती भावनेच्या वर्चस्वामुळे हिंदूंत धर्मासाठीचा संघटीतपणा, कडवेपणा दिसत नाही. क्वचितप्रसंगी दिसला तरी तो जुजबी असतो, फसवा असतो. यामुळेच 'हिंदू संघटन' हे महत्त्वाचं उद्दिष्ट असलं तरी ते फार दूर राहिलं आहे. जाती संस्था हाच हिंदू संघटनेतला मुख्य अडसर आहे. हा अडसर असेपर्यंत भारतात हिंदू कधीही बहुसंख्यांक होऊ शकणार नाहीत. हिंदू बहुसंख्यांक होण्यासाठी जाती संस्थेचा नायनाट हाच एकमेव इलाज आहे. परंतु सगळेच पक्ष, संघटना जातीचे हिशेब करून आपले डाव टाकतात, विचारवाद रेटतात. राजकारण खेळतात.हे ढोंगच अल्पसंख्यांकांना चिथावणारे आणि हिंदूंनाही अल्पसंख्यांक करणारे आहे. नव्या वर्षाच्या नव्या संकल्पामध्ये जातीव्यवस्था मोडण्याचा संकल्प का असू नये? हिंदुत्व दिनाच्या निमित्ताने हे व्हायला हवं! नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
-हरीश केंची

प्रभंजन साठीचा लेख.

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...