Sunday 23 April 2017

व्यक्तिदोषामुळे काँग्रेसी विचारासामर्थ्य खुंटले!

*व्यक्तिदोषामुळे काँग्रेसी विचारसामर्थ्य खुंटले*

 "काँग्रेसपक्षाला झालेल्या निवडणुकांतून फार मोठे अपयश आले. पण हे अपयश एकदम काँग्रेसच्या माथ्यावर कोसळलेले नाही. ते गेली दहा-पंधरा वर्षे एक एक पावलाने येतच होते. काँग्रेसने गरिबांशी, दलितांशी, उपेक्षितांशी, अल्पसंख्य समाजघटकांशी, समाजातल्या परिवर्तनाला सदैव निष्ठेने साथ देणाऱ्या मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली. त्यामुळे अपयश काँग्रेसला झोम्बु लागले, काँग्रेस धनिकांच्या दावणीला बांधली गेली आणि सदासर्वदा स्वार्थाचा रवंथ करणाऱ्या बैलांनी फक्त आपल्या गोतावळ्यापुरतीच आहे असे वर्तन करून काँग्रेसबद्धल जनमानसात अप्रिती वाढविली.काँग्रेस अशीच राहावी असा प्रयत्न करणारे महाभाग आजही आहेत. काँग्रेसला बदलावे लागेल. काँग्रेस पुन्हा लोकांची झाली नाही तर काँग्रेस नक्कीच संपेल."

पुण्याच्या काँग्रेस भवनात गांधीजींचा पुतळा आहे.या भवनात गांधीजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी भवनाबाबत समाधान व्यक्त केले होते. आपला अभिप्राय देताना त्यांनी लिहिले होते, ' यह मकान सच्चे सेवकोंका याने खिदमतगारोंका निवास बने'. महात्मा गांधींचा हा अभिप्राय या पुतळ्याच्या खाली त्यांच्याच हस्ताक्षरात संगमरवरी स्मृतिशलाकेत कोरण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या या विचारांशी, व्यक्त केलेल्या अपेक्षेशी आजची काँग्रेस कितपत कटिबद्ध आहे? याचं उत्तर अगदी स्पष्ट 'नाही' असंच आहे. हा काँग्रेसी उजाळा, झळाळी दाखवत असताना याच काँग्रेसच्या नावाखाली चाललेला काळाकुट्ट व्यवहार मात्र लोकांना सतावत होता. सारी लाज, लज्जा, शरम आणि सभ्यता काँग्रेसच्या तिरंगी झेंड्याच्या दांड्याला टांगून वाट्टेल ते करणाऱ्या सफेद डाकूंची फलटण आज काँग्रेस पक्षात फोफावली आहे. या सफेद डाकूंमध्ये आणि टोळीयुद्धात असलेल्या संघटित गुन्हेगारांमध्ये तसा फरक फारसा उरलेला नाही.
काँग्रेस पूर्वी अशी नव्हती. पैसा प्रतिष्ठा याचा मोह वाटणारे 'खादीधारी' होते, पण या पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी दुसऱ्यांच्या प्राणाशी खेळ मांडण्याचा प्रकार काँग्रेसवाले करीत नव्हते. हे प्रकार कधी आले, कुणी आणले? पैसा असेल तर वाट्टेल ते करता येईल, याची ओळख सहकारातून काँग्रेसवाल्याना झाली आणि मग ही सहकारी वारुळे शाबूत ठेवण्यासाठी जिवाच्या कराराने ग्रामीण भागात आपापसात झुंजी दिल्या गेल्या. आजही त्या सुरूच आहेत. पूर्वीच्या नेत्यांनी एक राहा, सत्ता राखा आणि अनंतकाळ ऐश्वर्य उपभोगण्याची आपल्या हातातील हुकुमी साधन सांभाळा, हा त्यांचा उपदेश सहकारी क्षेत्रात काही काळ चालला. पण आपापली वारुळे दक्षपणे सांभाळत. यासाठी सहकाराची, एवढेच कशाला साध्या सभ्यतेची मूल्येसुद्धा राजरोसपणे तुडवत जागोजागचे सहकारसम्राट आपले अस्तित्व दाखवीत आपल्याला हवे तसे काँग्रेस पक्षाला राबवित राहिले. आपापल्या भागात सहकारी संपत्तीमार्फत स्वतःची साम्राज्ये उभी केली. या साम्राज्यात ते म्हणतील तो समाजवाद आणि ते देतील तो न्याय, हा खाक्या सुरु झाला. साखर कारखाने केवळ ऊसाला पिळून काढत नव्हते, तर लोकशाहीमध्ये ज्याला फार मोल आहे तो वैचारिक विरोध करणाऱ्यांना देखील पिळून काढले जात होते. सहकारातून जे काही निर्माण होत होतं, ते आपल्याच बापाचं! ही वृत्ती या सहकारी वारुळाच्या अनभिषिक्त सम्राटात पुरेपूर मुरली होती.

सत्तेचा सर्वंकष फायदा घेऊन लोकांच्या पैशावर आपली साम्राज्ये बळकट बनवीत राहिले. साखर साम्राज्य चालविणाऱ्यांनी, सहकारी बॅंकांवर वेटोळे घालून बसणाऱ्यांनी आपापल्या भागात कित्येकांना मातीत गाडले. संसारातून उठविले आणि देशोधडीला लावले. याचा हिशेब कधी करणार? कोण करणार? निवडणुकात लाखो रुपयांची खैरात करणारे हजारोंनी गुंडांच्या टोळ्या, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो मधून आणून पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत निवडणूक लढणारे, वाढविणारे, विरोधकांना साम, दामC, दंड भेद हे सगळे मार्ग वापरून नामोहरम करणारे गारदी काँग्रेसमध्ये नाहीत? मंत्रीमंडळात नव्हते? याची आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होऊ लागलीय.

लोकसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकीत केवळ काँग्रेसचाच नव्हे तर सर्व समाजवादी विचारांच्या पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. विचारसामर्थ्य शक्तिशाली असले तरी व्यक्तिदोषामुळे हा पराजय झाला आहे. आपसातले संघर्ष, ते मिटवण्याच्या नावाखाली चाललेली अटीतटी, दिलजमाईचे प्रदर्शन आणि कुजकी टोमणेबाजी यामधून काँग्रेसवाल्यांना बाजूला काढून पुरोगामी विचारापर्यंत आणण्याचे काम आज व्हायला हवे. सत्ता जिंकण्यासाठी देवाधर्माचा वापर करण्याचा, तो करता यावा म्हणून वेगवेगळ्या संघटना उभारण्याचा, त्यांच्याद्वारा श्रद्धावान भाबड्या जनसामान्यांना खोट्यानाट्या गोष्टी ऐकवून फितवण्याचा, विशिष्ट राजकीय पक्षासाठी त्यांना वापरण्याचा उद्योग या देशात पद्धतशीरपणे केला जातो आहे. जन्मजात उच्च-नीचतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्याविरुद्ध लढणाऱयांना आपसात लढायला लावण्याचा अथवा निष्क्रिय बनवून निरुपयोगी करून टाकण्याचा जोडधंदाही याच मंडळींनी प्रभावीपणे चालवला आहे. याला रोखण्याचे सामर्थ्य फक्त पुरोगामी विचारातच आहे. राजकारणात मतलब सांभाळणे ही बाब आता अनिवार्यच झाली आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मतलबासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसरा घरोबा केला की, ती व्यक्ती उठवळ! पण एकमेकाला संपविणे हेच ध्येयधोरण असलेले दोन पक्ष जेव्हा मतलबासाठी एकत्र येतात तेव्हा? मतलबासाठी पक्षबदल करणाऱ्यात आदर्श म्हणवले जाणारे राजकारणीही आहेत. हे लक्षात घ्यावे लागेल.

काँग्रेसपक्षाला या निवडणुकांतून फार मोठे अपयश आले. पण हे अपयश एकदम काँग्रेसच्या माथ्यावर कोसळलेले नाही. ते गेली दहा-पंधरा वर्षे एक एक पावलाने येतच होते. काँग्रेसने गरिबांशी, दलितांशी, उपेक्षितांशी, अल्पसंख्य समाजघटकांशी, समाजातल्या परिवर्तनाला सदैव निष्ठेने साथ देणाऱ्या मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली त्यामुळेच अपयश काँग्रेसला झोम्बु लागले. काँग्रेस धनिकांच्या दावणीला बांधली गेली आणि सदासर्वदा स्वार्थाचा रवंथ करणाऱ्या बैलांनी फक्त आपल्या गोतावळ्यापुरतीच काँग्रेस आहे असे वर्तन करुन काँग्रेसबद्दल जनमानसात अप्रिती वाढविली. काँग्रेस अशीच राहावी असा प्रयत्न करणारे महाभाग आजही आहेत. काँग्रेसला बदलावे लागेल. काँग्रेस पुन्हा लोकांची झाली नाही तर काँग्रेस नक्कीच संपेल. शाहू, फुले, आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या आचार-विचारातच काँग्रेसला पुन्हा सामर्थ्य देण्याची शक्ती आहे. काँग्रेसवाल्यांना या निकालांनी आपण पुरे झोपलो नाही हे दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली. प्रचारादरम्यान मतलबासाठी चालवलेल्या आरोप प्रत्यारोपांनी आपले कापलेले नाक मिरवत वावरण्याचा उद्योग काँग्रेसवाल्यांनी चालविला होता. आपल्याच हाताने आपला गळा कापून घेण्याचे प्रयोगही केले गेले, अशावेळी आपल्या बगलबच्यांना टाळ्या वाजवायला लावले जात होते याकडे गांभीर्याने पाहिलेच गेले नाही. उत्तरकाळात पेशव्यांच्या नालायकीने मराठी सत्ता ग्रासली हे खरे; पण ह्या नालायक पेशव्यांना त्यांच्या तोडीस तोड नालायकी करणारे मराठे सरदारही आपल्या सर्व दुर्गुणासह पुरेपूर साथ देत होते. हा इतिहास झाकून ठेवता येणार नाही. आज उत्तर पेशवाईतल्या प्रमाणे सत्ताधारी रंगढंग दाखवत असतील तर त्याला कारण नांदेड, लातूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, बारामतीचे आपसात लढण्यात दंग असलेले काँग्रेसवालेच आहेत. या सगळ्यांनी लोकहितासाठी लढण्याचे, गोतावळ्यात गुंतून न पडण्याचे आणि सामाजिक समता, सहकार, समृद्धी यासाठी सर्वशक्ती वेचण्याचे ठरवले तर लोकही त्यांना साथ देतील.

पराभवानंतर झालेल्या आत्मचिंतनात 'आपण सगळे सध्याच्या परिस्थितीत जागरूक आणि संघटित राहिल्यास राज्यातील सत्तेत फसगतीने झालेला तात्पुरता बदल दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही'. असे म्हटले गेले. यातल्या 'आपण सगळे' याची व्याप्ती केवढी? 'आपण सगळे' ही भावना घेऊन काँग्रेस खरोखरच उभी राहणार आहे? दिलजमाई पर्व सुरु असताना कळवळून 'निदान भांडणासाठी तरी काँग्रेस शिल्लक ठेवा' असं विलासरावांनी म्हटलं होतं याची आठवण झाली. लोकांना झुलविण्यासाठी देवाधर्माचा उपयोग करण्याचे तंत्र साधलेली मंडळी भावनांचा प्रक्षोभ घडविणारे नाना विषय स्वतः नामानिराळे राहून उपस्थित करणार आहेत. काशी-विश्वेश्वर आणि मथुरेच्या श्रीकृष्णापासून गल्लीतल्या मारुती गणपतीपर्यंत देवांचा वापर करून लोकांच्या भाबड्या श्रद्धांना हात घातला जाईल. नको ते घडविले जाईल. हा देश, समाज आपल्या महत्वाकांक्षेपायी भरडून टाकण्याची टोकाची भूमिका घेतली जाईल. हे तुफान रोखण्यासाठी दिलजमाई व्हायलाच हवी. हातात हात गुंफून दृढ विश्वासाने उभे राहण्यासाठी लोक पुढे यायला हवेत. माणसे जोडली जायला हवीत. महात्मा गांधींनी देशाच्या कानाकोपऱ्यात 'करेंगे या करेंगे' ही जिद्द जागवली तशी जिद्द जागवायला हवी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महात्मा फुले यांनी ज्या त्वेषाने अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचे वारे समाजात खेळते ठेवले ती तडफ लोकांत निर्माण होईल असे वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचे भान आपण दाखवले पाहिजे. काँग्रेसवाल्यांच्या वृत्तीत बदल घडला तर सत्तेत बदल घडणे कठीण नाही. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभे करण्याची ताकद आहे. रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय. आता काँग्रेसला आधार केवळ या महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचारांचाच आहे.

- हरीश केंची,

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...