Sunday 23 April 2017

प्रक्षोबाची धुरी पेटवा, दडलेल्यांना बाहेर खेचा...!

*प्रक्षोभाची धुरी पेटवा, दडलेल्यांना बाहेर खेचा...!*


इन्ट्रो
"दूरचित्रवाहिन्यांच्या विविध वाहिन्यांवरून गुन्हेगारविषयक कार्यक्रम सादर केले जातात. या साऱ्याच कार्यक्रमातून एखादी दुसरी घटना सोडली तर, व्याभिचाराच्या, वासनाकांडाच्या आणि बलात्काराच्या बातम्यांच प्रामुख्याने आढळून येतात. देशात आणि राज्यात अशा अनैतिक, व्याभिचार, लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना नांदेड इथल्या केला महिलेवर अत्याचार करुन तिच्या देहाची विटंबना करीत गटारीत तिचा मृतदेह टाकून देण्यात आला. या प्रकाराने उभा मराठवाडा हादरून गेला. यापूर्वी घडलेल्या कोपर्डी वा इतर घटनांपेक्षा अत्यंत भयानक अशी ही घटना आहे. नांदेडच्या जनतेने बंद पुकारुन आपल्या भावना किती तीव्र आहेत हे दाखवून दिलं आहे. अद्याप सरकार मात्र ढिम्म आहे. ते नराधम अद्यापही उजळ माथ्याने फिरताहेत."

मीना नक्का ही गरीब घरातील सुस्वरूप तरुणी, पोटाची खळगी भरण्यासाठी विड्या वळण्याचे काम करीत होती.नांदेडातल्या नल्लागुट्टा चाळ येथे राहणारी ही तरुणी २४ जानेवारी रोजी तयार केलेल्या विड्या कारखान्यात देऊन परतत असताना भरदुपारी दीड वाजता तिचे अपहरण करण्यात आले. तिला मिळालेल्या मजुरीचे पैसे, अंगावरचे दागिने लुटण्यात आले, तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. एवढंच करून ते नराधम थांबले नाहीत, तर तिचा खून केला आणि तिला विवस्त्र करून तिचा मृतदेह पक्कीचाळ परिसरातील गटारात फेकून दिला. घरी न परतल्याने तिच्या पतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर ती हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. प्रजासत्ताकदिनी तिचा मृतदेह आढळून आला. लोकांनी संताप व्यक्त केला. प्रक्षोभ उसळला. पोलीस तपास करतील अशी आशा होती पण ती फोल ठरली, अखेर नांदेडमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी १२फेब्रुवारीला कडकडीत बंद पुकारला. पण आज अखेर कुणालाच अटक झालेली नाही.

जे हरामखोर या वासनाकांडात गुंतले आहेत, त्यांना जगणे हराम व्हावे, एव्हढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाज पुढे यायला हवा. स्त्रियांच्या असहायतेचा गैरफायदा उठवणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणेच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजाने का घेऊ नये, जे कोणी पोलीसांच्या हातात न सापडता  सोज्वळता मिरवत बसले आहेत त्यांना महिलांनी, समाजाने गुपचूप चढाई करून 'बडवून' काढले तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, तर भेकडपणे या अशा प्रकरणी आपले सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांनाही आनंद होईल.

बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरचीच्या पेटवून धुरी दिली जाते. जनप्रक्षोभाची धुरी धगधगत ठेऊन बिळात दडलेल्या बलात्काऱ्याना, अत्याचार करणाऱ्याना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर आल्या तर अशांची पळता भुई थोडी होईल. नांदेड प्रकरणात निकराने धक्का देण्याइतपत ताकद निश्चित आहे पण जनतेची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे त्यांची मानसिकता काय आहे. देशाला कडक शिस्तीचे धडे देणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचे हे नांदेड शहर एवढ्या अधोगतीला जावं ही चिंताजनक बाब आहे. ही घटना काळजात दुःखाचा वणवा उठवणारी आहे. मस्तकात आग पेटवणारी आहे.


दिल्ली, मुंबई इथे अशी प्रकरणे घडली की, प्रसिद्धीमाध्यमे अशा बाबी रवंथ करीत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागला आहे. सर्वच ठिकाणी महिलांनी असा संताप दाखवायला हवाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहिरपणे बोबं ठोकून अत्याचाराला अद्दल घडविण्याची हिंमत मुलींनी, महिलांनी दाखवायला हवी. अशा दुर्दैवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला मनाची उदारता दाखवून आपली म्हणणारे तरुण पुढे यायला हवेत. आईबापांनीही अशा कामात दिलदारपणे मुलांना सर्वप्रकारे प्रोत्साहन द्यायला हवे. गुंड सरकार आणि पोलीस यांची हातमिळवणी असल्यामुळेच असले प्रकार घडतात. महिलांना बरबाद करणाऱ्या विरुद्धही संतापाने खदखदत हजारो लोक रस्त्यावर आले तर पोलीस त्यांच्यावरच लाठी उगारणार मग या महिलेला न्याय देणार कोण? हा नीच प्रकार करणाऱ्याच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, आमचे कोण वाकडे करणार? आम्ही सगळे दडपू शकतो अशी खात्री असल्यानेच हे सारे नराधम बेफाम बनले आहेत.कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो, लोकांना धमकावू शकतो, आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरून घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारेच वापरायचे असते असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासावणाऱ्या, लांच्छनास्पद प्रकाराबाबत सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी राजकीय पक्ष मात्र मूग गिळून गप्प आहेत. मोठा गाजावाजा  करीत महिलांच्या विकासाचं धोरण, उद्धाराचा वसा घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना या प्रकारणाचं काही सोयर सुतक दिसत नाही.

समाज दिवसेंदिवस विकृत होतोय काय असं वाटतंय. संवेदनाच साऱ्या संपल्या आहेत असे चित्र आहे. संस्कारी समाज कुठे हरवलाय? अनेक गुन्ह्यात सिनेमांपासून प्रेरणा घेतल्याचं तपासात आढळून येतंय. हिंदी सिनेमासृष्टी जणू समाज विध्वंसक लोकांच्या स्वाधीन झालाय. तस्करांचा, गुंडांचा, लबाडांचा पैसा आणि त्यांना विविधप्रकारे मदत करणाऱ्यानाच दिला जाणारा वाव याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या चित्रपटातून जे काही दिसते ते समाजात कुठे आहे असा प्रश्न इतके दिवस पडत होता. कोपर्डी, नांदेड इथल्या या घटना, ही वासनाकांडे काही दिवसात धगधगली वा धगधगताहेत ती बघितल्यावर हिंदी चित्रपटांनी समाजमनांना किती विकृत वळण दिलंय हे दिसून येतंय. रस्त्यात जाणाऱ्या अनोळखी मुलीला अडवून तिला पटविण्याची हिंमत या चित्रपटातल्या नायकांनी दिली आणि त्या मुलींना पळवून नेऊन त्याच्यावर बलात्कार करण्याची शक्कल खलनायकांनी दिली. तरुण तरुणींचे अर्धनग्न तांडे कामक्रीडांची आठवण व्हावी अशी झटका झटकी करत नाचताहेत आणि चोळीच्या आंत काय दडलंय हे तपासत आहेत. आपल्या खटिया जवळ सरकावत आहेत. ओले ओले, कोरडे कोरडे किंचाळत आहेत. हे सारे आपण मिटक्या मारत बघत आलो, घरातील टिव्हीपुढे आई, बाप, मुलं ह्या सगळ्यात रंगू लागली, तर घराचा सिनेमा कां नाही होणार? आपल्या मुलीला रस्त्यात गाठून लॉजवर मजा मारायला नेण्याचा प्रकार कां नाही घडणार? गुंड, सरकार आणि पोलीस यांच्याइतकेच आपणही या परिस्थितीला जबाबदार आहोत , हे का दडवायचं?
-हरीश केंची

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...