Monday 24 October 2022

दुसऱ्या गांधीची 'पायपीट'....!

"एक संवेदनशील तरुण राजकारणात आला, तेव्हा त्याला तिथं रुजण्याऐवजी उखडून टाकण्यासाठी गलिच्छ राजकारण खेळलं गेलं. त्याची टिंगलटवाळी, निंदानालस्ती करत, पप्पू म्हणत, हिणवत निर्भत्सना केली. तो ड्रग्ज घेणारा, रोज रात्री पार्ट्या झोडणारा, परदेशात जाऊन मजा मारणारा असं चित्र रंगवलं गेलं. पण त्याला त्यानं कधी प्रतिवाद केला नाही, उलट गांधीजींच्या मार्गावर अत्यंत शांततेनं, संयमानं वाटचाल करतोय. त्यानं प्रस्थापित राजकारणाला छेद देणारी 'भारत जोडो' यात्रा आरंभलीय. वयाच्या ५२ व्या वर्षी दररोज वीस किलोमीटर वेगानं चालतोय. असा माणूस अगदी चोवीस तास लोकांमध्ये वावरतोय.आबालवृद्धांशी प्रेमानं, मायेनं बोलतोय. विचारवंतांशी तर्कशुद्ध संवाद करतोय. लोक वेड्यासारखे त्याच्याभोवती गराडा घालताहेत. आपण स्वच्छंदी, सुखासीन, सरंजामी, आळशी, व्यसनी, निर्बुद्ध, नालायक माणूस नाही तर संवेदनशील आहोत हे तो सिद्ध करतोय. त्याच्या या वाटचालीचा घेतलेला हा अल्पसा आढावा!"
-----------------------------------------------

तो निघालाय...! तो निघालाय...!!
दक्षिणेकडून उत्तरेकडे
उत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करत
विमान, जेट, हेलिकॉप्टर, बुलेटप्रूफ गाड्या,
सारे हाताशी असतानाही
धुळीच्या रस्त्यावरून  तो निघालाय....
गर्दीचा गैरफायदा घेत,
बापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातून
पुन्हा त्याच गर्दीवर विश्वास टाकत
हिंसेलाही लज्जित करत तो निघालाय..
पूर्वीही असेच राजे निघत,
अश्वमेध करायला, सैन्य घेऊन जिंकत जिंकत,
रक्ताचा सडा शिंपडत, पण तो नि:शस्त्र आहे,
प्रेम आणि संवादाचे शस्त्र घेऊन
राज्य जिंकण्याचे सोडाच
निवडणूक जिंकण्याचीही गोष्ट तो बोलत नाही
पक्षाच्या सीमा ओलांडून
समविचारींना कवेत घेत तो निघालाय..
फक्त येईल त्याला प्रेमाने आलिंगन देत,
एकट्या पडलेल्या व्यवस्थेत हरलेल्या
फाटक्या, केविलवाण्या माणसांना
मायेची ऊब देत तो निघालाय...
त्याच्या वयाला न शोभणारा,
घरातला प्रेमळ ज्येष्ठ माणूस
आबालवृद्धांना त्याच्यात भेटतोय
कुणाला भाऊ, कुणाला बाप, कुणाला लेक
अशा नात्यात हा पन्नाशीचा पोरगा लुभावतोय....
त्याला भेटून रडताहेत माणसं,
त्यांच्या अश्रूत वाहताहेत,
व्यवस्थेने त्यांच्यावर केलेले शोषणाचे घाव
नुसते चालून होईल काय?
लोकांशी बोलून होईल काय ?
हा दांडीयात्रेपासून भूदान यात्रेपर्यंत
आणि चंद्रशेखर ते बाबा आमटेपर्यंत
खिल्ली उडवणारा ऐतिहासिक प्रश्न
त्यालाही विचारला जाईल...पण
असल्या प्रश्नांची उत्तरे वर्तमान नाही
तर, इतिहासच देत असतो...!!!!
सोशलमीडियावर खूपच व्हायरल झालेली हेरंब कुलकर्णी यांची ही कविता! राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेचं चित्रण! या कवितेतून मांडलेल्याहून अधिक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व राहुल गांधींचं आहे. गांधीजींना 'बापू' म्हटलं गेलं तर राहुलला 'पप्पू' म्हणून हिणवलं गेलं. यात भक्तांचा मोठा सहभाग आहे. त्याला पूरक असं काँग्रेसमधले ढूढ्ढाचार्य वागताहेत. काँग्रेसनं आणलेल्या ईव्हीएम मशिन्सनं त्यांचंच वाटोळं केलं. वैभवशाली इतिहास असतानाही काँग्रेसला धराशाही व्हावं लागलंय. राजकीय युद्धभूमीवर रुतलेलं काँग्रेसी रथाचं चाक बाहेर काढून त्याला गती देणारा हा नेता 'भारत जोडो' पदयात्रेसाठी बाहेर पडलाय!... आज राहुल गांधी आणि महात्मा गांधींच्या या यात्रेची तुलना करता भले ही गांधीजींची यात्रा तुलनेनं लहान असेल मात्र या यात्रेला मिळालेलं यश मोठं होतं. ज्याची तुलनाच करता येणार नाही. आज राहुल ५२ वर्षांचे आहेत आणि बातम्यांनुसार ते दिवसात २० किलोमीटर अंतर कापताहेत. गांधीजींच्या दांडीयात्रेमागे दोन उद्देश होते. एक म्हणजे काँग्रेसचं पुनरुज्जीवन आणि दुसरं म्हणजे मीठावर लावलेल्या जाचक करातून सूट मिळवणं. या आंदोलनानं केवळ मीठाचा कायदाच मोडला नाही तर संपूर्ण देशात चळवळ सुरू झाली. काँग्रेसचे बडे बडे नेते गांधींच्या या पदयात्रेच्या विरोधात होते. आणि तरीही गांधींच्या दांडीयात्रेनं भारतीयांमध्ये स्वातंत्र्याचा नवा संकल्प निर्माण केला. या दृष्टिकोनातून राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवर महात्मा गांधींच्या दांडीयात्रेचा प्रभाव दिसतो. या यात्रेतून भारताला एकसंध बांधण्याचा उद्देश असला तरी काँग्रेसवरचं मळभ अजूनही हटलेलं नाही. त्यामुळं यातून काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल अशी आशा वाटते. बेजान काँग्रेसमध्ये जीव फुंकण्यासाठी गांधीजींनी दांडीयात्रा काढली. आज काँग्रेसची अवस्था बघता काँग्रेसला संजीवनीची गरज आहे. पण ही पदयात्रा यात्राच राहणार की त्याचा 'पॉलिटिकल इव्हेंट' होणार यावरं सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या नजराही लागून राहिल्या आहेत. राहुल शांतपणे मार्गक्रमण करताहेत. मीडियातून त्यांच्याविरोधात सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून विषारी आणि विखारी प्रचार केला जातोय. भाजप आणि त्यांच्याशी संलग्न संघटना राहुलची बदनामी हा एककलमी कार्यक्रम राबवताहेत. परंतु पन्नाशीपार केलेला हा तरुण जराही विचलित न होता, धीरोदात्तपणे चालला असल्याचं दिसतं. मनात आणलं असतं तर वीसेक वर्षापूर्वीच तो प्रधानमंत्रीपदावर विराजमान होऊ शकला असता, पण ते नाकारून तेव्हापासून देश समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तेही अगदी महात्मा गांधीजींच्या मार्गानं! राजकारणातली संवेदनशीलता नष्ट होत असताना एवढ्या संवेदनशीलतेनं वाटचाल करणं, हेच मुळी आश्चर्यचकित करणारं आहे. याच्या कौतुकाऐवजी हेटाळणी, टिंगलटवाळीच केली जातेय. खरं तर, राहुलला दुसरा गांधी म्हणावं लागेल. गांधीजींनी देश समजून घेण्यासाठी गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून स्वातंत्र्यलढ्यात येण्याआधी देशभर भ्रमण केलं होतं, तेही रेल्वेनं आणि तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून लोकांशी थेट संपर्काचा तेवढा चांगला मार्ग दुसरा कुठलाही नव्हता. त्यानंतर जवळपास नव्वद वर्षांनंतर राहुलनं तोच मार्ग अवलंबलाय. केवळ आजच नव्हे तर गेल्या २०-२२ वर्षांपूर्वीपासून लोकांमध्ये थेट मिसळण्याचा. लोकांशी बोलण्याचा. तेही सतत मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असताना प्रयत्न करतोय. त्याची प्रत्येक कृती ही गांधीजींच्या जवळ जाणारी आहे. कुणाला ते नाटक, ढोंग वाटत असेल, परंतु हे जे काही नाटक, ढोंग म्हटलं जातं, ते त्या कृतीचं वर्णन असतं. जी कृती राहुल गांधींनी प्रत्यक्षात केलेली असते. या दुसऱ्या गांधीचा राजकीय प्रवास रूढ कॉंग्रेस मानसिकतेला अनेक धक्के देणारा आहे. अमेठीतून राहुल गांधी उभे राहणार असल्याची घोषणा झाली. ती तमाम पत्रपंडित आणि राजकीय भाष्यकारांनाही विस्मयचकित करणारी होती. कारण 'प्रियांका गांधी याच काँग्रेसचं भविष्य आहेत आणि त्याच काँग्रेसला पुनरुजीवन देऊ शकतात...!' असा बहुतेकांनी दावा त्यावेळी केला होता. अनेकांना त्यांच्यात इंदिरा गांधींचं प्रतिबिंब दिसत होतं. कॉंग्रेसला पुनर्वैभव मिळवून देण्याची क्षमता केवळ प्रियांकामध्ये असल्याचं अनेकांचं मत होतं. अशा स्थितीत राहुल राजकारणाच्या आखाड्यात उतरले होते. दहशतवाद्यांच्या सावटात आणि पर्यायानं कडक सुरक्षाव्यवस्थेत राहणं, ही गांधी घराण्याची जीवनशैली बनलीय. त्यामुळं खासगी आयुष्य उरलेलं नाही. जगण्यातला मोकळेपणाही नाही. राहुलसारख्या तरुणाला हे जाचक वाटणं स्वाभाविक आहे. त्यातूनच अनेकदा सुरक्षारक्षकांचं कडं भेदून राहुलनं सामान्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केलाय. राहुलची प्रत्येक कृती जोखमीची होती. परंतु ती जोखीम राहुलनं पत्करली. कुणी त्याला पब्लिसिटी स्टंट म्हणत असेल, पण पब्लिसिटीसाठी कधी कुणी जिवाची बाजी लावत नाही. तेही ज्या तरुणानं आजी आणि वडिलांचा दहशतवादी हल्ल्यात झालेला मृत्यू पाहिलाय, असा तरुण! हेही इथं लक्षात घेण्याची गरज आहे. एका श्रमदान शिबिरात राहुल सहभागी असताना, त्याची खूप चर्चा झाली होती. घमेल्यातून दगडमाती वाहून नेणाऱ्या युवकांच्या रांगेत राहुल होता. सगळ्यांच्या खांद्यावर लोखंडी घमेलं तर राहुलच्या खांद्यावर प्लास्टिकचं घमेलं होतं. त्यावरून राहुलची खिल्ली उडवण्यात आली होती. का तर म्हणे प्लास्टिकचं घमेलं घेऊन श्रमदानचं नाटक करतोय म्हणून. ज्याला स्वतःच्या घराबाहेर मोकळा श्वासही घेता येत नाही, असा तरुण समवयस्कांच्यात मिसळतो. जमेल तेवढं श्रमदान करतो, हे लक्षातही न घेता टिंगल करणाऱ्यांमध्ये कोण आहे हे सांगायची आवश्यकता नाही. राहुलनं केलेली कृती लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच त्यावरच्या प्रतिक्रिया विकृतपणे पोहोचवल्या जातात, ते याच भूमिकेतून!

'राहुल गांधी यांचं पासपोर्टवरचं नाव राहुल विन्सी किंवा रॉल विन्सी आहे!' अशी बदनामीकारक प्रचारमोहीम मध्यंतरी चालवली होती. परंतु त्याची वस्तुस्थिती अशी की, राहुल हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना राजीव गांधींच्या हत्येनंतर त्याला रोलिन्स कॉलेजमध्ये हलवण्यात आलं आणि त्यावेळी त्याचं नाव रॉल विन्सी असं बदलण्यात आलं. फक्त विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी आणि सुरक्षायंत्रणेलाच त्यांची ओळख माहीत होती. दहशतवादाच्या सावटाखाली आपलं नाव बदलून राहावं लागण्याची वेदना काय असते, हे टिंगलटवाळी करणाऱ्यांना कसं समजणार? अणुकरारावर संसदेत जी चर्चा झाली, त्यावेळी राहुलनं केलेलं भाषण चर्चेत आलं होतं. या चर्चेत बहुतेक वक्त्यांनी विद्वताप्रचुर युक्तिवाद केले होते; परंतु राहुल थेट विदर्भातल्या कलावतीच्याच घरी जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या या विधवेची भेट घेतली होती. तेव्हाची विजेची परिस्थिती आणि तिच्या मुलांच्या स्वप्नांचा संबंधही ऊर्जेशी कसा आहे आणि ही गरज भागवण्यासाठी अणुकरार कसा महत्त्वाचा ठरणार आहे, हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत राहुलनं संसदेत मांडलं. जिथं जिथं सामान्यांची वेदना दिसली, तिथं तिथं राहुल धावून गेलाय. राहुलनं दलिताच्या झोपडीत मुक्काम केला, त्यांच्याबरोबर जेवण घेतलं. या कृतीला केवळ स्टंटबाजी म्हटलं गेलं. राहुल आपल्या राजकीय उमेदवारीच्या काळात या गोष्टी करतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. तळागाळांतल्या माणसांचं जगणं समजून घेण्याची प्रामाणिक कृती म्हणून का पाहू शकत नाही आपण? झोपडीत मुक्काम केला, ही वस्तुस्थितीच विचारात न घेता त्यावर सवंगपणे प्रतिक्रिया दिल्या जातात. स्थलांतरितांमुळे महानगरांमधून मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता इथं हाच प्रश्न आहे. यासंदर्भात वृत्तवाहिन्यांमधून, वृत्तपत्रांमधूनही चर्चा असते. त्यामुळं या प्रश्नाचे अनेक कंगोरे समोर येतात. परंतु भविष्यात देशाची धुरा ज्याला आपल्या खांद्यावर घ्यायचीय, अशा युवकाला केवळ माध्यमांमार्फत किंवा मध्यस्थांमार्फत आलेल्या मुद्यांवर विसंबून राहून चालेल का? २० ऑक्टोबर २०१०ला राहुलनं गोरखपूरपासून मुंबईपर्यंत रेल्वेच्या स्लीपर क्लासमधून प्रवास केला. उत्तरेकडून मुंबईकडं लोक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. त्यांच्या स्थलांतराची कारणं काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी राहुलनं या प्रवासात सहप्रवाशांशी, बेरोजगारांशी बोलून त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. कोणताही गाजावाजा न करता त्यानं हा प्रवास केला. या प्रवासाची खबर ना प्रसारमाध्यमांना होती, ना पोलिसांना. यावरून लक्षात येतं की, राहुल काही गोष्टी समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. पब्लिसिटी स्टंटच करायचा असता, तर राहुलबरोबर वृत्तवाहिन्यांची पलटन असती आणि दौऱ्याचं लाइव्ह कव्हरेज मिळालं असतं. मात्र राहुलचा उद्देश प्रसिद्धी मिळवण्याचा नव्हता, तर प्रश्न समजून घेण्याचा होता. राहुल शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला. पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. देशातला ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी चळवळ, साखर व्यवसाय, हे सारं काही समजून घेण्यासाठी तो पुण्यात कुणालाही न कळवता राहिला होता!

राहुलचा २०१०-११ चा मुंबई दौराही गाजला होता. या दौऱ्यातही त्यानं पूर्वनियोजित कार्यक्रमांत आयत्यावेळी बदल करून एटीएममधून पैसे काढून थेट लोकलमधून प्रवास केला. तळागाळांतल्या माणसांशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहुल करतोय. पण राजकारणात एवढी संवेदनशीलता अलीकडच्या काळात कोणत्याही नेत्यानं दाखवलेली नाही. राहुल जे करतोय, त्यालाही कडेकोट सुरक्षेच्या मर्यादा आहेतच. त्या मर्यादेतच राहुलला पुढची वाटचाल करायचीय. राहुल ज्या कॉंग्रेस संस्कृतीत आहे, त्या संस्कृतीत हुजरेगिरी करणाऱ्यांची मांदियाळी आहे. प्रांतोप्रांतीच्या सुभेदाऱ्यांना नियंत्रणात ठेवत पक्षाची ताकद वाढवायचीय. कारण कॉंग्रेसचं नेतृत्व आणि देशाचं प्रधानमंत्रीपद त्यांच्याकडं जाणं अपरिहार्य आहे. कुणी ते रोखू शकत नाहीत. देश समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर, तळागाळांतल्या माणसांच्या वेदना समजून घेणारी अशी व्यक्ती प्रधानमंत्रीपदावर आरूढ होईल, तेव्हा निश्चितच तळागाळांतल्या माणसांच्या झोपडीतला अंधार दूर करण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करील. बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आपली ताकद पणाला लावेल. तेवढा विश्वास त्यानं आतापर्यंतच्या वाटचालीतून दिलाय. गांधी मार्गानं निघालेला हा 'दुसरा गांधी' म्हणूनच आजच्या राजकीय संस्कृतीत वेगळा आणि गांधीजींचा खरा वारसदार वाटतो! आज राहुल आणि महात्मा गांधींच्या यात्रेची तुलना करता, भले ही गांधीजींची यात्रा तुलनेनं लहान असेल मात्र या यात्रेला मिळालेलं यश मोठं होतं. आज राहुल ५२ वर्षांचा आहे आणि ते एका दिवसात २० किलोमीटर अंतर कापताहेत. गांधीजींच्या दांडीयात्रेमागे दोन उद्देश होते. एक, काँग्रेसचं पुनरुज्जीवन आणि दुसरं म्हणजे मीठावर लावलेल्या जाचक करातून सूट मिळवणं. या आंदोलनानं केवळ मीठाचा कायदाच मोडला नाही तर देशभरात चळवळ सुरू झाली. काँग्रेसचे बडे नेते या पदयात्रेच्या विरोधात होते. तरीही दांडीयात्रेनं भारतीयांमध्ये स्वातंत्र्याचा संकल्प निर्माण केला. राहुलच्या पदयात्रेवर गांधीजींच्या दांडीयात्रेचा प्रभाव दिसतो. या यात्रेतून भारताला एकसंध बांधण्याचा उद्देश असला तरी काँग्रेसवरचं मळभ अजूनही हटलेलं नाही. त्यामुळं निदान या यात्रेतून काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल अशी आशा वाटते. बेजार झालेल्या काँग्रेसमध्ये जीव फुंकण्यासाठी गांधीजींनी दांडीयात्रा काढली. आज काँग्रेसची अवस्था बघता काँग्रेसला संजीवनीची गरज आहे. पण ही पदयात्रा यात्राच राहणार की त्याचा 'पॉलिटिकल इव्हेंट' होणार यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या नजराही लागलेल्या आहेत.
चौकट
पक्ष. देश की प्रेम?
राहुलच्या आयुष्यातलं एक नाजूक वळण आहे त्यांच्या मैत्रिणीचं! त्यानंच एकदा पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, त्याची ही गलफ्रेंड सध्या व्हेनेझुएलात राहते, ती स्पॅनिश आहे. हे प्रेमप्रकरण किती वर्षांपासूनचं आहे, याचा खुलासा झालेला नाही; परंतु राहुलनं वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही लग्न केलेलं नाही.  राहुलचं लग्न हा चेष्टेचा, गंमतीचा विषय होतो. व्यंगचित्राचा विषयही होतो. परंतु तो आपल्या मैत्रिणीबरोबर विवाह करू शकत नाही, यामागची वेदना लक्षात घेतली जात नाही. विदेशी तरुणीबरोबर लग्न केल्यानंतर त्याची देशात काय प्रतिक्रिया उमटेल, विरोधक त्याचा कसा अपप्रचार करतील, काय मुक्ताफळे उधळतील आणि देशातले लोक याकडं कसं पाहतील, याचा अंदाज बांधता येत नाही. परंतु राहुलच्या राजकीय वाटचालीत त्यामुळं अडथळे निर्माण होतील. सोनिया गांधी राजकारणात आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर ज्या टिपण्या झाल्या त्या राहुलनं ऐकल्यात. याची पुनरावृत्ती राहुलच्या विदेशी मैत्रिणीबाबतही होऊ शकते. कॉंग्रेस पक्ष, देश एकीकडं आहे आणि विदेशी मैत्रीण दुसरीकडं आहे. तूर्त तरी राहुलनं पक्ष आणि देशालाच प्राधान्य दिल्याचं दिसतंय. यामागची त्यागाची भावना कुणालाही कळण्याजोगी नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...