Saturday 8 October 2022

भगव्या वादळानं सुडाग्नी पेटलाय....!

दसरा मेळाव्यानं महाराष्ट्राचं राजकारण घुसळून निघालंय. नागपुरात दीक्षाभूमीवर, संघ कार्यालयात, बीडमध्ये भगवान गडावर आणि मुंबईत शिवतीर्थावर तसंच बीकेसीत मेळावे झाले पण सर्वाधिक चर्चा झाली ती मुंबईतल्या मेळाव्यांची! हे मेळावे शिवसेना कुणाची आहे हे दाखवणारं होतं. ते स्पष्ट झाल्यानं महाशक्तीला धक्का बसलाय. फुटीरांनी जे काही सांगितलं होतं त्याहून वेगळी वस्तुस्थिती शिवसेनेच्या मेळाव्यातून दिसली. या अपेक्षाभंगानं महाशक्ती आता सरसावलीय. मुंबई महापालिका आणि लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याचं आव्हान समोर असताना आता शिवसेना साथीला नाही. जे फुटीर येऊन मिळालेत त्यांच्यासोबत शिवसैनिक नाहीत मग लोकसभेचं लक्ष्य कसं गाठणार? दिल्लीची सत्ता हाती घेण्यात महाराष्ट्राचा मोठा सहभाग होता. तो आता दिसेल का? मग दिल्लीश्वरांना काय सांगणार? शिवसेनेचं संघटित यश दिसल्यानं आता मुंबईची निवडणूक पुढे ढकलली जाईल. शमीच्या झाडावर ठेवलेली ईडी, सीबीआयची शस्त्र पुन्हा परजली जातील. आरोपांची राळ उडवली जाईल. ठाकरेंचं चारित्र्यहनन करत नामोहरम केलं जाईल. मातोश्रीवर हल्ले होतील. आगामी काळ हा महाराष्ट्रातलं राजकारण सुडाग्नीनं पेटवलं जाईल, अशी भीती वाटतेय!
---------------------------------------------------
*यं*दाचा दसरा हा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारा होता. नागपुरात दीक्षा भूमीवर भीमसागराच्या साक्षीनं प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला घातलेली साद. नागपुरातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पारंपरिक मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेला महिला सन्मानाचा विचार. कार्यवाह होसबेळे यांनी भाजपला दाखवलेला वस्तुस्थितीचा आरसा. बीडच्या भगवान गडावर पंकजाताई मुंढे यांनी लाखोंच्या उपस्थितीत भाजप नेत्यांविरोधात पुकारलेला एल्गार. पण खरं औत्सुक्य होतं ते मुंबईतल्या शिवसेनेच्या दोन मेळाव्याचं! एक ठाकरेंचं आणि दुसरं फुटीरांचं. त्याचीच चर्चा गेली आठ-दहा दिवस सुरू होती. एक मेळावा शिवसेनेच्या मूळ ठाकरेंचा शिवतीर्थावर झाला आणि दुसरा 'आमचीच शिवसेना खरी...!' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाचा बीकेसीतल्या मैदानावर झाला. दोघांनीही आपलं सामर्थ्य दाखविण्यासाठी सारी शक्ती पणाला लावली होती. ठाकरे यांच्या पाठिशी सर्वसामान्य शिवसैनिकांची ताकद दिसून आली तर 'आमचीच शिवसेना' म्हणणाऱ्यां फुटीरांकडं सत्ता, मत्ता, महाशक्तीची सारी आयुधं याशिवाय खोक्यातून प्रकट झालेलं दिव्य अर्थदर्शन घडलं. दोन्ही मेळावे जंगी झाले. एकीकडं जमलेले निष्ठावंत शिवसैनिक होते तर दुसरीकडं कशाचंही सोयरसुतक नसलेले जमवलेले लोक होते. एकीकडं भाषण होतं तर दुसरीकडं वाचन होतं. एकीकडं 'कागदावाचून' तर दुसरीकडे 'कागद वाचून' आव्हानं प्रति आव्हानं दिली जात होती. इथं 'विचारांचं सोनं' लुटण्यासाठी यायचंय म्हणून आवतनं दिली होती पण 'विचारांचं सोनं' राहिलं दूर, उघडं पडलं ते पक्षावर ताबा मिळविण्याचं 'पितळ' कारस्थान! त्यासाठीच हा सारा खटाटोप सुरू होता. दोन्ही मेळाव्यातल्या शक्ती प्रदर्शनाची वर्णनं प्रसिद्धीमाध्यमातून आली आहेत. सोशल मीडियातून तर मेळाव्यातल्या घडामोडींवरच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला होता. या  मेळाव्याचं कवित्व अद्यापि सुरूच आहे. सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसिद्धीमाध्यमांनी  दोन्ही मेळाव्यांची तुलना करत उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरच्या 'एकनिष्ठ मेळाव्या'नं बीकेसीतल्या एकनाथ शिंदेंच्या 'हिंदुत्वाच्या मेळाव्या'वर मात केल्याचं निरीक्षण नोंदवलंय. शिवतीर्थावरचा आणि बीकेसीतल्या मेळाव्यातल्या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाबी लोकांसमोर मांडल्या. शिवतीर्थावर मेळावा यशस्वी झाला तर बीकेसीतला फेल झाला. असं सांगितलं, दाखवलं जात होतं त्यामुळं लोकांना विशेषतः मुंबईकरांना जे काही समजायचं होतं ते समजून चुकलं. कारण या पारंपारिक मेळाव्यांना जशी शिवसेनेतल्या फुटीरतेची झालर होती. तशीच ती अंधेरीतल्या विधानसभेची पोटनिवडणुक आणि पुढं ढकलल्या गेलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी होती. शिवसेनेच्या फुटीरतेवरून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याकडं रखडलेल्या वादाचीही किनार होती. शिवसेना पक्ष, त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाकडं राहणार यासाठी या मेळाव्याच्या यशस्वीतेची दोघांनाही गरज होती, निकड होती म्हणून जीव तोडून प्रयत्न होत होते. कारण 'आम्हालाच सर्वाधिक समर्थन मिळालेलं आहे... आमचीच खरी शिवसेना आहे...!' हे सर्वोच्च न्यायालयाला, निवडणूक आयोगाला दाखवून पक्षाचा ताबा आपल्याकडं राहावा यासाठीची ही सारी धडपड अगदी स्पष्टपणे दिसत होती. बीकेसीतल्या मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंच्या फुटीर गटाला महाशक्तीकडून सर्व काही रसद पुरवली जात होती, कारण त्यांचं राजकारण, त्यांचा उद्देश आणि त्यांचा कावा त्यातून साध्य होणार होता. पण महाशक्तीचा नेमका अपेक्षाभंग झालाय. शिवसेनेनं साथसंगत सोडलं असल्यानं या महाशक्तीला मुंबई महापालिका निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीसाठी या फुटीरांची गरज आहे. फुटीरांच्या मदतीनं मुंबई महापालिका तर जिंकायची आहेच पण २०१९ मध्ये शिवसेनेच्या साथीनं महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ४० लोकसभेच्या जागा युतीनं जिंकल्या होत्या. या जिंकलेल्या ४० जागा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकायचं लक्ष्य आहे. त्यातूनच दिल्लीतली सत्ता महाशक्तीकडं राहणार की नाही हे ठरणार असल्यानं महाशक्तीची घालमेल होतेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाकडून न्याय जरी मिळाला नाही तरी शिवसेनेच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांकडून, लोकांडून साथसंगत मिळेल की नाही हे महाशक्तीसाठी अत्यंत महत्वाचं ठरणारं होतं. शिवतीर्थावरचा मेळावा यशस्वी झाला असला तरी महाशक्तीला ते मान्य दिसत नाही. त्यामुळेच पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना महाशक्तीचे म्होरके, नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'बीकेसीतल्या एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला मोठं यश लाभलंय. तिथं मोठ्याप्रमाणात गर्दी जमली होती, तीच खरी शिवसेना आहे !' असं म्हटलं. पत्रकारांनी शिवतीर्थावरच्या मेळाव्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी 'तिथं शिमगा होता, मी शिमग्यावर काही बोलणार नाही!' असं कुत्सित मत व्यक्त केलं. त्यांचं हे कुजकं मतप्रदर्शन वेगळंच काही सुचवत होतं. आपल्या दिल्लीतल्या वरिष्ठांकडं एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना आहे, त्यामुळं आपण ठाकरेंना सोडून शिंदेंशी जवळीक करावी यासाठी गळ घातली होती. दिल्लीश्वरांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास टाकून सर्व ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली आणि महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं. पण शिंदेंच्या सेनेला काहींचा अपवाद वगळता तळागाळातल्या शिवसैनिकांचा पाठींबा मिळाला नाही हे लक्षांत आल्यानं महाशक्तीनं त्याचा धसका घेतलाय.

महाशक्तीच्या दिल्लीश्वरांना २०२४ च्या निवडणुकीचे वेध लागले आहेत अद्यापि १८ महिने शिल्लक असतानाही त्यांनी त्यांच्याकडं नसलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. केंद्रीय मंत्र्यांना या १४४ मतदारसंघाची जबाबदारी सोपवलीय. त्यासाठी संबंधित मतदारसंघात मंत्र्यांचे दौरेही सुरू झालेत. २०२४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला महाशक्तीची गरज लागणार आहे म्हणून शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंच्या गटात डेरे दाखल झाले. पण या फुटीर बाराही खासदारांच्या मतदारसंघातही महाशक्तीनं लक्ष घातलंय. ती जागा महाशक्तीला मिळावी यासाठी प्रयत्न चालवलेत. महाशक्तीच्या या हालचालीनं फुटीर खासदारांचे, आमदारांचे धाबे दणाणलेत. बीकेसीच्या मेळाव्यात शिवसेनेचे आणखी पांच आमदार आणि दोन खासदार फुटीर गटात सामील होत आहेत असं सांगितलं गेलं होतं पण प्रत्यक्षात एकही जण फुटला नाही, कुणीही आमदार, खासदार शिंदेंच्या गटाला मिळाले नाहीत. ह्या साऱ्या घटना महाशक्तीला व्यथित करणाऱ्या ठरल्या आहेत. निवडून आलेल्या शिवसेना आमदार-खासदारांनी आपला सवतासुभा उभा केला असला तरी या लोकांना आमदार-खासदार बनवणारे रस्त्यावरचे शिवसैनिक मात्र मूळच्या शिवसेनेच्या पाठीशी असल्याचं दिसून आलंय. फुटीर गटाच्या या शक्तीपाताचा झटका महाशक्तीला बसणार असल्यानं त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलीय. आता ठाकरेंच्या शिवसेनेचं समर्थन करणाऱ्यांवर राज्य सरकारचं अँटी करप्शन खातं, केंद्रीय तपास यंत्रणा ईडी, सीबीआय यांचे आसूड ओढले जातील, त्यांना तुरुंगात डांबले जाईल. संजय राऊतांच्या साथीला काही जणांना जावं लागणार आहे. याशिवाय शिवसेनेवर, ठाकरे परिवारावर, मातोश्रीवर कमरेखालचे वार केले जातील. जेवढं म्हणून करता येईल तेवढं चारित्र्यहनन केलं जाईल. त्याचं प्रात्यक्षिक लगेचच नारायण राणेंनी दाखवून दिलंय. आता महाशक्तीनं उसने आणलेले दहा तोंडी रावण आपल्या दहा तोंडांनी हल्ले चढवतील, आरोपांची राळ उडवतील. ठाकरेंच्या समर्थकांना नामोहरम केलं जाईल. शिवसेनेला, शिवसैनिकांना न्यायालयीन झगड्यात झगडावं लागेल. रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. सोशल मीडियावरच्या युद्धाचा सामना करावा लागेल. महाशक्तीला जोवर यशाची खात्री होणार नाही तोवर मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातील. या साऱ्यासाठी शिवसैनिकांना सामोरं जावं लागणार आहे. महाशक्तीच्या या अशा प्रकारानं ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना सहानुभूती मिळू शकते. पूर्वानुभव लक्षांत घेता ज्या ज्या वेळेला असा हल्ला शिवसेनेवर झाला त्या त्यावेळी रस्त्यावरच्या शिवसैनिकानं दुप्पट जोमानं त्याचा मुकाबला केलाय!

उद्धव ठाकरे यांचं मेळाव्यातलं भाषण हे राष्ट्रीय राजकारणात शिवसेना जाण्याचे संकेत देणारे होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाशक्ती, प्रधानमंत्री, गृहमंत्री यांचा आपल्या ठाकरी भाषेत टीका करून त्यांना अंगावर घेतलंय. संघाच्या सरसंघचालकांच्या, संघाचे कार्यवाह होसबेळे यांच्या भाषणांचा समाचार घेतला. गृहमंत्री अमित शहांनी शिवसेनेला जमीन दाखवण्याच्या जे वक्तव्य केलं होतं त्यालाही त्यांनी खणखणीत उत्तर दिलं. फडणवीस यांच्या 'कायदा मोडला तर कारवाई करू!' या त्यांच्या धमकीला त्यांनी तेवढ्याच कडक शब्दात सुनावलं. भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेतली विसंगती दाखवताना उद्धव यांनी आडवाणींनी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर माथा टेकवला होता. प्रधानमंत्री मोदींनी न बोलविताही  पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांची गळाभेट घेतली होती, याचं स्मरण करून दिलं. याशिवाय शिवसेनेतल्या फुटीरांचं राजकारण, राज्यस्तरावरचे प्रश्न त्याच बरोबर राष्ट्रीय विषयही त्यांनी हाताळले. त्यांच्या भाषणाला श्रोत्यांतून प्रतिसाद मिळताना दिसत होता. शिवसेनेनं आपल्या नेहमीच्या पठडीतला मेळावा आयोजित करून दाखवला. बीकेसीतला एकनाथ शिंदेंचा मेळावा हा एक 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा उत्कृष्ट नमुना होता. त्यांनी मराठवाड्यातून जिथं शिवसेनेचं प्राबल्य आहे तिथून मोठ्या प्रमाणात माणसं आणली होती. ती तिथं का आली हे त्यांनाच ठाऊक नसल्याचं दिसून आलं. भव्य, दिव्य व्यासपीठ उभारलं होतं. भावनात्मक वातावरण तयार करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यातल्या सभेत वापरलेली खुर्ची आणण्यात आली होती. त्याला चाफ्याचा हार घातला होता. याशिवाय ज्या मुलाला बाळासाहेबांनी आपल्या हयातीतच घराबाहेर काढलं होतं अशा जयदेव ठाकरेंना व्यासपीठावर आणलं होतं. त्यांच्या येण्यानं फुटीरांचा काय फायदा होईल ते तेच जाणे, पण एक मात्र निश्चित की,शिवसेनाप्रमुखांना ते आवडलं नसतं, त्याने ते व्यथित झाले असते. जयदेवशिवाय त्यांची पत्नी जिला जयदेव यांनी सोडून दिलं होतं त्या स्मिता ठाकरे यांनाही आणलं होतं. बाळासाहेबांचा नातू बिंदुमाधव यांचा मुलगा निहार यालाही स्वतःच्या शेजारी बसवून घेतलं होतं. त्यानं नेमकं काय साधलं गेलं हा वेगळा विषय आहे, पण कौटुंबिक भांडणं ही चव्हाट्यावर आणली गेली. उद्धव ठाकरेंचं कुटुंब वगळता सारं ठाकरे माझ्यासोबत असल्याचा हा शिंदेंचा प्रयत्न होता हे दिसून आलं. त्यांच्या भाषणातही काही दम नव्हता. विधिमंडळात बहुमत स्थापन केल्यानंतर त्यांनी जे भाषण केलं होतं, त्यामुळं खरं तर त्यांच्या भाषणाची उत्सुकता होती. मात्र त्यांच्या भाषणानं साऱ्यांचाच भ्रमनिरास झाला. मुद्द्यांचा पुनरुक्तीनं श्रोते कंटाळले त्यामुळंच त्यांनी सभास्थानातून बाहेर पडणं श्रेयस्कर ठरवलं. त्यांचं ते भाषण महाशक्तीनं लिहिलेली स्क्रिप्ट होती अशी टीका झाली. खरं खोटं तेच जाणो! शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा विचाराऐवजी उद्धव यांच्यावर टीका करण्यातच त्यांचा अधिक वेळ खर्ची पडला.


लढाऊ शिवसेनेला संपवण्याचं ध्येय महाशक्तीचं असल्यानं त्यांनी शिवसेना फोडली. २०१९ मध्ये शिवसेनेनं साथसंगत सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीनं सत्ता मिळवली. आता पुढच्या काळात शिवसेना कितीही केलं तरी आपल्यासोबत येणार नाही हे लक्षांत आल्यानं शिवसेना संपवण्याच्या हालचाली केल्या गेल्या. स्वतःच्या स्वार्थासाठी, पक्षवाढीसाठी इतर पक्षाशी युती करून त्यांना संपवण्याचा आजवरचा इतिहासही मोठा रंजक आहे. महाशक्ती बनलेल्या या पक्षाचं ज्या पक्षाशी युती करायची त्यालाच खाऊन त्याच्यासारखं व्हायचं, हे वैशिष्ट्य आजवर राहिलंय. पुराणातली गोष्ट आहे. ती भाकडकथा असली तरी बोधप्रत आहे. त्या कथेत एक प्राणी होता. तो ज्याला खायचा त्याच्यासारखा तसाच आकार धारण करायचा. मुळात हा प्राणी शेळपट, पण बुद्धीचातुर्यानं त्यानं आपलं सामर्थ्य वाढवलं. तो आपल्यापेक्षा ताकदवान प्राण्याला त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्याचं भय दाखवायचा. आपण एकत्र आलो तर त्याला गारद करू, अशी खात्री त्याच्यात निर्माण करायचा. दोघांची युती व्हायची. मग संधी मिळताच हा पुराणोक्त प्राणी दोस्तालाच गिळायचा आणि त्याच्यासारखा आकार धारण करायचा. असं करीत करीत शेळीचा वाघोबा झाला. महाशक्तीला अजून वाघ व्हायचंय. पण अनेक विचारवादी पक्षांना काँग्रेसचं भय दाखवत, त्यांच्याशी दोस्ती करीत, त्यांचे गुण आपल्यात भिनवत महाशक्तीनं आपली ताकद वाढवलीय. या शक्तीवर्धनासाठी महाशक्ती गांधीवादी झाली. समाजवादीही झाली. देशभरातला हिंदू महासभा, गोव्यातला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, पंजाबातला अकाली दल, आंध्रप्रदेशातला तेलुगु देशम, उत्तरप्रदेशातला मायावतींचा बहुजन समाज पक्ष, बिहारमधला रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष महाराष्ट्रातला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाशिव खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांची शिव संघटना, रयत क्रांती संघटना, अशा अनेक छोट्या मोठ्या सर्व राजकीय पक्षांचे गुणावगुण आपल्यात भिनवून महाशक्ती आज अंतरबाह्य काँग्रेसचं झालाय, अगदी भगवी काँग्रेस! शिवसेनेच्या दोस्तीनं महाशक्तीनं महाराष्ट्रात आपली संघटनशक्ती वाढवलीय. त्यासाठी महाशक्तीनं आपल्यात शिवसेना रुजवली. बाळासाहेबांच्या दराऱ्यामुळं महाशक्ती डरकाळी फोडत नव्हती. पण त्यांच्या निधनानंतर महाशक्तीनं आपलं खरं रूप दाखवलंच! शिवसेनाच संपवायची या उद्देशानंच त्यांच्या कारवाया सुरू झाल्यात.मुंबईतल्या मराठी माणसाच्या, अस्मितेचा साक्षमोक्ष लावला जाणार आहे याची जाणीव होऊ लागलीय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...