Thursday 5 November 2020

ठाकरी प्रहार... !


"उद्धव ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण हे त्यांच्या स्वभावशैलीला छेद देणारं ठरल्यानं ते चर्चेचा विषय होणं साहजिकच होतं! त्यामुळं कायम आक्रमक शैलीत वाढलेला शिवसैनिक सुखावणंही साहजिकच! मात्र, भाजपची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता हाती घेतल्यानंतर उद्धव यांच्यावर आक्रमक हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करण्याबाबत जी मोठी बंधनं आघाडी धर्मामुळं आली होती, त्यातून त्यांना शिवसेना पक्षप्रमुखाची आक्रमक भूमिका घेण्यावर मोठ्या मर्यादा पडल्या होत्या. स्वत:वर मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आहे, त्याचा दबाव आहेच. ते स्वत: बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे स्वभावानं आक्रमक नाहीत. त्यामुळं त्यांच्याकडून अशा घणाघाती आणि आक्रमक राजकीय टोलेबाजीच्या भाषणाची विरोधकांना तर सोडाच पण सर्वसामान्य शिवसैनिकांनाही अपेक्षा नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणानं सर्वांनाच जोरदार धक्का दिलाय. विरोधकांसाठी हा अपेक्षाभंगाचा धक्का जिव्हारी लागणारा, शिवसैनिकांसाठी सुखद तर मित्रपक्षांना गर्भित इशारा देणारा ठरला. एका दगडात तीन पक्षी बरोबर मारण्याची ही कसरत अत्यंत अवघडच पण ती उद्धव ठाकरे यांनी लीलया पार पाडलीय!"

---------------------------------------------------
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'ए उद्धव ठाकरे' असं एकेरी बोलणारा उद्धट अर्णब असो किंवा मुंबई, पोलीस आणि महापालिका यांची मुघलांपर्यंत तुलना करणारी नटवी कंगना असो, किंवा बाप काढणारे भाजपेयीं दानवे वगैरे असोत. साऱ्यांनी पातळी सोडून उद्धव ठाकरेंवर टीका केली. एवढं सारं होऊनही उद्धव इतके शांत का? असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांनी त्यांच्या 'द कझन्स ठाकरे' पुस्तकात नमूद केलाय. ते वाचून काय कळायचं ते तुम्हाला कळेल. १९७७ ची गोष्ट. राज ठाकरे आणि त्यांचे मित्र दादरमध्ये बॅडमिंटन खेळत असत. काही दिवसांनी उद्धव ठाकरे तिथे आले. त्यांंनाही बॅडमिंटन खेळावं वाटलं. एकेदिवशी खेळता खेळता ते पडले. याला बॅडमिंटन जमत नाही वगैरे अशा हेतूनं राज ठाकरेंचे मित्र उद्धव ठाकरें यांच्यावर हसले. दुसऱ्याच दिवसापासून उद्धव ठाकरेंनी तिथं बॅडमिंटन खेळायला जाणं थांबवलं. मात्र, त्यांनी वांद्रेतल्या एमआयजी क्लबमध्ये बॅडमिंटनचा क्लास लावला, तिथं शिकले आणि एकेदिवशी पूर्ण शिकून पुन्हा दादरमध्ये राज ठाकरे आणि त्यांचे मित्र खेळत असत तिथं खेळायला आले. पूर्ण तयारीनिशी! त्यांच्या परिपक्व खेळानं ते सारे मित्र अवाक झाले....! राज्याच्या कारभाराची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांच्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण सत्तेवरचे शांत, संयमी, जबाबदार, प्रगल्भ आणि कुटुंबवत्सल उद्धव हे पक्षाच्या व्यासपीठावर आपल्या ठाकरी शैलीचा वापर करीत विरोधकांना अक्षरशः फोडून काढले.

उद्धव ठाकरे हे प्रकरणच तसं अनपेक्षित आहे. बाळासाहेबांची झेरॉक्स कॉपी असलेल्या राज ठाकरेंच्या करिष्म्यापुढं हे कसले टिकतात, असं लोक म्हणत असताना त्यांनी पक्षावर मांड ठोकली आणि पक्ष हळूहळू वाढवत नेला. बाळासाहेबांच्या पश्चात, मोदी लाटेत हे वाहून जातील, असंही लोक म्हणत असताना, त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत एकाकी लढत देत, खणखणीत यश मिळवलं. आणि, वर्षभरापूर्वीच ज्यांची भाजपेयींच्या सत्तेत फरफट होतेय, असं वाटत होतं, ते उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे कणखर मुख्यमंत्री म्हणून विरोधकांना रोज नवे धक्के देताहेत. भाजपेयींच्या हिंदुत्वाच्या ट्रॅपमध्ये उद्धव अडकत नाहीत, ही भाजपची सगळ्यात मोठी गोची आहे. कॉंग्रेससोबत सरकार चालवताना उद्धव दररोज गोंधळतील, असा भाजपचा कयास होता. घडतं आहे ते उलटंच. भाजपचा वाढत चाललाय आणि उद्धव मात्र अत्यंत सुस्पष्ट मांडणी करताहेत. दसरा मेळाव्यातील उद्धव यांचं भाषण हा त्याचा पुरावा होता. राज्य सरकारला आर्थिक अडचणीत आणलं गेलं. दुसरीकडं, साक्षात राज्यपालांनी 'सेक्युलरिझम'चा उल्लेख अगदी शिवीसारखा वापरला. राममंदिर आणि त्याचा सगळा माहोल तयार होत असताना, उद्धव यांना खिंडीत गाठलं गेलं. आदित्य ठाकरे यांंना देखील कोंडीत पकडलं गेलं. मात्र उद्धव या सगळ्यांना पुरून उरले. ते बोलत काहीच नव्हते. अर्णबनं त्यांना ललकारलं, आव्हान दिलं तरी ते शांत राहिले. कंगनानं तर त्यांना एकेरीवर आणलं, तरी गप्प राहिले. नितेश राणे हवं तसं पचकला, तरी उद्धव चूप राहीले. किंबहुना, संयमी असंच त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. दसऱ्याच्या मेळाव्यात मात्र त्यांनी आपलं मूळ रूप दाखवलं, तोंडावरचा मास्क काढला आणि त्यांनी प्रबोधनी सोटा उगारला. विरोधकांवर जोरकस बरसले. 'कसलं घंटा हिंदुत्व तुमचं, आमचं हिंदुत्व हे त्यापेक्षा व्यापक आहे', असं सांगत त्यांनी थेट प्रबोधनकारांचा वारसा सांगितला. संताना हिंदुत्वाशी जोडून घेत, संघ आणि भाजप यांच्यातच त्यांनी लावून दिलं. 'काळ्या टोपीखाली डोकं आहे की नाही?' असं विचारत राजभवनातील आजोबांनाही छानशी लगावली. 'मेणाहूनि मऊ' वाटणा-या उद्धव ठाकरे यांच्या या 'वज्राहून कठोर' रूपानं भल्या-भल्यांची तोंड बंद होतील. 'माझे सरकार पडणार नाहीच, पण तुम्ही मात्र तुमचं केंद्रातलं सरकार सांभाळा. तुमचा पक्ष सांभाळा', असं सांगताना त्यांचा निशाणा थेट दिल्लीच्या दिशेनं होता.

भाजपनं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यावर सेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. हळूहळू या प्रश्नाची धार तिखट करत सत्तेसाठी शिवसेनेनं हिंदुत्वाशी फारकत घेतल्याचं आणि आता भाजप हाच हिंदूंचा एकमेव कैवारी, असं चित्र रंगवायला सुरुवात केली होती. त्यासाठी मंदिरं उघडण्यासाठीचं आंदोलनही भाजपनं हाती घेतलं. त्यात आपण घटनात्मक पदावर बसलेलो आहोत, याचं भान न ठेवता राज्यपाल महोदयांनीही उडी घेतली. या सगळ्यानं शिवसेना आणि शिवसैनिक हिंदुत्वाच्या मुद्यावर कोंडीत सापडल्याचं आणि बॅकफूटवर गेल्याचं चित्रही निर्माण झालं होतं. सरकारमध्ये असल्यानं आणि हे सरकार तीन पक्षांचं असल्यानं साहजिकच उद्धव ठाकरेंना ही कोंडी मुख्यमंत्री म्हणून फोडता येत नव्हती. त्याचा परिणाम शिवसैनिकांच्या मानसिकतेवर होणं अटळच होतं! त्यातून सत्तेत असूनही शिवसेना आणि शिवसैनिक मरगळलेल्याच स्थितीत होते. या अवस्थेचा पुरेपूर फायदा उठवत सत्ता गमावल्याच्या पोटदुखीनं बेजार राज्यातील भाजपेयीं नेत्यांनी पातळी सोडून टीका करत सेनेला आणि उद्धवना लक्ष्य केलं होतं. एवढी टोकाची टीका होऊनही शिवसेना गप्प कशी? सेनेची आक्रमकता सत्तेमुळं खरंच संपुष्टात आली का? सेना हिंदुत्व सोडणार का? इथपासून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि सेना पुळचट झाल्याचा निष्कर्षही पेरले जात होते. शिवाय अधूनमधून सेना पुन्हा भाजपसोबतच येणार, अशा पुड्याही सोडल्या जात होत्या. या वातावरणानं साहजिकच शिवसेना आणि शिवसैनिकांमध्ये अस्वस्थताही होती आणि संभ्रमाचं वातावरणही होतं. पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांच्यावर साहजिकच याचा पक्षसंघटनेच्या दृष्टीनं दबाव होताच. पक्षातील संभ्रम दूर करून शिवसैनिकांचं मनोबल वाढविण्याचं आव्हानही उद्धव ठाकरे यांच्यासमोर होतं आणि पिंज-यात अडकलेल्या वाघासारखी त्यांची अवस्था दिसत होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचं निमित्त साधून हा पिंजरा तोडला आणि डरकाळी फोडली. एवढेच नाही तर 'ठाकरे शैली' वापरत विरोधकांना अक्षरश: धुऊन काढले आणि शिवसैनिकांच्या धगधगत्या निखा-यावरील जमलेली राख एका फटक्यात दूर केली. शिवाय अपप्रचाराला रोखठोक उत्तरं देत, असा प्रचार करणा-यांचा समाचारही घेतला आणि समर्पक उदाहरणांसह वस्त्रहरणही केलं. त्यांचा हा अनपेक्षित अवतार विरोधकांसाठी जोरदार धक्काच होता. त्यातून सावरायला भाजपेयीं नेत्यांना बराच वेळ लागेल. मात्र, उद्धव यांचे ठाकरी प्रहार भाजपच्या जिव्हारी लागले. त्याचे पडसाद दुस-या दिवशी दिसलेच!

ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्यावर उदाहरणासह निर्माण केलेल्या प्रश्नांचं खंडन भाजपेयीं नेत्यांना करता आलं नाहीच! उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सत्ताकारणाची वस्त्रे वेशीला टांगून आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला अद्दल घडवणारच, हे ठणकावून सांगितलं. शिवाय सेनेनं हिंदुत्व सोडलेले नाहीच, हे ही त्यांनी स्पष्ट केले. हा जसा भाजपला भीमटोला होता तसाच मित्रपक्षांनाही इशारा होताच! सत्ताकारण म्हणून आघाडी धर्माचे पालन आम्ही करतोय, ही स्पष्ट भूमिका उद्धव यांनी अधोरेखित करत शिवसैनिकांबरोबरच सर्वांचाच संभ्रम पूर्णपणे दूर केला. शिवाय जीएसटीचा मुद्दा उपस्थित करत आता भाजपशी सख्य तर नाहीच उलट भाजपला आव्हान देण्यात शिवसेना अग्रभागी असेल, असं स्पष्ट करून त्यांनी उघड बिगूल तर फुंकलंच पण मित्रपक्षांच्या मनातल्या शंकाही स्पष्टपणे दूर केल्या. एका अर्थानं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं स्वीकारलेल्या नव्या वाटेचा प्रवास कसा असेल? याचे स्पष्ट संकेतच दिले. उद्धव ठाकरेंचा नवा अवतार सर्वांनाच दिसला आणि या अवतारानं त्यांनी सर्वांनाच धुऊन टाकलं. याच्या परिणामी राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता बळावलीय. शिवाय विरोधकांनाही मुद्यांवर राजकारण करण्याचा स्पष्ट संदेश मिळालाय. उद्धव यांच्या या नव्या अवतारानं शिवसेना ख-या अर्थानं सीमोल्लंघन करून नवी राजकीय भूमिका अंगीकारणार आणि तीही आपली नैसर्गिक आक्रमकता न सोडता, हे स्पष्ट झाले आहे, हे मात्र निश्चित!

त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यात जीएसटीच्या संबंधात मांडलेलं विश्‍लेषण अधिक महत्वाचं आहे. ही करप्रणाली फसलीय, हे मान्य करून आता जीएसटी करप्रणालीच रद्द करून राज्यांना त्यांचे कर वसुलीचे अधिकार पुन्हा दिलं गेलं पाहिजेत, यासाठी पुढाकार घेण्याची घोषणा त्यांनी केलीय. त्यांची ही घोषणा अनेक अर्थानं महत्वाची आहे. जीएसटीची नुकसानभरपाई देण्याची कायदेशीर हमी केंद्र सरकारनं राज्यांना दिली होती. पण आता ही देणी देण्याची जबाबदारी मोदी सरकार टाळतेय. 'राज्यांना नुकसानभरपाई देणं ही आमची घटनात्मक जबाबदारीच नाही, तुम्हीच तुमच्या रकमेचं कर्ज घ्या!' अशी भाषा निर्मला सीतारामन यांनी सुरू केली होती. वास्तविक राज्याच्या नुकसानभरपाईचे पैसे देण्यासाठी केंद्र सरकारनं महागड्या वस्तुंवर वेगळा सेस लावून त्याची तरतूदही करून ठेवली होती. ते पैसे केंद्राकडे प्रत्यक्ष जमाही झाले आहेत पण त्यांनी ते परस्पर दुसरीकडं वळवून राज्यांवर मात्र भिक मागण्याची वेळ आणलीय. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या या मुजोरी विरोधात कोणत्या तरी मुख्यमंत्र्यांनी ठामपणे उभं राहण्याची गरज होती. ती भूमिका आम्ही पार पाडू अशी महत्वाची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलीय. राज्य सरकारांचे पैसे केंद्राकडून सर्रास थकवले जात असताना कोरोनासह, नैसर्गिक आपत्तीतील मदत, आणि अन्य आर्थिक खर्चाची सगळीच जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवून केंद्र सरकार नामानिराळे राहात असेल तर त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचीच एक भक्कम आघाडी उघडणे अत्यंत गरजेचं बनलंय. केंद्रानं महाराष्ट्राचेच एकूण ३८ हजार कोटी रूपये थकवले आहेत. हे पैसे न देता महाराष्ट्र शासनाला फुकटचे सल्ले देणाऱ्यांना जनतेपुढे उघडं पाडणं अत्यंत गरजेचंच होतं ते काम उद्धव ठाकरे यांनी चोखपणे पार पाडलंय. आजच्या या विचित्र आव्हानाच्या परिस्थतीत सारीच राज्ये अडचणीत आली असताना, त्यावर मात करून जनजीवन सुरळीत ठेवणं हे प्रत्येक सरकारचेच प्राथमिक कार्य आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार त्यादिशेनं योग्य काम करताना दिसतेय. या सरकारच्या कामाचं नेमकं परिक्षण करण्यासाठी त्यांना आणखी थोडा काळ देणं गरजेचं आहे. पण त्याच्या आतच सरकारवर थिल्लरपणाच्या भूमिकेतून टीकाटिपण्णी सुरू राहणार असेल तर शेवटी आम्हीही ठाकरे आहोत हेच उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलंय!

हरीश केंची
harishkenchi@gmail.com

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...