Saturday 13 April 2019

मनसेचं इंजिन रुळावर आलंया...!

"महाराष्ट्रातलं राजकारण हे नेहमी दोन युती-आघाडी यांचं राहिलंय. पण गेल्या काही वर्षांत मनसेनं त्यात स्थान निर्माण केलंय. काँग्रेसचं प्रतिरूप म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आली अगदी तसंच शिवसेनेचं प्रतिरूप म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अस्तित्वात आली. मनसेनं आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक आदर्श असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण नंतरच्या काळात त्यांचं रुप बदललं आणि ती शिवसेनेसारखीच झाली. अस्सल उपलब्ध असताना नक्कल कोण स्वीकारील? याची जाणीव उशिरा का होईना ती झाली. रुळावरून घसरलेलं मनसेचं इंजिन आताशी रुळावर आलंय! मनसेचा गुढीपाडव्याचा मेळावा मुंबईला झाला, पाठोपाठ नांदेडला प्रभावी सभा झालीय, आता राज ठाकरे यांनी  सोलापूरकडे आगेकूच केलीय. प्रबोधनकारांचा नातू त्यांच्या विचारांचा पाईक होतोय! मनसे निवडणूक लढवीत नसल्यानं त्यांना यशापयशाची चिंता नाही. पण त्यांचा प्रभाव यावेळी कितपत होतोय हे पाहणं औत्सुक्याचं असेल!"
----------------------------------------------------
*शि* वाजी पार्कच्या विशाल मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याचा मेळावा संपन्न झाला. निवडणूक न लढविताही राजकीय वातावरणात हलकल्लोळ माजविता येतो हे राज ठाकरे यांनी दाखवून दिलंय! गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळणार्‍या राज ठाकरे यांनी अकस्मात मोदी विरोधाचा झेंडा कशाला खांद्यावर घेतला? पारंपारिक भाजपाविरोधी पक्षापेक्षाही कडव्या भाषेत राज ठाकरे कशाला बोलत असतात? वरकरणी बघितले तर राजवर होणारी टिका पटणारी आहे. मध्यंतरी दोन वर्षापुर्वी पवार राज ठाकरे दोस्तीची सुरूवात झाली. पुण्यातल्या एका भव्य कार्यक्रमात राजनी शरद पवार यांची जाहिर मुलाखत घेतली आणि ती अनेक वाहिन्यांनी थेट प्रक्षेपणाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवली होती. त्यानंतर हळुहळू दोघांमधल्या ‘आस्थेचे’ विविध पैलू समोर येत गेले. मनसेच्या आरंभ काळात सुचक शब्दात राजवर टिका करणारे पवारही अकस्मात खुप बदलून गेले आहेत. त्यांची आपुलकी लपून राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व मनसे जवळ येणार, अशाही बातम्या होत्या. मग कॉग्रेसला मनसे नको असल्याच्याही बातम्या आल्या आणि अखेरीस राजनी १९ मार्चला मुंबईत आपल्या अनुयायांची सभा घेऊन लोकसभा लढवणार नसल्याची घोषणा करून टाकली. तसे बघायला गेल्यास दोन वर्षापुर्वीही त्यांनी घरगुती कारणासाठी महापालिका निवडणूका उपचार म्हणून लढवल्या होत्या. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणूकांकडे पाठ फ़िरवण्यात फ़ारशी मोठी बाब बघण्याचे कारण नाही. पण उमेदवार उभे न करणे, ही एक गोष्ट आहे आणि निवडणूकीपासून अलिप्त रहाणे, ही वेगळी गोष्ट आहे. राज यांनी लढणार नाही म्हटले, याचा अर्थ पक्षातर्फ़े उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण ते आणि त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष निवडणूकीकडे पाठ फ़िरवलेली नाही. ते लढतीमध्ये नक्की आहेत. ते कोणाच्या बाजूने आहेत, ते त्यांनी सांगायची गरज नाही. पण ते कोणाच्या विरोधात आहेत, त्याचा स्पष्ट खुलासा वा घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये काही सुचक राजकारण सामावले आहे काय? हे कालांतरानं स्पष्ट होईल.

*निरपेक्षवृत्तीनं राज यांनी घेतलेला निर्णय*
राज ठाकरे हा एकमेव नेता व त्याचा मनसे हा एकमेव पक्ष असा आहे, ज्याने कुठलीही जागा मागण्यापेक्षा निरपेक्ष वृत्तीने भाजपाला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही तर भाजपाचा उमेदवार पाडण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे संपुर्ण देशातील हा एकच नेता खराखुरा मोदी-शहांचा कट्टर विरोधक असल्याचे कोणालाही मान्य करावं लागेल. सर्वांनी एकत्र येऊन मोदी-शहांना पराभूत करावं, असं त्यांचं आवाहन जुनं आहे. पण ते साधलं नाहीतर आपल्या परीनं विरुद्ध काम करण्याची त्यांची तयारी पक्षस्वार्थ म्हणून चुकीची वाटू शकते. आपल्याला वरकरणी चुक वाटणारी अशी कृती खरोखर चुकीचीच असते का? पक्षाला कुठला लाभ नसलेल्या कृती वा भूमिकेतून काहीच साधत नसते का? असंच राजकारण करायचे तर लोकशाहीत पक्ष असून उपयोग काय? राजची ही भूमिका चुकीची ठरवणार्‍यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १९८० सालच्या निर्णयाचेही असंच वाटलं असतं. तेव्हाही त्यांनी लागोपाठच्या पराभवानंतर असाच चमत्कारीक वाटावा असा निर्णय घेतला घेतला होता आणि तेव्हा त्यांच्यावर कॉग्रेसची बटीक असा आरोप करणारे आज कॉग्रेस वाचवण्यात गर्क असतात. हे इथं लक्षांत घेतलं पाहिजे.

*राज यांच्या डावपेचाकडं दुर्लक्ष करणे गैर*
१९८० सालात मुंबईतही विधानसभा लढवण्याचे टाळलेली शिवसेना, १९९० सालात राज्यात कॉग्रेस समोरचे सर्वात मोठं आव्हान झालेलं होतं. राज ठाकरे यांनी आज अचानक निवडणूका न लढवता मोदी-शहांना पराभूत करण्याचा घेतलेला पवित्रा, म्हणूनच तडकाफ़डकी चुकीचा वा मुर्खपणाचा ठरवणे मला तरी योग्य वाटत नाही. अजून त्यामागचे तर्कशास्त्र राजनी स्पष्ट केलेले नाही, किंवा त्याला पुढल्या काळात कुठले वळण लागणार; त्याचाही अंदाज बांधता येत नाही. राजकारणावर भाष्य करणारे व विरंगुळ्याच्या गप्पा छाटणारे आणि प्रत्यक्षात राजकारणात जगणार्‍यांचे निकष वेगवेगळे असतात. पराभवात किंवा माघारीतही अनेकदा डावपेच सामावलेले असतात. आपण ते बघू शकत नाही, म्हणून त्याला मुर्खपणा वा चुकीचे ठरवणे मला योग्य वाटत नाही. राज ठाकरे ‘मनसे’ मोदी-शहांच्या विरोधातल्या इतक्या आवेशात कुठले राजकीय डावपेच असतील? नजिकच्या काळात त्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करणे मला योग्य वाटते. अर्थात प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. आज राजच्या या आवेशाकडे बघून असेही वाटते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे गुढीपाडव्यादिवशी झालेले भाषण ऐकणाऱ्या पाहणाऱ्या लोकांना कौतुक वाटल्याशिवाय राहिलं नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा, विचारांचं सोने लुटायला या असे आवाहन करतो. त्याच धर्तीवर ‘विचारांची गुढी उभारायला या’ म्हणून राज ठाकरे यांनी मनसेचा मेळावा सुरू केला. मराठी नववर्षप्रारंभी, गुढीपाडव्याइतका औचित्यपूर्ण दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाच्या वार्षिक मेळाव्यासाठी दुसरा कुठला असू शकत नाही!

*मोदींच्या सभा, वक्तव्य आणि छबीचा उबग*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणुकीच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत जी दुर्दशा झाली आहे, ती सगळी गाठीशी बांधून राज ठाकरे यांचे राजकारण सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना न थकणारे राज ठाकरे आता थेट नरेंद्र मोदी यांना राजकारणातून हद्दपार करण्याची भूमिका घेऊन मैदानात उतरले आहेत. स्वत:चा पक्ष लोकसभेची एकही जागा न लढवता ते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत, आणि राज्यात आठ-दहा सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या सभांचा फायदा साहजिकच काँग्रेस-राष्ट्रवादीला होणार आहे. ज्या शहरी, महानगरी भागात काँग्रेस-राष्ट्रवादी कमकुवत आहे, तिथे नक्कीच राज ठाकरे यांच्या सभांचा त्यांना उपयोग होईल. मनसेचे जे समर्थक असतील त्यांच्यासह कुंपणावरच्या शहरी मतदारांना भाजप-शिवसेनेच्या विरोधात पर्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे ढकलण्यास राज ठाकरे यांच्या सभा महत्त्वपूर्ण ठरू शकतील. आजच्या घडीला राज ठाकरे यांच्याइतका प्रभावी वक्ता महाराष्ट्रात दुसरा कुणी नाही, किंबहुना राजकीय वारे फिरवण्याची ताकदही कुणा नेत्याकडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील सभांचा अनुभव पाहता त्यांच्याबद्दलचे कुतूहल संपले आहे आणि टीव्हीवर, सिनेमाच्या आधी, रस्त्यावरच्या होर्डिंगमधून सतत त्यांचा चेहरा पाहून सामान्य माणसांना उबग आला आहे. त्यांच्या भाषणांमध्येही नाविन्य राहिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एका सुरातील भाषणही ऐकायला त्रासदायक वाटते. एकूण काय तर राज ठाकरे यांच्या भाषणांचा प्रभाव पुसून टाकील असा वक्ता भाजप-शिवसेना युतीकडे नाही. त्याचा निश्चित फायदा काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो.

*राज यांचं आजवरचं सर्वोत्तम भाषण*
मनसेच्या राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेक भाषणे केली आहेत. गेल्या पंधरवड्यात झालेलं राज ठाकरे यांचं भाषण त्यांच्या खास शैलीतलं होतं. त्याअर्थानं ते एक सुपरहिट म्हणता येईल असं भाषण होतं. राज ठाकरे यांच्या चाहत्यांना हवा असलेला सगळा मसाला त्या भाषणात होता. त्या तुलनेत परवाच्या शिवाजी पार्क मैदानावरच्या भाषणानं राज यांच्या चाहत्यांची थोडी निराशा झालेली असू शकते. परंतु त्यापलीकडं जाऊन भाषणाचा जो कंटेंट होता, तो निवडणूक काळातल्या भाषणातला सर्वोत्तम म्हणता येईल असा होता. वैशिष्ट्य म्हणजे राज यांनी या संपूर्ण भाषणात विनोद, टवाळी, नकला हे सगळं टाळून भाषणाचं गांभीर्य वाढवलं. एखादी गंभीर गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवायची तर ती सांगणाऱ्यानंही गांभीर्य पाळायला हवं, ते राज यांनी पाळलं. महाराष्ट्राच्या राजकीय पर्यावरणात गेल्या अनेक वर्षांत एवढं मुद्देसूद आणि प्रभावी भाषण ऐकण्यात आलेलं नाही. कोथळा काढू, वाघाचे दात मोजू, मर्दाची अवलाद असले शब्द वापरून भाषण प्रभावी होत नाही. किंवा विरोधकांवर पातळी सोडून टीका केली म्हणूनही भाषण संस्मरणीय ठरत नाही. त्यासाठी मूळ भाषणांचा आशय चांगला असावा लागतो. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये तो होता म्हणूनच एक गांभीर्यपूर्वक केलेल्या भाषणाची दखल घेतली गेलीय!

*काँग्रेसला सत्ता गेल्यानंतर वैराग्यावस्था*
केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारभाराचा मोजक्या उदाहरणांसह पंचनामा राज ठाकरे यांनी केला. भाषणांसोबत सादरीकरण केल्यामुळं त्या केवळ वाऱ्यावरच्या बाता ठरल्या नाहीत. कामगिरीच्या संदर्भात सरकार किती थापा मारतंय, खोट्या जाहिराती करतंय आणि् लोकांची लुबाडणूक करतंय हे राज यांनी पुराव्यांसह मांडलं. खरंतर काँग्रेसच्या केंद्रीय प्रचार यंत्रणेनं हे सगळं करायला हवं होतं. नरेंद्र मोदींची सत्तेवर येण्याआधीची भाषणं आणि नंतरची भाषणं, सत्तेवर येण्यासाठी दिलेली आश्वासनं आणि त्यांची आजची वस्तुस्थिती, पाच वर्षांपूर्वीची वक्तव्यं आणि आजची वक्तव्यं हा सगळा आयता मसाला उपलब्ध आहे. फक्त तो नेमका शोधून योग्य रितीनं मांडला तरी लोकांना वस्तुस्थिती समजू शकते. परंतु काँग्रेसवाल्यांकडं तेवढी अक्कल असण्याचं कारण नाही. सत्तेचा माज आणि सत्ता गेल्यानंतरची वैराग्यावस्था याच्या मधे काही असतं हे काँग्रेसवाल्यांना ठाऊकच नाही. त्यामुळं राहुल गांधी येतील, प्रियांका गांधी चमत्कार करतील अशा भिकारी मानसिकतेतच अजूनही ते आहेत. राज ठाकरे यांच्या करिश्म्याचा लाभ घेण्याची क्षमता तरी त्यांच्याकडं आहे का, याची शंका वाटल्यावाचून राहात नाही. नांदेडला ते जाणवलं आता सोलापूरला काय होतंय हे पाहावं लागेल. काँग्रेस वा वंचित आघाडी कितपत त्याचा फायदा कसा घेतील हे महत्वाचं आहे.

*महागठबंधनातही अहंकाराची गाठोडी*
देशभरात निर्माण झालेल्या आजच्या काळात, म्हणजे मोदी-शहा यांचा कारभार पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे राज ठाकरे यांच्याइतकी पोलिटिकल करेक्ट भूमिका देशात अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने घेतलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी एकमेकांच्या हातात हात घालून ऐक्याचा देखावा करणारे सगळे नेते आपापल्या अहंकाराची गाठोडी घेऊन पांगले. काँग्रेसला दिल्लीत 'आप'शी युती करता येत नाही. ममता बॅनर्जी, मायावती-अखिलेश यांच्याशी जुळवून घेता आलं नाही. आणि निघालेत मोदी-शहांशी लढायला. हमखास हरणाऱ्या जागांवरही तडजोड करायला तयार नाहीत एवढा मस्तवालपणा आहे यांच्या अंगी. ज्या मायावतींचा लोकसभेत एकही खासदार नाही त्यांच्या अहंकाराला जगात तुलना नाही. शहाणा मानला जाणारा अखिलेश यादवही बुआजींच्या नादाने बहकला. तिकडं पाच वर्षे समन्वयाची भाषा बोलणारा लालूपुत्र तेजस्वी यादव कन्हैय्याकुमारसाठी एक जागा सोडायला तयार नाही आणि राहुल गांधीही त्यासंदर्भात चकार शब्द काढत नाहीत. यावरून या सगळ्यांची सत्तापिपासा आणि लायकी कळते. यांना आणखी पाच वर्षे विरोधात बसवायला पाहिजे आणि यांच्यातल्या पाच-पन्नासांना मोदी-शहांनी तुरुंगात टाकायला पाहिजे, असे कधीकधी वाटते ते यांचा हाच मस्तवालपणा पाहूनच! पण लोकशाही राष्ट्रात शक्य नाही; तोपर्यंत लोकजागरण करायला काय हरकत आहे? असा विचार ठाकरे यांचा दिसतोय.

*देशाला भविष्यात खूप मोठी किंमत चुकवावी लागेल*
प्राप्त परिस्थितीत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. मोदी-शहा या जोडगोळीला सत्तेपासून लांब ठेवायला पाहिजे. काँग्रेस भ्रष्ट आहे, परंतु मोदी-शहांचा भाजप क्रिमिनल आहे. या दोन्हीपैकी एक निवडण्याचा पर्याय आहे. म्हणूनच राज ठाकरे यांची भूमिका योग्य ठरते. सगळ्या घटनात्मक संस्था मोडीत काढणारे मोदी-शहा हे लोकशाहीपुढचा धोका आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची संधी यावेळी दवडली तर भविष्यात देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. हे मतदारांच्या लक्षांत आणून द्यायला हवंय!

*मनसेची ही विधानसभेची बांधणी असावी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीत नक्की उतरेल. त्यासाठीची बांधणी म्हणून लोकसभा प्रचाराकडे पाहावे लागेल. लोकसभा निवडणुकीत वातावरण निर्मिती केल्यानंतर त्यांना विधानसभेसाठी पक्षबांधणी करावी लागेल. विधानसभेच्या आधी त्याअनुषंगाने पुरेशी तयारी करावी लागेल. याचा अर्थ पुढचे सहा महिने खूप राबावे लागेल. पदाधिकाऱ्यांना पळवावे लागेल. जबाबदार माणसे निवडून त्यांच्याकडे जबाबदाऱ्यांचे वाटप करावे लागेल. कारण ही  शेवटची संधी असेल. यावेळी त्यांनी ढिलाई दाखवली, वेळ वाया घालवला, संघटना बांधणीकडे दुर्लक्ष केले, वर्तनव्यवहारात गांभीर्य राखले नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांचे देव कायमचे उठतील. आज पक्षातला नेता त्यांना सोडून जातोय. मुंबईतील नगरसेवक, पाठोपाठ एकुलता एक आमदारही गेलाय. हे इथं नमूद करायला हवंय!

*प्रश्न बदलले, आता भूमिका बदलावी लागेल*
राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीनं  राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत असण्याचा. त्यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेशी कुणीही लोकशाहीप्रेमी माणूस सहमत होईल. परंतु व्यापक महत्त्वाचे विषय येतील तेव्हा त्यांची भूमिका तपासून घ्यावी लागेल. आरक्षणाचा प्रश्न, पपरप्रांतीय कष्टकऱ्यांचे प्रश्न, अल्पसंख्यांकांचे प्रश्न, काश्मीरचा प्रश्न, अट्रोसिटीचा प्रश्न, दलित-आदिवासी-महिलांचे प्रश्न यासंदर्भातील पेच त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीचे जेवढे सुलभीकरण ते करतात तसे ते नसते. अर्थात राज ठाकरे यांनी ट्रॅक बदलला आहे. आताच्या घडीला ते योग्य ट्रॅकवर आहेत. अशाच प्रकारे  इतर प्रश्नांच्याबाबतही ते व्यापक भूमिका घेतील आणि त्यांचे रेल्वे इंजिन योग्य ट्रॅकवरून गतीने धावेल अन्यथा मागील पानावरून पुढं असं झालं तर मात्र मनसेला फारसं यश विधानसभेत मिळणं अवघड वाटतं.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

2 comments:

  1. सध्याच्या परिस्थितीत मनसे चे आणि एकंदरीत मोदी शहा या मस्तवाल जोडगोळीचे तसेच इतर नेत्यांचे व पक्षांचे केलेले योग्य विश्लेषण तसेच आपण उपस्थित केलेले प्रश्न ही योग्य आहेत.

    ReplyDelete
  2. विक्रांत अमराळे
    पुणे

    ReplyDelete

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...