Friday 22 March 2019

विधानसभा निवडणुकीत मनसे-राष्ट्रवादी युती!

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला, भाजप-मोदी-शहा यांचा पराभव करण्याचा निर्धारही व्यक्त केला. या त्यांच्या निर्धारात राज्यात आकाराला येणाऱ्या नव्या युतीची बीजे आहेत. मनसेचा येत्या ६ तारखेला गुढीपाडव्याला मराठी नववर्षानिमित्त मेळावा शिवतीर्थावर होणार आहे या मेळाव्याला राज ठाकरे यांच्या बरोबरच राष्ट्रवादीचे शरद पवार हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेनंतर होणाऱ्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-मनसे अशी युती होणार आहे. त्याचे संकेत मेळाव्यात दिसून येतील. मराठीच्या मुद्द्यावर पूर्वी बाळासाहेब ठाकरे-शरद पवार हे एकत्र आले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती होतेय. ठाकरे-पवार त्याच शिवतीर्थावर एकत्र येत आहेत."
---------------------------------------------------
*रा* ज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुका प्रत्यक्षपणे न लढविता मनसैनिकांनी भाजप, नरेन्द्र मोदी, अमित शहा यांच्या प्रभाव करण्यासाठी विरोधात काम करा असा थेट आदेश दिला आहे. त्याचा अप्रत्यक्ष अर्थ हा काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत असाच होतो. हे कुणी सांगायची गरज नाही. मराठी प्रसिद्धीमाध्यमांनी २०१४च्या निवडणुकीनंतर 'मोदी लाटेत मनसेचे सर्वत्र डिपॉझिट जप्त' अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु मोदीलाटेतही अनेक लोकसभा मतदारसंघात लाख-सव्वालाख ते ८०-९० हजार मतं पडली होती. सफॉलोजीच्यादृष्टीने याचा अर्थ असा होतो की, मनसेनं स्वतःची आपली मतदारपेटी हळुवारपणे का होईना निर्माण केलीय. ज्यांच्यावर मोदीलाटेचा काहीच प्रभाव झाला नाही. मनसेची हीच मतं आणि जी मतं २०१४ मधील निवडणुकीत मोदीलाटेमुळे सेना-भाजपकडे वळली होती, पण सेना-भाजपच्या सत्ता काळाचा अनुभव पाहून पुन्हा मनसे किंवा त्यांच्या अप्रत्यक्ष सहयोगी मित्रांकडे वळल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला साहजिकच होणार आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं राज ठाकरे विधानसभा मतदारसंघात दौरे करतील आणि पक्षाच्या मतदारांच्या संपर्कात राहतील. ज्याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होईल. अशी राजकीय मांडणी राज ठाकरे यांनी केल्याचं दिसून येतं.

*काँग्रेस, हिंदी भाषकांचा दबाव ठोकरणार*
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा,राजकारणाचा विचार करता, असं लक्षांत येईल की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष राज्यात सध्या नावापुरताच राहिला आहे. त्यांच्या स्थानिक नेतृत्वाचा राज्यभरात काडीचाही उपयोग होताना दिसत नाही. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. मात्र ते राज्यात काँग्रेसपक्षाच्या जाळ्यात अडकल्याने त्यांचा पक्षविस्तार खुंटला आहे. त्यामुळे एका राष्ट्रीय पक्षासोबत राज्यात अजून काही वर्षे नाईलाजाने चिकटून राहिल्यास राष्ट्रवादीचं भवितव्यही अवघड आहे. त्यात राज्यात काँग्रेसकडं चेहराच नाही. राज्यातील मतदार राहुल गांधी किंवा सध्याच्या गांधी परिवाराकडे आकर्षित होत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. शिवाय उत्तर भारतीय समाजाचा कांगावा करत काँग्रेस पक्ष स्वतःसोबत राष्ट्रवादीला देखील पुढं जाऊ देत नाही. अशी परिस्थिती आहे. वास्तविक राष्ट्रवादी पक्षाचा उत्तरप्रदेशात काहीच राजकारण नाही. तिथं त्यांचा कार्यकर्ताही नाही.  बिहारमधील राष्ट्रवादी नेते तारिक अन्वर यांनीदेखील पक्षाला केव्हाच रामराम ठोकल्यानं तिथंही पक्षाला काहीच अस्तित्व नाही. त्यामुळं या हिंदीपट्ट्यातील मतांचा राष्ट्रवादीला कसलाच फायदा नाही. हे शरद पवार जाणतात. सध्या राष्ट्रवादीला महाराष्ट्र आणि काही प्रमाणात गोव्याच्या राजकारणात भविष्य आहे. त्यामुळं शरद पवारांनी विधानसभेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्यासारखा प्रभावी मोहरा स्वतःकडे खेचून विधानसभेच्यावेळी मोठा राजकीय भूकंप घडविण्याची योजना आखली आहे. महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसच्या जास्तीतजास्त ४-५ जागा निवडून येतील असं चित्र आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील काँग्रेसचं दखल घ्यावी असं महत्व उरणार नाही. हे शरद पवारांनी अचूक ओळखलं आहे, त्यामुळं त्यांनी राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचलं आहे.

*इतर छोट्या पक्षांना सोबत घेणार*
या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचा आकडा १०-१२ पर्यंत नेऊन दिल्लीत पक्षाचं स्थान मजबूत करण्याची योजना शरद पवारांनी आखली आहे. त्यानंतर २-४ महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी-महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवतील असं सध्याचं वातावरण आहे. या नव्या युतीचा अनौपचारिक शुभारंभ मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात होईल. या मेळाव्यात शरद पवार यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मेळाव्याचं निमंत्रण दिलंय. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासारखे धुरंधर राजकारणी एकाच व्यासपीठावर येऊन प्रचार करू लागले तर ग्रामीण आणि शहरी भागात कमीतकमी १०० जागा जिंकणं सहजशक्य आहे. त्यानंतर इतर लहान पक्षांना तसेच अपक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याची वेगळीच गणितं शरद पवार राज ठाकरे यांच्यासोबत आखत आहेत. असं राज्यातल्या आगामी राजकारणाचं चित्र असेल!

*ग्रामीणभागात राष्ट्रवादी तर शहरात मनसे*
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या राजकारणात महत्वाचा असला तरी महत्वाच्या मुंबई महापालिकेत त्यांचा फारसा प्रभाव नाही. नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही प्रबळ बनण्यासाठी राज ठाकरेंसोबत भविष्यातील रणनीती आखताना ते दिसत आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राज ठाकरे जातात तर अजित पवार हे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर जातात याला एक वेगळाच राजकीयदृष्ट्या संदर्भ आहे तो इथं घेतला पाहिजे. त्यामुळं उत्तरभारतीयांच्या मुद्द्यापेक्षा मराठीचा मुद्दा राष्ट्रवादी पक्षाला भविष्यात अधिक फायद्याचा ठरणारा आहे. राज ठाकरे यांचा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा अनेकांना चुकीचा वाटत असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादीसाठी खूप फायद्याचं ठरणारं आहे हे निश्चित!

*प्रकट मुलाखतीतून जुळले ऋणानुबंध*
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळणार्‍या राज ठाकरे यांनी अकस्मात मोदी विरोधाचा झेंडा कशाला खांद्यावर घेतला? पारंपारिक भाजपाविरोधी पक्षापेक्षाही कडव्या भाषेत राज ठाकरे कशाला बोलत असतात? वरकरणी बघितले तर राजवर होणारी ही टिका पटणारी आहे. मध्यंतरी दोन वर्षापुर्वी शरद पवार आणि राज ठाकरे दोस्तीची सुरूवात झाली. पुण्यातल्या जागतिक मराठी परिषदेच्या भव्य कार्यक्रमात राजनी शरद पवार यांची जाहिर मुलाखत घेतली आणि ती अनेक वाहिन्यांनी थेट प्रक्षेपणाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवली होती. त्यानंतर हळुहळू दोघांमधल्या ‘आस्थेचे’ विविध पैलू समोर येत गेले. मनसेच्या आरंभ काळात सुचक शब्दात राजवर टिका करणारे पवारही अकस्मात खुप बदलून गेले आहेत. त्यांची राजबद्धलची आपुलकी लपून राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व मनसे जवळ येणार, अशाही बातम्या होत्या. मग कॉग्रेसला मनसे नको असल्याच्याही बातम्या आल्या आणि अखेरीस राजनी वर्धापनदिनाच्या निमित्तानं १९ मार्चला मुंबईत आपल्या अनुयायांची सभा घेऊन लोकसभा लढवणार नसल्याची घोषणा करून टाकली. तसे बघायला गेल्यास दोन वर्षापुर्वीही त्यांनी घरगुती कारणासाठी महापालिका निवडणूका उपचार म्हणून लढवल्या होत्या. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणूकांकडे पाठ फ़िरवण्यात फ़ारशी मोठी बाब बघण्याचे कारण नाही. पण उमेदवार उभे न करणे, ही एक गोष्ट आहे आणि निवडणूकीपासून अलिप्त रहाणे, ही वेगळी गोष्ट आहे. राज यांनी लढणार नाही म्हटले, याचा अर्थ पक्षातर्फ़े उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण ते आणि त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष निवडणूकीकडे पाठ फ़िरवलेली नाही. ते लढतीमध्ये नक्की आहेत. ते कोणाच्या बाजूने आहेत, ते त्यांनी आता सांगायची गरज नाही. पण ते कोणाच्या विरोधात आहेत, त्याचा स्पष्ट खुलासा वा घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये काही सुचक राजकारण सामावले आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात हे स्पष्ट होईल!

*शिवसेनेनेही असाच निर्णय १९८०त घेतला होता*
राज ठाकरे हा एकमेव नेता व त्याचा मनसे हा एकमेव पक्ष असा आहे, ज्याने कुठलीही जागा मागण्यापेक्षा निरपेक्ष वृत्तीनं भाजपाला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही तर भाजपाचा उमेदवार पाडण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे संपुर्ण देशातील हा एकच नेता खराखुरा मोदी-शहांचा कट्टर विरोधक असल्याचे कोणालाही मान्य करावं लागेल. सर्वांनी एकत्र येऊन मोदी-शहांना पराभूत करावं, असं त्यांचे आवाहन जुनं आहे. पण ते साधलं नाहीतर आपल्या परीनं विरुद्ध काम करण्याची त्यांची तयारी पक्षस्वार्थ म्हणून चुकीची वाटू शकते. आपल्याला वरकरणी चुक वाटणारी अशी कृती खरोखर चुकीचीच असते का? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. पक्षाला कुठला लाभ नसलेल्या कृती वा भूमिकेतून काहीच साधत नसते का? असेच राजकारण करायचे तर लोकशाहीत पक्ष असून उपयोग काय? असं राजकीय विश्लेषकांना वाटणं स्वाभाविक आहे. राजची ही भूमिका चुकीची ठरवणार्‍यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १९८० सालच्या निर्णयाचंही असंच वाटलं असतं. तेव्हाही त्यांनी लागोपाठच्या पराभवानंतर असाच राजकीय विश्लेषकांना चमत्कारीक वाटणारा निर्णय घेतला घेतला होता आणि तेव्हा त्यांच्यावर कॉग्रेसची बटीक असा आरोप करणारे आज कॉग्रेस वाचवण्यात गर्क असतात. त्यांच्या पाठिशी उभं राहतात. हे आपल्याला दिसलं असेलच!

*गुढीपाडव्याला नव्या युतीची पायाभरणी*
१९८० साली मुंबईतही विधानसभा लढवण्याचे टाळलेल्या शिवसेनेनं १९९० सालात राज्यात कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान केलेलं होतं. हे इथं लक्षांत घेतलं पाहिजे. राज ठाकरे यांनी आज अचानक निवडणूका न लढवता मोदी-शहांना पराभूत करण्याचा घेतलेला पवित्रा, म्हणूनच तडकाफ़डकी चुकीचा वा मुर्खपणाचा ठरवणे मला तरी योग्य वाटत नाही. अजून त्यामागचे तर्कशास्त्र राजनी स्पष्ट केलेले नाही, किंवा त्याला पुढल्या काळात कुठले वळण लागणार; त्याचाही अंदाज बांधता येत नाही. राजकारणावर भाष्य करणारे व विरंगुळ्याच्या गप्पा मारणारे आणि प्रत्यक्षात राजकारणात जगणार्‍यांचे निकष वेगवेगळे असतात. पराभवात किंवा माघारीतही अनेकदा डावपेच सामावलेले असतात. आपण ते बघू शकत नाही, ते आपल्याला समजणारही नाही म्हणून त्याला मुर्खपणा वा चुकीचे ठरवणे योग्य वाटत नाही. राज ठाकरे आणि ‘मनसे’ मोदी-शहांच्या विरोधातल्या इतक्या आवेशात कुठले राजकीय डावपेच असतील? नजिकच्या काळात त्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करणं योग्य वाटतं. अर्थात प्रत्येकाचे मत वेगळे असू शकतं. आज राजच्या या आवेशाकडे बघून असेही वाटते, येत्या ६ तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून या गोष्टी स्पष्ट होतील. शरद पवार या मेळाव्यातून काय बोलतात हे ही लक्षणीय असेल. लोकसभा निवडणुकीत मनसैनिकांचं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल, त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत युती करणं मनसे आणि राष्ट्रवादीला सोपं जाईल असा त्यांचा होरा असेल!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...