Sunday 26 December 2021

'हिंदुत्वा'ची दावेदारी...!

"गेल्या रविवारी अमित शहा यांच्या दौरा झाला. त्यांनी शिर्डीच्या सहकार परिषदेशिवाय पुण्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभाचा झाला. तिथं त्यांनी शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला. शिवसेनेच्या हिंदूत्वाबाबत कार्यकर्त्यांची मनं कलुषित केली. कदाचित शिवसेना भाजप युतीचा इतिहास त्यांना ठाऊक नसावा. भाजपच्या आधीपासून शिवसेनेनं 'राजकारणात हिंदुत्व' आणलं होतं. त्यामुळं शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. शिवसेनेच्या या धाडसामुळंच 'राजकारणात हिंदुत्व' ऐरणीवर आलं. हे पाहूनच प्रमोद महाजन मातोश्रीवर येऊन युतीसाठी शिवसेनेच्या गळी पडले. शिवसेनेच्या दोस्तीनं भाजपनं महाराष्ट्रात आपली संघटनशक्ती वाढवलीय. त्यासाठी भाजपनं आपल्यात शिवसेना रुजवली. बाळासाहेबांच्या दराऱ्यामुळं भाजप डरकाळी फोडत नव्हता. पण त्यांच्या निधनानंतर भाजपनं आपलं खरं रूप दाखवलंच!"
--------------------------------------------------

*त* ब्बल दोन वर्षांनंतर अमित शहा यांचं राज्यात आगमन झालं ते शिवसेनेच्या विरोधात शड्डू ठोकण्यासाठी! त्यांनी आपण मुख्यमंत्रीपदासाठीचा कोणताच शब्द शिवसेनेला दिला नव्हता, असं सांगत त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर कडाडून हल्ला चढवला. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, हिंदुत्वाशी तडजोड केली, दोन पिढ्या ज्यांना विरोध केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसले.अशी टीका केली. हे सारं करण्यामागं महाराष्ट्राची सत्ता हाती आली नाही याचं शल्य दिसून आलं. पण १७ ऑगस्ट २०१९ ला शहा यांच्याच उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं होतं याची चित्रफीत युट्युबवर आजही उपलब्ध आहे. ती पहावी म्हणजे सारं स्पष्ट होईल. राजकीयपक्षाचं अंतिम घ्येय सत्ताकारण हेच असतं, त्याला कोणताहीही पक्ष अपवाद नाही. एखाद्या पक्षाला सत्तेत येण्यासाठी जेव्हा बहुमत प्राप्त झालेलं नसतं, तेव्हा सत्तेसाठी तो पक्ष तडजोडी करत सत्ता मिळवतो, याबाबत सगळेच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, त्यात भाजप वेगळा नाही मग शिवसेनेवरच आरोप का केला जातोय. शहांनी आपल्या पक्षाचा सत्तासंपादनाचा पूर्वेतिहास जरी डोळ्याखालून घातला असता तरी भाजप सत्तेसाठी कुणाकुणाच्या मांडीवर जाऊन पहुडला होता हे आठवेल! थेट मोरारजी देसाईंपासून ते मेहबुबा मुफ्तीपर्यंतचे सारे आठवतील. एवढं कशाला शिवसेनेला सोडून थेट राष्ट्रवादीच्या अजित पवारांशी पहाटेच्यावेळी म्होतुर लावलं होतं. खरंतर भाजपचा त्या दीडदिवसाच्या म्होतुराचा विस्कोट झाल्यानंतरच शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेलीय! भाजपनं शब्द फिरवला म्हणूनच शिवसेना इतरांबरोबर गेली. तेव्हा २०१४ मध्ये शिवसेना कशी फरफटत भाजपबरोबर आली तशीच आताही येईल असं त्यांना वाटलं होतं, पण घडलं भलतंच! तेव्हा फडणवीसांनी सत्तास्थापनेचा जो विश्वास शहांना दिला होता तो प्रत्यक्षात आला नाही. त्यामुळं शहांचा फडणवीसांवर राग असणं स्वाभाविक आहे. पण त्यावेळीच शहांनी काही प्रयत्न केले असते तर हरियाणासारखी इथंही सत्ता आली असती. नारायण राणे आणि इतर आयारामांना ताकद देण्याचा प्रयत्न शहांनी केला. सरकारी तपास यंत्रणांची सारी आयुधं तैनातीला ठेऊनही सरकार काही पाडलं गेलं नाही. उलट ते मजबूत बनलं. अखेर शहांनाच मैदानात उतरावं लागलं. विरोधी राजकीय पक्ष म्हणून शहांनी मांडलेली मतं ही योग्यच आहेत. पण सत्तेसाठी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, हिंदुत्वाशी तडजोड केली, असं म्हणणं हे तथ्यहीन आहे. कारण ९० च्या दशकापासून सगळ्याच पक्षांची वैचारिक बैठक संपुष्टात आलीय. विचारधारा, ध्येयधोरणे खुंटीला गुंडाळून, केंद्रातल्या वा राज्यातल्या सत्तेसाठी कुठल्याही पक्षाशी तडजोड करून व्यवहारवादी आणि सत्ताभोगी 'नवसत्तावाद' तयार झालाय. याचा पाया खरंतर भाजपनंच घातलाय. काँग्रेसच्या सत्तालोभी वरताण भाजपनं सत्तासाथीदार शोधलेत. १९९८ ला अटलजींनी विविध विचारधारेच्या २४ पक्षांना एकत्र करून सत्ता मिळवली होती. तेव्हा भाजपनं हिंदुत्व गुंडाळून ठेवलं नव्हतं का? भाजपनं सत्ताकारणासाठी विचारधारा गहाण ठेऊनच सत्तेचा मलिदा लाटला. म्हणजे त्यांचा तो आदर्शवाद अन शिवसेनेनं सत्तेचं गणित जुळवलं तर ती हिंदुत्वाशी तडजोड हे कसं काय?

'राजकारणात हिंदुत्व' याचा मागोवा घ्यायला जरा मागे जावं लागेल! शिवसेनेचं नाव हिंदुत्वाशी देशात जोडलं गेलं ते १९८७ सालच्या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीमुळं! ही देशातली पहिली निवडणूक थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढविली गेली. लोकप्रतिनिधी कायदा १९५२ अन्वये हिंदुत्वाच्या आधारावर मतं मागितल्यामुळं ती निवडणूक उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरविली, त्यावर सर्वोच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब केलं. निवडणूक रद्दबातल ठरली तरी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागता येतात आणि मतदारांचं ध्रुवीकरण करता येतं हे या निवडणुकीनं सिद्ध झालं. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला गेला, तर दुसरीकडं याच निवडणुकीमुळं भाजपला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेना नावाचा नवा राजकीय साथीदार मिळाला. या निवडणुकीनं शिवसेना देशभरात गाजली. देशभरात हिंदुत्वाच्या नावावर थेट मतं मागणं सुरू झालं. १९८७ साली काँग्रेसचे विलेपार्ले इथले आमदार हंसराज भुग्रा यांचं निधन झालं. भुग्रा यांच्या निधनानं इथं पोटनिवडणूक झाली. काँग्रेसनं प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी दिली. समाजवादी पार्श्वभूमीच्या कुंटे यांच्या मुंबईतल्या झोपडपट्टीच्या सर्वेक्षणातून झोपडीधारकांना फोटोपास मिळाले होते. काँग्रेसअंतर्गत राजकारणातही कुंटे यांचा मोठा दबदबा होता. तेव्हा मुख्यमंत्रीपदावर शंकरराव चव्हाण यांच्यासारखे हेडमास्तर होते. बाळासाहेबांनी काँग्रेस विरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी मुंबईचे महापौर असलेल्या रमेश प्रभू यांची निवड केली आणि निवडणूक घोषणा दिली 'गर्व से कहो हम हिंदू है!' आज हिंदुत्वाच्या नावावर देशाची सत्ता काबीज करणाऱ्या भाजपचा तेव्हा फारसा प्रसार झालेला नव्हता. मात्र तेव्हा भाजपनं शिवसेनेला या निवडणुकीत पाठिंबा दिलेला नव्हता. तर भाजपचा पाठिंबा धर्मनिरपेक्ष जनता पक्षाला होता. हिंदुत्वावर मतं मागणाऱ्या शिवसेनेला म्हणजे 'हिंदुत्वाच्या राजकारणा'ला विरोध केला होता. ते आता शिवसेनेला हिंदुत्व शिकवायला लागलेत. या निवडणुकीत जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा, काँग्रेसचे प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेचे रमेश प्रभू अशी ही तिरंगी लढत होती. बाळासाहेबांनी या निवडणूक प्रचाराची रचना केली होती. मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना प्रचारासाठी पार्ल्यात उतरवलं होतं. संपूर्ण विलेपार्ले भगव्या रंगानं न्हाऊन निघालं होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाहीर सभांमधून मतं मागितली होती. या झंझावातामुळं शिवसेनेनं निवडणूक जिंकली. या निवडणुकीमुळं भाजपच्या प्रमोद महाजन यांना पहिल्यांदाच शिवसेनेचा अंदाज आला आणि शिवसेना भाजप युतीच्या दिशेनं राजकारण सुरू झालं.

निवडणुकीच्या विरोधात कुंटे यांनी उच्च न्यायालयात दावा केला. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये दावा ठोकला. या कायद्यान्वये धर्माच्या नावावर मतं मागणं किंवा दुसऱ्या उमेदवाराला मतं देऊ नका, असं सांगणं हे अयोग्य असल्यानं न्यायालयानं कुंटे यांची बाजू उचलून धरताना प्रभू यांची निवडणूक रद्दबातल केलीच शिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा धर्माच्या नावावर मतं मागितल्यानं मतदानाचा अधिकारही काढून घेतला. या निवडणुकीमुळं भाजपनं शिवसेनेबरोबर युती तर केलीच शिवाय निवडणुकीत आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार स्वतःच्या मंचावरून करण्याचं न्यायालयाच्या निकालामुळं त्यांनी कायमच टाळलं. साध्वी ऋतांभरा किंवा तत्सम आक्रमक हिंदुत्वाची भाषा करणाऱ्यांना प्रचारात हिंदुत्वाचा प्रचार करण्याची जबाबदारी देऊन त्यांना भाजपच्या मंचावर नेण्याचं टाळत मतांचं ध्रुवीकरण करण्याची रणनिती आखली. आजही तीच रणनीती ते राबविताहेत. खरंतर शिवसेनेच्या स्थापनेनंतर लगेचच कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरच्या देवीमंदिरात नवरात्रोत्सवाला तिथल्या मुस्लिमांनी विरोध केला होता. शिवसेनाप्रमुखांनी स्वतः तो मोडून काढत उत्सव सुरू करून आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेला प्रारंभ केला. १९८७ साली डॉ.प्रभूंची निवडणूक रद्द झाली. त्यानंतर मनोहर जोशी यांच्या निवडीलाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. शिवसेनाप्रमुखांनी तिथं मांडलेली हिंदुत्वाची व्याख्या मान्य करून जोशींची निवडणूक ग्राह्य ठरवली. त्यानंतर १९८८ मध्ये हिमाचलच्या पालमपूर इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात आपल्या 'एकात्म मानवतावाद' आणि 'गांधीवादी समाजवादा'चा त्याग करून 'हिंदुत्वाचं राजकारण' स्वीकारलं. शिवसेनेशी युती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय महाराष्ट्रात होतं पण तिथं त्यांना शिरकाव करता आलेला नव्हता. शिवसेनेचा हात धरूनच भाजप महाराष्ट्रातल्या बहुजन समाजात शिरला आणि सत्तेपर्यंत पोहोचला.

जनसंघाचा भाजप झालेल्या या पक्षाचं ज्या पक्षाशी युती करायची त्यालाच खाऊन त्याच्यासारखं व्हायचं, हे वैशिष्ट्य आजवर राहिलंय. पुराणातली गोष्ट आहे. ती भाकडकथा असली तरी बोधप्रत आहे. त्या कथेत एक प्राणी होता. तो ज्याला खायचा त्याच्यासारखा तसाच आकार धारण करायचा. मुळात हा प्राणी शेळपट, पण बुद्धीचातुर्यानं त्यानं आपलं सामर्थ्य वाढवलं. तो आपल्यापेक्षा ताकदवान प्राण्याला त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्याचं भय दाखवायचा. आपण एकत्र आलो तर त्याला गारद करू, अशी खात्री त्याच्यात निर्माण करायचा. दोघांची युती व्हायची. मग संधी मिळताच हा पुराणोक्त प्राणी दोस्तालाच गिळायचा आणि त्याच्यासारखा आकार धारण करायचा. असं करत करत तो शेळीचा वाघोबा झाला. अनेक विचारवादी पक्षांना काँग्रेसचं भय दाखवत, त्यांच्याशी दोस्ती करत, त्यांचे गुण आपल्यात भिनवत भाजपनं आपली ताकद वाढवलीय. या शक्तीवर्धनासाठी भाजप गांधीवादी झाला. समाजवादीही झाला. हिंदू महासभा, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, अकाली दल, जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाशिव खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांची संघटना, रयत क्रांती संघटना, अशा अनेक छोट्या मोठ्या सर्व राजकीय पक्षांचे गुणावगुण आपल्यात भिनवून भाजप आज अंतरबाह्य काँग्रेसचं झालाय. अगदी भगवी काँग्रेस! शिवसेनेच्या दोस्तीनं भाजपनं महाराष्ट्रात आपली संघटनशक्ती वाढवलीय. त्यासाठी भाजपेयींनी आपल्यात शिवसेना रुजवली. बाळासाहेबांच्या दराऱ्यामुळं भाजप डरकाळी फोडत नव्हता. पण त्यांच्या निधनानंतर भाजपनं आपलं खरं रूप दाखवलंच!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...