Saturday 9 November 2019

युती की, महा'शिव'आघाडी....!

"महाराष्ट्राचं राजकारण एक वेगळं वळण घेतलंय. खऱ्या-खोट्याच्या वादात अमित शहांच्या साक्षीनं दिल्या गेलेल्या समसमान सत्ता आणि पदाच्या सत्याला असत्य ठरवलं गेलं. साहजिकच मतभेदात रूपांतर मनभेदात झालं. एकमेकांवरचा विश्वास उडाला आणि इगो जागृत झाला. इतरवेळी बंधुत्वाचं नातं सांगणाऱ्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं! युती ही हिंदुत्वाची नव्हती तर ती सत्तेची होती हे पुन्हा सिद्ध झालं. दोघांचे मार्ग अलग झाले. भाजपेयींनी सत्तेचा दावा केलाय तर, शिवसेनेने पवारांच्या साथीनं मुख्यमंत्रीपदाची तयारी चालविलीय. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. हिंदुत्व वगळता इतर कोणत्याही धोरणाशी सुसंगत नसलेल्यांची युती टिकणं केवळ अशक्य होतं, ते आज घडतंय. खरं-खोटं, मानापमान, इगो, सत्ताकांक्षी मानसिकता दूर ठेवून युती होतेय की, राज्यात नवी 'महाशिवआघाडी' अस्तित्वात येतेय हे आगामी काळात दिसेल. पवार, शिवसेना आणि भाजपेयीं यांच्यातील परस्पर संबंधाचं केलेलं हे विश्लेषण!"
--------------------------------------------------------


*म* हाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेनं जाणार आहे याचे काही संकेत मिळताहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं वृत्त आहे त्यापूर्वी संजय राऊत यांनी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. राज्यात भाजपेयींना सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नांना पवारांनी काँग्रेसलाही सोबत घेतलंय. राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण पाहता, भाजपेयींची सत्तासाथीदार असलेली शिवसेना ही आता पुन्हा भाजपेयींबरोबर जायला इच्छुक नसल्याचं दिसतंय. त्यामुळं आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सख्य घडलं तर आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेची तर प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजपेयींची साथ सोडण्याची तयारी दिसतेय. पूर्वी भाजप हा शहरी पक्ष होता त्याला ग्रामीण भागात जाण्यासाठी शिवसेनेची साथ हवी होती. आज तशी स्थिती राहिलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपेयींची सत्ता आल्यानं सत्ताकारणातले सर्वच पक्षातले सटोडीये थेट भाजपात गेले अन त्यामुळं भाजपला ग्रामीण तोंडवळा आलाय. आता गरज संपली असल्यानं भाजपला शिवसेनेची साथ नकोशी झालीय. २०१४ला सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेनेनं विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. विरोधीपक्षनेतेपदही मिळविलं होतं. बहुमत सिद्ध करताना 'अदृश्य हाता'ची जी खेळी राष्ट्रवादीनं खेळली त्यानं भाजप खरं तर सत्ताधारी बनला. सत्ताधारी बनल्यानंतर ही युती टिकावी म्हणून केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी 'मातोश्री' गाठली आणि शिवसेनेला सत्तासाथीदार बनविलं. तरीदेखील तांत्रिकदृष्टया अखेरपर्यंत शिवसेना विरोधीपक्षातच होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्नात भाजपेयींनी शिवसेनेला वापरलं आणि झुलवत ठेवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तेतील या साथीदारांनी एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते. त्यामुळे या दोघांच्यात पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. भाजपेयींशी युती न करण्याचा निर्णय जर शिवसेनेनं घेतला तर राष्ट्रवादीचा 'अदृश्य हात' पुन्हा भाजपच्या पाठीशी राहणार तर नाही ना? राष्ट्रवादीचा पूर्वानुभव लक्षात घेता अशी भीती शिवसेनेला वाटत असल्यानेच संजय राऊत यांनी पुन्हा पुन्हा शरद पवारांची भेट घेत :महाशिवआघाडी'चा खुट्टा हलवून बळकट केलाय. पवारांनी मात्र अद्याप प्रसिद्धीमाध्यमांना आपल्या स्वभावानुसार 'ताकास तूर' लागू दिला नाही. काँग्रेसी नेत्यांनी हो नाही करत भाजपेयींना रोखण्यासाठी पवारांचं घर गाठलं!

*लोकनेत्यांना एकमेकाविरुद्ध झुंजवलं*
एकंदरीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही तसे राज्यस्तरावरचेच पक्ष आहेत. देशातल्या इतर राज्यात त्यांचं अस्तित्व फारसं नाहीच. तेव्हा महाराष्ट्रातला आपला गड मजबूत करण्याची गरज सध्यातरी दोघांनाही दिसतेय. तसं पाहिलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही महाराष्ट्राचे लोकनेतेच! आज शिवसेनाप्रमुख हयात नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांचं जबरदस्त वजन होतं, चलनी नाणं होतं. चलनी नाण्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवसेनाप्रमुख हे 'काटा' काढून आपली 'छाप' पाडायचे तर शरद पवार आपली 'छाप' पाडून 'काटा' काढत! तसे दोघे सख्खे मित्र, ते त्यांनी कधी लपवलंही नाही. गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्यावेळी दोघे मांडीला मांडी लावून बसले होते. त्यापूर्वी दोघांनी एकत्र येऊन एक साप्ताहिकही सुरू केलं होतं. पवार कन्या सुप्रिया सुळे जेव्हा राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी सुप्रिया ही माझीच मुलगी आहे असं म्हणत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. अशी त्यांची दोस्ती होती. याच नात्यानं उद्धव ठाकरे पवारांना भेटायला गेले असावेत. शिवसेनाप्रमुख आणि पवार यांच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत होती. या दोघांचा शब्द हा प्रमाण मानला जाई. महाराष्ट्रावर प्रभाव असणाऱ्या या दोघा मित्रांना मात्र भाजपेयींनी कुटील डाव खेळत एकमेकांच्या विरोधात अखेरपर्यंत त्यांना झुंजविलं होतं. महाराष्ट्रात अनेकवर्षे प्रयत्न करूनही स्वबळावर ग्रामीण भागात जाणं भाजपला जमत नव्हतं. याचा प्रत्यय येताच भाजपेयींनी शिवसेनेला पद्धतशीररित्या घेरलं. त्यासाठी संघ परिवारातले ग. वा. बेहेरे, विद्याधर गोखले, दि. वा गोखले अशा काही पत्रकार मंडळींना वापरलं. त्यानंतर 'महाजनी' साथीनं शिवसेनेच्या 'भगव्या'च्या कृपेनं महाराष्ट्राच्या सर्वदूर 'केशरी' भाजपेयी शिवसेनेचं बोट धरून शिरले. सर्वधर्मसमभाव, मानवी एकता-समता यासाठी हिंदू ऐक्य हे गणित मांडलं गेलं. महाराष्ट्राची सत्ता जिंकण्यासाठी सेना-भाजप उभी आहे आणि हे आव्हान परतवून लावण्याची हिंमत, ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्येच आहे, याची पूर्ण कल्पना असल्यानंच भाजपेयींनी नाना मार्गानं शरद पवारांना बदनाम करण्याचा, त्यांची गुन्हेगारी राजकारणी अशी प्रतिमा जनमानसापुढं आणण्याचा पद्धतशीररीत्या प्रयत्न पूर्वी केला. त्यासाठी नोकरशाहीतल्या आपल्या काही पिलावळींना देखील वापरलं. त्याचबरोबर काँग्रेसमधल्या गटबाजीचाही त्यांनी चाणाक्षपणे वापर केला. सत्तेसाठीच सेनेशी भाजपेयींनी युती केली. उद्या आपल्याला बाजूला ठेऊन शिवसेना शरद पवारांबरोबर आघाडी करून सत्ता राबविल ही भीती तेव्हाही भाजपेयींच्या मनांत होती. तशी आजही आहे. यासाठी शिवसेनाप्रमुख यांच्या मनांत शरद पवारांबद्धल केवळ राजकीय विरोधच नव्हे तर द्वेष भरण्यातही भाजपेयी यशस्वी झाले. भाजपेयींनी या दोघा मित्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभं करण्यात यश मिळवलं. या लढाईत कुणातरी एकाची सफाई होणार हे निश्चित होतं आणि अशी सफाई हीच भाजपची कमाई!  इकडे पवारांनी आपल्या मैत्रीपूर्ण राजकारणानं राज्यातली डावी चळवळ केव्हाच गलितगात्र करून टाकली होती. परंतु त्याचवेळी उजव्या विचाराच्या भाजपनं हिंदुत्वाचा अंगीकार करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वरूपात जबर आव्हान उभं केलं होतं. हे विसरता येणं शक्य नाही.

*मतभेदाचं रूपांतर मनभेदात झालंय*
हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे मध्यममार्गी, प्रबोधनी विचारांची शिवसेना भाजपच्या दावणीला कशी बांधली गेली त्याचा हा इतिहास! आज बाळासाहेब हयात नाहीत, मात्र शिवसैनिकांनी त्याच हिंमतीनं, उद्धव ठाकरेंच्या साथीनं भाजपेयींना हिसका दाखवलाय. पन्नाशी पार केलेल्या शिवसेनेला आज कधी नव्हे ती राजकीय आधाराची गरज वाटू लागल्याचं सध्यातरी जाणवतंय. भाजपला ताकद देणाऱ्या शिवसेनेला भाजपवर विश्वास राहिला नसल्याचं सिद्ध झालंय; भाजपेयींनी ते आपल्या वागण्यानं दाखवूनही दिलंय. १९९९ मध्ये राज्यातली सेना-भाजपची सत्ता गेल्यानंतर औरंगाबाद महापालिका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा 'शत प्रतिशत भाजप' असा नारा दिला होता. तेव्हापासून भाजपनं हा शिवसेनेच्या विरोधातला सवतासुभा उभा केलाय. त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, अगदी अलीकडच्या मुंबईपासून सोलापूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार मंडळींनी पातळीसोडून शिवसेनेवर टीका तर केली होती. शिवाय 'शिवसेनेला गाडून टाका' असं जहरी वक्तव्य केल्यानं शिवसेना आणि शिवसैनिक त्वेषानं उभे ठाकले. राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी यावेळी शिवसेनेला खिंडीत गाठून कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनाप्रमुख यांच्याशिवाय होणारी ती निवडणूक होती. उद्धव, आदित्य, शिवसेनेतील परप्रकाशित नेते आणि शिवसैनिकांनी जिद्दीनं मुंबई, ठाणे महापालिका आपल्याकडं राखली, सोलापुरात आपली लक्षणीय वाढ केली. आज राणे भाजपच्या वळचणीला गेलेत, राज चाचपडतोय, काँग्रेस अद्यापि सावरलेली नाही. अशावेळी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची साथ शिवसेनेनं घ्यायला हवीय. हा धूर्त विचार शिवसेनेनं करायला हवाय. कोकणातील माणसं ही शिवसेनेच्या मागे आहेत. तर देशावरची, घाटावरची माणसं राष्ट्रवादी बरोबर आहेत. हे खचितच उद्धव ठाकरे जाणत असतील. पवारांशी त्यांनी केलेली सलगी हे त्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल व्हावं!

*शिवसेनेला मूळ विचाराप्रत परतू शकेल*
ज्या प्रबोधनकारांनी शिवसेनेला जन्माला घातलं त्या प्रबोधनकारांचे उद्धव ठाकरे हे नातू आहेत. त्यांचा प्रबोधनी विचार शिवसेनेनं स्वीकारायला हरकत नाही. शिवसेनेची मानसिकता ही पूर्वी कधीच भाजपेयी नव्हती, ती मराठी अस्मितेचीच होती. त्यामुळेच शिवसेनेनं प्रारंभीच्या काळात प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. हा मूळ विचारच विसरल्यानं शिवसेनेची आजची संभ्रमावस्था निर्माण झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यात शिवसेना मूळ विचाराप्रत परतू शकेल. मराठी अस्मिता अंगीकारता येईल. यानं नव्या वाटचालीचा प्रारंभ होईल. पण शिवसेनेतल्या काहींना हे मानवणारं नाही. त्यांचे सारे मतदारसंघ शहरी असल्यानं त्यांना भाजपचाच मेणा उचलायचाय पण भाजपेयींना आता असले भोई नकोसे झाले आहेत. असं असलं तरी शेवटी पक्षप्रमुखांना आणि शिवसैनिकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. कालपर्यंत शरद पवारांचा 'नेणता राजा' असं म्हणत अवहेलना करणाऱ्यांना आज त्यांनाच 'जाणता राजा' म्हणावं लागणार की भाजपेयींची पेशवाई झुल आपल्या अंगाखांद्यावर मिरवाचीय हा त्यांच्यापुढचा महत्वाचा प्रश्न आहे.

*इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे*
आज जशी स्थिती झालीय अगदी तशीच परिस्थिती १९९९ मध्ये झाली होती. तेव्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुणालाच बहुमत न मिळाल्यानं कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होत नव्हतं. त्या निवडणुकीत सेना-भाजपची युती होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी नव्हती  हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते, त्यापूर्वी पवारांनी सोनिया गांधींचा 'विदेशी' म्हणून तिरस्कार केल्यानं दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यताच नव्हती. सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असताना तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी भाजप-सेनेनं राष्ट्रवादीशी समझौता करावा असा पर्याय मांडला होता. वेळ पडलीच तर शिवसेनेनं बाहेरून पाठींबा द्यावा असाही विचार होता. राष्ट्रवादीच्या साथीनं मुंडे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुंडे यांची ही चाल ओळखून शिवसेनेनं हे सारे पर्याय धुडकावून लावले. पवारांना सोनियांच्या विरोधात उभं ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न देखील शिवसेनेमुळे फसला. यामुळं एक झालं, पवार पुन्हा काँग्रेसच्या जवळ गेले, सत्ता हाती घेतली आणि केंद्रात सत्ताधारीही बनले ते केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेच! हे ही इथं समजून घेतलं पाहिजे. या साऱ्या घडामोडी पवार जाणतात, शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्यास भाजपवर अंकुश राहू शकतो. ते काम शिवसेना आपल्या पद्धतीनं करेल हे जाणूनच पवारांनी आता शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद दाखवलाय. आता शिवसेना काय करते हे पाहावं लागेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि त्यांचे 'चाणक्य' संजय राऊत आणि शिवसैनिक यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. पण मराठी माणसाच्या मनांत जसं बाळासाहेब-शरद पवार यांनी एकत्र यावं असं वाटतं होतं तसंच आता बाळासाहेबांची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यावं अशी मनिषा आहे हे मात्र निश्चित! पाहू या आगामी काळात काय घडतंय ते!

*तीन पायाच्या लंगडीच्या खेळात काय होणार!*
सध्यस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या निकालानं एक गोष्ट स्पष्ट झालीय. भाजपेयींना सत्तेत यायला शिवसेनेची गरज लागणार आहे. त्याउलट, शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा पर्याय खुला झालाय. लोकसभा निवडणुकीपुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषेदेत समसमान सत्तावाटपाबाबत केलेली घोषणा फडणवीस यांनीच नाकारल्यामुळं शिवसेना खवळली. शिवसेनेतला एक गट, जो नेहमीच भाजपेयींच्या विरोधात होता, त्याला नेमकं बळ मिळालं. या गटात भाजपेयींबाबत प्रचंड कटुता असणारे राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे पण होते. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर चाकं फिरू लागली, ती एक नवीन राजकीय आणि सामाजिक समीकरण घडवण्यासाठी; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करण्याची. जर शिवसेनेनं राष्ट्रवादीला सोबत घेऊन काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं तर शिवसेनेला पुन्हा आपल्या मराठी माणसाची अस्मिता या विषयावर लक्ष केंद्रित करता येईल. या वाटेवर खाच-खळे जरूर आहेत; शिवसेनेनं लढवलेल्या १२४ जागांपैकी ५७ ठिकाणी थेट लढत ही पवारांच्या राष्ट्रवादीशी होती. त्यामुळे अशापद्धतीनं स्थापन होणारं सरकार किती काळ टिकेल याबाबत शंका देखील आहे, पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकच भीती आहे, ती म्हणजे भाजप परत निवडून आली तर त्यांचे आमदार फोडून आपले सभागृहातले स्थान भक्कम करेल. त्यामुळे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र… या उक्तीला साजेशी तीन पायांच्या लंगडीचा खेळ सुरु झाला आहे. या अंकाचा शेवट काय होईल हे लवकरच कळेल…

चौकट............
*भाजपनं शिवसेनाच आपल्यात रुजवली!*
जनसंघाचा भाजप झालेल्या या पक्षाचं ज्या पक्षाशी युती करायची त्यालाच खाऊन त्याच्यासारखं व्हायचं, हे वैशिष्ट्य आजवर राहिलंय. पुराणातली गोष्ट आहे. ती भाकडकथा असली तरी बोधप्रत आहे. त्या कथेत एक प्राणी होता. तो ज्याला खायचा त्याच्यासारखा तसाच आकार धारण करायचा. मुळात हा प्राणी शेळपट, पण बुद्धीचातुर्यानं त्यानं आपलं सामर्थ्य वाढवलं. तो आपल्यापेक्षा ताकदवान प्राण्याला त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्याचं भय दाखवायचा. आपण एकत्र आलो तर त्याला गारद करू, अशी खात्री त्याच्यात निर्माण करायचा. दोघांची युती व्हायची. मग संधी मिळताच हा पुराणोक्त प्राणी दोस्तालाच गिळायचा आणि त्याच्यासारखा आकार धारण करायचा. असं करीत करीत शेळीचा वाघोबा झाला. भाजपला अजून वाघ व्हायचंय. पण अनेक विचारवादी पक्षांना काँग्रेसचं भय दाखवत, त्यांच्याशी दोस्ती करीत, त्यांचे गुण आपल्यात भिनवत भाजपनं आपली ताकद वाढवलीय. या शक्तीवर्धनासाठी भाजप गांधीवादी झाला. समाजवादी झाला. सर्व राजकीय पक्षांचे गुणावगुण आपल्यात भिनवून भाजप आज अंतरबाह्य काँग्रेसचं झालाय. शिवसेनेच्या दोस्तीनं भाजपनं महाराष्ट्रात आपली संघटनशक्ती वाढवलीय. त्यासाठी भाजपनं आपल्यात शिवसेना रुजवली. बाळासाहेबांच्या दराऱ्यामुळे भाजप डरकाळी फोडत नव्हता. पण त्यांच्या निधनानंतर भाजपनं आपलं खरं रूप दाखवलंच!
------------------
- हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

  1. छान विश्लेषण.
    शिवसेना प्रबोधनकारांच्या मूळ विचारांकडे गेली तर उत्तमच, पण बदललेले संदर्भ शिवसेनेला ती मोकळीक देईल का आणि सध्याचे नेत्रुत्व हा क्रांतीकारक पवित्रा घेईल का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
    बाकी भाजपच्या वाढीबाबत विश्लेषण पटते.
    या मांडणीबद्दल अभिनंदन.

    ReplyDelete

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...