Saturday 21 April 2018

कामासुरांच्या उरावर थयाथया नाचायला हवं!

बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशाप्रकारे जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बिळात दडलेल्या बलात्काऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींना बरबाद करणाऱ्यांविरुद्ध संतापाने खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर येऊन त्यांना हुडकून काढून चेचून सरळ करायला हवंय. खरं तर कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय! अक्षरशः पांच सहा वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी आणि शुष्क भावनांनी संवेदना संपलेला आपला हा समाज बातम्या वाचतो आणि विसरून जातो. त्या बिचाऱ्या अजाण मुलींना त्यांचा देह ही भोगाची खाण आहे ह्याचीच काय, पण आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणजे काय आहोत, याचीही कल्पना नसते, एवढ्या छोट्या वयात अत्याचार होतो. दुसऱ्याच्या विकृत वासनेपायी आपलं सारं बालपण-जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसेल. पण दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा जणू मोहोर फुटलाय, त्यामुळं अशा पाशवी घटना जागोजागी घडताहेत. आमच्या मुलीबाळींना नासवणारे हे साप ठेचून काढण्यासाठी जागरूकता, ऐक्य दाखवू शकलो तरच सत्ता आणि मत्ता यांचा कैफ चढलेली बेधुंद बेफाम  झालेली कारटी ताळ्यावर येतील!"
---------------------------------------------
*ब* लात्काराच्या घटनांनी सारा देश हादरून गेलाय. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या कळ्यांना कुस्करून टाकलं जातंय. या कळ्यांचे विकृत वासनेच्यापोटी क्रूरपणे बळी घेतले जाताहेत. जम्मू काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यातल्या एका खेडेगावात असिफा या ८ वर्षाच्या मुलीवर सात दिवस बलात्कार करून तिला मारून देवळाच्या मागे टाकलं. या कुकर्माचं धिक्कार करायचं सोडून तिथले भाजपच्या दोन मंत्र्यांसह अनेक नेतेमंडळी धार्मिक आधारावर त्यांचं समर्थन करत होते. उत्तरप्रदेशातल्या उन्नावमध्ये झालेल्या बलात्कारात भाजपचाच आमदार भावासह दोषी सापडला. गुजरातच्या सुरतमध्ये असाच प्रकार उघडकीला आलाय. एकापाठोपाठ एक अशा घटना उघडकीस येताहेत. लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा बातम्या आल्या. देशभरात फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर आक्रोश उमटतोय. डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज उघडकीस येताहेत.

*जागोजागी अशा घटना घडताहेत*
दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवरून गुन्हेगारी विषयक कार्यक्रम सादर केले जातात. या साऱ्याच कार्यक्रमातून एखादं दुसरी घटना सोडली तर व्याभिचाराच्या, वासनाकांडाच्या, लैंगिक अत्याचाराच्या, बलात्कारासारख्या बातम्यांच प्रामुख्यानं आढळून येतात. देशात आणि राज्यात दिवसेंदिवस अनैतिक, व्याभिचार, लैंगिक विकृती, अत्याचार याचे प्रमाण वाढताना दिसताहेत. लहान मुलींवर बलात्काराच्या घटना सध्या वाढल्याने त्याची मोठी चर्चा प्रसिद्धीमाध्यमात सुरू आहे. जागोजागी वासनाकांडे उभी राहताहेत. वाट्टेल ते करून सत्ता मिळवायची, ती टिकविण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असणाऱ्या आणि अब्रूपेक्षा अन्य गोष्टी सांभाळण्याचीच संवय लागलेल्या महाभागांची कारटी या अशा घटनांत प्रामुख्यानं असलेली दिसतात.अशा घाणेरड्या प्रकरणात गुंतलेल्या, आपलं सारं आयुष्य उध्वस्त करून टाकण्याएवढा नीच गुन्हा सहजपणे करणाऱ्यांच्या पालकांना आज अश्रू ढाळण्याची वेळ आलीय. निलाजरेपणाने लोकांपुढं येत असतील आणि अशा घटनांमागे व्यक्तिदोष राजकारण आहे, असे खुलासे करत असतील, पण रात्री अंथरुणावर पडल्यावर अथवा एकाकी असल्यावर ही सगळी आपल्याच पापाची, आपल्याच बेजबाबदारीची, आपल्याच गैरगोष्टीत सहभागी होण्याची फळं आहेत. हे त्यांना जाणवत असणार!

*सत्ता आणि मत्ता यानेच अशा घटना घडताहेत*
सत्ता आणि मत्ता म्हणजे अधिकार आणि पैसे पचवायलाही माणूस समर्थ असायला लागतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे समाजाचे लक्ष आहे, याची जाणीव त्याला असावीच लागते. लोकांची पर्वा नसेल त्यातल्या एखाद्याला वाटतं, पण तो सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, निर्मिक परमेश्वर, जगतचालक माझ्यावर लक्ष ठेवतोय त्याची पर्वा करायला हवी, असं त्या एखाद्याला वाटायलाच हवं. हे जेव्हा वाटेनासं होतं तेव्हा घसरण सुरू होतं. मुलं बेफाम बनतात. स्वतःच्याच नव्हे सगळ्या खानदानाच्या तोंडाला काळ करावं लागेल. हे सगळं नक्की कशामुळे घडलं याचा खोल अभ्यास करून मगच निष्कर्ष काढले गेले पाहिजेत. जेव्हा समाजाचेच नैतिक अधःपतन होतं तेव्हा असं घडणारच! याबाबत समाजानेच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर आपल्याकडच्या हिंदी चित्रपटातून किंवा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. नट्याचं अंग हलवणं, असासे, उसासे टाकणं हे तरुणांचीच नव्हे, म्हाताऱ्यांचीही विकृत वासना चाळवण्यासाठीच असते. असाच अनुभव येतोय, याबाबत कुणीच काही बोलत नाही. अशी दृश्ये देणाऱ्या नट्या आज निषेधाचे फलक घेऊन पोज देताहेत, हा दांभिकपणा आहे.

*समाजमनाला विकृत वळण दिलं जातंय*
कायद्याचे रक्षक पोलीस, वकील, न्यायाधीश आणि ज्यांच्याबद्धल परंपरेनं आदरभाव जोपासला जातो, अशा शिक्षक, प्राध्यापक, मार्गदर्शक व्यक्ती यांचे अत्यंत गैरचित्रण पद्धतशीरपणे हिंदी चित्रपटातून, साहित्यातून होत असते आणि त्याबद्धल कुणीही, कधीही संताप व्यक्त केलेला नाही. जी वासनाकांडे गेल्या काही दिवसात धगधगली वा आज जी धगधगताहेत ती बघितल्यावर हिंदी चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. रस्त्यात जाणाऱ्या अनोळखी मुलीला अडवून तिला पटविण्याची हिंमत या चित्रपटातल्या नायकांनी दिली आणि त्या मुलींना रांडबाजी करायला लावून त्यांच्या साह्यानं मौजमजा करण्याइतपत पैसा कमावण्याची शक्कल या चित्रपटातल्या खलनायकांनी दिली. तरुण-तरुणींचे अर्धनग्न तांडे कामक्रीडांची आठवण व्हावी, अशी झटकाझटकी करत नाचताहेत आणि चोळीच्या आंत काय दडलंय हे तपासताहेत. आपल्या खटियाजवळ सरकावत आहेत. ओले-ओले कोरडे-कोरडे किंचाळताहेत. हे सारे आपण मिटक्या मारीत बघत आलो. घरातल्या दुरदर्शनपुढे आई-बाप-मुलं या सगळ्यांत रंगू लागली, तर आपल्या घराच्या सिनेमा का होणार नाही? आपल्या मुलीला रस्त्यात गाठून लॉजवर मजा मारायला नेण्याचा प्रकार का नाही घडणार? हे हरामखोर अशा वासनकांडात गुंतले आहेत. त्यांना जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाज का पुढाकार घेत नाही? स्त्रियांच्या, मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणेच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजाने का घेऊ नये, जे कुणी पोलिसांच्या हाती न सापडता सोज्वळता मिरवत बसले आहेत त्यांना महिलांनी, समाजाने गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, भेकडपणे या अशा प्रकरणी आपलं सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांना आनंद होईल.

*अत्याचाराच्या अशाही घटना घडताहेत*
प्रसिद्धी माध्यमं अशा बाबी रवंथ करीत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली महिलांनी दाखवायला हवी. अशा दुर्दैवी व अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना मनाची उदारता दाखवून आपलं म्हणणारे तरुण पुढं यायला हवेत. आईबापांनी अशा कामात दिलदारपणे मुलांना सर्वप्रकारे प्रोत्साहन द्यायला हवं. आपलीच मुलं आपल्यापैकी कुणाच्यातरी मुली फसवतात, नासवतात, धंद्याला बसवतात, ब्लॅकमेल करण्यासाठी या दुर्दैवी मुलीसोबत केलेल्या संभोगाच्या चित्रफिती बनवतात, ही गोष्ट काळजात दुःखाचा वणवा उठवणारी आहे. मस्तकात आग पेटवणारी आहे. आपल्या मुलांना आपणच या अशा प्रकरणात सडवत घालणार आहोत का?

*उन्माद मस्तकात भिनलाय*
असले नीच प्रकार करणाऱ्यांच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, सत्तेचं आणि मत्तेचं पाठबळ आहेच. आमचं कोण काय वाकडं करणार? आम्ही सगळं दडपू शकतो, अशी खात्री असल्यानेच हे सारे बेफाम बनले आहेत. आमच्या हाती सत्ता आहे. कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो. लोकांना धमकावू शकतो आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरूण घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारे वापरायचे असते असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासवणाऱ्या प्रकाराबद्धल राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. राजकीय व्यासपीठावरून राणा भीमदेवी थाटाची भाषणं करणारे लोक लैंगिक शोषणाबाबत काहीच बोलत नाहीत. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी भांडणारे डावेही शांतच आहेत. मोठा गाजावाजा करत महिलांच्या विकासाचे धोरण जाहीर करणाऱ्या पक्षालाही याचं तर जणू सोयरसुतकच नाही अशी परिस्थिती आहे.

 *डोक्याला मुंग्या आणणारी घटना*
मध्यंतरी टाईम्स नाऊ चॅनेलवर एक मेंदूला मुंग्या आणणाऱ्या घटनेवर चर्चा सुरू होती. 'बंगळुरू शहरात पुन्हा एकदा 'निर्भया' सारखं प्रकरण घडलं होतं, भर दिवसा एका तरुणीवर मद्यधुंद झालेल्या सहा तरुणांनी पाशवी बलात्कार केला. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिला विवस्त्र केलं, तिचे ते अंगावरचे कपडे जाळून टाकले. तिचे हात-पाय दगडाने ठेचुन तिला जखमी केलं. या साऱ्या घटनेचा व्हिडीओ चित्रणही त्या नराधमांनी केलं आणि त्या मुलीला त्याच असहाय अवस्थेत तिथंच टाकून ते पळाले. ती तरुणी त्या जखमी अवस्थेत सरकत सरकत जवळच असलेल्या कचरा पेटीत गॅरेजवाल्यांनी टाकलेले ऑईलचे गलिच्छ कापड आपल्या लज्जारक्षणासाठी वापरले. तिथल्या बसस्टॉपवर जाऊन ती मृतवत अवस्थेत पडून राहिली. तब्बल ४८ तास ती तरुणी तिथं होती जाणारे येणारे पाहात होते पण कुणीही तिला मदतीचा हात दिला नाही. संवेदनाहीन समाज, थिजलेली मनं याचं दर्शन इथं घडत होतं. एका समाजसेवी संस्थेच्या अनोळखी महिलेनं तिला रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा ही दुर्दैवी घटना उघडकीला आली

*घराचं थिएटर झालंय*
विजापूरच्या विजयानगर परिसरात अशाच एका शालेय मुलीवर चार जणांनी पाशवी बलात्कार तर केलाच शिवाय तिची निघृण हत्याही केलीय.
पुण्यातही पिंपरी चिंचवडला सहा मद्यधुंद तरुणांनी दोघा अल्पवयीन बहिणींना सामूहिक बलात्कार केलाय. अशा दुर्दैवी घटना दररोज दुरचित्रवाणीवर आणि वृत्तपत्रातून पाहतो वाचतो. सामाजिक संवेदना तर केव्हाच मेल्यात. अशा प्रकारानंतर प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या पण तसं झालंच नाही. घराचं थिएटर आणि टीव्हीवरच्या नंगानाच सहकुटुंब सहपरिवार पाहणाऱ्या समाजाला त्यातली बीभत्सता कशी जाणवणार? त्या निरागस मुलीवर झालेला अत्याचार हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. स्त्रियांवर अत्याचार करणारा स्त्रीला माणूस मानतच नाही. सामुहिक बलात्कार, फसवणुकीनं बलात्कार, चंदेरी दुनियेतील झगमटावर भाळलेल्यांचा घेतलेला गैरफायदा या सगळ्या गोष्टी पुरुषात पशुत्व असल्याचं दर्शवतात. अशावेळी तो स्त्रीशरीराची, मनाची पर्वाच करीत नाही. स्त्री शुद्धीवर आहे की मेलीय याचाही तो विचार करत नाही. बंगळुरातला सामूहिक बलात्कार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतात. एका तरुणीवर सहा सहा जण अत्याचार करतात, तिच्या देहाचा चोळामोळा करतात, तिची तडफड त्यांना दिसत नाही, त्यांचं मन द्रवत नाही. एकाकी असहाय स्त्रीवर ते झडप घालतात. सत्ता, पैसा आणि ताकद या तिन्हींचा या दुष्कार्मासाठी वापर केला जातो. सारं करून साळसूदपणे मिरवायला पुरुषपशु मोकळे सुटतात याविरुद्ध संघटित आक्रदन व्हायला हवं!


 चौकट....

*पौरुष्यच कापायला हवंय!*
बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटत नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. जोवर आपल्या अब्रूच्या अंगाराने ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशाना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर वर्तमानकथाही आहे. स्त्री जोवर हिंमत दाखवणार नाही तोवर असंच होणार. माझी अब्रू तू लुटलीस तुझी अब्रू मी चव्हाट्यावर लुटणार म्हणून स्त्री बेडरपणे उभी राहिली, तर भल्याभल्याची पाचावर धारण बसेल. आज ना उद्या हे होणारच! त्यासाठी डॉ. राममनोहर लोहिया जे सांगत ते प्रत्येकीने लक्षात घ्यायला हवं. ' पावित्र्य हे केवळ कौमार्याशी संबंधित नाही बलात्कार करणाऱ्याला बरबाद करण्याची जिद्द धरायला हवी.' अत्याचारी पुरुषाचे पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याचे अधूनमधून वृत्तपत्रातून वाचनात येतं. डिंपल कपाडिया-नाना पाटेकर असलेल्या कुठल्यातरी हिंदी सिनेमात हे प्रकर्षानं दाखवलं होतं. जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात हे केव्हाच सांगितलं आहे!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

2 comments:

  1. Horrible...Day by day our country's image is being tarnished globally by such heinous rapes.
    १२ वर्षाखालील बलिकेवर बलात्कार करणाऱ्याला आता म्हणे फाशी देणार! ह्याचा फारसा परिणाम भारतीय जनमानसावर होईल असे नाही वाटत. मात्र, अशी फाशी गुन्हा घडल्यावर ताबडतोब एक आठवड्यात, आणि भर चौकात हजारो लोकांना जमवून, जाहीरपणे दिली तरच परिस्थिती सुधारेल.
    - अरविंद पाटील.

    ReplyDelete
  2. फाशी म्हणजे त्याची मुक्ती!
    त्याचा लिंगच्छेद म्हणजे आयुष्यभर सतत मिळणारी टोचणी असेल, केलेल्या नीच कृत्याची आठवण होत राहील....!

    ReplyDelete

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...