Tuesday 6 August 2024

सारे प्रवासी खुर्चीचे.. ... !

"सडलेलं राजकारण दिवसेंदिवस अधिक गलिच्छ होत चाललंय. लोकसेवेच्या मुखवट्यानं सत्तेसाठी हपापलेल्यांनी चिखलफेक आरंभलीय. 'विरोधकांना तुडवा, सोडू नका...!' असा आदेश देणारे फडणवीस. 'एकतर मी राहीन नाहीतर, तू राहशील...!' असं उद्विग्नतेनं उद्धव ठाकरेंचं म्हणणं. आरक्षणासाठी 'सत्ताधाऱ्यांच्या नव्हे तर पवार, ठाकरे, शिंदे,फडणवीस यांच्या गाड्या फोडा...!' असं सांगणारे प्रकाश आंबेडकर. 'आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा...!' म्हणणारे मनोज जरांगे. सत्तालोलुपतेसाठी लालुच दाखवणारे शिंदे आणि पवार, 'विकासाचा ब्लू प्रिंट' आणण्याची आशा दाखवून धरसोड भूमिका घेणारे राज ठाकरे. फसवल्या गेलेल्या बच्चू कडू, रवी तुपकर आदींची तिसरी आघाडी. युतीतले तीन, आघाडीतले तीन, आंबेडकर, जरांगे आणि तिसरी आघाडी. असे नऊ ग्रह मतदारांना वेठीला धरून मतकल्लोळ उभा करताहेत!"
___________________________________
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. सत्तेवरच्या महायुतीनं लोकसभा निकालाचा धसका घेतलेला दिसतोय. मतदारांचा कौल लक्षांत आलाय. आम्हाला फरक पडलेला नाही. असं ते म्हणत असले तरी, त्यांची धाकधूक स्पष्टपणे दिसतेय. त्यामुळंच लाडकी बहिण, भाऊ म्हणत रोख रक्कम देण्याचा घाट घातलाय. ही मतांसाठीची लाच नाही तर केलेली मदत आहे. अशी मखलाशी केली जातेय. आता आयाराम गयारामांना उधाण येणार आहे. एकमेकांच्या उखाळ्या पाखळ्या काढल्या जातील. ताळतंत्र सोडून आरोप प्रत्यारोप होईल. कुणाचाच पायपोस राहिलेला नाही. एकूण काय, 'सारे प्रवासी खुर्चीचे...!' असं चित्र आगामी काळात दिसेल...! पुराणात एका सुंदरीसाठी सुंद आणि उपसुंद या दोघा शक्तिमान मित्रांमध्ये युद्ध झालं त्यात ते दोघेही घायाळ होऊन गतप्राण होतात! राज्यातही सत्तासुंदरीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जुंपलीय. खरंतर हे राजकारण सडल्याचचं लक्षण आहे. सरकारं बदलली की, मूलभूत व्यवस्था, निर्णयप्रक्रिया ही कायम असते. पण आधीचे सारे निर्णय पुसून, तुघलकी कारभार करायचा नसतो. अशी कारभाराची सलगता हीच लोकहिताची असते. हे पथ्य न पाळल्यानं विकासाचे प्रश्न चिघळू लागतात. राज्यातल्या धुरीणांनी पक्षीय मतभेद किती ताणायचं आणि श्रेयासाठी किती लढायचं याचा विचार केला पाहिजे. राजकारणी आता राज्यहितासाठी एकत्र येत नाहीत. जनतेसाठी प्रकल्प म्हणत जनतेलाच वेठीला धरून विरोध केलं जातंय. हा सडलेल्या राजकारणातला सत्तासंघर्ष आहे. एवढंच म्हणावं लागेल! राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता दिसून येतेय. दाखवलं जातंय तेवढं वैचारिक मतभेद राहिलेले नाहीत. कुणीही कुठल्याही मूल्यांशी, विचारांशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजप नेते, कार्यकर्ते धरून हे म्हणता येईल. तशी सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांचीच आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारं करण्याचा पक्का इरादा करूनच लोक राजकारणात पडताहेत. सारं काही करतात आणि आव मात्र तत्व-निष्ठेचा, नि:स्वार्थी जनसेवेचा आणतात. पण जो मिळेल तिथं हात धुवून घेतो. आणि तोच वारंवार मग माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो! हे सारेच जाणतात. लोक बोलत नाहीत पण त्याची कारणंही सगळ्यांना ठाऊक आहेत. कोण कुठं होते नी कुठं पोहोचलेत हे काय लोकांना दिसत नाही? ज्यांना खरोखरच लॉटरी लागलीय त्यांच्याकडं बघत 'देवा दया तुझी, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला...!' असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा. हिंदुत्व आता राजकारणातून बाद झालंय. राजकारण्यांनी ते बाद केलं की, लोकांनीच बाद केलं. कुणी अजूनही हिंदुत्व सांगत असेल तर ते केवळ छाप पाडण्याएवढंच असणार. अर्थकारणात समाजवादी विचारांचं तर कधीच रुद्राक्ष झालंय. तेव्हा कुठलंही 'कॉम्बिनेशन' आता होऊ शकतं. ते होण्याइतपत 'सामंजस्य' आपसात राखायला काय हरकत आहे? एकदा सगळ्यांचा पॉट एकच आहे हे कळल्यावर आडवं कुणाला घालायचं आणि उभं कुणाला करायचं हे ठरवायला विशेष अडचण पडू नये. उभे आडवे धागे विणलं की, वस्त्र तयार होतं. उगाच अटीतटी आणून आणि भरमसाठ बोलून काही साधत नाही. नेते वाट्टेल ते बोललेलं विसरून, वाट्टेल ते करतात. कुणाशीही त्यांना सहज जमवून घेता येतं आणि न जमवून घेतलं तरी चालतं. त्यांना संरक्षण कवच असतं. कार्यकर्ते या अटीतटीनं बरबाद होतात. निष्कारण भांडणं, वैर वाढतं, हाणामाऱ्या कराव्या लागतात. कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव झालीय. आक्रस्ताळे, अटीतटीचं राजकारण बाजूला पडेल असं वाटत होतं आणि घडलंही तसंच.
कुठलंही जनकल्याणाचं काम जिद्दीनं, इर्षेनं करणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा मान राखून त्याला विश्वास देऊन धडाक्यानं विकासाची कामं करणारे कल्पक, विवेकी, विधायक वृत्तीचे नेतृत्व ही महाराष्ट्राला स्थैर्य, सामर्थ्य, ऐश्वर्य देऊ शकेल. ग्रामीण भागात शिकलेली, नवी दृष्टी लाभलेली, आपल्या भागाचा विकास, कायापालट करण्याची ईर्षा असलेली, त्यासाठी गावातच पाय रोवून राहायची तयारी असणारी आणि शहरातल्या लोकांचे रीतभात, हुशारी, चलाखपणा याला तोडीस तोड ठरणारी तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्याबरोबर ईर्षा, चुरस, डावपेच यांचीही ग्रामीण भागातली तीव्रता वाढलीय. या तरुणांना शह, काटशह देत संपवण्याचा कार्यक्रम राबवू न देता त्यांना विविध पातळ्यांवर विविध क्षेत्रात विविध सत्तास्थानावर एकमेकाला पूरक असं काम करण्याची गोडी लावायला हवीय. शरद पवारांनी तरुणांना विधायक कामांसाठी प्रेरणा देऊन ग्रामीण भागात नव्या जोमदार तरुणांची एक फौजच उभी केली होती. साखर कारखानदारांना कितीही नावं ठेवा, त्यांनी आपल्या भागातल्या लोकांचं जीवन बदलून टाकलंय. शिक्षणाची कोंडी फोडलीय. त्यांची दादागिरी दंडेली याबद्धल तक्रारी आहेत, पण त्यांनी कितीतरी लोकांना विकासाच्या वाटेवर चालायची संधी दिलीय. याच लोकांनी काँग्रेसला बळ दिलं होतं आता ते नेमकं कुणाच्या मागं आहेत याचा शोध घ्यावा लागेल. लाखाच्या सभेत तास, अर्धातास दे दणादण भाषण ठोकलं की विचार रुजतात हा भ्रम दूर करून तात्यासाहेब कोरे, विखे पाटील, मोहिते पाटील, रत्नाप्पाण्णा, पी.के.अण्णा पाटील या सगळ्या साखर कारखान्यामागील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा, त्यांनी उभ्या केलेल्या संघटित शक्तीचा, त्यांनी दाखवलेल्या व्यापारी दृष्टीचा विचार, नेते होऊ बघणाऱ्या सगळ्यांनीच करायला हवाय! राजकारण बदलतंय. आता जंगी सभा आणि फर्डे वक्तृत्व, हंशा, टाळ्या आणि आवाज कुणाचा या आरोळ्यानी लोक आता बधत नाहीत. सभांचा प्रभाव दिवसेंदिवस मर्यादित होतोय. पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाचा जमाना येतोय. ज्यांच्याबद्धल लोकांना हा माणूस काम करतोय असा विश्वास आहे तो कसा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता लोक मतदान करतील. आपण हवा असलेला प्रतिनिधी पाठवण्यात यशस्वी होऊ असा विश्वास लोकांमध्ये आलाय. भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांना आपले भाग्यविधाते बनवायला लोक तयार नाहीत.
भाषणांनी लाटा उठत नाहीत आणि एखाद्याला बदनाम करून उठवण्याचा अतिरेकही उलटतो. शरद पवार यांच्या विरोधात सुरू असलेल्या अतिरेकामुळं लोकांत शरद पवारांबद्धल आपुलकी वाढतेय. भ्रष्टाचार-गुन्हेगारी यावर सोवळेपणानं बोलणाऱ्यांच्या बुडाखाली केवढं डबोलं आणि केवढी घाण आहे याची कल्पना सर्वांना आहे. सोवळ्यात पावित्र्यच असतं असं मी मानत नाही. सोवळे पावित्र्यासाठी वापरले जात असावं, पण पावित्र्याचा आणि सोवळ्याचा संबंध दाखवण्यापूरताच उरलाय याचं प्रत्यंतर देणारे महाभाग भेटल्यानंतर, अशी सोवळी मिरवणाऱ्यांपासून दूर राहणंच बरं; असं लोक मानू लागले तर तो लोकांचा दोष नाही. भाजप असा सोवळं मिरवणाऱ्यांचा अड्डा आहे. राष्ट्रनिष्ठा, बंधुभाव, सचोटी, सभ्यता, सहजीवन कुठं असेल तर इथंच असाही टेंभा मिरवणारे आहेत. पण सोवळ्याआड जे आहे ते काँग्रेसपेक्षा वेगळं नाही. असं स्पष्ट करणाऱ्या घटना पुनःपुन्हा घडताहेत. भाजपमध्ये भरपूर भ्रष्ट, तत्वशून्य, गुंड प्रवृत्तीचे आहेत. संधीसाधू आहेत आणि जातीयतेची कीड वळवळणारेही आहेत. सत्ताधाऱ्यांमधली घाण काढायचा, तिच्याबद्धल नाकानं कांदे सोलायचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या बुडाखालील घाण दाखवली तर मग कळवळता का? वाईट माणसं, गुन्हेगार काँग्रेसमध्ये आहेत, मात्र सत्ताधाऱ्यांकडं नाहीत हा कांगावा बस्स झाला. जरा आपल्या सोवळ्यातून येणाऱ्या दुर्गंधीचाही तपास घ्या असं कुणी म्हटलं तर रागावता का? राजकारण सर्वबाजूनं नासतंय; ते सुधारायचं, निदान आहे त्यापेक्षा अधिक नासू द्यायचं नसेल तर भाकड विश्वास बाळगू नका. फक्त आरोप आणि अफवा उठवून हेतुपूर्वक किटाळ रचलं गेलं, प्रतिमा डागळण्याचा उद्योग झाला त्याचं काय? राजकीय शास्त्री सध्या अशी काही कोडी सोडविण्याच्या आणि मांडण्याच्या कामात गुंतलेत.
गळ्यात गळा घालून उभे राहणारे गळा कसा, किती आणि कुणाचा कापायचा याची खलबतं सतत चाललेली असतात. गोरगरिबांना सेवासुविधा देण्यात एकमत आहे झेंड्याचे रंगसुद्धा तसे फार वेगळे नाहीत. सेनेचा भगवा हा तिरंग्यात वर आहे तर भाजपत तो आडवा घातलाय. काँग्रेसनं त्यांना वरखाली ठेऊन मध्ये पांढरा आणलाय. तिघात भगवा कॉमन! उडीदामाजी गोरे काळे प्रमाणे सारेच एका माळेचे मणी आहेत. नेत्यांना आपले सारे उद्योग बिनबोभाट पार पाडण्यासाठी नंदीबैलांचा एक कळप हवा असतो. काही चलाख धूर्त, काही विरोधी गटातले उपद्रव देण्याचे सामर्थ्य असणारे आणि बाकी माना हलवणारे नंदीबैल घेऊनच राज्य चालविण्याचा परिपाठ सुरू आहे. 'मी समर्थ आहे...!' हा आत्मविश्वास नेत्यांत असायला हवा, पण लोकशाही समर्थ व्हायची असेल समर्थ आत्मविश्वास असलेल्यांची एक फळीच असावी लागते. पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी निष्ठावान, कर्तृत्ववान, सुशिक्षित, लोकसेवा करण्यात आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर ठेवून आयारामांना पायघड्या घालून कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय. अशावेळी निष्ठावंत मिळणार कुठे? सारेच सत्तेचे लोभी...! सत्तेसाठीच इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांना ज्या पक्षात होते त्यांनाच लक्ष्य करण्यासाठी पुढं केलं जातं. 'बाटग्याची बांग मोठी..!' या म्हणीप्रमाणे त्यांना वापरलं जातं. हीच मंडळी सतत टीकास्त्र सोडत असतात. ही मंडळी शेणगोळा ब्रँड आहेत. ह्या शेणगोळ्यांचे साहेब त्यांना सारवण्यासाठीच वापरणारच, नाही का...?- 
राजकीय घडामोडी आणि अनेक घटकांवर निवडणूक अवलंबून असेल. मनोज जरांगे आणि त्यांचे मराठा आरक्षण आंदोलन, मराठा-ओबीसी वाद, शेतकऱ्याचे प्रश्न, बेरोजगारी, ध्रुवीकरण हे प्रभावी ठरलेले मुद्दे आताही राहतील. नेते एकमेकांवर टीका करतात. जनतेला दिसेल अशा चापट्या मारतात. पण प्रत्यक्षात त्या त्यांना लागत नाहीत. कारण ती नूरा कुस्ती असते. पुन्हा या लोफर भुरट्यांना भविष्यात दरोडा घालण्यासाठी एकत्रित यावं लागणार. त्यामुळं मैत्रीपूर्ण टीका केली जाते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर राज ठाकरे यांनी टोकाची टीका केली. त्यानंतर ते एकत्र येण्याची यत्किंचितही शक्यता नव्हती. पण 'बिनशर्त पाठींबा' म्हणत एकत्र आले. आता पुन्हा विरोधात उभे ठाकलेत. राजकारणी किती निर्लज्ज आणि कोडगे असतात याचा नवीन मासला चाखायला मिळतोय. टीका करताना बहुतेक साऱ्या राजकारण्यांनी ताळतंत्र सोडलंय. अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना कमळाबाई... कमळाबाई... कमळाबाई... असं म्हणत, 'घेतली ना बोकांडी बसवून...!' अशा अर्थाचे हातवारे केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना जेलमध्ये जाऊन 'चक्की पिसिंग...अँड चक्की पिसिंग... अँड चक्की पिसिंग....!' असं दळण जातं फिरवल्यासारखं हातवारे करुन दाखवलं होतं. नारायण राणे यांनी टीका करताना भाजपला 'गुंडांचा पक्ष' संबोधलं होतं. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी राणेंच्या गुन्ह्यांचा पाढा अगदी फौजदारी कलमांसह वाचून दाखविला होता. किरिट सोमय्यांनी आरोप केलेले सारे राजकीय नेते भाजपच्या वळचणीला आहेत. त्यामुळं सोमय्यांच्या थोबडीत मारल्यासारखं झालंय. पण खरी कमाल आहे ती राज ठाकरे यांची. त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री या दोघांना राजकीय क्षितिजावरुन नाहीसं करा. असा इशारा राज यांनी दिला होता. इतिहासातला सर्वात खोटारडा पंतप्रधान असा उल्लेखही केला होता. पंतप्रधानांनी देशाबाहेरील काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा केले जातील, असं आश्वासन दिलं होतं. ते पाळलं नाही याचीही आठवण राज यांनी करुन दिली होती. तेच राज प्रचार कोणाचा करत होते? मग त्यांच्यावर विश्वास का ठेवावा? राज यांच्या प्रचारानं दोन्ही लोकसभा निवडणुकीत फरक तर पडला नाहीच. विधानसभा निवडणुकीत आता लोकांसमोर राज कोणत्या मुखानं जाणार? त्यांच्या कार्यकर्त्यांची चलबिचल आताच सुरु झालीय. २००९ साली राज यांना मतदारांनी नवीन राजकीय पक्ष म्हणून संधी दिली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढणं गरजेचं होतं. आपण धडाकेबाज आहोत हे दाखवत असले तरी, नागरिकांना मितभाषी आणि नम्र नेता हवा असतो. उर्मट आणि तहसनहस करणारा नेता नको असतो. काम थोडं कमी झालं तरी चालेल पण शांतता नासवणारा पुढारी लोक नाकारतात. नाही तरी कामं करणारी नेते मंडळी आहेत कुठे? 
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...