Saturday 12 May 2018

जीना : सेक्युलर की धर्माध?

जीनांना सेक्युलर ठरविण्यासाठी त्यांच्या पाकिस्तान निर्मितीनंतरच्या नव्या पाकिस्तानात हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन अशा सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म स्वातंत्र्याची मुभा आहे, या विधानाचा आधार दिला जातो. जीनांचं हे व्हिजन पाकिस्तानने कधीच मान्य केलं नव्हतं. त्यांचं ते प्रसिद्ध भाषणही पाकिस्तानच्या रेडिओवरून प्रसारित होताना सर्वधर्मीयांना समान स्वातंत्र्याचा उल्लेख वगळण्यात आला होता. नंतर झिया-उल-हक यांच्या काळात तर जीनांना पुसून टाकण्याचा किंवा विकृत रूपात पुढे ठेवण्याचा प्रयत्न झाला. जीनांनी 'ब्रिटिश इंडिया'त हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत; त्यांचा इतिहास, संस्कृती, आदर्श सारेच भिन्न आहेत; त्यामुळं हे दोन समाज एकत्र राहू शकत नाहीत, अशी भूमिका घेऊन पाकिस्तानची मागणी केली. आणि ती तडीस नेली. मात्र, त्यांनी त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना अनेकदा 'पाकिस्तान हे आधुनिक राष्ट्र बनवायचं आहे, धार्मिक नव्हे,' असं बजावलं होतं. तथापि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्रच झालं आणि जीनांचं स्वागत मौलाना महंमद अली झिंदाबाद, असं होऊ लागलं!"
-----------------------------------------------
*दे* शाच्या राजकारणात मधून मधून बॅरिस्टर जीना यांचा विषय डोकं वर काढत असतो. आज अलिगढ मुस्लिम विद्यापीठात जीनांचा फोटो लावावा यासाठी आंदोलन केलं गेलं. भाजपच्या सावित्रीबाई फुले नामक खासदार महिलेनं 'जीना हे थोर नेते होते, त्यांचे फोटो सर्वत्र लावायला हवेत असं म्हटलं आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्यात जीनांच्या कबरीवर डोकं टेकवून जीना हे 'हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अँबॅसिडर' असं म्हटलं आणि केवढं काहूर माजलं. अखेर त्यांना जाहीर माफी मागावी लागली होती. त्यानंतर जसवंतसिंह यांच्या 'जीना:इंडिया-पार्टिशन इंडिपेंडन्स' या पुस्तकानं पुन्हा जीना नावाचं भूत बाटलीतून बाहेर काढलं. ज्या जीनांना पाकिस्तानातही विस्मरणात ढकललं जात आहे; त्यांचा विचार, वारसा गुंडाळल्याखेरीज राज्य करणं शक्य नाही, अशी स्थिती पाकिस्तानात आहे. ते जीना भारतीय राजकारणात अधून मधून धुमाकूळ घालत असतात.

*नेहरू-पटेलांना खलनायक ठरवलं*
भारतातील बुद्धीमंतांसाठी बॅरिस्टर महंमद अली जीना हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. जीनांना सेक्युलर म्हणावं की धर्माध? हा पेच या वर्गाला गेल्या सत्तर वर्षात सोडविता आलेला नाही. त्यामुळं जीनांविषयीची 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिप कोणत्या ना कोणत्या कारणाने अधून मधून उफाळून येते. जसवंतसिंह यांनी आपल्या पुस्तकात 'जीनांना भारत अखंड ठेवायचा होता, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना फाळणीकडे ढकललं' असा थिसिस मांडला आहे. हे पहिल्यांदा लिहिलं गेलंय असं काही नाही. जिनांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांची अशीच बाजू घेतलीय. जसवंतसिंह यांच्या पुस्तकात जीनांना नायक ठरविण्यापेक्षा; नेहरूंना किंबहुना त्याहून अधिक पटेलांना खलनायक ठरवणं, हे दिसतं.भारतीय जनता पक्षानं १९८९ पासून आपल्या पूजनीय व्यक्तींमध्ये सामील करून घेतलं आहे. नेहरू विरुद्ध पटेल असं इतिहासात नसलेलं द्वंद्व निर्माण करून 'पटेलांचा पोलादी वारसा चालविणारा पक्ष' अशी प्रतिमा भाजपला आणि त्यांचं नियंत्रण करणाऱ्या संघवाल्यांना हवीय अर्थात, यासाठी गांधीजींच्या हत्येनंतर याच पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिली बंदी आणली, याकडंही डोळेझाक केलं जातं.

*मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठीच*
२००५ दरम्यान लालकृष्ण अडवणींना कराचीत जीनाच्या कबरीसमोर गेल्यानंतर जीनाप्रेमाचा झटका आला होता. पाकिस्ताननिर्मितीनंतरच्या जीनांच्या एका भाषणाचा आधार घेऊन 'ते सेक्युलर आणि महान नेते होते', असा साक्षात्कार तेव्हा अडवणींना झाला होता. अडवाणींनी अत्यंत खुबीनं जीनांच्या स्तुतीला भाजपकडे मुस्लिमांना आकर्षित करण्याचा डाव म्हणून वापर करायचं ठरवलं होतं. त्यात त्यांना यश आलं नाही, हा भाग वेगळा! नेहरु विरोधाची भूमिका हा मात्र जसवंतसिंह आणि अडवाणी  यांच्या जीनास्तुतीमधला समान धागा होता. मात्र जसवंतसिंह यांची हकालपट्टी, पाठोपाठ अडवाणी यांचे राजकीय सल्लागार सुधींद्र कुलकर्णीचा राजीनामा, तत्कालीन मंत्री अरुण शौरी यांनी केलेला हल्लाबोल, माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांना अचानक आलेला पुळका या सगळ्या घडामोडींचा परिणाम झालाच! पण जीनांच्या बाबतीत; ते खरंच धर्मनिरपेक्ष होते की धर्माध? त्यांना अखंड भारत हवा होता की, पाकिस्तानसह भारताचे आणखी तुकडे पाहिजे होते? या प्रश्नांची उत्तरं महत्वाची आहेत.

*जीना एक कॉम्प्लेक्स पर्सनालिटी*
जीना राजकीय नेते होते. बुद्धीमंत होते, धर्मद्वेषाला खतपाणी घालून एकहाती राष्ट्र निर्माण करणारे होते. या सगळ्यांपेक्षा ते कसलेले वकील होते, आणि त्यांच्या वकिली कौशल्याबद्धल पाकिस्तानचे निर्माते या प्रतिमेइतकेच ते प्रसिद्ध होते. वकील जसा प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे पाहतो आणि त्यापोटी अशिलाशी बाजू धडाक्यात मांडतो, तसं जीनांचं होतं. त्यांची सगळी राजकीय कारकीर्द त्या त्या वेळी त्यांना पटलेल्या मुद्द्यांची आक्रमकपणे वकिली करण्यात आणि त्याची तड लावण्यात खर्ची पडलीय. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिगत जीवनातल्या भूमिका त्यांनी उभं केलेलं राजकीय तत्वज्ञान याचा एकमेकांशी ताळमेळ लागत नाही. परिणामी जीना ही एक 'कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी' बनते. त्यामुळेच जीनांकडे जसे बघाल, तसे ते दिसतात. त्यांच्याविषयी हवा तसा निष्कर्ष काढणारे संदर्भ ढिगाने सापडतात.

*जीनांचा विचार सतत बदलला*
जीनांना सेक्युलर ठरविण्यासाठी त्यांच्या पाकिस्तान निर्मितीनंतरच्या नव्या पाकिस्तानात हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन अशा सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म स्वातंत्र्याची मुभा आहे, या विधानाचा आधार दिला जातो. जीनांचं हे व्हिजन पाकिस्तानने कधीच मान्य केलं नव्हतं. त्यांचं ते प्रसिद्ध भाषणही पाकिस्तानच्या रेडिओवरून प्रसारित होताना सर्वधर्मीयांना समान स्वातंत्र्याचा उल्लेख वगळण्यात आला होता. नंतर झिया-उल-हक यांच्या काळात तर जीनांना पुसून टाकण्याचा किंवा विकृत रूपात पुढे ठेवण्याचा प्रयत्न झाला. जीनांनी 'ब्रिटिश इंडिया'त हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत; त्यांचा इतिहास, संस्कृती, आदर्श सारेच भिन्न आहेत; त्यामुळं हे दोन समाज एकत्र राहू शकत नाहीत, अशी भूमिका घेऊन पाकिस्तानची मागणी केली. आणि ती तडीस नेली. मात्र, त्यांनी त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना अनेकदा 'पाकिस्तान हे आधुनिक राष्ट्र बनवायचं आहे, धार्मिक नव्हे,' असं बजावलं होतं. तथापि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्रच झालं आणि जीनांचं स्वागत मौलाना महंमद अली झिंदाबाद, असं होऊ लागलं!

*जन्मतारीख बदलली, साहेबी वेशभूषा*
अव्वल इंग्रजी वातावरणात आणि पाश्चात्य विचारांच्या सहवासात पिंड पोसलेल्या जीनांनी मला मौलाना म्हणू नका, मिस्टर जिनाच म्हणा, असं बजावलं होतं. 'एक दिवस पुन्हा हिंदुस्तानात यायला आवडेल,' असंही जीना म्हणाले होते. जीनांची वाढ-विकास हा पूर्णतः आधुनिक पाश्चात्य कल्पनांवर झाला होता. त्यांचं शिक्षण इंग्रजी शाळेतून झालं होतं. त्यांचे आजोबा हिंदू असल्याचं सांगतात. जीनांवर इंग्रजी विचारांचा पगडा होता. इतका की, त्यांनी आपली जन्मतारीख २० आक्टोंबर ऐवजी २५ डिसेंबर अशी बदलून घेतली होती. ते स्वतःच नाव इंग्रजी पद्धतीनं एम.ए.जीना असंच लिहीत. त्याकाळातले उदारमतवादी मुस्लिम नेतेसुद्धा नावात अशी तडजोड करीत नसत.जीनांचा दुसरा विवाह पारशी मुलीशी झाला. तो ही त्याकाळात गाजला. मुस्लिम कट्टरपंथीयांमध्ये हे घडणं शक्य नव्हतं. जीनांची पाकिस्तान निर्मितीपर्यंतची वेशभूषा साहेबी थाटाचीच असायची!

*गांधीजींच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा*
सरोजिनी नायडू यांनी जीनांना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अंबसिडर अशी पदवी दिली होती. मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला जीना वेडगळपणा म्हणत होते. आणि सुरुवातीला पाकिस्तानच्या कल्पनेचेही 'मूर्खपणा' अशी खिल्ली उडवत होते. जीनांना मद्य आणि पोर्क-डुकराचं मटण वर्ज्य नव्हतं. या सगळ्या गोष्टी जीनांना सेक्युलर, उदारमतवादी ठरवण्यासारही आधार म्हणून सांगितल्या जातात. जीनांचे गांधीजींशी मतभेद होते, पण त्यांच्यावर गांधींचा पगडासुद्धा होता. त्यांनी लोकमान्य टिळकांची बाजू न्यायालयात मांडली होती, असे सारे दाखले दिल्यानंतर मुस्लिम लीगचा नेता म्हणून वाटाघाटीस पटेल-नेहरू यांच्यासोबत बसलेले जीना भारत तोडण्याच्या बाजूनं असतीलच कसे? त्यांना भारतातील मुसलमानांच्या हिताची काळजी होती आणि त्यासाठी ते पुढे ठेवत असलेल्या मागण्या सत्तेसाठी उतावीळ झालेल्या नेहरू-पटेलांनी अमान्य केल्या, यातून जीना पाकिस्तानानिर्मितीच्या मागणीकडे ढकलले गेले. असा तर्क मांडता येतो.

*माऊंटबॅटन यांनी जीनांचा वापर केला*
लॉर्ड माऊंटबॅटनने फाळणीची योजना आधीच तयार केली होती. योग्यवेळी त्यासाठी जीनांच्या महत्वाकांक्षेचा आणि एकदाचं स्वातंत्र्य मिळू दे, असं टेकीला आलेल्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेचा माऊंटबॅटनने वापर केला. यात जीनांचा दोष काय? असाही तर्क लढविला जाऊ शकतो. अशा तऱ्हेनं जीनांना नाईलाजानं फाळणी पत्करणारा, मनापासून अखंड हिंदुस्तानवादी असलेला नेता, अशा रंगात रंगविता येऊ शकतं. तसंच याच जीनांच्या आयुष्यात अनेक घटना आणि वक्तव्याने ते कडवे धर्माध होते, असंही दाखवून देता येतं. जीनांच्या मुलीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या मूळ पारशी तरुणांशी विवाह केला. तेव्हा जीना चवताळून उठले होते. इतके की आयुष्यभर जीनांनी आपल्या मुलीचा उल्लेख नेहमी 'मिसेस वाडिया' असाच करीत. तिचा नुकताच लंडन इथं निधन झालं.

*नंतर जीना कडवे मुस्लिम नेते बनले*
पाकिस्तानचा पाया हा मुस्लिम धर्मातल्या मुलतत्वात सापडतो असं सांगणारे जीनाच होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही त्यांना इस्लाममधील आर्थिक विचारांवर आधारित हवी होती. त्याविषयीचं त्यांचं भाषणही प्रसिद्ध आहे. १९४० पर्यंत बऱ्याच अंशी निधर्मी आणि अखंड भारतवादी असलेले जीना; त्यानंतर मात्र कडवे मुस्लिम बनलेले दिसतात. १९ जुलै १९४६ ला त्यांनी केलेलं भाषण प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात, ' मी इथं नैतिकतेची चर्चा करायला आलेलो नाही. आमच्या हातात पिस्तुल आहे आसनी ते वापरता येईल, अशा स्थितीत आम्ही आहोत! हे पिस्तुल म्हणजे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी होती. आणि ते वापरताना त्यांनी दिलेला डायरेक्ट एक्शनचा आदेश जीनांसाठीची ऐतिहासिक कृती होती. सनदशीर मार्गाने लढण्यासाठी आयुष्य घालवणाऱ्या जीनांनी हा मार्ग आणि 'घटनेचा बडेजाव गुंडाळून ठेवत आहोत', असं सांगून हिंदू-मुस्लिम दंगलींना उत्तेजन दिलं. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी झपाटलेल्या जीनांच्या या कृत्यामुळे हजारो हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चनांच्या कत्तली झाल्या, लाखो लोक निर्वासित झाले. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर जीनांना पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे सध्याचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांना जोडणारा एक हजार किलोमीटरचा पट्टा हवा होता. अशा जीनांची सेक्युलर म्हणून स्तुती कशासाठी करायची, असा प्रश्न पडू शकतो.

*पाकिस्तान धर्मानं नाही तर भाषेनं तोडलं*

जीनांच्या अटी मान्य केल्या असत्या तर अखंड हिंदुस्थान राहिला असता, हा तर्क मूर्खपणाचा आहे. यासाठी जीनांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, घटना समितीचे अध्यक्षपद आळीपाळीने मुस्लिमांना द्या; अशा भविष्यात नागरी युद्धालाच आमंत्रण देणाऱ्या अनेक अटी घातल्या होत्या. देशभर असले निखारे धगधगत ठेवण्यापेक्षा एकदाच पाकिस्तानचा तुकडा मोडावा, या निष्कर्षाप्रत नेहरू-पटेल आले होते. या वास्तवाकडे जीनांच्या प्रेमात पडून दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. खरं तर, जीना ब्रिटिशांच्या धोरणांचे प्यादे बनले होते आणि नेतृत्व म्हणून आपण नेहमी सर्वोच्च ठिकाणीच असलो पाहिजे, या व्यक्तिगत अहंगंडानी पछाडलं होतं. यासाठीच त्यांना मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून काँग्रेसमधील अन्य मुस्लिम नेते मान्य नव्हते. त्यामुळेच ते घटना समितीत गेले नाहीत. इतकंच काय भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होताना ते थेट पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले. त्यांना दुय्यम भूमिका कुठेच मान्य नव्हती. अशा अट्टाहासामुळेच जीना ज्या दृष्टिकोनातून पाहावेत, तसे दिसतात. पण ते फाळणीचे खलनायक नाहीत, असं म्हणणं मात्र सत्याचा विपर्यास करणारं आहे. जीना १९३० ते ३३ भारतातील राजकारणाला वैतागून इंग्लंडमध्ये कायमचे स्थायिक होण्यासाठी गेले होते. तिथं त्यांनी ब्रिटिश नाटकं पाहायचा छंद लावून घेतला होता. जीनांना नट होऊन हॅम्लेट मध्ये काम करायचं होतं. असा बहुरूपी जीनांच्या मानसिकतेतच असावा . म्हणूनच १९०५ पासून मृत्यूपर्यंत दर पाच-सात वर्षांनी जीना बदललेले दिसतात. जीनांमधला हा बहुरूपी समजून घेतल्याशिवाय त्यांच्यावर कोणताही शिक्का मारणं इतिहासावर अन्याय करण्यासारखं आहे. शेवटी ते कसलेले वकील होते. म्हणून त्यांना कायदे-आझम म्हणत. त्यांनी अखंड हिंदुस्तानची कल्पना जितक्या तर्कशुद्धपणे मांडली, तितक्याच विद्वत्तापूर्ण शैलीने स्वतंत्र पाकिस्तानची अनिवार्यता पटवून दिली होती. अशा बहरूपी जीनांच्या ओळखीत भर घालायची असेल, तर पाकिस्तानी व भारतीयांप्रमाणेच बांगलादेशींच्या मते जीना कसे आहेत, ते समजून घेतलं पाहिजे. कारण पाकिस्तानच्या धर्माधिष्ठित राष्ट्र निर्मितीनंतर पंचवीस वर्षात पाकची फाळणी होऊन बांगलादेशची स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती झाली आहे. हे काम बंगाली भाषेनं केलं, अतिरेकी धर्मावादाला छेडण्याचं काम भाषेनं केलं!

चौकट.......

*जीनांनी संधीसाधू राजकारणासाठी सतत भूमिका बदलल्या!*

महंमद अली जीना...पाकिस्तानचे जनक. मुसलमानातील अल्पसंख्य अशा एका खोजा कुटुंबात कराची जन्मले. उच्च शिक्षण मुंबई व इंग्‍लंडमध्ये झालं. धार्मिक रीतिरिवाजांचे त्यांना वावडेच होते. इंग्रजी ही जणू त्यांची मातृभाषाच होती. तरीही ७२ वर्षांनी भारतीय उपखंडातील सर्व मुसलमानांचे ते एकमेव पुढारी-कायदे आझम झाले. जन्मभर सिंधबाहेर राजकारण करून शेवटी कराचीत जन्मस्थानीच त्यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून शपथविधी झाला. १९१८ साली त्यांनी सामाजिक रूढी झुगारून एका पारशी स्त्रीशी विवाह केला. एक उदार मतवादी म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि शेवटी ते मुस्लिम लीगचे सर्वसत्ताधारी बनले. आरंभीला मुसलमान नेतृत्वाचा विरोध न जुमानता त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध केला; पण शेवटी मुसलमानांसाठी वेगळ्या राष्ट्राची त्यांनी मागणी केली.

इंग्‍लंडहून बॅरिस्टर होऊन परतल्यावर एक अव्वल दर्जाचे वकील म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आणि त्याचबरोबर गोपाळ कृष्ण गोखले, सर फिरोजशहा मेहता यांचे सहकारी म्हणून काम करताना काँग्रेस नेते म्हणूनही ते चमकले. १९०९ साली केंद्रीय कायदेमंडळात निवडून गेल्यावर त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध करून मुस्लिम लीगचा विरोध पत्करला. त्याच वर्षी जीना, आझाद, मझरूल हक यांसारख्या प्रागतिक नेत्यांच्या आग्रहास्तव लीगने आपल्या ध्येयधोरणात बदल केला. इतर जमातींशी सहकार्य करून क्रमशः राजकीय सुधारणा मिळविणे आणि शेवटी देशाला अनुरूप असे स्वराज्य प्राप्त करून घेणे, हे लीगचे नवे उद्दिष्ट झालं. जीनांच्या खटपटीमुळे काँग्रेस व लीग यांची अधिवेशने बरोबर होऊ लागली आणि १९१६ साली सुप्रसिद्ध लखनौ करार झाला. काही काळ जीना होमरूल चळवळीतही होते आणि अ‍ॅनी बेझंट यांना अटक झाल्यावर त्यांना होमरूल लीगचे अध्यक्षपद देण्यात आले.

जीनांचा पिंड नेमस्त राजकारणाचा होता. गांधीयुग सुरू झाल्यावर सामूहिक आंदोलनाचे शस्त्र पुढं आलं.  जीनांच्या आयुष्याला इथून कलाटणी मिळाली. १९२० साली खिलाफत चळवळीला उधाण आलं होतं. प्रथम लीगच्या आणि नंतर काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार आंदोलनास पाठिंबा देणारे ठराव संमत झाले. लीग अधिवेशनातील आपल्या अध्यक्षीय भाषणात जीनांनी स्वतःचे मनोगत व्यक्त न करता प्रतिनिधींना विचारपूर्वक निर्णय घ्या, असा सल्ला दिला. काँग्रेस अधिवेशनात मात्र त्यांनी आंदोलनाला कडाडून विरोध केला. नंतर ते काँग्रेसच्या बाहेर पडले ते कायमचेच.

१९२३ साली मृतप्राय झालेल्या लीगचे जिनांनी पुनरुज्‍जीवन केले. १९३०–३१ साली गोलमेज परिषदा भरल्या. त्यासाठी जीनांना खास आमंत्रण मिळाले होते. मुस्लिम शिष्टमंडळाचे नेतृत्व आगाखानांकडे होते. जीनांनी आगाखानांच्या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा दिला आणि मुस्लिम मागण्या मान्य झाल्याखेरीज मध्यवर्ती सरकारसाठी संघीय संविधान तयार करण्यास विरोध केला. परिषदा आटोपल्यावर जीनांनी इंग्‍लंडमध्ये स्थायिक होण्याचे ठरविले. पण पुढील दोन वर्षांत अनेक ज्येष्ठ मुस्लिम नेते निधन पावल्यामुळे उरलेल्यांनी एकत्र येऊन जीनांना मुस्लिम लीगचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले. जीनांनी हे आमंत्रण स्वीकारून लीगची  धुरा उचलली. त्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत ते लीगचे सर्वाधिकारी म्हणून टिकून राहिले. १९३८ अखेरीस सिंध-मुस्लिम लीगने देशाच्या फाळणीची मागणी केली. जून १९४७ मध्ये नवे व्हाइसरॉय माउंटबॅटन यांनी  फाळणीची योजना मांडली. त्यात देऊ केलेले कुरतडलेले पाकिस्तान जीनांनी पत्करले व देशाची फाळणी झाली. १९४६ साली जिनांची प्रकृती एवढी खालावली होती, की आपण फार काळ जगणे अशक्य आहे, हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे कॅबिनेट मिशन योजना राबवून कधी काळी मोठे पाकिस्तान निर्माण करण्याचे स्वप्‍न आपल्याला साकार करता येणार नाही, असे त्यांना दिसून आले असावे; म्हणून त्यांनी कुरतडलेले पाकिस्तान स्वीकारले असे दिसते ते कराची येथे मरण पावले. पाकिस्तान राष्ट्राचे जनक म्हणून आधुनिक इतिहासात जिनांना महत्त्व प्राप्त झाले. राजकीय जीवनातील विरोधाभास त्यांच्यामध्ये जेवढा आढळतो;  तेवढा इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या जीवनामध्ये दिसत नाही.
-हरीश केंची
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...