Friday 3 March 2017

मतलबी राजकारण्यांची पलटणच उभी आहे!

*मतलबी राजकारण्यांची पलटणच उभी आहे*

"कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावाने कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणाने मुकाबला करण्याची तयारी पुरीगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल. उत्तर पेशवाईचा उल्लेख कुणी केला की काही मंडळींना कळमळायला होतं. रयतेच्या रक्षणाची, उदरनिर्वाहाची जबाबदारी न पाळण्याचा, फुकटखाऊ, भिक्षुक, उनाड बाया यांचे तांडे पोसण्याचा प्रकार करणारे राज्यकर्ते होऊन गेले याची आठवण काढण्याने जर कुणाला दुःख होत असेल तर अशी वेळ समाजावर पुन्हा येऊ नये याची खबरदारी या मंडळींनीच घ्यायला हवी."

          लोकसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकीत केवळ काँग्रेसचाच नव्हे तर सर्व समाजवादी विचारांच्या पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. विचारसामर्थ्य शक्तिशाली असले तरी व्यक्तिदोषामुळे हा पराजय झाला आहे. आपसातले संघर्ष, ते मिटवण्याच्या नावाखाली चाललेली अटीतटी, दिलजमाईचे प्रदर्शन आणि कुजकी टोमणेबाजी यामधून काँग्रेसवाल्यांना बाजूला काढून पुरोगामी विचारापर्यंत आणण्याचे काम आज व्हायला हवे. सत्ता जिंकण्यासाठी देवाधर्माचा वापर करण्याचा, तो करता यावा म्हणून वेगवेगळ्या संघटना उभारण्याचा, त्यांच्याद्वारा श्रद्धावान भाबड्या जनसामान्यांना खोट्यानाट्या गोष्टी ऐकवून फितवण्याचा, विशिष्ट राजकीय पक्षासाठी त्यांना वापरण्याचा उद्योग या देशात पद्धतशीरपणे केला जातो आहे. जन्मजात उच्च-नीचतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्याविरुद्ध लढणाऱयांना आपसात लढायला लावण्याचा अथवा निष्क्रिय बनवून निरुपयोगी करून टाकण्याचा जोडधंदाही याच मंडळींनी प्रभावीपणे चालवला आहे. याला रोखण्याचे सामर्थ्य फक्त पुरोगामी विचारातच आहे. राजकारणात मतलब सांभाळणे ही बाब आता अनिवार्यच झाली आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मतलबासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसरा घरोबा केला की, ती व्यक्ती उठवळ! पण एकमेकाला संपविणे हेच ध्येयधोरण असलेले दोन पक्ष जेव्हा मतलबासाठी एकत्र येतात तेव्हा? मतलबासाठी पक्षबदल करणाऱ्यात आदर्श म्हणवले जाणारे राजकारणीही आहेत. हे लक्षात घ्यावे लागेल.

काँग्रेसपक्षाला या निवडणुकांतून फार मोठे अपयश आले. पण हे अपयश एकदम काँग्रेसच्या माथ्यावर कोसळलेले नाही. ते गेली दहा-पंधरा वर्षे एक एक पावलाने येतच होते. काँग्रेसने गरिबांशी, दलितांशी, उपेक्षितांशी, अल्पसंख्य समाजघटकांशी, समाजातल्या परिवर्तनाला सदैव निष्ठेने साथ देणाऱ्या मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली त्यामुळेच अपयश काँग्रेसला झोम्बु लागले. काँग्रेस धनिकांच्या दावणीला बांधली गेली आणि सदासर्वदा स्वार्थाचा रवंथ करणाऱ्या बैलांनी फक्त आपल्या गोतावळ्यापुरतीच काँग्रेस आहे असे वर्तन करुन काँग्रेसबद्दल जनमानसात अप्रिती वाढविली. काँग्रेस अशीच राहावी असा प्रयत्न करणारे महाभाग आजही आहेत. काँग्रेसला बदलावे लागेल. काँग्रेस पुन्हा लोकांची झाली नाही तर काँग्रेस नक्कीच संपेल. शाहू, फुले, आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या आचार-विचारातच काँग्रेसला पुन्हा सामर्थ्य देण्याची शक्ती आहे. काँग्रेसवाल्यांना या निकालांनी आपण पुरे झोपलो नाही हे दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली. प्रचारादरम्यान मतलबासाठी चालवलेल्या आरोप प्रत्यारोपांनी आपले कापलेले नाक मिरवत वावरण्याचा उद्योग काँग्रेसवाल्यांनी चालविला होता. आपल्याच हाताने आपला गळा कापून घेण्याचे प्रयोगही केले गेले, अशावेळी आपल्या बगलबच्यांना टाळ्या वाजवायला लावले जात होते याकडे गांभीर्याने पाहिलेच गेले नाही. उत्तरकाळात पेशव्यांच्या नालायकीने मराठी सत्ता ग्रासली हे खरे; पण ह्या नालायक पेशव्यांना त्यांच्या तोडीस तोड नालायकी करणारे मराठे सरदारही आपल्या सर्व दुर्गुणासह पुरेपूर साथ देत होते. हा इतिहास झाकून ठेवता येणार नाही. आज उत्तर पेशवाईतल्या प्रमाणे सत्ताधारी रंगढंग दाखवत असतील तर त्याला कारण नांदेड, लातूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, बारामतीचे आपसात लढण्यात दंग असलेले काँग्रेसवालेच आहेत. या सगळ्यांनी लोकहितासाठी लढण्याचे, गोतावळ्यात गुंतून न पडण्याचे आणि सामाजिक समता, सहकार, समृद्धी यासाठी सर्वशक्ती वेचण्याचे ठरवले तर लोकही त्यांना साथ देतील.

पराभवानंतर झालेल्या आत्मचिंतनात 'आपण सगळे सध्याच्या परिस्थितीत जागरूक आणि संघटित राहिल्यास राज्यातील सत्तेत फसगतीने झालेला तात्पुरता बदल दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही'. असे म्हटले गेले. यातल्या 'आपण सगळे' याची व्याप्ती केवढी? 'आपण सगळे' ही भावना घेऊन काँग्रेस खरोखरच उभी राहणार आहे? दिलजमाई पर्व सुरु असताना कळवळून 'निदान भांडणासाठी तरी काँग्रेस शिल्लक ठेवा' असं विलासरावांनी म्हटलं होतं याची आठवण झाली. लोकांना झुळविण्यासाठी देवाधर्माचा उपयोग करण्याचे तंत्र साधलेली मंडळी भावनांचा प्रक्षोभ घडविणारे नाना विषय स्वतः नामानिराळे राहून उपस्थित करणार आहेत. काशी-विश्वेश्वर आणि मथुरेच्या श्रीकृष्णापासून गल्लीतल्या मारुती गणपतीपर्यंत देवांचा वापर करून लोकांच्या भाबड्या श्रद्धांना हात घातला जाईल. नको ते घडविले जाईल. हा देश, समाज आपल्या महत्वाकांक्षेपायी भरडून टाकण्याची टोकाची भूमिका घेतली जाईल. हे तुफान रोखण्यासाठी दिलजमाई व्हायलाच हवी. हातात हात गुंफून दृढ विश्वासाने उभे राहण्यासाठी लोक पुढे यायला हवेत. माणसे जोडली जायला हवीत. महात्मा गांधींनी देशाच्या कानाकोपऱ्यात 'करेंगे या करेंगे' ही जिद्द जागवली तशी जिद्द जागवायला हवी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महात्मा फुले यांनी ज्या त्वेषाने अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचे वारे समाजात खेळते ठेवले ती तडफ लोकांत निर्माण होईल असे वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचे भान आपण दाखवले पाहिजे. काँग्रेसवाल्यांच्या वृत्तीत बदल घडला तर सत्तेत बदल घडणे कठीण नाही. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभे करण्याची ताकद आहे. रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय. आता काँग्रेसला आधार केवळ या विचारांचाच आहे.
- हरीश केंची,

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...