Monday 13 March 2017

*दारुअड्ड्यावरील धाडी अन पोलिसांची कर्तव्य कसूरता!*

*दारुअड्ड्यावरील धाडी अन पोलिसांची कर्तव्य कसूरता!*


नगर जिल्ह्यात पांगरमल गावात दारु पिऊन आठ जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. त्याची दखल फारशी घेतली गेली नाही. होळीला कुठल्याशा गावात दारूच्या बाटल्या पेटवून होळी केल्याचे दुरचित्रवाहिनीवर दाखविले गेले आहे. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी पुर्वांचलातल्या कुठल्यातरी गावातल्या काही झुंझार बायकांची गोष्ट दूरदर्शनवर दाखविली होती. अंमली पदार्थाच्या, दारूच्या तडाख्यात सापडलेल्या आपल्या मुलांची, पुरुषांची सुटका करण्यासाठी अंमली पदार्थ, दारू विकणाऱ्यांविरुद्ध ह्या बायका कशा जिद्दीने झुंजतात, हे दुरदर्शनने दाखविले होते. रात्री-बेरात्री हातात मशाली घेऊन, जंगलात घुसून अंमली पदार्थाचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा पराक्रम करणाऱ्या या बायका बघितल्यावर हे इथे का घडू नये, असं मला सारखं वाटत राहिलं. 

दारु ही आता सुशिक्षित, सुसंस्कृत माणसाच्या घरातलीच झालीय. तिला घरंदाजपणा आलाय. दारु घेण्यात आणि देण्यात प्रतिष्ठा आहे. दारुचे घोट घेत दोन घटका बसणं हा आनंद मानला जाण्याइतपत दारु आता जवळची झालीय पैसा मुबलक असलेल्या मुलांना आता 'दारुभत्ता' सुद्धा दिला जातो. त्याला 'एन्जॉयमेन्ट मनी' म्हटलं जातं आणि 'हार्ड घेऊ नको रे' असा प्रेमाचा सल्लाही त्यासोबत देतात. काही घरांना दारु अशी घरंदाज झाली असली तरी काही घरातून आजही बरबादीचा डाव मांडूनच बसते आहे. त्या घरातला पैसा, आनंद, प्रेम संपवण्याचं काम दारु यथासांग पार पाडत आहे. विशेषतः ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकऱ्यांचे संसार बघता बघता उद्ध्वस्त करण्याचे काम दारू इमाने इतबारे पूर्वीच्याच क्रूरपणे आजही उरकत आहे. 

गरीब वस्तीत दारुचे अड्डे चालतातच कसे, असा प्रश्न पडतो. माणसं कष्ट, दुःख, निराशा, अपमान विसरण्यासाठी दारू घेतात. दोन घोट घेऊन घरी गेलं की झालं. दुसऱ्या दिवशी बाहेर पडेपर्यंत सगळं ठीकठाक होतं, असं घेणारे सांगतात पण हे खोटं असतं. दारू ठाकठीक करणारी नाहीच. ती थेंबाथेंबानं तुम्हाला संपवित असते. तुमच्या जीवनातला आनंद संपवत असते, नासवत असते. कुठल्याही गरीब वस्तीत सहजपणे दारू मिळते, ताडीमाडीच्या स्वरूपात हवी तशी, हवी तेवढी ही दारू आपल्या संसारात विष कालवते हे दिसत असून बायका ही दारूची दुकाने कशी चालू देतात? नवऱ्याचं कुणाशी भांडण झालं आणि नवऱ्यावर भांडणाऱ्याची मात होतेय असं दिसताच त्या रणरागिणी बनत त्या भांडणात शिरणारी आणि नवऱ्याशी भांडणाऱ्याला उभा आडवा करणारी स्त्री ही सर्वविनाशी दारू कशी खपवून घेते? तिच्या विरोधात ती थैमान का घालत नाही? असं नेहमीच वाटत आलंय. 

काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या सांगवडे गावात भेसळीच्या दारूने काहीजण मेले; पण जनक्षोभ उसळला नाही. दारुचे सर्व गुत्ते राजरोसपणे धंदा करीत होते. तिथे पिणाऱ्यांची गर्दी होतीच. शहरातून शंभर पावलावर परमिटरूम, देशी दारूचं दुकान, ताडीमाडीचं दुकान, चोरट्या दारूचा गुत्ता व घरगुती पिणाऱ्यांची सोय, निदानपक्षी बीअर तरी आहेच. आता दारूच्या जाहिराती राजरोसपणे करण्याचे धूर्त तंत्रही सरकारने 'मान्य'केले असल्याने जागोजाग दारूच्या मोहात पडा, असं सुचविणाऱ्या मोठमोठया जाहिराती दिसू लागल्या आहेत. त्या सोड्याच्या, ग्लासच्या असल्याच्या पळवाटा आहेत. पण ज्यांना खुणवायचे, मोहावयाचे, जाळ्यात आणायचे आहे त्यांच्यापर्यंत 'योग्य' संदेश देण्याचं काम त्या प्रभावीपणे करतात, हेही आपण बघत आहोत. दारुशी जमवून घ्या, असेच जणू आम्हाला सांगितले जात आहे. असे हे झिंगलेले वातावरण! 

असंच पांडवनगरातल्या महिलांनी आपण काय करू शकतो, हे दाखवून दिलंय. एक दिवस या बायका उठल्या आणि वस्तीतल्या दारुगुत्त्यावर कोसळल्या. काही कळायच्या आत बायकांनी दारूगुत्ते फोडले आणि वस्तीत दारू विकायची नाही, असं गुत्तेवाल्याला सांगितलं. पांडवनगर दारूपासून मुक्त झालं. नवरे, तरुण पोरं बिथरली. बायको, बहिणीला आईला जाब विचारू लागली. पण त्यांचा सारा जोर बायकांनी ओळखला होता. काही नवरोबांनी मारहाण करून, शिवीगाळ करून बायकांना नमवण्याचा प्रयत्न केला. पण वस्तीत दारू विकू देणार नाही, घराच्या माणसाला दारू प्यालेल्या अवस्थेत घरात येऊ देणार नाही, हा निर्धार बायकांनी केला. निग्रहाने पुढे रेटला आणि वस्तीचं रंगरूपच बदललं. 

दारू गुत्ताविरुद्ध ही लढाई या बायकांना घरातही लढावी लागत होती. पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रथम बायकांना दामटावण्याचा प्रयत्न केला. धंदेवाले असतील त्यांना पकडून हजर करा, असं बायकांनाच त्यांनी फर्मावलं. 'हे काम आम्ही करायचं तर तुमचं काय काम? कशासाठी तुम्ही इथं बसलात?' बायकांनी हा सवाल करताच हप्ते खाऊन निर्ढावलेल्या मंडळींच्या तुमानी खाली घसरताच त्यांनी निमूटपणे कारवाई करून गुत्तेवाल्यांचा बंदोबस्त केला.  इतर ठिकाणच्या महिलाही जागृत झाल्यानंतर मात्र या मोहिमा थंडावल्या. पोलिसांनी धाडी टाकून शंभराच्यावर दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. याचा अर्थ एवढे अड्डे होते, मग ते कुणाच्या हद्दीतले, कुठल्या अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेत होते, याचा शोध घ्यायला पोलीस आयुक्तांना वेळ लागणार नव्हता. कायद्याच्या भाषेत 'ज्याच्या हातात ग्लास आणि बाटली तो आरोपी' त्यानुसार ज्याच्या हद्दीत हे अड्डे ते आरोपी ठरविले गेले पाहिजे, पण ते होणे नाही, पांगरमल इथल्या या घटनेतून केवळ दिखाऊ कारवाई नको. मनुष्यवधाचा गुन्हा आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर का नको? गृहराज्य मंत्री राम शिंदे यांचा हा जिल्हा ते इथे अशा प्रकारची कारवाई करण्याचे धाडस दाखवतील काय?
-हरीश केंची,

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...