Thursday 20 August 2015

जगणार्‍यासाठी सरकार आहे की मरणार्‍यांसाठी?

प्रमोद नवलकर हे शिवसेनेचे नेते, मंत्री होते आणि त्याच्याही आधीपासून उत्तम लेखक व पत्रकार होते. दैनिक ‘नवशक्ती’मधून त्यांनी प्रदिर्घकाळ ‘भटक्याची भ्रमंती’ हा स्तंभ लिहीला होता. त्या एक स्तंभलेखासाठी अनेकजण ते दैनिक विकत घ्यायचे. जेव्हा शिवसेनेतर्फ़े नवलकर प्रथमच १९६८ सालात मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, तेव्हा संपादकांनी त्यांचे अभिनंदन करताना ‘भटक्या’ कोण त्याचा खुलासा केला होता. अशा नवलकरांनी लिहिलेल्या एका लेखाची सध्या आठवण येते. बोरीबंदर स्थानकाबाहेर एक भिकारी त्यांनी नित्यनेमाने बघितला होता. थंडीच्या काळात कुडकुडत तिथे जीव मूठीत धरून जगणार्‍या त्या गरीबाला कोणी कधी उबदार पांघरूण दिले नव्हते. एका हिवाळ्यात त्याच थंडीने त्याचा बळी घेतला. त्या दिवशी त्याचे बेवारस प्रेत तिथेच पडले होते आणि पोलिसही शासनाचा प्रतिनिधी म्हणून तिथे पंचनामा करीत होते. मात्र त्या दिवशी नवलकरांना त्याचा चेहरा बघता आला नाही. कारण त्या मृतदेहावर पोलिसांनी शुभ्र चादर पांघरली होती. त्यावर आपला स्तंभ लिहिताना नवलकरांनी मारलेला ताशेरा आठवतो.

मेल्यानंतर त्याच्या मृतदेहावर पांघरूण घालायला शासन यंत्रणा हजर झाली. तीच यंत्रणा आदल्या रात्री वा काही दिवस आधी तीच चादर त्याच्या कुडकुडणार्‍या गारठलेल्या देहावर पांघरूण घालायला आली असती, तर तो मेला नसता. सरकार मृतांची काळजी घेते आणि जिवंतपणी मात्र त्यांच्या यातना, वेदनांकडे डोळेझाक करते. जगणार्‍यासाठी सरकार आहे की मरणार्‍यांसाठी?

असा सवाल नवलकरांनी त्या स्तंभातून विचारला होता. आज तीस वर्षे उलटून गेल्यावरही त्या प्रश्नाचे उत्तर कोणी दिलेले नाही. या प्रदिर्घकाळात अनेक सरकारे आली गेली. नवलकरही एका सरकारमध्ये मंत्री होऊन गेले. अर्धा डझन मुख्यमंत्री बदलले. पण नवलकरांच्या त्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेले नाही. खरे सांगायचे तर त्या प्रश्नाची दखलही अजून सरकारने वा प्रशासनाने घेतलेली नाही. किंबहूना मेलेल्यांचे सरकार, अशीच आजही सरकारची अवस्था आहे. तिथे मेलात तर तुमची दखल घेतली जाते. जिवंत असताना कितीही टाहो फ़ोडा, तुमच्याकडे कोणी ढुंकून बघत नाही. खोटे वाटत असेल तर आजच्या किंवा कालच्या सरकारकडे बघा. त्याचा कारभार बघा. आत्महत्या करणार्‍यासाठी सरकार धावते आणि जो उद्यापरवा आत्महत्या करणार आहे, त्याची या सरकारला फ़िकीरच नाही. मरणार्‍याला आजच्या सरकारी कारभारात मोल आहे आणि जगणारा कवडीमोल आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो, ही आता बातमी राहिलेली नाही, ती नित्याची बाब बनली आहे. त्याने आत्महत्या करू नये, यासाठी सरकारपाशी कुठली उपाययोजना नाही. पण त्याने आत्महत्या केलीच, तर त्याच्यासाठी भरपाई व अनुदान म्हणून सरकारने ठराविक रकमेची तरतुद करून ठेवलेली आहे. अर्थात आत्महत्या केली आणि लगेच भरपाई मिळाली, असे होत नाही. तुम्हाला आपल्या कोणीतरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याचे सिद्ध करावे लागते.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...