Saturday 29 July 2023

भाजपतली अस्वस्थता...!

"देशातले प्रश्न, मणिपूरमधला हिंसाचार, त्यावरून संसदेतला गोंधळ, संसदेतल्या कामकाजाऐवजी निवडणुकांच्या प्रचाराला दिलेलं प्राधान्य. शेतकऱ्यांचं आंदोलन, चीनची घुसखोरी, अदानीचा घोटाळा, मालिकांचे आरोप, मणिपूरचं प्रकरण यावर प्रधानमंत्र्यांनी कधीच तोंड उघडलं नाही. भ्रष्टाचारावर आरोप केलेल्यांनाच जवळ घेणं, यानं संघ, भाजपत नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत यशाबद्धल साशंक असलेल्या संघानं भाजप नेत्यांना समजावून सांगतानाच नव्या नेतृत्वाचा शोध अवलंबला आहे. 'मी आलो, मी पाहाणार आणि मीच जिंकणार!' असा पायंडा वा तशी सवय लागलेल्या नरेंद्र मोदींना निवडणुका या डाव्या हाताचा मळ वाटतात. त्यांना जिंकण्याचा जणू नादच नव्हे, तसा संसर्ग त्यांनी करून घेतलाय. एखाद्या हुकूमशहाला जसा सर्वंकष सत्तेचा हव्यास जडतो आणि त्याच्या नादात तो विरोधीच काय आपल्या विचारधारेचंही किंवा आपल्याच माणसांचं निर्दालन करताना, सारे विधिनिषेध गुंडाळून ठेवतो, तसंच काहीसं भाजपत चाललंय!"
----------------------------------------------

*म*ध्यंतरी संघाशी संबंधित 'द ऑर्गनायझर' नियतकालिकानं भाजपच्या होणाऱ्या पराभवाचं विश्लेषण केलं. आता पांच राज्याच्या निवडणुका आहेत, त्यात पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपनं काय करावं याचं मार्गदर्शन केलं. संघानं भाजपला दिलेली प्रेरणा, सल्ला आणि निर्देश याचं अनुकरण केलं तरच निभाव लागेल! स्थानिक नेतृत्वाला दूर सारून केवळ राष्ट्रीय नेतृत्वाची छबी मिरवल्यानं पक्षात नाराजी आहे. त्यातून अडचणी निर्माण झाल्यात. भाजप, संघ कधीच व्यक्तीसाक्षेप नाही तर मूल्याधिष्ठित कार्यरत असतो. मात्र मोदी-शहांचं महिमामंडन करत तसं व्यक्तीसाक्षेप रूप यायला लागलंय. संघाच्या सदस्य संख्येपेक्षा दहापट भाजपची सदस्य संख्या आहे, त्यामुळं पक्षाला संघाची फारशी गरज नाही, असं मत भाजपच्या नेतृत्वाचं बनलंय. पण पक्षाचा आत्मा हा संघात असल्यानं तसं घडू शकत नाही! आगामी काळ कठीण असल्यानं मित्रपक्षांसह पक्षातून दूर सारलेल्या नेत्यांना गोंजारायला हवंय. स्थानिक नेत्यांचा सन्मान करायला हवाय. असा सल्लाही यात दिलाय! त्याचा अनुभव आता येतोय. प्रधानमंत्री मोदी यांचा करिष्मा आणि हिंदूत्व एवढंच निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसं नाही. त्याला स्थानिक पातळीवरचं खंदे नेतृत्व आणि सुशासनाची जोड असायला हवी, असं परखड विवेचन ‘द ऑर्गनायझर’नं केलं. नव्या संसद भवनात राजेशाही प्रतीत करणारी ‘सेन्गोल’ प्रतिमा, मणिपूरमधला भडकलेला हिंसाचार, महाराष्ट्रातली फोडाफोडी, तिथं भ्रष्टाचारांना सामावून घेणं हे आणि अन्य मुद्दे उपस्थित झालेत. मंत्र्यांच्या कारभारा विरोधात जनतेची नाराजी ही भाजपच्या दृष्टीनं चिंतेची बाब होती. काँग्रेसला कर्नाटक निवडणुकीत अपेक्षेहून अधिक यश मिळाल्यानं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांचं मनोधैर्य उंचावलंय. त्यामुळंच यशाच्या आहारी न जाता काँग्रेसनं 'इंडिया'चा प्रयोग केलाय. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेच्या पराभवात एक समानता आहे. तिथं भाजपकडं मजबूत स्थानिक नेतृत्वाचा अभाव दिसून आला. या ठिकाणी राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय प्रश्नावरच निवडणुका लढवल्या गेल्या; हिंदुत्व हाच मुद्दा तिथंही होता. आता पाच राज्याच्या मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड इथल्या निवडणुका आहेत. या सर्व राज्यांत भाजपला याच समस्येशी झुंजावं लागेल. भाजपनेते राजस्थानात वसुंधरा राजे यांना सोबत घेऊ इच्छित नसतील तर, पर्यायी नेतृत्व तिथं नाहीये, जरी मेघवालांना कायदामंत्री केलं वा धनखडांना उपराष्ट्रपती केलं तरी त्यांचा तेवढा प्रभाव तिथं नाहीये. छत्तीसगडमध्येही स्थानिक नेतृत्व दिसत नाही. मध्यप्रदेशात शिवराजसिंह आहेत, पण ते तिथं २० वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं अँटीइन्कमबन्सी निर्माण झालीय ते कितपत चालतील हा ही एक प्रश्नच आहे. तेलंगणात पक्षांकडं मजबूत नेतृत्व नाहीये. मिझोराममध्येही कुणी नाहीये. ह्या सगळ्या ठिकाणी भाजपला काम करावं लागणार आहे. सतत नरेंद्र मोदींना 'इन कॅश' करतानाही एक मर्यादा येते. एक मात्र निश्चित की, यशासाठी स्थानिक नेतृत्व हवंच! संघाचं धोरण पाहता तिथं आधीपासूनच 'व्यक्तिवादी' व्यक्तिसाक्षेप व्यवस्था नाही; तिथं मूल्याधिष्ठित विचारसरणीनं काम चालतं. मात्र ही पहिलीच वेळ आहे की, संघानं गेल्या नऊ वर्षात नरेंद्र मोदींचं व्यक्तीसाक्षेप राजकारण सुरू आहे त्याला संघानं कधी आक्षेप नोंदवलेला नाही. कधीच टीका टिपण्णी केली नाही की, नाराजी दाखवली नाही. कारण संघ-भाजपला तोवर यशाचा फायदेशीर रिझल्ट मिळत होता. आता थोडंसं नुकसान होतंय तर, संघ सांभाळून घेतोय. पण इथं लक्षात घेतलं पाहिजे की, २०१४ मधला संघ आणि २०२३ मधला संघ यात खूप मोठा फरक झालाय. संघाची जी सदस्य संख्या आहे त्याहून दहा पट अधिक भाजपची सदस्य संख्या आहे. त्यामुळं पूर्वीप्रमाणे आज भाजप संघावर अवलंबून नाहीये. पण भाजपचा आत्मा संघात असल्यानं भाजप संघाला टाळू शकत नाही. प्रमोद महाजन हे भाजपचे मोठे नेते होते, ते जेव्हा सामनाच्या कार्यालयात आले होते, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की, भाजपमध्ये सर्वोच्च नेते कोण आहेत? अटलबिहारी वाजपेयी की लालकृष्ण अडवाणी? त्यावर त्यांचं उत्तर होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांना नेता मानेल तो भाजपचा सर्वोच्च नेता! त्यामुळं संघानं आजवर मोदींना सर्वोच्च नेता मानलंय. आता मात्र ती स्थिती बदलली जातेय असं दिसतंय. त्यामुळंच नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झालाय असं म्हटलं जातंय. सध्याचे भाजपचे वरिष्ठ नेते हे स्थानिक नेतृत्वाला जाणूनबुजून दूर ठेवताहेत. पर्यायी नेतृत्व तयार होऊ देत नाहीत. हे संघाच्या लक्षांत आलं नसेल असं नाही. कारण साऱ्या घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. सतत विश्लेषण करत असतात, कदाचित पक्षनेतृत्वाला याची जाणीवही करून देत असतीलही! पण बाजारात जी बाब चालत असते त्यात सहसा बदल केला जात नाही. समजा स्थानिक नेतृत्वाला दूर ठेऊन एक मध्यवर्ती नेतृत्वाच्या म्हणजेच मोदींच्या नेतृत्वानं यश मिळत असेल तर, पक्षावर दबाव आणण्यात काय हशील आहे? असं कदाचित संघाला वाटत असावं.

देशातल्या मूलभूत प्रश्नांवर बोलणारा सध्यातरी एकही पक्ष दिसत नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक पक्ष आवाज उठवत असताना देशातला सर्वात जुना पक्ष राष्ट्रीय पातळीवर काही प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. काँग्रेसनं आपल्या आप, तृणमूलसारख्या विरोधक असलेल्या विरोधकांना जवळ घेत  'इंडिया' या नव्या आघाडीची घोषणा करताच भाजपचे नेते आणि प्रवक्ते चवताळून उठलेत. याचा अर्थ भाजपला आजही काँग्रेसची भीती वाटतेय. तसं नसतं तर हताश, निराश आणि कमजोर झालेल्या काँग्रेसच्या 'इंडिया'ची दखल घेण्याची भाजपला गरजच नव्हती. भाजपचं हे सर्व गमतीचं आहे. काँग्रेस पुन्हा उठली तर भाजपसमोर अडचणी निर्माण होतील. खर्गे, राहुल, प्रियंका हे जनसमर्थन मिळविण्यात यशस्वी झाले तर काय होईल हे त्यांना कर्नाटकातून दिसून आल्यानं, त्या भयातून ‘इंडिया’वर टीका होतेय. सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला तरी हे शोभा देणारं नाही. काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षानं राष्ट्रीय ऐक्यासंदर्भात एखादा कार्यक्रम ठरवला असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. असे प्रयत्न राष्ट्रीय ऐक्यासाठी हवेच आहेत. राहुल गांधी यांच्यावर इतके हल्ले करूनही त्यांचं मनोधैर्य तुटलेलं. ते 'नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान!' म्हणत वाटचाल करताहेत हे भाजपच्या पचनी पडलेलं नाही, ही खरी पोटदुखी आहे. अदानी-मोदी यांचे परस्पर संबंध काय आहेत? अदानीच्या शेल कंपनीत गुंतवले गेलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? असे सवाल लोकसभेत विचारल्यानंतर त्याचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची खेळी खेळली गेली. तरीही ते निर्धारानं वाटचाल करताहेत. पक्ष शरपंजरी असला तरी सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष तोच आहे. स्वातंत्र्यलढ्याचा वारसा काँग्रेसला लाभलाय! भाजपकडं असा नाही. काँग्रेसनं ७० वर्षांत काय केलं वगैरे प्रश्न विचारणाऱ्यांनी स्वतःला एकदा तपासायला हवंय. सर्वांचं काँग्रेसबरोबर मतभेद आहेत; त्यांनी काँग्रेसच्या फाजील सेक्युलरवादावर प्रहार केलेत. भाजपची वाढ ही नवहिंदुत्वाची सूज आहे. सर्व प्रश्नांवर ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ हाच उपाय त्यांच्याकडं आहे. पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करून मतांचं ध्रुवीकरणही नेहमीचंच आहे. मात्र आपली हजारो हेक्टर जमीन घशात घालणाऱ्या, सतत घुसखोरी आणि सीमेवर कुरबुरी करणाऱ्या चीनच्या विरोधात पाकिस्तान प्रमाणे भाजप कधी ललकारी देताना दिसत नाही. चीननं अर्धे लडाख घशात घातलं तरी ‘इंडिया’वर चिखलफेक करणारे गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद, हिंदुत्व इथं थंड पडतं!

येऊ घातलेल्या छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनीं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं महत्त्व पूर्वीपेक्षा वाढवलंय. लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ मध्ये झाल्या. त्यानंतर प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका झाल्या असत्या तर आपण १५ व्या लोकसभेच्या कार्यकाळात असतो. परंतु १९७१ च्या लोकसभा निवडणुकानंतर पाचवेळा मुदतपूर्व निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुका हा काही देशापुढचा मुख्य प्रश्न नाहीच. प्रश्न, देशातल्या लोकशाहीच्या अडणीवर भुजंगासारखं वेटोळे घालून वाढत असलेल्या जाती-धर्मवादी कर्मठतेचा आणि ढोंगी लोकशाही प्रेमाचा आहे. १९६७ पासून हे कर्मठपण आणि ढोंग मोठ्याप्रमाणात धुमाकूळ घालतंय. ते १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया यांच्या रूपानं अवतरलं, १९७५ ला जयप्रकाश नारायण त्या कर्मठतेचं आणि ढोंगाचं नायक बनले. ते कातडं १९८७ मध्ये व्ही. पी. सिंह यांनी पांघरलं. त्या भूमिकेत १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी गेले. त्यानंतर १० ते १२ वर्षांचा अवकाश गेला आणि २०१४ नरेंद्र मोदी अवतरले. त्यांचा अवतार असा की, जणू त्यांच्या पूर्वसुरींची सारी प्रभावळच झाकोळली जावी! गुजरात विधानसभेच्या २०१२ च्या निवडणुकीनंतर त्यांचा भारताच्या राजकीय पटलावर जणू जाणीवपूर्वक उदय करण्यात आला. गुजरातच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर देशाचं अवघं कॉर्पोरेट विश्व, अभिजन वर्ग, बाजारपेठ आणि ग्राहक आपलं तोंड नरेंद्र मोदी यांच्याकडं करून बसला. मग सिकंदर भारताकडं यावा, अशा वेगात आणि आविर्भावात नरेंद्र मोदी कर्णावतीकडून इंद्रप्रस्थाकडं चालू लागले. २०१४ मध्ये १६ व्या लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झाली. मतदान झालं. पण प्रस्थापित विश्व आणि मुख्यतः सर्व प्रकारच्या माध्यमांनी असा काही आव आणला की, देशात जणू पहिल्यांदाच अशी काही निवडणूक होतेय. या निवडणुकीत भाजपनं ५४५ पैकी २८२ म्हणजे बहुमतापेक्षाही पाच-दहा जागा जास्त जिंकल्या. पण या २८२ जागांनी सत्तेच्या माजाचा असा काही बुरखा मोदी आणि पक्षाला दिला की, देशातल्या एकाही पत्रकाराला गेल्या नऊ वर्षांत त्यांचं स्पष्टीकरण मागण्याची खुली संधी मिळू शकलेली नाही. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या त्यावेळी प्रधानमंत्री राजीव गांधी होते. पण त्यांनी सत्ताकारणात, राज्यकारभारात भाजपच्या 'त्या' दोन खासदारांना गृहीत धरलं होतं. याउलट २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकलेल्या काँग्रेसचा नरेंद्र मोदी यांनी करता येईल, तेवढा आणि तितक्यांदा अपमान केलाय. आतातर त्याचा कडेलोट झालाय. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं ५४५ पैकी ४१५ जागा जिंकल्या होत्या. पण सत्ता कारभारात त्यांनी मोदींएवढा उन्माद कधीच केला नाही. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ३६४, ३७१ जागा जिंकल्या. अटलबिहारी वाजपेयी यांनी 'दुर्गा' म्हणून गौरवलेल्या इंदिरा गांधी यांनीही चारवेळा अनुक्रमे २८३, ३५२, १५४, ३५३ जागा जिंकल्या पण त्यांनी 'आणीबाणी'सारखा कटू निर्णय वगळता आपल्या व्यक्तिमत्त्वाचं मोदींसारखं सवंग, अहंकारी, ढोंगी प्रदर्शन कधीच केलं नव्हतं.

मोदींच्या उदयानंतर  तामिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांचा अपवाद वगळता जवळपास १५ राज्यात भाजपची सरकारं आली. केंद्रातही भाजप सरकार आणि राज्यातही भाजप अशा दुटांगी धोतरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चड्डी पँट लपून गेली आणि 'काँग्रेसमुक्त भारता'ची घोषणा फिरली. हा दर्प आणि माज साध्या बहुमतानं आला होता. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला मिळाल्या तशा, ४१५ जागा भाजपला मिळाल्या असत्या, तर विज्ञानाचे सारे सिद्धान्त उलटे फिरले असते. देशाचा कारभार कॅलेंडराऐवजी पंचागावरच चालवावा लागला असता. पण देश फार मोठं शहाणपण आपल्या मनी मानसी बाळगून आहे. या देशानं बुद्ध पाहिला; तसा पुष्यमित्र शुंगही पाहिलाय. बळी अनुभवलाय आणि वामनही वाचलाय. कर्झन वायली, रॉलेट या क्रूरकर्मी ब्रिटिश राज्यकर्त्यांची सत्ता सोसलीय आणि महात्मा गांधीही स्वीकारलेत. देशानं गरुडाचा विहार पाहिला आणि चिलटांची गुणगुणही सहन केलीय. जिथं चौदा चौकड्यांची राज्यंही कडकडा मोडली; तिथं लवचिक घटना असलेल्या आणि बऱ्यापैकी लोकशाही रुजलेल्या देशात अशी व्यक्तिवादी संस्कृती फार दिवस कशी बरं टिकणार? अशा वातावरणात पांच राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. 'मी आलो, मी पाहाणार आणि मी जिंकणार!' असा पायंडा पाडून राज्य करणाऱ्या किंवा तशी सवय लागलेल्या मोदींना या निवडणुकाही आपल्या डाव्या हाताचा मळ वाटताहेत. मोदी फक्त दिल्लीतच नव्हते. यत्र-तत्र सर्वत्र होते. त्यांना जिंकण्याचा जणू नादच नव्हे, रोग जडलाय किंवा तसा संसर्ग त्यांनी करून घेतलाय. एखाद्या हुकूमशहाला जसा सर्वंकष सत्तेचा हव्यास जडतो आणि त्या नादात तो विरोधीच काय आपल्या विचारधारेचंही किंवा आपल्याच माणसांचं निर्दालन करताना, सारे विधिनिषेध गुंडाळून ठेवतो, तसंच काहीसं भाजपत चाललंय. म्हणूनच अडवाणी, जोशी, सिन्हा यासारख्या अनेकांना मोडीत निघालेली भांडी ठरवलीत. गडकरी, राजनाथसिंह यांना अंतरावर रोखलंय. व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेला अडसर ठरण्याऱ्या योजना आयोग, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, सर्वोच्च न्यायालय यासारख्या घटनात्मक व्यवस्था मोडीत काढण्याचं काम सुरू झालंय. त्यांच्या एकूण कामकाजाच्या शैलीचा निष्कर्ष लोकहिताला अपायकारकच दिसून आलाय. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षांनंतर प्रथमच भारतीय लोकशाही व्यवस्थेसमोर मोठाच अडथळा निर्माण झालाय. याची सुरुवात नोटाबंदीच्या निर्णयानं झाली. न्यायमूर्तीच्या लेखणीचा हात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दाबून धरला जातोय. देशाची बाह्यसुरक्षा असो की आंतरिक सुरक्षा, त्याचाही खेळखंडोबा केला जातोय. देशाचे प्रधानमंत्री महापालिकेच्या निवडणूक असोत की, राज्यांच्या विधानसभेची, मोबाईल फोनच्या भाषेत बोलायचं तर सतत इवेक्शन मोडमध्ये असतात. भाषण, भाषण आणि भाषण! एकतर्फी बोलणंच, दुसऱ्याचं कधी काहीच ऐकायचं नाही, असा सारा व्यवहार! असं खूप काही संपूर्ण देश सोसतोय. मध्यप्रदेश ही अनेक वर्षांची संघभूमी. भगवान बुद्धाच्या विशाल तत्त्वज्ञानाची आणि संघाची. इथंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचं पहिलं आणि टिकाऊ राज्य सरकार अस्तित्वात आलं. तिथं नव्या संदर्भात सांगायचं तर, वैदिक संघाचं पतन होऊन लोकशाही मूल्यांच्या बाजूनं जो कौल तिथं मिळाला, तो स्वागतार्ह होता. तो भाजपमुक्त देश, हा संदेश देणारा होता. तिथं काँग्रेस पक्ष हा निमित्तमात्र होता. पण ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा कौल भाजप आणि मोदींच्या चरणी वाहिला आणि काँग्रेस तिथं धाराशाही झाली. तेव्हापासून या संस्कृतीची पुनरावृत्ती इतर राज्यातूनही झाली! याचा अनुभव महाराष्ट्रही घेतोय! विरोधी पक्षांवर शरसंधानासाठी पूर्वीइतकीच ताकद भाजप आजही लावतोय, तरीही अन्य पक्षीयांचा प्रभाव वाढतोय. भाजपकडे नऊ वर्षे काही ना काही सांगण्याजोगं होतं. मोदी-शहांनी ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा केली होती. संसदेत अनुच्छेद ३७० रद्द करून त्यांनी भाजप-संघाच्या कट्टर पाठीराख्यांना धक्का दिला. राम मंदिरासंदर्भात न्यायालयानं निकाल दिला तेव्हा मुस्लिमांवर मिळवलेला सांस्कृतिक विजय असल्याचं समाधान मिळालं होतं. संघ विचारांची बांधिलकी नसलेल्या अनेक देशवासीयांनी जल्लोष केला. हिंदू सांस्कृतिक वर्चस्वाचं श्रेय प्रधानमंत्री मोदींना दिलं. २०१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या तेव्हा वाटलं होतं की,भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणार! एवढा धाडसी प्रधानमंत्री देशाला कधीही लाभणार नाही असा विश्वास वाटला होता. मोदींच्या निर्णयप्रक्रियेतली अनिश्चितता हाही कौतुकाचा विषय ठरला होता. भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर लोकांमध्ये दिसलेला आशावाद त्यांना मोदींच्या नेतृत्वाकडं आकर्षित करत राहिला. मग, नऊ वर्षांनंतर मोदींचं सरकार हे काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारसारखं आणि भाजप दहा-बारा वर्षांपूर्वीच्या काँग्रेससारखा वाटू लागलाय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 22 July 2023

द्रौपदीचं वस्त्रहरण! सरकार धृतराष्ट्र...!!

"मणिपूरच्या घटनेला ७७ दिवस उलटूनही आरोपींना अटक नाही, मूळातच ही घटना समोर येऊ दिली नाही. याचा शोध घेण्याची गरज आहे. इथल्या पोलिस अधीक्षकाला बडतर्फ केलं पाहिजे. कारण आपल्या जिल्ह्यात ही घटना घडली, त्याची खबरबात अधीक्षकाला नसेल, असं नाही. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यामुळं ती झुंड, तो जमाव जितका दोषी आहे, तितकेच दोषी तिथले पोलिस अधीक्षक, कलेक्टर, लोकप्रतिनिधी आणि स्वतः मुख्यमंत्रीही आहेत. जर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नसता, तर कदाचित या महिलांना न्याय मिळालाच नसता, ही घटना दाबली होती, मात्र त्या व्हिडिओमुळं या घटनेला वाचा फुटली. काय दोष असेल त्या महिलांचा, की त्यांना
इतकी गंभीर शिक्षा या जमावानं दिली. सामूहिक बलात्कार करून  विटंबना केली, विवस्त्र देहाची धिंड काढली. किती ही विकृती, अमानवीयपणा. मात्र सगळ्यांनी चुप्पी साधत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळं सगळेच दोषी ठरतात!"
----------------------------------------------
द्रौपदियों के चीर हरण पर
धृतराष्ट्र सहित सबकी आँखें अंधी,
जुबां खामोश अभी तक है
दुशासन-दुर्योधन क्रूर अभी तक हैं...
जागो लोकतंत्र के रखवालों जागो ll

*म* णिपुरातल्या कुकी स्त्रियांची नग्न धिंड काढली जातेय. त्यांच्या गुप्तांगांची, त्यांच्या सन्मानाची विटंबना केली जातेय. हे सगळं दाखवणारा व्हिडिओ, फोटो समाजमाध्यमांवर फिरताहेत. सगळे तथाकथित राष्ट्रप्रेमी गप्प आहेत. महाभारतातल्या सभेतल्या  द्रौपदी वस्त्रहरणाची परंपरा रस्त्यावर आणली जातेय. टिकली, साडी वरुन व्याकूळ होणारे संस्कृतीरक्षकही गप्प आहेत. महाभारताच्या त्या सभेतही रथी महारथी गप्प होते. स्त्री देहाची विटंबना होताना गप्प बसण्याची परंपरा खूप जुनी आहेच. शत्रूपक्षाच्या, आपल्याहून वेगळ्या धर्माच्या स्त्रीला सन्मानानं परत पाठवण्याची छत्रपती शिवरायांची कृती सद्गुणविकृती ज्यांना वाटते आणि शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार करायला हवेत, असे विचार जे मांडतात त्या विचारांच्या वारसदारांकडून कोणत्याही प्रतिक्रियेची, निषेधाची अपेक्षाच नाही. अर्थात आज लोकलाजेस्तव यातली काही मंडळी या घटनेचा निषेध करतीलही. पण तो एक नाईलाज असेल, सोपस्कार असेल, विसंगती असेल. गेली काही वर्ष वैचारिक विरोध करणाऱ्या स्त्रियांबाबत सातत्यानं जी आक्षेपार्ह, चिथावणीखोर भाषा वापरली जातेय, त्यातून हे असेच माथेफिरू तयार होणार आहेत. ही अशी चिथावणीखोर भाषा वापरली जात असताना सोयीस्कर मौन धारण केलं जातंय. त्या मौनाचेच हे परिणाम आहेत. मणिपूरची घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहेच, पण ती घडली याचं आपण आश्चर्य वाटून घेणार असू तर तो भाबडेपणा आहे. मणिपूर मधल्या आदिवासी महिलांवरच्या अत्याचाराचा व्हिडीयो समोर आल्यानंतर अचानक गोदी मिडीयानं मौन सोडलंय. मध्यंतरी राहुल गांधी मणिपूरला जाऊन आले, मात्र नरेंद्र मोदी अद्याप ही मणिपूरला गेलेले नाहीत. देशातल्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राष्ट्रपती मूर्मू या महिला असतानाही त्यांनी दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचारावर मौन बाळगलंय. निषेध सोडा, शांततेचं अपिल ही करायला कोणी तयार नाही. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा ती आपलं परकं काही पाहत नाही. सत्तातुराला भय आणि लज्जा काहीच शिल्लक राहत नाही. मात्र मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी संताप व्यक्त केलाय. असा प्रकार यापूर्वी आपण कधी पाहिलेला नाही असं म्हणत, त्यांनी इथल्या साऱ्या घटना आपण वेळोवेळी वरिष्ठांना कळविल्यात, तसे अहवाल पाठविलेत पण कोणतीच कार्यवाही झालेली नाही. असं त्यांनी उद्वेगानं असहायतेनं म्हटलंय. मणिपूरच्या घटनेवर सगळीकडं दुःख, संताप, शोक आज व्यक्त केला जातोय. खासकरून समाज माध्यमांवर एक दिवस हळहळ व्यक्त केली जाईल. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्या आपण ही जात्यात असू, त्यावेळेला इतरही लोकं अशीच हळहळ व्यक्त करतील. आपापल्या कुवतीप्रमाणे अशा गोष्टींचा निषेध आपण केला पाहिजे. मौन बाळगणं हे मेलेल्या माणसाचं लक्षण आहे. कदाचित उद्या तुम्ही ही एखाद्या व्यवस्थेचे पिडीत व्हाल, तेव्हा तुमची साथ देणारे तुम्हालाच आरोपी बनवतील. सिस्टीम माणूस पाहत नाही, ओळखत नाही. सिस्टीम केवळ सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशाला बांधील आहे. त्यामुळं आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा.

मणिपूरमध्ये ४ मे रोजी ही घटना घडली. या तीन महिलांपैकी ज्या एकीला जमावाने मिनतवारी केल्यानंतर त्या वयस्कर असल्यानं पुढं नेऊन सोडलं. तिचा नवरा भारतीय लष्करात जवान होता, त्यानं कारगिल युद्धात भाग घेतलेला होता. त्या महिलेच्या नातेवाईकानं केलेल्या पोलीस तक्रारीनुसार कांगपोकपी जिल्ह्यातल्या एका गावात झालेल्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी आदिवासी कुकी समाजातले दोन पुरुष आणि तीन महिला जंगलात पळून जात असताना ही घटना घडलीय. या तक्रारीत म्हटलंय की पाच जणांना वाचविण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जमावानं त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी आम्हाला घराजवळून उचललं आणि गावापासून थोडं दूर नेलं आणि जमावासोबत रस्त्यावर सोडलं. आम्हाला पोलिसांनीच त्या नराधमाच्या ताब्यात दिलं! जमावानं या महिलांना निर्वस्त्र करुन रस्त्यावर चालण्यास भाग पाडलं. व्हायरल व्हिडीओमध्ये काही पुरुष दोन महिलांना विवस्त्र करून शेताकडं ओढून जबरदस्तीनं खेचताना दिसताहेत. १८ मे रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत, पीडित महिलांनी क्रूरपणे विवस्त्र धिंड काढून सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप केलाय. यापैकी एका २१ वर्षांच्या मुलीवर अत्यंत हिंसक पद्धतीनं दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि इतर दोन महिला तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरल्या असंही या तक्रारीत म्हटलंय. भारतासारख्या देशामध्ये कोणतीही यंत्रणा एवढी कमकुवत नाही की महिलांना अशी वागणूक दिली जात असताना त्यांना काहीही करता येणार नाही. गुन्हेगारांव्यतिरिक्त संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनाही यामध्ये शिक्षा झाली पाहिजे. ट्विटरवर हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर आणि दस्तरखुद्द सुप्रीम कोर्टानंही हा व्हीडिओ 'धक्कादायक' असल्याची टिप्पणी केलीय. त्यांनी सरकारला बजावलं की, 'तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्हाला लक्ष घालावं लागेल...!' नागरिकांनी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सतत मागणी करूनही महिला सशक्तीकरण आणि मुलींच्या शिक्षणाबाबत सतत बोलणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मणिपूरातल्या हिंसाचारावर प्रतिक्रियाही दिलेली नव्हती. पण सुप्रीम कोर्टाच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी पावसाळी अधिवेशनाच्या आधी बोलताना नरेंद्र मोदींनी त्यांचं मौन तोडत सांगितलं की, या घटनेमुळं त्यांचं मन 'प्रचंड दुःख आणि रागानं भरलंय आणि यातल्या दोषींना माफ केलं जाणार नाही!' असं असलं तरी हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यामध्ये सगळ्या हल्लेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत असूनही कारवाईला एवढा वेळ का लागला हा प्रश्न उरतोच.

आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसल्याची शक्यता आहे, ज्यात शेकडो पुरुष महिलांना नग्न करून तिचं शरीर, गुप्तांग दाबताहेत. जमाव निर्वस्त्र केलेल्या महिलांना पकडून घेऊन जातोय. जमावाचे खुनी हात त्या महिलांच्या शरीरासोबत खेळताहेत. असहाय्य आणि लाचार महिला रडताहेत. पुरुषांची गर्दी आनंद घेतेय. सभ्यतेच्या सामाजिक नियमांनुसार सोशल मीडिया साईट्स लवकरच या व्हिडीओचं प्रदर्शन थांबवतील. परंतु घडलेली घटना वास्तव आहे. घटनेचे तपशील तेच आहेत जे लिहिलंय. आपल्याला माहीत नाही की या व्हिडीओनंतर त्या महिलांच्या सोबत काय झालं? जमावाची गर्दी त्यांना कुठून घेऊन येत होती? कुठं घेऊन जात होती? त्या व्हिडीओला सुरवात आणि शेवट नाहीये, फक्त मधला थोडा भाग आहे. कोणीही त्या व्हिडीओकडं दुर्लक्ष करू शकत नाही. आज तुम्ही शांत राहू शकत नाही. पुरुषांच्या जमावानं वेढलेल्या त्या निर्वस्त्र महिलांसाठी आज बोलावं लागेल. जात, धर्म, भाषा, प्रदेशाच्या अस्मितेच्या राजकारणानं माणसालाच माणुसघाणं बनवलंय. मणिपूरच्या महिलांना घेरून नाचणारा जमाव तुमच्या आजूबाजूला सुद्धा तयार झालाय. त्या सर्वांना जाऊन सांगा की अस्मिता आणि द्वेषाच्या राजकारणानं देशाच्या जनतेला कशाप्रकारे या जमावात सामील केलंय. त्या ‘मणिपूर’च्या महिला नाहीयेत. त्या कुकी महिला नाहीयेत. त्या फक्त महिला आहेत. जर ही घटना तुम्हाला अस्वस्थ करत नसेल, यानं तुमचं शरीर कंप पावत नसेल तर तुम्ही स्वतःला मृत घोषित करून टाका. देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यात शांततेचं आवाहन केलेलं नाही. तिथं जाऊन द्वेष आणि हिंसा रोखण्याचं आवाहन केलेलं नाही. सरकारनं त्याचं कर्तव्य पार पाडलं नाही. त्यांच्या जाण्यानं किंवा आवाहनानं हिंसा थांबलीच असती याची काही गॅरंटी नाही. पण या चुप्पीचा काय अर्थ आहे? या चुप्पीचं समर्थन केलं जाऊ शकतं? पण प्रधानमंत्री परदेश दौऱ्यात मश्गुल होते, निवडणूक यंत्रणेत गर्क होते. सत्ता आल्यानंतर मित्रपक्षांना धुडकावलेल्यांना गोंजारत होते. जळणाऱ्या मणिपूरपेक्षा हे सारं त्यांना महत्वाचं वाटत होतं.

अत्याचार करणाऱ्यांचे चेहरे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत असतानाही पोलिसांनी आजवर कोणतीच कारवाई केली नाही. आता लोकांनाच विशेषतः महिलांना पुढाकार घ्यावा लागणार. बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशाप्रकारे जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बिळात दडलेल्या नरपशूंना, अत्याचार करणाऱ्या नराधमांना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींची विटंबना करणाऱ्यां विरोधात संतापानं खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर येऊन त्यांना हुडकून काढून चेचून सरळ करायला हवंय. खरं तर कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय! अक्षरशः महिलांना निर्वस्त्र करून तिच्या छातीवर, गुप्तांगावर शेकडो हातांनी मुलीं, महिलेवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी आणि शुष्क भावनांनी संवेदना संपलेला आपला हा समाज व्हिडीओ पाहतो, बातम्या वाचतो आणि विसरून जातो. त्या बिचाऱ्या मुलींना त्यांचा देह ही भोगाची खाण आहे, आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणून अत्याचार होतोय हे भयाण वास्तव अनुभवायला येतं. दुसऱ्याच्या विकृत वासनेपायी आपलं सारं जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसेल. दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा जणू मोहोर फुटलाय, त्यामुळं अशा पाशवी घटना वारंवार घडताहेत. मणिपूरच्या विकृत मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना तर बेशरमपणे अशी शेकडो घटना इथं घडल्यात असं म्हटलंय. असं सांगताना त्यांना थोडीशीही लाज वाटली नाही. हे असले नीच प्रकार लोकांसमोर येऊ नयेत म्हणून इंटरनेट बंद केल्याचं सांगतात, या निर्ढावलेल्यांना काय म्हणावं? आमच्या मुलीबाळींना नासवणाऱ्यांना ठेचून काढण्यासाठी जागरूकता, ऐक्य दाखवू शकलो तरच सत्ता आणि मत्ता यांचा कैफ चढलेली बेधुंद बेफाम झालेली कारटी ताळ्यावर येतील! तब्बल ७७ दिवसांनंतर व्हिडीओमार्फत उघडकीस आलेल्या या मणिपूरच्या घटनांनी सारा देश हादरून गेलाय. जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या इथल्या कळ्यांना कुस्करून टाकलं जातंय. या कळ्यांचं विकृत वासनेच्यापोटी क्रूरपणे बळी घेतले जाताहेत. एकापाठोपाठ एक अशा घटना उघडकीला येताहेत. मुलींवरच्या अत्याचाराच्या बातम्या आल्यानंतर देशभरात फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर आक्रोश उमटतोय. डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज उघडकीस येताहेत.

सत्ता म्हणजे अधिकार आणि मत्ता म्हणजे पैसे हे पचवायलाही माणूस समर्थ असायला लागतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडं समाजाचं लक्ष आहे, याची जाणीव त्याला असावीच लागते. लोकांची पर्वा नसेल असं त्यातल्या एखाद्याला वाटतं, पण तो सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, निर्मिक परमेश्वर, जगतचालक माझ्यावर लक्ष ठेवतोय त्याची पर्वा करायला हवी, असं त्या एखाद्याला वाटायलाच हवं. हे जेव्हा वाटेनासं होतं तेव्हा घसरण सुरू होतं. मुलं बेफाम बनतात. हे सगळं नक्की कशामुळं घडलं याचा खोल अभ्यास करून मगच निष्कर्ष काढले गेले पाहिजेत. जेव्हा समाजाचंच नैतिक अधःपतन होतं तेव्हा असं घडणारच! याबाबत समाजानंच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. जी वासनाकांडं गेल्या काही दिवसात मणिपुरात धगधगली वा आज जी धगधगताहेत ती बघितल्यावर चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. जे काही हरामखोर अशा वासनकांडात गुंतलेत. त्यांना जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाजानं पुढाकार घ्यायला हवाय. स्त्रियांच्या, मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणंच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजानं का घेऊ नये, जे कुणी पोलिसांच्या हाती न सापडता सोज्वळता मिरवत बसलेत त्यांना महिलांनी, समाजानं गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, भेकडपणे या अशा प्रकरणी आपलं सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांना आनंद होईल. प्रसिद्धी माध्यमं अशा बाबी रवंथ करत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली, महिलांनी दाखवायला हवी. असले नीच प्रकार करणाऱ्यांच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, सत्तेचं आणि मत्तेचं पाठबळ आहेच. आमचं कोण काय वाकडं करणार? आम्ही सगळं दडपू शकतो, अशी खात्री असल्यानंच हे सारे बेफाम बनलेत. आमच्या हाती सत्ता आहे. कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो. लोकांना धमकावू शकतो आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरूण घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारे वापरायचं असतं असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासवणाऱ्या प्रकाराबद्धल राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. राजकीय व्यासपीठावरून राणा भीमदेवी थाटाची भाषणं करणारे लोक लैंगिक शोषणाबाबत काहीच बोलत नाहीत. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी भांडणारेही शांतच आहेत. मोठा गाजावाजा करत 'बेटी बचाव बेटी पढाव!' म्हणत महिलांच्या विकासाचं धोरण जाहीर करणाऱ्या पक्षालाही याचं तर जणू सोयरसुतकच नाही अशी परिस्थिती आहे.

मणिपुरातला सामूहिक बलात्कार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतात. एका तरुणीवर कित्येकजण अत्याचार करतात, तिच्या देहाचा चोळामोळा करतात, तिची तडफड त्यांना दिसत नाही, त्यांचं मन द्रवत नाही. एकाकी असहाय स्त्रीवर ते झडप घालतात. सत्ता, पैसा आणि ताकद या तिन्हींचा या दुष्कार्मासाठी वापर केला जातो. सारं करून साळसूदपणे मिरवायला पुरुषपशु मोकळे सुटतात याविरुद्ध संघटित आक्रदन व्हायला हवं! महिलेला नग्न करून तिची धिंड काढून बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटत नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. जोवर आपल्या अब्रूच्या अंगारानं ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशा नराधमांना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर वर्तमानकथाही आहे. स्त्री जोवर हिंमत दाखवणार नाही तोवर असंच होणार. अत्याचारी पुरुषाचं पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याच्या बातम्या अधूनमधून वृत्तपत्रातून येतात. जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात हे केव्हाच सांगितलंय!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 15 July 2023

सारे प्रवासी सत्तेचे...!

"महाराष्ट्रातल्या राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आहे. जितकं दाखवलं जातंय तितकं वैचारिक मतभेद कुठंच उरलेलं नाहीत. सर्वत्र भुरट्या राजकारण्यांचीच चलती आहे. राजकारणातल्या सगळ्यांचा पोत एकच आहे हे कळल्यावर आडवं कुणाला घालायचं, अन उभं कुणाला करायचं हे ठरवायला विशेष अडचण पडू नये. उगाच अटीतटी ताणून आणि भरमसाठ बोलून काही साधत नाही. सर्वच पक्षातले नेते वाट्टेल ते बोललेलं विसरून, वाट्टेल ते करताहेत. कार्यकर्ते मात्र अटीतटीनं बरबाद होतात. इथं कुणीही संस्कारी, मूल्याधिष्ठित नाही, सारे सत्तेचे प्रवासी! सारे सत्तापिपासू बनलेत. सत्ताधारी शिंदेंसेना, भाजप आणि अजितवादी एकीकडं तर सत्ताकांक्षी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना दुसरीकडं. सगळ्यांचीच राजकीय घालमेल सुरू झालीय. जसजशी निवडणूक जवळ येईल तेव्हा वातावरण अधिकच उध्वस्त झालेलं असेल. पातळी आणखी घसरलेली असेल, कसलाच घरबंद राहिलेला नसेल!"
--------------------------------------------------

*अ* खेर राज्यातल्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजितवादी मंत्र्यांचं खातेवाटप झालंय. दहा-बारा दिवस बैठकांचा, गाठीभेटींचा काथ्याकूट झाला. पण 'एक फुल दोन हाफ' मुख्यमंत्र्यांचं खातेवाटपावर एकमत होऊ शकलं नाही. इतर मंत्र्यांचं गुरगुरणं सुरूच होतं. इथं काही होत नाही असं म्हटल्यावर मग अजित पवार दिल्लीला शरण गेले, तिथं 'अमितशाही' धावून आली, त्यानंतर त्यांच्या मनासारखी खाती  मिळालीत. जी खाती अजितवादींना मिळालीत हे पाहिलं तर लक्षांत येईल की, यापूर्वी भाजपनं ज्या ज्या खात्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, बैलगाडीभर पुरावे दिले होते. ती सारी खाती पुन्हा एकदा अजितवादी पक्षानं पटकावलीत. दोन दिवसांपूर्वी खुद्द प्रधानमंत्र्यांनी अजितवादी पक्षावर सत्तर हजार कोटींची भ्रष्टाचार केल्याचा आरोप जाहीर सभेतून केला होता. त्याच अजितवादी पक्षानं प्रधानमंत्र्याच्या भाजपशी मोहतुर लावलं आणि सत्तेत सहभागी झाले. पदरी पडलं अन पवित्र झालं अशी स्थिती झालीय. अजितवादी पक्षातल्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याशिवाय सर्व आमदार आपल्यासोबत आहेत असं म्हणत त्यांनी पक्षावर आणि चिन्हावर शिंदेंसेनेसारखा दावा केला. पण पक्षातून फुटण्यासाठी ३६ हून अधिक आमदार सोबत हवेत, मात्र ती संख्या गाठताना अजितवादी दिसत नाहीत. तसं झालं नाहीतर त्यांचं निलंबन होईल. ती संख्या गाठली तरी त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. या नऊ मंत्र्यांची आमदारकी रद्द व्हावी असं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभाध्यक्षांकडे पत्र दिलंय. आमदारांत अस्वस्थता आहे. अजितवादी पक्ष आमदारांना सर्व मार्गानं आपल्याकडं ओढण्याचा प्रयत्न करताहेत. पूर्वी खोक्याची भाषा वापरली गेली आता मात्र धाकदपटशा, मंत्रिपद, महामंडळ याची आमिष दाखविली जाताहेत, तर शरद पवार आपल्या पद्धतीनं त्यांना वळवताहेत. ह्या साऱ्या गदारोळात मुख्यमंत्री आणि महाशक्ती यांचं राज्याच्या प्रश्नांकडं लक्ष नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला आणि त्याच्यामागे चौकशी लावलीय त्यांनाच महाशक्ती गोंजारतेय. विधानसभाध्यक्ष महाशक्तीच्या इशाऱ्याची वाट पहाताहेत. त्यांनी प्रोटोकॉल सोडून देवेंद्रनिवासी सागर गाठला असला तरी शिंदेंसेनेच्या निर्णयानुसार 'थंडाकरके खावो' अशाच भूमिकेमध्ये ते राहतील अशी स्थिती आहे. त्यामुळं सध्या राज्यात अस्तित्वात असलेलं सरकार हे वैध आहे की, अवैध हे स्पष्ट होत नाही. हा केवळ शिंदेसेनेचा वा अजितवादींचा प्रश्न नाही तर राज्याचा, त्याच्या वैधतेचा, लोकशाहीचा प्रश्न आहे. अजितवादींकडं ३६ आमदार जमा झाले नाहीत तर अजितवादी पक्षातल्या नऊ मंत्र्यांना निलंबित व्हावं लागेल. शिंदेंसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाचा निकाल  विधानसभाध्यक्षांना १० ऑगस्टपूर्वी द्यावा लागणार आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा भूकंप होईल. पण तसं होण्याची शक्यता कमीच दिसतेय, याचं कारण अजितवादी पक्षाला जीवदान देण्याची जबाबदारी महाशक्तीची असल्यानं ते हा प्रश्न रेंगाळत ठेवतील. तोपर्यंत राज्याच्या निवडणुका येतील अन सार गुलदस्त्यात राहील.
इकडं शिंदेंसेनेत घालमेल सुरू झालीय. बहुमत असतानाही महाशक्तीनं अजितवादींना सोबत घेतलंय. शिवाय ज्या अजित पवारांवर महाविकास आघाडीत असताना आरोप केले होते की, त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जात नाही, त्यामुळं आम्हाला आमच्या मतदारसंघात विकासाची कामं करता येत नाहीत, मग आम्ही निवडून कसे येणार? म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडतोय असं म्हटलं होतं, त्याच अजित पवारांना महाशक्तीच्या दबाववर अर्थखातं द्यावं लागलंय. आपल्यासोबत आलेल्या शिंदेंसेनेच्या आमदारांना न्याय देता येत नाही. हा सारा प्रकार गळ्यात अडकलेला आवंढा आहे! इथं एका म्यानात जिथं दोन तलवारी बसू शकत नाहीत तिथं तीन तीन तलवारी कशा बसणार? तीनही तलवारी ह्या धारदार आहेत. महाशक्तीच्या देवेंद्राचा एक मोठा दबदबा आहे, ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत शिवाय महाशक्तीच्या वरिष्ठांच्या गळ्यातले कंठमणी आहेत. शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्याकडं अधिकार आलेत, उद्धव ठाकरेंचा मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री होते, दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. आता प्रशासनाचा जबरदस्त अनुभव असलेले अजित पवार सत्तेत आलेत. त्यांनी चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांकडून राजकारणाचे धडे घेतलेत. ते एकटेच सत्तेत आले नाहीत तर छगन भुजबळ, वळसे पाटील यासारख्या दिग्गजांना सोबत घेऊन आलेत. हे सारे शक्तिशाली नेते आहेत. याचं आकलनही तुम्ही करू शकणार नाही! त्यामुळं शिंदेंसेनेची कोंडी झालीय. सत्तेत आधीच निलंबनाची टांगती तलवार आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना दोन आठवड्यात निर्णय घ्यावा यासाठी त्यांना नोटीस नुकतीच जारी केलीय.आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय, यात याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयानं १६ आमदार निलंबित होणारच आहेत केवळ त्याची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळं निलंबनाची कारवाई झाली तर त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ गडगडेल, कायदेशीर तरतुदीनुसार सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळं शिंदेंसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरलीय. ती मंडळी हैराण झालीत. त्यांच्यात गोंधळ उडालाय. आम्ही ४०-४५ जण बाहेर पडून भाजपची सत्ता आणली, पण भाजपनं इथं गोंधळ घातलाय. आम्ही असताना अजितवादींना सोबत घेतलंय. म्हणजे एक असताना त्यांनी दुसरीला घरांत आणलंय! भाजपच्या मेळाव्यात जागा वाटप झालंय, त्यांनी भाजपचे १५२ आमदार निवडून येतील असं म्हटलंय. असं असेल तर मग अजितवादींना सोबत का घेतलंय? असा सवाल शिंदेंसेना विचारतेय. भाजपला केवळ शिंदेंसेनेला वापरायचं आहे अशी भावना त्यांच्यात निर्माण झालीय. लोकसभा, महापालिका त्यातही मुंबई महापालिका भाजपला हवीय त्यामुळं आपल्याला हाती धरलंय असं त्यांना वाटतंय. कारण मुंबई महापालिका ही शिवसेनेकडं आहे. ती खेचून घ्यायचीय. इथं अजितवादींचा काही उपयोग नाही म्हणून आपल्याशी ते गोड बोलताहेत. अशी भावना शिंदेंसेनेच्या आमदारांची झालीय. लोकांच्या भावना तीव्र बनल्या आहेत सरकारच्या विरोधात त्यांची मतं बनत चालली आहेत. लोकभावनेच्या विरोधात जाणं महागात पडणार आहे. लोकांसमोर निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा जावं लागेल तेव्हा खूप मोठ्या अडचणी उभ्या राहतील या विचाराने ते हवालदिल झालेत. त्यामुळं या आमदारांना नाईलाजानं भाजपसोबत जावं लागणार आहे. आपली फरफट होतेय असं वाटत असतानाही शिंदेंनी समजावलं म्हणून ते भाजप सोबत आहेत अन्यथा त्यांची पुन्हा शिवसेनेत परतण्याची तयारी आहे. तसे संकेत शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिलेत. उद्धव ठाकरे हे त्यांना परत पक्षात घेतील की नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण ही मानसिकता सर्व शिंदेंसेनेच्या आमदारांची झालीय अशी चर्चा आहे. याशिवाय त्यांच्यासमोर कोणताच पर्याय राहिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात ते आहेत. शिवाय पक्षावर जो हक्क सांगितलाय त्याविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे तसं झालं अन पक्षाची सूत्रंही गेली तर मग 'तेलही गेलं....!' अशी अवस्था होईल. या विचारानं त्यांना भंडावून सोडलंय  त्यामुळं शिंदेंनी आता पक्षाची, आपल्या समर्थकांची जुळवाजुळव सुरू केलीय. काल ठाण्यात आपल्या बालेकिल्ल्यात आणि आज कोल्हापुरात ते मेळावे घेताहेत. पक्ष चालवणं किती कठीण असतं याचा अनुभव ते सध्या घेताहेत. शिवाय मियर म्हणून पुढं आलेल्या महाशक्ती आपल्याशी कशाप्रकारे वागणूक देतेय याचाही अनुभव ते घेताहेत. पक्षासाठी पैसे, निष्ठावंत कार्यकर्ते लागतात. आज जे त्यांच्या घराभोवती, कार्यालयात गर्दी करताहेत ते त्यांची कामं करून घेण्यासाठी येताहेत. ते अनुयायी होऊ शकत नाहीत. याची जाणीव होऊ लागलीय.

शिंदेसेनेची खरी परीक्षा ही निवडणुकीच्या काळात होणार आहे. त्यांचा कितपत उपयोग आहे याची चाचपणी भाजपनं केली तेव्हा त्यांना फारसा सकारात्मक उत्तरं मिळालेली नाहीत भाजपनं जो सर्व्हे केलाय त्यात ही शिंदेंसेनेची आमदार मंडळी पुन्हा निवडून येण्याची शक्यता त्यांना आढळली नाही भाजपच्या दृष्टीनं त्यांना लोकसभा महत्वाची आहे. भाजपला २०१९ मध्ये शिवसेनेच्या साथीनं ४१ जागा मिळवल्या होत्या. त्यामुळं २०२४ ला पुन्हा तेवढ्याच जागा मिळाव्यात म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. शिंदेंसेनेच्या सोबत घेतलं. बेकायदेशीररित्या पक्ष आणि चिन्ह शिंदेंसेनेला सोपवलं पण एवढं सारं करूनही त्यांना अपेक्षित साथसंगत मिळत नाही असं दिसल्यानं भाजपनं अजितवादींना सोबत घेतलंय. त्यासाठी पक्षतल्या काहींचा विरोधही घेतला. गडकरींसारख्यांनी या प्रकाराला विरोध केला तरी त्यांनी अजितवादीना नाराजीचं सोबत घेतलंय. कारण अजितवादीकडं महाराष्ट्राची सहकार चळवळ आहे. बहुसंख्य आमदारांकडं साखर कारखाने, सूट गिरण्या, मध्यवर्ती बँका, खरेदीविक्री संघ, बाजार समित्या अशा सहकारी संस्था आहेत. त्यामुळं ग्रामीण भागात त्यांचं चांगलं नेटवर्क आहे. मोठा जनाधार आहे  तो पाठीशी आला तर लोकसभेच्या ज्या जागा गेल्यावेळी जिंकल्या होत्या त्या २०२४ ला राखता येईल आणि केंद्रातली सत्ता मिळविण्यासाठी त्याचा मोठा आधार होईल. शिवाय महाराष्ट्रात निवडणुका लढवायच्या असतील तर फडणवीस यांच्यासारख्या अभिजनी चेहरा चालणार नाही त्यासाठी बहुजनी चेहरा हवाय. त्यामुळंही अजित पवारांना गोंजारण्याचा प्रयत्न झालाय. आज त्यांच्याकडं काँग्रेसमधून आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे धुरंधर, प्रभावशाली नेते आहेत. सातवेळा ते आमदार आहेत, मंत्री आहेत पण संपुर्ण राज्यात अजित पवारांचा संपर्क आहे  त्यामुळं जर अजित पवार भाजपमध्ये आले तर विखे पाटील यांच्याप्रमाणेच अजित पवार हे भाजपचा महाराष्ट्रातला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहू शकतो असा राजकीय विश्लेषकांच्या होरा आहे. असाच प्रयोग त्यांनी आसाममध्ये केलाय. ज्यांच्या भ्रष्टाचाराची पुस्तिका काढून वाभाढे काढले होते त्याच हेमंत विश्व सर्मा यांना मुख्यमंत्री बनवलं गेलंय. तशाचप्रकारे जरी अजित पवारांचा विरोधात बैलगाडीभर भ्रष्टाचाराचे पुरावे दिले गेले असले तरी सत्तेसाठी अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यात मागेपुढं पाहिलं जाणार नाही. अशी भाजपची व्यूहरचना दिसून येतंय त्यामुळं भाजपत आलेल्याची गोची झाली आहे. त्यांची अवस्था आगीतून फोफाट्यात अशी झालीय. जणू तोंड दाबून बुक्क्यांचा मार. अशी आयारामांनी अवस्था तर मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था 'सहनही होत नाही अन सांगताही येत नाही.. !' अशी झालीय. देवेंद्राच्या हातात ज्यावेळेपासून पक्षाची सूत्रं आली तेव्हापासून आयारामांच्या संख्येत मोठी वाढ झाली, जणू लाटच आली. त्यामुळं कोण मूळचा भाजप कार्यकर्ता कोण भाजपचं तत्वज्ञान जगणारा, कोण पक्षासाठी मेहनत करणारा, हे सारं आता पक्ष विसरून गेलाय. भाजप आता आयारामांनी गच्च भरलेला पक्ष झालाय. नगरमध्ये विखे पाटलांनी पक्ष आपल्या ताब्यात घेतलाय. सोलापुरात मोहिते पाटलांनी पक्ष काबीज केलाय. कोकणात तर नारायण राणे यांनी जणुकाही आपल्या पिढ्यानपिढ्या भाजपत आहेत अशाप्रकारे वर्तन सुरू केलंय. नव्या मुंबईत गणेश नाईकांच्या हाती पक्ष सोपवलाय. अशी अनेक नेत्यांची नावं घेता येतील. मुंबईत तर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ यांनी पक्ष आपल्याला आंदण दिलाय अशा तऱ्हेनं वागताहेत. ज्या लोकांना भाजपनं विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेऊन प्रवेश दिला ही सगळी मंडळी भाजपच्या जुन्या मंडळींची कशी कशी वाट लावताहेत याची अनेक उदाहरणं देता येतील. महत्वाचा मुद्दा हा आहे की, इतर पक्षातून आलेले जे आयाराम आहेत, हे जुन्या कार्यकर्त्यांसाठी किती बाधक सिद्ध होताहेत. जुन्या कार्यकर्त्यांची किती केविलवाणी परिस्थिती होतेय हा याठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. शिंदेंसेना, अजितवादी या पक्षांना जवळ केल्यानं आगामी निवडणुकीत त्यांना जागा दिल्यावर भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांतल्या कितीजणांना उमेदवारी मिळेल हा ही सतावणारा प्रश्न आहे. फडणवीस आणि अजित पवार या दोन प्रभावशाली आणि ताकदवान नेत्यांच्यामध्ये एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी अडकले आहेत. ते तसे मृदू स्वभावाचे आहेत त्यामुळं त्यांची अवस्था कठीण बनलीय!

शरद पवार आता पुन्हा एकदा पक्ष सावरण्यासाठी सरसावले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून वाटचाल आरंभलीय. जी मंडळी पवारांच्या समोर उभी राहू शकत नव्हती ती आज त्यांच्यावर टीका करताहेत. ज्या प्रफुल्ल पटेलांना पवारांनी घडवलं, लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असतानाही तीन वेळा राज्यसभेवर घेऊन १० वर्षाहून अधिक काळ मंत्रीपदावर ठेवलं होतं, त्याच पटेलांनी पवारांविरोधात सवतासुभा उभा केलाय. अजित पवारांना सोबत घेऊन पक्षात जशी फूट पाडलीय तशीच ती अभेद्य असलेल्या पवार कुटुंबातही त्यांनी उभी फूट पाडलीय. शरद पवारांना कुणाचीही आणि कशाचीही भीती नाहीये. देशात भाजपविरोधात सर्व पक्षांची एकजूट बांधण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना त्यांच्या घरातच महाराष्ट्रात त्यांचा पक्ष सावरता आलेला नाही ही मोठी नामुष्की त्यांच्यावर ओढवलीय, हे शल्य पवारांना खूप मोठं आहे. पवारांनी जी सभा येवल्यात घेतलीय त्याला मोठा प्रतिसाद मिळालाय. ते जिथं जातात तिथं त्यांना लोकांमधून पाठींबा मिळतोय. तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये शरद पवारांची मोठी क्रेझ आहे. आमदार जरी इकडेतिकडे गेले असले तरी कार्यकर्ते, 'लोक माझ्या सांगाती' आहेत हे पवार दाखवून देताहेत. पक्ष पळवून नेण्याला सुरुवात झाली ती शिवसेनेतून. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. ४० आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव आणि आदित्य यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेऊन शिवसैनिक आपल्याच सोबत आहेत हे दाखवून दिलंय. नुकतंच त्यांनी विदर्भाचा दौरा केला. तिथं त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. तिथं त्यांनी फडणवीस यांना महाराष्ट्राचा कलंक म्हटलं त्यावर वातावरण खूप तापलं. पाठोपाठ भिवंडीत भाजपचा मेळावा झाला त्यात शिवसेना, राष्ट्रवादी फोडणं ही कुटनीती आहे अशी त्या कृत्यांची भलामण केलीय. ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. कार्यकर्त्यांना त्याग करायला सांगितलं. पण आगंतुक आणि आयारामांना आपल्याकडची सतरंजी देताना, खुर्ची देताना आपल्याच खस्ता झालेल्या निष्ठावंतांना जमिनीवर आणलंय हे भाजपचे पारंपरिक मतदार कसं विसरणार?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 8 July 2023

'सत्ता'मेव जयते...!

"सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना फुटीवर राज्यपालांचे, नेता निवडीचे, प्रतोद निवडीचे सारे निर्णय चुकीचं ठरवले, मात्र सत्ता फुटीरांच्याच हाती दिली! हा अजब न्याय दिला. तो निर्णयच आता इतरांसाठी 'पथ मार्गदर्शी' ठरलाय. पक्षात फूट पाडून सत्तेसाठी शिंदेगटानं जी पायवाट चोखाळली, त्याच पायवाटेवरूनअजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालवलाय! ही इतिहासाची पुनरावृत्ती ठरतेय. पूर्वी पक्षात फूट व्हायची, फुटीर नवा पक्ष स्थापन करायचे, आता फुटीर पक्षच आपला आहे, चिन्हही आपलंच आहे, असा दावा करून पक्ष बळकवताहेत, सत्ता मिळताहेत! त्यासाठी 'महाशक्ती'चा आशीर्वाद असतोच. 'पुरोगामी महाराष्ट्र' असं म्हणवून घेण्यास लाज वाटावी असं सध्या महाराष्ट्रात घडतंय. बेदिली, फसवणूक, विश्वासघात, बदमाशी, उन्माद, अहंकार, माज यांना ऊत आलाय. राजकारणाचा तर पार चोथा झालाय, चिखल झालाय!"
---------------------------------------

*या* लेखाचा मथळा देतांना 'सत्यमेव जयते' या पवित्र शब्दाचं विडंबन करताना मनाला खूपच वेदना झाल्या. पण त्याशिवाय दुसरा मथळा योग्य वाटतंच नाही! सध्या राज्यात राजकारण्यांचा नंगानाच चाललाय. कसलाही विधिनिषेध राहिलेला नाही. सत्तापिपासूनी कोलांटउड्या मारत सत्ता मिळवली तरी त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यातल्या अनेकांचा मंत्रिपदं मिळवण्याचा हट्ट आहे, पक्षातलं परतीचे दोर कापले गेलेत. शिंदेंसेनेच्या फुटीरांमध्ये चलबिचल सुरू आहे. अजित पवारांच्या फुटीरांमध्ये नव्यांना स्थान मिळालेलं नाही, त्याच जुन्या खोंडांकडं मंत्रिपद दिली गेलीत. त्यामुळं त्यांचा 'अभिमन्यू' झालाय. अनेक कुंपणावर आहेत. त्यांची अवस्था 'कोणता झेंडा घेऊ हाती!' अशी झालीय. त्याचं समाधान करण्यात नेतृत्वाला अपयश येतंय. त्यामुळं सत्तेतली शिंदेंसेना अजितवादी पक्ष यांच्यातल्या अनेकांकडं सत्ता झिरपलीच नाही, त्यामुळं ते सारे अस्वस्थ आहेत. तर १०५ आमदार असतानाही 'महाशक्ती'ला सत्तेत दुय्यम स्थान मिळालंय. कमी संख्या असलेल्यांना गोंजारलं जातंय. यामुळं सारे भाजप अस्वस्थ आहेत. इतर पक्षातून भाजपत आलेल्यांची अवस्था तर आणखीच अवघड झालीय. 'ना घरका ना घाट का!' अशी स्थिती झालीय. न्यायालयाचा निकाल लागूनही सेना फुटीरांबाबत अध्यक्ष निर्णय देत नाही म्हणून उध्दवसेना अस्वस्थ आहे, त्यासाठी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. तर आपण पक्षाचे सर्वेसर्वा असतानाही पक्ष पळवला गेलाय म्हणून राष्ट्रवादी शरद पवारही अस्वस्थ बनलेत. त्यांनी नव्यानं पक्ष उभारणीसाठी कंबर कसलीय. या सगळीकडंच राजकीय अस्वस्थता पसरलीय. सगळ्यांनी नैतिकता कधीच गुंडाळून ठेवलीय, केवळ 'सत्ता' आणि त्यातून मिळणारा 'मत्ता' हेच लक्ष्य असल्यानं राजकारण्यांचा गोंधळ उडालाय! शांत, स्वस्थ आहे तो फक्त काँग्रेस पक्ष! सर्वात कमी आमदार असलेला काँग्रेस पक्ष राज्यात आता दुसऱ्या क्रमांकाचा झालाय! शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटल्यानं आता दोन्ही सभागृहातल्या विरोधीपक्षनेतेपद त्यांच्याकडं येईल! दुसरीकडं राजकारण्यांचं 'कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून' वागणं लोक अनुभवताहेत. नैतिकता, ध्येयधोरणं, तत्व, विचार, मूल्यं हे सारं आता वाऱ्यावर उडून गेलंय. सत्ता आणि मत्ता हे अंतिम लक्ष्य, उद्देश राहिलेलंय. ज्यांना सत्तेत बसायला मतं दिलीत ते विरोधात आहेत अन ज्यांना विरोधात बसण्यासाठी मतं दिली ते सत्तेत आहेत. सत्तातुरांचा 'खो खो' चा खेळ सुरू आहे. कशाचीच, कुणाचीच, कसलीच लाज राहीलेली नाही. सत्तेसाठी मूठभरांचा नग्न स्वार्थ हे राज्यांचं, राष्ट्राचं वा समाजाचं अधिष्ठान असू शकत नाही. राज्यव्यवस्थेच्या मुळाशी किमान काही मूलभूत नैतिक मूल्यांचं अधिष्ठान असावं लागतं. ती नैतिकता, न्याय, विश्वास, सत्य आणि शिव या मूल्यांवर आधारलेली असते. उत्तम समाजाचं ते लक्षण असतं. अशा समाजातच प्रत्येकाला स्वतःचं कल्याण साधण्याची, माणूस म्हणून शांततेनं जगण्याची हमी मिळू शकते. या मूल्यांच्या अभावांसह जे सत्ताकारण चालतं त्यातून निर्माण होतो तो फक्त 'जंगलचा कायदा!'

बळी तो कान पिळी या न्यायानं, बळी मग तो शारिरीक ताकदीनं केलेला असो की सत्तेच्या कवचामुळं, तोच अशा समाजात इतरांचे कान पिळत असतो आणि मग तिथल्या अशा जनतेला जनता म्हणत नाहीत, तर गुलाम म्हणतात! आपल्याकडंच्या सर्वच राजकीय पक्षांची वाटचाल ही असे गुलाम निर्माण करण्याच्या दिशेनंच सुरू आहे, हे इथलं उघडंनागडं वास्तव आहे. इथं जनतेला किंम्मत शुन्य! अर्थात जनता पण तशीच आहे, ती या अशा नेत्यांनाच देव मानते…! राजकारणात कसलीच नैतिकता नसते, साधनसुचिता नसते, असं म्हटलं जातं; पण त्यात असतो तो फक्त संधीसाधूपणा आणि फक्त वैयक्तिक फायद्याचा विचार. गेल्या रविवारी दुपारी असाच सर्वांना अनपेक्षित धक्का बसला, राजकारण्यांना, कार्यकर्त्यांना, महागाईग्रस्त सामान्यांना आणि तमाम पत्रकारांनाही. शनिवारी पुण्यात शरद पवारांचा कार्यक्रम होता. पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या सत्कारासाठी तब्बल चार तास ते उपस्थित होते, पण त्यांना अशा प्रकारची कोणतीही चाहुल लागलेली नव्हती. मात्र इकडं अजित पवार आणि त्यांच्या समर्थक राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून मुंबईत रविवार सकाळपर्यंत पोहोचा असे निरोप देत होते. अजितदादा असं कोणतंही बंड करणार नाहीत. जरी त्यांनी १ जुलैचा अल्टीमेंटम पक्षाला दिला असला तरी ते कोणताही आततायी निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास होता. मात्र दुपारी सगळंच चित्र पालटलं. टीव्हीवर 'अजितदादा शपथविधीसाठी राजभवनाकडं रवाना!' अशा बातम्या झळकू लागल्या. उभ्या महाराष्ट्राला धक्का बसला. कार्यकर्ते अस्वस्थ झाले. शरद पवार देशाच्या राजकारणासाठी  सरसावले असताना त्यांना स्वतःचं घर सांभाळता आलं नाही. स्वतःच्या पक्षाला सावरता आलं नाही. अजितदादांनी त्यांच्या काकाला, पक्षालाही वेठीला धरलं आणि ते आणि त्यांचे सहकारी 'देवेंद्रवासी' झाले! कालपर्यंत शिंदेंसेनेला '५० खोके एकदम ओक्के' अशी टीका करणाऱ्या अजित पवारांनी एकनाथ शिंदेंजवळ शरणागती पत्करली. 'अजितदादा चक्की पिसिंग, चक्की पिसिंग..!' असं जाहीर करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे ते सत्तासाथीदार बनले. असा सत्ताखेळातला व्यवहार हा अनैतिकतेनंच करायचा असतो, त्यात नीतिमूल्यं डोक्याला गुंडाळून ठेवायची असतात, असा एक व्यापक भ्रम सध्या निर्माण झालाय. देशात साध्य, साधन, विवेक सांगणारा एक महात्मा होऊन गेला, हेही विसरलं गेलंय. किंबहुना त्यांची हत्या करणाऱ्यांचं महिमामंडन करण्यात सत्ताधारी मग्न आहेत. इकडं कोण कोणाला फसवून, घाबरवून, पैसे चारून सत्तेच्या तिजोरीवर वेटोळे घालून बसतो, यावरून 'कोण कोणाचा बाप' ठरतो अशी सैद्धांतिक मांडणी राजकारण्यांमध्ये होऊ लागलीय. फसवणूक, विश्वासघात, बदमाशी, उन्माद, अहंकार, माज अशा गोष्टी समाजजीवनात प्रतिष्ठित झाल्यात. त्या आड कोणताही 'इझम' येत नाही, कोणतीही धार्मिक नैतिकता येत नाही. आज संपूर्ण देश एकच राजकीय भूमिका घेऊन जगतोय. ते म्हणजे 'आपल्या नेत्यानं खाल्ली तर श्रावणी आणि दुसऱ्यानं खाल्लं तर शेण...!' आता अनुयायी, समर्थक, भक्त, पाठीराखे म्हणून काम एवढंच उरलंय, की आपल्या नेत्याच्या, पक्षाच्या प्रत्येक कृतीचं समर्थन करणं, त्या कृतींना तात्विक मुलामा देणं. विरोधकांना ट्रोल करणं. पण आज अशी स्थिती निर्माण झालीय की, सदासर्वकाळ अविरत सोशल मीडियावर निंदानालस्ती, ट्रोल करणारे भक्तगण गेले आठवडाभर सोशल मीडियावरून गायब झालेत, ते शांत आहेत. नेमकी काय भूमिका घ्यावी हे त्यांचं त्यांनाच समजतच नाहीये! कालपर्यंत ज्यांच्यावर टीकेची झोड उठवली तेच आता मांडीवर येऊन बसलेत!

'पुरोगामी महाराष्ट्र' असं म्हणवून घेण्यास लाज वाटावी असे प्रकार सध्या महाराष्ट्रात घडताहेत. राजकारणाचा तर पार चोथा झालाय, चिखल झालाय.  जनतेची कामं करायची सोडून राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग आहेत. आता पुतण्यानं भाजपसमोर लोटांगण घालत 'मला काकांपासून वाचवा हो' अशी किंकाळी फोडलीय. यापूर्वी जेव्हा-जेव्हा कठीण प्रसंग आले, भ्रष्टाचाराची प्रकरणं अंगाशी येण्याची शक्यता वाटली तेव्हा अजित पवारांनी 'काका मला वाचवा' अशी हाक मारली होती. काकांनीही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केल्याचं दिसलं होतं. तोवर सगळे ठीक चाललं होतं, पण आता काकांची गत धृतराष्ट्रासारखी झाल्यावर पुतण्याला काकापासून संरक्षण घेण्यासाठी थेट कळप मोडावा लागलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भाकरी फिरवून पक्षाची संघटनात्मक घडी बसवण्याचा प्रयत्न करीत असताना अजित पवार आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. रविवारी राजभवनावर दुपारी अत्यंत घाईघाईनं पार पडलेल्या शपथविधी समारंभात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर अन्य आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री बनण्याची संधी साधलीय. पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना शपथ देऊन शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी चर्चा असतानाच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी शपथ घेतली. या शपथविधीमुळं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं दिसलं. रविवारी सकाळपासून राजकीय घडामोडींना प्रारंभ झाला होता. अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हेही उपस्थित होते. सुप्रिया यांनी अजित पवारांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या आधीचं अजित पवारांचं पहाटेचं बंड फसलं होतं. यावेळची खेळी फसू नये म्हणून अजित पवार विधानसभेतल्या बहुसंख्य आमदारांच्या संपर्कात होते. भाजपसोबत जाण्याचा अजित पवारांचा निर्णय म्हणजे शरद पवारांना मोठं राजकीय आव्हान असल्याचं दिसतंय. सत्तेसाठी अधीर झालेल्या नेत्यांनी हवं तेव्हा हव्या तशा उड्या मारायच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र निष्ठा, विचारसरणी धरून ठेवायची. आपल्या नेत्यांसाठी भावंडांशी वैर घ्यायला मागंपुढं पाहायचं नाही. राज्यातल्या सध्याच्या घडामोडी पाहता अशा हाडाच्या कार्यकर्त्यांनी आरशात पाहायला हवंय आणि जनतेनंही हा खेळखंडोबा आणखी किती दिवस सहन करायचा याचा एकदा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. 'पुरोगामी महाराष्ट्र' म्हणायची आता धास्ती वाटतेय, एवढा खेळखंडोबा आपल्या नेत्यांनी, राज्यकर्त्यांनी पुरोगामीत्व या संकल्पनेचा करून ठेवलाय. आपल्या सोईनुसार भूमिका घेत पुरोगामी या संकल्पनेचा बाजार मांडणाऱ्या नेत्यांमुळं आणि यांचे 'खेळ' बिनबोभाटपणे सहन करणाऱ्या आम्हा जनतेमुळं रविवारी सुरू झालेल्या तमाशाचं फार वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. ही गोष्ट या पलटूराम नेत्यांच्या मागं-पुढं करणाऱ्या, त्यांच्यासाठी मतदारसंघातल्या, तालुक्यातल्या अन् अगदी गावातल्या, घराशेजारी राहणाऱ्या मित्रांशी वैर घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ध्यानी यायला हवी एवढीच काय ती इच्छा. राजकीयदृष्ट्या विचार केला तर अजित पवारांनी यावेळी बंडाचं धाडस दाखवलं आणि भाजपसोबत हातमिळवणी केली तर त्यात बिघडलं कुठं?, असा प्रश्न काहीजण उपस्थित करतील. त्यात काहीच गैर नाही, हेही गोरगरीब जनता, मतदार मान्य करेल, पण मग मतदारांसमोर परस्परांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचं, परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचं नाटक या दोन्ही पक्षानं करू नये, एवढंच जनतेचं मागणं आहे.     
    
शरद पवार कितीही दावा करीत असले तरी अजित पवारांच्या बंडामुळं पक्षाला मोठं खिंडार पडलंय यात शंका नाही. आता आणखी काय उलथापालथी होतील ते लवकरच स्पष्ट होईल. सत्ताप्राप्तीसाठी राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतात. राजकीय नेत्यांच्या शाब्दिक चकमकी आणि एकमेकांवरच्या चिखलफेकीला आता जनता कंटाळलीय. दुर्दैवानं महाराष्ट्रातली जनता नेहमी बघ्याचीच भूमिका घेत असते. रविवारी महाराष्ट्रात जे काही घडलं त्याकडं जनता दिग्मूढ होऊन केवळ बघत राहिलीय. या घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्याला किती ताप होऊन बसलाय, याची कल्पना या नेत्यांना येणार नाही. उद्या एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचारासाठी आल्यावर मतदाराला आधी हे लक्षात घ्यावं लागेल की हे कार्यकर्ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? ते शिवसेनेचे असतील तर कोणत्या शिवसेनेचे आहेत? शिंदेंचे आहेत का ठाकरेंचे, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीत उतरला असेल तर तो कुठल्या राष्ट्रवादीचा उमेदवार आहे हे त्याला कसं कळणार? त्याला सांगावं लागेल की अमूक उमेदवार थोरल्या पवारांचा नसून धाकल्या पवारांचा आहे. आता केवळ काँग्रेसच्या ४५ आमदारांपैकी एखादा गट फुटून सरकारमध्ये सहभागी कधी होणार याची त्याला आस लागलीय. एकदा तसं झालं म्हणजे चायबिस्कुटवाले पत्रकार ही सगळी साहेबांचीच गुगली आहे हे सांगायला मोकळे अन् तिकडं प्रधानमंत्री मोदी-शाह 'सबका साथ सबका विकास' केल्याचा बँडबाजा वाजवायला मोकळे!

राजकीय वैचारिक बांधिलकी, नैतिकता नावाचं जे काही त्यांनी नेसलं होतं, ते आता सुटत चाललं होतं. सत्तेची हाव माणसाला कोणत्या स्तरावर घेऊन जातं याचं प्रदर्शन तीन वर्षांपूर्वी तसंच गेल्यावर्षी आणि आताही उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. इथल्या प्राचीन संस्कृतीचे, परंपरांचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी, अशी संघस्थानावर प्रतिज्ञा  करणारे आज कोणत्या परंपरा जपताहेत? कुणाशी चुंबाचुंबी करताहेत? दुसरीकडं संविधानातल्या सेक्युलरिझम, सर्वधर्म समभाव, इथलं उघडंनागडं वास्तव, त्याचे निघणारे धिंडवडे आपण पाहतो आहोत. गंगा-जमनी तहजीब इथपासून संसदीय लोकशाहीची मूल्यं इथपर्यंतच्या संकल्पनांचा उठता-बसता उदोउदो करणारे लोक या सगळ्याच्या विरोधात असलेल्या शक्तींशी मोहतर लावताहेत. त्यांना मांडीवर घेताहेत. ते आज 'अमितशाही' राजकारणाचं कौतुक करताना दिसताहेत. इथं 'रामराज्य' आणण्याची हिंदुत्ववाद्यांची प्रतिज्ञा आहे. खरंतर रामराज्य म्हणजे नीतीचं, न्यायाचं, लोकहिताशी बद्ध असलेलं राज्य. प्रभू रामचंद्र हा असा सर्व मूल्यं असलेला आदर्श राजा होता. अशा मूल्याधिष्ठित आदर्शासमोर आजकाल हटकून 'रोकड़ा व्यवहारवाद' उभा केला जातोय.

लोकशाहीचं जे एक पवित्र स्वरूप आहे. नेमकं तेच विद्रूप करण्याचे प्रकार देशात आणि राज्यात सुरू आहेत. एकमेकांच्या भूमिका मान्य असलेले, एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुका लढलेले पक्ष नंतर बाजूला झाले तर ते एकवेळ मान्य करण्यासारखं असतं. पण एकमेकांच्या सर्व भूमिकांना तीव्र विरोध करणारे, त्यांच्यावर टीकास्त्र सोडणारे नंतर एकत्र येतात आणि सत्ता स्थापन करू पाहतात वा करतात, हे मात्र सर्वसामान्य मतदारांना पटण्यासारखं नाही. कारण ती लोकांशी, मतदारांशी, आपल्या मूल्यांशी केलेली प्रतारणा ठरते. आणि म्हणूनच निवडणुक निकालानंतरचं कोणतंही 'जोडकाम' हे लोकशाहीचं 'पाडकाम' असतं! अशा जोडकामाचा अभद्र कळस रविवारी दुपारी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कालपर्यंत एकमेकांवर तुटून पडणारे रविवारी राज्यपालांच्या साक्षीनं एकमेकांशी हात मिळवताना दिसले. या अशाप्रकारची राजकीय शय्यासोबत, 'पोलिटिकल पोर्न' पाहावं लागणं ही राज्यातल्या जनतेला, मतदारांना मिळालेली शिक्षाच म्हणावी लागेल. राजकारणात नैतिकतेचा आग्रह आता सर्वांनीच सोडलाय, त्याची ही किंमत आहे. ज्येष्ठ साहित्यिक स्व.विद्याधर गोखले यांनी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना विचारलं होतं, तुम्हाला तीन मुलं. पण यातलं कोणीच राजकारणात कसं नाही? यावर भोसले यांनी उत्तर दिलं, 'राजकारणात जाण्यासाठी तीन गुण अंगी लागतात. ते म्हणजे ‘लठ्ठ’, ‘मठ्ठ’ आणि ‘निगरगट्ट...!’. माझ्या तिन्ही मुलांमध्ये हे तिन्ही गुण नसल्यानं राजकारणात कोणीच नाही!” यात तथ्य किती हे ज्यानं-त्यानं ठरवावं. बॅॅरिस्टर भोसलेंचे शब्द भलेही टोचणारे असतील. पण सर्वसामान्यांवर दादागिरी करणारे, हिंसा करणारे ‘गुंड’ लोकप्रतिनिधी आजुबाजूला नाहीत का? स्वार्थासाठी, लोकहिताचा बळी देणारे ‘षंढ’ लोकप्रतिनिधी जिथं तिथं दिसतातच ना? ज्ञान, भान, भाषा, समज, वर्तन, गुणवत्ता, तारतम्य आणि यातून उभ्या राहणाऱ्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत किती राजकारणात? केवळ राजकारणीच नाही तर सुसंस्कृत, सुसंस्कारित, पार्टी विथ डिफर्न्स म्हणवणारे ही जी घाण करताहेत. त्यानं मतदारांना शिसारी येतेय. 'मत' या शब्दाला आता अर्थच उरलेला नाही. जनतेनंच आता काहीतरी करायला हवंय. गलिच्छ राजकारण, गलिच्छ निवडणुक प्रक्रियेविरूद्ध आता आवाज उठवला नाही तर खरंच देशाची वाताहात होईल!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 1 July 2023

समान नागरी कायदा : एक सांस्कृतिक क्रांती...!

"जनसंघापासून कलम ३७०, राममंदिर आणि समान नागरी कायदा हे भाजपचे मुद्दे. कलम ३७० आणि राममंदिर मार्गी लागलंय. आता 'समान नागरी कायद्या'ला मोदी सरकारनं हात घातलाय. २०१६ मध्ये विधी आयोगानं एक प्रश्नावली तयार केली, मात्र त्यात संशोधन किंवा गांभीर्य नव्हतं. ‘समान नागरी कायदा’ ही काळाची गरज आहे आणि तो महिलांचं स्वातंत्र्य, समता आणि सन्मानाचं संरक्षण करेल. पण सुधारणेच्या नावानं कुणा समुदायाला गुन्हेगारासारखं उभं करता येणार नाही. ‘समान नागरी कायदा’ जितका ‘कायदा’ म्हणून आवश्यक आहे, त्याहून कितीतरी अधिक तो ‘सुधारणेचा कार्यक्रम’, ‘सांस्कृतिक क्रांती’चा अजेंडा आहे. पण सत्ताधाऱ्यांना सुधारणेत रुची नाही. त्यांची बांधीलकी कट्टरपंथी अजेंड्याशी आहे. ‘समान नागरी कायदा’ हा मतांसाठीचा एक जुमला आहे. यातून हवा तसा माहोल ते तयार करू शकतात आणि अल्पसंख्याक समुदायात भयही निर्माण करू शकतात. हाच यांचा मुख्य उद्देश आहे. पण सध्याचे धर्मनिहाय कायदे रद्द करावे लागतील. घटनादुरुस्ती करावी लागेल. बहुसंख्याकांनाही या कायद्यानं अडचणी येणार आहेत. त्यांचीही मतं विचारात घ्यावी लागतील!"
---------------------------------------------------

*लो* कसभा निवडणुकीचे पडघम वाजताच भाजपनं आपल्या पोतडीतून तिसऱ्या मुद्द्याचं हत्यार उपसलंय. ते म्हणजे, समान नागरी कायदा...! स्वातंत्र्यापासूनच समान नागरी कायद्याची चर्चा होतेय. सर्वांसाठी एकच कायदा असायला हवाय, असं घटनाकारांनीही म्हटलंय. जेणेकरून लग्न, घटस्फोट, संपत्तीचे मालक, वारसाहक्क आणि दत्तक घेण्याचे अधिकार, याबाबतचे नियम सगळ्यांना एकच असतील. खरंतर या मुद्द्यांशी प्रत्येक धर्मातले लोक आपापल्या पद्धतीनं लढत असतातच. या गोष्टी खरंतर 'डायरेक्टिव्ह प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी' म्हणजे राज्यांच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ठेवण्यात आल्यात. मात्र, घटनाकारांना वाटत होतं की, समान नागरी कायदा बनवण्याचा प्रयत्न व्हावा. हिंदू, मुस्लीम, खिश्चन, शीख किंवा आणखी कुणी, या सगळ्यांचे वेगवेगळे कायदे आहेत, याचं इंग्रजांना आश्चर्य वाटत असे. त्यामुळं तत्कालीन इंग्रज सरकारनं एखादं प्रकरण संबंधित धर्मांच्या कायद्याच्या आधारेच सोडवायला सुरुवात केली. याच काळात राजा राममोहन रॉय सारख्यांनी हिंदू धर्मात परिवर्तनासाठी प्रयत्न केले. सती प्रथा, बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी चळवळी केल्या. स्वातंत्र्योत्तर पहिल्या सरकारनं 'हिंदू कोड बिल' आणलं. हिंदू धर्मातल्या महिलांना अनिष्ट प्रथांच्या बेड्यांनी बांधलंय, त्या बेड्या हटवण्याचं काम हे बिल करेल, असा दावा करण्यात आला. मात्र, हिंदू कोड बिलाला संसदेत विरोध झाला. नेहरूंचं सरकार केवळ हिंदूंनाच अशा कायद्यात बांधतेय आणि इतर धर्मियांचे अनुयायी आपापल्या चालीरितींनुसार जगू शकतात, असं हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होतं. हिंदू कोड बिल तेव्हा मंजूर झालं नाही. मात्र, १९५२ साली हिंदूंमध्ये लग्नासह इतर गोष्टींसाठी स्वतंत्र विधेयक आणलं गेलं. १९५५ मध्ये हिंदू विवाह कायदा बनवला गेला, यात घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्यासह आंतरजातीय विवाहालाही मान्यता देण्यात आली. मात्र, एकापेक्षा जास्त लग्न करणं अवैध मानलं गेलं. १९५६ साली 'हिंदू वारसाहक्क कायदा', 'हिंदू दत्तक व निर्वाह कायदा' आणि 'हिंदू अज्ञानत्व व पालकत्व कायदा' आणला. हिंदूंसाठी बनलेल्या कोडच्या चौकटीत शीख, बौद्ध आणि जैन धर्मियांनाही आणलं गेलं.

इंग्रजांच्या काळात मुस्लिमांचं लग्न, तलाक आणि वारसाहक्क याचे निर्णय शरीयतनुसार होत असत. ज्या कायद्याद्वारे हे होत असे, त्याला 'मोहम्मडन लॉ' म्हटलं जाई. मोहम्मडन लॉबद्धल फार विस्तृत कुठं लिहिलं नाहीये. पण हिंदू कोड बिलाच्या बरोबरीचं मोहम्मडन लॉ समजलं जाई. १९३७ पासून मोहम्मडन लॉ लागू होता. ही सर्व कायदेशीर व्यवस्था घटनेतल्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराअंतर्गत म्हणजेच अनुच्छेद-२६ अन्वये करण्यात आली. यानुसार सर्व धार्मिक सांप्रदाय आणि पंथांना सार्वजनिक व्यवस्था आणि नैतिकतेशी संबंधित प्रकरणांवर स्वत:च मार्ग काढण्याचं स्वातंत्र्य मिळालं. याला १९८५ साली वळण मिळालं. मध्यप्रदेशातल्या शाहबानोंना त्यांच्या पतीनं तलाक दिला. त्यानंतर शाहबानोंनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. सुप्रीम कोर्टानं शाहबानोंच्या पतीला आदेश दिला की, शाहबानोंना आजीवन पोटगी द्यावी. शाहबानो प्रकरणावरून गोंधळ झाला. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी सरकारनं संसदेत 'मुस्लीम वुमन प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑफ डिव्होर्स अॅक्ट' मंजूर केला. यामुळं सुप्रीम कोर्टानं शाहबानोंच्या प्रकरणात दिलेला आदेश रद्द केला. पोटगीची मुदत तलाकनंतर ९० दिवसांपर्यंतच मर्यादित केली. यासोबत 'सिव्हिल मॅरेज अॅक्ट'ही आला, जो देशातल्या सर्वांना लागू होतो. या कायद्यानुसार मुस्लिमही कोर्टात लग्न करू शकतात. एकापेक्षा जास्त लग्न करण्याला या कायद्यानं बंधनं घातली. शिवाय, या कायद्यान्वये लग्न करणाऱ्यांना वारसाहक्क कायद्याच्या अंतर्गत आणलं आणि घटस्फोटानंतरची पोटगीही सर्व धर्मीयांसाठी एकसारखीच ठेवण्यात आली. जगातल्या २२ इस्लामिक देशांनी तिहेरी तलाकची प्रथा पूर्णपणे रद्द केलीय. पाकिस्तानातल्या तिहेरी तलाक प्रथेत बदल करण्याची प्रक्रिया तत्कालीन प्रधानमंत्र्यांमुळंच सुरू झाली. १९५५ साली पाकिस्तानचे प्रधानमंत्री मोहम्मद अली बोगरा यांनी पत्नी असूनही, वैयक्तिक सचिव असलेल्या महिलेशी लग्न केलं. या लग्नाला विरोध झाला. त्यानंतर सरकारनं सात सदस्यीय आयोगाची स्थापना केली. पाकिस्तानातल्या आताच्या नियमांनुसार, पहिल्यांदा तलाक बोलल्यावर संबंधित व्यक्तीनं युनियन काऊन्सिलच्या अध्यक्षांना नोटीस देणं अनिवार्य आहे. त्याची एक प्रत पत्नीला देणंही बंधनकारक आहे. हे नियम मोडल्यास पाकिस्तानात एका वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपयाचा दंड आहे. भारतात मोठ्या वाद-विवादानंतर तिहेरी तलाक विरोधात कायदा बनवण्यात यश मिळालं.

२०१६ सालीही विधी आयोगानं समान नागरी कायद्यावर लोकांची मतं मागवली होती. त्यासाठीची प्रश्नावली वर्तमानपत्रांत प्रकाशित केली होती. या प्रश्नावलीत एकूण १६ मुद्द्यांवर मतं मागवण्यात आली. विवाह, घटस्फोट, दत्तक, पालकत्व, पोटगी, वारसाहक्क आणि वारसा या मुद्द्यांशी संबंधित प्रश्न यातून विचारले होते. असा एखादा कायदा बनवला जावा, ज्यातून समानता प्रस्थापित होईलच, सोबत देशाची विविधताही जोपासली जाईल. समान नागरी कायदा 'ऑप्शनल' म्हणजे 'पर्यायी' असायला हवा का? बहुपत्नीत्व, बहुपतीत्व, 'मैत्री करार' सारख्या प्रथांबाबतही मतं मागवली होती. या प्रथांना कायद्याची मान्यता नाही. समाजमान्यतेनं या प्रथा सुरू आहेत. गुजरातमध्ये मैत्री कराराला कायदेशीर मान्यता आहे. या करारावर मॅजिस्ट्रेटची स्वाक्षरी असते. अशा प्रथा पूर्णपणे संपवल्या पाहिजेत वा, कायद्याद्वारे नियंत्रित केल्या पाहिजेत, असा प्रश्न विधी आयोगानं विचारला होता. आलेल्या सूचना, मतांच्या आधारे विधी आयोगानं सरकारला अहवाल सादर केला. मात्र, त्या अहवालाचं पुढं काय झालं, याबद्धल काहीच माहिती नाही. मात्र, असं वाटतं की, ज्याप्रकारे तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्यात आला. तसाच समान नागरी कायद्यासाठीही कायदा येऊ शकतो. आता पुन्हा नव्यानं विधी आयोगानं सूचना मागवल्यात पण त्यात स्पष्टता नाही.

*बहुपत्नी* - १८६० साली भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ आणि कलम ४९५ अन्वये ख्रिश्चन धर्मानं बहुपत्नीत्व बंद केलं. १९५५ साली हिंदू विवाह कायद्यानुसार, ज्याची पत्नी जिवंत आहे, त्याला दुसऱ्या लग्नासाठी मनाई करण्यात आली. १९५६ साली या कायद्याला गोवा वगळता सर्वत्र लागू करण्यात आलं. मुस्लिमांना चार लग्न करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. कारण त्यांच्यासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड होतं. मात्र, हिंदूंमध्ये बहुपत्नीत्वाचा मुद्दा कायमच वादात राहिलाय. सिव्हिल मॅरेज अॅक्टनुसार केलेल्या लग्नांसाठी बहुपत्नीत्व हे बेकायदेशीर आहे. *बहुपती* - बहुपती प्रथा खरंतर पूर्णपणे संपलीय. मात्र, काही भागातून या प्रथेच्या बातम्या येत राहतात. हिमाचल प्रदेशातल्या किन्नौरमध्ये ही प्रथा होती. हा भाग तिबेटजवळ भारत-चीन सीमेवरचा आहे. याच भागात महाभारताच्या काळात पांडवांचा पराभव झाल्याचं काही लोक मानतात. त्यामुळंच इथं बहुपती प्रथा होती, असंही म्हटलं जातं. शिवाय, दक्षिण भारतातल्या मलबारच्या इज्हावास, केरळमधलं त्रावणकोरच्या नायरो आणि निलगिरीच्या टोडास जमातींमध्येही ही प्रथा आढळत असे. मात्र आज तसं दिसत नाही. *मुत्तह निकाह* - इराणमध्ये जिथं मुस्लिमांमधले शिया पंथीय राहत असत, तिथं ही प्रथा प्रचलित होती. स्त्री आणि पुरुषात विशिष्ट कालावधीसाठीचा एक करार केला जातो. म्हणजे, अगदी दोन किंवा तीन महिन्यांचा. तेवढ्याच कालावधीत ते एकत्र राहतात. इराणमध्ये ही प्रथा आता संपुष्टात येऊ लागलीय. भारतातल्या शिया समूहात ही प्रथा जवळपास नाहीच. *चिन्ना विडू* - चिन्न विडूचा संबंध दुसऱ्या लग्नाशी आहे तामिळनाडूत या प्रथेला एकेकाळी समाजमान्यता होती. एका राजकीय नेत्यानंही एक पत्नी असताना, दुसरं लग्न केलं होतं. या प्रथेला आता तामिळनाडूत वाईट प्रथा म्हणून पाहिलं जातं. ही प्रथाही जवळपास संपल्यात जमा आहे. *मैत्री करार* - या प्रथेला गुजरातमधल्या स्थानिक समाजात मान्यताही होती. कारण या करारावर मॅजिस्ट्रेट स्वाक्षरी करतो. यात पुरुष नेहमीच विवाहित असतो. मैत्री करार म्हणजे दोन प्रौढ व्यक्तींमधला करार असतो. मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत लिखित स्वरूपात हा करार केला जातो. पुरुष आणि स्त्री यात  'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये असतात. गुजरातमधले अनेक दिग्गज लोक अशा नात्यात राहिलेत. अशा कराराचा दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवण्याला सामाजिक मान्यतेसाठी ढाल म्हणून वापर केला जातो.
इस्लामिक कायदे काळानुसार बदलत नाहीत, हे खरंय. अनेक पुरोगामी लोकांना वाटतं की, आता काळानुसार बदलायला हवं.  हिंदू समाजानं अनेक समाजसुधारणांचे कालखंड पाहिलेत. त्यामुळं काळानुसार अनेक प्रथा संपल्यात. मात्र, मुस्लीम समाजात सामाजिक स्तरावर सुधारणांचं काम झालं नाही! समान नागरी कायदा लागू झाल्यास, सर्व समाजातल्या पितृसत्ताक परंपरेला बळी पडलेल्या महिलांना लाभ होईल, भारतीय दंड संहिता आणि सीआरपीसी सर्वांसाठी लागू होतात. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा असायला हवा, जो सर्वांना लागू असेल. मग हिंदू, मुस्लीम वा इतर कुठल्याही धर्माचा असो. १९३७ साली मुस्लीम पर्सनल लॉमध्ये सुधारणा झाल्या. मात्र, त्या कायद्याला तेव्हा विरोध झाला. परिणामी त्याला अनुच्छेद ४४ मध्ये ठेवण्यात आलं. मात्र, हे शक्य आहे. कारण आपल्याकडं गोव्याचं उदाहरण आहे, जिथं समान नागरी कायदा लागू आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेत्याच्या मते, 'भारत विविधतेनं नटलेला देश आहे. इथं वेगवेगळ्या प्रथा आहेत. समान नागरी कायद्यावर केवळ राजकारण होईल. यातून कुणाचंच भलं होणार नाही! प्रत्येक धर्मीय आपापल्या संस्कृती आणि परंपरांनुसार जगण्यास स्वतंत्र आहे!' ख्रिश्चन सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की, 'महिलांना सशक्त करणाऱ्या आणि लहान मुलांचं भविष्य उज्वल असणाऱ्या प्रत्येक कायद्याचं समर्थन करतो. मात्र, समान नागरी कायद्याचं स्वरूप बहुसंख्यांकवादी असेल आणि इतर सर्वांवर ते थोपवलं जाईल! जर सरकारला समान नागरी कायदा आणायचा असेल, तर त्यात सर्व धर्मियांच्या परंपरा आणि संस्कृतींना सोबत घेऊन जाण्याचं वचन असावं. कारण भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता आहे, हिंदू धर्मातही अनेक प्रचलित प्रथा आहेत, ज्यांना सरकार अवैध घोषित करण्याचं धारिष्ट्य दाखवणार नाही. उदाहरणादाखल सांगायचं तर, दक्षिण भारतात सख्ख्या भाचीसोबत सख्खा मामा लग्न करू शकतो, सरकार अशा प्रथांवर बंदी आणेल का? जाट, गुज्जर वा इतर समाजातल्या प्रथांना सरकार संपवेल का? मला नाही वाटत, हे इतकं सहजपणे होईल!' आता सरकार काय करतंय याकडं  लक्ष आहे. कारण यापूर्वीही न्यायालयानं असा निर्देश दिला होता पण सरकारनं तो मानला नाही. आता भाजपच्या अजेंड्यातला हा विषय असल्यानं तो मार्गी लागेल असं दिसतंय!

आपल्या अठरापगड धर्म, जाती, प्रजातींचा कसलाही अंदाज नसलेल्या वर्गाला या समान नागरी कायद्याचं कायमच आकर्षण राहिलंय. एकदा का समान नागरी कायदा आला की, आपल्या सर्व सामाजिक समस्या सुटणार असा समज आहे. सध्याच्या ‘समान नागरी कायदा’ची आवश्यकता एकाच कारणासाठी आहे, ती म्हणजे ‘त्यांच्यातलं’ बहुभार्या प्रथा रोखणं! समान नागरी कायदा नसल्यामुळं मुसलमानांना अनेक ‘बायका’ करता येतात. यात आणखी एक गैरसमज दिसतो, तो या कायद्याच्या अभावामुळं ‘त्यांची’ वाढत चाललेली लोकसंख्या! वास्तविक याला कोणताही शास्त्रीय, संख्यात्मक आधार नाही. उलट उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांत हिंदूंच्यातच वाढ होत असल्याचं सरकारची पाहणी दर्शवते. पण समान नागरी कायद्याभोवतीची कल्पना काही आकसताना दिसत नाही. या कायद्याला हिंदूंतल्या मोठ्यावर्गाचाच विरोध असू शकतो, हे लक्षांत येत नाही! समान नागरी कायद्याचा आग्रह धरणाऱ्यांच्या समोर आक्षेपासाठी उदाहरण असतं ते मुस्लीम शरियाचं. तो एकदा का गेला की मुसलमानांना चार बायका करता येणार नाहीत, हा या मंडळींचा समज! कालबाह्य ठरतील असे अनेक मुद्दे या शरियात आहेत. धर्माच्या संकल्पनेत कालसुसंगत बदल करणं थांबलं की धार्मिक कायदे कालबाह्य होतातच. पण याच शरियानुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीत मुलांइतकाच वाटा दिला जाणं. अन्य धर्मीयांतल्या मुलींना हा अधिकार मिळावा यासाठी कायद्यात बदल करावा लागला. समान नागरी कायदा प्रत्यक्षात आकाराला आला तर केवळ शरिया या इस्लामी धार्मिक कायद्याचं अस्तित्व नाहीसं होईल असं नाही. ‘हिंदू मॅरेज अ‍ॅक्ट’सह पारसी विवाह कायदा, ख्रिश्चन विवाह कायदा इतकंच काय पण ‘हिंदू अविभक्त कुटुंब कायदा’ही रद्द करावा लागेल. भारतीय घटनेनं हिंदू, पारसी, इस्लामी आणि यहुदी धर्मीयांच्या स्वतंत्र कायद्यांला मान्यता दिलेली आहे आणि हे सर्व धर्मकायदे न्यायालयात ग्राह्य धरलेत. याचा अर्थ समान नागरी कायदा आणण्याआधी ही विविध धार्मिक कायद्यांना दिलेली मान्यता काढून घ्यावी लागेल आणि त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. वास्तविक विविध धार्मिक कायद्यांना दूर ठेवण्यासाठी सर्व धर्मीयांना ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’चा आधार घेण्याची उत्तम सोय आताही आहे. समान नागरी कायदा आल्यास हा कायदाही नामशेष होईल. हे झालं अन्य धर्मीयांचं! पण समान नागरी कायद्याला खरा विरोध हा हिंदूंकडूनच होऊ शकतो. याचं कारण, सद्य:स्थितीत फक्त हिंदूंनाच उपलब्ध असलेली अविभक्त कुटुंब म्हणवून घेण्याची आणि त्याद्वारे उत्पन्न आणि कमी कर आकारण्याची सोय! हिंदू, शीख, जैन यांना हा ‘हिंदू अविभक्त कुटुंब’ म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. ‘हिंदू अविभक्त कुटुंब’ ही स्वतंत्र, करपात्र वैध अस्तित्व-लीगल एन्टिटी मानली जाते, त्यासाठी स्वतंत्र ‘पॅन’ कार्डही दिलं जातं. त्यानंतर अशा हिंदू अविभक्त कुटुंबाला करपात्र उत्पन्नातून वजावटींचा आधार घेता येतो. या अशा अविभक्त कुटुंबातल्या सर्वांना समान अधिकार मिळतात आणि समान करसवलती उपभोगू शकतात. हा मुद्दा नमूद केला याचं कारण एकदा का ‘समान नागरी कायदा’ आला की हिंदू धर्मीय धनाढ्यांना ही अविभक्त कुटुंबाची सोय राहणार नाही. केवळ धार्मिक द्वेषापोटी ‘समान नागरी कायदा’ रेटणाऱ्या मंडळींनी खरं तर किती हिंदू ‘अविभक्त कुटुंब’ म्हणवून घेतात याचाही अभ्यास केल्यास ज्ञानात भर पडेल. याचा अर्थ समान नागरी कायद्याची गरज नाही, असं अजिबात नाही. सर्व धर्मीयांना सामावून घेणारा आधुनिक समान नागरी कायदा ही काळाची गरज आहे हे निश्चित. तथापि मुसलमानांना चार बायका करता येतात आणि त्यामुळं त्यांची जनसंख्या वाढते या खुळचट अंधश्रद्धेपोटी समान नागरी कायद्याचं तुणतुणं वाजवणं अयोग्य. खरं तर स्वत:च्या आसपासचे मुसलमान शोधून त्यातल्या किती जणांना बहुभार्या आहेत याचाही शोध घ्यावा. राहता राहिला मुद्दा मुसलमानांची लोकसंख्या वाढणार याचा! अर्थशास्त्र आणि लोकसंख्याशास्त्र स्पष्टपणे दाखवून देतं की, अधिक मुलं होण्याचा थेट संबंध हा गरिबीशी आहे.धर्माशी नाही. तेव्हा प्रयत्न हवेत ते गरिबी निर्मूलनाचं! अधिकाधिक संपत्तिनिर्मिती आणि त्याची संधी हेच या समस्येचं उत्तर आहे. या संधीअभावी काही धर्मीयांना वा जातीना कोंडाळं करून राहावं लागतं. ‘समान नागरी कायदा’ हे या सर्वावरचं उत्तर असं काहींना वाटतं. तेव्हा एकदाच हा विषय संपवून टाकू या...!
- हरीश केंची
९४२२३१०६०९

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...