Thursday, 15 May 2025

सार्वजनिक काका: चारुदत्त सरपोतदार

पांढरा पायजमा..., भगवा शर्ट..., शर्टच्या कॉलरभोवती गुंडाळलेला रूमाल... पायात चपला..., गोरापान वर्ण..., भव्य कपाळ..., डोक्यावर विरळ झालेले केस..., छोटंस टक्कल..., पांढरट ठुबकेदार मिशा..., इकडं तिकडं न पाहता झरझर चालण्याची लकब... धनकवडीतल्या कलानगर मधल्या घरापासून थेट लक्ष्मीरोडपर्यंतच्या त्यांच्या 'पुना गेस्ट हाऊस'पर्यंत चालत येणारी ती व्यक्ती ही पुणेकरांसाठी श्रद्धेचं स्थान होतं. नव्यापिढीतले 'सार्वजनिक काका' अशी ओळख असलेले चारुदत्त सरपोतदार उर्फ चारुकाका यांचा १५ मे १९३५ हा जन्मदिवस...! चारुदत्त सरपोतदार हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी अन् उत्साही व्यक्तिमत्त्व. आज नव्वदहून अधिक वर्षाहून अधिक काळ ‘पूना गेस्ट हाऊस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारुदत्त सरपोतदार हे आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. गेल्या तीन पिढ्यांतले नाट्य-चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी ‘पुण्यातला घरचा हक्काचा माणूस...!’ असलेले चारूकाका अनेकांसाठी त्यांच्या आयुष्याचा आधारस्तंभ होते. विविध स्तरांतली हजारो माणसं ‘पूना गेस्ट हाऊस’शी जोडली गेलीत. त्यांच्याशी जोडली गेलेली माणसं हेच त्यांचं सर्वांत मोठं भांडवल होतं. सरपोतदार कुटुंब हे मूळचे रत्नागिरीजवळच्या नांदिवली - अंजणारी गावचे! या गावात तेव्हा फक्त आणि फक्त सरपोतदार या आडनावाची, भावकीचीच माणसं राहत. यातले चारुकाकांचे वडिल नानासाहेब सरपोतदार हे आपल्या कलेवरच्या प्रेमापोटी १९३५ साली पुण्यात आले. त्यांनी जुन्या पेशवे पार्कशेजारी मूकपट निर्मितीसाठी ‘आर्यन फिल्म स्टुडिओ’ सुरू केला. या चित्रपटांचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक अशा सर्व जबाबदाऱ्या ते स्वत: सांभाळत. त्यांनी पन्नासहून अधिक मूकपटांची निर्मिती केली. त्यातला ‘महाराचे पोर’ हा मूकपट त्याकाळी तब्बल २५ आठवडे चालला. बहुजन समाजाविषयी बनविला गेलेला हा पहिलाच चित्रपट! पण या सगळ्या चित्रपट उद्योगाचा उपजीविकेसाठी साधन म्हणून फारसा उपयोग होईल, असं त्यांना वाटेना. त्यामुळं कोल्हापुरात खानावळ चालविणाऱ्या सरस्वतीबाई या आपल्या बहिणीच्या मदतीनं त्यांनी पुण्यात हा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. त्यातून ‘पूना गेस्ट हाऊस’ची पायाभरणी झाली. त्यावेळी आधुनिकतेची कास धरल्याचं प्रतीक म्हणून ‘पूना रिफ्रेशमेंट हाऊस...’ हे उपाहारगृह आणि निवासाची व्यवस्था असलेलं ‘पूना गेस्ट हाऊस...’ ही दोन्ही नावं इंग्रजीमध्ये दिली गेली. पुढे त्यांचे मोठे चिरंजीव बंडोपंत सरपोतदारांनी हा व्यवसाय खऱ्या अर्थानं जोपासला, वाढवला. नानासाहेबांनी पुण्यात जेवणासाठी पहिल्यांदाच स्टीलच्या थाळीचा वापर केला. सरस्वतीबाईंनी मग इथं मुलींचं पहिलं वसतिगृह सुरू केलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बंडोपंतांनी माथेरानमध्ये ‘पूना गेस्ट हाऊस’ सुरू केलं. त्याकाळात उद्योगपती गरवारे, किर्लोस्कर या मित्रमंडळींची त्यांना मोठी मदत झाली. पुण्यात त्यावेळी मास्टर विठ्ठल, मास्टर विनायक, पृथ्वीराज कपूर, बालगंधर्व, भालजी पेंढारकर आदी चित्रपट क्षेत्रातली दिग्गज मंडळी सरपोतदारांकडे मुक्कामाला असत. पुढे यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ आणि ग. दि. माडगूळकर यांनी आग्रहानं बंडोपंतांना दिल्लीला नेलं आणि ‘पूना गेस्ट हाऊस’ची ध्वजा दिल्लीमध्येही फडकली. ते दिल्लीतल्या मराठी माणसांसाठी जणू सांस्कृतिक केंद्रच बनलं. त्यांनी तिथं ‘दिल्ली दरबार’ हे मुखपत्र सुरू केलं. ‘पूना गेस्ट हाऊस’ सुमारे साठ वर्षं, तर दिल्ली विधानसभेचं कँटीन बंडोपंतांनी २५ वर्षं चालवलं. या दरम्यान चारूकाकांचं भोसला मिलिटरी स्कूलमधलं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांनी पुण्यात येऊन आजीबरोबर व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. त्यांची बहीण उषा ही तेव्हा अनेक मराठी नाटकांमधून भूमिका करत होती. पुढे त्या राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्थेच्या ‘एनएसडी’च्या संचालिका झाल्या. विवाहानंतरच्या त्या उषा सरपोतदारच्या उषा बॅनर्जी बनल्या. बंडोपंतांसह विश्वास, गजानन आणि चारूकाका या सगळ्या भावंडांची पहिली आवड चित्रपट हीच होती. बंडोपंतांचं ‘ताई तेलीण’ या चित्रपटामुळं मोठं नुकसान झालं. ‘घर गंगेच्या काठी’, ‘जावई माझा भला’ हे त्यांनी काढलेले चित्रपट विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले; पण निर्माते आणि वितरक म्हणून सर्वांत यशस्वी ठरले ते विश्वास सरपोतदार. त्यांच्या ‘हीच खरी दौलत’, ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यांची या क्षेत्रात घोडदौड सुरू राहिली. मात्र चारुकाकांनी ‘पूना गेस्ट हाऊस’वर लक्ष केंद्रित केलं. त्यावेळी कोणत्याही कारणास्तव पुण्यात येणाऱ्या नाट्य-चित्रपट कलावंतांसाठी ‘पूना गेस्ट हाऊस’ हे वास्तव्याचं एकमेव ठिकाण होतं. या कलावंतांना तिथं घरचं प्रेम मिळालं. येणाऱ्या प्रत्येक कलावंताची आवडनिवड चारूकाका आणि आजींच्या लक्षात असायची. ज्याला जे हवं, जे आवडतं, ते न मागता अनपेक्षितरीत्या समोर आलं, की मंडळी खूश होऊन जायची. डॉ. काशिनाथ घाणेकरांना प्रयोग संपवून रात्री आलं, की झोपण्यापूर्वी दूधभात लागायचा. ते ‘गेस्ट हाऊस’वर यायच्या वेळी आजीचा गरम गरम मऊ भात तयार असायचा. अशा येणाऱ्या कलावंतांच्या आवडीनिवडी या मायलेकांना ठाऊक असायच्या आणि त्या न चुकता पुरविल्या जायच्या; पण हे सगळं फक्त कलावंतांसाठीच होतं असं नाही. चारुकाकांनी अनेक मराठी कलावंतांना, बॅकस्टेज आर्टिस्टना कुठेही चर्चा, वाच्यता होऊ न देता त्यांना त्यांच्या अखेरपर्यंत मदत केलीय. अनेकांचा सांभाळ केला. त्यांचं फक्त जेवणच नाहीतर त्यांचं पथ्य, औषधपाणी देखील पाहिलं. थकलेल्या असहाय, एकट्या ज्येष्ठ कलावंतांना त्यांनी सकाळ संध्याकाळ जेवणाचे डबे पुरवलेत. हे केलं ते सारं अगदी मनापासून कृतार्थ भावनेनं! अशा अनेक कलावंतांची नावं सांगता येईल, ज्यांना चारुकाकांनी मदत केली, पण तसं करणं हे चारुकाकांच्या उदात्त कार्याचा उपमर्द केल्यासारखं होईल. सर्वसामान्य माणसाबद्दलही चारूकाकांना हीच आत्मीयता होती. ‘पानशेतचा प्रलय' झाला तेव्हा पुण्याची सगळीच दुर्दशा झाली होती. चारूकाकांनी महिनाभर पुणेकरांसाठी तेव्हा मोफत अन्नछत्र चालवलं. चिनी युद्धानंतर तांदळाचा तुटवडा होता. फार थोडे तांदूळ रेशनवर मिळायचे. त्यावेळी मर्यादित थाळीची ‘राइस प्लेट’ची पद्धत प्रथम ‘पूना गेस्ट हाऊस’मध्ये सुरू झाली. मासिक पासधारक मंडळी होतीच. ‘सरस्वती मूव्हीटोन’, ‘प्रभात’च्या चित्रपटांच्या शूटिंगनिमित्तानं येणारी कलावंत मंडळीही होती; पण चारूकाकांचा एक दंडक होता. कुणीही कलाकार मंडळी कितीही दिवस राहिली, जेवली, तरी त्यांना पैशाबद्दल काहीही विचारायचं नाही. ही मंडळी त्यांच्या उत्पन्नानुसार जे देतील, ते गोड मानून घ्यायचं. चारूकाकांच्या या स्वभावामुळे अनेक मंडळी ‘पूना गेस्ट हाऊस’शी जोडली गेली.  ती घरातली होऊन गेली. चारुकाकांची आई या सगळ्यांचीच आई होऊन गेली...!'  चारूकाकांच्या आत्मीयतेविषयीचा एक प्रसंग आवर्जून सांगण्याजोगा आहे. पानशेतचा प्रलय झाला तेव्हा अभिनेत्री सुलोचनाबाई पुण्यात होत्या. त्यांना मुंबईला जायचं होतं; पण सगळे रस्ते बंद होते. आता काय करावं, ते न सुचून त्या ‘पूना गेस्ट हाऊस’वर आल्या. त्यांचा मुंबईला परतायचा विचार ऐकून अस्वस्थ झालेले चारूकाका अक्षरश: त्यांच्या अंगावर ओरडले, ‘कुणीही कुठंही जायचं नाही इथून, निमूटपणे राहा इथं सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत...!’ सुलोचनाबाईंना चारूकाकांच्या मनातली काळजी, प्रेम, जिव्हाळा सारं काही त्या स्वरातून समजलं नि तेव्हापासून चारूकाका त्यांचे भाऊ होऊन गेले! सार्वजनिक जीवनातही चारूकाकांनी फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. अनेक नवनव्या गोष्टी केल्या; पण प्रसिद्धी अन् लौकिकाची कसलीही अपेक्षा न ठेवता. पुणे महापालिका होण्याआधी पुण्यातल्या खानावळी, ‘अमृततुल्य’चे मालक, चहाची छोटी गाडी चालवणारे विक्रेते या सर्वांचा मिळून ‘खाद्य-पेय विक्रेते संघ’ त्यांनी स्थापन केला. ४८ वर्षं ते त्याचे अध्यक्ष होते. अनाथ मुलांसाठी ससून परिसरात सुरू असलेली ‘श्रीवत्स’ ही पहिली संस्था स्थापन झाली ती चारूकाकांच्या पुढाकारानं! चित्रपट क्षेत्रातल्या मंडळींचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असावं म्हणून 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'ची स्थापना करण्यामध्ये सुधीर फडके, विनायकराव सरस्वते यांच्याबरोबर मोठा सहभाग होता तो चारूकाकांचाच! मराठी कलावंतांचा पहिला सामूहिक परदेश दौरा त्यांनीच घडवून आणला. या कलावंतांची सामूहिक वसाहत असावी, त्यासाठी त्यांना सुलभ हप्त्यानं कर्ज उपलब्ध व्हावं, ही कल्पनाही त्यांचीच! त्यातूनच पुण्यात सातारा रस्त्यावर धनकवडीत ‘कलानगर’ वसवलं गेलं. त्याचं भूमिपूजन सी. रामचंद्र यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पुणे विद्यापीठाचं आणि रिझर्व्ह बँक ट्रेनिंग कॉलेजचं कँटीन कितीतरी वर्षं चारूकाका चालवत होते. कऱ्हाडे ब्राह्मण महासंघ, हिंदू महासभा यांचंही कामकाज ते पाहात होते; पण ही सगळी कामं करताना येणाऱ्या पैशाला कधी पाय फुटायचे ते कळायचंही नाही. त्याची झळ संसाराला बसू नये म्हणून त्यांच्या पत्नी चारूशीलाताई प्रभात रोडवर मेस चालवत. दीडशे लोक रोज जेवायला असायचे. घरी पेइंग गेस्ट ठेवले होते. ते उत्पन्न चरितार्थासाठी उपयोगी पडायचं. चारूकाकांचे चिरंजीव किशोर सरपोतदार आणि त्यांच्या बंधूंनी आजही त्यांची परंपरा आणि नीतिमूल्यं कायम ठेवून, त्यांनी घालून दिलेले काही पायंडे जपत वाटचाल सुरू ठेवलीय....!’  चारूकाकांची समाजाभिमुखता, कलाप्रेम, बांधिलकी, अगत्य या साऱ्याचाच वारसा नवनव्या गोष्टी करण्याचा, आव्हानं स्वीकारण्याचा चारूकाकांचा वारसाही त्यांच्या दोन्ही मुलांनी आत्मसात केलाय. चारुदत्त सरपोतदार यांचं १९ जानेवारी २०१८ रोजी निधन झालं. त्यांच्या जन्मदिनी ही श्रद्धा अन् भावनांची ओंजळ...!

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...