"दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी झालीय. त्यावर कुणाचाच ताबा राहिलेला नाही. विलीकरण झालं असतं तर थोरल्या पवारांचं वर्चस्व पुन्हा निर्माण झालं असतं. ते नको म्हणून पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांनी घाई केली. थोरल्या पवारांच्या पक्षाची यातून अगतिकता दिसून आली. ज्यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं. ते सारे नॉन मराठा आहेत. राष्ट्रवादी ही मराठा नेत्यांचा पक्ष समजला जातो. मग खेळी सुरू झाली. मराठा आमदारांना गोंजारणं, रोहित पवारांनी अजित पवारांचा घात की अपघात म्हणत तपासासाठी राळ उठवली. आपणच दादांची जागा चालवू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला. इकडे सुनेत्रा आणि पार्थ पवार गप्प आहेत. पक्षांतर्गत राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पण थोड्याच दिवसात दिसून येईल की, राष्ट्रवादी काँग्रेसची गरज महाराष्ट्राला आहे की, नाही? तोवर वाट पाहावी लागेल!"
..............................................
राष्ट्रवादीतली विलीनीकरणाची चर्चा थांबलेली दिसते. थोरल्या पवारांचे नेते सत्तेशिवाय हवालदिल झालेत. पण ज्यांच्या हाती अजित पवारांच्या पक्षाची सूत्रं आहेत त्यांनी विलिनीकरणाला खो घातलाय. भाजपला आणि अजित पवार यांच्या पक्षातील सत्तेच्या लाभातील मंडळींना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नये असे वाटतंय. उलट एकत्रीकरण व्हावे असे शरद पवार यांच्या गटाला आता तीव्रतेने वाटत असावं. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने ज्या पद्धतीने जाहिराती दिल्या त्यानंतरच अजित पवार यांच्या पक्षावर कंट्रोल ठेवण्यासाठी ती इमोशनल खेळी आहे, हे लक्षात आलं. भाजपचे वरिष्ठ नेते हे सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याशी संवाद ठेवून होते. त्यानंतरच शपथविधीचा निर्णय झाला. आपण शपथविधीला निघालो आहोत, हे सुनेत्रा पवार यांनी थोरल्या पवारांना सांगितले देखील नाही. याचा अर्थ त्यांचे ‘मार्गदर्शन’ घ्यायचं नव्हतं किंवा त्याची गरजही नाही, हे सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिलं. कारण सारे मार्गदर्शन भाजपने आधीच केलं होतं. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर पवार कुटुंबीय राजकीय दृष्ट्या अजून दोन ध्रुवावर आहेत, असं देखील यातून स्पष्ट झालं. आपण शरद पवार यांच्या कह्यात राहणार नाही, हे एका निर्णयाने सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिलंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असल्याचं फुटेज आता ‘लीक ’ करण्यात आलं होतं. ही आता शरद पवार यांच्या पक्षाची हतबलता होती. राजकारणात खेळी या कोणत्याही भावनिक किंवा दुःखद प्रसंगामुळे थांबत नाहीत. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांच्या शोकप्रसंगावेळेची एक घटना अजूनही सांगितली जाते. जेव्हा काँग्रेसचे आमदार रेड्डी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येत होते त्याचवेळी शेजारच्या खोलीत त्या आमदारांना बोलावून त्यांच्या पुत्राच्या पाठिंब्यासाठी म्हणजे जगन यांना मुख्यमंत्री करण्यासाठीच्या पत्रावर सह्या घेण्यात येत होत्या. भावनिक दबाव टाकण्याचा हा प्रयत्न होता. ही बाब काँग्रेस श्रेष्ठींना न आवडल्यामुळे जगन मोहन यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी अशा शोक प्रसंगात होणे ही फारच सामान्य बाब आहे. कारण दिवस उलटल्यानंतर राजकारणाला अनेक फाटे फुटतात.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यात राज्यातल्या राजकीय घडामोडी सुरू झाल्यात. आता महत्त्वाच्या समस्यांना तोंड देणाऱ्या बातम्या माध्यमांना कराव्या लागतील. राजकीय स्पेक्युलेशन करणाऱ्या बातम्या कमी कराव्या लागतील, असं वाटत होतं. पण अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींचा बदलांचा वेग आणखी काही दिवस असाच राहीला. त्यामुळे टेबल न्यूज, सोयीच्या राजकीय रंग देणाऱ्या बातम्यांचे पेव पुढील काही दिवस कायम राहणार. आता या सर्व घडामोडीतून माझा अंदाज किंवा टेबल न्यूज म्हणा सुनेत्र पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार होतील. त्यांचे पुत्र पार्थ पवार त्यांच्या जागी राज्यसभेवर जातील. पार्थ पवार यांना राजकीय इनिंग सुरू करण्याची ही अखेरची संधी आहे. हे त्यांना पटले असेलच. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करायचे की नाही याचा निर्णय शरद पवार यांच्या हातात नाही. तो निर्णय अमित शहा आणि देवेंद फडणवीस यांचा असेल. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी अजितदादा खूप आग्रही होते. पवार साहेबांची दोन एप्रिल ला राज्यसभेचा टर्म संपली की ते राजकीय संन्यास घेणार म्हणजे भाजपसोबत जायच नाही या पवारांच्या भूमिकेला तडा जाणार नाही नंतर सुप्रिया सुळेंना सोबत घेऊन एकत्र येऊन भाजपसोबत जायला अडचण राहणार नाही. हा मध्यममार्ग काढून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. या सगळ्या घडामोडीत राष्ट्रवादीचा एक कंपू तयार नव्हता. प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, पार्थ पवार हे त्यात अग्रणी आहेत. दादाकडे ते खाजगीत तक्रारी करत असत या विलीनीकरणाबाबत. त्याच कारण ही तसच होत. विलीनीकरणानंतर दिल्लीत जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे असणार होती त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच महत्व संपल्यात जमा झाल असत. पार्थ पवारांना रोहित पवारांसोबत स्पर्धा नकोय. धनंजय मुंडेंना ही जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असे सत्तेत वाटेकरी नको होते.आता दादा गेले. हे ज्यांना विलीनीकरण व्हाव वाटत होत. ते आता गेलेत आणि ज्यांना हे होऊ नये अस वाटत होत त्यांच्या ताब्यात सगळी सूत्र गेलीत. काल त्याचसाठी घाईत मुंडे मुश्रीफ मुख्यमंत्र्यांना भेटले. सुनेत्रा पवारांच नाव पुढे आणण्यात आलं. विलीनीकरण करण्याबाबत फक्त शरद पवार गटाचे नेते बोलताहेत. अजित पवार गटाच कुणीही अजून बोललेलं नाही. आता विलीनीकरण आणखी कठीण झालंय. घाई घाई झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला का कोण जाणे अजीतदादांच्या पक्षाचा विनाकारण विचका करायचा आहे? राजकारणात आणि कोणत्याही ट्विस्टमध्ये सरळसोट असणाऱ्या दादांच्या पश्चात भंपक गोंधळ घातला जातोय. खरंतर, सगळी उत्तरं शतप्रतिशत दादांसारखी सरळसोट आहेत. दादांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांच्या पश्चात सगळी उत्तरं अगदी स्वाभाविक आहेत. मात्र विनाकारण वाद निर्माण केला जातोय, गोंधळ वाढवला जातोय.
मुंबईत दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून काय दोन पक्ष एकत्र आले काय? दोघे आपापल्या चिन्हवरच लढले ना? भलं विलीनिकरण झालं तरी थोरल्याना भाजपा सत्तेत घेईल का? जे होणारच नाही तरी विलिनीकरण झालं असं मानलं तरी शरद पवारांना भाजप सत्तेत घेईल का? आणि जर सत्तेत जाता येत नसेल तर थोरले पवार कशाला विलीनकरणाला मान्यता देतील? विलिनीकरणाची चर्चा फक्त थोरल्यांकडे, दादांचा गट सत्तेपासून का वेगळा होईल. पक्षीय विलीनिकरण हा विषय केवळ निव्वळ चुकीचा असून तो फक्त पवार साहेबांच्या गटातूनच बोलला जातोय. दादांच्या गटाकडून असं काही बोललं जाईल का? का कोण सत्तेपासून वेगळं होईल? साहेबांच्या गटाला विलीन करून सत्तेत घेणे हा विषय भाजपाचा आहे, मग देवेंद्र कसे याला मान्यता देतील? तटकरे, भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचं काय? सुनील अरोरा हा असाच प्रफुल्ल पटेलांचा जवळचा माणूस. तो वहिनींना भेटून गेला याचा अर्थ तो काय निर्णय प्रक्रियेतला भाग नाही. तो केवळ पोस्टमन, इतकंच ! राजकारणात अजीतदादा सारखा इतका सरळसोट नेता असताना त्यांच्या पश्चात विनाकारण विचका केला जातोय. सगळं काही सहज सोप्प असलं तरी हे दादांच्या शिवाय होतंय, हे मात्र क्लेशकारक आहे. शरद पवारांची मुलाखत पुढच्या पिढीच्या राजकारण्यांनी शिकण्यासारखं खूप काही आहे. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार हे मला माहित नाही असं म्हणून या सगळ्या खेळात आम्ही नाही हे स्पष्ट केलं. पटेल, भुजबळ, तटकरेंनीच हे केलं असं सूचित करून एक्सपोज करून टाकलं. एवढ्या घाईत हा निर्णय का झाला ते माहीत नाही असं सांगून राष्ट्रवादीचं विलिनीकरण भाजप, प्रफुल्ल पटेल, भुजबळ आणि तटकरेंना नकोय, ते विलिनीकरणाला घाबरत आहेत हे पोचवलं. बारा तारखेला विलीनीकरण होणार होतं हे सांगून आत्ता दादांचा पक्ष जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरूद्ध वागत आहे हा संदेश सामान्य कार्यकर्त्यांना देऊन टाकला. दादा म्हणजे आम्हीच; पटेल, भुजबळ, तटकरे नव्हेत हे हायलाईट करून टाकलं. अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रावहिनींचा कुटूंबाशी संवाद झालेला नाही हे सांगून उर्वरित पवार कुटूंब या निर्णयात नाही हे सांगून टाकलं. बारामतीत नीरा नदीची पाहणी करून मोठा मेसेज दिला. बारामतीचा सातबारा मी अजितदादाच्या नावे केला होता, आता अजितदादा गेल्यावर मी म्हणजे मूळ मालकानं सातबारा स्वतःच्या नावावर परत घेतला आहे हा तो मेसेज. किमान शब्दात कमाल अर्थ पोचवणे याला म्हणतात. किंवा एका दगडात दोन पक्ष मारणे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९