"महाराष्ट्रातलं राजकारण अजित पवारांच्या निधनानं ढवळून निघालंय. राजीव गांधींच्या निधनानंतर सोनिया गांधींनी जशी पक्षाची धुरा स्वीकारली तशीच धुरा सुनेत्रा पवारांनी हाती घेतलीय. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलंय. आता चर्चेतली राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया लांबलीय. शरद पवार किंवा पवार कुटुंबीयांशी चर्चा न करता पटेल, तटकरे, भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांना पक्षाची धुरा आणि उपमुख्यमंत्रीपद तर पार्थ पवार यांना राज्यसभा देऊन पक्षावर नियंत्रण आपलंच सिद्ध केलंय. पक्ष पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जाऊ नये याची खबरदारी घेतलीय. महायुतीत जाण्याला उत्सुक असलेल्या शरद पवार गटाच्या नेत्यांना सत्तेपासून रोखण्यात यशस्वी झालेत. या खेळीमागे भाजप नेते असून अजित पवारांचा पक्ष भाजप चालवित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातून राष्ट्रवादीतला 'पॉवर शो' दिसून आलाय. आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी ह्या विलक्षण असतील.!"
------------------------------------
राजकारण हे प्रवाही असतं, ते कुणाच्या जाण्यानं थांबत नाही की, कुणाच्या जाण्यानं अधिक वेग घेत नाही. राजकारणाला स्वतःची गती असते आणि ज्या ज्या वळणावर राजकारण येऊन थांबतं त्या त्या वेळेला ते कुस बदलत असतं. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा काळ थांबण्याची जाणीव काही क्षणासाठी तरी झाली. पण आपण म्हणतो तसं शो मस्ट गो ऑन...! तशा पद्धतीनं तातडीनं राजकारण २४ तासाच्या आत प्रवाही होऊ लागलं. गुरुवारी बारामतीत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यात एक छोटी बैठक झाली, त्यात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आणि शुक्रवारी सकाळी पटेल, तटकरे, भुजबळ हे तिघेजण मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या भेटीनंतर भुजबळांनी सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री होतील, त्यासाठी शनिवारी दुपारी २ वाजता विधिमंडळ सदस्यांची बैठक होईल त्यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होईल आणि संध्याकाळी ५ वाजता शपथविधी होईल. हे सारं घडत असताना मात्र तटकरे हे तसं काही ठरलं नाही असं म्हणत नाकारू लागले. तिकडे प्रफुल्ल पटेल मात्र आम्हाला पवार कुटुंबीयांशी बोलावं लागेल, चर्चा करू असं सांगत त्यांनीही नकार दर्शविला. पण भुजबळांच्या वक्तव्यानं गोंधळ उडाला. त्यामुळं राष्ट्रवादीत काहीतरी घडतंय अशी शंका येऊ लागली. त्यामुळं नक्की अजित पवारांची जागा कोण घेणार? दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होणार की नाही? पवार फॅमिलीच्या राजकारणाचा पुढचा प्रवाह कसा आणि काय असणार हे शुक्रवारी रात्री उशिरा स्पष्ट झालं जेव्हा सुनेत्रा पवारांचा त्यासंदर्भातला होकार आला आणि त्या पार्थ आणि जय यांच्यासोबत मुंबईच्या दिशेनं निघाल्या असल्याच्या बातम्या आल्या. त्यानुसार शनिवारी विधिमंडळाची बैठक झाली आणि संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या उपमुख्यमंत्री त्या ठरल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांचे समर्थक यांना आनंद होणं स्वाभाविक आहे पण याबाबत पवार कुटुंबीयांशी तशी कोणतीच चर्चा तोवर झालेली नाही. इतरांना वा आपल्याला याबाबत विचारलं गेलं नाही, असं पवारांनी स्पष्ट केलंय. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र आहेत. त्यांच्यातला तो अंतर्गत प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाबाबत अजित पवारांची शेवटची इच्छा होती, आमचीही होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर १२ फेब्रुवारीला ते होईल असं ठरलं होतं, पण आता खंड पडलाय असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. पण अजित पवारांच्या पक्षातले नेते आज शांत झालेले दिसले. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण आता काही काळासाठी तरी थांबल्याचं जाणवतं.
अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अन् सर्वेसर्वा होते. प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष तर सुनील तटकरे हे प्रांताध्यक्ष आहेत. भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. ते उपमुख्यमंत्रीही होते. हे तिघेही नॉन मराठा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा तसा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. बहुसंख्य आमदार हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळं हे तिघं किंवा इतर कुणीही उपमुख्यमंत्री झाला असता तर पक्षात फूट पडली असती. पक्षात आमदारांना, नेत्यांना एकत्र ठेवण्यासाठी भावनिक बंध आवश्यक होते त्यामुळं सुनेत्रा पवार यांची निवड ही आवश्यक ठरलीय. भाजपची भूमिकाही इथं महत्वाची ठरली. कारण अजित पवारांना सोबत घेताना त्यांच्यामागे असलेला समाज, सहकारी संस्था ह्या भाजप सोबत यायला हवाय हा विचार होता. राष्ट्रवादी नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबत संमती घेतली. त्यामुळं सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा झाला. पवार घराण्यातलं कुणीतरी व्हावं असाच आग्रह होता हेही स्पष्ट झालं. आता प्रश्न उभा राहतो हा की, अजित पवारांकडे असलेली खाती राष्ट्रवादीला मिळतील का? तर त्याचं उत्तर नाही असंच असेल. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच 'अर्थसंकल्पाचं काही काम अजित पवारांनी केलेलं आहे. पण त्या पुढचं काम मी पाहणार आहे!' असं स्पष्ट केलंय. त्यामुळं आता अर्थखातं हे भाजपकडे राहील हे दिसून आलं. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना सोडून पटेल, तटकरे आणि भुजबळ हे अजित पवारांबरोबर आले. पक्षातली महत्वाची पदं घेतली. अजित पवार आज नाहीत. पण असं काही घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण अशी अभूतपूर्व परिस्थिती समोर येऊन ठाकलीय, अशा स्थितीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं एकत्रिकरण केलं आणि एक पक्ष म्हणून काम करावं लागलं तर पुन्हा एकदा शरद पवार आणि इतर नेत्यांबरोबर काम करावं लागलं तर गेल्या काही वर्षात पक्षावर आपण मिळवलेलं वर्चस्व आणि नियंत्रण निसटून जाईल याची चिंता त्यांना वाटत असावी. दुसरं जर आपल्याला शरद पवार यांच्या हाताखाली काम करावं लागलं तर आपल्याला माहित आहे की, शरद पवार असे नेते आहेत की, त्यांच्यावर कधी कुणी आघात केला असेल तर ते अजिबात विसरत नाहीत. अशावेळी आपल्याला फारसा उज्वल भवितव्य नाही अशी भीती या तिघांना वाटत असावी. असुरक्षितता भासत असावी म्हणूनच त्यांनी शरद पवार यांची भेट न घेता थेट फडणवीस यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवार यांचा प्रस्ताव पुढे रेटला हे पटेल, तटकरे, भुजबळ बोलण्यातून स्पष्ट होत होतं. एका विचित्र परिस्थितीत अजित पवार हे वारसदार झाले. पण आता ते नसताना मराठा समाजाचे आमदार, नेते, हे ओबीसी असलेल्या पटेल, तटकरे, भुजबळ यांना स्वीकारणार का? जर दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण झालं तर जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे अशांना पुन्हा एकदा संधी मिळेल का? मग आपलं काय होणार? अशाही शंका त्यांच्या मनात असतील. म्हणून ही संधी आपल्या हातून जाता कामा नये यासाठी सुनेत्रा पवार यांना पुढं करून भावनिकता निर्माण करून त्यांच्या माध्यमातून पक्ष एकसंघ ठेवून पक्षावरचं आपलं नियंत्रण अबाधित राहावं यासाठी यांनी तशी घाई केल्याचं दिसतं.
सुनेत्रा पवारांना पुढं करून राष्ट्रवादीतल्या या तिघा नेत्यांनी अजूनही आपणच पक्ष चालवतो अशी भूमिका घेतलेली दिसते. दिल्लीतले मोदी आणि शहा या दोन्ही नेत्यांशी प्रफुल्ल पटेल या गुजराती नेत्यांचे मधुर संबंध आहेत. त्यामुळेच अजित पवार हे त्यांच्या माध्यमातून महायुतीमध्ये सामील झाले होते हे विसरता कामा नये. केंद्रातल्या राजसत्तेनं राष्ट्रवादीतल्या अनेकांना वेठीला धरलं होतं म्हणून त्यांनी महायुतीत सामील होणं पसंत केलं होते. राज्यात भाजप आणि शिंदेसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी पक्ष असताना अजित पवारांनी मात्र आपलं धर्मनिरपेक्ष धोरण ठामपणे मांडलं होतं. ते तसेच वागतही होते. पण आता अजित पवार नाहीत. शरद पवारांनी आपण भाजप बरोबर जाणार नाही अशी भूमिका घेतलेलीय. मग जर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं एकत्रीकरण झालं तर शरद पवार आणि त्यांच्या पक्षातले नेते हे महायुतीत सामील होतील का? तेव्हा आपलं राजकीय भवितव्य यापुढच्या काळात राहील की नाही अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली तर मात्र दोन्ही राष्ट्रवादीतले आमदार, नेते थेट भाजपमध्ये सामील होतील अशी शक्यता असल्यानेच सुनेत्रा पवारांना पुढं केलं गेलंय. पवार घराण्यातल्या साऱ्यांनी अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणुका लढविलेल्या आहेत. जाहीरपणे 'सुनेत्रा ह्या बाहेरच्या आहेत' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं होतं त्यामुळं त्यांचा पराभव झाला होता. हे शल्य सुनेत्रा पवारांना सलत असणार. शिवाय पार्थ पवारांच्या उमेदवारीला देखील शरद पवार यांनी विरोध केला होता. त्यामुळं अजित पवार हे जरी एकत्रीकरणाच्या बाजूनं होते तरी देखील त्यांच्यानंतर त्यांचं कुटुंब हे एकत्रीकरणाच्या विरोधात असतील असा होरा पटेल, तटकरे, भुजबळ यांचा असावा असं दिसतं. त्यामुळं त्यांनी ही खेळी घाईघाईनं खेळलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचा तंबू ज्या अजित पवार नावाच्या मजबूत एकखांबी आधारावर उभा होता, तोच खांब अचानक निखळल्याने या पक्षात मोठी उलथापालथ होणार निश्चित. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रचंड वेगाने घडामोडी घडताहेत. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही राजकारणातील सारीपाटाच्या खेळाची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने इतक्या जवळ आल्या होत्या, की शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या घड्याळावरच अनेक ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्या की, काका-पुतण्यांचे हे दोन पक्ष एकत्र येणार असं बोलले जात होते. अर्थात, या एकत्र येण्याबाबत अजित पवार यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे मतभेद आहेत. तर शरद पवारांच्या पक्षातले नेते एकत्र यायला आतुर आहेत. अजित पवार यांच्यानंतर या प्रक्रियेला खीळ बसते किंवा कसे, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार याची चर्चा सुरू झाली होती. ती सध्यातरी थांबलीय. शरद पवारांसोबत फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी आपली वेगळी वाटचाल केली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह ही मिळालं. पक्षावर त्यांची एकहाती पकड होती. त्यांच्या ताकदी एवढा एकही नेता सध्या तरी पक्षात नाही. अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा असं साधं सरळ गणित बनलं होतं. सध्याच्या स्थितीत अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सुनेत्रा पवार सांभाळणर आहेत. सुनेत्रा पवार या प्रत्येक गोष्टीत अजित पवारांसोबत राहील्यात. त्यामुळे त्यांना राजकारणाचा आणि तसंच अजित पवारांच्या खास राजकारणाचा अनुभव आहे. शिवाय पवार घराण्यातलीच व्यक्ती असल्याने त्यांच्यामुळे पक्ष एकसंध ठेवण्यास मदत होईल. पक्ष दुसऱ्या कुणाच्या हातात जावू नये याची ही काळजी त्या घेतील. त्यात त्यांना पार्थ आणि जय यांची ही साथ मिळेल. आपल्या दोन मुलांपैकी एकाला पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधला दुरावा गेल्या काही महिन्यापासून कमी झालेला दिसून आला. दोन्ही राष्ट्रवादी एक झाली पाहीजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र अनेक नेते सध्या 'वेट अँण्ड वॉच'ची भूमिका घेणार असं दिसतंय. अजित पवारांच्या प्रेमापोटी अनेक नेते, आमदार हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत आले होते. पण अजित पवारांच्या अकाली जाण्याने त्यांच्या समोर मोठे प्रश्न निर्माण झालेत. अशावेळी काही नेते हे शरद पवारांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. तर काही जण भाजपकडे जातील असं ही बोललं जातंय. काहीना काँग्रेसचा पर्याय खुला आहे. त्यामुळे जसा वेळ पुढे जाईल तसं राष्ट्रवादीचे नेते ही आपला निर्णय काय त्यावर विचार करतील. सध्या सर्वच जण संभ्रमात असल्याची स्थिती आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांना सुप्रिया सुळेचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे ते परत त्यांच्याकडे जाणार नाहीत. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे असे नेते पक्षाकडे आहेत. पण त्यांचा आवाका तेवढा मोठा नाही. त्यामुळे यांचे नेतृत्व सर्वांनाच मान्य होईल असे नाही. अशा वेळी पक्षात मोठी फूट पडण्याची भीती ही भविष्यत आहे. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा निवडणुकीस उभ्या राहिल्यापासून त्यांनी पक्षातील अनेक जबाबदाऱ्या घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पक्षातील एका गटात याबाबत नकारात्मक चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सुनेत्रा यांनी पक्षाच्या कामात अधिकाधिक लक्ष दिले. त्यामुळे सुनेत्रा पवार या अगदीच अनुभवी नाहीत, अशा प्रसंगी कार्यकर्त्यांचा धीर वाढवायचा असल्यास त्यांच्याशिवाय पर्याय नाही, असे पक्षातील अनेक आमदार व बहुतांश कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुढे कशाप्रकारे जायचे याबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उघड बोलले जात होते. शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडे असले, तरी वयोमानामुळे पक्षाच्या दैनंदिन कामकाजाकडे पूर्वीसारखे लक्ष देणे त्यांनाही शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणानंतरही त्या एकीकृत पक्षाचे प्रमुख नेते म्हणून अजित पवारच असणार अशीही चर्चा होती. मात्र, अजितदादांच्या अपघाती निधनामुळे ही सगळीच गणिते संपुष्टात आली आहेत.
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
अजितदादा कधी पूजा-पाठ नाही, कोण्या बाबाच्या चरणी लीन नाहीत. हातात अंगठी नाही, गंडेदोरे नाहीत. अंगारे धुपारे यज्ञ मुहूर्त अमावस्या पौर्णिमा शुभ अशुभ अंधश्रद्धाळू अविचारी दादा नव्हते. काम हाच देव आणि काम करणं हीच पूजा. आज राजकारणात माजलेले स्तोम, दिखाऊ श्रद्धा, घंटा-घोष पाहता, हे जाहीरपणे सांगण्याचं धारिष्ट्य फक्त दादांकडेच होतं. सुनेत्राताई उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार म्हणताच अनेकांच्या कमेंट्स येऊ लागल्या. सुतक तरी संपायला हवे, दहावा तरी व्हायला हवा. यांना सत्ता व पैसा हवा असतो, इ. वास्तविक हे सामान्य माणसांचे किंवा उगीच विरोध करणारांचे मत झालं. खरंतर कोणतीही स्त्री, कितीही वयाची पतीच्या दुःखातून कधीच बाहेर येत नसते, ती फक्त मुलं आणि कुटुंब यासाठी जगत असते. सुनेत्राताई तर एका कामाच्या माणसाच्या, वादळाच्या पत्नी आहेत. काळ थांबत नसतोच.. आणि त्या दुःखातून बाहेर येण्यापेक्षा आपण दहावा, तेरावा यातून बाहेर येऊयात. सुनेत्रा पवार यापुढच्या आयुष्यात योग्यच निर्णय घेतील. आज त्या डोंगराहून मोठ्या दुःखाला सामोरे जात आहेत परंतु त्यांनी शपथ घेणे आणि पक्षाला सावरणे हीच दादांना श्रद्धांजली ठरेल. स्त्रीला सावरणे अवघड असते. तिचे तिलाच ते सावरावे लागते. समाजात स्त्री सन्मान करण्यापेक्षा खच्चीकरण करणारांची संख्या जास्त आहे.