"शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठीच्या आंदोलनांना सरकारला सामोरं जावं लागलंय. आज जगातल्या साऱ्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख भारतीय आहेत. त्यांचं शिक्षण इथं सरकारी शाळेत झालेलंय. ती परंपरा खंडित होताना दिसतेय. शिक्षणाचा दर्जा घसरतोय. सरकारी ऐवजी खासगी शाळांचं पीक जोमानं वाढतेय. सरकारनं देखील शिक्षण देणं ही सेवा न समजता व्यवसाय ठरवलाय. त्याचं खासगीकरण, व्यावसायिकीकरण झालंय. त्यात आमुलाग्र बदलाची गरज आहे. देशात 'पोलिसी डेमोक्रेटिक व्यवस्था' निर्माण झालीय. असं म्हणावं इतका सरकारच्या व्यवस्थापनासाठीचा खर्च वाढतोय. नवी पिढी घडविण्यासाठी होणारी शिक्षणावरची तरतूद मात्र घटतेय. २०१४ ला अर्थसंकल्पात ५-६ टक्के तरतूद होती ती आता २.५ ते ३ टक्के इतकी घसरलीय. हे अत्यंत गंभीर आहे! विविध समित्यांनी वेळेवेळी केलेल्या शिफारशी राबवाव्यात. तरच शाळा सुधारतील, शाळा ठीक होतील अन् गरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची, राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे!
..................................
*जे*न झी युवाशक्तीचं आंदोलन हे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानं शांत झालं असलं तरी शाळा सुधारणा साठीचे 'स्कूल ठीक करो...!' आंदोलन सुरू आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात विरोधकांनी मागणी केल्यानंतर मंत्र्यांचे राजीनामे होत असत. पण मोदींच्या काळात राजीनामे घेणं, मोदींना झुकवणं, त्यांची रात्रीची झोप उडवणं. हे सहजशक्य नव्हतं. पण प्रधानमंत्री मोदींना रात्रीचं जेन झीना फ्रेंड्स म्हणत आवाहन करणं भाग पडलं होतं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानं शिक्षण क्षेत्रातला सावळागोंधळ थांबणार आहे का? शिक्षण क्षेत्राचा खरा प्रश्न आहे तो शिक्षणाचं अन् शिक्षण व्यवस्थेचं झालेलं व्यावसायिकरण, खासगीकरण, कॉर्पोरेटायझेशन, प्रायव्हेटायझेशन. आमच्या काळात १५ रुपयाच्या फी मध्ये उच्चशिक्षण मिळत होतं, आज तेच शिक्षण १५ लाख रुपये फी देऊनही मुलांना शिक्षण मिळत नाहीये. सरकारनं सामान्य माणसांसाठीचे दरवाजे बंद करून टाकलेत. ही सारी व्यवस्था समाजातल्या केवळ १० टक्के लोकांसाठीच उरलीय. यातल्या काहींना प्रवेश मिळाला नाही तर अशांना परदेशाची दारं खुली आहेत. गरिबांच्या मुलांनी जायचं कुठं...? त्यामुळं शैक्षणिक व्यवस्थेत धोरणात्मक परिवर्तनाची गरज आहे. शिवाय अर्थसंकल्पात त्यासाठी मोठी म्हणजे पूर्वी एवढी किमान ५ किंवा ६ टक्के असायला हवी. आज लोकसंख्या, महागाई, गरजा वाढल्या आहेत, असं असताना तरतूद मात्र कमी करून ती केवळ २.५ टक्केच तरतूद केली जातेय. हे अधिक चिंताजनक आहे. अर्थसंकल्पात एकाबाजूला गृहखात्यासाठीची तरतूद तीन पट होतेय, त्याचवेळी शिक्षण खात्याची मात्र घटविली जातेय. शिक्षण खात्याची तरतूद वाढविली तरच तरुणांना सशक्त करता येईल.
२०१४ मध्ये भारताची लोकसंख्या १२५ कोटी होती. आज ती १४७ कोटी इतकी झालीय. २०१४ मध्ये गृहखात्यासाठी पोलिसी खर्च प्रतिव्यक्ती ५०५ रुपये इतका होता, १२ वर्षानंतर आज तोच खर्च १,१७७ रुपये इतका म्हणजे दुपटीहून अधिक झालाय. अर्थसंकल्पातली पोलिसीसाठीची तरतूद २०१४ च्या तुलनेत तेीप्पटीहून अधिक वाढलीय. तेव्हा ८४ हजार कोटींची तरतूद असायची. आज २ लाख ३४ हजार ५५ कोटी रुपयांची तरतूद आहे. इतकी मोठी वाढ इतर कोणत्याच खात्यात झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयासाठी केली जाणारी तरतूद ही १३४ हजार कोटी रुपये २०१४ ला होती ती आता ६५० हजार कोटी रुपये इतकी झालीय. याच दरम्यान देशातल्या शाळांची संख्या देखील कमालीची घटलीय. २०१४ मध्ये अर्थसंकल्पातली शिक्षण खात्याची तरतूद ५५ हजार कोटी रुपयांची होती. १२ वर्षानंतर तीच तरतूद ८८ हजार कोटी रुपयेवर पोहोचलीय. प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोगानं जे अहवाल प्रसिद्ध केलेत. त्यात म्हटलंय की, या प्राथमिक शाळांसाठी पंचवार्षिक योजनेत ११२ टक्के वाढ अपेक्षित व्हायला हवी. पण इथं तेी तरतूद ५० टक्क्यांपर्यंतही पोहोचत नाहीये. २०१४ मध्ये देशात ११ लाख ७ हजार सरकारी शाळा होत्या. अन् २६ कोटी ९५ हजार विद्यार्थी होते. लोकसंख्या वाढली असताना आज ती संख्या घटून ९ लाख ८५ शाळा अन् २४ कोटी ७० हजार विद्यार्थी इतकी खाली आलीय. आज जवळपास दररोज २५ शाळा बंद होताहेत.
गेली बारा वर्षात स्मृती इराणी ते धर्मेंद्र प्रधान यांपैकी एकाही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपली कारकीर्द पूर्ण केलेली नाही. आधीच्या अनेक शिक्षण सुधार समित्यांच्या सूचना अन् नव्या शैक्षणिक धोरणाचीही अंमलबजावणी नीट झालेली नाही, अशा स्थितीत एकंदर शिक्षण व्यवस्थेत सुधारणांची अपेक्षा कितपत धरावी? पेपरफुटीबद्दल कडक शिक्षा देणारा कायदा करून न थांबता परीक्षा पद्धत सुधारण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली कृतिगट सरकारनं नेमलाय. त्याचवेळी पेपरफोड्यांना कठोर शासन होईल अशा काही सुधारणाही संबंधित कायद्यांत करण्यात येणार आहेत. महिनाभर ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणानं निर्माण झालेला वणवा आता शांत झालाय. शिक्षण खात्याच्या साफसफाईचं सरकारनं मनावर घेतलंय असं दिसतं. गेल्या १२ वर्षांत चार शिक्षणमंत्री झाले. विद्यमान प्रल्हाद जोशी हे पाचवे. याआधी विदूषी स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यापैकी कोणीही सन्मानानं आपली शिक्षणमंत्रीपदावरची कारकीर्द पूर्ण करू शकलेला नाही. पण यातल्या पहिल्या तिघांची गच्छंती प्रधान यांच्याइतकी वादग्रस्तही ठरलेली नाही. प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आल्यानंतर सरकारला उपाययोजना जाहीर कराव्या लागल्यात.
निलेकणी हे ‘आधार’चे कर्ते. ‘इन्फोसिस’ या कंपनीच्या संस्थापकांतले एक. निलेकणी यांना सार्वजनिक जीवनात आणलं ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी. निलेकणी हेही काँग्रेसीच. त्या पक्षाच्या तिकिटावर त्यांनी बंगलुरु इथं लोकसभा निवडणूकही लढवली होती. शिवाय ते नेहरू यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘आयआयटी’चे स्नातक. ‘आधार’ प्रकल्पाचं काँग्रेसकालीन पितृत्व निलेकणी यांच्याकडं जातं. त्यामुळे त्यांच्याविषयी आक्षेप असणार नाही. याआधी २०२४ मध्ये देखील जेव्हा ‘नीट’ परीक्षेत पेपरफुटी झाली होती त्यावेळी सरकारनं ‘इस्रो’ या दुसर्या पं. नेहरू संकल्पित अवकाश संस्थेचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन यांच्याकडं परीक्षा यंत्रणांत सुधारणा सुचवण्याची जबाबदारी दिली होती. त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी किती झाली हे गुलदस्त्यात आहे. यानिमित्तानं असे प्रयत्न कधी आणि कोणी केले; त्यांचं काय झालं याचा आढावा घेणं आवश्यक ठरावं. भारतातल्या शिक्षण व्यवस्था कशी असावी, यासाठी स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत अनेक आयोग अन् समित्या नेमल्या गेल्या. त्यांनी केलेल्या शिफारशी, सूचना यांची अंमलबजावणी किती झाली, हा एक प्रश्न आहे. या समित्या अन् आयोगांमधले काही ठळक टप्पे म्हणता येतील, ते म्हणजे दौलत सिंग कोठारी आयोग, प्रा. यश पाल समिती, राष्ट्रीय ज्ञान आयोग आणि वेगवेगळ्या काळात तयार केलेली राष्ट्रीय शिक्षण धोरणं. स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये नेमल्या गेलेल्या एस. राधाकृष्णन आयोगानं विद्यापीठांच्या स्वायत्ततेविषयी भाष्य केलं होतं. याच समितीच्या शिफारशीवर 'विद्यापीठ अनुदान आयोगा'ची स्थापना झाली. विद्यापीठे केवळ महाविद्यालयांना संलग्नत्व देणार्या संस्था न राहता, तिथं शिक्षण-संशोधनावर भर असावा, हा उद्देश तेव्हा होता. तो किती सफल झाला हे आपण पाहतो आहोत. संलग्न महाविद्यालयांच्या ओझ्याखाली वाकलेली विद्यापीठे शिक्षण-संशोधनाची व्यासपीठे न ठरता फक्त परीक्षा घेणारी केंद्रे म्हणून उरलीत हे वास्तव नाकारता येणार नाही.
कोठारी आयोगानं तर अनेक शिफारशी केल्या. त्यातली कधीच अमलात न आलेली शिफारस म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची....! शिक्षणासाठीची तरतूद पहिल्या वर्षापासून दुप्पट केली जाईल असं आश्वासन २०१४ सालच्या निवडणुकांपूर्वी देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात या सरकारनं मनमोहन सिंग यांच्या काळात जेी होती त्यापेक्षा तरतूद कमी केली. अर्थसंकल्पात शिक्षणासाठीची तरतूद किमान १० टक्के असावी असा आग्रह धरणारे, त्यासाठी जाहीर भूमिका घेणारे एकमेव शिक्षणमंत्री आपल्याकडे होऊन गेले. ते म्हणजे मौलाना अबुल कलम आझाद. ते नेहरू सरकारातले ते शिक्षणमंत्री. त्यांनी केलेली मागणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. तीच बाब ६ ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्याची. ही शिफारस तब्बल चार दशकांनी शिक्षण हक्क कायद्यानं अमलात आली. कौशल्य शिक्षणावरची भर, काळानुरूप शिक्षण, विद्यापीठांची वित्तीय रचना अशा अनेक बाबी विचारात घेऊन या आयोगानं केलेल्या अनेक शिफारशी आजही सुसंगत वाटाव्यात अशा आहेत. प्रा. यश पाल यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या नेमल्या गेल्या. पहिल्या १९९३ मध्ये नेमलेल्या समितीनं शालेय शिक्षणातील बदलांची गरज अधोरेखित केली होती. अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धतींवर त्यात भर होता. त्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं महत्त्वही सांगण्यात आलं होतं. पुढं २००५ मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात याच शिफारशींचं एक व्यापक रूप रेखाटलं गेलं. मुलं घोकंपट्टीकडून संकल्पना समजून घेण्याकडं कशी वळतील, याकडं लक्ष देण्याची गरज यात प्रतिबिंबित झाली होती. सहामाही, वार्षिक परीक्षांवरच भर देण्याऐवजी सुचवला गेलेला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा विचारही यातलाच. विद्यार्थ्यांना काय आवडतं, काय जमतं त्यानुसार शिक्षणानं त्याला त्या दिशेला वळवायला हवं, त्यातलं कौशल्य द्यायला हवं, यासाठी अध्ययन-अध्यापन पद्धतीत आमूलाग्र बदल करणं ही काळाची किती नितांत गरज आहे, हे यातून समोर आलं. नंतर संयुक्त पुरोगामी आघाडी-यूपीए सरकारच्या काळात २००५ मध्ये सॅम पित्रोदांच्या समितीनं राष्ट्रीय ज्ञान आयोगाचं उद्दिष्ट शिक्षण सुलभपणे उपलब्ध करणं हे होतं. तसंच, विज्ञान-तंत्रज्ञानावर त्यात भर होता. नंतर प्रा. यश पाल यांच्या अध्यक्षतेखाली २००९ मध्ये उच्च शिक्षणाच्या ‘पुनरुज्जीवना’साठी नेमलेल्या समितीनं अनेक मूलभूत बदल सुचवले होते. उच्च शिक्षण क्षेत्रात विद्याशाखांच्या वेगवेगळ्या शिखर संस्था ठेवण्याऐवजी एकच राष्ट्रीय उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग-एनसीएचईआर नेमण्याची शिफारस याच समितीनं केली होती. म्हणजे विधि अभ्यासक्रमांच्या नियमनासाठी बार कौन्सिल, औषधनिर्माणशास्त्रासाठी फार्मसी कौन्सिल, अभियांत्रिकीसाठी ‘एआयसीटीई’ असं न करता, सर्व अभ्यासक्रमांसाठी एकच ‘एनसीएचईआर’ नेमून सर्व अभ्यासक्रमांचं नियमन करील. ही शिफारस करताना या शिखर संस्थांनी त्यांच्या त्या विद्याशाखेची पदवी घेतलेले पदवीधर सक्षम आहेत का, याची तपासणी करावी, असंही समितीनं म्हटलं. विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर घाला येणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना यात होती. याच धर्तीवरचं सध्याच्या सरकारचं ‘विकसित भारत शिक्षा अधिष्ठान’ विधेयक राज्य सरकार अन् विद्यापीठांच्या शैक्षणिक स्वायत्ततेच्या मुद्द्यावर मौन पाळून आहे.
‘नवीन शैक्षणिक धोरण’ म्हणून ओळखलं जाणारं सहा वर्षांपूर्वीचं धोरण आहेच. यात आता निलेकणी कृतिगट आलाय. त्यांचं काम ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’चा कारभार सुधारण्याचा, शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा आहे. त्यासाठी विविध समित्या आणि आयोगांनी केलेल्या शिफारशींचा नीट आढावा घेतला आणि त्यात कालसुसंगत काही बदल केले, तरी खूप काही साध्य होईल. ते करायचं असेल तर शिक्षण हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा. अन्यथा चार शिक्षणमंत्री एव्हाना गेले; आणखीही जातील. पण शिक्षण, शिक्षण व्यवस्था जेी होती ती तिथंच राहील. सरकारी शाळांची दुरवस्था म्हणजे गोरगरीबांच्या शिक्षणाच्या हक्कावर घाला आहे. शाळांची अवस्था चिंताजनक आहे. अपुऱ्या सुविधा, शिक्षकांची कमतरता, सातत्याने घटणारी पटसंख्या यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर प्रश्न निर्माण झालेत. अनेक शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी नाही, स्वच्छ, कार्यक्षम शौचालयांची कमतरता, वीजेची समस्या आहे. यूडायस प्लस २०२५-२६ अहवालानुसार महाराष्ट्रात एकशिक्षकी ९ हजार २७४ शाळा असून, यामध्ये १ लाख ७९ हजार ७१ विद्यार्थी शिक्षण घेताहेत. सुविधांअभावी अन् खासगी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारी शाळांमधली पटसंख्या कमी होतेय. सरकारी शाळा सक्षम करण्याऐवजी त्या कमकुवत होवू देऊन खासगी शिक्षणाला प्राधान्य देणं हे शिक्षणविरोधी धोरण आहे. ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलांना खासगी शाळेत घालण्याची वेळ त्यांच्यावर येते. मात्र खासगी शिक्षणाचा खर्च प्रत्येक पालकाला परवडणारा नाही. परिणामी अनेक मुला-मुलींचं शिक्षण अर्धवट राहतं. त्यांना शाळा सोडावी लागते. सरकारी शाळा मजबूत करणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. गोरगरीबांच्या लेकरांचं भविष्य अंधारात ढकलणारं धोरण थांबवून सरकारने शिक्षणाकडे गंभीरपणे आणि संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. असं असताना मूलभूत शिक्षण व्यवस्थेची उकल करून ती सुधारण्याऐवजी त्याकडं दुर्लक्ष केलं जातं हे भयाण वास्तव नाकारता येत नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९