"मराठी माणसांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपलीय. राज्याची कोसळलेली अर्थव्यवस्था, उन्मत्त, लाडवलेली, बेबंद नोकरशाही, उध्वस्त प्रशासन, भरकटलेली राज्यव्यवस्था, विस्कटलेलं सामाजिक सौहार्द, भडकलेलं समाजमन, उसळलेली महागाई, उफाळलेली गुंडगिरी, अक्राळविक्राळ बेरोजगारी, घसरलेली राजकीय भाषा, चिघळलेला खुनशीपणा, पसरलेला धार्मिक द्वेष, एवढंच नाही तर सत्तेसाठीचं सत्ताधाऱ्यांनी स्वीकारलेलं अजब 'दग्धभू धोरण' यानं कधीकाळी सशक्त, सधन, समृद्ध, सुसंस्कृत, सविनय, सुशासित, विकसित महाराष्ट्र आज अस्ताव्यस्त झालाय, त्याची वीण विस्कटलीय. राज्यसत्ता ज्यांच्याकडे विश्वासानं सोपविली तेच आता बेधुंदपणे वागताहेत. कशाचीही तमा न बाळगता बेमुर्वतपणे राज्यशकट हाकताहेत. राजसत्तेचं लाभ कायदेशीर, बेकायदेशीररित्या ओरबाडण्यासाठी, लुटण्यासाठी सरसावलेत. विस्कटलेला महाराष्ट्र सावरण्यासाठी, गतवैभवासाठी सारं काही विसरून कोण, कधी अन् कसा महाराष्ट्र सावरणार?...
..........................................
*'रा* ज्यात एक फुल, दोन हाफ सरकार...!' अशी टीका सतत होत असते. सध्या सामाजिक सौख्य, सौहार्द बिघडलंय. मंत्री बाह्या वर करत सरसावलेत. तिघेही एकमेकावर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. असं दिसून येतंय. 'आम्ही तिघे एकत्र आहोत' असं म्हणतानाच त्यांच्यातलं छुपं युद्ध उघडपणे दिसतंय. तिघांनीही आपली मूलभूत स्वभाव वैशिष्ट्ये गुंडाळून ठेवलीत. दोन हाफपैकी एका हाफला राज्यातल्या समस्यांपेक्षा आपली नसलेली पक्षनिष्ठा, पक्षसेवा, आर्थिक संपदा ही अधिक महत्वाची वाटतेय. दुसरे हाफ गुलाबी जॅकेट घालून लाडक्या कार्यकर्तीला, मुलाला, नातेवाईकाला गोंजारण्यात मग्न आहेत, त्यांचा गैरकारभार ते पाठीशी घालताहेत. 'एकफुल'ला त्यासाठी साद घालताहेत. आपलं स्थान टिकविण्यासाठी दिल्लीश्वरापुढे कुर्निसात करण्यात दोघेही मश्गूल असतात. दिल्लीश्वरांनीच सुभेदारी बहाल केली असल्यानं तिथं निष्ठा वाहण्यासाठी ते सदैव तयार असतात. तसे बिचारे एक फुल तर हे दिल्लीश्वराचेच 'मांडलिक'...! त्यांना कोण आवरणार? आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्यात. या निवडणुकांसाठी हाती राजसत्ता असल्यानं घोषणांचा पाऊस त्यांनी पाडला गेला. आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय घेतलेत. त्यातले अनेक निर्णय संशयास्पद आहेत. साऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय. त्याच्या आशा आकांक्षा, त्याचे प्रश्न, त्याच्या सेवासुविधा याकडे राजसत्तेचं लक्ष नाही. मराठी माणूस असाच दबला जातोय, परप्रांतियांना पायघड्या घातल्या जाताहेत. मुंबईत येण्याचं आवतन दिलं जातंय. 'माय मराठी मेली तरी चालेल पण हिंदी मावशी जगली पाहिजे...!' अशी त्यांची भूमिका झालीय. असं जर घडलं तर, खात्रीपूर्वक समजा की, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संपला...! बाहुबली चित्रपटात दाखवलेला माहिष्मती संस्थानातल्या युद्धसदृश्य दृष्यात प्रभास हा नायक धनुर्धारी अमरेंद्र बाहुबली, नायिका अनुष्का शेट्टी म्हणजेच देवसेनेला आपल्या धनुष्यातून तिरंदाजी करताना एकाचवेळी तीन बाण कसं सोडायचं याचं प्रात्यक्षिक देताना एक मंत्र ऐकवतो. नाद्वे..... मणीबंधम्.... बहिर्मुखम्....! त्याच धर्तीवर आपल्या राज्यात डंकापती दिलीश्वरानं महाराष्ट्रावर चाल करताना तीन अस्त्र सोडण्याची ही किमया साधलीय! देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशा ह्या एक फुल, दोन हाफ 'एडीए' शस्त्रानं सत्तेसह राजकीय युद्ध सध्या आरंभलंय...!
सत्तेसाठी सारं काही म्हटल्यावर राजधर्म, न्याय, नीती, हा सारा कल्पनेचा खेळ वाटायला लागतो. मग या खेळासाठी नैतिकता पणाला लावली जाते. सत्य-असत्याची चाड राहात नाही. सध्या राज्यात कुणाचा पायपोस कुणाला राहिलेला नाही. स्वतःच आसन स्थिर नसताना जनतेच्या स्थिरस्थावराचा विचार कुठं येणार? गरीब बिचारी मुकी जनता तिला कुणीही आणि कसंही हाका. ती सहन करतंच जगतेय...! खरं तर निवडणूकांची आतुरतेनं वाट पाहणारे आपण मात्र उद्भवलेल्या परिस्थितीत नको ती निवडणूक म्हणण्याची वेळ आपल्यावर आलीय. मतदार यादीतला गोंधळ उघडकीला आलाय आणि तो केवळ विरोधकांनीच नाहीतर सत्ताधारी नेत्यांनीही उघडकीला आणलाय. दुबार मतदार, बोगस मतदार, पत्ता नसलेले, चुकीचा पत्ता असलेल, वेगळे फोटो, वेगळी नावं लिंग, वय बदललेले मतदार, घरांक नसलेले मतदार उघडकीला आणलेत. विरोधकांनी त्याला 'व्होटचोरी' म्हटलंय. हे सारं सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोगानं केल्याचा राहुल गांधी, राज ठाकरे, मंदा म्हात्रे, किरीट सोमय्या, आदित्य ठाकरेसह अनेकांनी असे जाहीर आरोप केलेत. पण मतदान यंत्रणा राबवणारा निवडणूक आयोग मात्र यावर ढीम्म आहे. त्यावर काहीच उत्तरं देत नाहीत. उलट हे प्रकार उघडकीला आणणाऱ्याच्या विरोधात बेमुर्वतखोरपणे सवाल करतेय. मात्र याची उत्तरं देताहेत भाजपचे बोलघेवडे प्रवक्ते. यामुळं निवडणूक आयोगाचं मौन आणि भाजप नेत्यांची उत्तरं ही मतदार यादीत, मतदानात गैरप्रकार केल्याची, घडल्याची एकप्रकारे कबुलीच दिली जातेय. अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होताहेत.
दुसरीकडे राज्याला धुवांधार पावसानं झोडपल्यानं पिकं, शेती, जमीन सारं नष्ट होण्याची स्थिती निर्माण झालीय. शेतकऱ्यांचं जीवनच उध्वस्त झालंय. त्याला दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला जातोय. मदतीसाठी आशेनं बसलेला बळीराजा हवालदिल झालाय. जातीय विद्वेष तर भयानक रूप धारण करण्याच्या आवेशात आहे. थेट मारण्या मरण्यापर्यंत गोष्टी गेल्यात. महागाईचा तर आगडोंब उसळलाय. मात्र याची जाणीव सत्ताधाऱ्यांना अजिबात दिसत नाही! मिळालेली राजसत्ता टिकविण्यासाठी लाडकेपणाचा पूर आणलाय. लौकिक अर्थानं विश्वस्त समजले जाणारे सत्ताधारी 'लोकप्रतिनिधी' या शब्दांचा अर्थच विसरलेत असं वाटतं. आपण राजसत्तेचे फक्त विश्वस्त आहोत, लोकसेवक आहोत याचं भानही त्यांना राहिलेलं नाही. केवळ स्वार्थ साधण्यासाठीच त्यांना सत्ता हवीय. त्यासाठी सारी नाती लाडकी दोडकी बनवलीत. ते करताना शेतकऱ्यांच्या, कंत्राटदारांच्या, सरकारी डॉक्टरांच्या आत्महत्या, महिला, तरुणी, अजाण बालिकेवरचा अत्याचारही त्यांच्यासाठी संवेदनाहीन बनलाय. संबंधित आरोपींना 'क्लीनचिट' देण्यात राजसत्ता मश्गूल आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढं एकच उद्दिष्ट ठेवण्यात राजसत्ता सध्या कार्यरत आहे. आम्ही सेवक नाही, तर मालक आहोत, अशा अविर्भावात, थाटात ते सर्वत्र वावरताहेत. अशांच्या मनात गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, गरजुंच्या बाबतीतली मनं संवेदनशील होतील का? पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने 'भूखंडाचं श्रीखंड' हा शब्दप्रयोग रूढ केला होता. तो अधिक मजबूत करण्यासाठी 'एक फुल दोन हाफ' सध्या कार्यरत दिसत आहेत. धारावीपासून सुरू झालेला हा जमीन लाटण्याचा प्रकार प्रत्येकाकडून मुंबई, नागपूर, अमरावती, संभाजीनगर, ठाणे, पुणे जवळपास प्रत्येक जिल्ह्यात सुरूच आहे. सरकारी जमिनीच नाही तर आता सेवाभावी संस्थांच्या, समाजाच्या जमिनीही लक्ष्य केल्या जाताहेत. जणू त्यांना भस्म्या रोगच जडलाय. मुंबईत देवेंद्र फडणवीस, ठाण्यात एकानाथ शिंदे, नागपुरात बावनकुळे, पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार यांची नावं घेतली जाताहेत. त्यांनी जमिनी बळकावल्याचे आरोप होताहेत. काँग्रेसनं महाराष्ट्राला लुटलं असं म्हणत सत्तेवर आलेल्यांनी महाराष्ट्राला केवळ लुटलंच नाही तर कर्जबाजारी केलंय. महाराष्ट्राच्या भरजरी वस्त्रांची लक्तरं केली आहेत. राज्य अस्तव्यस्त करून सारी घडी विस्कटून टाकलीय. दिवसेंदिवस माणूस जगणंच विसरून गेलाय. दुःख, अडचणी, समस्या, आजारपण, आर्थिक समस्या, बेरोजगारी, महागाई, वाहतुकीची कोंडी, फसवणूक, स्त्रियांवरचे अत्याचार, जातपात, अवकाळी पाऊस, महापूर, घाणेरडं राजकारण अशा किती तरी समस्यांनी तो ग्रासलाय. साथीच्या आजारानं पिच्छा सोडलाय, असं अजून म्हणता येत नाही. रोज नवनव्या आजारांनी लोकांना घेरलंय. या साऱ्यांतून माणूस स्वतःला सावरायचा प्रयत्न करतोय; पण तो आत्मविश्वासच गमावून बसलाय. अशा आत्मविश्वास गमावून बसलेल्या लोकांना पाठबळाची अत्यंत गरज असते. माणसाला सुख, शांती, समाधान, राहायला घर, पोटाला चार घास, स्वस्त औषधोपचार, हाताला काम, यश, मुलाबाळांचे शिक्षण इतक्याच माफक अपेक्षा आहेत. तमाम बळीराजाचं दुःख, कष्ट यातून काहीही केलं तरी सुटका होतं नाही. कधी कमी पाऊस तर कधी तुफान पाऊस. होत्याचं नव्हतं करणारा पाऊस. एकदा पेरणी करताना नाकी नऊ येते. इथं तर दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ येऊ लागलीय. कर्जाचे डोंगर उभे राहताहेत. जर काही पिकलंच तर ते माती मोल किमतीला विकावं लागतंय. यंदा पावसानं धुवांधार बरसात केलीय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. पण शेतीत उगवलेलं सारं पीक भुईसपाट होतंय! गावच्या गावं तळी होताहेत. विकासाच्या नावाखाली चकचकीत रस्ते, पूल होताहेत. विमानतळ विकसित होताहेत. वंदेभारत श्रीमंती थाटाची रेल्वे धावतेय. पण पॅसेंजर रेल्वेत लोक एकमेकांच्या उरावर बसून प्रवास करताहेत. शहरांच्या हद्दवाढीनं सिमेंटची जंगले उभी राहताहेत; पण माणूस स्वास्थ्य हरवत चाललाय. अभिमान, स्वाभिमान बाजूला ठेवून सुख शोधण्यासाठी तो धडपडतोय; मात्र त्याच्या नशिबात निराशेशिवाय काहीच पडत नाही. गेल्या काही वर्षात श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी अधिकच रुंदावत चाललीय. विकासाची गंगा काही मोजक्याच लोकांच्या घरात वाहतेय. त्यांच्या विकासाचा दर बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक आहे.
माणूस निसर्ग नियमांना अनुसरून वागायचं विसरलाय. हवा, पाणी, ध्वनी अशा प्रत्येक गोष्टीचं प्रदूषण करतोय. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. त्यामुळं दिवसेंदिवस माणसाचा श्वास कोंडतोय.
२०१९ नंतरची महाराष्ट्राची ही पाच वर्षे 'अनागोंदी', राजकीय चिखलफेक, कोविडचा फटका बसलेलं राज्य, ढासळलेली अर्थव्यवस्था, उध्वस्त झालेलं प्रशासन यामुळं राज्याचा पाया या राजसत्तेच्या काळात कमकुवत झालाय. बेजबाबदार नेत्यांनी वाढवलेल्या जातीय आणि धार्मिक तणावामुळे सामाजिक सलोखा, सौहार्द धोक्यात आलाय. आता निवडणुक होणार असल्यानं याचं नीट अवलोकन करून येत्या निवडणुकांचं महत्त्व समजून घेण्याची गरज आहे...! गेल्या पाच वर्षात राजकीय डावपेचांची मोठी किंमत महाराष्ट्रानं चुकवलीय. ही किंमत तीन पातळ्यांवर आलीय. एक राजकीय अनिश्चितता, दुसरी आर्थिक घसरण आणि तिसरा मुद्दा आहे बिघडलेल्या सामाजिक सलोख्याचा! आमदारांची पळवापळवी, पक्षांतर, पक्ष चोरणं आणि या सगळ्यात घसरलेल्या राजकीय व्यवहारासोबत रसातळाला गेलेली राजकीय भाषा, यांनी महाराष्ट्रानं आजवर ज्या बंधुत्वाच्या, लोकशाहीपूर्ण राजकीय संस्कृतीचा अभिमान देशात सांगितला, मिरवला, तो अभिमानच धुळीला मिळालाय. या राजकारणाची सुरुवात झाली ती २०१९ पासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या एकसंघ शिवसेनेनं भाजपसोबत फारकत घेतली. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकारात सामील झाले. खरं तर, उद्धव यांनी काँग्रेससोबत येणं, हीच एक अभूतपूर्व घटना होती. १९९५ साली युती सरकार येईपर्यंत काँग्रेसचा वरचष्मा होता, त्याला तडा गेला तो १९९५ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेना-भाजप युतीमुळे! त्यानंतर राज्यात काय घडलं आणि कसं घडलं हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही. तो सारा इतिहास आपण अनुभवलाय!
मराठ्यांनी सदैव राष्ट्राचाच विचार केलाय. आपल्याबरोबर राष्ट्र मोठं व्हावं म्हणूनच मराठे धडपडले. पानिपतावर अब्दालीची झुंड रोखण्यासाठी मराठ्यांची एक पिढीच्या पिढी मारता मारता मरावं अशी झुंजून मेली. अब्दालीला पुन्हा भारताकडं वाकडी नजर करून बघायची हिंमत होणार नाही, असा चोप मराठ्यांनी दिला. मराठे पानिपतावर मोडले, पण हे राष्ट्र, इथला समाज आणि धर्म त्यांनी सावरला. मराठ्यांची समशेर हा भारताचा आधार होता म्हणूनच मराठे ताठमानेनं शिलंगणाला निघायचे. पण महाराष्ट्र धर्म आपण विसरलोत. आपसातल्या लाथाळ्यात आणि कुणाचं तरी अनुयायीत्व मिरवण्यात आम्हाला समाधान वाटू लागलंय. महाराष्ट्रापेक्षा पक्षनेते मोठे ही 'स्वामी'निष्ठा यातूनच निर्माण झाली. वास्तविक, हे राष्ट्र मोठं करण्याचं काम आम्ही करतो म्हणूनच मराठ्यांच्या भूमीला महाराष्ट्र हे नाव आहे, असं छातीठोकपणे सांगणारी आणि कर्तबगारी गाजवणारी माणसं महाराष्ट्रात झालीत. त्या कर्तृत्ववान मराठी पुत्रांमुळेच 'महाराष्ट्र आधार या भारताचा' हा विश्वास निर्माण झाला होता. महाराष्ट्राचं वैभव तळपू लागलं होतं. त्याचा जेव्हा अभाव जाणवला तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय लादला गेला आणि त्या अन्यायानंच अंगार पेटावा तसा मराठा धगधगून उठला होता. महाराष्ट्र मिळाला, पण मराठी माणूस मात्र संपत गेला. आज त्याचीच अवहेलना होतेय. सत्तेवर बसलेल्यांना आपल्याच माणसाकडं लक्ष द्यायला वेळ नाहीये. दिल्लीश्वरापुढं कुर्निसात करण्यातच ते मश्गूल आहेत, त्यातच धन्यता मानताहेत दिल्लीश्वरांनीच त्यांना सुभेदारी बहाल केली असल्यानं त्यांच्या चरणी निष्ठा वाहण्यासाठी ते सदैव तयार असतात. त्यांनी ज्या मराठी माणसाच्या जीवावर, मतांवर वाटचाल आरंभली. त्याचा त्यांना विसर पडलाय. हिंदुत्वाचं ढोंग आणि अवडंबर माजवणाऱ्या, त्यातूनच रक्तपिपासू शोषक व्यवस्थेचा वडवानल पेटवून देणाऱ्या हिणकस राजकीय वृत्तीसमोर 'नफरत छोड़ो'तून आपसूकच एक फार मोठं आव्हान उभं ठाकलंय. त्यामुळंच, या विषमता आणि विद्वेषवादी लोकांना देशातल्या गरीबी, बेरोजगारी तरीही, अजून कंत्राटी-कामगार, अर्धरोजगारीवर ते मूग गिळूनच आहेत, आर्थिक-विषमतेवर बोलण्यासाठी कंठ मात्र फुटलाय! लक्ष्मीपुत्र गुजराथ्यांसाठी,बिहारी भय्यांसाठी भाजपच्या 'मांडलिक' मुख्यमंत्र्यांचा आटापिटा सुरूय. मराठी कामगारांनो, आता, फक्त छातीच पिटा! कामगारांचा आवाज जर, असाच दबला; तर, खात्रीपूर्वक समजा की, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संपला!.
महाराष्ट्राची १९६० मध्ये स्थापना झाली त्यानंतर पहिली निवडणूक १९६२ मध्ये झाली. मुंबई आणि मध्य भारतातल्या दोन प्रांतांतून महाराष्ट्राची निर्मिती झाली. नव्या राजकीय व्यवस्थेचा स्वीकार १९६२ मध्येच पणाला लागला होता. आजच्यासारखी गंभीर परिस्थिती कधीच नव्हती. हे महान राज्य, कष्टानं मिळविलेलं वैभव गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. आताची ही निवडणूक महाराष्ट्राचं, ते वैभव पुन्हा मिळविण्यासाठीची निवडणूक आहे. थोडाथोडका नाही, तर हा गेल्या दोन हजार वर्षाचा इतिहास आहे की, जेव्हा जेव्हा या देशावर संकट आलं तेव्हा तेव्हा हा माझा महाराष्ट्र छातीचा कोट करून त्या संकटासमोर उभा राहिलाय. त्याच या माझ्या महाराष्ट्रावर आता स्वतःलाच वाचवायची वेळ आलीय, है दुर्दैव आहे. पण म्हणून हतबल होऊन बसायला आता वेळ नाहीये. हे राष्ट्र वाचेल तेव्हाच हा महाराष्ट्र वाचेल आणि त्यासाठीच, या देशासाठी महाराष्ट्र मजबूत करायला हवाय. ही निवडणूक अस्ताव्यस्त, विस्कळीत, कमजोर होत चाललेला महाराष्ट्र सावरणारी आणि पुन्हा योग्य मार्गावर आणणारी ठरली पाहिजे, ही निव्वळ इच्छा नव्हे, एक मराठी माणूस म्हणूनही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे! पण महाराष्ट्र कोण, कधी अन् कसा सावरणार? तो इतर कुणी येऊन सावरणार नाही, आपल्यालाच सावरावं लागणार आहे. नाईलाजास्तव म्हणावं लागतंय, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...?
चौकट
*सत्तेसाठीचं दग्धभू धोरण!*
'दग्धभू धोरण' ही एक युद्धनीति! जिचा वापर करून मोठीमोठी आक्रमणं परतविलीत. शत्रूनं हल्ला केला तर आपण प्रजेसह मागे जायचं आणि जाता जाता ती जमीन नापीक करायची. उभी पिकं आडवी करायची, विहिरीचं पाणी विषारी करायचं, अन्नधान्याची इतर स्रोतं उद्ध्वस्त करायची. ज्यामुळे शत्रूची अन्नान्न दशा होऊन शेवटी उपासमारी, महामारी, रोगराईला कंटाळून तो परत फिरेल मग पुन्हा आपण आपलीच जमीन पादाक्रांत करून ती पूर्ववत सुपीक करायची. याचाच उपयोग करून इतिहासात अनेकांनी विजय मिळवलाय. बुंदेलखंड चंदेल राजांनी महमूद गझनीला परतवून लावलं, महाराणा प्रतापसिंहानीही मुघलांशी यशस्वी संघर्ष केला. रशियाच्या स्टॅलिननंसुद्धा हिटलरच्या आक्रमणाला असंच तोंड देत रशियाचं रक्षण केलं. महादजी शिंदे यांनी 'दग्धभू तंत्र' इंग्रजांविरुद्ध वापरलं. हा झाला इतिहास...! असाच प्रयत्न आज राजसतेनं आरंभलाय. सामाजिक, राजकीय, आर्थिक, प्रशासकीय, राज्यव्यवहारकोश 'दग्धभू धोरण' स्वीकारून सारं काही उध्वस्त केलंय, विस्कटून टाकलंय. जेणेकरून विरोधकांनाच नव्हे तर इतर कुणालाच सत्ताकारण करणं अशक्य होईल.
हरीश केंची
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment