Sunday, 10 May 2026

नसरापूरचा नरकासुर.....!

"चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी, शुष्क भावनांनी, संवेदना संपलेला समाज जागा झाला. त्या बिचाऱ्या अजाण मुलीला तिचा देह ही भोगाची खाण आहे ह्याचीच काय, पण आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणजे काय आहोत, याचीही कल्पना नसेल, एवढ्या छोट्या वयात अत्याचार झालाय. लिंगपिसाटाच्या विकृत वासनेपायी सारं बालपण-जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट नाही. पण दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा मोहोर फुटलाय, नसरापूरसारख्या पाशवी घटना जागोजागी घडताहेत. बलात्काऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना चेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. संतापाने खदखदत लेकीबाळींना बरबाद करणाऱ्यांविरुद्ध  हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर यायला हवंय, कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना, नरकासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय...!" 
---------------------------------------------
पुणे शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या नसरापूर परिसरात शंकराचं भव्य पुरातन बनेश्वर मंदिर आहे, जवळच राज्य शासनाचं बनेश्वर वन उद्यान, खळाळत्या पाण्याचे धबधबे, सुप्रसिद्ध नेकलेस पॉईंट, भव्य असं त्रिमंदीर, शिवाय वर्वे लेक व्ह्यू पॉईंट अशी निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळं आहेत. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. अशा नसरापूरात, धायरीत राहणारी अन् आजोळी नसरापूरला आलेल्या चार वर्षांच्या मुलीवर ६५ वर्षीय भीमराव कांबळे या लिंगपिसाट नराधमाने अत्याचार केले. तिला दगडाने ठेचून ठार मारलं अन् तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. नसरापूर ग्रामस्थांनी नवले पुलावर आंदोलन केलं. नसरापूर बंद ठेवलं. चिमुकली खेळता खेळता बेपत्ता झाली म्हणून तिच्या आजीने शोध सुरू केला. गावकरी मदतीला आले. तिला शोधताना गावकऱ्यांसोबत हा भीमाजी कामळेही होता. भीमराव कांबळेकडे विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांना संशय आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. भीमराव कांबळे याने आधीही दोन गुन्हे केले होते, ते छेडछाडीचे, महिलांसंबंधी होते. भीमाजी कामळेला या विकृतपणामुळे त्याच्या मूळ गावामधून २० वर्षांपूर्वी गावबंदी करून हाकललं होतं. हा भोर तालुक्यातील साळवडे गावातला. गावामधून हाकलल्यानंतर तो नसरापूर इथं राहत होता. आजूबाजूला गावामध्ये छोटी मोठी कामं करून तिथं तो राहत होता. घटनेदिवशी पीडित मुलगी मंदिराजवळ खेळत होती, त्यावेळी भीमराव कांबळे विटा वाहण्याचं काम करत होता. त्याने मुलीला आमिष दाखवून गोठ्यामध्ये नेलं. त्यावेळी गावातली लाईट गेलेली होती. बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद झाले होते. मात्र, मंदिरासमोरील घरातला सीसीटीव्ही बॅटरीवर सुरू होता. त्या कँमेऱ्यात आरोपी कैद झाला आणि घटनेचा उलगडा झाला. जिच्यावर अत्याचार झालाय, ती चिमुरडी इथल्या बनेश्वर शंकर मंदिरातल्या पुजाऱ्याची ही नात आहे. असं समजतं. 
बलात्काराच्या घटनेने सारा महाराष्ट्र हादरून गेलाय. जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या अजाण कळीला लिंगपिसाटाने कुस्करून टाकलंय. राज्यात अशा अनेक कळ्यांना विकृत वासनेला क्रूरपणे बळी पाडलं जातंय. या कुकर्माचं धिक्कार करायचं सोडून मुख्यमंत्री अन् मंत्र्यांसह अनेक नेते त्यांचं राजकारण होतंय असं रडगाणं गाताहेत. १ मे ला ही दुर्दैवी  घटना घडलीय. चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्या लिंगपिसाटाने वासनेचं बळी बनवलंय. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की, पीडित चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झालीय. तिचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, तो सुन्न करणारा, हादरून टाकणारा आहे. चिमुकली ओरडू नये म्हणून तिच्या तोंडांत त्याचा घाणेरडा सॉक्स कोंबलेला आढळला. त्या आधी त्यानं चिमुरडीच्या छातीत बुक्की मारल्याचं आढळून आलंय. मुलीसोबत जे काही घडलंय ते अंगावर काटा आणणारं आहे. ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरलाय. फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावरही आक्रोश उमटतोय. डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज घडताहेत. बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशी जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बलात्काऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींना बरबाद करणाऱ्यांविरुद्ध संतापानं खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन: पुन: रस्त्यावर येऊन त्यांना चेचून सरळ करायला हवंय. 
घटना नसरापुरात घडली. पुण्यात लोक रस्त्यावर आले. बंगलोर महामार्ग बंद पाडला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. जणू अशा घाणेरड्या प्रकारच्या विरोधात प्रक्षोभ कुणी व्यक्त करूच नये. कोणत्या वातावरणात जगतो आहोत आपण? या नीच घटनेने चिमुकलीच्या आई बाबांचं काळीज पिळवटून निघालं असणार. आपल्या लेकराला असं भोगावं लागलं, काय वाटलं असंल त्या बिचाऱ्यांना! त्या मुलींचे पालक म्हणत असतील की, *"आम्हाला हे असलं रामराज्य नकोय, कारण इथं कायदा आहे तो असुरांना पाठीशी घालण्यासाठीचा...! मग रावण राज्य आलं तरी चालेल, कारण रावण लाख वाईट होता पण तिथं सीता सुरक्षित तरी होती...!"*  नसरापुरातली आंदोलनकर्ते मंडळी ही स्थानिक माणसंच होती, तो जनतेचा स्वयंस्फुर्तीने व्यक्त झालेला संताप होता, प्रक्षोभ होता, आक्रोश होता. त्या अजाण, असहाय चिमुकल्यांच्या प्रचंड यातनांपेक्षा पोलिसांना आपली प्रतिमा महत्वाची वाटली! रास्ता रोको आंदोलन ही काही केवळ त्या एका घटनेची प्रतिक्रिया होती असं नाही. तर अलीकडच्या अनेक घटनांबद्दलची जनतेच्या मनातल्या संतापाची एकत्रित अन् प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती. सामूहिकपणे दिलेला तो इशारा होता. राज्यातल्या कोणत्याही शहरात जा, कायद्याचा, खाकी वर्दीचा मुळीच धाक उरलेला नाही हे सर्वसामान्यांचं मत बनलंय. काल हा जमाव असा मनातून पेटला नसता तर सरकार तरी फास्ट ट्रॅक एवढं वेगानं हललं असतं का? ज्या दिवशी आंदोलन झालं, त्याच दिवशी एका बलात्कार प्रकरणाचा निकाल ३२ वर्षांनंतर लागल्याची बातमी होती. म्हणजे न्यायालय, कायदे यावरचा विश्वास कमी होत चाललाय. न्यायालयात होणारा विलंब म्हणजे न्याय न मिळण्यासारखंच आहे. याचा अनुभव लोकांना येतोय, म्हणून आंदोलनकर्त्यांनी आरोपीला आमच्या हाती द्या अशी मागणी केली. ती गैर असली तरी ती त्यांना करावीशी वाटणं हे गंभीर आहे. याचाही विचार व्हायला हवाय! असंच होत राहिलं अन् सहनशक्तीचा अंत झाला, तर लोक कायदा हाती घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. अशा नराधमांना कायद्याचा धाक बसावा यासाठी राज्य सरकारनं २०२२ मध्ये निर्माण केलेला 'शक्ती कायदा' केंद्रात पडून आहे. तो अंमलात आणायला हवा. राज्यात एक ना दोन अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यांचा निकाल प्रलंबित आहे.
महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. लहानग्या मुली, चिमुकली मुलं सुद्धा सुरक्षित नाहीत. अजून किती वेळा हे सिद्ध व्हायला हवंय? बदलापूर-ठाणे नंतर डोंगराळे-मालेगाव, वडगाव पान- संगमनेर,  नसरापूर-भोर, चाकण-पुणे, पर्वती-पुणे, थेऊर-पुणे, जोडभावी पेठ-सोलापूर.... जवळपास दिवसागणिक एक शिसारी यावी अशा घटना राज्यात सतत घडताहेत. आणखीन किती वेळा अशा भयानक घटना घडण्याची वाट पहायची? राज्यकर्ते नेहमीप्रमाणेच कडक कारवाई करणार, फाशी देणार, यंव करणार अन् तंव करणार असले फिल्मी डायलॉग मिडियासमोर मारण्यातच मग्न आहेत. करत काहीच नाहीत. एकामागोमाग एक निष्पाप आयुष्यं उद्ध्वस्त होताहेत. कोणाला काय पडलंय? बदलापूर प्रकरणातला आरोपी संस्थाचालक तुषार आपटे याला तर भाजपने थेट स्वीकृत नगरसेवक म्हणूनच निवडलं होतं. निव्वळ बेशरमपणा! तुमचे जीव जाऊ द्यात, आम्ही आमचं राजकारण पुढे रेटत राहतो. भयंकर आहे सगळं. लाज, लज्जा, शरम जनाची नसली तरी मनाची असेल, तर 'तत्काळ राजीनामा द्या...!' अशी कीर्तने, प्रवचने देताना आम्ही फडणवीस यांना पूर्वी बरेचदा पाहिलंय. गृहमंत्री अन् मुख्यमंत्री म्हणून सातत्याने ते ठार अपयशी ठरलेत. कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय, अकार्यक्षम नि असंवेदनशील लोक आहेत. ही घटना काही तासात विसरली जाइल , बातमी म्हणून चार दिवस लोकही चघळतील, कारण शेजारच्या घरात झालेलं दुःख आम्हाला होत नाही, आता तर भावकी पण १३ दिवसाची वाट पाहत नाही, दुःखाचा डोंगर मुलीच्या कुटुंबियांच्या आयुष्यात आलाय, बाकी वेदनांवर फुंकर घालेल जरी हा काळ तरी मुलीचं 
काय चुकलं हे शोधण्याचं काळीज होत नाही, काल कोणी दुसरं आज या चिमुरडीवर उद्या आणखी कोणी तिसऱ्यावर हा प्रसंग येतच राहणार. कारण व्यवस्थेत बसलेले आंधळे नि बहिरे तर आहेतच पण लुळे नि लंगडे ही झालेत, त्यांचा वचक राहिलाच नाही म्हणून तर एकानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं प्रकरण बाहेर येत जातंय, कोणाला भीतीच राहिली नाही, सारं काही घडत जातंय बिनधास्त बेफिकिरपणे! चौरंगा नाही भर चौकात जिवंत जाळलं पाहिजे. नराधमाने चार वर्षांचं लेकरू हंबा बघायला नेलं नि अत्याचार करून शेणात पुरलं, एवढी हैवानी मानसिकता येते कुठून...? गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुत्री सुटतात कशी मोकाट...सरकार, आता सरळ ठोका, कायदाच करा तसा, तरच जरब बसेल...!
अशा घटना घडणार नाहीत, याबाबत समाजानंच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. नट्याचं अंग हलवणं, असासे-उसासे टाकणं हे केवळ तरुणांचीच नव्हे, तर म्हाताऱ्यांचीही विकृत वासना चाळवण्यासाठीच असते. कायद्याचे रक्षक पोलीस, वकील, न्यायाधीश अन् ज्यांच्याबद्धल परंपरेनं आदरभाव जोपासला जातो, अशा शिक्षक, प्राध्यापक, मार्गदर्शक व्यक्ती यांचं अत्यंत गैरचित्रण पद्धतशीरपणे हिंदी चित्रपटातून, साहित्यातून होत असतं आणि त्याबद्धल कुणीही, कधीही संताप व्यक्त केलेला नाही. वासनाकांडे धगधगली वा धगधगताहेत ती बघितल्यावर चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. दुरदर्शनपुढे आई-बाप-मुलं या सगळ्यांत रंगू लागलीत, तर आपल्या घराचा सिनेमा का होणार नाही? जे हरामखोर यात गुंतलेत. त्यांना जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाज का पुढाकार घेत नाही? मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणंच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजानं का घेऊ नये. महिलांनी, समाजानं गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गाला आनंद होईल. प्रसिद्धीमाध्यमं अशा बाबी रवंथ करत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली, महिलांनी दाखवायला हवी. ही गोष्ट काळजात दुःखाचा वणवा उठवणारी आहे. मस्तकात आग पेटवणारी आहे. सामाजिक संवेदना तर केव्हाच मेल्यात. अशा प्रकारानंतर प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या पण तसं झालंच नाही. घराचं थिएटर अन् टीव्हीवरचा नंगानाच सहकुटुंब सहपरिवार पाहणाऱ्या समाजाला त्यातली बीभत्सता कशी जाणवणार? त्या निरागस मुलीवर झालेला अत्याचार हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. चिमुरडीवर झालेला अत्याचार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतो. 
चौकट....   *पौरुष्यच कापायला हवंय!*
बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटत नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यायला हवं. लिंगपिसाटाच्या, अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. हे दाखवून द्यायला हवं. जोवर आपल्या अब्रूच्या अंगारानं ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशांना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर ती आता वर्तमान कथाही आहे. 'माझी अब्रू तू लुटलीस तुझी अब्रू मी चव्हाट्यावर लुटणार...!' म्हणून स्त्री बेडरपणे उभी राहिली, तर भल्याभल्याची पाचावर धारण बसेल. आज ना उद्या हे होणारच आहे! अत्याचारी, लिंगपिसाट पुरुषाचं पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याचं अधूनमधून वृत्तपत्रातून वाचनात येतं. डिंपल कपाडिया-नाना पाटेकर असलेल्या कुठल्यातरी हिंदी सिनेमात हे प्रकर्षानं दाखवलं होतं. जयवंत दळवींच्या 'पुरुष' मराठी नाटकात तर हे केव्हाच सांगितलं आहे!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

नसरापूरचा नरकासुर.....!

"चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी, शुष्क भावनांनी, संवेदना संपलेला समाज जागा झाला. त्या बिचाऱ्या अज...