हा जनसंघ-भाजप कार्यालयाचा पत्ता होता...! हा पत्ता राजकारणातल्या सात्विक, सतशील, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा पत्ता होता. इथं स्वच्छ, चारित्र्यवान, सेवाभावी कार्यकर्त्यांची उठबस असायची. मूल्याधिष्ठित राजकारण केलं जायचं. वैचारिक बैठक असलेल्या कार्यकर्त्यांना हे मंदिर वाटायचं. त्यामुळं त्याचं पावित्र्य राखलं जायचं. मात्र जेव्हा सत्ताचाटण लाभलं, तेव्हा त्यालाबाजारू रूप आलं. ज्यांना आवर्जून टाळलं जायचं, त्यांचीच आज गळाभेट होऊ लागली. पत्ता बदलला आणि त्यातली सात्त्विकता संपली. रंगसफेदी झाली, लाली-लिपस्टिक लावली गेली. मग या वरलिया रंगा भुलून हौशे-गौशे-नवशे गोळा झाले. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणत साधनसुचिता जपणाऱ्या पक्षाचं स्वरूप 'भगवी काँग्रेस' बनलं. मग त्याचे सारे गुण, अवगुण अंगी भिनले. सच्च्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होऊ लागली आणि व्यवहारी, बाजारू कार्यकर्त्यांचा जमावडा तयार झाला. मूळ निष्ठावंत कार्यकत्यांची घुसमट सुरू झाली. बाहेरून येणाऱ्या उपऱ्यांचं रेड कार्पेटवर स्वागत केलं जाऊ लागलं. सन्मानाची पदं त्यांना दिली जाऊ लागली. निष्ठावंतांची मात्र अवहेलना सुरू झाली.
-----------------------------------------
गैरो पे करम, अपनो पे सितम l
ए जाने वफा, ये जुल्म ना कर ll
१९६८ मध्ये आलेला 'आंखे' नक्कीच पाहिला असेल. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं हे गीत आज नक्कीच आठवणार. 'ही मॅन' धर्मेंद्रकडं आशाळभूत नजरेनं पाहणारी माला सिन्हा आणि त्याच्या जोडीला लतादीदींचा अजरामर आवाज या गाण्यातून एका प्रेमिकेचं दुःख व्यक्त होतं. भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदार, निष्ठावंत कार्यकर्ते देवेंद्रजींना हेच म्हणत आहेत. आमच्याकडं दुर्लक्ष करू नका. आम्हाला अंतर देऊ नका. ते त्यांनी ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पाहायला मिळाला होता. कसब्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात तब्बल २८ वर्षानंतर भाजपचा पराभव झाला. आपल्या माणसांना दुखावून जगात कोणीही सुखी होत नाही. पैशानं हवा तसा निकाल आपल्या पदरात पडून घेता येत नसतो. कसबा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल अजिबात धक्कादायक नव्हता. या निवडणुकीत काय होणार, याचा साधारण अंदाज आला होता. फक्त 'पोपट मेलाय' हे सांगायला कोणी तयार नव्हतं. इथं रासनेंचा पराभव झाला नव्हता तर आपणच पुण्याचे सर्वेसर्वा असं समजून वागणाऱ्या, कोल्हापूरहून आयात केलेल्या चंद्रकांत पाटील यांचा हा पराभव होता. ते मुंबईचे, तिथं त्यांना काही करता आलं नाही, मग गिरणी संपानंतर कोल्हापुरात आलेल्या पाटलांना तिथंही काही जमलं नाही. सत्ता आणि मंत्रिपद उपभोगलेल्या पाटलांना स्वतःचा मतदारसंघ नाही. मग त्यांनी मेधा कुलकर्णी आणि इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हक्काचा कोथरूडचा मतदारसंघ बळकावला. तिथून निष्ठावंत भाजप मतदारांच्या साथीनं सत्ता मिळवली. अभाविपचे कार्यकर्ते आणि अमित शहांशी जवळीक एवढ्याच भांडवलावर त्यांनी आपलं बस्तान बसवलं. स्थानिक पक्षासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्याभोवती जमणाऱ्या पिलावळीला जमवून निष्ठावंत कार्यकर्त्यांना दूर लोटलं. त्यांनाच पक्षातली आणि सत्तेची सारी पदं बहाल करून आपला गट मजबूत केला.
ज्यांनी यापूर्वी कसब्यातून निवडणुका लढवल्या, अरविंद लेले यांच्यापासून मुक्ता टिळक यांच्यापर्यंत साऱ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं त्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना प्रचारापासून दूर ठेवलं होतं. ज्याचा कसब्याशी काहीही संबंध नाही अशा मतदारसंघ बाहेरच्यांच्या हातात प्रचाराची सूत्रं दिली. त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांनी दूरच राहणं पसंत केलं. ही निवडणूक आपल्या हातातून निसटतेय असं लक्षांत आल्यावर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची सूत्रं हाती घेतली. त्यांनी जळगावच्या महाजनांच्या हजारएक कार्यकर्त्यांना त्यासाठी जुंपलं. पण वेळ निघून गेली होती. हा खरंतर चंद्रकांत पाटलांनी हा पराभव झाल्यावर पुण्याचे पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. 'who is Dhangekar?' असं विचारून त्यांनी ही निवडणूक घालवली. कसब्यातल्या निकालातून पुण्यातल्या मतदारांनी चंद्रकांत पाटील यांचं नेतृत्व नाकारलंय. पुण्यातल्या कोणत्याही भाजप नेत्याशी बोलल्यावर किंवा महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी बोलल्यावर त्याला चंद्रकांत पाटील यांच्याकडून कशाप्रकारे ट्रिटमेंट दिली जातेय, हे ऐकल्यावर येत्या काळातल्या सगळ्याच निवडणुका पुण्यात भाजपसाठी अवघड जातील असं वाटतं. कसब्याच्या या निवडणुकीचा चंद्रकांत पाटलांनी सर्व्हे केला होता. या सर्व्हेच्या आधारावरच हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. असं सांगितलं गेलं पण तो सर्व्हे कोणी केला, हे पक्षानं जाहीर करावं आणि त्यातले निष्कर्ष कसब्यातल्या मतदारांसमोर मांडावेत. कारण अशाप्रकारचा सर्व्हे ही पाटलांसाठी आणि भाजपसाठी पळवाट झालीय. सर्व्हेची ढाल करून पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर कायमच अन्याय करायचा आणि आपल्या पिलावळींना सत्तेची पदं, उमेदवाऱ्या द्यायच्या असा प्रकार गेली काही वर्षे होतोय. शहराचे खासदार असलेल्या गिरीश बापटांना जाणीवपूर्वक निर्णयप्रक्रियेतून दूर ठेवायचं. शहराध्यक्षपद भूषवलेल्या आणि कसब्याचीच नव्हे तर शहराची रेष न रेष माहीत असलेल्या योगेश गोगावले, विजय काळे आणि इतरांना बाजूला ठेवायचं, त्याचा हा परिणाम आहे हे सांगण्यासाठी राजकीय तज्ज्ञाची गरज नाही. सलग चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊनही स्वतःच्या प्रभागात ज्याला निर्णायक आघाडी घेता येत नाही. तो जर एखाद्या सर्व्हेच्या आधारावर निवडणुकीत जिंकेल, असं वाटणं अजब म्हणावं लागेल!
सत्ता चाखल्यापासून भाजपची एक वेगळीच शैली तयार झालीय. उपद्रव मूल्य नसलेल्या, जनतेत काहीच स्थान नसलेल्या व्यक्तीला मोठं करायचं. एखादं पद मिळालं की, तेच या अशा लोकांसाठी घबाड मिळाल्यासारखं असतं. कसब्यात उमेदवार देताना यापेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. तुलनेत स्वतःची 'लोकसेवक' अशी प्रतिमा निर्मिती करण्यात यशस्वी ठरलेले रविंद्र धंगेकर पहिल्यापासून प्रचारात आघाडीवर होते आणि निकालाच्या फेऱ्यांमध्येही आघाडीवरच राहिले. त्यांचा पक्षबदल लोकांना जाचला नाही. आधी शिवसेना मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि नंतर काँग्रेस अशी त्यांची वाटचाल झालीय. भाजप येण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला गेला. पुण्यातला भाजप म्हणजे मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, गणेश बीडकर आणि हेमंत रासने हेच, हे काही योग्य नाही. धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले आणि इतर असे सक्षम कार्यकर्ते पुण्यातल्या भाजपचं नेतृत्व करायला आणि विविध पदांवर चांगलं काम करायला सक्षम नेते आहेत. पण त्यांचा विचार का होत नाही, त्यांना दरवेळी का नाकारण्यात येतं हे शोधलं पाहिजे. हवं तर भाजपनं त्यासाठी एक सर्व्हे करावा. ज्याला आपल्या प्रभागात मतदान घेता येत नाही त्याला आपण सलग चार टर्म स्थायी समिती देऊन चूक केली हे सुद्धा मनातल्या मनात का होईना पक्ष नेतृत्त्वानं मान्य करावं. कसब्यातल्या निवडणुकीतून बोध घेऊन शहरात सतत वेगवेगळ्या पोस्टरवर दिसणाऱ्या या चार-पाच स्थानिक नेत्यांना तूर्त विश्रांती द्यायला हवीय. नाहीतर आज कसबा गेला उद्या पुणं हातातून जाईल! चुका शोधल्या पाहिजेत आणि त्या सुधारल्या पाहिजेत. पण भाजपच्या नेतृत्त्वाला 'आम्ही सर्वगुणसंपन्न आहोत; आम्ही चुकूच शकत नाही...!' असा जो भ्रम झालाय तो दूर केला पाहिजे. आता असं सांगितलं जातंय की, बापट यांच्या जागी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार आहेत मात्र कसब्याच्या या निवडणुकीतून बोध घेऊन ते तसं धाडस करणार नाहीत. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी द्यायला नकोय नाहीतर त्यांचाही पराभव होऊ शकतो. यापुढेही महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र राहील असं वातावरण आहे. असं झालं तर भाजपाला जड जाईल.
No comments:
Post a Comment