Friday, 7 August 2026

काँग्रेस : पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा अन्...

'यह मकान सच्चे सच्चे सेवकों याने खिदमतगारोंका निवास बने...!' महात्मा गांधींचे हे उद्‌गार आहेत, काँग्रेस भवनमध्ये लावलेल्या त्यांच्या हस्ताक्षरांतील संदेश! महात्मा गांधींच्या या विचारांशी आजची काँग्रेस कटिबद्ध आहे का? या त्यांच्या विचाराप्रमाणे मार्गक्रमण करते आहे का? याचं उत्तर नाही, असंच आहे. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, काकासाहेब गाडगीळ अशा आणि त्यापूर्वीही न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, शंकरराव देव, मामा देवगिरीकर अशा मंडळींनी कॉंग्रेस पक्षाला एक उच्च परंपरा निर्माण करून दिली आहे. ती परंपरा अगदी विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांच्यापर्यंत होती. मात्र, शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर सुरेश कलमाडी यांचा प्रवेश झाला अन् हळूहळू ती उच्च परंपरा संपुष्टात आली.
कलमाडींच्या राजकारणाला प्रारंभी फारसा प्रतिसाद लाभला नाही. कारण गाडगीळ आणि प्रकाश ढेरे यांनी पक्षावर पक्की मांड ठोकलेली होती. आज जे मोहन जोशी कलमाडींच्या विरोधात आहेत ते पूर्वी कलमाडींचे प्रतिनिधी म्हणून ढेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आव्हान देत होते. प्रसंगी कलमाडींनी जयंतराव टिळकांशी समझोता केला. हळूहळू पक्षावर ताबा मिळविलेल्या कलमाडींनी गाडगीळ ढेरेंना हटविण्यासाठी शिवरकर, रणपिसे, विजय नालम, वस्ताद रियाझ यांचा वापर केला. ढेरे मागे हटणारे नव्हते त्यांनी पक्षाने लादलेल्या सुरेश शेवाळे यांचा पराभव करून दिवाकर ऊर्फ पोपटराव खिलारे यांना महापौरपदावर निवडून आणले. पक्षाचे बहुमत असताना पक्षाचा झालेला पराभव हे पक्षातल्या दुहीचे चित्र स्पष्ट करणारे होते. अशाच घडामोडी बाबूरावजी सणस, शिवाजीराव ढेरे, भाऊसाहेब शिरोळे, यांच्या काळातही झाल्या होत्या. या तिघांचीही शहराच्या आणि पक्षाच्या राजकारणावर जबरदस्त पकड होती. खिलारे यांच्या विजयानंतर गाडगीळ, ढेरे यांचे वर्चस्व वाढण्याऐवजी कमी झाले. त्यातच गाडगीळांचे निधन झाल्याने ढेरे एकाकी पडले. सहकारी दुरावले, ज्यांना आपल्या राजकीय आयुष्यात विरोध केला त्या शरद पवारांच्या आश्रयाला ढेरेंना जावे लागले. कलमाडींना पक्षात विरोधक असा राहिलाच नाही. त्यामुळे कलमार्डीचे वारू चौखूर उधळले तेव्हापासून ते आजपर्यंत!
जायंट इंटरनॅशनल या संस्थेतून कामाला प्रारंभकेलेल्या कलमाडींना शरद पवारांनी राजकीय आश्रय दिला; पण ते डोईजड होताच त्यांना दूर केले. आज कलमाडींच्या विरोधात उभे ठाकलेले मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, शरद रणपिसे, कुण्याकाळी त्यांचे समर्थक होते, हे विसरता कामा नये. कलमाडींच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये यांचा मोठा सहभाग असायचा; पण राजकारणात कुणी कुणाचे कायमचे मित्र वा कायमचे शत्रू असत नाही. त्याप्रमाणे कालचे मित्र-सहकारी आज विरोधात उभे आहेत; पण ही सारी मंडळी स्वप्रकाशित आहेत. याचा अर्थ ही पक्षाची मंडळी आहेत. कुण्या नेत्यांची नव्हे हे स्पष्ट करायला हवे.
आज शहराध्यक्षापासून विरोधी पक्ष नेत्यांपर्यंतची मंडळी ही पक्षाची म्हणवीत असली, तरी ते कलमाडीचे समर्थक म्हणूनच त्यांची ओळख आहे. किंबहुना त्यांची मानसिकताच तशी निर्माण झाली आहे. नाहीतर पक्षाने कलमाडींना निलंबित केले तरी पक्षाच्या वरिष्ठाकडे जाऊन कलमाडींची रद्दबदली करायची त्यांना हिंमतच झाली नसती. पुण्यातली काँग्रेस नेतृत्वहीन बनली आहे, असा कांगावा करण्याचे कारणच नाही. नेतृत्वबदल ही एखाद्या संस्थेत, राजकीय पक्षात होणारी घटनाच समजली पाहिजे. पक्षाने कलमाडींना काढून टाकल्यानंतर काँग्रेस भवनात गोंधळ घातला गेला. ते कलमाडींनी पेरलेलेच उगवले असे म्हणावे लागेल! शहराध्यक्षांना सर्व पक्षकार्यकर्ते हे आपल्या पाल्याप्रमाणे असतात. त्यांनी पक्षातल्या साऱ्यांना आपुलकीने जवळ केले पाहिजे. गोपाळ तिवारी व इतर काही सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेली ही मागणी काही गैर नाही. उल्हास पवारांना धमकावल्यानंतर त्याचा पाठपुरावा पक्षाने करायला हवा पण तसे झालेले नाही. या साऱ्या बाबी पक्षनेतृत्वाचा उणेपणा दाखविणाऱ्या आहेत. वजाबाकीच्या राजकारणापेक्षा बेरजेचे राजकारण करायला हवे.
आम्ही पक्षाचे पाईक आहोत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे कार्यकर्ते आहोत असे खरेतर म्हणायला हवे; पण आमच्यावर पतंगराव कदमांचे, नारायण राणेचे नेतृत्व लादू नका, असे म्हणणे म्हणजे पक्षाच्या नेतृत्वावर दाखविलेल्या अविश्वास आहे हे सोयीस्कररीत्या विसरले जाते आहे; पण कलमाडींच्या प्रेमात आपण काय करतोय याचे भान राहिलेले नाही. म्हणूनच नेतृत्वाचा डांगोरा पिटला जातोय. कलमाडी यांनी नेतृत्वाच्या ज्या कल्पना, संस्कृती, रुढी, परंपरा निर्माण केल्या आहेत त्या पूर्ण करण्याची क्षमता इतर कुणामध्ये नाही. कलमाडींनी निर्माण केलेले चाटुगिरी, लाटूगिरी, काटुगिरी नव्या नेतृत्वाला करता येणार नाही. म्हणूनच येणाऱ्या नेतृत्वाला रोखण्याचा आहे. कुणाचेही नेतृत्व द्या, आम्ही पुन्हा पक्षाची सत्ता महापालिकेत आणू, असा निर्धार करायला हवा, तरच ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातील अन्यथा कलमाडींच्या दारात झुलणारे हत्ती की, आणखी कुणी... हा ज्याचा त्याने विचार करायला हवा.

No comments:

Post a Comment

कोथरूडचे शिल्पकार: शशिकांत सुतार

" कोथरूड महापालिका आणि पुणे म्युनिसिपालीटी....!" असा मथळा असलेली बातमी सकाळ वृत्तपत्रानं १९७९ साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुक...