बालगंधर्व रंगमंदिर,..... संध्याकाळचा कार्यक्रम सुरू होता. संगीत नाटकाच्या परंपरांचा गौरव समारंभ असल्यानं धूप लावून रंगमंदिर सुवासित केलं होतं. सारे साहित्य संमेलनाध्यक्ष अन् नाट्य संमेलनाध्यक्ष हजर होते. पडदा उघडला. नांदी सुरू झाली... श्रोते त्यात मग्न असतानाच अचानक प्रेक्षकांमधून येत आपल्या खड्या आवाजात नांदी गात छोटा गंधर्व हे रंगमंचावर आले. रंगमंचावरून नांदी गाणाऱ्या नव्या गायकांना काय होतंय हे समजतच नव्हतं, ते भेदरून गेले होते. रंगमंदिरात अंधार असल्यानं काय होतंय, कोण गातंय हे रंगमंचावर समजत नव्हतं. पण छोटा गंधर्वांनी चढ्या आवाजात सूर लावला होता. ते आपल्याच गानविश्वात मग्न होऊन गात होते. सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणं अशी अत्यंत बहारदार नांदी त्यांनी रंगमंचावर येऊन ऐकवली. उपस्थित नव्या पिढीतले गायक अभिनेते त्याचं ते गाणं पहिल्यांदाच अनुभवत होते. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सर्वांनी उभं राहून त्यांना त्यांच्या नांदीला, गायकीला अभिवादन केलं. तो क्षण विसरणं शक्यच नव्हतं. त्यांना त्यांच्या घरी भेटलो होतो. प्रभात रोडवर असलेल्या निमुळत्या गल्लीतलं त्यांचं घर, त्यांचं ते सलग सिगारेट ओढणं अन् वैभवशाली मराठी संगीत रंगभूमीबाबत गप्पांची मैफिल नेहमीचच झाली होती. काही वर्षांपूर्वी पुण्यात शांतीलाल सुरतवाला आणि सुनील महाजन यांच्या पुढाकारानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष यांचा एकत्रित सत्कार बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला होता. त्याच्या स्मरणिकेची जबाबदारी माझ्याकडे होती. त्याचं प्रकाशन व्यंकटेश माडगूळकर यांच्याहस्ते झालं होतं. त्याच्या प्रकाशन समारंभात ही सारं घडलं होतं.
१० मार्च १९१८ रोजी जन्मलेले छोटा गंधर्व हे मराठी संगीत रंगभूमीवरचे नामवंत गायक नट. ‘सौदागर’ ह्या नावानंही ते परिचित होते. त्यांचं संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावजवळच्या भाडळे गावी त्यांचा जन्म झाला. त्याचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नाही. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बालमोहन संगीत मंडळी’चे मालक दामूअण्णा जोशी हे एका गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली आणि त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी सौदागर आणि त्यांचा धाकटा भाऊ पितांबर यांना आपल्या बालमोहन संगीत मंडळीत आणलं. ‘बालमोहन संगीत मंडळी’नं रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा ह्या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका वयाच्या १० व्या वर्षी मिळाली आणि तीही नायिकेची. पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग २२ जुलै १९२८ ला झाला. सौदागरांच्या सुरेल आवाजानं आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या गंधर्वतुल्य आवाजामुळे दामूअण्णांनी आपल्या संस्थेतर्फे होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत सौदागरांचा उल्लेख ‘छोटा गंधर्व’ असा करायला सुरुवात केली आणि नंतर हेच नाव त्याचं रूढ झालं. ‘बालमोहन’च्या अन्य काही नाटकांत कामं केल्यानंतर, ह्या संस्थेनं सादर केलेल्या संशयकल्लोळ ह्या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली. त्यांनी गायलेल्या अनेक पदांना प्रेक्षकांकडून पसंती मिळत असे. संगीतकलेत सौदागरांची अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून दामूअण्णांनी सौदागरांना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळेल, अशी व्यवस्था केली. पंडित बळवंत गोवित्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे इथले गायनशिक्षक गणेशबुवा पाध्ये ह्यांनी त्यांना आरंभीचं संगीत, गाणं शिकवलं. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम त्यांना मिळाली. कृष्णराव गोरे, अब्दुल करीमखाँ, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभला. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणं शिकले. अनेकांच्या गायकीचे अनुभव आणि संस्कार लाभल्यामुळं जिथं जे काही चांगलं गवसेल, ते घेऊन आपल्या स्वत:च्या गायकीचे सुंदर रसायन त्यांना घडविता आलं. नाटकाच्या व्यवसायाला १९३२-३३ च्या सुमारास वाईट दिवस आले होते. ‘बालमोहन संगीत मंडळी’लाही ह्या परिस्थितीची झळ लागली होती. तथापि आचार्य अत्र्यांसारखा प्रभावी नाटककार ह्या संस्थेच्या मागं उभा राहिल्यामुळं ही संस्था त्या आपत्तीतून बचावली. अत्र्यांचं पहिलं नाटक 'साष्टांग नमस्कार' बालमोहननं १९३३ साली रंगभूमीवर आणलं. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ह्या नाटकात सौदागरांनी नायिकेची म्हणजेच त्रिपुरीची भूमिका केली होती. त्यानंतरच्या घराबाहेर चा पहिला प्रयोग १९३४ मध्ये झाला. ह्या अत्रेकृत नाटकातल्या पद्मनाभच्या भूमिकेपासून त्यांनी स्त्रीभूमिका करणं सोडून देऊन नायकाच्या भूमिका करायला सुरुवात केली. साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर नंतर भ्रमाचा भोपळा, १९३६ मध्ये लग्नाची बेडी १९३६ मध्येच उद्याचा संसार, वंदे मातरम्, मी उभा आहे अशी नाटके ‘बालमोहन’नं रंगभूमीवर आणली. ह्यात संस्थेला आर्थिक लाभाबरोबरच जी कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळाली, ती मिळविण्यात सौदागरांचा वाटा फार मोठा होता. तथापि 'मी उभा आहे' ह्या नाटकानंतर अत्रे अन्य क्षेत्रांत मग्न झाल्यामुळं ‘बालमोहन’चा एक मोठा आधार तुटला. संस्था चालवणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागलं. त्यामुळं ‘बालमोहन’मधल्या काही प्रमुख नटांनी १९४३ मध्ये ‘कला-विकास’ ही नवी संस्था काढली. त्यांच्यांत सौदागरही होते. ह्या संस्थेतर्फे नाटककार नागेश जोशी ह्यांची फुलपाखरे, मैलाचा दगड, देवमाणूस, विजय ही नाटके सादर केली जाऊ लागली. त्यातल्या मुख्य भूमिकांची आणि संगीताची बाजूही सौदागर यांनी सांभाळली. ह्या संस्थेच्या नाटकांची पदंही देवमाणूस पासून सौदागर स्वत: लिहू लागले. ह्या नाटकातले ‘चांद माझा हा हसरा’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. ‘कला-विकास’ ही नाट्यसंस्था कालांतरानं बंद पडल्यानंतर ‘भारत नाट्यकला’ ह्या संस्थेच्या सौभद्र नाटकात कृष्ण, विद्याहरण मध्ये कच, मानापमान मध्ये धैर्यधर अशा भूमिका त्यांनी ह्या नाटकांतून नायकाच्या केल्या. त्यांची कृष्णाची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. १९५१ नंतर ठेकेदारांनी ठरवलेल्या नाट्यप्रयोगांतून ते मानधनावर कामे करू लागले. त्या काळात छोटा गंधर्व संगीत नाटकांकरिता सर्वांधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक गायक नट होते. विद्याधर गोखले ह्यांच्या सुवर्णतुला ह्या नाटकाचा पहिला प्रयोग १० ऑक्टोबर १९६० ला झाला. ह्या नाटकात त्यांनी काम केलं होतं. आणि त्यातल्या पदांना संगीतही त्यांनी दिलं होतं. सौभद्र, विद्याहरण, मानापमान, मृच्छकटिक आणि संशयकल्लोळ ह्या नाटकांतूनच त्यांनी पंचविसांहून अधिक वर्षे प्रमुख भूमिका केल्या. १९७८ मध्ये त्यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला.
सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणं ही त्यांच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या असामान्य गानकौशल्यामुळे ‘स्वरराज छोटा गंधर्व’ हे नामाभिधानही त्यांना लाभलं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी संजोग, गुणिकंस, नंदबसंत, कौशी बहार, बसंती, शंकरा यासारख्या नवीन रागांच्या संकल्पना केल्या. ‘गुनरंग’ या नावानं त्यांनी बंदिशी लिहिल्या. शृंगार, सृष्टीवर्णन, ईशस्तुती, अध्यात्म असे विविध विषय त्यांच्या चिजांमध्ये आढळतात. नाट्यसंगीतासाठी शास्त्रीय संगीताची बैठक आवश्यक असून संगीतातल्या सर्व प्रकारचं सौंदर्य नेमकेपणानं टिपता आलं पाहिजे. नाटकातल्या पदाचा आरंभ अन् त्याची अखेर आकर्षक असली पाहिजे. नाट्यसंगीतासाठी क्लिष्ट रागांची योजना करू नये. प्रेक्षकांच्या अंत:करणापर्यंत सहजपणे भिडतील अशा संगीतरचना कराव्यात, अशी त्यांची मतं होती. छोटा गंधर्व यांच्याबरोबर संशयकल्लोळमध्ये रेवतीची भूमिका करणाऱ्या इंदू तुळपुळे ह्यांच्याशी त्यांनी १९३७ साली विवाह केला. सुलभा सौदागर या त्यांच्या कन्या. मुंबईत १९८० साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता. छोटा गंधर्व यांचं पुण्यात ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झालं.
No comments:
Post a Comment