Sunday, 2 November 2025

महानायकांना भिडवण्याचा प्रयत्न..!

"देशापुढील मूलभूत प्रश्न सोडविण्यापासून दूर गेल्यानं भावनात्मक मुद्द्यांना महत्त्व देण्याचा काळ आता सुरू झालाय. खरी माहिती दडवून, खोटी, विपरीत, विपर्यास्त, विसंगत माहिती लोकांच्या डोक्यात ठासून भरण्याचे काम सुरूय! देशात भाजपेयींची सत्ता आल्यापासून वल्लभभाई पटेल यांचा उदो उदो अन् पंडित नेहरू यांची निंदानालस्ती केली जातेय. त्यांच्यातील संबंधाबाबत अनेक उलटसुलट गोष्टी सांगितल्या जाताहेत. पटेलांची उभी केलेली उंच प्रतिमा न्याहाळतानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेण्याची नैतिक जबाबदारी देखील आपली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या धोरणांचा, निर्णयांचा तसंच त्यांच्या इतरांशी असलेल्या संबंधाबाबत विपरीत प्रसार-प्रचार आणि गॉसिप करण्याचा अधिकार कुणालाही असू शकत नाही. गांधीजींच्या हत्येपूर्वी संघाबाबत पटेलांचं मत सकारात्मक होतं पण त्यानंतर मात्र अत्यंत प्रतिकूल बनलं. थेट संघावर बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात सरदार पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंडित नेहरू यांच्यातील परस्पर संबंध कसे होते हे सांगणारा हा लेख आहे."
----------------------------------------------------
दिल्लीत ज्याप्रकारे प्रजासत्ताक दिनी संचलन केलं जात त्याच धर्तीवर परवा शुक्रवारी ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भव्य प्रतिमेच्या प्रांगणात प्रथमच करण्यात आलं. याच दिवशी इंदिरा गांधी यांची जी पुण्यतिथी होती ती मात्र झाकोळून गेली. कदाचित ते पुसून टाकण्यासाठीच हे संचलन केल्याचं राजकीय वर्तुळात होतेय. देशात सत्तेवर आलेल्या भाजपेयींनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या स्वयंसेवकांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची बदनामी करण्याचा जणू विडाच उचललाय. ही गोबेल्सनीती एकाबाजूला सुरू असतानाच सरदार पटेल यांची तोंड फुटेपर्यंत स्तुती करताना ते थकत नाहीत. त्याबद्धल सर्वप्रथम पाहू यात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजे महात्मा गांधी यांची हत्या होण्यापूर्वी १९४८ मध्ये सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत म्हटलं होतं, की, *"तुम्ही तुमच्याकडे असलेल्या लाठी-काठीनं कोणत्याही संघटनेला दाबून टाकू शकत नाही, लाठी-काठी तर चोर, डाकू वापरत असतात. ते दुष्कर्म करण्यासाठी त्यागोष्टी उपयोगात आणत असतात. मात्र संघ तर देशभक्ती करणारी संघटना आहे...!*  या सरदार पटेलांच्या मतप्रदर्शनानंतर ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसेनं गांधीजींची हत्या केली त्यानंतर सरदार पटेलांच्या संघाबाबतच्या असलेल्या भूमिकेत, त्याबाबतच्या त्यांच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला. हे इथं नमूद करायला हवंय!
सरदार पटेलांनी २७ फेब्रुवारी १९४८ ला पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं त्यात ते म्हणतात, *"गांधीजींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग दिसून येत नाही. मात्र हे काम हिंदू महासभेच्या कट्टरपंथी कार्यकर्त्यांनी केलेलं आढळतं आहे. हे कट्टरपंथी सावरकरांच्या नेतृत्वाखाली काम करतात. या कट्टरपंथीयांनीच हत्येचं षडयंत्र रचलेलं आहे. हे लोक गांधीजींच्या विचारधारेला आणि गांधीजींना सतत विरोध करत. या कट्टरपंथीशिवाय इतर हिंदू महासभा आणि संघाच्या स्वयंसेवकांवर हत्येबाबत संशय घेता येईल अशी परिस्थिती नाही...!"* नेहरूंच्या या पत्रव्यवहारातून पटेलांची संघाबाबतची भूमिका, हिंदू महासभाबाबतचं मतं व्यक्त होतं. जसा जसा काळ गेला तस तसा सरदारांच्या लक्षांत आलं की, गांधीजींच्या हत्येत संघाचा जरी थेट हात नसला तरी, त्यांनी देशभरात जे हिंदू-मुस्लिम विरोधातलं आणि सांप्रदायिक विद्वेषाचं वातावरण निर्माण केलं आहे. त्यातूनच गांधीजींची ही हत्या झालीय असं त्यांचं मत बनलं. त्यानंतर गृहमंत्री म्हणून सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. दीड वर्षाच्या कालावधीनंतर ती उठविण्यात आली असली तरी संघ आणि हिंदू महासभा यांना राजकीय घडामोडीत सहभाग घेता येणार नाही, असं स्पष्टपणे नमूद केलं आणि बंधनं टाकली.
१८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेलांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पत्र लिहिलं, *"गांधीजींच्या हत्येबाबतचा खटला हा अद्याप न्यायालयात सुरू आहे. त्यामुळं संघ आणि हिंदू महासभा यांच्याबाबत आताच मी काही सांगणार नाही, कोणतंही मतप्रदर्शन करणार नाही. परंतु आमच्याकडे प्राप्त झालेल्या रिपोर्ट्सनुसार, महात्मा गांधीजींच्या हत्येची जी काही घटना घडली आहे ती या दोन्ही संघटनांनी चालवलेल्या विद्वेषमुलक हालचालींनी आणि निर्माण केलेल्या विपरीत परिस्थितीमुळेच! खासकरून संघाच्या करणीचा हा परिणाम आहे. देशात असं काही वातावरण निर्माण करण्यात आलं की, अशा प्रकारची म्हणजेच गांधीजींच्या हत्येसारखी भयानक घटना घडावी. माझ्या मनांत शंका नाही की, हिंदू महासभेचा कट्टरपंथी गट गांधीजींच्या हत्येच्या कटात सामील होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चालवलेल्या हालचालींनी, प्रचारांनी भारत सरकार आणि देशाच्या अस्तित्वाला देखील धोका निर्माण झालाय...!"* श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झालेला पत्रव्यवहार हा संघाबाबतचा पटेलांचा दृष्टिकोन स्पष्ट करणारा आहे. निवडणुकीच्या काळात रामजन्मभूमीच्या नावानं उठता बसता भजन करणारे भाजपेयीं आजकाल स्वार्थासाठी गांधी-गांधी असं जप करत असतात. गांधीजींचं नाव घेताहेत. पण प्रत्यक्षात त्यांची पैतृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मात्र गांधीविरोधी जी भूमिका घेतली आणि गांधीजींबाबत जो विखारी प्रचार केला, त्यामुळं ती एक विषारी संघटना बनली आहे. गांधीजींची हत्या झाली तेव्हा संघानं मिठाई वाटली होती, असं त्यावेळी निष्पन्न झालं होतं. डॉ. केशव हेडगेवार यांच्यानंतर गोळवलकर हे सरसंघचालक होते. १९४० ते १९७३ पर्यंत त्यांनी संघाचं नेतृत्व केलं होतं. ११ सप्टेंबर १९४८ रोजी सरदारांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं.
*"भाईश्री गोळवलकर,*
*११ ऑगस्ट रोजी तुम्ही पाठवलेलं पत्र मिळालं, जवाहरलालजींनीही तुमचं पत्र माझ्याकडं पाठवलंय. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतची माझी असलेली मतं जाणता. लोकांनाही माझी ही मतं माहिती आहेत. मला आशा होती की, तुमचे लोकही या माझ्या मताचा स्वीकार करतील. पण मला असं वाटतंय की, माझ्या या भूमिकेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. त्यांच्या कार्यक्रमातही कोणत्याही प्रकारचं परिवर्तन झालेलं नाही. याबाबत माझ्या मनात कोणताही संदेह नाही की, संघानं स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या देशांतर्गत परिस्थितीत हिंदू धर्माची सेवा केलीय. अशा भागात जिथं लोकांना मदतीची गरज होती. याशिवाय अशाप्रकारच्या संघटनेची जिथं गरज होती की, तिथं संघाच्या तरुणांनी महिलांचं आणि लहान मुलांचं रक्षण केलंय, मदत केलीय. मीच काय पण कोणीही समजूतदार माणसं याबाबत शंका घेणार नाहीत. प्रश्न त्यावेळी निर्माण झाला जेव्हा बदला घेण्याच्या भावनेनं मुसलमानांवर हल्ले केले गेले. हिंदूंना संघटित करणं आणि त्यांना मदत करणं ही गोष्ट अलाहिदा पण प्राप्त परिस्थितीत हिंदूंना जो त्रास झाला त्याचा बदला निर्दोष मुस्लिम महिला आणि मुलांवर घेतला जाणं ही वेगळी गोष्ट आहे...!"* या पत्रावरून सरदार पटेलांची संघाबाबत बदललेली भूमिका स्पष्ट होते.
सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यात मतभेद होते पण त्याचा अर्थ असा नाही की, ते एकमेकांच्या विरोधात होते. मतभेद कुणामध्ये नसतात? दोन सख्या भावाभावात किंवा मित्रांमध्ये देखील असतात. एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये मतभेद असणं हे लोकशाहीचं सौंदर्य म्हणायला हवं, ते जिवंत लोकशाहीचं लक्षण म्हटलं पाहिजे. आजकाल असं चित्र रंगविण्यात येतंय की, सरदार पटेल हे नेहरूंच्या विरोधात होते. इतिहासाला अशाप्रकारे तोडूनमोडून विपरितपणे भविष्य बदलण्याचा, भावी पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तर भावी पिढीच काय वर्तमान देखील आपल्याला कधीच माफ करणार नाही! हे मात्र निश्चित! जून १९४६ मध्ये जवाहरलाल नेहरू हे कारागृहात असलेल्या शेख अब्दुल्ला यांना भेटून न्यायालयात त्यांची केस लढविण्यासाठी निघाले होते. परंतु तत्कालीन काश्मीरचे प्रधानमंत्री रामचंद्र काक यांनी नेहरु यांना ते श्रीनगर पोहोचण्यापूर्वीच त्यांची धरपकड केली होती. त्यावेळी याबाबत कुणीतरी सरदार पटेल यांना विचारलं, "सरदारसाहेब, काक यांचं काय? त्यांनी नेहरूंना अटक केलीय...!" त्यावर सरदार पटेलांनी संताप व्यक्त केला, ते म्हणाले, "काक तो हमेशा खाकमें मिल जायेगा...!" यावरून सरदारांच्या नेहरूंबाबतची भूमिका आणि त्यांची मानसिकता स्पष्ट होते.
भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर कराची इथे संपन्न झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद सरदार पटेलांनी भूषविलं होतं, त्या अधिवेशनात नेहरूंनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांची जाहीरपणे वाखाणणी केली होती, गौरव केला होता. याविषयी नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की या *"अधिवेशनात अध्यक्षस्थानी असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानात लोकप्रिय असलेले एक जबरदस्त, भारदस्त असे व्यक्तिमत्व होते त्यांनी गुजरात मध्ये झालेल्या बारडोली सत्याग्रहाच्या वेळी शेतकऱ्यांचे यशस्वी नेतृत्व करून सुकिर्ती, ख्याती प्राप्त केली होती...!"* यावरून नेहरू आणि पटेल यांचे परस्पर संबंध लक्षांत येईल. 

१८३० मध्ये गोलमेज परिषद भरली असताना ग्लोन वॉल्टन नामक एका इंग्रज पत्रकारानं  *'द ट्रेजडी ऑफ गांधी'* या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, 'मुलतान नावाच्या एका जहाजात जे भारतीय नेते बसले होते, त्यांच्यात एक चर्चा सुरू होती. ती त्यांची सारी चर्चा ही गांधीजींच्या विरोधात होती. त्यांना हे माहीत होतं की गांधीजी विरुद्ध काँग्रेसची वर्किंग कमिटीतील अनेकजण आहे आणि त्यांनी एक षडयंत्र रचले आहे. त्यांना हेही माहीत होतं की, ती वेळ येताच काँग्रेस वर्किंग कमिटीतील काही मंडळी गांधीजींना काँग्रेसमधून उखडून फेकून देतील, याशिवाय काँग्रेस वर्किंग कमिटी ही गांधींबरोबरच त्यांच्या जवळच्या लोकांना देखील काढून टाकील...!' या बातमीने त्यावेळी खळबळ उडाली होती. नेहरूंनी या अशा बातम्यांना 'हवेत केलेला गोळीबार' असं म्हणत फेटाळून लावलं हे षडयंत्र रचणारे कोण आहे त्याचा हेतू काय आहे? असा सवालही केला होता. त्याचवेळी असं सांगण्यात आलं होतं की काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांमध्ये मी आणि सभापती सरदार वल्लभभाई पटेल हे दोघे अत्यंत तापट स्वभावाचे आहेत यावरून या षडयंत्र रचणाऱ्यांमध्ये आमचेही नाव घेतले जाईल...! खरं तर सरदार वल्लभभाई पटेल हे गांधीजींचे पट्टशिष्य आणि भक्त म्हणून ओळखले जातात त्यांच्याशिवाय दुसरा कोणी असा त्यांचा भक्त वा शिष्य असेल असं मला वाटत नाही ते स्वतः कडक शिस्तीचे आणि मजबूत, सक्षम विचाराने काम करणारे होते, त्यांचं राजकारणच नव्हे तर जीवन देखील मूल्याधिष्ठित होते. पण गांधीजींचा विचार, त्यांचा आदर्श, त्यांची नीती, त्यांचे व्यक्तिमत्त्व याच्याविषयी पटेलांना खूपच भक्ती होती. पण मी असा दावा करत नाही की, गांधीजींना मी त्यांच्या आदर्शासह स्वीकारलेलं आहे. पण मला त्यांच्या अत्यंत जवळ राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. त्यांच्याविरुद्ध षडयंत्र निर्माण करण्याचा विचार देखील माझ्या मनात येऊ शकत नाही तो माझा पराभव असेल आणि गांधीजींच्या संस्कारांचाही पराभव असेल!
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य निर्मितीत सरदार पटेल आणि नेहरू यांची भूमिका आणि कार्यकर्तुत्व एकसमान होतं. दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नव्हते तर ते एकमेकांना पूरक असेच होते नेहरू हे गांधींचे आदर्श विचार राबविणारे होते तसेच, जागतिक घडामोडीबाबत राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले जे काही लोक होते त्यात नेहरूंचा समावेश होता. तर सरदार पटेल हे काँग्रेस पक्षाची संघटना आणि देशांतर्गत व्यवस्था चालविणारे कर्मयोगी होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपला वारसदार नेमताना महात्मा गांधींनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला होता. गांधीजींनी सरदार पटेलांना वारसदार म्हणून नाकारण्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे पटेलांचं वय झालेलं होतं त्यांना देशाची जबाबदारी झेपणारी नव्हती. दुसरं महत्त्वाचं कारण असं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर कठीण बनलेल्या वैश्विक परिस्थितीत भारतात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करायचं होतं त्यासाठी जागतिक दृष्टिकोन असल्याची गरज होती, ती नेहरूंकडे होती. इंग्रजांनी जेव्हा देशात कारभार करण्यासाठी जे कामचलाऊ सरकार बनवलं त्यात सरदार पटेल यांच्याकडे गृह खातं सोपविण्यात आलं होतं, आणि नेहरू यांच्याकडं विदेशमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांची एकमेकांशी तुलना करताच येणार नाही कारण दोघांनी त्यावेळी आपापली भूमिका यशस्वीपणे, मजबुतपणे पार पाडली होती. महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांच्या आश्रमात राहणारे हरीभाई उपाध्याय हे पंडित नेहरू आणि सरदार पटेल या दोघांच्याही निकटवर्ती होते त्यांनी पटेल आणि नेहरूंच्या परस्पर संबंधाबाबत आपल्या 'सरदार पटेल अँड कॉन्ट्रास्ट नेहरू' या पुस्तकात लिहिलं आहे की, 'पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांचे विचार वेगळे होते. दोघांची कार्यशैली देखील वेगळी होती. कामचलाऊ सरकारमध्ये सरदार पटेलांनी पंडित नेहरूंना आपले नेते मानायला सुरुवात केली होती. नेतृत्व मान्य केलं होतं. तर दुसर्‍या बाजूला नेहरू देखील सरदार पटेल यांचा आदर करीत होते, सन्मान करत होते. या दोघांमध्ये मतभेद आणि गैरसमजआहेत असं लोकांना वाटत होतं. काही लोकांना त्यांच्यातील मतभेद, गैरसमज वाढावेत असं वाटत होतं. परंतु सरदार यांनी कधीच अशा गोष्टीना थारा दिला नाही. प्रसिद्ध होणाऱ्या अशाप्रकारच्या बातम्यांना महत्त्व दिलं नव्हतं. दोघांची राजकारणाबाबत आपली विशिष्ठ मतं होती, त्यानुसारच ते काम करीत असल्यानं तिसऱ्या कोणी त्यांच्या पद्धतीबद्दल आलोचना करायला लागला तर दोघेही त्याच्यावर रागवत, फैलावर घेत. दोघे एकमेकांसाठी ढाल म्हणून त्याकाळी काम करत होते. एकमेकांना सांभाळून घेत होते. जेव्हा सरदार मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी आपल्या एका जवळच्या मित्राला बोलावून सांगितलं होतं की 'नेहरूंवर लक्ष असू दे, त्यांना जपा...!' एकदा नेहरूंना एक विशेष व्यक्ती म्हणाली की सरदार पटेलांनी तुमच्याविषयी कडक भाषेत टीकाटिप्पणी केली. तेव्हा नेहरूंनी त्या माणसाला बजावलं की, काही झालं ते तर मला माझ्या थोरल्या भावासारखे आहेत आणि माझ्यावर टीका करण्याचा, बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे खरंतर ते आपल्या सगळ्यांचे कस्टोडीयन आहेत..!
सरदार पटेलांना नेहरूंप्रती कोणताही आकस वा त्याबाबतची कटुता नव्हती. नॅशनल बुक ट्रस्टने सरदार पटेल यांनी लिहिलेल्या पत्रांचं संकलन करून एक पुस्तक प्रसिध्द केलंय. सरदार पटेलांचं एक पत्र पंडित जियालाल कौल जलाटी (असिस्टंट जनरल जम्मू काश्मीर, १९ जून१९४६) यांना उद्देशून लिहिलंय, *"राजकीय आंदोलनांना धार्मिक-जातीय प्रश्नांपासून दूर राखायला हवंय. मी मानतो की, नेहरू स्वतः शांतीचा संदेश घेऊन  व्यक्तिगतरीत्या काही समजुती घडविण्यासाठी काश्मीरला येताहेत. नेहरू हे हिंदूतर आहेतच पण स्वतः काश्मिरी पंडितही आहेत. ते एक कडवे देशभक्त आहेत, आधुनिक भारताचे महान नेते आहेत. असं असलं तरी ते एक माणूस आहेत त्यांच्याकडूनही काही चूक होऊ शकते. माणुसकीच्या दृष्टीनेही नेहरू उच्च कोटीचे आहेत. त्यांनी आजवर जी कामं केली, निर्णय घेतले त्यात देशासाठीची उत्कृष्ट समर्पण भावनाच दिसून येते. आपण आशा करू या की, काश्मीरचा तोडगा लवकर निघेल. आपण कुणाच्याहीप्रती कटुता ठेऊ नये...!"*  नेहरूंनी ८ ऑक्टोबर १९४७ रोजी सरदार पटेलांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं की, *"मला वाटतं की, काश्मीर समस्या सोडविण्यासाठी कोणतीही कसर आपण ठेवलेली नाही. काश्मीर प्रश्न सोडविण्याबाबत जे धोरण, जी नीती अवलंबिली आहे, त्याबाबत आपल्यात मतभेद असतील पण त्याची मला काही माहिती नाही. असं असलं तरी अनेक जणांना असं वाटतं की आपल्यात मतभेद आहेत. त्यामुळे आपल्यातील संबंध आणि आजूबाजूच्या लोकांच्या सदभावना यात दुर्दैवानं याला धक्का लागलाय. मला या गोष्टीचंही खूप दुःख झालं आहे...!"*
दुर्दैवाने स्वातंत्र्य लढ्यातील महानायकांना समोरासमोर भिडवून आपण खरंतर त्यांच्या समर्थकांचे गट निर्माण करतोय आणि त्याबरोबरच या दोन महानायकांचं कार्यकर्तृत्व कलंकित करतो आहोत. त्यांच्या त्यागावर शिंतोडे उडवीत आहोत. याची जाणीवच राहिली नाही. त्याबाबतचे ऐतिहासिक संदर्भ देतानाही इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक आपापल्या बुद्धीनं, इराद्यानं आणि राजकीय हेतूनं अर्थ लावताहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप आणि काँग्रेसचे नेतेमंडळी आपापल्या बौद्धिक उंचीप्रमाणे ग्रंथालये, जुने दस्तऐवज यांचा धांडोळा घेतील. 
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

एलआयसी : मुंद्रा ते अदानी...!

"राजकारणी, सनदी अधिकारी, शेअर बाजारातले सटोडीये यांना हाताशी धरून हर्षद मेहतापासून अदानीपर्यंत सगळ्यांनी घोटाळे केलेत. असाच एलआयसी घोटाळा १९५७ साली नेहरूंच्या जमान्यात झाला होता. तो उघडकीस आणला होता राहुल गांधींचे आजोबा फिरोज गांधी यांनी! अदानीप्रमाणे उद्योगाचं साम्राज्य निर्माण करण्याच्या हव्यासापायी हरिदास मुंद्रा यांनी तो केला होता. तेव्हा न्या.छगला यांच्या चौकशीत दोषी अर्थमंत्री टी.टी. कृष्णाम्माचारी, एलआयसीचे अध्यक्ष के.आर. कामथ, प्रधान सचिव एच.एम. पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्या.विवियन बोस यांनी निवडणुकीत मुंध्रा यांनी काँग्रेसला २.५ लाख दिल्याच्या बदल्यात एलआयसीने गुंतवणूक केली असे निष्कर्ष नोंदवले. आज अदानीची चौकशी झाली तर काय होईल? पण सरकारी बँका, एलआयसीसारख्या वित्तीय संस्था यांच्यावरचा गुंतवणूकदारांचा, सर्वसामान्यांचा विश्वास उडू नये यासाठी तरी चौकशी व्हावी...!"
------------------------------------------------
वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिलंय की, बंदरांपासून ते ऊर्जेपर्यंत व्यवसाय करणाऱ्या अदानी समूहावर कर्जाचा डोंगर कोसळला होता, त्याची अमेरिकेत चौकशी सुरू होती, तेव्हा अर्थमंत्रालयाने मे महिन्यात एलआयसीच्या अदानी समूहात अंदाजे ३.९ अब्ज जवळपास ३९ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता दिली. पोस्टने वृत्त दिले आहे की, मे २०२५ मध्ये, अदानी पोर्ट्स अँड सेझने १५ वर्षांच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर द्वारे ७.७५% कूपन दराने ५ हजार कोटी रुपये उभारले, ज्याचे पूर्णपणे एलआयसीने सदस्यत्व घेतले होते. एपीएसईझेडने गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे स्रोत म्हणून त्यांची 'मजबूत आर्थिक स्थिती ' आणि 'एएए/स्थिर देशांतर्गत रेटिंग' उद्धृत करून या समस्येचे समर्थन केलंय. मात्र सरकार दरबारी त्यांना संरक्षण दिलंय. तशा अर्थाने गौतम अदानी भाग्यवान आहेत. 'आर्थिक घोटाळा’ म्हटलं की आपल्याला प्रामुख्यानं तेलगी, हर्षद मेहता, केतन पारीख, नीरव मोदी, चोकसी, मल्ल्या ही नावं आठवतात. जेव्हापासून शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंज हे सामान्य माणसांना कळायला लागलं तेव्हापासून आपण ‘स्कॅम’ सारख्या गोष्टींमध्ये रुची घ्यायला लागलोत. पण, आर्थिक घोटाळ्याचा इतिहास पाहिला तर एक लक्षात येतं की, स्वतंत्र भारताचा पहिला घोटाळा हा १९५७ मध्ये झाला होता. या आर्थिक घोटाळ्याचं नाव ‘मुंद्रा घोटाळा’ हे होतं. कोलकत्ता इथं रहाणारे उद्योगपती हरिदास मुंद्रा हे या घोटाळ्याचे सूत्रधार होते. आपले  पैसे जमा असलेलं ‘जीवन बिमा निगम’ म्हणजेच ‘एलआयसी’ला आपल्या कह्यात घेऊन हा घोटाळा केला होता. हरिदास मुंद्रा यांनी हे कसं शक्य केलं? कुतूहल म्हणून जाणून घेऊयात. हरिदास मुंद्रा हे कोलकत्ता इथं इलेक्ट्रिक बल्बची विक्री करणारे व्यापारी होते. त्यासोबतच ते शेअर मार्केटचे ‘सट्टेबाज’ सुद्धा होते. बनावट शेअर्सचा मदतीनं अल्पावधीतच त्यांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग केलं आणि मार्केटमधून पैसे उभे करायला त्यांनी सुरुवात केली. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हरिदास मुंद्रा यांनी एलआयसीसमोर त्यांच्या उद्योगात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला. लोकांचा पैसा कुठेही गुंतवणूक करण्याचा निर्णय एलआयसीची ‘इन्व्हेस्टमेंट कमिटी’ घेत असते. गुंतवणूक मागणाऱ्या कंपनीची मागील तीन वर्षांची बॅलन्सशीट तपासणं, नफातोटा पाहणं, पुढील काही वर्षातल्या योजनांचा अंदाज घेणं, कागदपत्रांची पडताळणी करणं अशी एक यंत्रणा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी कार्यरत असते. हरिदास मुंद्रा हे जेव्हा एलआयसीसमोर गुंतवणुकीचा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा मात्र ‘इन्व्हेस्टमेंट कमिटी’ला धाब्यावर बसवण्यात आलं अन् थोडी थोडकी नाही तर तब्बल १ कोटी २६ लाख ८६ हजार १०० रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. एलआयसीचं नव्हे तर अर्थखात्यातले काही सरकारी अधिकारी, राजकीय नेते यांचा सुद्धा या घोटाळ्यात समावेश होता. आर्थिक घोटाळ्यांची मोठी आकडेवारी ऐकून आज जरी आपली नजर सरावली असली तरी १९५७ च्या काळात १.२६ कोटी ही रक्कम खूप मोठी होती. आजच्या कितीतरी पट! प्रकरण संसदेपर्यंत गेलं होतं.

काँग्रेसचे खासदार फिरोज गांधी यांनी ‘मुंद्रा’ घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी संसदेत मागणी केली. फिरोज गांधी हे नात्याने प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जावई, इंदिरा गांधी यांचे पती सुद्धा होते, म्हणून हे प्रकरण आणि त्यावर्षीचं लोकसभा अधिवेशन हे जरा जास्तच गाजलं. फिरोज गांधी यांनी या प्रकरणावरून एलआयसीकडं स्पष्टीकरण तर मागितलंच; शिवाय त्यांनी सरकारचे तत्कालीन प्रमुख आर्थिक सल्लागार एच. एम. पटेल आणि अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांच्यावरही आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी एलआयसीवर दबाव टाकल्याचे आरोप सुद्धा करण्यात आले. फिरोज गांधी यांनी आपल्याकडं एच. एम. पटेल यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराची प्रत असल्याचं सुद्धा लोकसभेत सांगितलं. प्रधानमंत्री पंडित नेहरु यांनी त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एम.सी.छगला यांच्या नेतृत्वाखाली एका चौकशी समितीची स्थापना केली. फिरोज गांधी यांनी एक मजबूत पुरावा संसदेत सादर केला, तेव्हा सरकारला एक सदस्यीय चौकशी समिती नेमावी लागली. ज्यात दोषी आढळल्यानं तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णाम्माचारी यांना आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी जीवन बिमा निगम - लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन - एलआयसी याची स्थापना करून केवळ एकच वर्ष झालं होतं. त्याचकाळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं प्रकरण बाहेर आलं. त्यामुळं खळबळ उडाली होती. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कस्थित हिंडनबर्ग रिसर्चनं अदानी उद्योगावरील रिपोर्ट जाहीर करून भारतात काही दिवसांपूर्वी भूकंप घडवून आणला होता. आता वॉशिंग्टन पोस्टनं हे उघडकीला आणलंय. अदानीच्या विविध कंपन्या गळ्यापर्यंत कर्जामध्ये बुडल्याच्या गुपितासह अदानी उद्योग समूहाचा तथाकथित गैरव्यवहाराच्या उल्लेखानं त्याच्या शेअर्समध्ये खूपच पडझड झाली होती. त्यामुळं एलआयसी आणि काही सरकारी बँका अडचणीत आल्या होत्या. त्याचं कारण एलआयसीनं अदानी उद्योग समूहात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केलीय. एलआयसीनं खुलासा केलाय की, अदानी ग्रुपमध्ये आम्ही फार मोठी गुंतवणूक केलेली नाही केवळ ३५ हजार कोटीचं गुंतविलेत. एलआयसीला ही फार मोठी गुंतवणूक वाटत नाही. पण गुंतवणूकीचा हा आकडा ऐकूनच सामान्यांच्या तोंडून अबब असा हुंकार निघतो. अदानीचा फायदा करण्यासाठी एलआयसी लाखाचे बारा हजार करून बसलीय; त्यामुळं लोकांमध्ये संताप व्यक्त होतोय. अदानी गुपच्या सोबतच एलआयसीचे शेअर्स गडगडलेत. एलआयसीची अदानी ग्रुपमधली गुंतवणूक सुरक्षित आहे. आजही अदानीच्या गुंतवणूकीत एलआयसी नफ्यातच आहे. असा अदानीची बचाव करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मैदानात उतरल्यात. पण लोकांच्या त्यांच्या वक्तव्यावर विश्वास राहिलेला नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. लोकांना असंच वाटतंय की, एलआयसीत खूप मोठा घोटाळा झालाय आणि अदानीमुळं एलआयसीची हालत बिघडणार आहे. हे कितपत खरं आहे माहीत नाही, पण एलआयसी संकटात सापडल्यानं १९५० च्या दशकाच्या अखेरीस एलआयसीत झालेल्या घोटाळ्याची आठवण ताजी झालीय. काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधीही तेव्हा लोकसभेचे सदस्य होते. रायबेरली मतदारसंघातून ते निवडून आले होते. फिरोज गांधी यांचं प्रधानमंत्री नेहरू यांच्याशी फारसं जमत नव्हतं. फिरोज गांधी तेव्हा सतत नेहरूंवर आणि नेहरूंच्या सरकारवर टीका करत, कारभाराचे वाभाडे काढत. विरोधीपक्षाहून अधिक विरोध करण्यात ते अग्रभागी राहत. त्यामुळं त्यांनी उघडकीस आणलेल्या एलआयसीतल्या घोटाळ्याच्या टीकेनं नेहरू सरकार अस्वस्थ बनलं. फिरोज यांनी उघडकीस आणलेला घोटाळा हा आताच्या अदानीच्या घोटाळ्याप्रमाणेच होता. फरक फक्त एवढाच आहे की, आत्ताच्या अदानीच्या जागी तेव्हा आद्य घोटाळेबाज हरिदास मुंद्रा हे कलकत्त्यातले उद्योगपती होते. मुंद्रांच्या कंपनीचं नांव एफ अँड सी ओसलर (इंडिया) होतं. ब्रिटनची जगविख्यात लॅम्प उत्पादक कंपनी भारतीय इलाख्याशिवाय मुंद्रा यांनी आणखी दोन युरोपीय कंपन्यांतले मोठ्याप्रमाणातले शेअर्स  घेतलेले होते. जेस्सोप्स एंड कंपनी, रिचर्डसन एंड क्रूड्डस, स्मिथ स्टेनीस्ट्रीट, ओस्लो लॅम्पस, अंजेलो ब्रदर्स आणि ब्रिटिश इंडिया कॉरपोरेशन या त्या कंपन्या होत्या. याशिवाय मुंद्रा यांनी अनेक लहान लहान कंपन्या खरेदी करून आपलं साम्राज्य उभं केलं होतं. त्यावेळी भारतात टाटा, बिर्ला आणि बजाज हे तीन मोठे उद्योग समूह होते. हरिदास मुंद्रांची या तीनही उद्योग समूहापेक्षा मोठा उद्योग समूह बनविण्याची महत्वाकांक्षा होती, त्यामुळंच त्यांनी धडाधड कंपन्या खरेदी करून स्वतःचं मोठं साम्राज्य उभं करायला सुरुवात केली. पण त्यांच्या या महत्वाकांक्षेनं आणि अंथरुणापेक्षा अधिक पाय पसरल्यानं मुंद्रा हे अडचणीत आले. मुंद्रांनी स्वतःच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सटोडीयांच्या माध्यमातून वाढविले. अर्थखात्यातल्या अधिकाऱ्यांना पैसे चारून, बँकांवर दबाव आणून हे शेअर्स गहाण ठेऊन कर्जे घेतली आणि या कर्जातून कंपन्या खरेदी केल्या. पण या कंपन्या चालविण्यासाठी जी रोकड हाती हवी होती ती नसल्यानं मुंद्रांच्या साम्राज्यात गोंधळ उडाला. दुसरीकडं मुंद्रांच्या कंपन्यांनी काही खास उत्पन्न मिळवलं नव्हतं. त्यामुळं कृत्रिमरीत्या वाढवलेल्या शेअर्सचे भाव गडगडायला सुरुवात झाली. शेअर्सची घसरण थांबविण्यासाठी मुंद्रांनी स्वतःच्याच कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायला सुरुवात केली. पण त्यातून फारसा फरक पडला नाही. मग मुंद्रांनी बनावट शेअर्स सर्टिफिकेटस तयार करून त्याच्या बदल्यात बँकांकडून कर्जे घेतली. ती रक्कमही लगेचच वापरली गेली. त्यामुळं मुंद्रा 'ठणठण गोपाल' बनले! मुंद्रा काँग्रेसला सढळ हाताने देणग्या देत असत. म्हणून सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी मुंद्रांच्या पदोपदी मदत केली. त्यांनी एलआयसीतली मोठी रक्कमेची गुंतवणूक मुंद्रांच्या कंपनीत करायला लावली. वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार मुंद्रांना वाचवण्यासाठी एलआयसीनं मुंद्रांच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. एलआयसीची मदत मिळाल्यानं दिवाळं काढण्याच्या अवस्थेतल्या मुंद्रांच्या अनेक कंपन्या वाचल्या गेल्या. पण हा सगळा गैरव्यवहार फिरोज गांधी यांच्याकडं पोचला आणि त्यांनी लोकसभेत धडाका करून टाकला!
न्या. छगला यांनी नियुक्तीनंतर लगेचच कामाला सुरुवात केली. भारताच्या इतिहासात प्रथमच खुल्या वातावरणात लोकांच्या समोर चौकशीचं काम झालं. न्यायालयाच्या बाहेर मोठमोठाले लाऊडस्पीकर लावण्यात आले होते. ज्यांना न्यायालयात बसून कार्यवाही पाहायला मिळणार नाही अशांना किमान ऐकता तरी येईल! या लाऊडस्पीकरवर जेव्हा अधिकारी, मंत्री वा इतरांना जेव्हा न्यायमूर्ती फैलावर घेत तेव्हा लोक टाळ्या वाजवून प्रतिसाद देत. एचडीएफसी बँकेचे संस्थापक हंसमुख ठाकोरदास पारेख यांनी आयोगासमोर हरिदास मुंद्रांच्या गैरकारभाराची जंत्रीच सादर केली. त्यांनी स्पष्ट केलं की, मुंद्रांनी या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या दराने विकून पैसा कमावला मात्र एलआयसी द्वारा याच कंपन्यांचे शेअर्स घेतल्याने ५० लाखाहून अधिक नुकसान झालं. आणखी एक वित्तीय सल्लागार ए. डी. श्रॉफ यांनी सांगितलं की, मुंद्रांनी टाटा समूहाशी निगडित एका बँकेनं कर्ज देण्याची शिफारस केली होती पण टाटा समूहाने ती शिफारस फेटाळली होती. शिवाय आपल्या कंपन्याशी व्यापार करण्याची विनंतीही मुंद्रांनी टाटा समूहाला केली होती, पण त्यांनी त्याला नकार दिला. श्रॉफ यांनी स्पष्ट केलं की, मुंद्रा एक खोटारडा व्यापारी आहे. त्याचं आभासी साम्राज्य नेस्तनाबूत व्हायला इतका वेळ का लागला? मुंद्रांनं उलट श्रॉफ यांनीच त्यांच्या कंपनीचे शेअर घेण्याची गळ घातली होती. पण श्रॉफ यांनी पुरावे सादर केल्यानं त्यांना दोषी धरण्यात आलं नाही. हरिदास मुंद्रा एक तल्लख बुद्धीचा माणूस होता. चौकशी दरम्यान अत्यंत शालीनतेनं तो वागत होता. पण न्यायालयाने खडसावून विचारल्यानंतर त्यानं आपला गुन्हा कबूल केलं. त्यानं जे सांगितले ते धक्कादायक होतं. कलकत्ता स्टॉक मार्केटमध्ये त्याचे खूप शेअर्स होते. त्यामुळं ते स्टॉक मार्केट त्याच्या दबावाखाली होतं. त्याच्या इशाऱ्यावर कलकत्ता स्टॉक मार्केटचे चेअरमननं अर्थ खात्याचा सचिवांना त्यांच्या शेअर्स खरेदीसाठी राजी केलं होतं, ज्यामुळं कलकत्ता स्टॉक मार्केटवरचा आर्थिक भार कमी होईल. २४ जून १९५७ ला अशी बातमी पसरली होती की, मुंद्रांच्या कंपनीचे शेअर्स एलआयसी खरेदी करणार आहे. त्यानंतर चढ्या भावाने शेअर्स एलआयसीनं खरेदी केले. त्यात मोठं नुकसान झालं!
या चौकशी समितीनं सर्वंकष तपास करून १९५८ च्या प्रारंभी सादर केलेल्या चौकशी अहवालात 'मुंद्रा यांनी अर्थखात्यातल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केलाय...!' असं म्हटलं. त्याचबरोबर अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांनाही दोषी ठरवलं. कृष्णम्माचारी यांनी हा दोषारोप स्वतःच्या सचिवावर टाकून त्यातून सहीसलामत सुटण्याचा प्रयत्न केला. पण न्या. छगला यांनी या घोटाळ्यात थेट टी. टी. कृष्णम्माचारी यांना दोषी ठरवलं होतं त्यामुळं अखेर १८ फेब्रुवारी १९५८ रोजी टी. टी. कृष्णम्माचारी यांना अर्थमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर अय्यंगार यांची सुद्धा या प्रकरणात दोन वेळा चौकशी करण्यात आली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत आठ बँकांची चौकशी केली. नेहरूंच्या सांगण्यावरून ही सारी आर्थिक उलाढाल एलआयसीनं केली होती. नेहरूंच्या घोटाळ्याचं खापर कृष्णम्माचारी यांच्यावर फोडण्यात आलं आणि नेहरूंना वाचविण्यासाठी कृष्णम्माचारी यांना बळीचा बकरा केला गेला अशी चर्चा होती. या प्रकरणात नेहरूंचा थेट संबंध नव्हता त्यामुळं त्यांच्याकडं अंगुलीनिर्देश करणं शक्य नव्हतं. नेहरूंनी दुसऱ्याच वर्षी पुन्हा एकदा कृष्णम्माचारी यांना अर्थमंत्री म्हणून सरकारमध्ये आणलं. त्यामुळं या प्रकरणी नेहरू आणि टीटीके यांची साठगाठ असल्याच्या शंकेला दुजोरा मिळाला असं म्हटलं गेलं. पण एलआयसी आणि मुंद्रा प्रकरणात चौकशीअंती कोणताच पुरावा नाही म्हणून कृष्णम्माचारी यांची निर्दोष मुक्तता केली गेली. न्या.छगला अहवालानुसार हरिदास मुंद्रा यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यात मुंद्राला २२ वर्षाची सजा झाली. मुंद्रांच्या कंपन्या उध्वस्त झाल्या. मुंद्रांच्या फायदासाठी गुंतवलेला एलआयसीचा पैसा मात्र काही परत आला नाही.
आज इतक्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान उपलब्ध असूनही कोणत्याही आर्थिक घोटाळ्याची वर्षानुवर्षे सुरू असलेल्या चौकशीबद्धल ऐकत, वाचत असतो. मात्र, एम.सी.छगला यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल तेव्हा केवळ २४ दिवसांत सादर केला. या अहवालाचं वाचन हे सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आलं होतं. अहवालात हे सत्य समोर आलं की, “आर्थिक गुंतवणूक करण्यामागे एलआयसीचा शेअर मार्केटमध्ये तेजी आणणे हा उद्देश होता. पण, असं करतांना त्यांनी हरिदास मुंद्रा यांच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास केला नाही...!" एलआयसीच्या ‘इन्व्हेस्टमेंट कमिटी’नं या प्रकरणावर भाष्य करतांना हा दाखला दिला की, “हरिदास मुंद्रा यांनी १९५६ मध्ये सुद्धा काही कंपन्यांचे बनावट शेअर्स तयार करून मार्केट मधून पैसे उचलण्याचा प्रयत्न केला होता. एलआयसीनं हरिदास मुंद्रा यांना पैसे देण्याआधी आम्हाला विचारलं असतं तर आम्ही ही माहिती त्यांना नक्कीच दिली असती...!” माजी सरन्यायाधीश एम. सी. छगला यांच्या या अहवालानंतर हे स्पष्ट झालं होतं की, मुंद्रा यांना पैसे देण्यासाठी एलआयसीवर राजकीय दबाव टाकण्यात आला होता. अदानीच्या प्रकरणात काय होईल हे सांगणं कठीण आहे. पण पूर्वी हिंडनबर्ग रिपोर्टनं आणि आता वॉशिंग्टन पोस्टने ६५-७० वर्षापूर्वीच्या घोटाळ्यांची आठवण मात्र करून दिली. या ६५-७० वर्षात इथलं वातावरण काही बदललेलं नाही. त्यावेळीही राजकारणी लोक एलआयसीतल्या पैशाचा स्वतःच्या मित्रांच्या फायद्यासाठी करत आजही ती स्थिती बदललेली नाही, ती तशीच आहे. हरिदास मुंद्रा भारतातल्या सगळ्या घोटाळ्यांचा बाप समजला जातो. एलआयसीच्या हरिदास मुंद्रा प्रकरणात एलआयसीच्या अधिकाऱ्यांना खरेदीकरून कसा खेळ करता येतो हे सिद्ध केलं होतं. मुंद्रांनी त्या जमान्यात अर्थखात्यातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्वतःच्या सहा कंपन्यांना १.२६ कोटींची गुंतवणूक करायला लावलं होतं. आताशी आपण अब्जावधी रुपयांचा घोटाळा ऐकतो त्यामुळं ती रक्कम फारशी मोठी वाटत नाही. पण १९५० च्या दशकात १.२६ कोटी रुपयांची रक्कम आजच्या ५० हजार कोटीहून देखील मोठी म्हणावी लागेल. मुंद्रानं शेअरबाजारातल्या सटोडीयांनाही स्वतःच्या फायद्यासाठी बखुबी वापर केला होता. मुंद्राला हर्षद मेहता, केतन पारेख, अब्दुल करीम तेलगी आणि त्यानंतर अब्जावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांचा बाप म्हणावा लागेल. कारण भारतात सरकारी यंत्रणा हाताशी धरून भ्रष्टाचार करता येणं शक्य आहे. हे सर्वात आधी मुंद्रा यानं सिद्ध केलंय. एलआयसी खटल्यातून १९७० च्या दशकात सुटल्यानंतर गुमनाम जीवन घालवलं आणि २०१८ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची साधी कुणीही दखलही घेतली नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९


Saturday, 25 October 2025

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्र गेले काही दिवस तापलाय. लडाखची जनता आंदोलन करतेय. या 'आंदोलनरूपी तापमानवाढीमागील' खरी कारणे काय आहेत? नेमकी मेख काय आहे? हिमाच्छादित पर्वतरांगा, नितळ आणि शुचित अशादायिनी हिमनद्या, निलशार स्वच्छ दलाचे तलाव आणि शुष्क बर्फाळ वाळवंट म्हणजे लडाख. भारताच्या उत्तरेकडे वसलेला हा एक केंद्रशासित प्रदेश. अतिशीत गाठले लडाख गेल्या काही दिवस मात्र 'ताप' आहे. लडाखची जनता आंदोलन करतेय
सुरक्षेसह, राजकीयमोडींच्या, परराष्ट्रनीती, संवर्धनाच्या, आदिवासी जनजातींच्या सांस्कृतिक जतनाच्या भारताच्या विकासाच्या. मुळात लडाखचा हा विषय अलीकडचा नाही. काश्मीर संस्थानचे महाराजाचे संस्थानिक राजा हरीसिंग यांनी जेव्हा नमूद केलं होतं, तेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही प्रदेश एकाच राज्याचे भाग बनले आणि त्यांना कलम ३७० चे संरक्षण. लडाख जनजीवन, परंपरा, संस्कृती, भाषा, विषयच तर रंगरूप जम्मू काश्मीर खोऱ्यातील लोकांचे फार निराळे आहेत. आपली एक वेगळी ओळख ओळखली जाते, असे लडाखच्या लोकांना वाटे. शिवाय त्यांना एक भावना कायमस्वरूपी आलीय, फक्त स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून लढा दिलाच पाहिजे आणि लडाख क्षेत्र स्वतंत्र कुटुंब आहे. भारतीय जनता पार्टी २०१४ च्या घटनेच्या घटनानाम्यामध्ये लडाखला केंद्रशासित बनविण्याचा मुद्दा होता. ५ ऑगस्ट २०१९ ला जेव्हा जम्मू काश्मीर राज्याचे कलम ३७० रद्द स्वतंत्र जम्मू काश्मीर आणि लडाख यांना दोन केंद्रशासित प्रदेश बनवले. केंद्राच्या या निर्णयाचे लडाखच्या लोकांनी जोशात स्वागत केले होते. मात्र १ जुलै २०१९ ला जेव्हा अधिकृत रीतीने लडाख केंद्रशासित प्रदेश बनले तेव्हा लडाखला मुक्त केंद्रशासित प्रदेश बनले लडाखवासी नाराज झाले. मात्र वर्ष २०२३ पासून त्यांच्या स्थानिकांचे दोन स्वरूप बदलले आणि त्यांच्या चळवळीला वेग आला. अचानक या आंदोलनाला परत धार का आली? ते वर्षात असे काय, की या स्मारकांनी पुन्हा जोर धरला? या प्रश्नातच खरी मेख आहे.
 
सोनम वांगचूक यांनी आपण आंदोलनाचे स्वरूप उग्र करणार, असे वक्तव्य २०२३ मध्येच केले होते. ४ मार्च २०२४ रोजी अ‍ॅपेक्स बॉडी ऑफ लेह चे तीन सदस्य आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सचे तीन सदस्य अशा एकूण सहा सदस्यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिल्लीमध्ये एक बैठक केली आणि त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवल्या. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा. तसे शक्य नसल्यास किमान लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या संसद जागा देण्यात याव्यात; लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे आणि लडाख लोकसेवा आयोगाची स्थापना करून लडाखच्या युवकांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, या मागण्या सदस्यांनी केल्या. या भूभागातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक जनजातींच्या सांस्कृतिक जतनासाठी आपण या मागण्या करीत आहोत, असे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या बैठकीमध्ये त्यांना अपेक्षित असा निर्णय होऊ शकला नाही आणि म्हणून ६ मार्च २०२४ पासून पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लडाखच्या लोकांनी उपोषण चालू केले. आदिवासी जनजातींना स्वायत्तता आणि पर्यावरणाचे संरक्षण असे जे या प्रश्नाचे साधे सोपे रूप बनविले जात आहे तेवढा सरळ हा प्रश्न नाही. हे तर केवळ हिमनगाचे वर दिसणारे टोक आहे. या प्रश्नाची गुंतागुंत, क्लिष्टता आणि गांभीर्य सहज न दिसणारे व खोल रुजलेले आहे. हा संपूर्ण विषय जर साकल्याने जाणून घ्यायचा असेल तर लडाखवासीयांच्या मागण्यांबरोबरच या परिसराची भौगोलिक परिस्थिती, तेथील हवामान व जलवायू, सीमावर्ती सुरक्षेच्या दृष्टीने या भूमीचे महत्त्व आणि या संपूर्ण प्रश्नामागील चीनची भूमिका हे सर्व समजून घेणे अधिक आवश्यक आहे. वर जसे नमूद केले की, मागील वर्षापासून या मागणीने जोर का धरला ही मेख समजून घेण्यासाठी सर्वात आधी लडाखची थोडी भौगोलिक पार्श्वभूमी जाणून घेऊ. हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांच्या परिसरात पराहिमालयामध्ये स्थित असलेले लडाख हे एक शुष्क बर्फाळ पठार आणि शीत वाळवंट आहे. हा भूभाग पाकिस्तान, तिबेट आणि चीन या देशांच्या सीमेलगत असून सीमावर्ती सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि अतिमहत्त्वपूर्ण असा हा प्रदेश आहे. शुष्क पठार असले तरी हिमनद्यांचे स्रोत या परिसरात मुबलक आहेत. या गोड्या पाण्याच्या शुद्ध हिमनद्या म्हणजे जणू नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना आहेत. लडाखला जोडलेले तिबेट हे आर्क्टिक आणि अंटार्क्टिकानंतरचे सर्वात मोठे जलस्रोत मानले जाते. याला थर्ड पोल आणि ‘वॉटर टॉवर ऑफ द वर्ल्ड’ असेही म्हणतात. तिबेटमध्ये अनेक नद्यांचे स्रोत आहेत, त्यापैकी काही लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलच्या आत लडाखमध्ये आहेत.
 
गिल्गिट बाल्टिस्तान ज्यावर आज पाकिस्तान आपला हक्क सांगतो आणि अक्साई चीन जे १९६२ पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे, हे दोन्ही प्रदेश लडाखमध्येच आहेत. शक्सगम खोरे जे पाकिस्तानने परस्पर चीनला १९६३ मध्ये भेट म्हणून देऊन टाकले तेदेखील याच भूमीवर आहे. आजवर स्वतंत्र भारताने जी युद्धे लढली १९४७-४८ असो वा ६५ चे असो वा कारगिल युद्ध असो, या लढाया लडाखच्या भूमीवर लढल्या गेल्या आहेत. लडाखचे हे भौगोलिक वैशिष्ट्य एवढ्या तपशीलवार येथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे माणसाच्या वास्तव्याच्या दृष्टीने फारसे अनुकूल वातावरण नसलेल्या लडाखबाबत चीनच्या ज्या काही उघड आणि छुप्या कुरापती चालू असतात त्याचे मुख्य कारण या नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे हे आहे. आज जगभरात राष्ट्राराष्ट्रांमध्ये होणारी युद्धे आणि तणाव पाहिले तर त्यांच्या मुळाशी नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असलेल्या भूमीसाठी होणारा झगडा हे कारण असते. थोडक्यात, नैसर्गिक देणगी लाभलेली ही भूमी भारताच्या विकासाच्या, सुरक्षेच्या, परराष्ट्र व्यवहाराच्या आणि मुख्यतः चीनच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. चीनला या नद्यांवर ताबा हवा आहे. तिबेटमधील यारलुंग सांगपो म्हणजे आपल्याकडील आसामची जीवनरेखा असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीची दिशा चिंजांगकडे वळवण्याचे चीनचे मनसुबे आहेत. शिवाय, त्यांना सुमारे १३५ किमी लांबीचे पँगॉन्ग सरोवर पूर्णपणे काबीज करायचे आहे. या सरोवराचा ४० किमी भाग लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलच्या भारतीय बाजूच्या आत आहे. त्यामुळे पाण्यावर हक्क हवा म्हणून चीनची लडाखवर धूर्त नजर आहे. शक्सगम खोरे जेथे आज २५० पेक्षा जास्त हिमनद्या आहेत, ते पाकिस्तानने चीनला परस्पर दिले. त्याचे कारण येथील हिमनद्या. हिमनद्यांचे हे शुद्ध पाणी भौतिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज पेसमेकरपासून स्मार्ट फोनपर्यंत अक्षरशः प्रत्येक आधुनिक उपकरणामध्ये जे मायक्रो चिप आणि मायक्रो वेफर्स वापरले जाते ते बनविण्यासाठी शुद्ध पाणी आणि वाळू या दोन गोष्टींची आवश्यकता असते. चीन हे निश्चित जाणते की, चीनमधील नद्या आता प्रदूषित असल्याने त्यांना मायक्रो चिप सुपर पॉवर बनण्यासाठी हिमालय आणि काराकोरम भागातील या हिमनद्यांची नितांत गरज भासणार आहे. त्यादृष्टीने चीनने आधीच चीननियंत्रित लडाखमध्ये काम चालू केले आहे. सियाचीन ग्लेशियर आणि शक्सगम खोर्‍याजवळ, ज्यावर चीनची अनधिकृत सत्ता आहे, तेथील झिंगजियांग भागात जीसीएल पॉली एनर्जी होल्डिंग्स या चीनच्या कंपनीने पॉलिसिलिकॉन उत्पादन करण्यासाठी प्लांट आधीच उभारलेला आहे. त्यामुळे चीनचे हे मनसुबे रोखणे आणि आपली नैसर्गिक साधनसंपत्ती संरक्षित ठेवणे हा केंद्र सरकारसमोर जास्त गंभीर प्रश्न आहे. या नैसर्गिक संपत्तीवर भारताचा ताबा असणे हे अतिशय गरजेचे आहे.

लडाखवर चीनची नजर असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तेथील खनिज साठा. लडाखमध्ये अनेक खनिजांचा खजिना आहे. या भागात युरेनियम, लिथियम, तांबे, जस्त, शिसे अशी जवळपास ९४ प्रकारची विविध खनिजे आहेत. चीनचे मुख्य लक्ष या पठारामध्ये दडलेल्या युरेनियममध्ये आहे. युरेनियम अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. ९ फेब्रुवारी २०२३ मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भागात लिथियमचा प्रचंड मोठा साठा सापडला. आजच्या आधुनिक जगात औद्योगिकीकरणासाठी आणि देशाच्या विकासासाठी युरेनियम आणि लिथियम ही दोन्ही खनिजे अत्यावश्यक आहेत. स्मार्ट फोन, विद्युत वाहन आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविण्यासाठी लिथियम मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आजवर भारताला लिथियम आयात करावा लागत असे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया अजून या लिथियमचा अभ्यास करीत आहे; पण प्राथमिक अंदाजानुसार सापडलेला हा लिथियमचा साठा भारताला लिथियम उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर नेऊ शकतो. ज्या धातूच्या आयातीवर आज भारत अब्जावधी रुपये खर्च करतो त्याचा साठा आपल्याकडे मिळणे, ही एक मोठी बाब आहे. आज जगात लिथियम बॅटरींची मागणी प्रचंड प्रमाणात आहे. चीन लिथियम बॅटरीच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील एकूण उत्पादनातील ७०% लिथियम बॅटरीचे उत्पादन चीनमध्ये होते. आपल्याकडे सापडलेल्या साठ्यामुळे चीनला हादरा बसला आहे. या साठ्यावर ताबा मिळविण्यासाठी चीन साम, दाम, दंड, भेद सर्व काही वापरणार हे निश्चित. चीनच्या या दुष्ट खेळींचा या आंदोलनामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हात तर नाही ना हे तपासावयास हवे.

या तपशीलवार माहितीच्या पार्श्वभूमीवर आता या मागण्यांचा विचार करू. आंदोलनकर्ते आणि त्यांचे समर्थक म्हणत आहेत की, लिथियम बॅटरी निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि खाण उद्योग लडाखच्या पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. औद्योगिकीकरण तेथील जलवायूसाठी हानीकारक आहे. पर्यावरणाला वाचविण्यासाठी लडाखमध्ये औद्योगिकीकरण होऊ नये आणि त्यासाठी लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून सुरक्षा द्यावी, जेणेकरून तेथील पर्यावरण सुरक्षित राहील. ही सहावी अनुसूची म्हणजे नेमके काय? भारताचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची विविधता. भौगोलिक, भाषिक, सांस्कृतिक, पारंपरिक अनेकविध वैविध्यांनी नटलेला आपला भारतच; परंतु या विविधतेला जपत आपली एकता टिकविण्याचे शिवधनुष्य आपल्या संविधानाला पेलायचे होते. ते लीलया पेलण्यासाठी आपल्या संविधानात अनेक तरतुदी आहेत. त्यापैकी एक म्हणजे संविधानाच्या भाग १० मधील कलम २४४. याचे दोन भाग आहेत, एक पाचवी अनुसूची आणि दुसरा सहावी अनुसूची. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात अशा कित्येक जातीजमाती होत्या ज्या भारताच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या होत्या. अनेक आदिवासी जमातींना आपल्याच प्रदेशात आपल्याच पद्धतींनुसार राहायचे होते. त्यांना सन्मानाने त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जतन करता याव्यात, त्यांना नाराज न करता सामाजिक ऐक्य टिकावे आणि त्यांना मुख्य प्रवाहाशीदेखील जोडता यावे म्हणून हे कलम २४४ काही आदिवासी जमातींना स्वायत्तता देण्यासाठी बनविले गेले. संविधानानुसार त्या वेळच्या आसाममधील आणि आजच्या मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाम या चार राज्यांतील काही जमातींना सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यानुसार त्यांच्या भूप्रदेशात तेथील स्थानिक लोकांना बरेच निर्णय घेण्याची मुभा मिळते. उर्वरित भारतातील ज्या आदिवासी जमाती मुख्य धारेपासून दूर आहेत त्यांना पाचव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले गेले. लडाखचे म्हणणे आहे की, तेथेही ९० टक्के जनता आदिवासी आहे आणि त्यांची संस्कृती व तेथील हवामान, पर्यावरण आगळेवेगळे आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी लडाखलादेखील सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे. मात्र सहावी अनुसूची ही संविधानाने केवळ ईशान्येकडील राज्यांमधील अशा जमातींसाठी दिली आहे ज्या भारताच्या मुख्य धारेपासून पूर्णतः तुटलेल्या आहेत. लडाख असे पूर्णपणे तुटलेले नाही. पर्यटन व्यवसायामुळे तेथे काही महिने जगभरातून लोक येतात.

येथील जवळपास ९०% जनता आदिवासी असून चांगपा, बाल्टी बेडा, ब्रोकपा, दार्द अशा वेगवेगळ्या आदिवासी जमाती येथे आहेत. मात्र लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे २०११ च्या जनगणनेनुसार, कारगिलची एकूण लोकसंख्या १ लाख ४० हजार ८०२ असून ७६.८७% लोक धर्मांतरित मुस्लीम बहुतेक शिया आहेत. लेहमध्ये एकूण लोकसंख्या १ लाख ३३ हजार ४८७ असून त्यातील ६६.४०% बौद्ध झाले आहेत. येथे तिबेटचा प्रभाव असल्याने बौद्ध धर्म झपाट्याने पसरला आहे. शिवाय मुस्लीम धर्मांतरणदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने तेथे सहावी अनुसूची लागू करणे कितपत योग्य होईल यावर अनेक अभ्यासक शंका व्यक्त करतात. लडाखच्या आदिवासी जनजातींच्या संस्कृतीला जतन करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या मागण्या आहेत, असे सोनम वांगचूक व त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे; पण जर २०११ च्या जनगणनेचा अभ्यास केला तर या भूप्रदेशात धर्मांतरणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. ७० वर्षे कलम ३७० ची विशेष स्वायत्तता आणि सुरक्षा मिळूनदेखील सीमेलगतच्या पाकिस्तान, चीन आणि तिबेटच्या प्रभावामुळे येथील स्थानिक आदिवासी लोकांचे मोठ्या प्रमाणात इस्लाम आणि बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर झालेले आहे. म्हणजेच आदिवासींच्या संस्कृतीला विशेष स्वायत्तता फारशी उपयुक्त ठरली नाही असेच दिसते.
 
सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झाल्यावर स्थानिक लोकांना अधिक स्वायत्तता मिळते हे खरे. मात्र लडाख हे क्षेत्र चीनपासून वाचवायचे असेल तर केंद्राकडे जास्त अधिकार असायलाच हवे. त्याशिवाय केंद्र सरकार चीनला रोखू शकणार नाही. त्यामुळे या मागणीवर या दृष्टीनेदेखील विचार करायला हवा. पर्यावरणाचे संवर्धन हा आज अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहेच. त्यात वादच नाही. मात्र आजच्या आधुनिक युगात ज्या धातूचा सर्वात जास्त वापर होतो, जो धातू देशाला महासत्ता बनवू शकतो, त्यास पूर्णपणे दुर्लक्षित करणे हा पर्याय निश्चितच होऊ शकत नाही. भारताने जर आज या साठ्यांकडे आणि आपल्या हिमनद्यांकडे दुर्लक्ष केले तर चीन त्याचा गैरफायदा घेणार हे निश्चित. चीन आपल्या महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी या भूभागातील पर्यावरण नष्ट करतच आहे. याचे अनेक पुरावे आहेतच. त्यामुळे सहावी अनुसूची हा योग्य पर्याय वाटत नाही. भारत सरकारने लडाखच्या विकासाच्या दृष्टीने पावलेदेखील उचलली आहेत. कलम ३७० रद्द करण्यामागे जम्मू काश्मीर आणि लडाखमधील शुद्ध पाण्याचे स्रोत, खनिजे व येथील नैसर्गिक साधनसंपत्ती चीनच्या हातात जाऊ नये हेदेखील एक कारण आहे. भारताने दक्षिण कोरिया, जपान आणि तैवान या तीन देशांना या प्रदेशात मायक्रोचिप बनविण्याचे प्लांट उभे करण्यासाठी बोलविले आहे. आपण या तीन देशांच्या साहाय्याने लडाखमधील जलवायूला हानी न पोहोचवता विकास करण्याचे प्रयत्न करीत आहोत. लडाखमध्ये जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्लांट उभारले जात आहे. याच्या मदतीने वीजनिर्मितीसह एक वर्षात जवळपास १२ हजार ७५० टन एवढे कार्बन उत्सर्जन रोखले जाईल.
 
हे सत्य आहे की, काही देशांमध्ये अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा सापडल्यावर त्यांची भौतिक प्रगती झाली. मात्र पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले व त्याचे अन्य दुष्परिणाम जगाला भोगावे लागले; पण एखादी कृती इतिहासात धोकादायक ठरली म्हणून सोडून देण्याऐवजी त्यातील धोके ओळखून, इतिहासातून शिकून, नवीन उपाययोजना करून, धोके टाळून ती कृती योग्य पद्धतीने करणे हे सुज्ञपणाचे लक्षण असते. औद्योगिकीकरण वाईट नाही. औद्योगिकीकरणाशिवाय आज पर्यायदेखील नाही. योग्य नियम, कायदे आखून, पर्यावरणपूरक पद्धतींनी विकास साधला जावा. खनिजसंपत्ती, खाण उद्योग आणि नैसर्गिक साधनांचा वापर तारतम्य बाळगून सदसद्विवेकबुद्धीने करण्यासाठी सोनम वांगचूक यांच्यासारख्या पर्यावरणवादी अभ्यासकांनी, शास्त्रज्ञांनी, चिंतकांनी आणि आपण सर्व भारतीयांनी सरकारला मदत करावी. आपला भूप्रदेश आणि आपली साधनसंपत्ती चिनी ड्रॅगनच्या घशात न जाऊ देता त्याचा आपल्या देशाच्या विकासासाठी आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोग करून घ्यावा.
 
अजून एक बाब म्हणजे, असे नाही की लडाखच्या स्थानिक जनतेचा तेथील निर्णयात मुळीच सहभाग नाही. लडाखला आपले प्रश्न, आपली मते आपल्या स्थानिक लोकांमार्फत मांडता यावेत म्हणून १९९५ मध्ये लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद स्थापन करण्यासाठी कायदा करून लेह जिल्ह्यासाठी लेह अ‍ॅपेक्स बॉडी स्थापन केली गेली होती. कारगिल जिल्ह्यासाठी २००३ मध्ये कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स निर्माण केली गेली. या दोन्ही परिषदांमध्ये प्रत्येकी ३० सदस्य असतात. त्यातील २६ निवडून आलेले स्थानिक सदस्य असतात, तर ४ नामित सदस्य असतात. म्हणजेच लडाखच्या प्रश्नांना मांडण्यासाठी निवडून आलेले ५२ सदस्य आणि नामित ८ सदस्य आहेत, जे तेथील भूमी, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा मुद्द्यांवर सल्ला देतात, आपले मत मांडतात आणि लोकांचे प्रश्न सरकारसमोर ठेवतात. याशिवाय लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या दोन संसदेच्या जागा द्याव्यात, अशीही लडाखची मागणी आहे. सध्या स्वायत्त परिषदेच्या रूपाने निवडून आलेले सदस्य सल्ला देत असले तरीदेखील विधानसभा आणि संसदेच्या जागा या दोन्ही मागण्यांवर सरकार निश्चित सकारात्मक विचार करू शकते. स्वत:, लडाखच्या वरकरणी योग्यतेने योग्य वाटत असले तरी ते मान्य करत भारताला दूरगामी नुकसान होऊ शकते. चीनची शांतता कमी करणे, हे टक्कर भारताला सक्त व्हायचे असेल, तर लडाखयूवर भारताचे नियंत्रण जलाच्या नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहे. आज गरज आहे लडाख विकास साधकांच्या भावना त्यांच्या जपत संस्कृतीचे, जलवायूचे संरक्षण करणे भारताचे आहे. लडाख आपला आहे, लहानला आपण स्वतःला राखून ठेवण्यासाठी पावले गुण लायत. 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वावर श्रद्धा श्रद्धा आपला भारत निश्चित पर्यावरणपूरक पावले शक्ति विकास साधू शकतो.




प्रबोधन आणि प्रबोधनकार

महाराष्ट्राच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा इतिहास
प्रबोधन हे नाव खर्‍या अर्थानं सार्थ झालं ते 'प्रबोधन' पत्रामुळं. 'प्रबोधन'च्या माध्यमातून 'प्रबोधन'कार ठाकरे यांनी संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारचे ज्ञानचक्षू अर्थात बुद्धीचे डोळे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हे काम करताना ते कोणत्याही दडपणाला बळी पडले नाहीत. तसेच त्या काळात बुद्धिप्रमाण्यवादाचा किल्ला एकहाती लढवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम सांगता येईल. 
'प्रबोधन'कार केशव सीताराम ठाकरे यांनी शंभर वर्षांपूर्वी 'प्रबोधन' नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं. या शताब्दीच्या निमित्तानं 'प्रबोधन'मधल्या प्रबोधनकारांच्या लेखांचा त्रिखंडात्मक ग्रंथ 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'नं प्रकाशित केला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं संपादन सचिन परब यांनी केलं. खरं तर 'प्रबोधन'कार ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री अशी आहे. प्रबोधनकारांच्या संस्कारात, तालमीतच बाळासाहेब ठाकरे लहानाचे मोठे झाले. इतकंच नव्हे, तर शिवसेना स्थापन करण्यामागची प्रेरणा बाळासाहेबांना प्रबोधनकारांकडूनच मिळाली होती. सचिन परब हे गेली कित्येक वर्षं सातत्यानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं 'रिंगण' नावाचा अंक प्रकाशित करतात, त्याद‍ृष्टीनं त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. विशेष म्हणजे, दहा-बारा वर्षांपूर्वी त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंवर वेबसाईट स्वतः पुढाकार घेऊन केली होती. तेव्हापासून त्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचा ध्यास घेतला होता. त्यांनी संपादित केलेलं हे काम एक प्रकारचा कलशाध्यायच म्हणावा लागेल. कारण, 'प्रबोधन'चे अंक वाचकांसाठी कुठं उपलब्ध नव्हते. हे अत्यंत दुर्मीळ असे अंक सचिन परब यांनी मिळवले. या अंकातले प्रबोधनकारांचे लेख या त्रिखंडात समाविष्ट करण्यात आलेत. या खंडाचं नुकतंच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
अत्यंत परखड, स्पष्ट वक्‍ते, निर्भीड, निस्पृह पत्रकार अशी प्रबोधनकारांची महाराष्ट्राला ओळख आहे. समोरचा प्रतिस्पर्धी किती मोठा आहे, याचा विचार न करता सत्याचा पाठपुरावा करणं हे आपलं काम आहे, असं समजून प्रबोधनकारांनी लेखन केलं. भाषणं केली. त्यांचं व्यक्‍तिमत्त्व अष्टपैलू होतं. ते नट होते. दिग्दर्शक होते. नाटककार होते. संशोधक होते. इतिहास संशोधक होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वक्‍तृत्वशास्त्रावरील पुस्तकानं झाली. हे पुस्तक मुद्रणालयात छापलं जात असताना काही कारणानिमित्त लोकमान्य तिथं आले होते. त्यांच्या नजरेस हे पुस्तक पडलं. त्यांनी ते चाळलं. तेव्हा प्रबोधनकार विशीच्या आसपास होते. या पुस्तकाचं कौतुक लोकमान्य टिळकांनी केलं होतं. त्यानंतरचं प्रबोधनकारांचं महत्त्वाचं काम वि. का. राजवाडे यांच्या संदर्भानं सांगता येतं. वि. का. राजवाडे यांनी केलेल्या संशोधनाचं महत्त्व खुद्ध प्रबोधनकारांनाच माहीत होतं. राजवाडे गेल्यानंतर प्रबोधनकारांनी लिहिलेल्या मृत्युलेखात राजवाड्यांच्या कामाचा यथोचित गुणगौरव केलाय.
पुढचा राजवाडे जन्माला येण्यासाठी काही शतकं लागतील, असं त्यांनी म्हटलं होतं. गुणगौरव केला, तशी राजवाड्यांवर टीकाही त्यांनी केली. राजवाडे चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी सांगू लागले. त्यांच्या सांगण्यामध्ये काही जातींचा अधिक्षेप कारण नसताना झाला, तेव्हा मात्र प्रबोधनकारांनी राजवाड्यांच्या संशोधनाची अक्षरशः चिरफाड केली. तसेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या आपल्या जातीचा किल्ला एकहाती लढवला. त्यांच्या या कामाचं मोल फार आहे. त्यांची ही कीर्ती राजर्षी शाहू महाराज यांच्यापर्यंत पोहोचली. मग शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना बोलावून घेतलं. शाहू महाराज अनेक बाबतींमध्ये प्रबोधनकारांना सल्ला देत. नंतरच्या काळात त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला. 'प्रभात'कार वा. रा. कोठारी, 'जागृती'कार भगवंतराव पाळेकर, श्रीपतराव शिंदे अशी किती तरी नावं सांगता येतील. त्याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक' सुरू केलं होतं. मुकुंदराव पाटील यांचं 'दीनमित्र' हे वर्तमानपत्रही चालायचं. त्याच काळात जहाल पत्रकार म्हणून ओळख असलेले दिनकरराव जवळकर हेही उदयाला येत होते. 'प्रबोधन'मध्ये ब्राह्मणेतर चळवळीचा प्रचार होता. आपल्याच ज्ञाती बांधवांचं जागरण करावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांच्यातल्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्यालाही दूर लोटावं, या पद्धतीनं त्यांनी 'प्रबोधन' हे पत्र चालवलं. त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळीला बुद्धिप्रामाण्यवादाचं अधिष्ठान लाभलं. ते देण्यात प्रबोधनकार ठाकरे यांचं योगदान फार आहे. ब्राह्मणांच्या देवांऐवजी आपल्या देवांची स्थापना करा किंवा त्यांच्या धर्मइतिहासाऐवजी आपला धर्म इतिहास लिहा, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये ते अडकले नाहीत. त्यापुढं जाऊन हिंदू धर्मासह एकूणच धर्मसंस्थेतल्या उणिवांवर प्रहार केले. धर्मात असलेल्या मध्यस्थावर कडाडून प्रहार केले.
त्या काळातल्या महाराष्ट्राचं वर्णन 'प्रबोधनयुग' असं केलं जातं. प्रबोधन हे नाव खर्‍या अर्थानं सार्थ झालं ते 'प्रबोधन' पत्रामुळं. 'प्रबोधन'च्या माध्यमातून प्रबोधनकारांनी संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारचे ज्ञानचक्षू अर्थात बुद्धीचे डोळे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हे काम करताना ते कोणत्याही दडपणाला बळी पडले नाहीत. तसेच त्या काळात बुद्धिप्रामाण्यवादाचा किल्ला एकहाती लढवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम सांगता येईल. बर्‍याच लोकांना वाटायचं की, राजर्षी शाहू महाराज यांच्या गुडबुक्समध्ये प्रबोधनकार आहेत. याचा अर्थ शाहू महाराजांची प्रत्येक गोष्ट प्रबोधनकारांना मान्य होती, असं नाही. ज्या वेळेला प्रबोधनकारांनी आपलं विरोधी मत दर्शवलं त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांच्या मताचा आदरच केला आहे. माझ्या द‍ृष्टीनं महाराष्ट्रातली ही फार महत्त्वाची जोडी होती. दुसरी जोडी अर्थातच कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांची. कर्मवीरांसाठी प्रबोधनकार हे गुरुतुल्य स्नेही होते. कर्मवीरांमुळंच प्रबोधनकारांनी मुंबईत सुरू केलेलं 'प्रबोधन' सातार्‍याला न्यायचं ठरवलं. पुढं त्यांनी 'खरा ब्राह्मण' नावाचं नाटक लिहिलं. संत एकनाथ यांच्या जीवनावर आधारित हे नाटक होतं. त्याचे खूप प्रयोग झाले. हे नाटक गाजलंही. आपल्या जातीवर टीका आहे, म्हणून काहीजणांनी कोर्टात जाऊन त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. प्रबोधनकारांनी गाडगे महाराजांचं, रंगो बापूजींचं चरित्रही लिहिलं. १८५७ च्या उठावात रंगो बापूजींचा फार मोठा सहभाग होता. त्यांचं चरित्र लिहावं, अशी शाहू महाराजांची इच्छा होती. प्रबोधनकारांनी ते लिहून शाहू महाराजांची इच्छा पूर्ण केली. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे, असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी 'शेतकर्‍यांचे स्वराज्य' लिहिलं. पुढं संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीतल्या नेत्यांच्या बैठका प्रबोधनकारांच्या घरीच होत. त्यात श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी असे अनेक मोठमोठे लोक होते. या सगळ्या बैठकांमधूनच चळवळीनं आकार घेतला, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या अर्थानं प्रबोधनकारांनी कोणती संघटना बांधली नाही. त्यांनी स्वतःचा असा अनुयायी वर्ग केला नाही. त्यामुळं एरव्ही त्यांच्या विचारांचा तितका गौरव होेऊ शकला नाही. वास्तविक, त्यांनी केलेल्या कामाला श्रेय हे मिळायलाच हवं होतं. परंतु, इतिहास कधी तरी न्यायाधीश होतो आणि होऊन गेलेल्या लोकांचं मूल्यमापन करतो. त्याला काव्यगत न्याय म्हणायलाही हरकत नाही. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेले हे तीन खंड या द‍ृष्टीनं महत्त्वाचे आहेत.
 हे सगळं साहित्य इंग्रजीत येणं ही गोष्टही महत्त्वाची आहे. या खंडांचं वाचकांच्या द‍ृष्टीनं मोल काय आहे, तेही थोडक्यात सांगता येईल. एक तर महाराष्ट्राच्या इतिहासाची महत्त्वाची बाजू जी एरव्ही मुख्य प्रवाहात येत नाही, ती समजून घेण्यासाठी हे खंड वाचण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा की, १९२० ते १९३० हे दशक महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या द‍ृष्टीनं एक केऑस आहे. नेतृत्वाच्या द‍ृष्टीनं महाराष्ट्र या काळात चाचपडत होता. कारण, दोन महत्त्वाचे नेते एक राष्ट्रवादी लोकांचे नेते लोकमान्य टिळक आणि ब्राह्मणेतर पक्षाची बाजू लढवणारे शाहू महाराज दशकाच्या सुरुवातीलाच कालवश झाले होते.
त्यामुळं त्यांच्या अनुयायांसमोर चांगला नेता नव्हता. या काळात प्रबोधनकार ठाकरे पुढं येऊन महाराष्ट्रासमोरची वैचारिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याद‍ृष्टीनं या त्रिखंडात्मक ग्रंथाचं महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रबोधनकारांचं या खंडात दडलेलं विचारधन वाचणं आवश्यक आहे.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावणारी थोर व्यक्तिमत्वं विसाव्या शतकात होऊन गेली, त्यातलं एक महत्त्वाचं नाव. महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरितींविरुद्ध उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, जातनिष्ठ इतिहास लेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्याने फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी वयाच्या सत्तरीत तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान, याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, विक्रेते, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व शब्दांत पकडणं कठीण आहे.
प्रबोधनकारांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३ चा. त्यांना ८८ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. हा बहुरंगी माणूस एका आयुष्यात अनेक आयुष्य जगला. पण त्यात त्यांची ओळख बनलं ते त्यांनी संपादित केलेलं 'प्रबोधन` हे नियतकालिक. १६ ऑक्टोबर १९२१ ला `प्रबोधन`नियतकालिकाचा पहिला अंक मुंबईहून प्रकाशित झाला. त्याला २०२१ च्या १६ ऑक्टोबरला शंभर वर्षं होतील. `प्रबोधन`चा शेवटचा अंक मार्च १९३० ला प्रसिद्ध झाला. या दरम्यान साधारण सहा प्रकाशन वर्षांत एकूण ९५ अंक प्रसिद्ध झाले. त्यापैकी ९१ अंक आज अभ्यासकांनी शोधून काढलेत.`प्रबोधन` नियतकालिकाने घडवलेली जागृती हा महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या, समाज सुधारणेच्या आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा फार महत्त्वाचा भाग आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीयुगाला सामोरं कसं जावं याविषयी महाराष्ट्र गोंधळलेला होता. त्याचबरोबर वेदोक्त प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद टोकाला गेल्याने महाराष्ट्र हादरलेला होता. या पार्श्वभूमीवर `प्रबोधन`चा जन्म झाला. त्यानंतरच्या म्हणजे १९२० च्या दशकातल्या जवळपास नऊ वर्षांच्या महत्वाच्या नोंदी `प्रबोधन`मध्ये आहेत. किंबहुना `प्रबोधन` हा या सगळ्या सामाजिक आणि राजकीय घुसळणीचा एक भाग आहे. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका आणि जपान यांचा महासत्ता म्हणून होणारा उदय, असहकार आंदोलन, मोपल्यांचा मलबार येथील हिंसाचार, खिलाफत चळवळ या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, तसंच १९२३ ची प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतल्या हालचाली, ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांच्या कारवाया, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांमुळे झालेले वाद, मुळशी सत्याग्रह, या महाराष्ट्रातल्या घडामोडींवर प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या महाराष्ट्रभर उत्तम जनसंपर्क असलेल्या अभ्यासू संपादकाने केलेली भाष्यं हा आज एक ऐतिहासिक दस्तावेज आहे.
त्यापेक्षाही महाराष्ट्रातल्या सामाजिक संघर्षाचा तपशीलवार पट `प्रबोधन`मधून उभा राहतो, तो महत्त्वाचा आहे. `मराठी वृत्तपत्रांचा इतिहास` या ग्रंथात रा. के. लेले म्हणतात, `ठाकरे यांच्या `प्रबोधन` पत्राची कारकीर्द अवघी पाचसहा वर्षांचीच होती. पण तेवढ्या अल्पावधीत त्याने केलेली वृत्तपत्राच्या आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रांतील कामगिरी न विसरता येण्यासारखी आहे. ठाकरे ह्यांच्या पत्राचे स्वरूप राजकीय प्रश्नांवर भर देणारे नव्हते. आगरकरांप्रमाणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे हे पत्र होते. आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा पाया अत्यंत शास्त्रशुद्ध होता. पण त्यांनी ज्या सुधारणांचा पुरस्कार केला, त्या पांढरपेशा वर्गापुरत्याच मर्यादित होत्या. त्यांच्या सुधारणावादाचे आवाहन बहुजन समाजापर्यंत पोचले नाही. त्यांनी म. जोतीराव फुले यांनी प्रसृत केलेले विचार आणि केलेले कार्य ह्यांची दखल घेतल्याचेही आढळत नाही. या दृष्टीने पाहीले तर ठाकरे ह्यांनी प्रबोधनाद्वारा ज्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला त्या अधिक व्यापक होत्या. या दृष्टीने ह्यांचे `प्रबोधन` आगरकरांच्या पुढे काही पावले गेलेले होते.`
`प्रबोधन`ने त्याच्या प्रकाशनकाळात महाराष्ट्रावर कसा प्रभाव टाकला, हे आचार्य अत्रेंच्या या उताऱ्यावरून लक्षात येऊ शकतं, `अच्युतराव कोल्हटकर यांच्या `संदेश` या पत्राने महाराष्ट्रात जी जागृती आणि खळबळ केली, तशाच प्रकारची खळबळ ठाकरे यांच्या `प्रबोधन`ने करून सोडली, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. सदर मासिकामध्ये पाच सहा वर्षेपर्यंत निरनिराळ्या सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर खळबळीत लेखमाला आणि निबंध लिहून ठाकरे यांनी बहुजन समाजाचे अक्षरशः `प्रबोधन` केले, यात संशय नाही. भिक्षुकी वृत्तीच्या आणि सनातनी दृष्टीच्या ब्राह्मण समाजावर अनेक निकराचे हल्ले त्यांनी आपल्या या पाक्षिकात चढविले, त्यामुळे `कोदण्डाच्या टणत्कारा`पासून ब्राह्मण विद्वानांत अप्रिय झालेले त्यांचे नाव अधिकच तीव्रतेने त्या समाजाच्या डोळ्यांत सलू लागले. तथापि, सनातनी भिक्षुक समाजात हे जितके अप्रिय ठरले, तितकेच ब्राह्मणेतर समाजामध्ये ते लोकप्रिय होऊन बसले....!`
प्रबोधनकारांनी मराठी समाजातले अनेक दोष १०० वर्षांपूर्वी दाखवलेले आहेत, जे आजही जसेच्या तसे आहेत. हुंड्याच्या विरोधात त्यांनी आंदोलनही केलं. पण आजही हुंडा थांबलेला नाही. भिक्षुकशाहीच्या विरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकलं होतं. पण आज जुनीच भिक्षुकशाही नवे मुखवटे घालून तसंच शोषण करते आहे. महाराष्ट्रातला इतिहास अजूनही स्वजातिभिमानाच्या चिखलात रुतून बसलाय. महिला सक्षमीकरणाची प्रबोधनकार सांगत असलेली निकड अजूनही कायम आहे. पूर्वीइतकी तीव्र अस्पृश्यता उरली नसली तरी जातिभेदाचे दुष्परिणाम महाराष्ट्र अजूनही भोगतोच आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाला `मानसिक गुलामगिरीविरुद्ध बंड` करण्याची ताकद आजही `प्रबोधन`कारांचे हे लेख देऊ शकतात. बहुजनवाद, हिंदुत्ववाद, गांधीवादच नाही तर कम्युनिझमविषयी आजच्या संदर्भात विचार करताना त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.
इंग्रजी शाळेत असतानाच प्रबोधनकारांनी इंग्रजीतून मराठीत अनुवाद केलेले दोन लेख करमणूक या आघाडीच्या साप्ताहिकात छापून आले होते. त्यांनी घरात दाबयंत्र तयार करून विद्यार्थी नावाचं हौशी साप्ताहिक चालवलं होतं. `प्रबोधन`कारांचं जन्मगाव पनवेलमध्ये पहिलं साप्ताहिक हे १९५० च्या सुमारास निघालं. तेही अल्पायुषी निघालं. १९६७ ला किल्ले रायगड हे दीर्घकाळ चाललेलं पहिलं साप्ताहिक पनवेलमधून सुरू झालं. हे लक्षात घेता एकोणिसाव्या शतकातच प्रबोधनकारांनी केलेला साप्ताहिक विद्यार्थीच्या प्रयोगाचं मोल लक्षात येतं. १७-१८ व्या वर्षी ते मुंबईच्या प्रसिद्ध तत्त्वविवेचक छापखान्यात असिस्टंट प्रूफरिडर म्हणून काम केलं. नंतर ते अनेक नियतकालिकांत सातत्याने लिहित होते. वयाच्या विशीत सांगलीकर नाटक मंडळीत असतानाच्या पंढरपूर आणि विजापूर अशा दोन शहरांतल्या मुक्कामांचं वर्णन त्यांनी केलंय. त्या दोन्ही ठिकाणी अनोळखी असणारे त्यांचे चाहते वाचक त्यांना शोधत आल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या नियतकालिकांत लिखाणाचा एक चाहतावर्ग तयार झाला होता. जळगावात असताना प्रबोधचंद्रिका साप्ताहिकाचे संपादक नारायण नरसिंह उर्फ नानासाहेब फडणीसांनी `प्रबोधन`कारांमधला संपादक नेमका हेरला आणि त्यांना एक सारथी नावाचं मासिक सुरू करायला लावलं. ते वर्षभर चाललं. प्रबोधनकारांच्या नोंदीनुसार हे सगळं १९०६-०७ मध्ये घडत होतं. याचा अर्थ प्रबोधनकार अवघ्या २१-२२व्या वर्षी संपादक बनले.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या वर्षाच्या अहवालात कायस्थदीप या पुस्तकावर एक २२ पानी लेख छापला. त्यात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजाची कुळी हीन असल्याचा आरोप केला. प्रबोधनकारांनी राजवाडेंचं संशोधन खोडून काढणारं पुस्तक लिहायचं ठरवलं. त्याचं कारण ते सांगतात, `एका काळच्या सत्तामदाने शिरजोर झालेले ब्राह्मण पंडित, इतिहास संशोधनाच्या किंवा आखणी कसल्या तरी फिसाटाच्या पांघरुणाखाली कायस्थादी ब्राह्मणेतरांवर आणि अनेक चित्पावनेतर ब्राह्मणांवरही हल्ले चढवायला सवकलेले आहेत. त्यांचा एकदा कायमचा पुरा बंदोबस्त केलाच पाहिजे या हिरीरीने मी कोदण्डाचा टणत्कार हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले.` कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी हे तडाखेबंद पुस्तक १७ नोव्हेंबर १९१८ ला प्रकाशित झालं. या ग्रंथाच्या सहा हजार प्रती अवघ्या पंधरा दिवसात संपल्याचा दावा प्रबोधनकारांनी केला आहे. कारण प्रबोधनकारांचा हा प्रतिवाद फक्त सीकेपींचा उरलेला नव्हता, तर तो ब्राह्मणी संशोधकांच्या बदनामी मोहिमांमुळे अस्वस्थ असलेल्या सगळ्याच ब्राह्मणेतरांचा झाला होता. याच दरम्यान वेदोक्त प्रकरण गाजत होतं. जातवर्चस्ववादाचं हिडीस रूप महाराष्ट्र बघत होता. त्यातून `प्रबोधन`कारांचंही विचारचक्र सुरू होती. त्यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोचले, ब्राह्मणेतर समाजाची पहिली गरज ही भिक्षुकशाहीच्या सापळ्यातून मुक्तता ही आहे. दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने सत्यशोधकी नियतकालिके सुरू करण्याचा धडाका सुरू होता. प्रबोधनकारांचा तर त्यांच्याशी आत्मीय स्नेह निर्माण झाला होता. त्यातून प्रबोधनकारांनी १९२१ च्या सप्टेंबर महिन्यात स्वतःचं वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला. `प्रबोधन`चा पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२१ ला प्रसिद्ध झाला
प्रबोधन`च्या कामासाठी प्रबोधनकारांनी दादर मधल्याच खांडके बिल्डिंगमध्ये एक ब्लॉक भाड्याने घेतला होता. तिथे अनेक तरुण `प्रबोधन`कारांकडे ओढले गेले. अभ्यास करण्यासाठी ते दिवसभर तिथेच असत. त्यातून स्वाध्यायाश्रम नावाची संस्था सुरू झाली. या तरुणांनी हुंडा विध्वंसन संघ स्थापन करून मुंबईत एक वादळच निर्माण केलं होतं. या संघटनेने प्रामुख्याने सीकेपी समाजातली हुंडा घेऊन होणारी लग्नं उधळून लावली. हुंडा निषेधाची गाणी गात मोठ्या मिरवणुका काढल्या. गाढवाच्या वराती घेऊन लग्नाच्या ठिकाणी हल्लाबोल केला. १९२२ -२३ च्या लग्नसराईत २०-२५ लग्नात हुंडा विध्वंसन संघाने धुमाकूळ घातला होता. या आंदोलनाला `प्रबोधन`चा सक्रिय पाठिंबा होता. खरं तर `प्रबोधन`च्याच नेतृत्वात हे सुरू होतं. हुंडा विरोधामागचा विचार `प्रबोधन`नेच समजावून सांगितला होता. हुंडा घेऊन लग्न करणाऱ्यांची नावं `प्रबोधन`मध्येच प्रसिद्ध होत.
याच काळात प्रबोधनकारांनी सरकारी नोकरी सोडली. त्यासाठी प्रबोधनकारांच्या आईचा विशेष आग्रह होता. त्या नेहमी सांगत की वेळ आली तर भीक माग पण इंग्रज सरकारची नोकरी करू नकोस. सरकारने परवानगी दिल्यामुळे `प्रबोधन` सुरू ठेवण्यात तांत्रिकदृष्ट्या अडचण काहीच नव्हती. पण प्रबोधनकारांच्या मनाला ते पटत नव्हतं. ते लिहितात, `एकीकडे नोकरी नि दुसरीकडे बहुजन समाज जागृतीचे कार्य, अशा परस्पर विरुद्ध दोन टोकांवरच्या डगरीवरचा कसरती खेळ माझ्या स्वभावाला पटेनासा झाला. सद्सद्विवेकबुद्धी सारखी टोचण्या देऊ लागली. सभांतून सरकारी धोरणांवर टीका करायची आणि प्रबोधनात मानसिक दास्याविरुदध बंड या विषयावर स्पष्टोक्तीची लेखमाला लिहायची हे मला सहन होईना...!` केवळ आपले विचार आणि कृती यात तफावत राहू नये, यासाठी अडीचशे रुपये मासिक पगाराची नोकरी सोडून पुन्हा गरिबीत उडी घेणारा संपादक विरळाच. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाची दखल मात्र इतिहासाने हवी तशी घेतलेली नाही.
`प्रबोधन`ला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांना `प्रबोधन`ची पानं आणि प्रती वाढवण्याची इच्छा होती. स्वतंत्र छापखाना नसल्यामुळे त्यांच्या या मनसुब्यात अडचणी येत होत्या. साताऱ्यातले उद्योजक धनजीशेठ कूपर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना `प्रबोधन`कारांकडे पाठवले. साताऱ्याजवळच्या पाडळी या गावात छापखाना उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्याला भुलून प्रबोधनकारांनी `प्रबोधन`चा कारभार साताऱ्याला हलवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या दरम्यान प्रबोधनकारांनी कूपर यांच्या गटातले भास्करराव जाधव यांच्याविरोधात भूमिका घेतली. तसंच त्यांनी `अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावधान` असं स्फुट प्रबोधनात लिहून बॉम्ब टाकला होता. परिणामी या दोघांच्या विरोधात कूपरने षडयंत्र रचायला सुरवात केली. त्यामुळे प्रबोधनकारांनी त्यात सगळा हिशेब देऊन कफल्लकपणे सातारा सोडला. `प्रबोधन`प्रेमी रामचंद्र उर्फ बापूसाहेब चित्रे यांनी पुण्यात कर्जात बुडालेला एक छापखाना विकत घेतला होता. त्याचा व्यवहार करण्यासाठी छापखान्याचा मालक, ज्याचा उल्लेख प्रबोधनकार गायतोंड्या भट असा करतात, सातारा रोडला प्रबोधनकारांना भेटायला आला होता. तो आला त्याच दिवशी `प्रबोधन`कारांची एका मुलीचं डायरियाने अचानक निधन झालं. तिचे अंत्यसंस्कार करत असतानाच घाईत असलेल्या छापखाना मालकाशी जड हृदयाने व्यवहाराच्या गोष्टीही करत होते. ते बघून प्रबोधनकारांच्या पत्नीने त्यांना सुनावलं, `प्रबोधनापुढे पोटच्या गोळ्याची सुद्धा यांना तिडीक येत नाही...!` तो उद्वेग स्वाभाविक असला तरी तो एका संपादकाच्या निष्ठेचा सन्मानही होता.
साताऱ्यातून प्रकाशित झालेल्या तिसऱ्या वर्षाच्या १७ व्या अंकातच पुढचा अंक पुण्यातून प्रकाशित होणार असल्याची घोषणा झाली. त्यानुसार सदाशिव पेठेत घर आणि बुधवार पेठेत छापखाना असा संसार त्यांनी थाटला. पण पुण्यातल्या काही सनातनी ब्राह्मणांनी मूळ मालकाला छापखाना प्रबोधनकारांना न देण्यासाठी उचकवलं. त्याला बळी पडून त्याने छापखान्याला टाळं लावलं. सनातन्यांनी `प्रबोधन`च्या नावाची पाटीही भररस्त्यात जाळली. वर पुण्यात `प्रबोधन`ला जाळून खाक करू अशी शेखी मिरवली. त्यामुळे पुण्यातच `प्रबोधन`चा छापखाना उभारण्याची प्रतिज्ञा प्रबोधनकारांनी केली. तोवर `प्रबोधन`चा तिसऱ्या वर्षाचा शेवटचा एकच अंक प्रकाशित होऊ शकला. प्रबोधनकारांनी नव्या छापखान्यासाठी कर्ज आणि देणग्या मिळवल्या. त्यातून सदाशिव पेठेत छापखाना उभा करण्याची तयारी झाली. पण प्रबोधनकारांनी मुंबईतून विकत घेऊन पाठवलेलं ट्रेडल मशीनचं चाक रेल्वेने पुण्यात पोहचेपर्यंत तुटलं. तरीही धीर न सोडता प्रबोधनकारांनी भांडवल उभं करण्यासाठी धावाधाव सुरूच ठेवली. त्यासाठी मुंबईत असताना धावपळीमुळे ते आजारी पडले. त्यातून बाहेर यायला चार महिने लागले. अर्धी मशिनरी पुण्यात, उरलेली अर्धी मुंबईत दुरुस्त होतेय, कारागिरांचे पगार थकलेत, उपचारासाठीही पैसे नाहीत अशी भयंकर परिस्थिती होती. पण यातून बाहेर येत १९२५ च्या जानेवारीत ते कसेबसे पुण्याला पोचले. पुन्हा `प्रबोधन` उभं करण्याच्या प्रयत्नांना लागले. पुढच्या चार महिन्यांत मशीन सातवेळा तुटलं. इतरही अडचणी येतच राहिल्या.
या सगळ्या अडचणींतून मार्ग काढत ९ महिन्यांच्या खंडानंतर `प्रबोधन` १९२५ च्या एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा सुरू झाला. `प्रबोधन`ला देवाज्ञा झाली अशी टीका करणाऱ्यांना `प्रबोधन`ने नव्याने सुरुवात करून उत्तर दिलं. चौथ्या महिन्याचा पहिला अंक हा आता पाक्षिक नसून मासिक होता. पानांची संख्या ४० होती. पुढे नोव्हेंबर १९२७ पर्यंत ३२ महिन्यांत मासिक `प्रबोधन`चे २२ अंक निघाले. त्याचसोबत प्रबोधनकारांनी ३१ ऑगस्ट १९२७ पासून लोकहितवादी हे नवीन साप्ताहिकही सुरू केलं. त्याचा शेवटचा तेरावा अंक पुण्याहूनच डिसेंबर १९२७ ला निघाल्याचा उल्लेख शनिमहात्म्य या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे जून १९२४ ला पुण्यात आल्यापासून नोव्हेंबरमध्ये मुंबईत परतेपर्यंत प्रबोधनकार अडचणींवर मात करत सनातन्यांच्या नाकावर टिच्चून `प्रबोधन` जगवत राहिले.
प्रबोधनकार पुण्यात होते त्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद अगदी टोकाला पोहोचला होता. ब्राह्मणेतर पक्षाचे नेते केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर त्यांना भेटण्यासाठी जवळपास दररोज `प्रबोधन` कचेरीत येत. शिवाय लोकमान्य टिळकांचे सुपुत्र रामभाऊ आणि श्रीधरपंत हेही असत. त्यामुळे या सगळ्याचे सूत्रधार प्रबोधनकारच असल्याचा समज पुण्यात पसरला होता. विशेषतः देशाचे दुष्मन हे पुस्तक प्रबोधनकारांनीच लिहिलं असल्याचं अनेकांना वाटत होतं. प्रबोधनकारांचा छापखाना अगदी ब्राह्मणी वस्तीमध्ये असल्याने त्यांना या सगळ्याचा त्रास भोगावा लागत असे. एका सभेवरून घरी जाणाऱ्या सनातन्यांनी `प्रबोधन`च्या छापखान्यावर जाऊन जवळपास दोन तास शिव्याशाप दिले. कारखान्याच्या नावाचा फलक खाली पाडला. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात ते पर्वतीजवळ फिरायला गेले असताना तीन चार जणांनी लाठीहल्ला केला. पण प्रबोधनकारांनी वॉकिंग स्टिकमधली गुप्ती बाहेर काढल्याने ते पळून गेले. खोटी निमंत्रणपत्रिका बनवून छापखान्याला पोलिसी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्नही केला गेला. गोडबोले नावाचा एक गुंड प्रबोधनकारांना भेटायला आला. छापखान्यातल्या कामगारांमुळे तो काही करू शकला नाही. पुढे पोलिसांना सांगून त्याचा बंदोबस्त करावा लागला. त्यांच्या लिखाणाला प्रक्षोभक ठरवून कोर्टात जाण्याचेही प्रयत्न केले. छापखान्यात आगीचा गोळा टाकून कागदाच्या थप्प्यांना आगही लावण्यात आली. शिवाय मेलेली कुजलेली कुत्री दारासमोर फेकण्यात आली. एकदा तर मेलेलं गाढवही टाकण्यात आलं. अनेकदा पैसे देऊनही छपाईसाठी चांगला कागद मिळून दिला जात नसे. तसंच पुण्यातल्या ब्राह्मण एजंटांनी `प्रबोधन`वर बहिष्कारही घालून बघितला. `प्रबोधन`चे अंक विकलात तर केसरी, ज्ञानप्रकाशचे अंक मिळणार नाहीत, असा दबाव त्यांनी विक्रेत्यांवर आणला. पण `प्रबोधन` छापखान्यातल्या कामगारांनी चौकाचौकात विकून त्यावर मात केली. तसंच चांगलं कमिशन दिल्याने विक्रेतेही नरम पडले. अनेकदा तर अंक वाचकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी एकगठ्ठा विकतही घेतले जात. या सगळ्या अडचणींवर मात करत प्रबोधनकार पुण्यात `प्रबोधन` चालवत होते. एका मोठ्या जातीचा, सत्ताधाऱ्याचा किंवा चळवळीचाही थेट पाठिंबा नसताना पुण्यात भिक्षुकशाहीच्या विरोधात संघर्ष करणं महाकठीण होतं. त्यासाठी प्रबोधनकारांसारखा वीर योद्धाच हवा होता. खुद्द सदाशिवपेठेत राहून ब्राह्मणेतरी विचारांचे `प्रबोधन`चे २२ आणि लोकहितवादीचे १३ अंक प्रकाशित करणं, यासाठीची हिंमत कळण्यासाठी तो काळ समजून घ्यावा लागेल.
चौथ्या वर्षाच्या काळात प्रबोधनकारांनी इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांना खुनी ठरवणाऱ्या बावला मुमताज प्रकरणावर आपली लेखणी जोरात चालवली. त्यातल्याच `टेम्प्ट्रेस` या लेखात `द बॉम्बे क्रॉनिकल` या वर्तमानपत्राचे प्रख्यात ब्रिटिश संपादक बी. जी. हॉर्निमन यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे चिडून त्यांनी प्रबोधनकारांच्या विरोधात मुंबईतल्या कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. त्यासाठी वकील द्यायला प्रबोधनकारांकडे पैसे नव्हते. त्यामुळे `प्रबोधन`चे अनेक प्रेमी मदत करण्यासाठी पुढे आले. याच खटल्यासाठी ७ नोव्हेंबर १९२७ला मुंबईत आल्यावर प्रबोधनकार पुन्हा एकदा गंभीर आजारी पडले. ते एकटेच नाहीत तर पत्नी, मुली आणि मुलगा असं संपूर्ण कुटुंबच वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झाले. त्यामुळे मुंबईत अडकलेले प्रबोधनकार पुन्हा `प्रबोधन` चालवण्यासाठी पुण्यात जाऊ शकले नाहीत.
`प्रबोधन` जवळपास दोन वर्ष बंद होतं. त्यानंतर ते १९२९ च्या दसऱ्याला पुन्हा सुरू झाला. तो क्रांन्त्यंक असं नाव होतं. किल्ल्यातून बाहेर येणारा वाघ त्यावर दिसत होता. प्रबोधनकार नावाच्या वाघानेही नव्याने डरकाळी फोडली होती. नोव्हेंबर १९२९ पासून मार्च १९३० पर्यंत `प्रबोधन`चे पाच अंक निघालेले दिसतात. त्यानंतर `प्रबोधन`चा अंक सापडत नाही. `प्रबोधन` बंद करण्यात येत असल्याची घोषणा केलेली नाही. माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी `प्रबोधन`शी संबंधित इतर घडामोडींची तपशीलवार चर्चा आहे. पण त्यात `प्रबोधन` मुंबईतून पुन्हा कसं सुरू केलं आणि ते सहा अंकात कसं बंद पडलं, याच्याविषयी काहीही सांगितलेलं नाही. फक्त उदरनिर्वाहासाठी `प्रबोधन`चा छापखाना आधी भाड्याने दिल्याचा आणि नंतर विकल्याचा उल्लेख आहे. पण या व्यवहारात मित्रांनी फसवल्यामुळे प्रबोधनकारांच्या हातात काहीच लागलं नाही. या काळात प्रबोधनकारांनी `शनिमहात्म्य` आणि `शेतकऱ्यांचे` स्वराज्य ही दोन महत्त्वाची पुस्तकं लिहिली. दोन्ही पुस्तकं त्या काळात अत्यंत लोकप्रिय झाली होती. शिवाय दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवातले ब्राह्मणी वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत चालवलेली चळवळ आणि त्यातून सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात या त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या महत्त्वाच्या घडामोडी `प्रबोधन`च्या याच टप्प्यात झाल्यात.
`प्रबोधन`च्या शेवटच्या पर्वात म्हणजे नोव्हेंबर १९२७ ते मार्च १९३० या दरम्यान `प्रबोधन`चे फक्त सहाच अंक निघालेले आहेत. पण त्यात वेगळे प्रबोधनकार दिसतात. `प्रबोधन`ची सुरवात ईशस्मरणाने करणारे प्रबोधनकार नोव्हेंबर १९२९ च्या अंकात नवी सुरुवात करताना लिहितात, `कोणत्याही कार्याच्या प्रारंभी – मग ते बॉम्ब फेकण्याचे असो नाहीतर बोंब मारण्याचे असो – कोणत्या तरी देवदेवतेचे नामस्मरणपूर्वक वन्दन करण्याचा हिन्दुजनांचा शिष्ट संप्रदाय आहे. यापूर्वीच्या माझ्या प्रत्येक ग्रंथारंभी हा शिष्ठाचार मी भक्तीपूर्वक इमानेइतबारे पाळलेला आहे… पण प्रागतिक मनुष्याने मतांच्या ठरावीकपणाला चिकटून बसण्याइतका मनाचा दुबळेपणा दाखविणे म्हणजे जगात जगण्याची आपली नालायकी सिद्ध करण्यासारखे आहे. कालपर्यंत मी देवदेवतांचे अस्तित्व मानणारा होतो. आज मी देवविषयक सर्व भावनांच्या छाताडावर बॉम्ब फेकणारा लालबुंद क्रान्तिकारक बनलो आहे.` मार्च १९३० च्या शेवटच्या अंकात ते लिहितात, `प्रबोधन निरीश्वरवादी आहे. त्याचे सत्यशोधन सत्यशोधक समाजाच्याही पुढे गेलेले आहे. देव मानवात दलाल नको, या काथ्याकुटापेक्षा देवालाच उखडला तर दलाल उरतोच कोठे?` इथे `प्रबोधन`च्या लिखाणाचं एक वर्तुळ पूर्ण होतं.






आज लोकशाही अशी मरते आहे ...!

"जागतिक लोकशाही मंदीचे उदाहरण भारत देतो. भारताचे अलिकडेच हायब्रिड राजवटीत रूपांतर होणे हे जगाच्या हुकूमशाहीवर मोठा प्रभाव पाडते. आणि भारतातील लोकशाहीच्या घसरणीची पद्धत आज लोकशाही कशी मरते हे दर्शवते: नाट्यमय बंड किंवा विरोधी नेत्यांच्या मध्यरात्री अटकेद्वारे नाही, तर विरोधी पक्षांचा पूर्णपणे कायदेशीर छळ, माध्यमांना धमकावणे आणि कार्यकारी अधिकाराचे केंद्रीकरण यातून ते पुढे जाते. सरकारी टीकेची तुलना राष्ट्राप्रती असलेल्या बेईमानीने करून, नरेंद्र मोदींचे सरकार विरोधी पक्ष कायदेशीर आहे ही कल्पनाच कमी करत आहे. आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही राहिलेली नाही!" 
भारतापेक्षा कोणताही देश आपल्या जागतिक लोकशाही मंदीचे चांगले उदाहरण नाही. त्याच्या स्थापनेच्या वेळी, भारताच्या लोकशाहीने पहिल्या सात दशकांमध्ये अधिक स्थिरता मिळवून विरोधकांच्या सैन्याला गोंधळात टाकले. भारताची लोकशाहीची तीव्रता औपचारिक मार्गांनी झाली, लष्करावर नागरी राजवटीचे एकत्रीकरण तसेच दशकांच्या उत्साही बहुपक्षीय स्पर्धेद्वारे आणि  अनौपचारिक मार्गांनी, निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याभोवतीच्या नियमांचे बळकटीकरण आणि औपचारिक राजकीय जीवनात महिला आणि इतर सामाजिक गटांचा वाढता सहभाग याद्वारे! भारतात लोकशाहीच्या बाबतीत दोन महत्त्वपूर्ण घसरण झाली आहे: जून १९७५ ते मार्च १९७७ हा २१ महिन्यांचा कालावधी, ज्याला आणीबाणी म्हणून ओळखले जाते आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीपासून सुरू झालेला समकालीन घसरण. मोदींच्या कार्यकाळात, प्रमुख लोकशाही संस्था औपचारिकरित्या अस्तित्वात राहिल्या आहेत, तर लोकशाहीला आधार देणारे नियम आणि पद्धती मोठ्या प्रमाणात बिघडल्या आहेत. समकालीन भारतातील ही अनौपचारिक लोकशाही घसरण आणीबाणीच्या अगदी विरुद्ध आहे, जेव्हा इंदिरा गांधींनी जवळजवळ सर्व लोकशाही संस्था औपचारिकपणे संपवल्निया. नीवडणुकांवर बंदी घालणे, राजकीय विरोधकांना अटक करणे, नागरी स्वातंत्र्यांना हिरावून घेणे, स्वतंत्र माध्यमांना गळा दाबणे आणि देशाच्या न्यायालयांच्या अधिकाराला कमकुवत करणाऱ्या तीन घटनात्मक सुधारणा मंजूर करणे.तरीही लोकशाहीचे पर्यवेक्षक हे मान्य करतात की आज भारत पूर्ण लोकशाही आणि पूर्ण हुकूमशाही यांच्यातील एका खालच्या भागात कुठेतरी राहतो. लोकशाहीवर लक्ष ठेवणाऱ्या संस्था लोकशाहीचे वेगवेगळे वर्गीकरण करतात, परंतु ते सर्व आज भारताला "हायब्रिड राजवट" म्हणून वर्गीकृत करतात - म्हणजेच, पूर्ण लोकशाही किंवा पूर्ण हुकूमशाही नाही. आणि हे नवीन आहे. २०२१ मध्ये, फ्रीडम हाऊसने भारताचे रेटिंग फ्री वरून अंशतः फ्री (फक्त उरलेली श्रेणी फ्री नाही) असे खाली आणले. त्याच वर्षी, व्हेरिएटीज ऑफ डेमोक्रसी (व्ही-डेम) प्रकल्पाने भारताला बंदिस्त हुकूमशाही, निवडणूक हुकूमशाही, निवडणूक लोकशाही किंवा उदारमतवादी लोकशाहीच्या प्रमाणात "निवडणूक हुकूमशाही" च्या स्थितीत खाली आणले. आणि इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटने भारताला पूर्ण लोकशाही, सदोष लोकशाही, संकरित राजवट आणि हुकूमशाही राजवटीच्या प्रमाणात "दोषपूर्ण लोकशाही" श्रेणीत स्थान दिले. भारताच्या लोकशाही अवनतीमुळे जगातील ८ अब्ज लोकांपैकी १.४ अब्ज लोक निरंकुश देशांच्या श्रेणीत आले. मुक्त ते अंशतः मुक्त असे त्याचे प्रमाण कमी झाल्याने स्वतंत्र देशात राहणाऱ्या जगाचा वाटा पूर्णपणे निम्मा झाला. लोकशाहीची भूमी, हुकूमशाहीचा समुद्र आणि संकरित प्रदेशांना चिन्हांकित करणारे दलदलीचे प्रदेश यांच्यातील संकल्पनात्मक रेषा तुम्ही जिथे काढता तिथे, भारताशिवाय आपले लोकशाही जग खूपच कमी लोकसंख्या असलेले आहे. आज भारत लोकशाही आहे का हा प्रश्न केवळ देशाच्या राजकीय भविष्याच्या विश्लेषणासाठीच नाही तर लोकशाही ट्रेंडच्या अधिक व्यापक आकलनासाठी महत्त्वाचा आहे. यावर्षी जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत हा आहे जिथे लोकशाहीसाठी जागतिक लढाई लढली जात आहे.
काही लोक भारताचे हायब्रिड-राजकारण क्षेत्रात रूपांतर झाले आहे यावर असहमत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारत सरकारने पाश्चात्य पक्षपातीपणाच्या आरोपांसह प्रतिक्रिया दिली आहे, भारताच्या लोकशाही अवनतीला "दिशाभूल करणारे, चुकीचे" म्हटले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने लोकशाही क्रमवारीतील विसंगतींवर प्रकाश टाकणारा एक कार्यपत्र प्रसिद्ध केला. तरीही मध्यवर्ती बँकेच्या व्याजदरांप्रमाणे राजवटीचे मूल्यांकन स्वतंत्र संस्थांकडून सर्वोत्तम का केले जाते याचे कारण आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीचे निरीक्षण करणारे पाश्चात्य लोकशाहीच्या गुणवत्तेवर टीका करण्यास लाजत नाहीत. परंतु स्वतंत्र आवाजांचा एक अल्पसंख्याक गट देखील भारताच्या संकरित राजवटीच्या पुनर्वर्गीकरणाला विरोध करतो. "भारताची लोकशाही का मरत नाही" या लेखात अखिलिश पिल्लमारी लिहितात की, "आज भारतातील सांस्कृतिक आणि सामाजिक ट्रेंड हे लोकशाहीच्या मागे जाण्याचे पुरावे नाहीत, तर ते भारतातील सामाजिक नियमांचे पुरावे आहेत जे भाषण, वैयक्तिक अभिव्यक्ती आणि टीकेबद्दल उदारमतवादी आहेत." तर भारत खरोखरच लोकशाहीच्या किनाऱ्यावरून निघून गेला आहे का? आणि जर तसे असेल तर, भारताचे संकरित राजवटीत संक्रमण उलट करता येईल का? दोन्ही प्रश्नांचे उत्तर हो आहे.
नावात काय आहे ?
भारताच्या लोकशाहीच्या घसरणीचे मूल्यांकन करण्यासाठी, सर्वप्रथम लोकशाहीची व्याख्या करणे आवश्यक आहे, कारण भारताच्या लोकशाहीच्या घसरणीवरील वादविवादाचा निर्णय संकल्पनात्मक स्पष्टतेवर अवलंबून आहे आणि कारण लोकशाही निःसंशयपणे मानक वैधतेचा अर्थ देते. अब्राहम लिंकनच्या म्हणण्यानुसार, लोकशाही ही एक संकल्पना आहे जी "लोकांची, लोकांद्वारे आणि लोकांसाठी" सरकारची व्यवस्था स्थापित करते. या कल्पनेला चालना देणाऱ्या लोकशाहीच्या गैर-मानक पैलूंवरील स्पष्टता आपल्याला भारताच्या लोकशाहीच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आपण वापरू शकतो अशा निकषांकडे निर्देश करते.
देशाला लोकशाही म्हणून घोषित करण्यासाठी पाच संस्था केंद्रस्थानी असतात यावर बहुतेक विद्वान सहमत आहेत. या पाच संस्थांपैकी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कायदेमंडळाच्या निवडणुका या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या आहेत. लोकशाहीचा दुसरा संस्थात्मक आधारस्तंभ म्हणजे खऱ्या राजकीय स्पर्धेची उपस्थिती. ज्या देशांमध्ये व्यक्तींना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे, परंतु जिथे सत्ताधारी विरोधी पक्षांना संघटित करणे कठीण करतात त्यांना सामान्यतः लोकशाही मानले जात नाही. लोकशाहीसाठी इतर शक्तींकडून सरकारी स्वायत्तता देखील आवश्यक असते - जसे की वसाहतवादी शासक किंवा शक्तिशाली लष्करी अभिजात वर्ग - जे लोकशाही निवडणुका थांबवू शकतात किंवा पूर्णपणे उलथवू शकतात; ही स्वायत्तता तिसरा संस्थात्मक आधारस्तंभ आहे.
लोकशाहीसाठी आणखी दोन संस्था संकल्पनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत कारण त्या नागरिकांना आणि सरकारच्या स्वतंत्र शाखांना सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यास सक्षम करतात: नागरी स्वातंत्र्य, चौथा स्तंभ आणि  कार्यकारी नियंत्रण, पाचवा स्तंभ. अनेक प्रमुख विद्वानांनी योग्यरित्या असा युक्तिवाद केला आहे की मूलभूत नागरी स्वातंत्र्यांचा समावेश नसलेल्या लोकशाहीच्या व्याख्या अपुर्या आहेत. गंभीर जनमत तयार करण्यास सक्षम करणारी स्वतंत्र प्रेस या नागरी स्वातंत्र्य स्तंभाचा भाग म्हणून वाढत्या प्रमाणात समजली जात आहे. लोकशाहीचा अंतिम संस्थात्मक स्तंभ, कार्यकारी नियंत्रण, ही निवडून आलेल्या सरकारच्या प्रमुखाला घोषित करण्यापासून रोखते.  लोकशाही ही अशा संस्थांचा संच आहे जी सरकारी जबाबदारीची प्रथा अंतर्भूत करते. ही जबाबदारी दोन रूपे घेते: लोक आणि निवडून आलेल्या सरकारच्या सर्वोच्च पातळींमधील उभ्या जबाबदारी, विशेषत: निवडणुका आणि पर्यायी राजकीय शक्ती; आणि कार्यकारी आणि स्वतंत्र संस्थांमधील क्षैतिज जबाबदारी, विशेषत: स्वतंत्र कायदेमंडळे आणि न्यायालये जी निवडून आलेल्या कार्यकारी अधिकारीला नागरी स्वातंत्र्य पायदळी तुडवण्यापासून रोखू शकतात.
लोकशाहीच्या या पाच-स्तंभीय संकल्पनेतून दोन महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात जे भारताच्या समकालीन लोकशाही अधोगतीच्या आपल्या मूल्यांकनाशी संबंधित आहेत. पहिले म्हणजे लोकशाहीची विद्वत्तापूर्ण व्याख्या कालांतराने योग्यरित्या विस्तारली आहे. गेल्या अर्ध्या शतकात, हुकूमशाही नेत्यांनी लोकशाहीच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या संस्थांना रद्द करताना तिचे चौकटीत बसणे शिकले आहे, त्यामुळे लोकशाहीचे निरीक्षकांनी सरकारी संस्थांमध्ये जबाबदारी आहे का आणि संस्थात्मक अधिकार केवळ कायद्यातच नाहीत तर व्यवहारातही अस्तित्वात आहेत का याचे अधिक चांगले मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करून हुशारीने अनुकूलन केले आहे. लोकशाहीच्या विद्वत्तापूर्ण संकल्पनांचा विस्तार ज्या विशिष्ट पद्धतीने झाला आहे तो म्हणजे लोकशाहीला बळकटी देण्यासाठी संस्थात्मक नियमांचे महत्त्व नवीन प्रकारे समजले आहे. नॅन्सी बर्मेओ यांनी २०१६ मध्ये या पानांमध्ये भविष्यसूचकपणे लिहिले आहे की, आपण लोकशाहीच्या मागे हटण्याच्या युगात जगत आहोत, ज्याचे वैशिष्ट्य उघड लोकशाही बिघाडाचे पतन आहे. सत्तापालटाची जागा वचनबद्ध सत्तापालटांनी घेतली आहे "निवडून आलेल्या सरकारची हकालपट्टी लोकशाही कायदेशीरतेच्या संरक्षण म्हणून सादर करणे"; कार्यकारी सत्तापालटांची जागा कार्यकारी वाढीने घेतली आहे "निवडून आलेले अधिकारी कार्यकारी अधिकारावरील नियंत्रणे एकामागून एक कमकुवत करतात, कार्यकारी प्राधान्यांना आव्हान देण्याच्या विरोधी शक्तींच्या शक्तीला अडथळा आणणारे संस्थात्मक बदलांची मालिका हाती घेतात"; आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या फसवणुकीची जागा निवडणुकीपूर्वीच्या धोरणात्मक हाताळणीने घेतली आहे "पदाधिकाऱ्यांच्या बाजूने निवडणूक क्षेत्र झुकवण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतींची श्रेणी" प्रतिबिंबित करते. दुसऱ्या शब्दांत, लोकशाही घसरण लोकशाही संस्थांच्या वाढत्या कमकुवतपणाचे रूप धारण करत आहे जिथे "त्रासलेल्या लोकशाही आता तुटण्याऐवजी क्षीण होण्याची शक्यता जास्त आहे." 
आणि अशा लोकशाही ऱ्हासाची सर्वात स्पष्ट चिन्हे म्हणजे निवडून आलेले नेते सर्व विरोधकांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि ते कमकुवत करण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक कायदेशीर साधनाचा वापर करतात. ऐतिहासिक प्रकरणांच्या विस्तृत श्रेणीचा आधार घेत, स्टीव्हन लेवित्स्की आणि डॅनियल झिब्लॅट असा युक्तिवाद करतात की राजकीय विरोधाप्रती अलिखित नियम आणि वर्तनाचे निकष हे अशा लोकशाही ऱ्हासाला रोखण्याची गुरुकिल्ली आहेत. त्यांचा असा युक्तिवाद आहे की दोन सर्वात महत्वाचे निकष म्हणजे  विरोधी सहिष्णुता,  म्हणजे राजकीय विरोधकांना शत्रू म्हणून वागणूक दिली जात नाही तर फक्त राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून वागवले जाते आणि  सहनशीलता,  म्हणजेच कार्यकारी आदेश, व्हेटो आणि फिलिबस्टर यासारख्या विरोधकांना रोखण्यासाठी कायदेशीर पद्धतींचा मर्यादित वापर. 6  समकालीन लोकशाही विरोधी पक्ष एका रात्रीत हुकूमशाहीत रूपांतरित होत  नाहीत  . त्याऐवजी, जेव्हा विरोध सहन केला जात नाही आणि जेव्हा निवडून आलेले राजकारणी राजकीय विरोधाशी तडजोड करण्याऐवजी कायद्याच्या पूर्ण शक्तीचा वापर करून ते रद्द करतात तेव्हा लोकशाही हळूहळू मरते.
भारताचा समकालीन लोकशाहीचा ऱ्हास हा लोकशाहीला पाठिंबा देणाऱ्या या महत्त्वाच्या निकषांचा झपाट्याने ऱ्हास होत असल्याचे एक उदाहरण आहे. भारताच्या लोकशाहीच्या औपचारिक संस्था मुख्यत्वे फ्रीडम हाऊसच्या राजकीय-हक्क श्रेणीत प्रतिबिंबित होतात आणि लोकशाहीच्या निवडणुका, स्पर्धा आणि स्वायत्तता स्तंभांशी संबंधित गेल्या दशकात तुलनेने स्थिर राहिल्या आहेत. याउलट, भारताचा नागरी स्वातंत्र्य क्रमवारी २०१९ पासून वर्षानुवर्षे घसरत चालला आहे, २०१० मध्ये ४२ संभाव्य ६० पैकी गुणांवरून २०२३ मध्ये ३३ वर घसरला आहे. फ्रीडम हाऊसच्या नागरी स्वातंत्र्य निर्देशांकातील ही नऊ-बिंदूंची घसरण भारताला लोकशाहीच्या श्रेणीतून सर्वसाधारणपणे ७० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या संकरित राजवटीच्या प्रदेशात सर्वसाधारणपणे ३५ आणि ७० दरम्यान गुण मिळवणाऱ्या नेऊन टाकली आहे. आणि, मी खाली तपशीलवार सांगितल्याप्रमाणे, डाउनग्रेड आवश्यक आहे.
दुसरा, संबंधित मुद्दा असा आहे की एकच राजवट वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे निरंकुश बनू शकते. आणि वेगवेगळे राजवटी तितक्याच अलोकतांत्रिक असू शकतात, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे. लोकशाही मंदीने नाट्यमय स्वरूप धारण करण्याची गरज नाही, जसे की लष्करी उठाव किंवा  इंदिरा गांधींच्या आणीबाणीत भारताने पाहिलेल्या ऑटोगोल्पचा प्रकार. २०२३ मध्ये, फ्रीडम हाऊसने इराक आणि माली दोघांनाही मुक्त नाही म्हणून वर्गीकृत केले आणि त्यांना २९ गुण दिले - परंतु पूर्णपणे भिन्न कारणांसाठी. राजकीय अधिकारांमध्ये मालीचा क्रमांक कमी आहे. ४० पैकी ८ गुण कारण लष्करी उठावानंतर देश अद्याप नियमित निवडणुका घेण्यास परतलेला नाही. परंतु नागरी स्वातंत्र्यांसाठी पूर्ण हुकूमशाहींमध्ये माली उच्च स्थानावर आहे ६० पैकी २१ गुण कारण त्याचे माध्यम तुलनेने स्वतंत्र आहे आणि त्याला मतभेद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यापक अधिकार आहेत. याउलट, इराक राजकीय अधिकारांवरील पूर्ण हुकूमशाहींमध्ये ४० पैकी १६ गुण तुलनेने उच्च आहे कारण ते नियमित, स्पर्धात्मक निवडणुका घेते आणि त्याचे विविध धार्मिक आणि वांशिक गट राजकीय व्यवस्थेत प्रतिनिधित्व राखतात. तरीही इराक नागरी स्वातंत्र्यांच्या बाबतीत कमी चांगले आहे ६० पैकी १३ गुण कारण मिलिशिया नागरिक आणि पत्रकारांना स्वातंत्र्यापासून वंचित ठेवत असल्याच्या वारंवार नोंदलेल्या घटना आहेत. काही क्षेत्रांमध्ये तीव्र घसरण होऊन देश लोकशाहीच्या उंबरठ्याखाली जाऊ शकतात. परंतु ते विविध निर्देशकांमध्ये काही प्रमाणात घसरण होऊन हायब्रिड-राजव्यवस्थेच्या क्षेत्रात देखील जाऊ शकतात - आणि हेच आपण समकालीन भारतात पाहतो.
स्थिर हक्क आणि घटते स्वातंत्र्य
भारताची लोकशाही कधीही उच्च दर्जाची नव्हती. स्वायत्त, स्पर्धात्मक निवडणुकांच्या औपचारिक अंमलबजावणीमध्ये व्यापक प्रमाणात नागरी स्वातंत्र्ये होती - जरी ती मोठ्या प्रमाणात गरिबी निर्मूलन कार्यक्रम आणि जगातील सर्वात मोठ्या सकारात्मक कृती कार्यक्रमात रूपांतरित झाली - त्यात नेहमीच अनेक कमतरता होत्या. परंतु लोकशाहीमध्ये एक अंतर्निहित ऑटोकरेक्ट वैशिष्ट्य देखील होते, ज्यामुळे सत्ताधारींना सत्तेवरून बाहेर काढता आले. ते ऑटोकरेक्ट वैशिष्ट्य आज बहुतेक  अनौपचारिक  मार्गांनी धोक्यात आले आहे. फ्रीडम हाऊसच्या राजकीय-हक्क स्कोअरच्या बाबतीत निवडणुका, स्पर्धा आणि स्वायत्ततेचे आधारस्तंभ समाविष्ट करून, मोदी सत्तेवर येण्यापूर्वीच्या नऊ वर्षांसाठी भारताची सरासरी २०१४ पासूनच्या नऊ वर्षांसारखीच होती. विद्यमान उलाढाल निवडणूकदृष्ट्या शक्य आहे परंतु अशक्य आहे कारण मोदी सरकारने लोकशाहीचे चौथे आणि पाचवे स्तंभ असलेल्या नागरी स्वातंत्र्यांचे आणि कार्यकारी निर्बंधांचे प्रत्यक्ष संरक्षण लक्षणीयरीत्या कमी केले आहे. भारताच्या नागरी-स्वातंत्र्य रेटिंगमधील घसरण ही त्याच्या समकालीन लोकशाही घसरणीचे कारण आहे. भारतीय न्यायालयांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या केवळ अनियमितपणे संरक्षित असलेला मतभेदाचा कायदेशीर अधिकार कायदेशीररित्या अजूनही अस्तित्वात आहे, तर जबरदस्त छळापासून मुक्त असलेल्या मुखर मतभेदाची व्यावहारिक शक्यता जवळजवळ नाहीशी झाली आहे. २०१४ मध्ये मोदींचे भारतीय जनता पक्ष सरकार सत्तेत येण्यापूर्वी भारतातील माध्यमे, सामान्यतः चैतन्यशील आणि मुक्त असली तरी, कधीकधी त्यांच्यावर सेन्सॉरशिप करण्यात आली होती. परंतु आज, माध्यमे कायदेशीररित्या मतभेद व्यक्त करण्यास मुक्त असताना, स्वतंत्र पत्रकारितेचा व्यापक छळ आणि एकाग्र मालकी संरचनांमुळे पत्रकार आणि व्यक्ती उच्च प्रमाणात स्व-सेन्सॉरशिपचा सराव करत आहेत. कार्यकारी अधिकारावरील नियंत्रणे,औपचारिकरित्या अस्तित्वात असताना, वेगाने कमी होत आहेत.
नागरी स्वातंत्र्यांवर आमूलाग्र बंधने आहेत. २०१६ पासून, नागरी स्वातंत्र्यांवर काही प्रमाणात कायदेशीर आणि काही प्रमाणात व्यावहारिकदृष्ट्या अंकुश लावण्यात आला आहे. १९७ देशांमध्ये जागतिक नागरी स्वातंत्र्यांचा मागोवा घेणारी आंतरराष्ट्रीय संस्था, CIVICUS, आता भारताला खुले, अरुंद, अडथळा, दडपलेले आणि बंद अशा घटत्या प्रमाणात "दडपलेले" म्हणून वर्गीकृत करते. २०१९ मध्ये घडलेल्या "अडथळाग्रस्त" वरून अवनत केल्यामुळे, संस्थेच्या वेबसाइटनुसार, भारताचे नागरी स्थान असे होते जिथे "सत्ताधारकांवर टीका करणारे नागरी समाज सदस्य पाळत ठेवणे, छळ, धमकी, तुरुंगवास, दुखापत आणि मृत्यूचा धोका पत्करतात." त्याच्या शेजारी देशांमध्ये, भारत आता पाकिस्तान आणि बांगलादेशच्या समान रेटिंग श्रेणीत आहे आणि नेपाळ आणि श्रीलंकेपेक्षा कमी श्रेणीत आहे.
मोदी सरकारने टीकाकारांना शांत करण्यासाठी दोन प्रकारचे कायदे वाढत्या प्रमाणात वापरले आहेत - वसाहतकालीन देशद्रोह कायदे आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA). पोस्टर्स, सोशल मीडिया पोस्ट, घोषणा, वैयक्तिक संवाद आणि एका प्रकरणात, पाकिस्तानी क्रिकेट विजयासाठी आनंदाचे संदेश पोस्ट करण्याच्या स्वरूपात असहमती दर्शविल्याबद्दल अधिकाऱ्यांनी नियमितपणे देशद्रोह कायद्यांतर्गत व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.  २०१० ते २०२१ दरम्यान देशद्रोहाच्या प्रकरणांमध्ये २८ टक्क्यांनी वाढ झाली. सरकारवर टीका केल्याबद्दल नागरिकांवर दाखल झालेल्या देशद्रोहाच्या खटल्यांपैकी ९६ टक्के खटले २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर दाखल करण्यात आले होते. एका अहवालाचा अंदाज आहे की फक्त एका वर्षाच्या काळात, एकाच जिल्ह्यातील दहा हजार आदिवासी कार्यकर्त्यांवर त्यांच्या जमिनीच्या हक्कांसाठी देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला होता. २०१९ मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्यात आली ज्यामुळे सरकारला दहशतवादी संघटनेशी विशिष्ट संबंध नसलेल्या व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित करण्याची परवानगी देण्यात आली. या वर्गीकरणाला आव्हान देण्यासाठी न्यायालयीन उपाययोजनांची कोणतीही यंत्रणा नाही. कायदा आता स्पष्ट करतो की त्याचा वापर "धमकी देण्याची शक्यता" किंवा "लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याची शक्यता" अशी कोणतीही कृती करणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो. २०१५ ते २०१९ दरम्यान, UAPA अंतर्गत अटकेत ७२ टक्के वाढ झाली आहे, अटक केलेल्यांपैकी ९८ टक्के जामिनाविना तुरुंगात आहेत. या मजबूत कायद्यांचे वारंवार आवाहन हे नवीन आहे आणि त्यामुळे मतभेदांना थंडावले आहे.  सरकारी धोरणांवरील टीकांना राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध किंवा "राष्ट्रविरोधी" असे व्यापकपणे लेबल लावून आणि समस्याग्रस्त ऑनलाइन मतभेद ओळखण्यासाठी स्वयंसेवकांची फौज नियुक्त करून राज्याने विरोधकांना घाबरवले आहे. भाजपच्या राजकारण्यांनी व्यक्ती, कारणे आणि संघटनांना लक्ष्य करणाऱ्या पद्धतींमध्ये "राष्ट्रविरोधी" हा शब्द लोकप्रिय केला आहे. 9  प्रथम शैक्षणिकांना लक्ष्य केले गेले, विद्यापीठ प्रशासक आणि प्राध्यापकांची चौकशी करण्यात आली, त्यांना शिस्त लावण्यात आली किंवा त्यांच्या राजकीय विचारांमुळे त्यांना पद सोडण्यास भाग पाडण्यात आले. परंतु अशा युक्त्या लवकरच वाढवल्या गेल्या ज्यामुळे कोणत्याही उच्च-प्रोफाइल मतभेदांना समाविष्ट केले गेले.
भारतातील मुस्लिम समुदाय, जो लोकसंख्येच्या १४ टक्के आहे, त्यांना नागरी स्वातंत्र्यांमध्ये विशेषतः लक्षणीय घट झाली आहे. मुस्लिमविरोधी हिंसाचाराच्या घटनांमध्ये, ज्यात लिंचिंग किंवा जमावाने केलेल्या हत्यांचा समावेश आहे, झपाट्याने वाढ झाली आहे. इंडियास्पेंडच्या मते, २०१० पासून भारतात हिंसाचाराच्या प्रमाणात गोवंशाशी संबंधित जमावाने केलेल्या मृत्यूंमध्ये (ज्यात गोमांस हाताळणाऱ्यांच्या अफवांचा समावेश आहे, विशेषत: मुस्लिम) लक्षणीय वाढ झाली आहे, २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर २०१० ते २०१७ दरम्यान ९७ टक्के गोवंशाशी संबंधित हल्ले झाले आहेत. सार्वजनिक हत्येचे बळी बहुतेक मुस्लिम असल्याचे मानले जाते. ह्यूमन राईट्स वॉच आणि यूएस कमिशन ऑन रिलिजियस फ्रीडमसह अशा बाबींवर अहवाल देणाऱ्या बहुतेक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्थांनुसार, भारतातील सर्वात मोठा अल्पसंख्याक आता "भीतीच्या व्यापक वातावरणात" जगत आहे. १०  २०१९ मध्ये संसदेने नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केल्यानंतर, मुस्लिमांविरुद्ध भेदभाव कायदेशीर स्वरूप धारण केले, विशेषतः मुस्लिम निर्वासितांना सुव्यवस्थित नागरिकत्व प्रक्रियेतून वगळण्यात आले. निरीक्षकांचा असा विश्वास आहे की या कायद्याचा, नियोजित राष्ट्रीय नागरिक नोंदणीसह, नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे नसलेल्या मुस्लिम मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी वापरला जाईल. भारतातील एकमेव मुस्लिम बहुल राज्य, जम्मू आणि काश्मीर, त्याच्या नागरी स्वातंत्र्यांवर बंदी घालत आहे जे प्रत्येक बाबतीत भारताच्या आणीबाणीसारखेच आहे - ही वस्तुस्थिती फ्रीडम हाऊसने भारतीय काश्मीरचे स्वतंत्र वर्गीकरण नॉट फ्री म्हणून केले आहे.
मतभेद व्यक्त करण्याच्या मर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्यामुळे एकत्र येण्याच्या स्वातंत्र्यावरील कायदेशीर बंधने अधिकच वाढतात. भारतातील एकत्र येण्याच्या स्वातंत्र्याचे मूल्यांकन करणाऱ्या २०२१ च्या इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉट-फॉर-प्रॉफिट लॉच्या अहवालात असे आढळून आले आहे: "सार्वजनिक निषेधांना राक्षसी आणि गुन्हेगारी करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमध्ये, ज्यामध्ये संमेलन आयोजकांची बदनामी देखील समाविष्ट आहे, एक दंडात्मक, सुरक्षा-केंद्रित दृष्टिकोन वाढत्या प्रमाणात वापरला जात आहे." ११
सरकारने निषेधाचे समन्वय साधण्याचे प्रत्यक्ष साधन असलेल्या इंटरनेटवर वारंवार बंदी घातली आहे. २०२२ मध्ये सरकार-निर्देशित ८४ इंटरनेट बंदसह भारत केवळ जगात आघाडीवर नाही, तर प्रभावी सार्वजनिक समन्वयाला अडथळा आणण्यासाठी निदर्शनांच्या आधी आणि दरम्यान हे ब्लॅकआउट लागू केले जातात, बहुतेकदा निलंबनासाठी स्पष्ट निकष नसतात. १२  अहवालात असे आढळून आले आहे की भाषण आणि सभेसाठीचे कायदेशीर संरक्षण केवळ किरकोळ प्रमाणात कमी झाले असले तरी, प्रत्यक्षात संरक्षण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
नागरी समाजातील सरकारच्या टीकाकारांना वारंवार प्रशासकीय छळाचे लक्ष्य केले जाते. २०२० मध्ये, मोदी सरकारने नागरी समाजाच्या स्वातंत्र्याचा गळा दाबण्यासाठी परकीय योगदान नियमन कायदा (FCRA) कडक केला, परकीय निधी हस्तांतरणाच्या रसदांना लक्ष्य केले, स्वयंसेवी संस्थांमध्ये खर्चाचे स्वरूप आणि निधी वाटप मर्यादित केले, केंद्र आणि राज्य सरकारांना स्वेच्छेने स्वयंसेवी संस्थांना निलंबित करण्याचा अधिकार दिला आणि सार्वजनिक कर्मचाऱ्यांना संघटनांमध्ये सामील होण्यापासून रोखले. सरकारी अधिकाऱ्यांनी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीनपीस, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च, फोर्ड फाउंडेशन, लॉयर्स कलेक्टिव्ह आणि ऑक्सफॅम यासारख्या नागरी समाज गटांच्या विस्तृत श्रेणीविरुद्ध तांत्रिक परंतु पूर्णपणे कायदेशीर आधारांवर आर्थिक ऑडिट आणि कर-संबंधित छापे पद्धतशीरपणे वापरले आहेत. १३
गेल्या दशकात, भारतीय माध्यमांनी थेट धमकी आणि संरचनात्मक बदलांमुळे सरकारवर टीका करण्याचे प्रमाण कमी केले आहे. २०१४ पासून, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्सच्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारत १८० देशांपैकी १६१ व्या स्थानावर घसरला आहे, जो अफगाणिस्तान, बेलारूस, हाँगकाँग, लिबिया, पाकिस्तान आणि तुर्कीपेक्षा खाली आहे. संस्थेच्या मते, भारतीय पत्रकारांना कधीकधी जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात आणि सरकारशी संबंधित ट्रोल फार्मद्वारे चालवल्या जाणाऱ्या सोशल-मीडिया द्वेष मोहिमांचे ते वारंवार लक्ष्य असतात. प्रमुख माध्यम नेटवर्क मोदी सरकारवर टीका करण्यास मोकळे वाटत नाहीत. २०२० मध्ये तीन महिन्यांत टाईम्स नाऊ या चॅनलवरील प्राइम-टाइम टेलिव्हिजन वादविवादांचे विश्लेषण करणाऱ्या एका अभ्यासात असे आढळून आले की  ज्यामध्ये कोणत्याही स्वरूपात मोदी सरकारवर टीका केलेली एकही  एपिसोड नाही  . २०१७ ते २०२० पर्यंत रिपब्लिक टीव्हीच्या एका वेगळ्या अभ्यासात कव्हरेज "मोदी सरकार आणि त्याच्या धोरणांच्या बाजूने सातत्याने पक्षपाती" असल्याचे आढळून आले. १४  मोदींनी स्वतः माध्यमांशी संवाद मर्यादित केला आहे, गेल्या नऊ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही.
निवडक परवाने देणे, मोदींशी संलग्न व्यावसायिकांकडून स्वतंत्र नेटवर्क्सचे अधिग्रहण करणे आणि उर्वरित काही स्वतंत्र आउटलेट्सचा छळ करणे यासारख्या पद्धती मीडिया स्वातंत्र्याला आणखी कमकुवत करतात. उदाहरणार्थ, सरकारने टेलिव्हिजन प्रसारणासाठी परवाना दिला पाहिजे आणि महत्त्वाच्या देशांतर्गत संस्थांना परवाने नाकारले पाहिजेत. सरकारने क्विंट न्यूज वेबसाइटचे संस्थापक राघव बहल (ब्लूमबर्गसोबत भागीदारीत काम करत) यांचा परवाना इतका काळ रोखला की त्यांनी कंपनीचा टेलिव्हिजन विभाग बंद केला. २०१९ मध्ये बहलची चौकशी करण्यात आली आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला .
भारतातील वृत्तसंस्थांची संख्या ही भरभराटीच्या माध्यमांना सूचित करते असे दिसते, परंतु कार्यात्मक मालकी संरचनेची तपासणी अन्यथा दर्शवते. स्वतंत्र मीडिया ओनरशिप मॉनिटरला भारतात "केंद्रित होण्याकडे आणि शेवटी सामग्री आणि जनमतावर नियंत्रण ठेवण्याकडे एक महत्त्वपूर्ण कल" आढळतो. १५  मोदींशी जवळचे संबंध असलेले उद्योगपती मुकेश अंबानी, किमान ८०० दशलक्ष भारतीयांनंतर थेट माध्यमांचे नियंत्रण करतात. मोदींचे आणखी एक जवळचे सहकारी, गौतम अदानी यांनी डिसेंबर २०२२ मध्ये भारतातील शेवटचे मोठे स्वतंत्र टेलिव्हिजन नेटवर्क, एनडीटीव्ही विकत घेतले. १६  विश्लेषकांच्या मते, अदानी यांनी एनडीटीव्हीचे अधिग्रहण "भारतातील स्वतंत्र माध्यमांसाठी शेवटचा खेळ दर्शविते, ज्यामुळे देशातील सर्वात मोठे टेलिव्हिजन वृत्तवाहिन्या भारत सरकारशी मजबूत संबंध असलेल्या अब्जाधीशांच्या हाती सोडल्या जातात." १७  स्वतंत्र बातम्यांचे काही लहान, दृढनिश्चयी स्रोत शिल्लक असताना, २०१३ पासून त्यांना त्यांच्या रिपोर्टिंगसाठी कर छापे आणि खटल्यांचा सामना करावा लागला आहे.
सरकार आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनाही त्यांच्या टीकेसाठी लक्ष्य करते, सामान्यत: टीकात्मक परदेशी बातम्यांचे वृत्तांकन भारताच्या जागतिक उदयाला रोखण्याच्या कटाचा भाग म्हणून दाखवते.  ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या भारतीय कार्यालयांवर फेब्रुवारी २०२३ मध्ये छापे टाकण्यात आले होते, वृत्तसंस्थेने मोदी सरकारवर टीका करणारा एक माहितीपट प्रसिद्ध केल्यानंतर काही आठवड्यांनीच. आणीबाणीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या कायद्यांचा वापर करून काही महिन्यांपूर्वीच बीबीसी माहितीपट आणि कोणत्याही क्लिप भारतात प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली होती. छापे टाकताच, भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बीबीसीला "जगातील सर्वात भ्रष्ट संस्था" म्हटले. १८  मी शिकवत असलेल्या डझनभर भारतीय विद्यार्थ्यांपैकी काहींनी ऑक्सफर्ड विद्यापीठात या माहितीपटाचे खाजगी प्रदर्शन आयोजित केले तेव्हा त्यांच्यात भीती स्पष्टपणे जाणवली. निमंत्रितांना सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून आणि व्हॉट्सअॅप संदेशांची देवाणघेवाण करण्यापासून दूर राहण्यास सांगितले गेले, कारण नियमित थांब्यांदरम्यान पोलिसांनी व्यक्तींना त्यांचे फोन अनलॉक करण्यास सांगितलेले व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. १९ मोदी सरकारच्या काळात कार्यकारी कारवाईची कायदेशीर तपासणी खऱ्या अर्थाने कमी होत चालली आहे. भारतातील प्राथमिक संसदीय संस्थांच्या समित्या कार्यकारी मंडळावर एक महत्त्वाचा नियंत्रण म्हणून काम करतात, सर्व विधेयकांच्या गुणवत्तेचे बारकाईने परीक्षण करतात आणि त्यावर चर्चा करतात. मोदी सत्तेत येण्यापूर्वी २००९-१४ च्या संसदेत समित्यांनी ७१ टक्के विधेयकांची छाननी केली आणि मोदींच्या पहिल्या कार्यकाळात २०१४-१९ च्या संसदेत फक्त २५ टक्के विधेयकांची छाननी केली. २०१९ पासून, अशा छाननीचे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, २०२० च्या साथीच्या काळात एकही कायदेविषयक विधेयक समितीकडे पाठवले गेले नाही. अलिकडच्या काळात भारतातील काही महत्त्वाचे कायदे आणि राजकीय निर्णय - चार तासांच्या सूचनेसह राष्ट्रीय लॉकडाऊन लादणे, नोटाबंदी, शेती कायदे - संसदीय सल्लामसलतीशिवाय आणि विरोधी पक्षांच्या निषेधाशिवाय मंजूर झाले. मोदी सरकारने व्हिसलब्लोअर संरक्षण कमकुवत करण्यासाठी अनेक कायदेशीर सुधारणा देखील आणल्या. २०
संसदेला कार्यकारी जबाबदारीचा वाढता अभाव वाढत चाललेल्या शांत न्यायव्यवस्थेमुळे अधिकच वाढला आहे. सर्वोच्च न्यायालय हे  भारताच्या संविधानाचे आणि त्याद्वारे नागरी स्वातंत्र्यांचे संरक्षक  आहे. २०१४ पूर्वीच्या दोन दशकांमध्ये, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आले, ज्यामुळे त्याला "जगातील सर्वात शक्तिशाली सर्वोच्च न्यायालय" असे नाव मिळाले. २१  केंद्र सरकारने वादग्रस्तपणे स्वतंत्र विचारसरणीच्या न्यायाधीशांची बदली केल्याने आणि कार्यकारी अधिकार नियंत्रित करणारे निकष कमी केल्याने हे लक्षणीयरीत्या बदलले आहे. २२  अशा हालचालींमुळे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या चार सर्वात वरिष्ठ सदस्यांनी २०१८ मध्ये एक अभूतपूर्व पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी इशारा दिला की मुख्य न्यायाधीशांनी खटले असामान्यपणे सोपवणे हे राजकीय हस्तक्षेपाचे लक्षण असू शकते. त्या चार न्यायाधीशांपैकी एक, जस्ती चेलमेश्वर यांनीही मुख्य न्यायाधीशांना एक खुले पत्र लिहून इशारा दिला की "कोणत्याही राज्यातील न्यायव्यवस्था आणि सरकारमधील सौहार्द लोकशाहीसाठी मृत्युघंटा असल्याचे दिसते." २३  सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या मंदिर, आधार बायोमेट्रिक आयडी सिस्टम,  काश्मीरमधील हेबियस कॉर्पस  , निवडणूक बंधपत्रे, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा यासारख्या प्रत्येक प्रमुख राजकीय मुद्द्यावर दिलेले निर्णय मोदी सरकारच्या बाजूने गेले आहेत. हे भूतकाळातील परिस्थितीशी एक वेगळेपणा दर्शवते. आणीबाणीच्या काळात आणि आजच्या सर्वोच्च न्यायालयातील व्यावहारिक फरक कमी आहे. काही जण असाही युक्तिवाद करतात की, आजची आणीबाणी ही फक्त "अघोषित" आहे. २४
 भारतीय लोकशाही वाचवता येईल का?
जगातील इतरत्रांप्रमाणे भारतातील लोकशाही आज लष्करी उठाव किंवा विरोधकांच्या नाट्यमय, समन्वित सामूहिक अटकेमुळे मरत नाही. त्याऐवजी, हुकूमशहांनी लोकशाही पद्धतीने बोलणे आणि हुकूमशहा पद्धतीने चालणे शिकले आहे, लोकशाहीचा कायदेशीर चेहरा राखत विरोधकांना त्रास देत आहे आणि निष्ठावंत मतभेदांसाठी जागा कमी करत आहे. भारतातील लोकशाहीच्या औपचारिक संस्था देखील दबावाखाली आहेत - मोदींच्या सर्वात प्रमुख राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अलीकडेच निवडणुकीत उतरण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे - हे प्रामुख्याने सामान्य नागरिकाला सरकारी धोरणांचे गंभीर मूल्यांकन वाचण्याची, छळाच्या भीतीशिवाय बोलण्याची आणि मुक्तपणे एकत्र येण्याची असमर्थता तसेच कार्यकारी अधिकारांवर ठोस नियंत्रण नसल्यामुळे भारत एका संकरित राजवटीत बदलला आहे.
भारताची लोकशाही घसरण वास्तविक असली तरी ती अपरिवर्तनीय नाही. जरी संकरित राजवटी बहुतेकदा स्थिर असतात, परंतु जोपर्यंत मतपत्रिका गुप्त राहतात आणि निवडणुकांचे निष्पक्ष निरीक्षण केले जाते तोपर्यंत निवडणुका जबाबदारीचे खरे क्षण राहतात. देखरेखीच्या पूर्णपणे सुधारित धोरणांसह पूर्णपणे हुकूमशहा राजवटी देखील प्रभावी निषेधाच्या क्षणांना सामोरे जातात कारण हुकूमशहा सत्तेच्या रचना अशा राजवटींना नागरिकांच्या चिंता - लोकशाही काय सर्वोत्तम करते याची अचूक समज मिळविण्यापासून रोखतात. चीनच्या शून्य-कोविड धोरण, इराणचे नैतिकता पोलिस आणि भारताच्या कृषी कायद्यांविरुद्धच्या अलीकडील निषेधांनी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होण्याच्या शाश्वत शक्यतांवर प्रकाश टाकला आहे.
पुढे जाऊन, लोकशाही पुनरुज्जीवनाचा भारताचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे सुविकसित संघटनात्मक मुळे असलेला खरा विरोधी पक्ष उदयास येणे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकेकाळी असाच पक्ष होता, परंतु १९६९ मध्ये इंदिरा गांधींनी पक्षाचे विभाजन केले आणि सत्तेचे केंद्रीकरण करण्याच्या प्रयत्नात तळागाळातील पक्ष पायाभूत सुविधा तोडल्या तेव्हा त्यांचे तळागाळातील संबंध नाहीसे झाले. भारतातील सिलिकॉन व्हॅलीचे घर असलेल्या दक्षिणेकडील राज्य कर्नाटकमध्ये अलिकडच्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश भाजपच्या चालू निवडणूक असुरक्षिततेला अधोरेखित करते आणि राहुल गांधींच्या तळागाळातील मोहिमे, भारत जोडो यात्रेला कदाचित त्याचे काही कारण आहे. २५  लहान पातळीवर, आम आदमी पक्ष ही एक आशादायक राजकीय शक्ती आहे जी दिल्लीच्या पायाच्या पलीकडे जाण्यात यशस्वी झाली आहे. परंतु दोन्ही पक्षांना त्यांच्या करिष्माई नेत्यांच्या पलीकडे कायमचा विकास करण्यासाठी दीर्घ लढाईचा सामना करावा लागतो. आणि नेहमीप्रमाणे, सत्तेचा प्रभावीपणे वापर करण्यापूर्वी व्यक्तींच्या पलीकडे चांगले संघटित असले पाहिजे. भाजपा, ज्यांची संघटनात्मक मुळे जवळजवळ एक शतकापासून वाढत आहेत, त्यांच्याविरुद्ध उभे राहणे ही एक कठीण परिस्थिती असेल. पण अशक्य नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९






महानायकांना भिडवण्याचा प्रयत्न..!

"देशापुढील मूलभूत प्रश्न सोडविण्यापासून दूर गेल्यानं भावनात्मक मुद्द्यांना महत्त्व देण्याचा काळ आता सुरू झालाय. खरी माहिती ...