"नुकतीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची बहुचर्चित भेट झालीय. प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रचारक राहिलेले मोदी पहिल्यांदा संघ संस्थापकांपुढे नतमस्तक होण्यासाठी संघ कार्यालयात गेले. भाजपच्या पक्षाध्यक्षांची निवड रखडलीय. मोदी सप्टेंबरमध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण करताहेत. त्यांनी वय झालेल्या अनेकांना वानप्रस्थाश्रमात पाठवलंय आता त्यांची वेळ आहे. पक्षाध्यक्ष निवडीबरोबरच मोदींचा वारस कोण? २०२९ ला प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार कोण ? शिवाय २०२७ मध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती नेमायचेत, १२ राज्यांचे मुख्यमंत्री निवडायचेत. यासाठी तेवढाच संघटनात्मक अन् राजकीयदृष्ट्या सक्षम व्यक्ती निवडावी लागणार असल्यानं हे विचारमंथन सुरू असल्याचं दिसतंय! संघाशिवाय हे होणे नसल्यानं मोदींनी संघ कार्यालयात भागवतांची भेट घेतलीय. म्हणूनच ही भरतभेट चर्चिली गेलीय!"
----------------------------------------------
*भा*रतीय राजकारणात पुढची अनेक वर्षे लक्षांत राहील अशी घटना गेल्या आठवड्यात घडलीय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेवर येऊन दहावर्षे उलटून गेलीत पण संघ प्रचारक म्हणून अनेक वर्षे काम केलं असतानाही संघ कार्यालयात, संघ संस्थापकांना वंदन करण्यासाठी कधीच गेले नाहीत. प्रचारासाठी नागपुरात गेले तिथं मुक्काम केला, पण आपल्या वंदनीय नेत्यांच्या दर्शनाला ते कधीच फिरकले नाहीत. त्यामुळं ३० मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विद्यमान संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यातल्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय. असं म्हटलं गेलं की, प्रधानमंत्री येत्या सप्टेंबरमध्ये ७५ वर्षाचे होत आहेत. त्यांनीच आपल्या नेत्यांना वानप्रस्थाश्रमात पाठविलं होतं, त्यामुळं नैतिकता म्हणून तेही सप्टेंबर नंतर निवृत्त होऊ शकतात. आपल्या कार्यकाळच्या उतरणीच्या काळात संघ कार्यालयात जाऊन संघ संस्थापकांचं दर्शन अन् भागवतांची घेतलेली ही भरत भेट ठरते की, काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. पण याबाबत काहीच ठोस असं स्पष्ट झालेलं नाही. या साऱ्या अंदाजच आहेत. मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनलेत पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळं सरसंघचालकांनी अनेकदा अप्रत्यक्षरित्या मोदींवर टीका केलेलीय. त्यांच्या धोरणांवर, वक्तव्यावर कडक टिपण्णी केलेलीय. दुसरीकडे भाजपच्या पक्षाध्यक्षांची नियुक्तीही रखडलीय. संघानं निश्चित केलेली नावं ही मोदी आणि शहा यांनी नाकारल्याचीही चर्चा आहे. त्यामुळं या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्व आलेलं आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 'आता भाजप सक्षम झालेला आहे. पूर्वी अक्षम असल्यानं संघाची मदत घ्यावी लागत होती. आता तशी गरज संघाची उरलेली नाही...!' असं म्हटलं होतं त्यामुळं संघ अलिप्त राहिला अन् भाजपला २४० वर थांबावं लागलं. नड्डा यांच्या वक्तव्यांमागं मोदी अन् शहा आहेत असं सांगितलं गेलं होतं. त्यामुळं आपला वारसदार नेमण्यासाठी त्याचं हे संघम् शरणम् गच्छामी...! झालंय.
नागपुरात गोळवलकर गुरुजींच्या नावानं सुरू होणाऱ्या डोळ्याच्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा समारंभ होता, त्यासाठी प्रधानमंत्री आले होते. निवडणूक प्रचारादरम्यान प्रधानमंत्री संघ कार्यालयात गेले असते तर त्याचा वेगळा राजकीय अर्थ काढला गेला असता. पण संघाने आयोजित केलेल्या समारंभाला मोदींनी जाणं ही संयुक्तिक कारण होतं. मोदी हे भागवतांपेक्षा सिनियर संघ प्रचारक आहेत. त्यामुळं स्वयंसेवक म्हणून मोदींची संघआयु ही भागवतांच्यापेक्षा अधिक आहे. पद अन् संस्थात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर भागवत हे मोदींना वरिष्ठ ठरतात, म्हणून त्याचं म्हणणं मोदींनी ऐकणं हे क्रमप्राप्त ठरतं. 'अनेक संघ स्वयंसेवकांनी देशात सत्ता यावी म्हणून अनेक वर्षे जे अथक प्रयत्न केलेत त्यामुळं सत्ता प्राप्त झालीय. त्या सर्व दिवंगत स्वयंसेवकांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आपण आलो आहोत...!' हे मोदींचं म्हणणंही रास्त आहे. दुसरं इथं नोंदवावं लागेल की, संघ गेल्या शंभर वर्षात जे करू शकला नाही ते मोदींनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात करून दाखवलंय. देशातल्या बहुसंख्याकांच्या मनांत 'होय, मी हिंदू आहे...!' हे मोदींनी बिंबवलं. पूर्वी सर्वधर्मसमभावी असं लोक स्वतःला समजत. हिंदू आहोत हे सांगायला घाबरत, स्वतःला भारतीय संबोधत असत आता 'गर्व से कहो हम हिंदू है...!' असं ठासून सांगू लागलेत. हे मोदींचं कार्यकर्तृत्व म्हणायला हवं. सारा देश हिंदुमय करण्याची भूमिका त्यांनी मार्गी लावलीय. संघाच्या पुस्तकात म्हटलंय की, 'देशातले ३ टक्के हिंदू जरी संघ स्थानावर येऊ लागले तर भारत हिंदुराष्ट्र बनण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही...!' त्याच दिशेनं मोदी आणि संघाची वाटचाल सुरूय. शिवाय गेली शंभरवर्षे रखडलेले संघाच्या पोतडीतले सारे विषय मोदींनी मार्गी लावलेत. काश्मीरमधलं ३७० कलम रद्द केलंय, तीन तलाक कायदा रद्द केला. अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर बांधलंय. बांगला देश संदर्भात एक रिझ्युलेशन संमत केलंय. वक्फ बोर्डाची दुरुस्ती केलीय. शिवाय त्यांनी देशाच्या वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी आणि स्वायत्त संस्था, इंटेलेकच्युअल ऑर्गनायझेशनवर, सांघिक आणि बौद्धिक संघटना यावर संघ विचाराची मंडळी बसवलीत. साऱ्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठांवर संघाची मंडळी विराजमान झालीत. पूर्वी उजव्या विचारसरणीचे लोक अशा पदांवर फारसे दिसत नव्हते आता सर्वत्र तीच मंडळी दिसताहेत. त्यांची बुद्धिमत्ता किती आणि काय आहे याविषयी मतभेद असू शकतात, प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ शकतात पण ते तिथं विराजमान झालेत अन् त्या संस्था त्यांनी काबीज केल्यात हे नाकारता येत नाही. त्यामुळं देशभरात संघ विचाराची प्रस्थापना करण्यात मोदींनी पुढाकार घेतलाय, त्यांनी आपली कर्तव्यपूर्ती केलीय. हे भाजप, संघ यांनाच नाहीतर त्या विचाराच्या साऱ्यांना मानावंच लागेल.
राहिला प्रश्न भाजपच्या अध्यक्षपदाची निवडीचा. संघाच्या संमतीशिवाय अध्यक्षाची निवड होऊ शकत नाही. बायोलोजिकल पाहिलं तर भाजप हे एक शरीर आहे आणि संघ त्याचं हृदय...! तिथूनच आवाज निघतो. जसजसे ठोके वाढतात तसे भाजपचं काम वाढतं. मेंदूदेखील संघाचा आहे. त्या दोघांच्या कनेक्शननं भाजप चालतो. हे जरी खरं असलं तरी संघामध्ये अशी चर्चा आहे की, जो पक्षाध्यक्ष बनेल तो मोदी अन् शहांसमोर गुडघे टेकवणारा नकोय. ज्या संघाच्या गोष्टी आहेत त्या त्या दोघांसमोर ठामपणे मांडणारा असावा. जे. पी. नड्डा हे संघ प्रचारक होते तरीदेखील ते त्यापद्धतीने वागले नाहीत, त्यामुळं त्यांच्याबद्दल नाराजी दिसून येते. पक्षाच्या घटनेनुसार नड्डा हे दोनदा अध्यक्ष झालेत, शिवाय त्यांना एक वर्ष अधिक मिळालेलंय. दुसरं असं म्हटलं जातंय की, पक्षपातळीवरच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तशा अमित शहांना अध्यक्ष करतानाही झालेल्या नव्हत्या. असं पहिल्यांदाच असं घडतंय असं काही नाही. आजवर १२ अध्यक्ष निवडले गेलेत पण असा विलंब कधी झालेला नव्हता. त्यामागं अनेक कारणं असतील. सहमती होऊ शकत नाही हेही खरंय. मोदींनी ७५ वर्षाची आयु मर्यादा घातली होती त्यामुळं अनेकजण वानप्रस्थाश्रमात गेले. पण मोदींनंतर कोण हा प्रश्न कदाचित संघासमोर असावा कारण मोदींच्या चेहऱ्यानं भाजपला सत्ता मिळालीय हे विसरता येणार नाही. त्यामुळं २०२९ च्या निवडणुकांवेळी कोण अध्यक्ष असेल अन् प्रधानमंत्रीपदाचा चेहरा कोणता असेल हे ठेवणारा अध्यक्ष निवडण्याची कसरत संघाला करावी लागतेय. लोकसभेच्या निवडणुका या २०२९ साली होतील. मोदी त्यावेळी ७९ वर्षाचे असतील. लोकसभा आणि १२ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. २०२७ मध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचीही निवड होणार आहे. अशावेळी जो आता अध्यक्ष होईल त्याची राजकीय व्हेटो पॉवर किती असायला हवीय! म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री अन् १२ राज्याचे मुख्यमंत्री निवडण्याची क्षमता असलेला अध्यक्ष निवडण्याची कसोटी संघापुढे आहे. माझ्यामते नरेंद्र मोदींकडे प्रत्येकाची निवड करताना प्रतिकात्मक दृष्टी होती. ती व्यक्ती कार्यकर्ता असावा, गरीब असायला हवी. त्यांनी आदिवासी, मागास वर्गातल्या लोकांना सत्तेची पदं दिलीत. दुसरं असं की, आजवर भाजप अध्यक्ष महिला कधीच झालेली नाही. जर कुणी एखादी महिला संघाच्या जवळ असेल तर त्या अध्यक्षा होऊ शकतात. येत्या आगामी ५ - १० वर्षात ज्या काही घडामोडी देशात आणि पक्षात घडणार आहेत त्यावर ज्याची संघटनात्मक, राजकीय पकड असेल अशा व्यक्तीचीच निवड होईल असं वाटतं.
नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच संघाशी समेट घडविण्यासाठी, बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी संघ कार्यालयात गेले असं काही वाटत नाही. अटलजी सहावर्षे प्रधानमंत्री होते पण ते त्याकाळी कधीच संघ कार्यालयात गेले नव्हते. तसेच मोदीही. पूर्वी अटलजींच्या कार्यकाळात संघाची आणि भाजपची नेतेमंडळी ही दिल्लीत एकत्र जमत विचारविनिमय, सल्लामसलत करत. पण मोदींच्या काळात तशा बैठका होत नाहीत. त्यामुळं सरसंघचालक आणि प्रधानमंत्री यांच्या भेटी झाल्या तरी चर्चा कधी झालेली नाही. पण आता अध्यक्षाची निवड व्हायची असल्यानं अशी चर्चा होणं गरजेचं असल्यानं ती नाकारणं शक्य नाही. त्या दोघांत जी चर्चा झाली त्यातून अध्यक्ष निवडला जाईल. दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद आढळून आले आहेत. भागवतांनी 'विरोधीपक्ष हा शत्रू नाही तर प्रतिपक्ष आहे...!' संसदेत आणि संसदेच्याबाहेर सत्ताधारी नेत्यांच्या वक्तव्यातून विरोधकाप्रती शत्रुता अधिक दिसून येते.भागवतांना हे का सांगावं लागलं की, विरोधकांशी तुम्ही अशाप्रकारे वागू नका! यातून मतभेद जाणवतंय. वैचारिकदृष्ट्या ते दोघे एकच आहेत. दोघांनाही हिंदुराष्ट्र बनवायचंय. त्यामुळं गेल्या ५- ७ वर्षात विरोधकांनी संघाला लक्ष्य केल्याचं दिसून येईल. गेल्या ७० वर्षात संघाच्या विरोधात विरोधीपक्ष एकत्र येताना दिसत नव्हते, जे आता दिसतात. भाजप आणि संघ यांची मतं वेगळी आहेत, हे दाखविण्याचा संघाचा प्रयत्न असतो. भागवतांची आजवरची वक्तव्य हेच दर्शवतात. संघाच्या मते भाजपचं नेतृत्व हे सामूहिक असायला हवंय. एकचालुकानुवर्तीत नेतृत्व असू नये. संघातही अशीच पद्धत आहे. सहा जणांची बैठक होते, त्यात धोरण, निर्णय ठरतात मग नेते बोलतात. त्याप्रकारे पक्षाच्या नेतृत्वाच्या अपेक्षा संघाच्या आहेत. नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री यांच्यात मतभेद नाहीत असं नाही, पण ते बाहेर व्यक्त होऊ नयेत, झालेच तर ते पक्षांतर्गत व्हावेत. अशी मांडणी संघाची आहे. संघाचा जो सांस्कृतिक अजेंडा जो होता त्यापैकी ८० टक्के अजेंडा भाजपने पूर्ण केलाय. राजकीय अजेंडा तर कधीच पूर्ण केलाय. पण आता संघासमोर प्रश्न आहे की, मोदींनंतर कोण? अध्यक्षाच्या निवडीनंतर ही स्पष्ट होऊ शकेल. अटलजी, अडवाणींनी एक टीम उभी केली होती. प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, अशी अनेक नावं आहेत. प्रत्येकजण प्रधानमंत्री बनण्याच्या क्षमतेचा होता. आता अशी टीम उभीच केली गेली नाही. अशी कोणतीच नावं राष्ट्रीय स्तरावर दिसत नाहीत. योगी आदित्यनाथ, अमित शहा आहेत पण ते सर्वसंमत असतील का? मोदींना दूर केलं तर भाजपचा चेहरा कोण असेल? लोकांना आपल्या सोबत आणण्याची किमया मोदींनी केलीय. मोदींमुळे ८- १० टक्के मतं भाजपला मिळतात, ती कमी झाली तर ती कुठे, कोण भरून काढणार? त्यामुळं नव्या अध्यक्षांची निवड ही महत्त्वाची ठरतेय. त्यांची निवड ही आगामी काळासाठी प्रतिकात्मक ठरणार आहे.
संघाच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र झालेत अन् त्यांनी संघाला लक्ष केलंय हे लक्षांत आल्यानंतर संघाने आपल्या भूमिकेत आधुनिकता आणलीय. भागवत गेले काही दिवस म्हणताहेत, 'मुसलमानाशिवाय हिंदूत्व दूर आहे... हिंदू मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच आहे... प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचंय...? काही लोक जय श्रीरामाच्या घोषणा देत आपलं करियर वाढविण्याचा प्रयत्न करताहेत....! दूरचित्रवाणीवर प्रवक्ते दुराग्रही हिंदुत्व व्यक्त करतात, त्यांना आपण नेत्यांना दिसावं म्हणून प्रयत्न करतात. हिंदुत्व मांडताना आपण अधिक कडवे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करत असतात...!' हे संघाला मान्य नाही. संघ हिंदुत्वाला वेगळ्या दिशेने नेऊ इच्छितेय. त्यासाठीच त्यांनी सौगात ए मोदी ही भेट देण्याचा प्रयत्न केला. पूर्वी सत्ताकारणात आणि पक्ष संघटनेत मुस्लिम नेते दिसायचे. आरिफ बेग, सिकंदर बख्त, शाहनवाज हुसेन, मुख्तार नक्वी अशी मंडळी होती. आज कुठेच मुस्लिम नाहीत. ना सत्तेत, ना पक्ष संघटनेत. होते त्या साऱ्यांना लांब ठेवलंय. निवडणूक प्रचारात अन् इतरवेळीही. प्रधानमंत्री आणि नेते मुस्लिमांवर तोंडसुख घेताना दिसतात. मुस्लिमांमध्ये भाजपविषयी एक भिती बसलेलीय ती दूर व्हावी असा प्रयत्न संघ करतेय. पण जे वातावरण निर्माण केलं गेलंय त्यात सारं अवघड होऊन बसलंय. भाजपची मुस्लिमांप्रती भूमिका ही दुटप्पी राहिलीय. एकाबाजूला प्रहार केला जातोय तर संघ त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. सौगात ए मोदींची खैरात सुरू असतानाच वक्फ बोर्डाच्या दुरुस्तीचे विधेयक आणलं गेलंय. मोदी हे नेहमीच आक्रमक भूमिकेत असतात. ते आकस्मिक असे धक्के देण्यात तरबेज आहेत. अशा धक्क्यांच्या मागे मग विरोधकांना फरफटत जावं लागतं. जेव्हा त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही तेव्हा काही काळ ते थोडेसे सौम्य बनले होते, पण सत्तेवर मांड ठोकताच त्यांनी आपला मूळ स्वभाव उफाळून आलाय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९.