Sunday, 28 December 2025

भाजपचा अश्वमेध रोखणार का?

'लावण्यवती मुंबई'ची अवस्था महाभारतातल्या द्रौपदीसारखी झालीय. ती काँग्रेसच्या ताब्यात होती तेव्हा तिला जुगारात लावलं अन् भाजपकडे गेली तेव्हा तिचं वस्त्रहरण झालं. आज मुंबईचं महत्व कमी केलं जातंय. इथली कार्यालये बाहेर नेली जाताहेत. येणारे उद्योग गुजरातकडे वळविले जाताहेत. सोन्याची लंका ओरबडून नेली जातेय. १०६ मराठी हुतात्मे देऊन मिळवलेली मराठी मुंबई हिंदी, गुजराती, बहुभाषी लोकांनी गिळंकृत करायचा प्रयत्न चालवलाय. त्याला राजसत्तेची फूस आहे. हे सारं रोखण्यासाठी, मराठीपण, मराठी भाषा, अस्मिता, मराठी माणूस टिकविण्यासाठी ठाकरे बंधू आपलं वैर विसरून उभे ठाकलेत. मदमस्त, सत्तांध झालेली राजसत्ता, शकुनी, दुर्योधन, दु:शासन त्यांचा सारीपाट अन् उधळलेला अश्वमेध रोखण्यासाठी मराठी माणूस सज्ज होणार की, नाही हा सवाल आहे. मुंबई महापालिका मराठी माणसाच्या ताब्यात राहणार की नाही. १६ जानेवारीला त्याचं चित्र स्पष्ट होईल!
-------------------------------------
महाराष्ट्राच्या राजकारणात 'मुंबई महानगरपालिका' हे केवळ एक स्थानिक प्रशासन नसून ते सत्तेचे सर्वात मोठं शक्तिपीठ आहे. मुंबईवर राज्य करणं हे ठाकरे घराण्याच्या राजकीय अस्तित्वाचं लक्षण राहिलेय. गेल्या ३० वर्षांपासून या महापालिकेवर ठाकरेंची एकहाती सत्ता होती. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेला प्रचंड विजय, नुकत्याचव झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमधली भाजपची घोडदौड पाहता, आता 'मुंबईचा गड' वाचवणे हे उद्धव आणि राज या दोन्ही बंधूंसमोर एक मोठं आव्हान बनलंय. भाजपने गेल्या दहा वर्षांत मुंबईत आपलं संघटन आक्रमकपणे विस्तारलंय. २०१७ मध्ये केवळ २ जागांच्या फरकाने हुलकावणी मिळालेल्या सत्तेवर यंदा कोणत्याही परिस्थितीत ताबा मिळवण्यासाठी भाजपने 'मिशन मुंबई' आखलेय. आता त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचा आक्रमक चेहरा, अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव आहे. नगरपरिषद निवडणुकीत भाजपने १२० पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आणून हे सिद्ध केलंय की, ग्रामीण भागाप्रमाणेच निमशहरी भागातही त्यांची लाट कायम आहे. उत्तर भारतीय, गुजराती आणि व्यापारी मतदारांची भक्कम साथ भाजपच्या अश्वमेधाला अधिक वेग देतेय. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर उद्धव यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. 'मशाल' चिन्हाच्या जोरावर त्यांनी विधानसभा निवडणुकीत मुंबईत झुंज दिली, परंतु २२७ सदस्यांच्या महापालिकेत बहुमत मिळवण्यासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नाही. मनसेसोबतचे जागावाटप हा त्यांच्यासाठी मोठा पेच असेल. मतांचे विभाजन झाले, तर त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रभावीपणे मांडणे ही उद्धव ठाकरेंची मुख्य रणनीती असेल. या संपूर्ण रणधुमाळीत राज ठाकरे हे सर्वात मोठे 'गुपित' आहेत. राज ज्या ज्या वेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात, त्यावेळी ते मराठी मतांचे मोठे विभाजन करतात. हे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडते. परंतु आता राज आणि उद्धव एकत्र येणार असल्याने मुंबईतील मराठी मतांचा एकगठ्ठा बँक या दोन्ही पक्षांना मिळणार आहे.
मुंबईसाठी अखेर उद्धव आणि राज हे एकत्र आलेत. मुंबई महापालिकेचं चित्र आमूलाग्र बदलून जाणार आहे. राज्यात याचा फार मोठा फरक पडणार नाही पण मुंबई महापालिकेत मात्र ही युती निर्णायक ठरू शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करत राज ठाकरेंनी शिवसेनेला आव्हान दिलं. बाळासाहेब ठाकरे तेव्हा हयात होते तरीदेखील राज यांनी ते धाडसी पाऊल उचललं होतं. राज यांचा करिष्मा, gवलय यामुळं २००९ मध्ये त्यांनी विधानसभेच्या १३ जागा जिंकल्या. त्याचा दबदबा तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत एका नवजात पक्षानं एवढं यश मिळवणं अभूतपूर्व होतं. राज यांचं आज घटलेलं संख्याबळ हे अदखलपात्र ठरलंय. तरीही राज यांचं महत्व कमी झालं नाही. स्वीकारा किंवा नकारा पण राज यांचा करिष्मा कायम आहे. राजसोबत उद्धव यांनी येणं कमी महत्वाचं नाही. २०१९ च्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तेव्हा खरंतर भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा होता. मी पुन्हा येईन...! असं फडणवीस म्हणाले होते पण भाजपला सोडून उद्धव काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव यांच्याबद्दल मोठी सहानुभूती तयार झाली. उद्धव महाविकास आघाडीचे नेते झाले. चेहरा बनले. लोकसभा निवडणुकीत त्यांचाच चेहरा अग्रभागी होता. या आघाडीनं लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीने मात्र सारं चित्र बदलून टाकलं. आघाडीची अक्षरशः वाताहत झाली. भाजपला आजवरच्या इतिहासात मिळालं नाही इतकं प्रचंड यश मिळालं. सोबतच्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही मोठं यश मिळालं. 
२०१९ मध्ये उद्धव मुख्यमंत्री झाले तेव्हाचे चित्र आणि आताच चित्र यात जमीन अस्मानाचा फरक आहे. विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत जे प्रचंड यश मिळालं त्यानं भाजपचा आत्मविश्वास वाढलेलाय. अशावेळी भाजपचं एक जुनं स्वप्न आहे, भाजपला मुंबई हवीय तेवढ्यासाठी २०१७ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असताना भाजपाने शिवसेनेला आव्हान दिलं. महापालिका निवडणूक स्वबळावर लढविली. त्यात चांगलं यश मिळालं पण शिवसेनेकडून महापालिका काही काढून घेता आली नाही. आता २०१७ नंतर आठ वर्षांनी पुन्हा महापालिकेच्या निवडणुका होताहेत. उद्धव राज यांची युती झालीय. आता तीन आठवड्यांनी मतदानाची वेळ येऊन ठेपलीय. वेळ कमी आहे. पण ते एकत्र येण्याचा फायदा मात्र त्यांना निश्चित होणार आहे. मुंबईची लोकसंख्या जवळपास दीड कोटी आहे. २२७  प्रभाग आहेत. २०१७ मध्ये शिवसेना आणि मनसे यांच्या मतांची टक्केवारी ३६ टक्के इतकी होती. तर भाजपची टक्केवारी २७.५ होती. शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर त्यांच्याकडे जास्त मतं जाऊ शकतात. अर्थात २०१७ नंतर चित्र बरंच बदललं. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला २९.२ टक्के मतं मिळाली. उद्धवसेनेला २३.२ टक्के तर मनसेला ७.१ टक्के मतं मिळाली. म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा उद्धव आणि राज ठाकरे यांची मतं अधिक होती. या निवडणुकीत शिवसेनाही होती. शिंदेसेनेला १७.७ टक्के मतं मिळाली. मतांच्या तुलनेत ही लढत तुल्यबळ असणार आहे. १९९७ पासून मुंबई महापालिकेत गेली ३० वर्षे शिवसेना सत्तेवर आहे. १९८७ ते १९९२ या काळात शिवसेना सत्तेवर होती पण १९९२ मध्ये काँग्रेसनं सर्वाधिक म्हणजे १११ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसनं महापालिकेचा ताबा घेतला. त्यानंतर १९९७ नंतर शिवसेनेनं मुंबई महापालिका कधीच सोडली नाही. काहीही झालं तरी मुंबई महानगरपालिका जिनाकायचीच असा पण भाजपने केलाय. त्याला कारणं आहेत. भाजपने सगळं जिंकलं. दिल्ली जिंकली. पण मुंबई जिंकण्याचं स्वप्न बाकी आहे. भाजपचं शीर्ष नेतृत्व गुजराती आहे आणि मुंबई ही गुजराती माणसाची ओली जखम आहे. मुंबई जिंकायचीच असा प्रयत्न २०१७ मध्ये भाजपने केला तो अयशस्वी झाला आता मात्र पूर्ण क्षमतेनं भाजप रिंगणात उतरलेलाय. 
उद्धव आणि राज एकत्र आल्यानं मुंबईत मोठा भावनिक वातावरण तयार होणार आहे. मराठी माणसाचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. विरोधीपक्ष कसे महाराष्ट्रद्रोही आहेत आणि मराठी अस्मितेचे नायक उद्धव आणि राज कसे आहेत हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न होणार आहे. पण इथं गडबड होण्याची शक्यता आहे. मराठी मतं विभागलं जाणं अटळ आहे. उद्धव आणि राज एकत्र आले असले तरी भाजपच्या बाजूला शिंदे आहे. विसर्जित महापालिकेतले ६३ नगरसेवक शिंदे यांच्याबाजूला आहेत. मनसेकडे एकही नगरसेवक नाहीये. काही झालं तरी त्या त्या व्यक्तीची त्या त्या भागात ठराविक अशी मतं असतातच. त्यामुळं मराठी मतांचं विभाजन होणार आहे तर अमराठी मतं ही एकसंघ भाजपकडे जाऊ शकतात. उद्धव आणि राज यांच्या सोबत जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आली तर मात्र फरक पडू शकतो. मागच्या सभागृहात काँग्रेसचे २१ नगरसेवक होते. ही संख्या लक्षणीय आहे. शिवाय काँग्रेसची निश्चित अशी मतं आहेत. शरद पवार यांचं देखील मुंबईत खास असं स्थान आहे. समाजवादी पक्षाकडे चांगली मतं आहेत. ही सारी एकवटली तर मात्र त्याचा मुकाबला करणं भाजपला जड जाणार आहे. मनसेसोबत काँग्रेस जाईल का हा प्रश्न आहेच. मनसेचा परिणाम इतर राज्यात आम्हाला फरक पडू शकतो असं म्हणताना त्यांनी हादेखील विचार करायला हवं ही, इतर राज्यात काँग्रेस शिल्लक आहे कुठं? खरं तर मुंबईचा विचार करून काँग्रेसनं पाठिंबा द्यायला हवाय. ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं तसं राज यांनाही सोबत घ्यायला हवं. नाहीतरी २०१९ च्या निवडणुकीत राज हे काँग्रेसचे स्टार प्रचारक होतेच ना! त्यांच्या लाव रे तो व्हिडिओ यानं पूरक वातावरण तयार केलं होतं. जर महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आली तर उद्धव सेनेचा महापौर होऊ शकतो. पण महायुती विरुद्ध उद्धव राज विरुद्ध काँग्रेस अशी जर लढत झाली तर मात्र मुंबईवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न साकार होऊ शकतो. सगळा खेळ मतांच्या विभाजनाचा आहे. या खेळात भाजप माहीर आहे. 
मुंबईच्या राजकारणाचा मूळ आधार हा 'मराठी माणूस'च आहे. आज ही मराठी मतं तीन प्रमुख प्रवाहात विभागली गेलीत. यात एक उद्धव यांचा निष्ठावान जुना शिवसैनिक आणि त्यांच्याविषयी सहानुभुती असलेला, दुसरा शिंदे यांच्यासोबत असेलला सत्तेचा वापर करून कामं करणारा अन् बाळासाहेबांच्या नावाने मतं मागणारा गट आणि तिसरा राज यांच्या आक्रमक मराठी अस्मितेचा समर्थक तरुण वर्ग आहे. जेव्हा जेव्हा ही मतं विभागली जातात, तेव्हा भाजपचा शिस्तबद्ध केडर आणि अमराठी मतदार एकत्रितपणे भाजपला मतदान करून विजयापर्यंत घेऊन जातात. परंतु आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने यातले दोन वर्ग एकत्र येतील आणि मतांचं विभाजन टाळलं जाईल. राज्यातल्या राजसत्तेने मुंबईत कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे, रस्त्यांचे काँक्रिटीकरण यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती दिलीय. 'लाडकी बहीण' योजनेचा शहरी महिलांवरचा प्रभाव अन् थेट संवाद यामुळे शिंदे गटाने मुंबईतल्या अनेक वस्त्यांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केलेय. सध्या महापालिकेवर प्रशासक राजवट असल्याने सरकारी निधीचा विनियोग महायुतीला अनुकूल अशा पद्धतीने होतोय, ही बाब ठाकरेंसाठी चिंतेची ठरू शकते. ठाकरे बंधू भाजपचा अश्वमेध रोखू शकतील का? याचे उत्तर 'एकी'मध्ये दडलेलं आहे. जर उद्धव आपल्या संघटनेला पुन्हा एकदा घराघरात पोहोचवण्यात यशस्वी झाले आणि मराठी मतं आपल्याकडं खेचू शकले, तर ते भाजपला कडवे आव्हान देऊ शकतात. दुसरीकडे, राज यांची भूमिका निर्णायक असेल. त्यांच्या भाषणांचा करिष्मा याआधी मुंबई आणि महाराष्ट्राने पाहिलाय. त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दीचं रुपांतर मतांमध्ये करण्यासाठी यावेळी दोन्ही ठाकरेंना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. सद्यस्थिती पाहता महायुतीचे आर्थिक बळ, सत्तेचा वापर आणि संघटनात्मक कौशल्य यांच्यासमोर ठाकरे बंधूंना आपल्या रणनीतीत आमूलाग्र बदल करावा लागेल. केवळ भावनिक साद घालून आता मुंबईची सत्ता मिळवणे कठीण आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची ओळख इम्फ्रामॅन अशी बनवण्यात यश मिळवलेय. दुसरीकडे शिंदे यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत मी मु्ंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे, असा विश्वास देण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षात केलाय. त्यामुळे ठाकरेंना या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला छेद देण्यासाठी ठोस पर्यायी विकास आराखडा आखावा लागेल. गल्ली गल्लीतील कार्यकर्त्यांची मोट बांधून जास्तीत जास्त मतं आपल्याकडे खेचून आणावी लागतील. १६ जानेवारी २०२६ रोजी लागणारा निकाल हा केवळ मुंबईचा महापौर ठरवणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील 'ठाकरें'ची पुढची दिशाही निश्चित करणार आहे. ठाकरेंचा झेंडा फडकविण्यासाठी ठाकरे बंधूंची भिस्त असेल ती मराठी आणि मुस्लिम मतदारांवर. त्यातही काही मराठी मते भाजपच्या पारड्यात जाणार तर काही मुस्लीम मते काँग्रेसच्या. दुभंगलेला पक्ष नव्याने उभा करून, गमावलेला जनाधार मिळविण्यासाठी लागणारी जिद्द, अंगमेहनत, राजकीय कौशल्य उद्धव यांना दाखवावे लागेल, तर स्थापनेला वीस वर्षे लोटूनही महाराष्ट्रव्यापी होऊ न शकलेली मनसे तूर्तास मुंबईत शाबूत असल्याचे राज यांना सिद्ध करावे लागेल. जुन्या चुका टाळून खरोखर मनोमिलन झाले आणि त्याला कठोर आत्मपरीक्षणाची जोड मिळाली तरच मराठी माणसाबरोबरचा त्यांचा बंध बळकट होईल. अन्यथा काय होईल, हे वेगळे सांगायला नको.
चौकट
*मुंबईचा लगाम कुणाच्या हाती ?* 
'मुडद्यातही जान यावी,' अशा नाना गोष्टी मुंबईत घडत असतात. त्याचा अनुभव घेण्यासाठीच परप्रांतीयांचे रोज हजारोंचे लोंढे मुंबईत धडकत असतात. मुंबई वाढत्या लोकसंख्येनं त्रासलेली असली तरी तिनं अजून कुणाला झिडकारलेलं नाही. ज्या नजरेनं परप्रांतीय मुंबई आपली मानतात, त्यादृष्टीनं महाराष्ट्रातले मराठी आपल्या राजधानीकडे पाहात नाहीत, ती आपलीच राहावी यासाठी झटत नाहीत. हा मुर्दाडपणा आपण आणखी किती काळ कवटाळून बसणार? महाराष्ट्र कैलासवासी झालाय का? तसं असेल तर भोळा शंकराचा अवतार धारण करून आपला गोळा करून घेण्याऐवजी मराठीजनांनी आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्काच्या मुंबईसाठी तांडव केलं पाहिजे, ते आकांडतांडव झालं तरी चालेल. ते करण्याचं बळ लाभावं ही इच्छा...! 'मुंबई फक्त आमचीच' असं मराठी लोकांनी कधीही म्हटलेलं नाही. परंतु, ज्यांना मुंबई ही धर्मशाळाच वाटते, ते नानाप्रकारे मराठींना डिवचत असतात. मुंबईत जन्म घालवायचा, मुंबईतल्या मराठी मतांवर निवडून येऊन वर आम्ही भाषिक अल्पसंख्य आहोत, असं म्हणत मराठी भाषेवर, मराठी माणसावर कुरघोड्या करण्याचे नीच डाव नवीन नाहीत. अशांना आमदारक्या-खासदारक्या, मंत्रिपदंही मिळतात. नेत्यांना पैसा, मोटारी पुरवल्या की अशांना मराठी माणसाच्या तोंडावर थुंकत मुंबईत मिरवता येतं, ही बाब अनेकदा दिसलीय. अशांना कधी रजनी पटेल, कधी मुरली देवरा, मुकेश पटेल, किरीट सोमय्या, कृपाशंकर सिंह, मंगलप्रभात लोढा, संजय निरुपम यांच्यासारखा अमराठी तारणहार गवसतो. मराठींनी जी मुंबई ५ वर्षांचा 'संयुक्त महाराष्ट्र'चा लढा देऊन महाराष्ट्रात राखली, ती 'आर्थिक राजधानी'च्या मोहापायी नाही. भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार मुंबई मराठी भाषिक प्रदेशात आली. ती सर्वांची आणि सर्वांसाठी आहे; पण ती मराठी भाषिक महाराष्ट्राचीच आहे. हा इतिहास आहे! त्यात १०६ जणांचे हौतात्म्य आहे. वर्तमान मात्र भयाण आहे. काळ हा घोड्यासारखा असतो त्यावर हुकमतीनं स्वार झालात, तर तो तुमचा होतो. तुम्हाला पाहिजे तिथं पोहोचवतो. अन्यथा फरफट अटळ असते. 'संयुक्त महाराष्ट्र'चा लढा मराठींनी जिंकला. मुंबईसह मराठींचा महाराष्ट्र झाला, मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. पण लगाम कुणाच्या हाती राहिलाय? 
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday, 20 December 2025

कुठे नेलाय महाराष्ट्र माझा.

"राज्य शकट हाकण्यासाठी आखलेले बहाणे, त्यासाठी बांधलेली पटकथा, राजसत्तेतल्या घटक पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरबुरी, केल्या जाणाऱ्या कुरघोडी, होणारी कायदेशीर शब्दचलाखी, मुद्दाम केले जाणारे वेळकाढूपणाचे दिखावे, दिली जाणारी खोटी आश्वासने, घेतल्या जाणाऱ्या आणाभाका अन् शपथा, आंदोलकांमध्ये कायद्याबद्दलचे, सरकारी प्रक्रियेचे असलेले अज्ञान, नेत्याची समाजाप्रती निष्ठा आणि कुवत यात होणारी गल्लत, केला जाणारा तह, माघारीसाठीचे निमित्त, घोषणा, केला जाणारा विजयोन्माद, इतरांकडून घेतले जाणारे आक्षेप, तक्रारी, न्यायालयात मागितली जाणारी दाद, त्यासाठीचे विशेष अधिवेशन, निवडणुकीची होणारी प्रतिक्षा, त्यासाठीची अधिसूचना, त्यानंतरची आचारसंहिता, मग तारीख पे तारीख! ना यश ना अपयश! मग हाती काय? जैसे थे!आंदोलनाचा फायदा नक्की कोणाला?.. तोपर्यंत दुसरा समाज आंदोलनास तयार.. मग पुन्हा सारे तेच, तिथेच अन् तसेच ! चालू द्या! लगे रहो! जय लोकशाही!!"
----------------------------------------
मागील विधिमंडळाच्या अधिवेशनात अखेरच्यादिनी आमदारानं मंत्र्यांची गचांडी धरत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. जिथं कायदे बनवले जातात तिथंच कायदे बनवणारेच कायद्याचे धिंडवडे काढले. हे काही पहिल्यांदाच घडलंय असं नाही. अनेक आमदार लोकांना, विरोधकांना, अधिकाऱ्यांना दमबाजी, शिवीगाळ, धमक्या देत असतात. मागे एका आमदाराने तर हवेत गोळीबार केला. हा त्यानेच केलाय हे उघडकीला आल्यानंतरही त्याला क्लिनचीट दिली गेली. त्यामुळं आपण काहीही केलं, अन् कसंही वागलो तरी आपल्याला काही होणार नाही असा विश्वास निर्माण झाल्यानं ते अधिकच निर्ढावलेत. एकानं तर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते म्हणवले जाणारे लोक संयमाने बोलतील असं वाटत असताना तेही चौखूर उधळल्याचं आपल्याला दिसून आलंय. ते इतके बेफाम झाले आहेत की, आपल्याला काही होणार नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय...! असं म्हणण्या इतपत त्यांचं धाडस झालंय. हा सागर बंगल्यात बसलेला त्याचा बॉस यावर काहीच बोलत नाही, त्यांना आवर घालत नाही की, समज देत नाही. अशावेळी हे प्रवक्ते अधिकच चेकाळतात. सुसंस्कृत, संयमी, पुरोगामी आणि प्रगतीशील समजला जाणारा महाराष्ट्र या अशा खुज्या नेत्यांमुळे अधोगतीकडे निघालाय. महाराष्ट्राची राजकीय, प्रशासकीय, सामाजिक सद्य:स्थिती पाहता सारेच नासके राजकारणी सतत आघाडीवर राहिलेला महाराष्ट्र नासवताहेत, असं म्हणावंस वाटतं. आज कोण सत्तारूढ आहेत आणि कोण विरोधक आहेत हेच समजतच नाही. राज्यातल्या प्रमुख चार राजकीय पक्षांचे सहा झालेत. सारेच सारखे बनलेत. उडीदामाजी काळे गोरे...! त्यामुळं महाराष्ट्रात एकच पक्ष बहुमतानं सत्तेवर येण्याचं दिवास्वप्नच राहणार यावर शिक्कामोर्तब झालंय. सद्य:स्थितीत तरी भाजप सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून गेली दहा वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात वावरतोय. पण त्याचं जे रूप स्वरूप पूर्वी होतं ते पार बदलून गेलंय. जनसंघ, भाजप हा संस्कारक्षम, नीतीवान मूल्याधिष्ठित राजकारण करू पाहणारा पक्ष होता, पण कालौघात त्यांच्या विचारसरणीची पार घसरण झालीय. त्यांना भगवी काँग्रेस म्हणावं तर मूळ काँग्रेस अधिक उजळ वाटू लागते. त्यामुळं ते सत्तेवर आले पण महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक, प्रशासकीय घडी त्यांना काही पुन्हा बसवता आलेली नाही; त्यामुळं सत्ताचाटण लाभलेल्या आमदारांना कुणाचंच भय, भीती, धाक राहिलेला नाही.
महाराष्ट्रातल्या जनतेनं आता संपूर्ण फेरविचार आणि फेरनियोजन केलं पाहिजे. कारण विकास-विकास असा गोंडस शब्द वापरून आपल्या पक्षांतराला, लोकमतांच्या गद्दारीला मुलामा देण्याचा जो प्रयत्न चालवलाय ते थांबवलं पाहिजे. विधी मंडळाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राज्यातले, महाराष्ट्रातले सव्वीस जिल्हे अविकसित ठेवून मोठी झेप घेता येणार नाही. राज्यात सहकारी चळवळीचं योगदान चांगलं होतं, काँग्रेसनं त्याला बाळसं आणण्याचा प्रयत्न केला होता. पण या नासक्या राजकारण्यांनी ती सहकारी चळवळ, त्यातून उभं राहिलेले उद्योग, व्यवसाय सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन ती खरेदी करायला सुरुवात केलीय. ग्रामीण भागात समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शेतकऱ्यांच्या त्यागातून, कष्टातून उभारलेली चळवळ मोडीत काढली जातेय. आगामी दहा वर्षांत महाराष्ट्रात एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीचा विकासात मोठा वाटा होता, असं सांगावं लागेल. महाराष्ट्राचा नियोजनबद्ध विकास करण्याची पद्धतच मागे पडत चाललीय. अर्थसंकल्पात त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. दिवसागणिक अर्थसंकल्पाची मोडतोड सुरू असते, वर्गीकरण, पुरवणी खर्चाला संमती मागितली जाते. विधायक कामाचा, सूचनांचा, अंमलबजावणीचा अभाव दिसून येतो. याबाबत कोणत्याही पक्षाचा आमदार बोलताना दिसत नाही. उभ्या महाराष्ट्राचा विचार केला जातोय असं दिसत नाही. जो तो आपल्या मतदारसंघापुरताच मर्यादित झालाय. 'काय झाडी, काय हाटेल' ही भाषा...'! असं म्हणण्यात तो मश्गूल आहे. हा तर महाराष्ट्राचा हा घोर अपमान आहे. बाळासाहेब भारदे, वि. स. पागे, जयंतराव टिळक, रा. सु. गवई, ना. स. फरांदे, शिवाजीराव देशमुख, शिवराज पाटील, दत्ता नलावडे, अरुण गुजराथी यांच्यासारख्या संसदीय परंपरा पाळणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सारथी म्हणून काम केलंय. ग्रामीण भागातल्या सुप्त बेरोजगारीला काम द्यावं म्हणून वि. स. पागे यांनी १९६७ मध्ये रोजगार हमी योजना सुरू केली. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारावर दोनशे रुपये कर लावला. रोजगार हमीसाठीच हा पैसा खर्च होईल याची तरतूद केली, असा जमा झालेला पैसा मागेल त्याला काम देऊन शिल्लक राहत होता. डॉ. रफिक झकेरिया या कल्पक मंत्र्यानं छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वाश्रमीचं औरंगाबाद इथं शहराजवळ नियोजन पद्धतीनं औद्योगिक वसाहत उभारली. त्यासाठी सिडकोची मदत घेतली. शरद पवार यांनी महाराष्ट्राला फळबाग योजना दिली. कोकण आज कोल्हापूर किंवा सांगलीपेक्षा दरडोई उत्पन्नात पुढे आहे. मुंबईसह कोकण विभागातले सातही जिल्हे सांगली सातारापेक्षा आघाडीवर फळबाग योजनेमुळे विकसित झाले. कोकण रेल्वेचा अफलातून नियोजन केलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या भूमीवरच झाला, अशा योजना आर. आर. आबा यांचा अपवाद सोडला तर कोणीही राबविल्या नाहीत. आज अशी दूरदृष्टीचे लोकप्रतिनिधी फारसे दिसत नाहीत.
सत्तेचा तमाशा मांडणाऱ्या या फुटिरांच्या विद्यमान मंत्रिमंडळातल्या एका तरी मंत्र्याला महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन आहे का? आज महाराष्ट्र सामाजिक प्रश्नांवर दुभंगतोय, कायदा-सुव्यवस्थेच्या नावांनी तर बोंब आहे. सत्ताधाऱ्यांच्या वाचाळवीरांनी कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसविण्याची धुराच सांभाळलीय. प्राथमिक तसंच उच्च शिक्षण क्षेत्र पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शिक्षण मंत्री बदलला की, धोरण बदलते. इतिहासाची मोडतोड केली जाते. मानसशास्त्राचा विचार न करता मुलांवर नको ते लादलं जातंय. हे एका बाजूला सुरू असतानाच शिक्षण घेणं हे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर जातंय. शैक्षणिक धोरण हे जणू कामगार निर्माण करण्याचे धोरण ठरतेय. देशात महाराष्ट्राचं प्रशासन सर्वोत्तम मानलं जात होतं. त्याचेही धिंडवडे निघताहेत. रस्ते, पाणी, शेतीच्या सवलती, आदींबाबत कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आदि राज्यांनी खूप मोठ्या सुधारणा केल्या आहेत. हे आपणाला मान्य करावंच लागेल. जिल्ह्याच्या नियोजन मंडळामार्फत संपूर्ण जिल्ह्याचं चित्र समोर मांडून विकासाचं नियोजन करावं, असं अपेक्षित असताना सत्तेतल्या आमदारांना ताकद देण्याची भाषा करत त्यांनाच निधी दिला जातोय. जणू त्या आमदाराच्या उत्पन्नातून निधी दिल्याप्रमाणे जनतेच्या पैशाचे वाटप होतंय. आमदाराला ताकद म्हणजे त्या निधीचा काही टक्के वाटा सरळसरळ काढून घेणं, सत्ताधारी आमदारांनाच निधी देण्याचं विचित्र फॅड अलीकडे रुजू लागलंय! महाराष्ट्राच्या जनतेनं सर्वच्यासर्व २८८ आमदार सत्ताधारी पक्षाचेच निवडून दिलं पाहिजेत. विरोधी पक्षाच्या मतदारसंघातली जनता सरकारला कर देत नाही का? असा प्रश्न विचारण्याइतका भोंगळ कारभार सध्या चालू आहे. पूर्वीच्या काळी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं धोरण यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचं जाळं उभारून कार्यकर्ते, नेते तयार करणारी कार्यशाळा निर्माण केली. जनतेच्या छोट्या-छोट्या समस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोक भिडत होते. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाच्या प्रश्नावर घ्यायच्याच नाहीत, असा वेडा विचार सर्वच राजकीय पक्ष घेत असतील तर यांना नासकेच म्हणावं लागेल ना? त्यांनी एक स्थानिक स्वराज्य संस्था ही व्यवस्था पांगुळगाडा करून टाकलीय. त्यामुळं आमदारांना यातून अधिक अधिकार मिळत गेले. नोकरशाहीला सर्वाधिकार मिळत गेले, त्यांचा बेधुंद, विना अंकुश कारभार सुरू झाला. मात्र राजकीय कार्यकर्ते गल्लीतच राहिले. इतका भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या पातळीवर होईल, असं कधी वाटलं नव्हतं! महाराष्ट्र आज तो अनुभवतोय. आता कार्यकर्त्यांनी प्रचारांच काम करण्यासाठी, हक्काचे कार्यकर्ते उपलब्ध व्हावेत यासाठी आधी लोकसभेच्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. जणू कार्यकर्ते हे पक्षाचे वेठबिगारच!
महाराष्ट्राच्या कोरडवाहू शेतीवरचे आठ ते दहा शेतकरी दररोज आत्महत्या करताहेत, याची ना कोणाला खंत, ना खेद, ना लाज वाटतेय? नवं तंत्रज्ञान उपलब्ध झालंय, राज्य सरकारकडे भरपूर उत्पन्नाचे मार्ग आहेत. उत्तम पद्धतीनं सर्व कामं करता येऊ शकतात. राज्य सरकारचे रस्ते बांधणी बेकार आहे. कोकणचा महामार्ग न्यायालयानं अट घालून द्यावी, आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या म्हणून न्यायालयानं सांगावं, मग न्यायाचे धिंडवडे काढत मनमानी निर्णय घेण्याची मनोवृत्ती वाढलीय. विधानपरिषदेवरच्या बारा आमदारांच्या नियुक्त्या तीन-चार वर्षे रखडून राहाव्यात, महामंडळावर अनेक वर्षे नियुक्त्याच केल्या जात नाहीत, हा काय आदर्श राज्यकाभार आहे का? यशवंतराव, वसंतराव, वसंतदादा, शंकरराव, अंतुलेसाहेब, मनोहर जोशी तुम्ही असा महाराष्ट्र आम्हाला देऊन गेला नाहीत. तो टिकेल, पण वाकेल असं आता वाटू लागलंय. सेनापती बापट म्हणायचे, 'महाराष्ट्र टिकला तर देश टिकेल...!' याचं स्मरण होतं. राज्य शकट हाकण्यासाठी आखलेले बहाणे आणि त्यासाठी बांधलेली पटकथा, राजसत्तेतल्या घटक पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरबुरी आणि केल्या जाणाऱ्या कुरघोडी, त्यासाठी होणारी कायदेशीर शब्दचलाखी, मुद्दाम केले जाणारे वेळकाढूपणाचे दिखावे, दिली जाणारी खोटी आश्वासने, घेतल्या जाणाऱ्या आणाभाका अन् शपथा, आंदोलकांमध्ये कायद्याबद्दलचे, सरकारी प्रक्रियेचे असलेले अज्ञान, नेत्याची समाजाप्रती निष्ठा आणि कुवत यात होणारी गल्लत, केला जाणारा तह, माघारीसाठीचे निमित्त, दिल्या जाणाऱ्या घोषणा, केला जाणारा विजयोन्माद, इतरांकडून मसूद्यावर घेतले जाणारे आक्षेप, त्यातल्या तक्रारी, न्यायालयात मागितली जाणारी दाद, त्यासाठीचे विशेष अधिवेशन, निवडणुकीची होणारी प्रतिक्षा, त्यासाठीची अधिसूचना, त्यानंतरची आचारसंहिता, मग तारीख पे तारीख! ना यश ना अपयश! मग हाती काय? जैसे थे!आंदोलनाचा फायदा नक्की कोणाला?.. तोपर्यंत दुसरा समाज आंदोलनास तयार.. मग पुन्हा सारे तेच, तिथेच अन् तसेच ! चालू द्या! लगे रहो! जय लोकशाही...! पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता नव्हती. वाद होते, संघर्ष होता. पण द्वेष नव्हता. तो गेल्या दहा बारा वर्षांत वाढला. का? कुणामुळे? याचं उत्तर महाराष्ट्राला ठाऊक आहे. पण, या द्वेषचक्रातून बाहेर पडण्याची राज्याला आता नितांत गरज आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

मनरेगा आता व्हीबी जी राम जी

"ग्रामीण जनतेला रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे - मनरेगा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अॅण्ड आजीविका मिशन' - व्हीबी - जी - राम - जी असं नामांतर करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतलाय. या नामांतराला आक्षेप घेत काँग्रेसने त्यांच्या काळातील ३२ योजनांची नावे बदलण्यात आल्याची यादीच जाहीर केलीय. तर नावांचे आणि ती देण्याचे वा बदलण्याचे हे असं आहे. एखाद्याचे नाव पुसून टाकल्याने त्याचा इतिहास बदलला जाईल असं नाही. गांधींच्या बाबतीत तर अजिबातच नाही. त्यांचा खून केल्याने त्यांचं नाव संपलं नाही, तर त्यांच्या नावे असलेल्या एका योजनेचं नाव बदलल्याने गांधी कसे संपणार? असा एक माणूस या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्यांना विश्वास ठेवणे कठीण जाईल असं गांधीजींबाबत म्हटलं जातं, ते कसं विसरता येईल? पण जे दुसऱ्याचं नाव पुसू पाहतात, त्यांचंही नाव पुसणारे उद्या कुणीतरी येणार असतात, इतिहास त्यांनाही हाच न्याय लावणार असतो, हे कसं विसरता येईल?"
-------------------------------------
महाराष्ट्राने देशाला जे अनेक अनुकरणीय कायदे दिले त्यात महात्मा गांधी रोजगार गॅरंटी ऍक्ट - मनरेगा हा ग्रामीण रोजगार देणारा कायदा दिला होता. त्याचा फायदा किती आहे याची जाणीव आजवरच्या सर्व पक्षाच्या राजसत्तेला होती म्हणूनच त्याची तरतूद केली जात होती. महाराष्ट्राचे सभापती पागे असताना त्यांनी ही योजना विधिमंडळात मांडली, त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यासाठी वेगळा कर लावला गेला. या कायद्याचे गांभीर्य आहे उपयोगिता लक्षात येताच विरोधकांनीही त्याला एकमुखी पाठिंबा दिला. त्यात जमा होणारा निधी इतर कुठेही वापरता येणार नाही अशी तरतूद देखील केली. ह्या योजनेचं महत्व लक्षांत आल्यानं काँग्रेस सरकारनं ती केंद्रात लागू केली. भाजप सरकारनं त्यातून महात्मा गांधींचं नाव हटविण्यात आलंय आणि ओढून ताणून रामाचं नाव त्यात बसविण्यात आलंय. केवळ नावच नाही तर यातील तरतुदी देखील बदलल्या आहेत. १०० ऐवजी १२५ दिवस कामाची हमी देण्यात आलीय. शिवाय यातला ४० टक्के आर्थिक बोजा राज्य सरकारांवर टाकलाय. देशातल्या राज्यांकडे जीएसटीच्या अंमलबजावणी नंतर निधीची कमतरता सतत पडत असते. जवळपास सर्वच राज्ये कर्जत बुडालेली आहेत. महाराष्ट्र तर १० लाख कोटीच्या ओझ्याने दबलेलं आहे. अशा कर्जात बुडालेल्या राज्यावर ही ओझं टाकणं कितपत योग्य आहे. याचा सारासार विचार इथं झालेला दिसत नाही. या योजनेचं नाव आता बदलण्यात आलंय. ज्या भाजपने 'गांधीवादी समाजवाद' स्वीकारला होता तीच भाजप आता महात्मा गांधींचं नाव पुसून टाकायला सरसावलीय. आज जगभरातल्या १४५ देशांमध्ये १९४८ पासून महात्मा गांधींचे पुतळे बसवण्यात आलेले आहेत. तर १९४० पासून जगभरातली १८९ विद्यापीठे भारतीय गांधीवाद शिकवत आहेत. भारतातल्या जवळपास प्रत्येक शहरात आणि गावात आज महात्मा गांधींचे नावाने एमजी रोड आहे.
मनरेगामधून महात्मा गांधींचे नाव काढून टाकणं ही काही अनपेक्षित घटना नाही. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचा सहभाग नव्हता त्यांच्याकडून इतिहास पुसून टाकण्यासाठीच हा प्रयत्न होती आहे. जणू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रकल्पाचा एक भाग आहे. गांधी आणि नेहरू हे या भारतातल्या दोन्ही वैचारिक भिंती आहेत ज्या पाडल्याने संघाला त्यांचं उद्दिष्ट साध्य करणं शक्य होणार नाही. गांधींचे 'ईश्वर अल्लाह तेरो नाम...!' आणि नेहरूंचे आधुनिक धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद नष्ट केल्याशिवाय त्यांना अभिप्रेत असलेलं 'हिंदू राष्ट्र' निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच गांधी आणि नेहरूंच्या प्रतिमा पुसण्याचे प्रयत्न वर्षानुवर्षे त्यांच्याकडून सुरू आहेत. प्रथम, गांधी यांची हत्या करण्यात आली, नंतर त्यांचे आश्रम आणि त्यांच्या आठवणींशी संबंधित चिन्हे यावर हल्ले करण्यात आले, एवढंच नाही तर पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकण्यात आले, संघाला असा विश्वास होता की, यामुळे समाजातून गांधी आणि नेहरूंचे वैचारिक आणि नैतिक अस्तित्व पूर्णपणे मिटून जाईल! कॉर्पोरेट सांप्रदायिकतेच्या साम्राज्याला मान्यता मिळविण्यासाठी, सर्व धर्मांची समानता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद याबद्दल बोलणारे गांधी आणि नेहरू यांना सर्व स्वरूपात काढून टाकणं संघाला आवश्यक झालेय. महात्मा गांधींच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थापित करण्यासाठी गांधींचे नाव पुसून टाकण्याचे काम केले जात आहे. निश्चितच, गांधी आणि सावरकर एकत्र राहू शकत नाहीत! उजव्या विचारसरणीचा बहुसंख्यवाद गांधी आणि नेहरूंनी वाढवलेल्या धार्मिक सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेला मारण्याचा आणि त्याचे अल्पसंख्याकविरोधी धार्मिक कट्टरतेत रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, गांधी आणि नेहरूंना वैचारिकदृष्ट्या संपवणे आवश्यक आहे. पण उजव्या विचारसरणीच्या शक्तींची ही सर्वात मोठी चूक आहे! देशभरातली शहरे आणि रस्त्यांची नावे बदलणे, गांधी आणि नेहरूंचे पुतळे विस्थापित करणे, त्यांच्याशी संबंधित आठवणी, चिन्हे आणि संस्था नष्ट करणे, जप्त करणे हे भारत आणि जगातील इतर देशांमधून गांधी आणि नेहरूंचे नाव पुसून टाकेल का? त्यांनी स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की गांधी आणि नेहरू आज मानवतेसाठी पूर्वीपेक्षा जास्त प्रासंगिक आहेत. गांधी आणि नेहरूंशिवाय जग कधीही चालणार नाही. कुसुमाग्रजांच्या 'मध्यरात्र उलटल्यावर...!' या  कवितेतले चार पुतळे कोणत्या ना कोणत्या जातीपुरते उरल्याची खंत व्यक्त करतात. तेव्हा पाचवा, गांधीजींचा पुतळा म्हणतो की, 'तुमच्या पाठीशी तुमच्या जाती तरी आहेत, माझ्या पाठीशी आहेत त्या फक्त सरकारी कार्यालयातल्या भिंती....!' पण मोदी सरकार ज्या वेगाने विविध योजनांची नामांतरे करतेय, ती पाहता या भिंतींवरूनही गांधीजींचे विस्थापन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. योजनांची नावे बदलली तर गांधी हा माणूस इथल्या लोकांच्या मनातून पुसला जाईल, असं खरंच सरकारला वाटत असेल, तर त्याच हेतूने भिंतीवरचं छायाचित्र उतरवायला आणि नव्या 'महात्म्यां'साठी जागा करू द्यायला असा किती वेळ लागणार आहे? त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कवितेत आहेत, तेवढेही सुदैवी गांधीजी यापुढच्या काळात असतील असं वाटत नाहीत. ते विशिष्ट ठिकाणी प्रातःस्मरणीय असतील, पण लोकांच्या समोर त्यांचं नाव सतत येता कामा नये याचा अट्टहास सतत होत राहील याचीच शक्यता जास्त. 
खरं तर नावं बदलून नेमके काय साध्य होतं? औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झालं, पण शहराच्या नागरी समस्यांमध्ये तिळमात्र फरक पडलेला नाही. अन्य शहरांमध्ये थोड्या फार प्रमाणात तोच प्रकार. सरकारी योजनांची नावं बदलल्याने त्यातला भ्रष्टाचार कमी झाला, लोकांचा फायदा झाला असंही काही अनुभवास येत नाही. वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याकरता जवाहरलाल नेहरू यांच्या नावे असलेल्या योजनेला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं. पण त्यामुळे शहरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काडीमात्र फरक पडलेला नाही. रोजगार हमी योजनेचं नाव बदलल्याने लोकांना सुलभपणे काम मिळेल असं काहीही नाही. उलट या योजनेतला निधी केंद्राने गेल्या दोन वर्षांत कमी केला. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध जातींना खूश करण्याकरिता मंडळे स्थापन करून त्या त्या जातीतील मान्यवरांची नावे दिली. पण या मंडळांना सरकारने निधीच उपलब्ध करून दिला नाही. मोदी सरकारने सुरुवातीलाच नियोजन आयोगाचं नाव बदलून नीती आयोग असं केलं. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेत पंतप्रधान कार्यालयाचं नव्याने 'सेवातीर्थ' असं नामकरण केलं. त्याआधी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतच्या मार्गाचं राजपथ हे नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आलं. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ७, रेसकोर्स रोड ऐवजी ७, लोककल्याण मार्ग, असा पत्ता बदलण्यात आलाय. काँग्रेस सरकारच्या काळातील 'निर्मल अभियाना'चे स्वच्छ भारत अभियान असं नामांतर करण्यात आलं. यूपीए सरकारने शहरांमधली सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम करण्याकरता जवाहरलाल नेहरू नागरी मिशन - जेएनएनयूआरएम अभियान सुरू करण्यात आलं होतं. त्याचंही नाव मोदी सरकारने अमृत असं केलं. इंदिरा आवास योजनेचं प्रधानमंत्री आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण विद्द्युतीकरण योजनेचं दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं भारतनेट, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीचं मेक इन इंडिया, राजीव आवास योजनेचं सरदार पटेल नॅशनल मिशन, राष्ट्रीय कृषी विमा योजनेचं प्रधानमंत्री फसल बिमा योजना अशी विविध योजनांची नावं बदलण्यात आलीत. दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा पुनर्विकास करून त्याचं स्पोर्ट्स सिटी असे नामांतर करण्याची योजना आहे. याशिवाय राजधानी दिल्लीतले औरंगजेब लेनसह काही रस्त्यांची नावे बदलण्यात आलीत. राज्यातही औरंगाबाद, उस्मानाबाद, इस्लामपूर अशी काही शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात अलाहाबाद, मुगलसराई, फैझाबाद, जलालाबाद अशा काही शहरांची वा जिल्ह्यांची नावं  बदलण्यात आलीत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) मध्ये मोदी सरकारला काय अडचण आहे? जर काही अडचण नसेल तर ते रद्द करून नवीन रोजगार विधेयक आणण्याची तयारी का करत आहे? अहवालानुसार केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वाचे विधेयक मांडलं. या नवीन विधेयकाचे नाव विकासित भारत रोजगार आणि उपजीविका मिशन (ग्रामीण) (VB-G RAM G) विधेयक, २०२५ असे आहे. याचा अर्थ असा की नवीन विधेयकातून महात्मा गांधींचे नाव गायब आहे. गांधींचे नाव काढून टाकल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण अलीकडेच काँग्रेसने अटकळ निर्माण झाली तेव्हा नाव बदलण्यास आक्षेप घेतला होता. राज्ये आणि गरिबांना रामाच्या नावाखाली शिक्षा आणि फसवणूक केली जात आहे. या विधेयकामुळे ग्रामीण कुटुंबांना १०० दिवसांऐवजी अकुशल शारीरिक कामासाठी दरवर्षी १२५ दिवसांचा रोजगार मिळेल. तथापि, राज्यांवर निधीचा भार वाढेल. सरकारने सोमवारी लोकसभा सदस्यांना या विधेयकाची प्रत वाटली. 'विकसित भारत २०४७' या राष्ट्रीय दृष्टिकोनाच्या अनुषंगाने ग्रामीण विकास चौकट स्थापित करणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. नवीन विधेयकात मनरेगामधून "महात्मा गांधी" हे नाव पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे, या हालचालीला विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. महात्मा गांधींचे नाव का काढून टाकत आहेत? महात्मा गांधी हे या देशाचे, जगाचे आणि इतिहासाचे एक महान नेते आहेत. मला हे का केले जात आहे हे समजत नाही. योजनेचे नाव बदलल्याने कार्यालये, स्टेशनरी आणि इतर सेवांमध्ये बदल करण्यावरील सरकारी खर्च वाढेल आणि हे अनावश्यक आहे. केवळ महात्मा गांधी नरेगाचे नाव बदलण्याबद्दल नाही. हे मनरेगा संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे. संघाच्या शताब्दीनिमित्त गांधींचे नाव काढून टाकणे हे दर्शवते की राजसत्ता किती पोकळ आणि वरवरचे आहेत, जे परदेशी भूमीवर बापूंना फुले अर्पण करतात.! असा विरोधकाकडून आरोप केला जातोय.
व्हीबी-जी राम जी विधेयक मनरेगा रद्द करत आहे. महात्मा गांधींचे नाव काढून टाकणे हे फक्त एक ट्रेलर होते, परंतु खरे नुकसान बरेच खोलवर आहे. सरकारने हक्क-आधारित हमी कायद्याचा आत्मा नष्ट केलाय त्याऐवजी राज्ये आणि कामगारांच्या विरोधात असलेल्या सशर्त, केंद्रीकृत योजनेने ते बदलले आहे. '१२५ दिवस' ही फक्त मथळा आहे. ६०:४० ही खरी गोष्ट आहे - मनरेगा पूर्णपणे अकुशल कामगारांसाठी केंद्राकडून निधी देण्यात आला होता; जी राम जी त्याचे मूल्य कमी करते, राज्ये खर्चाच्या ४० टक्के भाग उचलतात. राज्यांना आता अंदाजे ५० हजारहून अधिक कोटी खर्च करावे लागतील. केरळलाच अतिरिक्त २- ३ हजार कोटी खर्च सहन करावा लागेल. ही सुधारणा नाही तर चोरीचा खर्च बदलणे आहे. ही नवीन संघराज्यव्यवस्था आहे: राज्ये जास्त पैसे देतात, केंद्र जबाबदारीतून पळून जाते, तरीही श्रेय घेते. केंद्र वाटप ठरवेल. मनरेगा ही मागणी-केंद्रित होती. जर एखाद्या कामगाराने काम मागितले तर केंद्राला पैसे द्यावे लागत होते. व्हीबी-जी राम जी हे केंद्राने ठरवलेल्या पूर्व-निर्धारित मानक वाटप आणि मर्यादांनी बदलते. जेव्हा निधी संपतो तेव्हा अधिकारही संपतात. कायदेशीर रोजगार हमी ही राज्यांच्या खर्चाने केंद्राद्वारे व्यवस्थापित केलेली प्रचार योजना बनते. 
विकेंद्रीकरण केंद्रीकृत टेम्पलेटने बदलले जात आहे. वाईट म्हणजे, व्हीबी-जी राम जी कृषी हंगामांच्या नावाखाली दरवर्षी ६० दिवस काम स्थगित करण्याचे आदेश देते. रोजगार हमी की कामगार नियंत्रण? योजनेतील कामगारांना कायदेशीररित्या सांगितले जाते: काम करू नका. कमवू नका. वाट पहा. कामगारांना खाजगी शेतात ढकलण्यासाठी सार्वजनिक कामे थांबवणे कल्याणकारी नाही  हा राज्य-व्यवस्थापित कामगार पुरवठा आहे, जो कामगारांना वेतन, निवड आणि प्रतिष्ठा हिरावून घेतो. २००५ मध्ये यूपीए सरकारने मनरेगा लागू केला आणि २००९ मध्ये महात्मा गांधींचे नाव त्याच्या नावात जोडले गेले. ही जगातील सर्वात मोठी ग्रामीण रोजगार योजना आहे, जी ग्रामीण गरिबी कमी करण्यात, स्थानिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आणि महिला सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तथापि, सरकारचा असा युक्तिवाद आहे की ग्रामीण भारत बदललाय, गरिबी कमी झालीय आणि डिजिटल प्रवेश वाढलाय, ज्यामुळे नवीन, आधुनिक योजनेची आवश्यकता आहे. विरोधी पक्ष याला मनरेगा रद्द करण्याचा प्रकार म्हणत आहेत, तर सरकार याला आधुनिक, पायाभूत सुविधांवर केंद्रित आणि डिजिटल सुधारणा म्हणत आहे. ग्रामीण भारतातील लाखो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम करणारा हा बदल राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरू शकतो.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Monday, 15 December 2025

वंदे मातरम..! वंदे मातरम...!!

"वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव निमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा घडवून आणली गेली. या पवित्र गीताच्या माध्यमातून राजकीय धुळवड खेळण्यात कोणतीच कसर राजकीय पक्षांनी ठेवली नाही. बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी त्याला आहे अशी चर्चा होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांनी नेहरू आणि काँग्रेसवर टीका केली तर राहुल, प्रियंका गांधी, खरगे आणि इतर विरोधकांनी संघ आणि भाजप यांनी कधीच वंदेमातरम् म्हटलेलं नाही उलट त्याच अर्थाचं 'नमस्ते सदा वत्सले...!' हे गीत प्रमाण गायलं. हे सांगतानाच संघ, भाजप स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हता. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, इंग्रजांना पूरक भूमिका घेतली असे आरोप केले. त्यामुळं संसदेतली ही चर्चा भाजपच्या अंगाशी आल्याचं दिसून आलं. पण त्याची वस्तुस्थिती काय याचा घेतलेला हा धांडोळा...!"
--------------------------------------
'जन-गण-मन'चा जन्म १९११ च्या डिसेंबरात झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सादर केलं. 'वंदे मातरम'च्या जोडीने 'जन-गण-मन'ही गायलं जाऊ लागलं. बंगाली भाषेतलं हे गीत सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारने नवभारताचे राष्ट्रगीत म्हणून स्विकारलं. सर्व धर्म आणि प्रांतीय अस्मितेच्या उल्लेखांतून राष्ट्रीय एकात्मतेचा जयजयकार, हे या गीताचं मुख्य सूत्र होतं; म्हणूनच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. आंबेडकर, घटना समितीतील विविध विचारांच्या नेत्यांनी चर्चा करून, वाद टाळून 'राष्ट्रीय मतैक्य' केलं. 'जन-गण-मन'ला राष्ट्रगीताचा मान दिला. 'वंदे मातरम'ची स्वातंत्र्य संग्रामातली परंपरा लक्षात घेऊन त्याच्या पहिल्या कडव्याला 'राष्ट्रीय गीत' - नॅशनल सॉंग म्हणून मान्यता देण्यात आली..!"

'वंदे मातरम् हे भारताचे गाणं आहे ज्याने ब्रिटिशांना रात्रीची झोप उडवली होती. हे गाणं भारतीय स्वातंत्र्यलढ्यातला एक महत्त्वाचा भाग होता आणि आजही आपल्याला देशाप्रती अभिमान, प्रेम आणि समर्पणाची आठवण करून देते. या संदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गाण्याच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चालणाऱ्या उत्सवाची सुरुवात केली आणि एक स्मारक टपाल तिकिट आणि नाणे देखील प्रकाशित केलं. आजही, वंदे मातरम आपल्याला आपल्या देशाबद्दल अभिमान, प्रेम आणि भक्तीची आठवण करून देते. हे गाणं आपण गातो तेव्हा प्रत्येक भारतीयामध्ये उत्साह आणि देशभक्ती निर्माण करत राहते. हे गाणं पहिल्यांदा १८७५ मध्ये प्रकाशित झाले. १६ एप्रिल १९०७ रोजी "बंदे मातरम्" या इंग्रजी दैनिकात श्री अरबिंदो यांनी लिहिलेल्या एका लेखातून या वस्तुस्थितीची पुष्टी होते, ज्यामध्ये बंकिम यांनी त्यांचं प्रसिद्ध गाणं बत्तीस वर्षांपूर्वी रचलं होतं असा उल्लेख आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यावेळी फार कमी लोकांनी ते ऐकलं होतं, परंतु दीर्घकाळापासून असलेल्या भ्रमातून जागृत होण्याच्या क्षणी, बंगालच्या लोकांनी सत्याचा शोध घेतला आणि त्याच क्षणी कोणीतरी "वंदे मातरम्" गायलं. पुस्तक म्हणून प्रकाशित होण्यापूर्वी, आनंद मठ बंगाली मासिक "बंगदर्शन" मध्ये मालिकाबद्ध झाला होता, ज्याचे बंकिम संस्थापक संपादक होते. "वंदे मातरम्" हे गाणं कादंबरीच्या मालिका प्रकाशनाच्या पहिल्या भागात, मार्च-एप्रिल १८८१ च्या अंकात प्रकाशित झालं. १९०७ मध्ये, मॅडम भिकाजी कामा यांनी बर्लिनमधील स्टुटगार्टमध्ये प्रथमच भारताबाहेर तिरंगा ध्वज फडकावला. ध्वजावर "वंदे मातरम्" असं लिहिलं होतं. वंदे मातरम् भारताचे आत्मगान आहे. पण देशातली काही मंडळी विरोध करताना दिसताहेत. इस देशमें रहना होगा तो 'वंदे मातरम' कहना होगा......! अशा घोषणा एका बाजूने सुरू असतानाच... 'गळ्यावर सूरी ठेवली तरी म्हणणार नाही.....!' अशी दरपोक्ती करणारे आपले लोकप्रतिनिधी आपण पाहिले तेव्हा आम्हालाच आमची लाज वाटली...! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आजही 'वंदे मातरम'ला विरोध केला जातोय. शाळेतून ते म्हणावं, त्यातून देशप्रेमाची शिकवण विद्यार्थ्याना मिळावी म्हणून आग्रह धरला जातोय. उत्तरप्रदेशात मदरसातून ते म्हटलं जावं असं फर्मान काढलं गेलंय. महाराष्ट्रातल्या विधिमंडळातले सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून जाताना आपण पाहलंय. 'वंदे मातरम'ची सक्ती केली तरी आम्ही ते म्हणणार नाही असं बेमुर्वतपणे आमदार म्हणतात तेव्हा त्यांच्या अल्पबुद्धीची कीव येते. 'वंदे मातरम'चा इतिहास आणि परंपरा याची माहिती त्यांना नसावी, गळ्याभोवती फास घेताना 'वंदे मातरम'चा जयघोष करणारी ती क्रान्तीकारी पिढी कुठे अन् त्या राष्ट्रीय गीताचा उपमर्द करणारे आजचे हे उपटसुंभ नेते कुठे..! संपूर्ण 'वंदे मातरम' म्हणण्याचा आग्रह धरणारे आणि राष्ट्रगीत म्हणून केवळ पहिलं कडवं म्हणण्यालाही विरोध करणारे हे दोघेही राष्ट्रधर्माचा अवमान करणारे आहेत. 'वंदे मातरम' या गीताच्या वादाचं भूत पुन्हा उठवलं जातंय. एमएमआयएम या मुस्लिमांच्या हिताचा ठेका घेतलेल्या पक्षानं शाळांमधून 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती करणं घटनाबाह्य आहे. घटनेच्या कलम २५ नुसार आम्हाला पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलं असल्यानं आमच्यावर 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती करता कामा नये. अशी भूमिका घेतली होती.
'वंदे मातरम' विरोध करणाऱ्यांच्या या दाव्यात तथ्य असलं तरी तो तद्दन पाजीपणा आहे. 'वंदे मातरम' म्हणजे मातृभूमीला वंदन! 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी...!' या समर्पक शब्दात प्रभुू रामचंद्रांनी माता अन् मातृभूमीच्या समभावाचं वर्णन केलंय. पालन-पोषण करणं, धारण करणं, सर्वकाही सहन करणं, क्षमाशील असणं, अशा अनेक गुणांतून माता आणि भूमी यांच्यातलं साम्य स्पष्ट होतं. म्हणूनच भूमीला भू माता असं म्हणतात. अथर्ववेदातील भक्तीसूक्तात 'माता भूमी: पुत्रो अहं पृथीव्या:...!' असा भूमातेचा गौरव केल्यानंतर तिच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली आहे. हे सारं हिंदूंच्या धर्मग्रंथात आहे म्हणून झटकायची गरज नाही. राष्ट्रभक्ती दाखविणाऱ्या या नोंदी आहेत. मातेसमान असणाऱ्या मातृभूमीला वंदन केल्याने मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा कसा काय खातमा होतो? जो देश तुम्हाला जगण्याचं बळ देतो, ज्या देशाच्या भूमीवर तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा मिळतो, त्याभूमीला भक्तिभावे वंदन करणं हे मुस्लिमांच्या ठेकेदारांना सक्तीचं का वाटतं? मातृभूमीला वंदन करणं, राष्ट्रध्वजाचा-राष्ट्रगीताचा मान राखणं, राष्ट्रवीर-वीरांगणांबद्धल आणि राष्ट्रीय स्थलांबद्धल आदर राखणं हा राष्ट्रधर्म आहे. त्याचं पालन भारतातल्या सर्वधर्मीयांनी आपल्या देव-धर्म-जातीबद्धलच्या भावभावनांना दुय्यम लेखून केलेच पाहिजे. कारण कुठल्याही देव-धर्मापेक्षा राष्ट्रधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे! परंतु 'वंदे मातरम' म्हटल्याने 'अल्ला हो अकबर' म्हणजे परमेश्वर महान आहे या घोषणेचा अपमान होतो, अशी भूमिका 'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्यांकडून मांडली जाते. ही भूमिका प्रथम मौलाना महंमदअली जीना यांनी मांडली. डिसेंबर १९२३ मध्ये आंध्रप्रदेशातील काकीनाडा इथं काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन होतं. खुद्द जीनाच त्याचे अध्यक्ष होते. अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे 'वंदे मातरम'ने व्हायची होती. कारण 'वंदे मातरम' हे काँग्रेसच्या झेंड्याखाली स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्त्रोत होते. फासावर जाणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे ते अखेरचे शब्द होते. 
१८७६ मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या लेखणीतून 'वंदे मातरम' गीताचा जन्म झाला. पण त्याचा १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'आनंदमठ' कादंबरीत समावेश झाल्यानंतरच ते लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. बंकिमचंद्रांनी 'वंगभूमी'साठी बंगालीत लिहिलेलं हे गीत स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणागीत होण्यासाठी त्यात अनेक बदल करण्यात आले. 'वंदे मातरम' गीतातील 'सप्त कोटी कंठ' चा 'कोटी कोटी कंठ निनाद कराले' हा झालेला बदल ही याची साक्ष आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या 'जन-गण-मन' या गीताच्या पुढे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करण्यात आला त्या रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात 'वंदे मातरम'चे रवींद्र संगीतासह गायन केले. 'वंदे मातरम'ला सर्वमुखी केलं. परंतु खिलाफत चळवळीने 'वंदे मातरम'ला वादात टाकले. महंमद अली आणि शौकत अली हे अलीबंधु चळवळीचे नेते होते. १९२० च्या दरम्यान सुरू झालेली ही चळवळ कालबाह्य धर्मवेडाने पछाडलेली होती. खिलाफत म्हणजे खलिफाची राजवट, खलिफा म्हणजे मुसलमानांचा धर्मगुरु. त्यांची सत्ता जीनांना आणायची होती. या खिलाफत चळवळीला असहकार आणि कायदेभंगाची चळवळ चालविणाऱ्या महात्मा गांधींचा पूर्ण पाठींबा होता. वर्षभरात स्वराज्य मिळविण्यासाठी सुरू होणाऱ्या आंदोलनात गांधीजींच्या दृष्टीनं खिलाफत चळवळीला अव्वल दर्जाचं महत्व होतं. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि खिलाफत या दोन्ही चळवळी एकच होत्या. त्यामुळेच हिंदू-मुस्लिम एकजूट होणार होती. गांधीजींच्या आतल्या आवाजातून निर्माण झालेला हा अजब दोस्ताना गांधीजींप्रमाणेच हिंदुस्तानलाही नडला. खिलाफत चळवळीतून हिंदू-मुस्लिम जातीयवाद निर्माण झाला आणि त्याची परिणती शेवटी पाकिस्तान निर्मितीत झाली. खिलाफत चळवळीमुळेच गांधीजींचे 'रामराज्य' मानवेनासे झाले. आतल्या आत धुसफूसणाऱ्या तणावाचे जाहीर प्रदर्शन होऊ लागलं. त्यात काही उत्साही मंडळींचा संपूर्ण 'वंदे मातरम' म्हणण्याचा आग्रह असायचा. त्याला मुसलमान आक्षेप घेऊ लागले. कारण त्यातले दुर्गा, कमला, लक्ष्मी, विद्या, सरस्वती या हिंदू देवतांचे आणि धर्मकल्पनांचे उल्लेख त्यांना खटकू लागले. या साऱ्याचा स्फोट जीना यांनी काकीनाडा अधिवेशनात पंडित दिगंबर विष्णू पलुस्कर यांनी 'वंदे मातरम' गायनाने प्रारंभ करताच त्यांना रोखून केला. त्यावर पंडितजींनी त्यांना कारण विचारताच 'संगीताला आणि मूर्तिपूजेला इस्लामचा विरोध आहे...!' असं ते रागात म्हणाले. त्याला पंडित पलुस्कारांनी चोख उत्तर देत 'हे इस्लामचे व्यासपीठ नाही, हे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन आहे...!' असं म्हटलं नि रितीप्रमाणे  'वंदे मातरम' पूर्ण केलं. जीनांनी घेतलेला आक्षेप चुकीचा नव्हता. शिवाय 'आनंदमठ'मध्ये 'वंदे मातरम' ज्या संदर्भात आलं होतं, त्यामुळे ते गीत केवळ हिंदुगीतच ठरत नव्हतं तर ते इस्लाम-मुस्लिमविरोधी गीतही ठरत होतं. परंतु हा साधार आक्षेप घेण्यासाठी जीनांसारख्या बुद्धिवाद्याला पंचवीस वर्षे खर्चावी लागली. कारण फाळणीची बीज त्यांच्या डोक्यात रुजायला तेवढी वर्षे जावी लागली. 
'वंदे मातरम' गीतासंदर्भातली माहिती देणारी कॉम्रेड प्रभाकर वैद्य, हिंदुत्ववादी अमरेंद्र गाडगीळ, आणि विक्रम सावरकर यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यातला लेखकांचा वैचारिक अभिनिवेश वजा करून ती पुस्तकं आवर्जून वाचावीत. 'वंदे मातरम'बाबतचे आता सगळेच संदर्भ बदललेत. भारतात राहायचे तर राष्ट्रधर्माचे पालन सर्वांनी केलंच पाहिजे. मुंबई महापालिकेच्या इमारतींमध्ये विविध भाषिकांच्या शाळा भरतात. त्यात उर्दू शाळाही असते. इतर शाळांतली मुलं सामुदायिकरित्या 'वंदे मातरम' म्हणत असताना उर्दू शाळेतली मुलं वर्गात उंडारत असतात. स्वतंत्र उर्दू शाळेत 'वंदे मातरम' म्हणत नसल्याने त्याचा अपमान तरी टळतो. परंतु घटनात्मक धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली माजलेली ही वृत्ती राष्ट्रधर्म पाळणाऱ्या मुस्लिमेतर भारतीयांनी का सहन करायची? पंडित पलुस्करांच्या केलेल्या कृतीतून हिंमत घेऊन 'शाळा म्हणजे मशिदी नाहीत. इतर शाळांप्रमाणे उर्दू शाळातही  'वंदे मातरम' म्हटलेच पाहिजे...!' असं ठणकावून बोलायला राजकारण्यांना मुहूर्ताची गरज लागू नये. कारण ज्यावर मुस्लिमांचा आक्षेप आहे, ती सारी कडवी घटनेनुसारच बाद करण्यात आलीत. 'वंदे मातरम'चं पहिलं कडवं मातृभूमीबद्धलचा कृतज्ञताभाव व्यक्त करण्यास पुरेसं आहे. तेवढं बोललेच पाहिजे हा आग्रह शासनानं धरलाच पाहिजे. त्यासाठी जनतेनेही केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करायला हवा.
'वंदे मातरम' हे स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारं गीत आहे. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गेली ७५ वर्षे 'वंदे मातरम'चा मुसलमानांप्रमाणे हिंदुधर्मवाद्यांनीही हत्यारासारखा वापर केलाय. संपूर्ण 'वंदे मातरम'मधील केवळ हिंदुधर्म संकल्पनाच्या उल्लेखामुळे ते स्वतंत्र भारताचं राष्ट्रगीत होऊ शकलं नाही. राष्ट्रगीताचा मान रवींद्रनाथ टागोरांच्या 'जन-गण-मन'ला मिळाला. हा निर्णय घटना समितीनं सर्व विचारांच्या पक्षीय आणि सर्वमान्य नेत्यांशी चर्चा करून घेतला. 'जन-गण-मन'चा जन्म १९११ च्या डिसेंबरात झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता इथली्या काँग्रेस अधिवेशनाच्या अखेरीस खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सादर केलं. त्यानंतर 'वंदे मातरम'च्या जोडीने 'जन-गण-मन'ही गायलं जाऊ लागलं. त्याचाही बोलबाला झाला. बंगाली भाषेतले हे गीत सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारने नवभारताचे राष्ट्रगीत म्हणून स्विकारलं होते. सर्व धर्म आणि प्रांतीय अस्मितेच्या उल्लेखांतून राष्ट्रीय एकात्मतेचा जयजयकार, हे या गीताचं मुख्य सूत्र होतं; म्हणूनच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि घटना समितीतील विविध विचारांच्या नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा करून, जाहीर वाद टाळून 'राष्ट्रीय मतऐक्य' नॅशनल कॉन्सेसस निर्माण केलं आणि 'जन-गण-मन'ला स्वतंत्र भारताच्या अधिकृत राष्ट्रगीताचा नॅशनल अंथेमचा मान देण्यात आला. त्याचवेळी या गीताच्या सामूहिक गायन वादनाचे नियमही करण्यात आले. तसेच 'वंदे मातरम'ची स्वातंत्र्य संग्रामातील थोर परंपरा लक्षात घेऊन त्याच्या केवळ पहिल्या कडव्याला 'राष्ट्रीय गीत' नॅशनल सॉंग म्हणून मान्यता देण्यात आली. तसंच हे गीत निश्चित स्वर तालात गंभीरपणे गाण्याचं आणि त्याचा योग्य आदर राखण्याचे आदेशही देण्यात आले  तथापी, राष्ट्रीय एकोपा राखण्यासाठी राष्ट्रगीतासाठी आखलेल्या या सीमारेषा
'आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरीती स्मृत: ।।' 
असा अखंड हिंदुस्तान निर्माणाच्या शपथा घेत हिंदुजागरण करणाऱ्यांना मान्य नाहीत. यासाठी संधी मिळेल तिथं रडक्या, चिरक्या सुरात संपूर्ण 'वंदे मातरम' एखाद्या गवयामार्फत समुदायाला ऐकविल जातं. 'वंदे मातरम' चा राष्ट्रीय मान राखायचा असेल तर ते सामुदायिकरित्याच म्हणायला हवं. 'वंदे मातरम'चा घोर अपमान करणारा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोय, त्याला वेळीच आळा घातला पाहिजे 
चौकट
'संघाचा असली चेहरा' नावाची एक छोटी पुस्तिका भाई वैद्य यांनी लिहीलेली आहे. त्यात नमुद केलंय की, संघाचे लोक वंदे मातरम् चा विरोध नि उपहास करत असत. पुण्यात १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी कॉग्रेस कार्यकर्ते जेंव्हा वंदे मातरम् म्हणत तेंव्हा त्याची खिल्ली उडवण्यासाठी संघ स्वयंसेवक 'वंदे मातरम् शेंडी कातरम् ...!' अशी घोषणा देत असत. वंदे मातरम् हे स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणा गीत असून ते कॉग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनातले संघटनगीत आहे. संघाचा ना स्वातंत्र्य चळवळीशी सबंध आहे ना वंदे मातरम् गीताशी. केवळ कांही मुस्लिम लोक वंदे मातरम् या गीताला धार्मिक कारणामुळे विरोध करतात म्हणून संघ नि भाजपाला वंदे मातरम् बद्दल प्रेम निर्माण झालं आहे.
हरीश केंची
९४२२३१०६०९

राजकारण कुरुप झालंय...!

"सत्ताधार्‍यांनी जात आणि धर्माचा वापर प्रचार आणि उमेदवार निवडताना केला, असा दावा करणार्‍या विरोधी पक्षांनी काय कमी दिवे पाजळलेत? निवडणुकीला कुणबी, कोष्टी विरुद्ध ब्राह्मण, किंवा मराठा विरुद्ध माळी असा रंग देणारे, यज्ञ, धार्मिक विधी जाहीरपणे करणारे ‘वाचाळेश्वर’  दिसू लागलेत. अशांमुळे अब्रू गेली ती राजकारणाची. संसदेतली्या विरोधी पक्षनेत्याला ‘पप्पू’ म्हणणं जितकं अशोभनीय, अवमानकारक आहे, तेवढंच देशाच्या पंतप्रधानांना ‘फेकू’, ‘चोर’ म्हणणं आहे, हे आपल्या राजकीय अध:पतनाचं राज्यस्तरीयच नव्हे, तर राष्ट्रीय स्वरूपही ‘कुरूप’ झालेलंय. आजच्या दगलबाज सहकाऱ्यांपेक्षा पूर्वीचे दिलदार स्पर्धक निर्मळ अंतःकरणाचे होते. ते कुरुक्षेत्रातले खरे योध्दे होते. युध्दाची वेळ संपल्यावर एकमेकांच्या जखमांना मलम लावण्याचं काम करत. आज राजकीय स्पर्धक एकमेकांवर जीवघेणा खुनी हल्ला करताहेत!"
-----------------------------------------
आज यशवंतराव चव्हाणसाहेब जाऊन जवळपास ४ दशक उलटलीत. पण साहेबांनी सुसंवादाचे महत्व विषद करणाऱ्या ‘Democracy is Government by Discussion’ या जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताच्या वाक्यानुसार राजकारण केलं तो राजकारणातला सुसंवाद आज लोप पावताना दिसतोय. त्याऐवजी सर्वत्र माजलाय तो नुसता कर्णकर्कश्श कलकलाट. राष्ट्रीय अन् महाराष्ट्रातले बहुसंख्य राजकारण्यांची बेताल, असंस्कृत 'मुक्ताफळं' ऐकताना उबग आलाय. शिवाय सध्या राजकारणाचा ढळलेला तोल, वाढलेली मग्रुरी, राजकारण्यांचा चंगळवाद, राजकारणातला हरवलेला ‘सुसंस्कृतपणा’ संवेदनशील लोकशाहीवाद्याला फार अस्वस्थ करणारा आहे...! बहुसंख्य मतदारांच्या मनात बहुसंख्य राजकारण्यांविषयी तिरस्कार आहे, काहीच्या मनात घृणाही, पण आपण या दिव्य लोकांना मतदान का करतो, चांगल्या उमेदवारांना निवडून का देत नाही, यासंदर्भात आपण बहुसंख्य कधीच किमानही गंभीर नसतो. अनेक जण तर मतदानालाही जात नाही आणि राजकारणी कसे वाईट आहेत, याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर टाकण्यात धन्यता मानतो. सध्याच्या बहुसंख्य राजकारण्यांमुळे, राजकारण म्हणजे केवळ आणि केवळ यथेच्छ शिवीगाळ असा समज वेगानं पसरतोय. हा समज गडद देशव्यापी झाला, तर उद्या लोक मतदानालाच न फिरकण्याची भीती आहे. असं जर खरंच घडलं, तर लोकशाहीत लोकच नसतील. लोकशाहीतला सुसंवाद हरवत चाललाय, सुसंस्कृपणा लोप पावत आहे, हे चित्र अस्वस्थ करणारंय. काही वर्षापूर्वी शरद पवारांचा जाहीर कार्यक्रमात मुका घेणारे केशवराव धोंडगे सर्वांना आठवत असतील. जुन्या काळात ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्त्व होते. विधिमंडळ आणि संसदेतही प्रदीर्घ काळ वावरलेले केशवराव ‘मण्यारचा वाघ’ म्हणून ओळखले जात. वयाचं शतक गाठून धोंडगे यांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हा शेवटच्या आजारपणात सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं, या प्रश्नाला केशवरावांनी तत्परतेनं साभिनय उत्तर दिलं. ‘राजकारणाबद्दल बोलण्यासारखं आता काहीच नाही. बोलणं बंदच करायला पाहिजे. उत्तर एकच. तोंडावर हात आणि कानावरही हात, हेच आजच्या राजकारणावरचं उत्तर आहे...!’, असं केशवराव म्हणाले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातले आणखी एक वादळी  नेते बबनराव ढाकणे यांचे ऑक्टोबर २०२३ ला निधन झाले. त्यांच्या त्या शेवटच्या काळात त्यांना काय वाटतं सध्याच्या राजकारणावर, या प्रश्नाला उत्तर देताना पटकन बबनराव ढाकणे म्हणाले, ‘चिंता वाटते...!' राजकारण्यांची भाषा, वागणं, राहणी आणि मग्रुरी यावर मग बबनराव बराच वेळ बोलत राहिले. त्यात कळकळ होती, तळमळ होती आणि चिंताही. सध्याच्या राजकारणाचा स्तर खरंच इतका खालावलाय की, बबनरावांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. राजकारण म्हटलं की, आरोप–प्रत्यारोप होणारच, सत्ताधारी-विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगणारच, पण मनुष्य आणि प्राण्यांचे अवयव तसंच अ-संसदीय भाषा तेव्हाच्या राजकारणात खरंच नव्हती. बबनरावांचा राजकारणातला प्रवास पाथर्डी पंचायत समितीचे सदस्य ते केंद्रीय मंत्री अशा भरारीचा आणि चार दशकांचा आहे. ते राज्यात आणि केंद्रातही काही काळ मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. बबनराव अतिशय आक्रमक म्हणून ओळखले जात. अहमदनगर जिल्ह्यातल्या दुष्काळी पाथर्डी तालुक्यात विकास कामे सुरू व्हावीत, म्हणून बबनरावांनी विधान सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली होती. जनतेच्या प्रश्नासाठी असं काही करणारे बबनराव देशातले पहिलेच. उडी मारून ज्या सभागृहात त्यांनी प्रवेश केला, त्याच विधानसभेचं सदस्यपद आणि उपाध्यक्षपद त्यांनी नंतर भूषवलं. विधानसभेत ‘मंडल आयोगा’च्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार राजी होत नव्हतं, तेव्हा बबनराव चक्क सभापतींच्या आसनासमोरील राजदंड घेऊन पळाले होते, पण तेव्हाचे राज्यकर्तेही सुसंस्कृत होते. बबनरावांना पाच दिवसांच्या कारागृहाची शिक्षा झाली, पण महत्त्वाचं म्हणजे सभागृहात त्यावर फार गंभीर चर्चा झाली आणि प्रशासनाला खडबडवून जाग आणण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले. बबनरावांची ही आक्रमकता जनतेच्या प्रश्नासाठी होती, स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी नाही. शब्दांच्या धडाडत्या तोफांतून मारा करून सभागृह आणि मैदानी सभा गाजवणारे आचार्य अत्रे, त्यांचे विरोधक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि सभागृहात जांबुवंतराव धोटे, केशवराव धोंडगे, प्रमोद नवलकर, एन.डी. पाटील, छगन भुजबळ, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते महाराष्ट्राच्या सभागृहाने पाहिले. त्यांचा सुसंस्कृतपणा अनुभवला आणि जनतेप्रती त्यांच्या हृदयांच्या गाभाऱ्यातून आलेल्या कळकळीची आणि क्वचित क्रोधाचीही प्रचिती सर्वांना आली.
वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख अशा अनेक सत्ताधारी नेत्यांचा आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील बहुसंख्य सहकाऱ्यांचा सुसंस्कृतपणाचाही डोह खोल होता. मंत्रीपद भूषवलेल्या शेषराव वानखेडे, रफीक झकेरिया, शिवराज पाटील चाकुरकर, सुधीर जोशी, शंकरराव गेडाम, सुंदरराव साळुंके, नितीन गडकरी, दिग्विजय खानविलकर, आर. आर. आबा , पतंगराव कदम... अशी किती तरी नावं या संदर्भात घेता येतील. या निमित्तानं आणखी काही जुन्या आठवणी सांगायला हव्यात. ‘विदर्भवीर’ म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे हेही खूप आक्रमक नेते होते. जांबुवंतरावांचं नेतृत्व जनतेच्या कळवळ्यानं ओसंडून वाहणारं होतं. वारांगणांच्या समस्या ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. त्या समस्यांच्या निराकरणासाठी धावून जाणारे जांबुवंतराव धोटे हे पहिलेच राजकीय नेते. तेव्हा विधिमंडळाच्या सभागृहात सदस्याच्या मेजावर लांब दांडी असणारा ध्वनिक्षेपक तसंच पेपरवेटसह कागद, पेन्सिल अशी स्टेशनरी असे. विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर जांबुवंतरावांच्या आक्रमकतेचा फटका माईक तुटण्यातही झाला होता. एकदा तर त्यांनी जनतेला न्याय मिळत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं पेपरवेटही भिरकावला होता. ते प्रकरण खूप गाजलं; जांबुवंतराव धोटे यांचं सदस्यत्व काही काळासाठी निलंबित करण्यात आलं. 
या घटनेनंतर सदस्यांच्या मेजावरचे माईक पक्के करण्यात आले. तसंच स्टेशनरीसारख्या सहज उचलता येण्याजोग्या वस्तूही गायब करण्यात आल्या. सरकार आणि विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे जांबुवंतराव यांच्याच यवतमाळ जिल्ह्याचे आणि तेच जांबुवंतरावांचं आवडतं लक्ष्य होतं. अतिशय कडक आणि जहरी शब्दांत जांबुवंतराव त्यांच्यावर हल्ले चढवत. मात्र वसंतरावांनी त्यांचा सुसंस्कृतपणा कधीच सोडला नाही, म्हणजे जांबुवंतरावांना विरोधकच मानलं, शत्रू नाही. जाबुवंतराव धोटे यांच्या मातोश्री गंभीर दुखणं घेऊन रुग्णालयात दाखल झाल्या, तेव्हा त्यांची विचारपूस करायला मुख्यमंत्रीपदाचा कोणताही गाजावाजा न करता भेटीला जाण्याचा सुसंस्कृतपणा वसंतराव नाईक यांनी दाखवला, तेव्हा जाबुवंतराव चकीतच झाले होते. ह्या त्याकाळातील उदाहरणाचा दाखला आजच्या काळात देताना जाणवते की, निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी, विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदानापासून जर दूर राहिला, तर त्यांना दोष देणार तरी कसा? आज चव्हाण साहेबांचं पुण्यस्मरण करताना यशवंतरावांचे ‘सुसंस्कृत राजकारण’ का लोप पावलं हा गहन प्रश्न आहे. ‘एक मारेन’, ‘थोबाड फोडेन’, ‘कानफटात लगावेन’, ‘कुणाचे तरी गाल’, ‘अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू’ आणि ‘म्हसोबाला सोडलेले बोकड’, अशी भाषा आलीय.
परमोच्च सुसंस्कृतपणाचा दाखला देणारी यशवंतराव चव्हाणसाहेबांचीच एक हृद्य हकीकत आहे. विधानसभेत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध विशेषत: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, अशी जुगलबंदी त्या काळात रंगलेली होती. अत्रे अति आक्रमक आणि सरस्वती पुत्र. त्यामुळे त्यांच्या भात्यातून एक एक जहरी शाब्दिक बाण असा काही सुटत असे की, सत्ताधारी प्रतिवादही करू शकत नसत. एकदा बोलण्याच्या ओघात यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भात एक वावगा शब्द निपुत्रिक असा आचार्य अत्रे यांच्या तोंडून निघून गेला. तो शब्द यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणूताई यांच्या जिव्हारी लागला. आपण निपुत्रिक का आहोत आणि त्याला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी कशी आहे, हे यशवंतरावांच्या वतीने अत्रेंना कळवण्यात आलं. ते ऐकल्यावर अत्रे खजील झाले. तडक उठून यशवंतरावांच्या घरी जाऊन यशवंतराव आणि वेणूताई यांची त्यांनी हात जोडून दिलगिरी व्यक्त केली. त्या पुढची हकीकत अत्यंत हृद्य आहे, चव्हाण दाम्पत्यांनी त्यांना माफ तर केलंच, पण पुढे जाऊन वेणूताई चव्हाण यांनी ‘मला एक भाऊ भेटला’, अशा शब्दांत त्या कटू प्रसंगावर कायमचा पडदा टाकला.
हा सुसंस्कृतपणा, वर्तनातला दर्जा हा असा एकेकाळी आपल्याकडच्या राजकारण्यात विपुल होता. कारण आक्रमकता म्हणजे आततायीपणा, उतावीळपणा, उठवळपणा, वाचाळपणा, शिवीगाळ, एवढंच नाहीतर कंबरेच्या खाली वार करणं नव्हे, याचं पक्कं भान राजकारणातल्या लोकांना होतं. यातले अनेक राजकारणी अल्पशिक्षित होते, पण त्यांची सुसंस्कृतपणाची पातळी अतिशय उच्च दर्जाची होती. काही राजकारणी अतिशय निश्चितपणे ‘माडी’ चढणारे आणि ‘ताडी’ चढवणारेही होते, पण त्या संदर्भात बोभाटा न होऊ देण्याचं भान त्यांच्यात होतं. ‘द्वितीय पात्र’ समाजात उघडपणे मिरवण्याचा आणि त्याचं समर्थन करण्याचा निलाजरेपणा त्यांच्यात आलेला नव्हता. थोडक्यात नैतिकता, मानवी मूल्य, सुसंस्कृतपणा असा त्रिवेणी संगम त्या काळच्या बहुसंख्य राजकारण्यात होता आणि त्या नेत्यांच्या वर्तनाची मोहिनी लोकांच्या मनावर होती. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली होणारं आंदोलन असो की सभा लोक हजारांनी सहभागी होत.
बबनराव ढाकणे, जांबुवंतराव धोटे, केशवराव धोंडगे, एन.डी. पाटील, विठ्ठलराव हांडे, मृणाल गोरे, अहिल्याताई रांगणेकर, अशा अनेक नेत्यांनी काढलेल्या मोर्च्यात अनेकदा दहा-वीस हजार लोक असत, पण त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना कधी दंडुका उभारावा लागला नाही. नेत्यानं उच्चारलेला एक शब्द आणि बोटाने केलेला इशारा ती गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी पुरेसा असायचा. अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते, हे खरं असलं तरी, जेव्हा अध:पतन व्यक्तीगत किंवा सामूहिक पातळीवर इतक्या प्रचंड वेगानं होतं, तेव्हा कुणीही विवेकी, संवेदनशील माणूस साहजिकच अस्वस्थ होतो, पण यापेक्षाही जास्त गंभीर असतं ते येणार्‍या नवीन पिढीच्या मनात त्याविषयी निर्माण होणारा तिरस्कार किंवा घृणा. नव्या पिढीचं राजकारणाबद्दल तिरस्काराने पाहणं, बोलणं हे यातूनच तयार झालंय.
पूर्वी कार्यकर्ते हे सामान्य घरातले होते. पंचतारांकित राहणीमान तेव्हा नव्हतं. नेते एसटी, बस, लोकल, जीपने प्रवास करत. हल्लीच्या निवडणुकांमध्ये आज उद्योगपतींचा दबदबा असतो. तेव्हा कामगार नेत्यांचा असे. सभा, मेळावे, अधिवेशने जिवंत वाटत. त्याला लोक स्वत: पदरमोड करुन हजर राहत. गेल्या काही वर्षांत निवडणूक हा अपप्रचाराचाच अधिक भाग बनत चाललाय. प्रसिद्धीमाध्यमे तेव्हाही नेत्यांची आरती ओवाळण्याचे काम करत होतीच. आणीबाणीत नाही का, संजय आणि इंदिरा गांधी यांची भलामण करण्यात तेव्हाच्या अनेक वर्तमानपत्रांनी जराही कसर सोडली नव्हती. तेव्हा पॅकेज वगैरे प्रकार नव्हता. मालक हेच संपादक होते, त्यामुळं तेव्हाची वर्तमानपत्रे निवडणुकांत भूमिकेशी अधिक बांधील होती. राजकीय पक्ष, संघटनांना प्रतिसाद देणाऱ्या तेव्हाच्या आणि आताच्या जनमानसाशी तुलना कशी करता येईल? आज कोणताही पक्ष कार्यकर्त्यांना विधायक कार्यक्रम देताना दिसत नाही. निवडणुका आल्या की कार्यकर्ते बाहेर येतात. समाजवाद्यांनी पहिल्या निवडणुकीतल्या पराभवानंतर पंचमढीला अधिवेशन घेतलं होतं. त्यात डाॅ. लोहिया यांनी ‘त्रिशुळ’ म्हणजे कुदळ, तुरुंग आणि मतपेटी असा कार्यक्रम दिला होता. जेपींनी त्याला ‘विचारयज्ञ’ असं म्हटलं होतं.
आजच्या आणि तेव्हाच्या नेत्यांची कार्यपद्धती विषयी काय सांगाल? आजचे नेते कोणत्या गावी, कार्यक्रमाला गेले, तर कार्यकर्त्यांशी फारसे संवाद साधत नाहीत. ते प्रसिद्धी माध्यमांशी मात्र अधिक संवाद साधतात. प्रसिद्धीकडे त्यांचा अधिक कल असतो. पण, तेव्हा असे नव्हते. पक्षात तेव्हा कार्यकर्ता महत्वाचा असे. प्रसिद्धी ही संघर्षातून आपसूक येते, यावर तेव्हाच्या नेत्यांची श्रद्धा होती. 
निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदानापासून जर दूर राहिला, तर त्यांना दोष देणार तरी कसा? तेव्हाचं म्हणजे ‘सुसंस्कृत राजकारण’ का लोप पावलं, यांची दोन कारणं आहेत. राजकारण ‘करिअर’ झालं. निवडणूक ‘इव्हेंट’ झाली आणि ती यशस्वी करण्यासाठी ‘व्यवस्थापक’ आले. दुसऱ्या भाषेत त्यांना ‘मॅन्युप्लेटर्स’ म्हणता येईल. सत्ताप्राप्ती हाच मूळ उद्देश झाला. सत्ता आली म्हणून पैसा आला. त्यासाठी लपवाछपवी, ‘तोडपाणी’ आलं. त्यापाठोपाठ आला तो सत्ता आणि पैशाचा माज. या माजामुळे कर्कश एकारलेपणा आणि टोकाचा कडवेपणा आला. यात सुसंस्कृतपणाला जागा उरली नाही आणि मग त्या माजातून आली ती मग्रुरी. ‘एक मारेन’, ‘थोबाड फोडेन’, ‘कानफटात लगावेन’, ‘कुणाचे तरी गाल’, ‘अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू’ आणि ‘म्हसोबाला सोडलेले बोकड’, अशी भाषा आली. शिव्या ‘लाईव्ह’ दिल्या जाऊ लागल्या आणि सज्जनांनी शरमेनं मान खाली घातली. ही आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची वाटचाल. राष्ट्रीय पातळीवर ‘खुनी’, ‘तू चोर, तुझा बाप चोर’, ‘दरोडेखोर’, ‘जल्लाद’, ‘मौत-का-सौदागर’, ‘मांड्या’, महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग... अशी किती उदाहरणं द्यायची?
भ्रष्ट, झूठ, खोटंनाटं बोलणारे लांचखोर, गुंडगिरीच्या जोरावर राज्यकर्त्यांनी राजकारणाच्या प्रतिमेला आणि प्रतिभेला चक्क काळीमा फासलाय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होऊ नये. इतकंच नव्हेतर राजकारण या शब्दाचा बेधडकपणे शब्द आणि अर्थ बदलून अर्थकारण करण्यापर्यंत त्यांनी मजल दर मजल मारलीय ही बाब साऱ्या जगाला उघड उघड दिसतेय आणि तेी कळून चुकलीय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अस्तित्वच धोक्यात आणून तिला गलितगात्र बनविण्याचा प्रयत्न केलाय आणि हें असं घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी असं दिवसेंदिवस रेटत नेणाऱ्यांना तिचा कुठंतरी अंत आहे याची क्षिती आणि पर्वा नाही याचे वाईट वाटतं. जे लोक सकाळी उठल्या उठल्या खोटं बोलण्यानंच चूळ भरतात ते सज्ञानीपणाचा, सर्वश्रेष्ठतेचा अवाजवी आव आणतात ते सज्ञानी नाहीतच, उलटपक्षी सपशेल अज्ञानीच आहेत हें जाहीरपणे स्पष्ट होतं. हाती अराजकतेने, बिनबोभाट, अवाजवी, अवास्तव तऱ्हेने लक्ष्मी आणि सरकारी खजाना लुटु लागल्यामुळे चोरांच्या उलट्या बोंबा मारणे सध्यां सुरूय. ब्रिटीशांनी अवलंबलेल्या परंपरेच्या पावलांवर पाऊल ठेवूनच मी मी म्हणविणारे नेते सध्या मार्गक्रमण करत आहेत. एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या भारतमातेला ओरबाडून लुटून रक्तबंबाळ करताहेत हे आता कळून चुकलंय. त्याचप्रमाणे भारत प्रगतीच्या मार्गावर आहे असा खोटा, पोकळ वासा जगभर उदोउदो करणाऱ्या नेत्यांनी आपलं फावड्याने ओढलेलं वित्त परदेशात नेऊन ठेवलंय हे त्रिवार सत्य आपण होऊन प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. तसेंच सारेच इथं भूतलावर सोडून जायचंय याची यत्किंचित जाणीव आपल्या परिपक्व मानवी मनाला करून देणं अधिक उचित आहे हें जाणलं पाहिजे.!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Sunday, 7 December 2025

राजकारण दर्जेदार कधी होणार?

"महाराष्ट्राने विचारप्रधानता, तत्त्वनिष्ठा अन् सुबुद्ध चर्चेच्या आधारे देशाला मार्गदर्शन केलं. त्या गौरवशाली राजकीय संस्कृतीचा आज पार विचका झालाय. याला नागरिकही जबाबदार आहेत. जनतेच्या पैशावर, विश्वासावर, सहनशीलतेवर डल्ला मारणाऱ्या अपात्र व्यक्तींना आपण वारंवार निवडून देतोय. ही विसंगतीच आजच्या विकृत राजकीय संस्कृतीचं पोषण करतेय. अशी द्वंद्वात्मक संधिसाधू बुद्धिमत्ता लाभलेले नागरिकच या लोकशाहीच्या मुळावर येणाऱ्या नव्या राजकीय संस्कृतीचे भागीदार अन् लाभार्थी आहोत. 'राजकीय आपत्ती व्यवस्थापन' यात 'डॉक्टरेट' मिळवलेले नेते देश अन् राज्यपातळीवर या नाट्याचं सूत्रसंचालन करताहेत. लोकप्रतिनिधींनी मतदारांबरोबरच्या परस्पर स्वार्थाच्या नात्याला जनकल्याणाच्या व्यापक अवकाशात अलगद पार्क केलंय. नेते अन् मतदारांच्या या सहप्रवासाने आज परवशतेचे स्थानक गाठलंय. सरकारच्या वर्षभराच्या राजकारणाचा, कामकाजाचा आढावा घेताना स्वतःचे ढोल बडवले जाताहेत. पण लोकांचं काय? त्यांना कोण त्राता राहिलाय?"
-------------------------------------------------
*स्था*निक स्वराज्य संस्था निवडणुकांत कोणता पक्ष कोणाबरोबर लढतोय अन् कोण कोणाविरुद्ध याचा पायपोसच उरलेला नाही, फोडाफोडीचं राजकारण एवढं पुढं गेलंय. पक्षनिष्ठा, भूमिका, डावे-उजवे सारं काही धुळीला मिळालंय. याचं मूळ मागील पाच वर्षांत भाजपने राज्यात केलेल्या राजकारणात दडलेलंय. आधी भाजपने शिवसेना फोडून शिंदेंना आपल्या गळाला लावलं नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांना आपल्या मांडीला मांडी लावून बसवलं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अधिकच खालची पातळी गाठलीय. सध्या फक्त निवडणुका जिंकण्यासाठीचं राजकारण सुरूय. निकालानंतर सत्तेसाठी याच्या पुढची पायरी गाठली जाऊ शकते. हे सारं सुरू असताना निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने काही ठिकाणच्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्यात. ही गोष्ट नियमाप्रमाणे आहे, परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांचा मात्र यामुळे तिळपापड झाला. त्यांनी निवडणूक आयोगालाच दूषणे दिली. एरवी जेव्हा राहुल गांधी निवडणूक आयोगावर टीका करत होते त्यावेळी याच फडणवीस यांनी राहुल गांधी आणि मंडळींना शहरी नक्षलवादी ठरवलं. आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेमध्ये स्वतः अन् आपला पक्ष अडकला तेंव्हा मात्र निवडणूक आयोग चुकीचा वाटतोय.
आयोगाच्या नियमावलीचा फटका स्वतःला बसल्यावरच फडणवीस यांना स्वतःच्या पायाखाली काहीतरी जळत असल्याची जाणीव झाली असावी. आणखी किती अधःपतन होणार? चळवळीतून आलेलं नेतृत्व, संविधानवाद, शेतकरी कामगारांचे लढे, सहकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाचन-चिंतनाशी नातं असलेले लोकप्रतिनिधी यावर राज्याच्या राजकीय संस्कृतीचा डोलारा उभा होता. त्याला सामाजिक सुधारणा, प्रबोधनाची जोड होती. मात्र गेल्या दशकांत निवडणुका, सत्तांतरं, पक्षांतरं, कंत्राटांवर आधारित प्रकल्पांची ढीगवाढ, अधिकारशाही प्रवृत्ती या लोंढ्याने राजकीय संस्कृतीला ग्रासलंय. लक्ष्मीदर्शन, जाती-धर्माच्या मतपेढ्या, निधीवाटप यामुळे घाऊक लाचार मतदान, याद्वारे आकाराला आलेली देवाण-घेवाणीची संस्कृती ही नव्या महाराष्ट्राची नवी ओळख झालीय. 
राज्यातली स्थिती अतिशय निराशाजनक आहे, पण समाज ज्यासाठी पात्र आहे, तेच त्याला मिळतं. एक समाज म्हणून आपण लोकशाहीसाठी पात्र आहोत का? बहुसंख्य मतदार सध्याच्या राजकारणाच्या या निराशाजनक परिस्थितीकडं दुर्लक्ष का करतात? आपण एवढ्या खालच्या पातळीवर कसे पोहोचलो? हा समाज काय वाचतो, ऐकतो, पाहतो? अलीकडं सार्वजनिक शिक्षण व्यवस्था कशी पद्धतशीरपणे उध्वस्त केलीय. एकत्र कुटुंब व्यवस्थेचं उच्चाटन झालंय. वृद्धापकाळानंतर अचानक पोकळी निर्माण होतेय. ती भरून काढण्यासाठी धर्माचा वापर होतोय. राजकीय हेतूंसाठी धर्माचा हुशारीने वापर केला जातो. रिकामं मन ही सैतानाची कार्यशाळाच असते. समाज बदललाय, त्याची मूल्यव्यवस्था बदललीय. हे सर्व बदल राजकारणात प्रतिबिंबित होतात. समाज जोपर्यंत आव्हानांचा सामना करत नाही, तोवर त्याला चांगल्या गोष्टींचं महत्त्व कळत नाही. सध्या केवळ हे दिवस सरण्याची प्रतीक्षा. खरं सांगायचं तर याला जेवढं खालच्या थराला गेलेले राजकारणी कारणीभूत आहेत, तेवढेच मतदारही आहेत. कारण ते राजकारण्यांची मनमानी सहन करतात. आपलं मत विकून मतदाराने आपली सहनशक्ती राजकारण्यांकडं गहाण टाकलीय, हे ते पुरतं ओळखून आहेत. प्रामाणिक मतदार अल्पमतात अन् अडगळीत पडलाय. अगदी क्लासवन अधिकारी, प्राध्यापक, मोठ्यापदांवर असलेली कुटुंबेही पैशांच्या पाकिटाची वाट बघत असतात. ज्याचं पाकीट जड त्याला मत. यशवंतराव, वसंतदादा, दंडवते, वाजपेयी वगैरेंनंतर राजकारण गाळात गेलं. कोणताही पक्ष कोणाच्याही बरोबर कुठेही युत्या, आघाड्या करू लागलाय. आपला पक्ष कुठं कोणाबरोबर आहे, याचाही अनेकांना पत्ता नसतो. आता मतदारांनी संघटना काढावी अन् आपल्या मतांचा जाहीर लिलाव करून मोकळे व्हावं. म्हणजे लोकशाहीचे अंत्यसंस्कार पूर्ण होतील. किळस वाटते स्वाभिमान विकलेल्या मतदारांची. महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ पातळीवर गेल्याचा प्रत्यय पदोपदी येतोय. पक्षनिष्ठा, पक्षाची मूल्यं पायदळी तुडविली जाताहेत. सुजाण लोकप्रतिनिधी दुर्मीळ झालेत कारण जनतेनेच आपला सुज्ञपणा पैशांसाठी गहाण टाकलाय. जे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? पक्ष अन् प्रतिनिधी फोडाफोडीच्या या राजकारणात प्रत्येकजण एकमेकांची लक्तरं वेशीवर टांगताहेत. महाराष्ट्राची अब्रू रोजच्या रोज चव्हाट्यावर येतेय. आजचा एकही लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या भविष्याचा सोडा, वर्तमानाचाही विचार करायला तयार नाही. त्यांना सत्तेचं व्यसन लागलंय. या व्यसनांधतेमुळे यांना स्वतःखेरीज काहीच दिसत नाही. त्यांच्या या बेशिस्त वर्तनामुळे महाराष्ट्र रसातळाला गेलाय.
महाराष्ट्राची राजसत्ता कधी नव्हे इतकी बिघडलीय. उभ्या देशाला आदर्शवत राज्यकारभार आजवर इथं होता. आज मात्र ज्यांना बिघडलेली राज्यं म्हटली जायची त्याहून अधिक दर्जाहीन कारभार इथं होऊ लागलाय. बेमूर्वतखोरवृत्ती वाढीला लागलीय. राज्याचं राजकारण कधी ‘दर्जदार’ होणारंय, याची चिंता सतावतेय. राजसत्तेला विरोधक का नकोसे झालेत. राज्यसत्तेने विरोधीपक्ष नेत्याला दर्जा द्यायलाच हवा. लोकशाहीत ‘सत्ताधारी आणि विरोधी’ आमदार हे अधिकाराच्या दृष्टीनं सभागृहात सम-समान आहेत. त्यात भेद करता येत नाही. दुर्दैवानं आज तो केला जातोय. विरोधी आमदारांना निधी देताना हात आखडता घेतला जातोय. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना वाटण्याच्या अक्षता दिल्या जाताहेत. त्यांना गांभीर्यानं घेतलंच जात नाही. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांएवढाच विरोधीपक्ष आवश्यकही आहे आणि तो विरोधीपक्ष कमी प्रमाणात असला तरी, त्याचा धाक सत्ताधाऱ्यांना असतो. हे विरोधी पक्षानं हजारवेळा सिद्ध करून दाखवलंय. १९६७ साली सत्ताधारी काँग्रेसचे २०२ आमदार होते. १९७२ साली २०२ चे २२२ झाले. विरोधीपक्ष संख्येने दुबळा होता, पण गुणवत्तेत एवढा तगडा होता की, २२२ आमदारांना तेव्हा घाम फुटायचा. सरकारची दमछाक व्हायची. १९६२ ते ७२ सलग १० वर्षे बाळासाहेब भारदे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्याचकाळात अधिकृतपणे मान्यता नसलेला पण, सलग १० वर्षे ज्यांचा विरोधी पक्षनेता म्हणून दरारा होता. असे शेकापचे कृष्णराव धुळूप यांना सत्ताधारी वचकून असायचे. मुख्यमंत्रीही त्यांचा आदर करत. उद्धवराव पाटील भाषणाला उभे राहिले तर सभागृहबाहेर जायला निघालेले मुख्यमंत्री पुन्हा आपल्या जागेवर बसत अन् लक्षपूर्वक भाषण ऐकत. विरोधी पक्षनेत्याचा आदर करण्याची त्यावेळच्या सरकारच्या वागण्यातला सुसंकृतपणा क्षणाक्षणाला जाणवायचा. याच विरोधकांनी रोजगार हमी योजनेसाठी पैसे उभे करायचे असतील तर ‘कर’ लावा, हा प्रस्ताव आणला होता. १९५२ पासून सगळ्या विरोधकांचं काम पहा, त्याची संख्या कमी होती. गुणात्मक दर्जा हजारपटीने अधिक होता. मंत्र्यांना अभ्यास करून यावं लागत होतं. सभागृहात आज मंत्र्यांची उपस्थितीच नसते. त्यावेळच्या प्रत्येक सभापतींनी विरोधी पक्षाची सदस्य संख्या किती ही कधी मोजलं नाही. सन्मानानं विरोधी पक्षनेत्याला दर्जा दिलेला. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, बंगला, स्टाफ मंत्र्याएवढ्याच सोयी आहेत. हे विधेयक महाराष्ट्र विधानसभेनेच प्रथम १९७८ साली मंजूर केलंय. वसंतदादा पाटील तेव्हा मुख्यमंत्री होते. दादा हे असं व्यक्तिमत्त्व होतं की, १९५२ ला ते पहिल्यांदा  निवडून आले. १९७२ ला मंत्री झाले. ते सुद्धा इंदिरा गांधी यांच्या आग्रहानं. २० वर्षे आमदार असताना, मंत्री व्हावं, असं त्यांना वाटलंच नव्हते. आताचे आमदार २० दिवस थांबायला तयार नसतात. ते १९६७ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना २०२ आमदार निवडून आले. त्यावेळी ९ राज्यांत काँग्रेसची सरकारे पराभूत झाली होती. १९७२ साली ही संख्या २२२ झाली. पण, विरोधी पक्षनेते दि.बा.पाटील यांना दर्जा दिला गेला. 
*विरोधकांचे आमदार किती, हा निकष महाराष्ट्र विधानसभेच्या नियमात नाही. असल्यास अध्यक्षांनी तो नियम वाचून दाखवावा. सभागृहाच्या १० टक्के विरोधी पक्षाचे सदस्य असले पाहिजेत. हा नियम लोकसभेकरता आहे. महाराष्ट्र विधानसभेत हा नियम झालेला नाही.* कोरमकरता मात्र हा नियम आहे.
लोकशाहीची बूज राखायची असेल तर अध्यक्ष एका मिनिटांत याबाबत निर्णय करू शकतात. मात्र अलिकडचे निर्णय केवळ पीठासीन अधिकाऱ्यांचेच असतात, असं समजू नका. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? हे विचारल्याशिवाय हा निर्णय होणार नाही. आजच्या विरोधी पक्षाला विधानसभेत दर्जा आहे की नाही, यापेक्षा लोकांचे प्रश्न घेवून रस्त्यावर उतरण्याची भूमिका त्यांनी आधी घ्यावी. आज सामान्य माणसांचे प्रश्न अधिक बिकट असताना, त्या प्रश्नाला वाचा फोडणारा नेता नेमका कोण आणि रस्त्यावर उतरणारा नेमका कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर लोकांना हवंय. विधानसभेत दर्जा मिळाला काय आणि न मिळाला काय. आजचे एकूणच राजकारण ‘दर्जा’ या शब्दाच्या अर्थाच्या पलिकडं गेलेलंय. त्यामुळं समाजातला धटिंगणपणा का वाढला? तर याचं उत्तर ‘जसे राज्यकर्ते...तशी जनता...!’ असं तर नसेल ना? म्हणून विरोधकांची भूमिका ‘लोकभावनेचा आदर’ करावा, अशी असली तरी, आताच्या राजकारणाचा लोकभावनेशी किती संबंध शिल्लक राहिलेलाय. हिंदीच्या सक्तीचा प्राथमिक शिक्षणापासून ढोल बडवला गेला नसता. एक नाही तर १० विषयांत सरकारला माघार घ्यावी लागली नसती. विरोधी पक्षनेत्याला दर्जा आहे की नाही, यापेक्षा यातल्या सामान्य माणसाला दर्जा आहे का? त्याच्या प्रश्नाबद्दल कोणी बोलतंय का? पूर्वीच्या सभागृहातले विरोधकाएवढे आक्रमक आमदार आज आहेत का? दि.बा. पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, बापू काळदाते, नवनीत बार्शीकर, नवनीत शहा, सुदाम देशमुख, मृणालताई गोरे, रामभाऊ म्हाळगी, पी. डी. रहांदळे, एस. ए. डांगे, एस. एम जेोशी, दत्ता देशमुख, उद्धवराव पाटील, ए. बी. बर्धन, प्रमोद नवलकर, जांबुवंतरावांसारखे तगडे नेते आज सभागृहात नाहीत. ज्यांचा सरकारला धाक वाटेल, अशा चारित्र्याचे किती आहेत? ज्यांच्या मागे रस्त्यावर लाखभर लोक उभे राहतील, असे किती आहेत? लोकभावनेची बूज अनेक विषयांत राखली जात नाही आणि म्हणूनच अनेक प्रश्न निर्माण झालेलेत आणि ‘जे प्रश्न नाहीत’ ते  ‘नसलेले प्रश्न’ मोठे केले गेलेत. महागाई आहे, कापसाला-सोयाबीनला भाव नाही. उन्हाळ्यात टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतो. भगिनींच्या डोक्यावर अजून हंडा आहे, गरिबांना ग्रामीण भागात आरोग्य सेवा आहे काय. हे प्रश्न विचारणाराही नाही. त्यासाठी मोर्चा काढणाराही नाही. त्याची उत्तरं देणाराही कोणी नाही. अशा स्थितीत सापडलेल्या महाराष्ट्रात विरोधी पक्षनेत्याला ‘दर्जा’ द्यायला हवा, ही मागणी अतिशय न्याय आहे. पण, उद्या ‘दर्जा’ दिला तर लोकांचे प्रश्न घेवून तो नेता रस्त्यावर उतरण्याची  हमी आहे का? सगळेच विषय बिघडल्यासारखे आहेत. लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. सध्याचं राजकारण वेगळे आहे. तेव्हा समंजस्यपणाने हे प्रश्न सोडवायचे असतील तर संयमाने विचारपूर्वक काम करणारं सरकार हवंय अन् तेवढ्याच दर्जाचा विरोधी पक्षनेता हवाय आज ती स्थिती दिसत नाही. राज्यात विधानसभेतल्या विरोधकांनी पुरोगामी कायद्यांसाठी चांगल्या कायद्यांना त्याहून चांगल्या दुरूस्त्या सूचवून पहाटे पाच-पाच वाजेपर्यंत विधानसभेचे अधिवेशन चालवलेलंय. प्रत्येक सूचना मताला टाकून मतदान घेतलेलंय. मंत्र्यांनी त्याची समर्पक उत्तरं दिलेलीत. चांगल्या सूचना स्वीकारलेल्यात. त्यातून महाराष्ट्राचे अनेक कायदे देशाने आदर्श कायदे म्हणून स्वीकारलेत. ती विधानसभा पाहण्याचे भाग्य लाभलेले माझ्यासारखे जे अनेकजण आहेत, त्यांना आजचा गोंधळ पाहिल्यानंतर महाराष्ट्रात नेमकं काय सुरूय, याचा अंदाजच येत नाही. बजेट झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनात लगेचच ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या महाराष्ट्राच्या ६५ वर्षांत पहिल्यांदाच मांडल्या गेल्या. आज राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर ६५ हजार रुपये कर्ज आहे. ग्रामीण भाग उद्धवस्त होतोय. खेड्यात रखरखाट आहे अन् शहरांत लखलखाट आहे. शहरांत चालायला रस्ता नाही. वाहतूक कोंडीने माणसं बेजार आहेत. शहरे फुगत चाललीत. नियोजन कोसळत चाललंय. त्याचा स्फोट ज्या दिवशी होईल त्यादिवशी राज्याला कोण सावरणार? तो नेता सत्ताधारी बाकावर दिसत नाही. अन् विरोधी बाकावरही दिसत नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेत्याला दर्जा द्यायलाच हवा. कायदेतज्ञ राहुल नार्वेकर अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचे अधिकार वापरून हा निर्णय करावा. पण विरोधी पक्षनेत्याच्या दर्जाबरोबरच राज्याच्या एकूण राजकारणाचा पाेत, दर्जा हा दर्जेदार होईल, यासाठी तो निर्माण करणाऱ्या नेत्याचं नाव काय? अन् तो नेता कोण आहे? राज्यातल्या प्रत्येक विषयात ‘दर्जा’ या शब्दाचा अर्थच घसरत चाललाय. घसरण सगळ्याच विषयात आहे अन् ती घसरण थांबवणारा नेता आज दिसत नाही. हीच मुख्य अडचण आहे. सभागृहात दर्जे मिळतील. पण, ४० वर्षांपूर्वीचा दर्जा पुन्हा कधी मिळेल. 
महाराष्ट्र विधानसभेत १९५७ साली विरोधीपक्ष नेतेपदी फक्त एक वर्षाकरिता एस.एम. जोशी होते. त्याआधी आर.डी.भंडारे हाेते. मग उद्धवराव पाटील झाले. एस.एम.जाेशी यांचे विरोधीपक्ष नेतेपदाची मुदत संपल्यानंतर ते यशवंतरावांच्या घरी गेले. त्यांनी यशवंतरावांना सहकार्य केल्याबद्दल हार घालत होते. यशवंतरावांनी तो हार घालून घेतला नाही, हाताने आडवला. ते एस.एम. ना म्हणाले, ‘सभागृहातली एक वर्षाची तुमची विरोधी पक्षनेतेपदाची तांत्रिक मुदत संपली असेल पण माझ्या दृष्टीने तुम्ही माझे कायमचे नेते आहात विरोधी पक्षात असलात तरी...!’ यशवंतरावांनी तोच हार एस.एम. यांच्या गळ्यात घातला. पुण्याला जाऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळचे विरोधी पक्षनेते हे असे होते. सत्ताधारीही तेवढ्याच बौद्धिक उंचीचे होते. सत्ताधारी बाकावर यशवंतराव नंतर वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, पी. के. सावंत, जीवराज मेहता, राजारामबापू पाटील, मधुकरराव चौधरी, यशवंतराव मोहिते, प्रतिभाताई पाटील, असे एकसे एक फाईल समजणारे फाईलवर पानभर आपली मतं व्यक्त करणारे मंत्री होते. देशाने राज्याचे १५ पुरोगामी कायदे स्वीकारले. तो हा महाराष्ट्र...! त्या महाराष्ट्रात विरोधी बाकावर तेवढेच दिग्गज आमदार होते. वैचारिक उंचीची माणसं तेव्हा होती. राजकारणाला दर्जा होता, आज विरोधी पक्षनेत्याला विधानसभा अध्यक्षांनी ‘विरोधी पक्षनेत्याचा’ दर्जा द्यावा, ही विरोधकांची मागणी योग्यच आहे. मात्र महाराष्ट्राचं राजकारण दर्जेदार कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवंय. 
हरीश केंची 
९४२२३१०६०९


सुसंस्कृत महाराष्ट्र कुठे गेला...?

"आज यशवंतराव चव्हाणसाहेब जाऊन जवळपास ४ दशक उलटलीत. पण साहेबांनी सुसंवादाचे महत्व विषद करणाऱ्या ‘Democracy is Government by Discussion’ या जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताच्या वाक्यानुसार राजकारण केलं तो राजकारणातला सुसंवाद आज लोप पावताना दिसतोय. त्याऐवजी सर्वत्र माजलाय तो नुसता कर्णकर्कश्श कलकलाट. महाराष्ट्रातले बहुसंख्य राजकारण्यांची बेताल, असंस्कृत 'मुक्ताफळं' ऐकताना उबग आलाय. शिवाय सध्या राजकारणाचा ढळलेला तोल, वाढलेली मग्रुरी, राजकारण्यांचा चंगळवाद, राजकारणातला हरवलेला ‘सुसंस्कृतपणा’ कुणाही संवेदनशील लोकशाहीवाद्याला फार अस्वस्थ करणारा आहे...!" 
--------------------------------------------
*आ*पण बहुसंख्य मतदारांच्या मनात बहुसंख्य राजकारण्यांविषयी तिरस्कार आहे, काहीच्या मनात घृणाही, पण आपण या दिव्य लोकांना मतदान का करतो, चांगल्या उमेदवारांना निवडून का देत नाही, यासंदर्भात आपण बहुसंख्य कधीच किमानही गंभीर नसतो. अनेक जण तर मतदानालाही जात नाही आणि राजकारणी कसे वाईट आहेत, याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर टाकण्यात धन्यता मानतो.
सध्याच्या बहुसंख्य राजकारण्यांमुळे, राजकारण म्हणजे केवळ आणि केवळ यथेच्छ शिवीगाळ असा समज वेगानं पसरतो आहे. हा समज गडद देशव्यापी झाला, तर उद्या लोक मतदानालाच न फिरकण्याची भीती आहे. असं जर खरंच घडलं, तर लोकशाहीत लोकच नसतील. लोकशाहीतील सुसंवाद हरवत चालला आहे, सुसंस्कृपणा लोप पावत आहे, हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. काही वर्षापूर्वी शरद पवारांचा जाहीर कार्यक्रमात मुका घेणारे केशवराव धोंडगे सर्वांना आठवत असतील. जुन्या काळात ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्त्व होते. विधिमंडळ आणि संसदेतही प्रदीर्घ काळ वावरलेले केशवराव ‘मण्यारचा वाघ’ म्हणून ओळखले जात. वयाचं शतक गाठून धोंडगे यांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हा शेवटच्या आजारपणात सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं, या प्रश्नाला केशवरावांनी तत्परतेनं साभिनय उत्तर दिलं. ‘राजकारणाबद्दल बोलण्यासारखं आता काहीच नाही. बोलणं बंदच करायला पाहिजे. उत्तर एकच. तोंडावर हात आणि कानावरही हात, हेच आजच्या राजकारणावरचं उत्तर आहे...!’, असं केशवराव म्हणाले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातले आणखी एक वादळी  नेते बबनराव ढाकणे यांचे ऑक्टोबर २०२३ ला निधन झाले. त्यांच्या त्या शेवटच्या काळात त्यांना काय वाटतं सध्याच्या राजकारणावर, या प्रश्नाला उत्तर देताना पटकन बबनराव ढाकणे म्हणाले, ‘चिंता वाटते...!' राजकारण्यांची भाषा, वागणं, राहणी आणि मग्रुरी यावर मग बबनराव बराच वेळ बोलत राहिले. त्यात कळकळ होती, तळमळ होती आणि चिंताही. सध्याच्या राजकारणाचा स्तर खरंच इतका खालावलाय की, बबनरावांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. राजकारण म्हटलं की, आरोप–प्रत्यारोप होणारच, सत्ताधारी-विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगणारच, पण मनुष्य आणि प्राण्यांचे अवयव तसंच अ-संसदीय भाषा तेव्हाच्या राजकारणात खरंच नव्हती. बबनरावांचा राजकारणातला प्रवास पाथर्डी पंचायत समितीचे सदस्य ते केंद्रीय मंत्री अशा भरारीचा आणि चार दशकांचा आहे. ते राज्यात आणि केंद्रातही काही काळ मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. बबनराव अतिशय आक्रमक म्हणून ओळखले जात. अहमदनगर जिल्ह्यातल्या दुष्काळी पाथर्डी तालुक्यात विकास कामे सुरू व्हावीत, म्हणून बबनरावांनी विधान सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली होती. जनतेच्या प्रश्नासाठी असं काही करणारे बबनराव देशातले पहिलेच. उडी मारून ज्या सभागृहात त्यांनी प्रवेश केला, त्याच विधानसभेचं सदस्यपद आणि उपाध्यक्षपद त्यांनी नंतर भूषवलं.
विधानसभेत ‘मंडल आयोगा’च्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार राजी होत नव्हतं, तेव्हा बबनराव चक्क सभापतींच्या आसनासमोरील राजदंड घेऊन पळाले होते, पण तेव्हाचे राज्यकर्तेही सुसंस्कृत होते. बबनरावांना पाच दिवसांच्या कारागृहाची शिक्षा झाली, पण महत्त्वाचं म्हणजे सभागृहात त्यावर फार गंभीर चर्चा झाली आणि प्रशासनाला खडबडवून जाग आणण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले. बबनरावांची ही आक्रमकता जनतेच्या प्रश्नासाठी होती, स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी नाही. शब्दांच्या धडाडत्या तोफांतून मारा करून सभागृह आणि मैदानी सभा गाजवणारे आचार्य अत्रे, त्यांचे विरोधक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,  जांबुवंतराव धोटे, केशवराव धोंडगे, प्रमोद नवलकर, एन.डी. पाटील, छगन भुजबळ, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते महाराष्ट्राच्या सभागृहाने पाहिले. त्यांचा सुसंस्कृतपणा अनुभवला आणि जनतेप्रती त्यांच्या हृदयांच्या गाभाऱ्यातून आलेल्या कळकळीची आणि क्वचित क्रोधाहीही प्रचिती सर्वांना आली.
वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख अशा अनेक सत्ताधारी नेत्यांचा आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील बहुसंख्य सहकाऱ्यांचा सुसंस्कृतपणाचाही डोह खोल होता. मंत्रीपद भूषवलेल्या शेषराव वानखेडे, रफीक झकेरिया, शिवराज पाटील चाकुरकर, सुधीर जोशी, शंकरराव गेडाम, सुंदरराव साळुंके, नितीन गडकरी, दिग्विजय खानविलकर, आर. आर. आबा , पतंगराव कदम... अशी किती तरी नावं या संदर्भात घेता येतील. या निमित्तानं आणखी काही जुन्या आठवणी सांगायला हव्यात. ‘विदर्भवीर’ म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे हेही खूप आक्रमक नेते होते. जांबुवंतरावांचं नेतृत्व जनतेच्या कळवळ्यानं ओसंडून वाहणारं होतं. वारांगणांच्या समस्या ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. त्या समस्यांच्या निराकरणासाठी धावून जाणारे जांबुवंतराव धोटे हे पहिलेच राजकीय नेते. तेव्हा विधिमंडळाच्या सभागृहात सदस्याच्या मेजावर लांब दांडी असणारा ध्वनिक्षेपक तसंच पेपरवेटसह कागद, पेन्सिल अशी स्टेशनरी असे. विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर जांबुवंतरावांच्या आक्रमकतेचा फटका माईक तुटण्यातही झाला होता. एकदा तर त्यांनी जनतेला न्याय मिळत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं पेपरवेटही भिरकावला होता. ते प्रकरण खूप गाजलं; जांबुवंतराव धोटे यांचं सदस्यत्व काही काळासाठी निलंबित करण्यात आलं. 
या घटनेनंतर सदस्यांच्या मेजावरचे माईक पक्के करण्यात आले. तसंच स्टेशनरीसारख्या सहज उचलता येण्याजोग्या वस्तूही गायब करण्यात आल्या. सरकार आणि विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे जांबुवंतराव यांच्याच यवतमाळ जिल्ह्याचे आणि तेच जांबुवंतरावांचं आवडतं लक्ष्य होतं. अतिशय कडक आणि जहरी शब्दांत जांबुवंतराव त्यांच्यावर हल्ले चढवत. मात्र वसंतरावांनी त्यांचा सुसंस्कृतपणा कधीच सोडला नाही, म्हणजे जांबुवंतरावांना विरोधकच मानलं, शत्रू नाही. जाबुवंतराव धोटे यांच्या मातोश्री गंभीर दुखणं घेऊन रुग्णालयात दाखल झाल्या, तेव्हा त्यांची विचारपूस करायला मुख्यमंत्रीपदाचा कोणताही गाजावाजा न करता भेटीला जाण्याचा सुसंस्कृतपणा वसंतराव नाईक यांनी दाखवला, तेव्हा जाबुवंतराव चकीतच झाले होते.
ह्या त्याकाळातील उदाहरणाचा दाखला आजच्या काळात देताना जाणवते की, निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदानापासून जर दूर राहिला, तर त्यांना दोष देणार तरी कसा? आज चव्हाण साहेबांचं पुण्यस्मरण करताना यशवंतरावांचे ‘सुसंस्कृत राजकारण’ का लोप पावलं हा गहन प्रश्न आहे. ‘एक मारेन’, ‘थोबाड फोडेन’, ‘कानफटात लगावेन’, ‘कुणाचे तरी गाल’, ‘अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू’ आणि ‘म्हसोबाला सोडलेले बोकड’, अशी भाषा आली.
परमोच्च सुसंस्कृतपणाचा दाखला देणारी यशवंतराव चव्हाणसाहेबांचीच एक हृद्य हकीकत आहे. विधानसभेत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध विशेषत: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, अशी जुगलबंदी त्या काळात रंगलेली होती. अत्रे अति आक्रमक आणि सरस्वती पुत्र. त्यामुळे त्यांच्या भात्यातून एक एक जहरी शाब्दिक बाण असा काही सुटत असे की, सत्ताधारी प्रतिवादही करू शकत नसत.
एकदा बोलण्याच्या ओघात यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भात एक वावगा शब्द निपुत्रिक असा आचार्य अत्रे यांच्या तोंडून निघून गेला. तो शब्द यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणूताई यांच्या जिव्हारी लागला. आपण निपुत्रिक का आहोत आणि त्याला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी कशी आहे, हे यशवंतरावांच्या वतीने अत्रेंना कळवण्यात आलं. ते ऐकल्यावर अत्रे खजील झाले. तडक उठून यशवंतरावांच्या घरी जाऊन यशवंतराव आणि वेणूताई यांची त्यांनी हात जोडून दिलगिरी व्यक्त केली. त्या पुढची हकीकत अत्यंत हृद्य आहे, चव्हाण दाम्पत्यांनी त्यांना माफ तर केलंच, पण पुढे जाऊन वेणूताई चव्हाण यांनी ‘मला एक भाऊ भेटला’, अशा शब्दांत त्या कटू प्रसंगावर कायमचा पडदा टाकला.
हा सुसंस्कृतपणा, वर्तनातला दर्जा हा असा एकेकाळी आपल्याकडच्या राजकारण्यात विपुल होता. कारण आक्रमकता म्हणजे आततायीपणा, उतावीळपणा, उठवळपणा, वाचाळपणा, शिवीगाळ, एवढंच नाहीतर कंबरेच्या खाली वार करणं नव्हे, याचं पक्कं भान राजकारणातल्या लोकांना होतं. यातले अनेक राजकारणी अल्पशिक्षित होते, पण त्यांची सुसंस्कृतपणाची पातळी अतिशय उच्च दर्जाची होती. काही राजकारणी अतिशय निश्चितपणे ‘माडी’ चढणारे आणि ‘ताडी’ चढवणारेही होते, पण त्या संदर्भात बोभाटा न होऊ देण्याचं भान त्यांच्यात होतं. ‘द्वितीय पात्र’ समाजात उघडपणे मिरवण्याचा आणि त्याचं समर्थन करण्याचा निलाजरेपणा त्यांच्यात आलेला नव्हता. थोडक्यात नैतिकता, मानवी मूल्य आणि सुसंस्कृतपणा असा त्रिवेणी संगम त्या काळच्या बहुसंख्य राजकारण्यात होता आणि त्या नेत्यांच्या वर्तनाची मोहिनी लोकांच्या मनावर होती. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली होणारं आंदोलन असो की सभा लोक हजारांनी सहभागी होत.
बबनराव ढाकणे, जांबुवंतराव धोटे, केशवराव धोंडगे, एन.डी. पाटील, विठ्ठलराव हांडे, मृणाल गोरे, अहिल्याताई रांगणेकर, अशा अनेक नेत्यांनी काढलेल्या मोर्च्यात अनेकदा दहा-वीस हजार लोक असत, पण त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना कधी दंडुका उभारावा लागला नाही. नेत्यानं उच्चारलेला एक शब्द आणि बोटाने केलेला इशारा ती गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी पुरेसा असायचा. अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते, हे खरं असलं तरी, जेव्हा अध:पतन व्यक्तीगत किंवा सामूहिक पातळीवर इतक्या प्रचंड वेगानं होतं, तेव्हा कुणीही विवेकी आणि संवेदनशील माणूस साहजिकच अस्वस्थ होतो, पण यापेक्षाही जास्त गंभीर असतं ते येणार्‍या नवीन पिढीच्या मनात त्याविषयी निर्माण होणारा तिरस्कार किंवा घृणा. नव्या पिढीचे राजकारणाबद्दल तिरस्काराने पाहणे बोलणे हे यातूनच तयार झाले आहे.
निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदानापासून जर दूर राहिला, तर त्यांना दोष देणार तरी कसा? तेव्हाचं म्हणजे ‘सुसंस्कृत राजकारण’ का लोप पावलं, यांची दोन कारणं आहेत.
राजकारण ‘करिअर’ झालं. निवडणूक ‘इव्हेंट’ झाली आणि ती यशस्वी करण्यासाठी ‘व्यवस्थापक’ आले. दुसऱ्या भाषेत त्यांना ‘मॅन्युप्लेटर्स’ म्हणता येईल. सत्ताप्राप्ती हाच मूळ उद्देश झाला. सत्ता आली म्हणून पैसा आला. त्यासाठी लपवाछपवी, ‘तोडपाणी’ आलं. त्यापाठोपाठ आला तो सत्ता आणि पैशाचा माज. या माजामुळे कर्कश एकारलेपणा आणि टोकाचा कडवेपणा आला. यात सुसंस्कृतपणाला जागा उरली नाही आणि मग त्या माजातून आली ती मग्रुरी. ‘एक मारेन’, ‘थोबाड फोडेन’, ‘कानफटात लगावेन’, ‘कुणाचे तरी गाल’, ‘अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू’ आणि ‘म्हसोबाला सोडलेले बोकड’, अशी भाषा आली. शिव्या ‘लाईव्ह’ दिल्या जाऊ लागल्या आणि सज्जनांनी शरमेनं मान खाली घातली. ही आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची वाटचाल. राष्ट्रीय पातळीवर ‘खुनी’, ‘तू चोर, तुझा बाप चोर’, ‘दरोडेखोर’, ‘जल्लाद’, ‘मौत-का-सौदागर’, ‘मांड्या’, महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग... अशी किती उदाहरणं द्यायची?
सत्ताधार्‍यांनी जात आणि धर्माचा वापर प्रचार आणि उमेदवार निवडताना केला, असा दावा करणार्‍या विरोधी पक्षांनी काय कमी दिवे पाजळले आहेत? नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीला कुणबी आणि कोष्टी विरुद्ध ब्राह्मण, शिरुर मतदार संघात मराठा विरुद्ध माळी असा रंग देणारे, यज्ञ आणि धार्मिक विधी जाहीरपणे करणारे ‘वाचाळेश्वर’ शहरो-शहरी दिसू लागले आणि अशांमुळे अब्रू गेली ती राजकारणाची. देशाचा विरोधी पक्ष नेत्याला ‘पप्पू’ म्हणणं जितकं प्रचंड अशोभनीय आणि अवमानकारक आहे, तेवढंच अशोभनीय आणि अवमानकारक देशाच्या पंतप्रधांनांना ‘फेकू’, ‘चोर’ म्हणणं आहे, हे आपल्या राजकीय अध:पतनाचं केवळ राज्यस्तरीयच नव्हे, तर राष्ट्रीय स्वरूपही ‘कुरूप’ झालेलंय.

भाजपचा अश्वमेध रोखणार का?

'लावण्यवती मुंबई'ची अवस्था महाभारतातल्या द्रौपदीसारखी झालीय. ती काँग्रेसच्या ताब्यात होती तेव्हा तिला जुगारात लावलं अन् ...