Sunday, 29 June 2025

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. हे मनोमिलन, भावबंधन मराठी मनाला सुखावणारं आहे. मराठीभाषा हा अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे. त्रिभाषेचं शैक्षणिक धोरण पुनर्जीवित करून हिंदी लादण्याचा सरकारचा डाव हा मराठी संस्कृती उध्वस्त करणारा, मराठीवर अन्याय करणारा असून तो उधळून, चिरडून टाकण्याचं आवाहन ठाकरे बंधूंनी जनतेला केलंय. मराठी भाषा, अस्मिता, संस्कृती अन् महाराष्ट्रधर्म वाचविण्यासाठी सरसावलेल्या ठाकरे बंधूंच्या आवाहनाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल...!"
---------------------------------------------------
हिंदू, हिंदी, हिंदुराष्ट्र याचा ध्यास घेत सत्ताधाऱ्यांनी आधीच जीर्ण, गलितगात्र, मरणकळा भोगणाऱ्या मराठीचा गळा धरून गुदमरून टाकलंय. ज्यांनी आपली उपजीविका, मानसन्मान, श्रेष्ठत्व मराठीवर उपभोगलंय अशा राजकारणी, अधिकारी, अभिनेते, खेळाडू, कलावंत, साहित्यिकांनीच जन्मदात्या मराठीला वाळीत टाकलंय. मायमराठी ज्यांनी टिकविलीय अशा सामान्य, गरीब, ग्रामीण भागातल्या मराठीतून शिकणाऱ्या अजाण मुलांवर हिंदी लादलीय. या विरोधात मराठी अस्मितेसाठी लढणारे ठाकरे बंधू चवताळून उठलेत. मराठी माणसांच्या मनाला साद घालत, १९ वर्षाचा दुरावा दूर लोटत, अद्यापि मुंबईत 'ठाकरे ब्रँड'च आहे. हे बिंबविण्यासाठी येत्या ५ जुलैला मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येताहेत. महाराष्ट्राच्या मनात जे होतं ते घडतंय! उद्धव आणि राज ही पटावर एकत्रित अवतरलेली प्यादी हत्ती-घोडा-उंट सोडा, वजीरांच्या चालीने चालू शकतात असं जाणवताच तथाकथित सत्ताधारी नेत्यांची घालमेल झालीय. हे होऊ नये म्हणून त्यांनी संशयाचं वातावरण निर्माण केलं गेलं. २० वर्षापूर्वी अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा शिवसेनेत उद्धव-राज यांची लुडबूड ही घराणेशाहीची सुरुवात आहे, असा कांगावा केला गेला. दोघांना एकटं पाडण्याची खेळी खेळली होती. हे घरातले, नुसते घरातले नव्हते. ठाकरे कुटुंबातले दोन जवान बाळासाहेबांचे जय-विजय झाले तर आमचे काय, हा घोर काही नेत्यांना लागला होता. तो संपावा म्हणून उद्धव-राज यांच्यावर डायरेक्ट मारा करत, त्यांच्यात वितुष्ट निर्माण करत वेगळं पाडलं गेल. त्यामुळं मराठी मन दुखावलं होतं. काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी तसे अथक प्रयत्न केले होते. हिंदीसक्तीच्या निमित्तानं ती उसवलेली वीण साधण्याचा प्रयत्न होतोय. मराठी माणसांच्या मनातलं घडतंय. मराठी अस्मिता, भाषा ही ज्याप्रकारे ठाकरे बंधूंना एकत्र आणतेय तशाच प्रकारे मुंबई महापालिका आपल्या हाती राखण्याचं कसब ठाकरे बंधूंना दाखवावं लागेल. मराठी मतांना एकत्र आणण्यासाठी आपापसातले मतभेद मिटवावे लागतील. गैरसमज दूर करावे लागतील. नेते एकत्र आले तरी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी दोघांनाही नमतं घ्यावं लागेल. हिंदीची सक्ती ही फडणवीस, शिंदे, पवार या सरकारनं जाणीवपूर्वक खेळलेली खेळी आहे. मुंबईवर कब्जा मिळविण्यासाठी परप्रांतीय त्यातही उत्तरेकडील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हा डाव आहे. म्हणूनच त्यांच्या एका पिठ्ठ्यानं मुंबईचा महापौर हिंदी भाषिक होऊ शकतो अशी वल्गना केलीय. त्याचाही समाचार घ्यावा लागेल. उद्धव आणि राज यांना आगे बढो अशा आरोळ्या ठोकून प्रोत्साहित करण्यात येतेय. सध्याचं राजकारण निर्मळ, निर्धोक राहिलेलं नाही. राजकारणात 'आगे बढताना' निदान ह्याची जाणीव असणं आवश्यक आहे. आपले हितचिंतक, खास विश्वासू वाटणारेच आपल्या वाटेवर खड्डे खोदत असतात. उघडपणे शत्रुत्व करणारा वा दूर होणारा परवडला. जवळ राहून घात करणारा नको. याचा अनुभव दोघांनीही घेतलेलाय.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती अन् त्रिभाषा सूत्र सरकार लागू करतेय. त्याविरोधात विरोधी पक्ष आणि शिक्षण क्षेत्रातल्या काही तज्ज्ञांनी भूमिका घेतलीय. सरकार तळ्यात मळ्यात दिसतेय. त्यांना हिंदी सक्तीचं नीट समर्थनही करता येत नाहीये. 'बाळासाहेबांचा विचार' म्हणत शिवसेना फोडलेल्या शिंदेसेनेची तर भाजपनं गोचीच केलीय. शिवसेना मराठीसाठी आग्रही आहे, मात्र तिच्याच खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपनं हिंदीची सक्ती लादलीय. आता 'लेखी नाही तर मौखिक हिंदी' अशी मखलाशी सरकारनं केलीय. अजित पवारांनी पहिलीपासून हिंदी नकोच अशी भूमिका घेतलीय, तर शिंदेसेनेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. एकनाथ शिंदेंचं प्रस्थ आणि उपद्रवमूल्य कमी करण्याचं राजकारणही यामागं दिसतेय. शिवाय हिंदीची सक्ती केल्यामुळं सगळ्यात मोठी राजकीय गोची ही कॉंग्रेसची झालीय. कारण हिंदीच्या सक्तीला अगदी उघड-उघड विरोध दर्शविल्यामुळं येणाऱ्या काळात राज आणि उद्धव ठाकरे यांचं जनसमर्थन, आणि राजकीय बळ वाढेल. परिणामी कॉंग्रेसची राजकारणातली स्पेस कमी होण्याची शक्यता आहे. इकडे विरोधी पक्षांनी एकत्र येत ५ जुलै रोजी मुंबईत हिंदीसक्ती विरोधात आंदोलन करताहेत. मराठी माणसं व्यवहारात हिंदी बोलतात, वाचतात अन् लिहितातही. हिंदी सिनेमा अन् त्यातली गाणी यामुळं हिंदी आधीच त्यांनी जवळ केलीय.मात्र वर्षोनुवर्षे इथं स्थायिक झालेले, जन्मलेले अनेक हिंदी भाषिक लोक मराठी बोलताना दिसत नाहीत. रामकृष्ण मोरेंनी शिक्षणमंत्री असताना पहिलीपासून इंग्रजी मौखिक लागू केलीय. त्याची तुलना हिंदी सक्तीशी करता येणार नाही. कारण इंग्रजी ही जागतिक पातळीवर 'अर्थ'भाषा, भाकरीची भाषा असल्याचं सिद्ध झालंय. तसं हिंदीचं नाही. ती भारतात त्यातही फक्त गायपट्ट्यापुरतीच मर्यादित आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण भारतात विविध प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. त्यांच्या अस्मितेशी हिंदी सक्तीचा विषय निगडीत आहे. त्यामुळं त्याला विरोध होतोय.
१९६६ साली प्रधानमंत्री बनलेल्या इंदिरा गांधींनी एका वर्षात १९५० च्या दशकापासून हिंदी विरुद्ध इंग्रजी या राजभाषा आणि संपर्क भाषा यावरून होत असलेला उत्तर-दक्षिणचा दुभंगवादी वाद संसदेच्या पटलावर कायद्यानुसार संपविला! सत्ता सांभाळणारा नेता संवाद अन् सहकार्य या तत्त्वानुसार सत्ताकारण करणारा असेल, तर प्रश्न कितीही जटील गुंतागुंतीचा असला, तरी लोकशाहीच्या मार्गानं, राष्ट्रीय ऐक्य साधून तो सोडविता येतो. हे १९६७ साली इंदिरा गांधींनी दाखवून दिलं होतं. त्यामुळं उत्तर केंद्रीत अहंकारवादाला तेव्हा चाप बसला. दक्षिण भारतीय जनतेनं राजभाषा कायद्यात केलेली 'हिंदी किंवा इंग्रजी' ही पर्यायी दुरुस्ती मान्य केली आणि आपल्या व्यवहारात, शिक्षणात आपली प्रादेशिक भाषा अन् संपर्क भाषा म्हणून इंग्रजीचा पर्याय स्वीकारला. हिंदी उत्तरवादी पंथीयांनी मात्र 'त्रिभाषा' सूत्राचा पट्टा अहिंदी राज्यांच्या गळ्यात बांधत आपण समाधानी असल्याचा खोटा आव आणला. त्यामुळं 'हिंदी भाषेच्या सक्ती'ला तेव्हा पूर्णविराम मिळाला. अर्थात भारतात राजकीय समस्या पूर्णपणे सुटली, असा निष्कर्ष काढणं हा राजकीय गाढवपणा ठरतो, तरीही १९६७ सालानंतर हळूहळू हिंदीच्या राष्ट्रीयपणावरून होणारा उत्तर विरुद्ध दक्षिण हा वाद तसा मंदावला होता. मात्र तो आता पुन्हा उफाळून आलाय. कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांची मांडणी ही उत्तरी प्रादेशिक केंद्रीत वर्चस्ववादी अन् हिंदीला राष्ट्रवादाशी जोडत तिच्यात अवघा देश बांधणारी असल्यानं १९५० पासून त्यांनी हा वाद पूर्णपणे कधीच गाडला नाही. संसदीय मान्यतेप्रमाणे १९६७ साली राजभाषा कायद्याच्या दुरुस्तीनुसार हा विषय खरंतर संपलेलाय. मग तो पुन्हा उभा करून महाराष्ट्रासह दक्षिणेतल्या राज्यांना उचकवण्याचं कारणच काय? त्याचं उत्तर आहे, भारतीय जनसंघ..! या पक्षाचं धोरण 'एक देश, एक भाषा, एक संस्कृती' असं होतं. जनसंघाचं नवरुपडं भारतीय जनता पक्ष, त्यांची सत्ता २०१४ साली केंद्रात येताच त्यांनी १९५० च्या दशकातला आपला हिंदी राष्ट्रभाषेचा अजेंडा अहिंदी भाषिक राज्यांवर लादण्याचा प्रयत्न सुरू केला. हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा अपप्रचार करत महाराष्ट्रासह दक्षिणी प्रादेशिक अस्मितेला दुखावण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून आज होतोय. 
मराठी शाळेत पहिलीत आलेली मुले वर्षाअखेर प्रयत्नपूर्वक मराठी वाचायला, लिहायला शिकतात. मुळात जगातली कोणतीही भाषा शिकणं, साक्षर होणं ही बालकांसाठी वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. प्रौढांना अगदीच सोपी गोष्ट वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती बरीच गुंतागुंतीची बाब असते, हे समजून घेतलं पाहिजे. साक्षरता क्षेत्रातले तज्ज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवली जाते आहेच. आणखी तिसरी हिंदी भाषा शिकवायला सुरुवात केल्यास शैक्षणिक भाराखाली 'गिनिपिग' बनवलेली बिचारी मुलं अक्षरशः दबून जातील. तुलनेनं गणित, शास्त्रसारखा महत्त्वाचा विषय शिकायला, शिकवायला वेळ अपुरा पडेल. राज्यात दोन शिक्षकी शाळांची संख्या अर्ध्याहून अधिक आहे. तिथल्या शिक्षकांवरचा भार आणखी वाढेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना राज्यानं आता तरी भाषिक न्यूनगंडातून बाहेर पडायला हवं. तीन भाषा शिकण्याची सक्ती इथं केली जातेय. उत्तरेकडच्या राज्यांतून तिसरी भाषा म्हणून मराठी शिकवणार का? शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. तर आपल्या राज्यानं असा निर्णय घेऊ नये. पहिली ते पाचवीचा स्तर मूलभूत शिक्षणाचा स्तर असतो. या काळात बौद्धिक क्षमता वाढवायची की त्याच्यावरचं ओझं वाढवायचं याबद्दल विचार केला पाहिजे. शिवाय मराठी हिंदी लिपी साधर्म्य असल्यानं इथं उत्तरेकडील लोक मोठ्या संख्येनं येतात. त्यांना मराठी शिकविण्याऐवजी त्यांची भाषा आपल्या मुलांवर लादण्याचा प्रयत्न आपण का करतो आहोत? याआधी हिंदी सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता अन् हिंदी सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सक्ती करणार नाही असं सरकारनं जाहीर केलं होतं पण त्यानंतर १७ जून २०२५ ला जो शासन आदेश जारी केलाय त्यात केवळ शब्दच्छल करून हिंदी सक्ती ठेवलीय, हा सरकारचा कावा आता सर्वांना समजलाय. केवळ शब्द बदलल्यानं त्याचा आशय बदलत नाही. मराठी ही केवळ भाषा नसून ती आपली संस्कृती आहे, ही संस्कृती संपवण्याचा अजेंडा संघ आणि भाजपचा आहे. हिंदू, हिंदी आणि हिंदूराष्ट्र हे गोळवलकर गुरुजींच्या 'बंच ऑफ थॉट...!' मध्ये आहे, तोच हे सरकार राबवतेय पण हे षडयंत्र हाणून पाडायला हवं. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे असं शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा आणि संस्कृती संपवायचीय. 
मध्यंतरी राज्य सरकारनं सर्व खात्यांना परिपत्रक पाठवून सर्व व्यवहार, नागरिकांशी संपर्क, संवाद हा मराठीतूनच करण्याची सक्ती केली. परंतु मराठीच्या आग्रहाची नैतिकता मंत्री, सनदी अधिकारी, आमदार, सभासदांमध्ये आहे का? मंत्र्यांची, आमदारांची, साहित्यिकांची, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचीही मुलं, नातवंडंही इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. एकदा असाच सर्व्हे केला असता बहुसंख्य आमदार, मंत्री, अधिकारी, साहित्यिक, संमेलनाध्यक्ष यांची मुलं ही इंग्रजीत शिकताहेत, काही तर परदेशातच आहेत. मराठी संस्कृतीला अन् भाषेला संजीवनी देण्याचा प्रश्न आहे. आधुनिक ज्ञानाची, शास्त्रांची भांडारं मराठी जनतेपासून दडवून ठेवणारी परभाषेची कुलपं तोडायला हवीत. सत्तालोभानं मराठीशी, महाराष्ट्राशी बेईमान होणाऱ्या राज्यकर्त्यांकडून याबद्दलच्या उमाळ्याची अपेक्षा नाही. सरकार मानधन, पारितोषिकं वा पगार देऊन बोलावील म्हणून वाट पाहणं, साहित्यिकाला लांच्छनास्पद आहे. त्यासाठी साहित्यिकांनी त्यांच्या संघटनांनी स्वतः होऊन संघटित प्रयत्न केले पाहिजेत. सर्व क्षेत्रात आमूलाग्र मराठी द्वाही फिरावी असं सामर्थ्य आणण्याची मोहीम उभी राहायला हवीय. त्याच्या अग्रभागी साहित्यिकांनी असायला हवंय. स्वतःच्या दुबळ्या, वैफल्यग्रस्त नि थिट्या भावना व्यक्त करायलाही मराठी भाषा अपुरी पडते, असं रडगाणं गाऊन इंग्रजी अन् मराठी शब्दांची हास्यास्पद नि खवट भेळ नवसाहित्य म्हणून खपविण्याची वृत्ती कायम राहिली तर ते होणार नाही. जी परब्रह्माची कोडी रांगड्या मराठी माणसालाही उलगडतील, असं सामर्थ्य मराठी भाषेत निर्माण करणाऱ्या संतांची परंपरा मराठी साहित्याला आहे. असं असताना आमची भाषा लोकांना दुर्बोध वाटते, त्याला आम्ही काय करावं? असा अहंगंड मिरवून हे कार्य होणार नाही. आज पाश्चिमात्य साहित्यापासून जिने शिकवण घेतलेलीय ती सुशिक्षितांची संस्कृती नि वाङ्मय वेगळं आणि महाराष्ट्राच्या रोमारोमात मुरलेल्या उज्ज्वल परंपरांचा वारसा जिला आहे, ती ग्रामीण जनतेची संस्कृती आणि वाङ्मय वेगळं, अशी फाळणी मराठी संस्कृतीची झालीय.आज महाराष्ट्र मुख्यतः ग्रामीण भागात आहे. सुशिक्षित मध्यमवर्गीय हा त्यावरचा पातळ थर आहे.  प्रतिष्ठित साहित्यिकांच्या वाङ्मयाची आजवर दडपली गेलेली बीजं उसळून वर आली पाहिजेत. अशी साहित्य संपदा मराठी माणसांकडे गेली पाहिजे.  मराठीचा विषय आला की, अमक्या-तमक्यामुळं हे सारं घडतंय, असा दोषारोप ठेवून रिकामे होतो. ते झालं की मोकळे, असा भासही निर्माण होतो. ही सामूहिक, पर्यायानं आपलीच जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यायला हवं. शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठस्तरीय शिक्षण, नोकरी, व्यवसाय, दैनंदिन सामाजिक व्यवहार, न्यायपद्धती, वैद्यकीय व्यवसाय, विविध कला यांच्या संदर्भात भाषेचा वापर भिन्न भिन्न पद्धतीनं करत असतो. त्या व्यवहाराशी आपण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंधित असतो. त्यामुळंच आपण ती जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळे होतो. सामूहिक, सामाजिक गोष्टींचा आरंभ स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून व्हावा असं आपण मानत असू तर तसं वागायला हवं. मुलांना मराठी शाळेत घालीन. वैद्यकीय व्यवसायात, कोर्ट-कचेरीच्या कामात, उद्योगक्षेत्रात जिथं जिथं मराठी भाषेचा वापर शक्य आहे, तिथं त्याचा आग्रह धरीन आणि तसंच आचरण करीन. कारणाविना इंग्रजी, हिंदी भाषेचा वापर करणार नाही. निदान त्यांचं भ्रष्ट मिश्रण करणार नाही. मराठीत बोलेन. मराठीत स्वाक्षरी करीन. मी मराठी आहे याचा अभिमान बाळगीन. हे म्हणताना कोठेही ओशाळलेपण येणार नाही याची काळजी घेईन. अशा अनेक गोष्टी आपण स्वतः आरंभ करू काय? सामूहिक जबाबदारीच्या वेळी आपण शासनाकडे बोट दाखवितो. त्यांनी काही करावं अशी अपेक्षा करतो. इंग्रज गेले; नुसतेच गेले नाही तर त्यांची भाषा, संस्कृती पेरून गेलेत. तेव्हा कोणाच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा स्वतःपासून बदलण्याची सुरुवात राजकारण्यांनी, साहित्यिकांनी केली तर त्याचा इतरांवर खूप परिणाम होऊ शकेल. त्यांनी खंबीर राहायला हवंय. इथंच सारी मेख आहे.
मुंबईमध्ये मराठीची अवस्था मंदिराबाहेरच्या गरीब, लाचार माणसासारखी झालीय. शासन दरबारी मराठी माऊली फाटके कपडे घालून केविलवाण्या पद्धतीने जाब विचारतेय, 'कोण कोण जबाबदार आहेत माझ्या ह्या अवस्थेला..!' खरंतर जबाबदार आपणच आहोत, भाषिक अस्मिता अन् स्वाभिमान आपण कधीच गहाण टाकलेलाय तसंच त्याची जबाबदारी कधीच झटकून टाकलीय, निव्वळ ग्रामीण भागात मराठीची अवस्था जरा चांगली आहे, पण त्यातही बदल होतोय, सध्याची परिस्थिती पाहता इंग्लिशची पाळंमुळं ग्रामीणभागात रुजू लागलीत, जर त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर ग्रामीण भागातूनही पण मराठी भाषा लुप्त होऊन जाईल. विकासाच्या नावाखाली आपण पुढच्या पिढीला एक नवीन भाषेचं दान देत आहोत, मराठी ही केवळ भाषा नाही तर एक संस्कृती आहे आपण तीच संस्कृती मोडीत काढतो आहोत. मराठी शाळांची अवस्था एवढी वाईट आहे की, त्या शाळेतून शिकलेले विद्यार्थी आज आपल्या पाल्याला भरमसाठ पैसे खर्च करून इंग्रजीभाषेच्या शाळेत टाकताहेत. आपण मातृभाषा बदलतो याचा अर्थ आपण आपल्या भाषेचा, संस्कृती, रीतिरिवाज बदलत आहोत, स्वतःच्या भाषांची कात टाकून परकीय भाषा स्वीकारत आहोत. कारण ह्या आधुनिक जगात वावरायचंय म्हणून एवढा मोठा त्याग करत आहोत. आपल्यासमोर इतिहास अन् संस्कृती आहे ती आपली मराठी आज प्राणवायुसाठी धडपडतेय. सरकार दरबारी तर मराठीला सावत्र वागणूक मिळतेय. मराठी भाषा आणि मराठी माणूस मुंबईमधून बाहेर जातोय. इतर परप्रांतीय मुंबईमध्ये आले, त्यांनी सोबत आपली संस्कृतीही आणली. त्याचे परिणाम दिसायला लागेलत. आज आपण आपल्याच राज्यात परकीय झालोत. आपली मराठी भाषा ताठ मानेने उभी राहील ही आशा आहे. कारण २०२० पासून मराठी विषय सक्तीचा केला पण हा उपाय नाही. मराठी भाषेतून माध्यमिक, प्राथमिक, उच्चशिक्षण सक्तीचं झालंच पाहिजे ह्यासाठी सरकारला जाब विचारावा लागेल. मराठीला जागतिक आणि पैश्याची भाषा बनवण्याची वेळ आलीय. मराठीतून ते शक्य आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. 
चौकट
चला, मराठीची तिरडी बांधायला सुरूवात करू या. मेलो होतोच आता कायदेशीर मरूया. मराठीला मुळापासून अभिजात दणका देण्याचं काम शासनानं सुरु केलंय. वीस हजार मराठी शाळा, त्यांच्या जमिनी घशात घालण्यासाठी बंद केल्याच आहेत. आता त्रिभाषा सूत्र आणून मराठी भाषा अनिवार्य नाही, हिंदी मात्र सक्तीची...! असं घोषित करून मराठी ही बिरूदावली बासनात गुंडाळून टाकायची जय्यत तयारी झालीय. आता महाराष्ट्रात मी - तू  हे कमी होऊन, मेरेकु - तेरेकु असं धेडगुजरी हिंदी सुरु करूयात. हिंदीनं मराठीला गिळायला सुरवात केलीय. पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना पु.ल. देशपांडे यांनी शिवसेनाप्रमुखांनाही सुनावलं होतं. कारण 'पुरस्कारांची गरज देणार्‍याला असते!' हे पु.ल. देशपांडे यांना माहीत होतं. मात्र त्यानंतरचे महाराष्ट्रभूषण पुरस्कारांचे लाभार्थी हे सरकारचे शरणार्थी झालेत अन्यथा हिंदीच्या सक्तीबाबत त्यांनी मौन पाळलं नसतं. अभिनेते, कलाकार, साहित्यिक, खेळाडू तोंडाला कुलुप लावून बसलेत. 
हरीश केंची
९४२२३१०६०९


 

राजकारणात समाजसंस्कृतीची हानी......

महाराष्ट्रात कुण्या एकेकाळी आंबेडकरी चळवळींनी रान पेटवलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर काँग्रेसच्या म्हणजेच सत्तेच्या वळचणीला दलित नेते गेल्यानं तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण नामदेव ढसाळ, राजा ढाले आणि इतरांनी दलित पँथरच्या वावटळीनं महाराष्ट्र पेटवून टाकला होता. तो लढा जसा सामाजिक होता तसाच ती सांस्कृतिकही होता. नवे नेतृत्व उदयाला आले. स्थापनेपासूनच त्यांच्यात नेतृत्व स्पर्धा होती. गोरगरिबांचं  नेतृत्व करण्याची संधी होती. नेत्यांचा अट्टाहास चळवळ मोडकळीस आणायला कारणीभूत ठरला. नव्या नेतृत्वानं मात्र वैचारिक कोलांट्या ऊड्या मारल्या. सत्ताधाऱ्यांची पालखी उचलण्यात धन्यता मानली. चळवळीला आणि आंबेडकरी जनतेला वाऱ्यावर सोडून दिलंय...!
--------------------------------------------
आंबेडकरी जनतेचा संघर्ष जितका राजकीय आहे तितकाच तो सामाजिक आणि सांस्कृतिक आहे. आजही दलित वस्त्या मुख्य वस्तीपासून वेगळ्या असतात. अस्पृशता जितकी इतिहासात होती तितकीच ती वर्तमानातही आहे. निवडणुकीच्या राजकारणात सत्तेचा सोपान चढण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या युत्या होत असतात. स्वबळावर बहुमत मिळवून सत्ता हस्तगत करणं आज छोट्या-मोठ्या कुठल्याच पक्षांना शक्य नाही. त्यामुळं छोट्या-मोठ्या समविचारी पक्षांशी युती करून आपापली आघाडी तयार करण्याचं काम गेली काही वर्ष राजकारणात सातत्याने सुरू आहे. मात्र अशी युती करून जनतेसमोर जाताना किमान समान कार्यक्रम आणि किमान समान विचार यांची अपेक्षा असते. भाजप किंवा शिवसेना जेव्हा युती करतात, तेव्हा ते हिंदुत्वाचा समान अजेंडा घेऊन पुढे जातात किंवा काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष जेव्हा कोणत्याही पक्षासोबत युती करतो, तेव्हा धर्मनिरपेक्षता या समान कार्यक्रमाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाते. अर्थात, युत्यांच्या राजकारणात या समान कार्यक्रमांची अनेकदा मोडतोड झालेली आहे. इंदिरा गांधींच्या विरोधात जेव्हा जनता पक्षाची स्थापना झाली, तेव्हा त्यात काँग्रेसविरोध या एकच मुद्दा लावून धरत जनसंघाचा समावेश झालेला होता. या अशा वैचारिक कोलांट्या उड्या नंतरच्या काळात सातत्याने होत राहिल्या. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं, तेव्हा वैचारिक कोलांटी उडीचा सर्वांत ठळक प्रत्यय देशाला आला होता. राजकारणात कोणी अस्पृश्य नाही, हा संदेश या संधिसाधू परिवर्तनातून दिला जात होता. थोडक्यात, संधिसाधू परिवर्तन युतीच्या राजकारणाला नवं नाही. पण पिढ्यान् पिढ्या ज्या समाजाने अस्पृश्यता सहन केली, ब्राह्मणी मूल्यांवर आधारलेल्या जातवर्णवर्चस्ववादाच्या अन्याय अत्याचारांना तोंड दिलं, त्या समाजाला ब्राह्मणी मूल्यांची, हिंदुत्ववादाची जोपासना करणाऱ्या पक्षांच्या दावणीला नेऊन बांधणं यात आणि आधीच्या कोलांट्या उड्या यात निश्चितच फरक आहे.
आंबेडकरी जनतेचा संघर्ष हा कम्युनिस्टांसारखा किंवा समाजवाद्यांसारखा केवळ अर्थकारण आणि वर्गव्यवस्था यांच्याशी संबंधित नाही. तो सामाजिक, सांस्कृतिक अधिक आहे. तो जातवर्णवर्चस्ववादावर, ब्राह्मणी मूल्यांवर आघात करणारा आहे. आजही अस्पृश्यता हा इतिहास नाही. अस्पृश्यता जितकी इतिहासात होती, तितकीच ती वर्तमानातही आहेच. गाव असो की शहर असो, आजही दलित-बौद्ध वस्त्या मुख्य वस्तीपासून वेगळ्या असतात. उच्चभ्रू वस्त्यांना आजही दलित-बौद्ध शेजार नको असतो. लग्नाच्या जाहिरातींमध्ये आजही 'एसटी, एससी क्षमस्व हे ठळकपणे छापलेलं असतं. भगव्या-निळ्याच्या या राजकीय सौदेबाजीत 'एसटी, एससी क्षमस्व' म्हणणाऱ्या या सामाजिक नकाराचं, सांस्कृतिक संघर्षाचं काय करायचं? 'क्षमस्व' म्हणणारी मंडळी बहुसंख्येने हिंदुत्ववादी विचारसरणीची, जातवर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीची, संघ, भाजपशी नातं सांगणारी आहेत. शिवाय आधीच्या कोलांट्या उड्या या व्यक्तिगत होत्या. उदाहरणार्थ, नामदेव ढसाळ आणि नीलम गोन्हे. समाजातल्या एका गटाला बरोबर घेऊन भगवा सोपान चढणारे रामदास आठवले हे पहिलेच आहेत, असं काही नाही. जीवघेणी महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी या प्रश्नांवर रान उठवण्यासाठी आपण शिवसेना भाजपबरोबर युती करत आहोत, असं रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले त्यावेळी सांगत होते. आठवले गेली अकरावर्षे केंद्रात मंत्री आहेत पण आजतागायत त्या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. याची जाणीव कदाचित आताशी त्यांना झाली असावी म्हणूनच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जाण्याचं वक्तव्य केलं होतं. आज गरज आहे ती महागाई, बेकारी, आत्मसन्मान यासाठी महाराष्ट्रभर संघटितपणे एकवटायला हवंय. आंबेडकरी विचारांच्या गटांकडूनही निर्णय मेळावा, निर्भीड मेळावा असे मेळावे घेत या महायुतीच्या विरोधात जनमानस एकटवण्याचा आणि नव्याने रिपब्लिकन चळवळीची मांडणी करण्याचा प्रयत्न करायला हवा. डॉ. बाबासाहेबांच्या वैचारिकतेला मानणारे कार्यकर्ते आणि विचारवंत महाराष्ट्रभर आहेत. त्यांच्यातल्या बहुसंख्यांचा या महायुतीला विरोध आहे. या सगळ्यांना एकत्रित करण्याचं, या महायुतीच्या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभं करण्याचं काम करायला हवं. भाजप ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पक्षीय आवृत्ती आहे. या मंडळींना गुजरातचा प्रयोग महाराष्ट्रात करायचाय. गुजरातमध्ये यांनी दलित-आदिवासींना मुस्लिमांच्या विरोधात वापरलं. मंडल आयोगाला विरोध करणारी ही मंडळी सातत्याने दलित, आदिवासी आणि बहुजनांच्या विरोधात राहिलीत. त्यांची शक्ती आणखी प्रबळ झाली, तर ब्राह्मणी मूल्यव्यवस्था आणण्यात त्यांना यश येईल. त्यामुळेच ही महायुती म्हणजे प्रागतिक चळवळींसमोरचं आव्हान आहे!
भाजपचे शिवसेनेसोबतचे मतभेद वाढलेत, राज ठाकरेंच्या मनसेने त्यांना आतून हलवलंय. त्यामुळं त्यांना मित्र हवा आहे. जरांगे पाटलांनी वातावरण निर्मिती केली होती पण बहुजनांमध्ये फूट पाडून आपलं साध्य करण्यात भाजपला यश आलंय. म्हणून ते आठवलेंना जवळ करताहेत. आठवले १९९५ दरम्यान जर शिर्डीत लोकसभा निवडणुक हरले नसते, तर त्यांनी ही युती केली असती का? गेली २०-२५ वर्षं आठवलेंनी केवळ स्वहिताचं राजकारण केलंय. त्याचा फुले-आंबेडकरी चळवळींवर गंभीर परिणाम झालाय. आधी त्यांनी पक्ष काँग्रेसकडे गहाण टाकला होता, तो आता भाजपकडे गहाण ठेवलाय. पूर्वी दलित वस्त्या हे म्हणजे धडाडीच्या कार्यकर्त्यांचे गड होते. पण २०- २५ वर्षांपूर्वीचा रिपब्लिकन कार्यकर्ता आणि आताचा रिपब्लिकन कार्यकर्ता यांच्यात गुणात्मक आणि राजकीय बदल झालाय. निवडणुकीच्या या राजकारणात मुख्य पक्ष हे दलित वस्त्यांमध्ये खोलवर शिरले आणि त्यांनी महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना करप्ट केलं. रिपब्लिकन पक्ष आपल्या मूळच्या भूमिकेपासून भरकटला. ज्या सामाजिक लढ्यासाठी तो जन्माला आला होता, तोच त्य, ठरवून पाडलेत. हे सारं आठवलेंच्या सहमतीनेच झालेलंय अशी कार्यकर्त्यांची भावना झालीय. आधी काँग्रेसकडे आणि नंतर भाजपकडे त्यांनी पक्ष गहाण ठेवला. यात पक्षयंत्रणा कुचकामी झाली. स्वतःच्या पक्षाचे उमेदवार पडत असताना आठवलेंचा स्वाभिमान कधी जागा झाला नाही. पण स्वतः पडल्यावर मात्र त्यांना स्वाभिमान आठवला आणि ते शिवसेना-भाजपकडे गेले. पण हे तत्त्वशून्य आणि संधिसाधू राजकारण आहे आणि आंबेडकरी जनता ते स्वीकारणार नाही. प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जातवर्णवर्चस्ववादी लोकांविरोधात लढा दिलेलाय. याचा विसर पडलाय.
राजकारणाच्या या वळणावर स्वतंत्रपणे नवी चळवळ उभी करण्याची गरज अनेक आंबेडकरी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय. आंबेडकरी जनतेची चळवळ ही राजकारणासाठी कधीच नव्हती. तर ती सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी होती. पण काहींना पैसा हवासा झाला आणि आंबेडकरी संस्कृतीचे जे मारेकरी आहेत, त्यांच्याच कळपात काहीजण गेलेत. पण या लढ्याला आंबेडकरी तयार आहोत, त्यांच्या सारखी जयपराजयाची भीती त्यांना वाटत नाही.  रामदास आठवले हे आधी पवारांकडे आश्रित आणि आता भाजपकडे आश्रित म्हणून गेलेत. आपलं अस्तित्व दुसऱ्यांच्या ओंजळीत घालायचं आणि उपकारांची भाषा करायची, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असे लाचार अनेक आहेत. नैतिकता नसलेल्या लोकांनी आज आंबेडकरी चळवळ ताब्यात घेतलीय. ज्या संस्कृतीवर बाबासाहेबांनी हल्ला केला, त्या संस्कृतीच्या रक्षकांकडे ते गेलेत. आता नव्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उद्धाराची लढली जाणारी ही लढाई नेमकी कोणती असेल, या संदर्भात बाबासाहेबांचं एका भाषणातील विधान उद्धृत केलं पाहिजे. 'मला या संस्कृतीचा कंटाळा आलेला आहे. या संस्कृतीबरोबर माझं सतत युद्ध सुरू आहे. आपलं कोणत्याही पक्षाबरोबर किंवा सरकारबरोबर युद्ध सुरू नाहीए. ब्राह्मणी मूल्य जोपासणाऱ्या या संस्कृतीबरोबर युद्ध सुरू आहे, याचं भान असलं पाहिजे...!' ज्या निजामाचं वकीलपत्र डॉ.बाबासाहेबांनी नाकारलं होतं, अशा बाबासाहेबांना ज्यांनी निजामाचा हस्तक ठरवलं, अशा लोकांच्या पंगतीला आज काही लोक जाऊन बसलेत. या लोकांनी डॉ. बाबासाहेबांना स्वीकारलंय, असं काही मंडळींना वाटतंय. पण अमित शहा यांची संविधान आणि डॉ.आंबेडकर यांच्याबाबत जे उदगार काढलेत ते या भाजपवासी नेत्यांना मान्य आहे का? कारण त्यावर त्यांनी मौन पाळलंय. केवळ भाजपच नाही तर या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी फक्त डॉ.बाबासाहेबांची प्रतिमा स्वीकारलीय, त्यांचे विचार मात्र स्वीकारलेले नाहीत. 
महाराष्ट्रात एकही दिवस बाबासाहेबांच्या लेकरांची सत्ता नव्हती. पण एकही दिवस चैत्यभूमीकडे वाकड्या नजरेने पाहाण्याची कोणाची हिंमत झाली नाही. कारण आंबेडकरी जनतेची ताकद या चैत्यभूमीच्या मागे आहे. उत्तरप्रदेशात बसपाची सत्ता आली, बाबासाहेबांची स्मारकं उभी राहिली, पण सत्ता गेल्यावर या स्मारकांमध्ये चरसी-गांजेकस शिरले. हा फरक आहे. कारण आमचा एकच साहेब आहे, बाबासाहेब! इतर कुणीही नाहीत. आठवलेंनी आजवर पक्ष चालवला, पण स्वतंत्रपणे विजयी होण्याची ताकद मिळवली नाही. भाजपने आपल्याच कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या, पोरांच्या बळावर त्यांचे आमदार आणि नगरसेवक त्यांनी जिंकून आणलेत. मग भाजपशी युती केलेल्यांनी वीस वर्ष काय केलं? असा प्रश्नही कार्यकर्ते विचारताहेत. ६ डिसेंबर हा आंबेडकरी जनतेचा शोक दिन आहे. मात्र बाबरी पाडणाऱ्या भाजपचा तो विजयदिन आहे. भाजपचे माजी मंत्री अरुण शौरी यांनी आपल्या पुस्तकातून डॉ.बाबासाहेबांना खोटा देव म्हणालेत, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय त्यावर खरंतर संसदेत त्यावर शौरींना झोडायला हवं होतं,  इथं आठवलेंनी मौन पाळलंय.
थोडक्यात, महायुतीशी केलेली गळामिठी मतपेटीत काय चमत्कार घडवून आणते हे आपण आजवरच्या निवडणुकीतून पाहिलंय. हाच मुद्दा कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. राजकीय गणितांबरोबरच याला सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचीही पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच आंबेडकरी कार्यकर्ते सामाजिक समतेच्या लढ्याचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. तर महायुतीला पाठिंबा देणारे कार्यकर्ते यानिमित्ताने सामाजिक अभिसरण होईल, असा आशावाद व्यक्त करत आहेत. सामाजिक समतेच्या मुद्याबाबत आग्रही असणारी मंडळी म्हणूनच या महायुतीबाबत निराश आहेत. ही महायुती केवळ राजकीय आहे, यातून कोणतंही सामाजिक अभिसरण किंवा बदल होणार नाही. भाजप आपल्या हिंदुत्ववादी विचारांवर केवळ ठाम नाही तर त्यासाठी आग्रही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेली बौद्ध तत्त्वप्रणाली ही विषमतेला विरोध करणारी आहे. ही बौद्ध तत्त्वप्रणाली हिंदुत्ववादी स्वीकारतील, ही अपेक्षा करणं भाबडेपणाचं आहे. खैरलांजी असो, इतर ठिकाणच्या अत्याचाराचं, बलात्काराची प्रकरणं असोत या प्रत्येकवेळी स्वतः जनतेनेच पुढाकार घेतलाय. साहित्यिकांनी धरणं धरलीत, मोर्चे काढलेत. यावेळी नेते कुठे होते? आपले लढे आपल्यालाच लढायचे आहेत, हे आंबेडकरी जनतेला कळून चुकलंय. बाकी जे काही चाललं आहे, ते सत्तेसाठीच सुरू आहे. सत्तासुंदरीसाठी भगव्या-निळ्याचा हा मिलाफ होत आहे. त्यात भगवा आपल्या हिंदुत्ववादी विचारावर ठाम आहे, पण निळ्याने मात्र आपला समतावादी रंग पुसला आहे. त्यानं आपली गल्ली बदललीय. यासाठी संघभूमी का चैत्यभूमी? जवळ करायची याचा निर्णय करावा लागणार आहे. आंबेडकरी जनतेला स्वतःची वाट आता स्वतःच शोधायची आहे.
हरीश केंची 
९४२२३१०६०९






गांधींची "ब्रँड व्हॅल्यू"

सुमारे आठ दशकांपूर्वी, याच वेळी, नथुराम गोडसे, नारायण आपटे, व्ही.आर. करकरे, मदनलाल पाहवा, गोपाळ गोडसे, शंकर किष्टय्या, दत्तात्रेय परचुरे, माफीचा साक्षीदार असलेला दिगंबर बडगे, गंगाधर दंडवते, गंगाधर जाधव, सूर्यदेव शर्मा हे तिघे फरार आणि पुराव्याअभावी निर्दोष मुक्त झालेले विनायक दामोदर सावरकर या हिंदुत्ववादी कट रचणाऱ्या मारेकऱ्यांनी महात्मा गांधींना संपवण्याची योजना आखली होती. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेनं गांधीजींच्या पायांना स्पर्श करण्याच्या बहाण्यानं त्यांची हत्या केली. या घटनेला ७७ वर्ष उलटूनही गोडसे-सावरकरांच्या वैचारिक वंशजांमध्ये गांधींबद्दलचा द्वेष कमी होण्याऐवजी तो अधिकच तीव्र झालाय. पक्ष स्थापनेच्यावेळी गांधींचा फोटो लावून गांधीजींच्या विचारांवर पक्ष चालवला जाईल असं ठरवणाऱ्यांनी आज जे काही चालवलंय ते पाहता ते आपल्या मूळ विचारधारेतं परतल्याचं जाणवतंय. एका फोटोमध्ये एक कृश, उघड्या शरीराचा, वृद्ध माणूस लाकडी चरख्यावर सूत कातत बसलाय, तर दुसऱ्या फोटोमध्ये, एक निरोगी, सुदृढ, धडधाकट आणि आत्मविश्वासू प्रधानमंत्री डिझायनर कपडे घालून एका डिझायनर चरख्यासमोर बसलेत. दोन्ही चित्रं शेजारी शेजारी ठेवा आणि आजच्या कोणत्याही जाहिरात गुरूला विचारा, यापैकी कोणतं चांगलं 'ब्रँड नेम' असू शकतं? मला माहित नाही की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधले वरिष्ठ माजी मंत्री अनिल विज यांच्यासारखे किती लोक काय काय म्हणतील. हरियाणात: "मोदी हा एक चांगला ब्रँड आहे. हे नाव आहे...!"  पण अनिल विज यांनी गांधींवर ही टिप्पणी पूर्ण प्रामाणिकपणे केली. ते म्हणाले, "गांधीजींच्या नावानं खादीचं पेटंट झालेलं नाही...!" गांधींच्या विचारसरणीशी त्यांच्या सहमती आणि असहमतीबद्दल आपण नंतर बोलू, पण आधी गेल्या २५ वर्षांत भारतीय राजकारणाची भाषा किती बदललीय ते पाहू. हे राजकारण नाही, ही बाजारपेठेची भाषा आहे. ब्रँड नेम, पेटंट आणि विक्रीत वाढ हे सर्व खादीच्या संदर्भात सांगितलं गेलं होतं, ज्याला गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध लोकांना एकत्र करण्यासाठी एक राजकीय साधन बनवलं होतं. नव्या युगातल्या नव्या नेत्यांना आता त्या खादीच्या ब्रँड, विक्री आणि पेटंटची चिंता आहे. भारतीय राजकारणाच्या भाषेतल्या या बदलासाठी अनिल विज किंवा नरेंद्र मोदी जबाबदार नाहीत. हे पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांचं योगदान आहे. ज्यांच्या धोरणांमुळे समाजाला प्रत्येक कल्पना, प्रत्येक तत्व आणि प्रत्येक मूल्य, बाजारभाव निश्चित करण्याचं व्यसन लागलं. परंतु अनिल विज यांनी गांधींबद्धल पुढं जे सांगितलं, ते आर्थिक उदारीकरण आणि आधुनिक बाजारपेठेबद्धल नव्हतं तर गांधी आणि त्यांच्या विचारांबद्धल होतं. हिंदुत्वाच्या राजकारणातल्या दशकांपासून चालत आलेला गोंधळ किंवा असहाय्यता प्रकट करत होतं. त्यांनी गांधीजींचं नाव अशुभ असल्याचं वर्णन केलं आणि म्हटलं, "महात्मा गांधींचं नाव असं आहे की, ज्या दिवशी ते नोटेवर चिकटवलं गेलं, त्याच दिवशी नोटेचं अवमूल्यन झालं....!"  म्हणून तुम्ही गांधीजींचं काढून मोदींचं टाकलं ही चांगली गोष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींप्रमाणेच, अनिल विज यांचं वैचारिक संगोपन देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी संघटनेत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत झालंय आणि नंतर ते हरियाणामधल्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक बनले. गांधींविरुद्धच्या त्यांच्या विधानांवर काँग्रेसनं ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय, ज्यांनी गांधींना फक्त चित्रांपुरतं मर्यादित ठेवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
अशा प्रकरणांमध्ये नेहमीप्रमाणेच, भारतीय जनता पक्षानं त्यांचे नेते अनिल विज यांच्या विधानाचा त्वरित निषेध केला. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी टाळाटाळ करत म्हटलं की, “कोणी काय म्हटलं ते घेणं वैयक्तिक असेल. त्याचा पक्षाशी थेट संबंध नाही." नरेंद्र मोदींनी चरखा सुरू केला तो खादीला प्रोत्साहन देण्यासाठी, गांधींना मागे टाकण्यासाठी नाही...!" पक्षाची भूमिका लक्षात घेऊन अनिल विज यांनीही ट्विटरद्वारे गांधींवरील आपलं विधान मागं घेतलं. त्यांनी लिहिलं, “महात्मा गांधींबद्दल दिलेलं विधान हे माझं वैयक्तिक विधान आहे. कोणाच्याही भावना दुखावू नयेत म्हणून मी ते परत घेतो...!" एका दिवसात वीस ब्रेकिंग न्यूज, पंचवीस खुलासे आणि पस्तीस खळबळजनक खुलासे देणाऱ्या माध्यमांच्या या युगात, अनिल विज यांचे गांधीविरोधी विधान देखील भूतकाळातली गोष्ट बनली. गांधींच्या जागी त्यांचा फोटो लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीही बोलण्याची गरज वाटली नाही आणि विज यांच्या विधानाप्रमाणे मोदींचे फोटोही मागे घेण्यात आले नाहीत. हे सर्व महात्मा गांधींच्या हत्येच्या ६९ व्या वर्धापन दिनाच्या काही दिवस आधी घडले. ६९ वर्षांपूर्वी, दिल्लीत जानेवारीची एक थंड संध्याकाळ होती. तेव्हा दिल्लीची हवा इतकी प्रदूषित झाली नसती, म्हणूनच गांधींनी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीला "निरुपयोगी" म्हटलं की, गांधी आणि पटेल हवा खाणार आणि पिणार आहेत. गांधी म्हणाले - दिल्लीची हवा इतकी चांगली आहे, मला ताजी हवा घेण्यासाठी बाहेर जाण्याची काय गरज आहे? पण दिल्लीची हवा प्रत्यक्षात तितकी स्वच्छ नव्हती. फाळणीनंतर त्यात विष मिसळण्यात आले. हे विष हवेत जाणवले नसेल पण लोकांच्या मनात जातीय द्वेषाचे विष भरलेले होते. नथुराम गोडसेच्या हातून झालेल्या हत्येच्या फक्त नऊ दिवस आधी, मोहनदास करमचंद गांधी यांनी दिल्लीतील बिर्ला भवन येथे संध्याकाळी प्रार्थना सभेत हिंदू कट्टरपंथीयांना थेट संदेश दिला. ते म्हणाले, “तुम्ही हे करू नये. हिंदू धर्म यातून वाचणार नाही. माझा असा दावा आहे की, जर हिंदू धर्म या जगात टिकून राहायचा असेल तर तो माझ्या कामाने वाचवता येईल!"
याच्या एक दिवस आधी, म्हणजे २० जानेवारी १९४८ रोजी, पाकिस्तानातून आलेल्या तरुण निर्वासित मदनलाल पाहवा यांनी गांधींच्या प्रार्थना सभेत बॉम्बस्फोट केला होता. गांधीजींसाठी हा एक इशारा होता. दुसऱ्या दिवशी प्रार्थना सभेत जमलेल्या लोकांना गांधीजींनी सांगितले की पहवा हे फक्त एक साधन होते आणि म्हणून त्यांनी देवाला त्याला बुद्धी देण्याची प्रार्थना करावी. गांधीजींचा संदेश प्रत्यक्षात त्या राजकीय शक्तींसाठी होता जे मदनलाल पाहवा आणि इतरांना महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी तयार करत होते. तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्याची ही पद्धत गांधीजींना पूर्णपणे समजली होती. २१ जानेवारी १९४८ च्या प्रार्थना सभेत त्यांनी ही पद्धत स्पष्ट केली. ते म्हणाले की, असे बरेच लोक आहेत जे मदनलाल पाहवा यांना समजावून सांगत आहेत की मी दुष्ट आहे आणि हिंदूंचा शत्रू आहे आणि देव दुष्टांना मारण्यासाठी पृथ्वीवर कोणाला तरी पाठवतो. मदनलाल पाहवा यांचा असा विश्वास होता की, गांधींसारख्या खलनायकाला मारणे हे धार्मिक कृत्य आहे. त्याला यश आले नाही, पण दहा दिवसांनंतर, गटातील आणखी एक सदस्य, नथुराम गोडसेने, गांधीजींच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या.
गांधीजींच्या हत्येला ७७ वर्षे उलटून गेली आहेत.  गेल्या काही दशकांमध्ये, गांधींइतके राजकीय, शैक्षणिक आणि वैयक्तिक पातळीवर इतर कोणत्याही नेत्याचे परीक्षण झालेले नाही. गांधींवर जितकी जास्त टीका झाली तितके ते टीकेच्या पलीकडे गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील गोंधळाचे हे एक प्रमुख कारण आहे. मुख्य प्रवाहातील राजकारण करणारा भारतीय जनता पक्ष पंडित जवाहरलाल नेहरूंना अगदी सहजपणे नाकारू शकतो, परंतु गांधींना नाकारणे त्यांच्यासाठी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी तितके सोपे नाही. कारण गांधीजींचे विचार कदाचित वाढले किंवा पसरले नसतील, परंतु त्यांच्या हत्येनंतर सात दशकांनंतर, त्यांची "ब्रँड-व्हॅल्यू" देशात आणि परदेशात इतकी वाढली आहे की, ती केवळ भाजपसाठीच नाही तर काँग्रेससाठीही एक सक्ती बनली आहे. उलट, तो ब्रिटिश सरकारसाठी देखील एक सक्ती बनला आहे. कारण त्यांनी त्यांच्या संसदेसमोर त्यांचा पुतळा बसवण्यात राजकीय फायदा पाहिला. गांधी आणि गांधींच्या विचारसरणीपासून संघ परिवाराचा हा लपंडाव अनेक दशकांपासूनचा आहे. गांधीजींच्या हत्येनंतर अनेक वर्षांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सकाळी स्मरणात ठेवायच्या व्यक्तिमत्त्वांच्या यादीत त्यांचा समावेश केला. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांचाही या यादीत समावेश होता. पण गांधी आणि संघ यांच्यातील संघर्ष संपला नाही. संघ परिवार गांधींना उघडपणे नाकारू शकत नाही, परंतु त्यांच्या पुतळ्याचे अभिषेक होऊ देऊ इच्छित नाही कारण गांधी आणि संघाची भारतीय समाजाबद्दलची समज एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
म्हणूनच कधीकधी अनिल विज गांधींचे नाव अशुभ मानतात आणि म्हणतात की हळूहळू त्यांचे चित्र चलनी नोटांमधून काढून टाकले जाईल, तर कधीकधी भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज गांधींचा खुनी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणतात. संघाचे अनेक नेते उघडपणे कबूल करतात की ते त्याच्या मार्गापासून भरकटले आहे पण त्याचे हेतू चुकीचे म्हणत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक प्राध्यापक राजेंद्र सिंह किंवा रज्जू भैया यांनी १९९८ मध्ये आउटलुक मासिकासाठी दिलेल्या मुलाखतीत गोडसेबद्दलच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर या शब्दात दिले: “गोडसे अविभाजित भारतापासून प्रेरित होते. त्याचे हेतू चांगले होते पण त्याने चांगल्या हेतूसाठी चुकीची पद्धत वापरली. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या मुस्लिमविरोधी दंगलीनंतर, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी एका जाहीर सभेत उघडपणे सांगितले की, “गोध्रा रेल्वे स्थानकावर दहशतवादाची विचारसरणी आली कारण या देशात गांधीजींची विचारसरणी प्रचलित आहे. २८ तारखेला आपण महात्मा गांधींना त्यांच्या घरात बंद केले... जोपर्यंत आपण गांधीजींची विचारसरणी, मुस्लिमांसमोर गुडघे टेकण्याची विचारसरणी, या पृथ्वीवर सोडून देत नाही तोपर्यंत दहशतवादाचा सामना केला जाणार नाही. माझ्या भावांनो, आपल्याला गांधींना सोडून जावे लागेल. पण गांधींना सोडून जाणे इतके सोपे नाही कारण त्यांच्या हत्येनंतर सात दशके झाली तरी गांधींची "ब्रँड व्हॅल्यू" अजूनही कायम आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना ती गाठण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागेल. आणि तेही बदललेल्या मार्गावर.







छोटा गंधर्व .....!

बालगंधर्व रंगमंदिर,..... संध्याकाळचा कार्यक्रम सुरू होता. संगीत नाटकाच्या परंपरांचा गौरव समारंभ असल्यानं धूप लावून रंगमंदिर सुवासित केलं होतं. सारे साहित्य संमेलनाध्यक्ष अन् नाट्य संमेलनाध्यक्ष हजर होते. पडदा उघडला. नांदी सुरू झाली... श्रोते त्यात मग्न असतानाच अचानक प्रेक्षकांमधून येत  आपल्या खड्या आवाजात नांदी गात छोटा गंधर्व हे रंगमंचावर आले. रंगमंचावरून नांदी गाणाऱ्या नव्या गायकांना काय होतंय हे समजतच नव्हतं, ते भेदरून गेले होते. रंगमंदिरात अंधार असल्यानं काय होतंय, कोण गातंय हे रंगमंचावर समजत नव्हतं. पण छोटा गंधर्वांनी चढ्या आवाजात सूर लावला होता. ते आपल्याच गानविश्वात मग्न होऊन गात होते. सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणं अशी अत्यंत बहारदार नांदी त्यांनी रंगमंचावर येऊन ऐकवली. उपस्थित नव्या पिढीतले गायक अभिनेते त्याचं ते गाणं पहिल्यांदाच अनुभवत होते. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सर्वांनी उभं राहून त्यांना त्यांच्या नांदीला, गायकीला अभिवादन केलं. तो क्षण विसरणं शक्यच नव्हतं. त्यांना त्यांच्या घरी भेटलो होतो. प्रभात रोडवर असलेल्या निमुळत्या गल्लीतलं त्यांचं घर, त्यांचं ते सलग सिगारेट ओढणं अन् वैभवशाली मराठी संगीत रंगभूमीबाबत गप्पांची मैफिल नेहमीचच झाली होती. काही वर्षांपूर्वी पुण्यात शांतीलाल सुरतवाला आणि सुनील महाजन यांच्या पुढाकारानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष यांचा एकत्रित सत्कार बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला होता. त्याच्या स्मरणिकेची जबाबदारी माझ्याकडे होती. त्याचं प्रकाशन व्यंकटेश माडगूळकर यांच्याहस्ते झालं होतं. त्याच्या प्रकाशन समारंभात ही सारं घडलं होतं.
१० मार्च १९१८ रोजी जन्मलेले छोटा गंधर्व हे मराठी संगीत रंगभूमीवरचे नामवंत गायक नट. ‘सौदागर’ ह्या नावानंही ते परिचित होते. त्यांचं संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावजवळच्या भाडळे गावी त्यांचा जन्म झाला. त्याचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नाही. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बालमोहन संगीत मंडळी’चे मालक दामूअण्णा जोशी हे एका गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली आणि त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी सौदागर आणि त्यांचा धाकटा भाऊ पितांबर यांना आपल्या बालमोहन संगीत मंडळीत आणलं. ‘बालमोहन संगीत मंडळी’नं रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा  ह्या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका वयाच्या १० व्या वर्षी मिळाली आणि तीही नायिकेची. पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग २२ जुलै १९२८ ला झाला. सौदागरांच्या सुरेल आवाजानं आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या गंधर्वतुल्य आवाजामुळे दामूअण्णांनी आपल्या संस्थेतर्फे होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत सौदागरांचा उल्लेख ‘छोटा गंधर्व’ असा करायला सुरुवात केली आणि नंतर हेच नाव त्याचं रूढ झालं. ‘बालमोहन’च्या अन्य काही नाटकांत कामं केल्यानंतर, ह्या संस्थेनं सादर केलेल्या संशयकल्लोळ ह्या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली. त्यांनी गायलेल्या अनेक पदांना प्रेक्षकांकडून पसंती मिळत असे. संगीतकलेत सौदागरांची अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून दामूअण्णांनी सौदागरांना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळेल, अशी व्यवस्था केली. पंडित बळवंत गोवित्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे इथले गायनशिक्षक गणेशबुवा पाध्ये ह्यांनी त्यांना आरंभीचं संगीत, गाणं शिकवलं. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम त्यांना मिळाली. कृष्णराव गोरे, अब्दुल करीमखाँ, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभला. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणं शिकले. अनेकांच्या गायकीचे अनुभव आणि संस्कार लाभल्यामुळं जिथं जे काही चांगलं गवसेल, ते घेऊन आपल्या स्वत:च्या गायकीचे सुंदर रसायन त्यांना घडविता आलं. नाटकाच्या व्यवसायाला १९३२-३३ च्या सुमारास वाईट दिवस आले होते. ‘बालमोहन संगीत मंडळी’लाही ह्या परिस्थितीची झळ लागली होती. तथापि आचार्य अत्र्यांसारखा प्रभावी नाटककार ह्या संस्थेच्या मागं उभा राहिल्यामुळं ही संस्था त्या आपत्तीतून बचावली. अत्र्यांचं पहिलं नाटक 'साष्टांग नमस्कार' बालमोहननं १९३३ साली रंगभूमीवर आणलं. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ह्या नाटकात सौदागरांनी नायिकेची म्हणजेच त्रिपुरीची भूमिका केली होती. त्यानंतरच्या घराबाहेर चा पहिला प्रयोग १९३४ मध्ये झाला. ह्या अत्रेकृत नाटकातल्या पद्मनाभच्या भूमिकेपासून त्यांनी स्त्रीभूमिका करणं सोडून देऊन नायकाच्या भूमिका करायला सुरुवात केली. साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर नंतर भ्रमाचा भोपळा, १९३६ मध्ये लग्नाची बेडी १९३६ मध्येच उद्याचा संसार, वंदे मातरम्, मी उभा आहे अशी नाटके ‘बालमोहन’नं रंगभूमीवर आणली. ह्यात संस्थेला आर्थिक लाभाबरोबरच जी कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळाली, ती मिळविण्यात सौदागरांचा वाटा फार मोठा होता. तथापि 'मी उभा आहे' ह्या नाटकानंतर अत्रे अन्य क्षेत्रांत मग्न झाल्यामुळं ‘बालमोहन’चा एक मोठा आधार तुटला. संस्था चालवणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागलं. त्यामुळं ‘बालमोहन’मधल्या काही प्रमुख नटांनी १९४३ मध्ये ‘कला-विकास’ ही नवी संस्था काढली. त्यांच्यांत सौदागरही होते. ह्या संस्थेतर्फे नाटककार नागेश जोशी ह्यांची फुलपाखरे, मैलाचा दगड, देवमाणूस, विजय ही नाटके सादर केली जाऊ लागली. त्यातल्या मुख्य भूमिकांची आणि संगीताची बाजूही सौदागर यांनी सांभाळली. ह्या संस्थेच्या नाटकांची पदंही देवमाणूस पासून सौदागर स्वत: लिहू लागले. ह्या नाटकातले ‘चांद माझा हा हसरा’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. ‘कला-विकास’ ही नाट्यसंस्था कालांतरानं बंद पडल्यानंतर ‘भारत नाट्यकला’ ह्या संस्थेच्या सौभद्र नाटकात कृष्ण, विद्याहरण मध्ये कच, मानापमान मध्ये धैर्यधर अशा भूमिका त्यांनी ह्या नाटकांतून नायकाच्या केल्या. त्यांची कृष्णाची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. १९५१ नंतर ठेकेदारांनी ठरवलेल्या नाट्यप्रयोगांतून ते मानधनावर कामे करू लागले. त्या काळात छोटा गंधर्व संगीत नाटकांकरिता सर्वांधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक गायक नट होते. विद्याधर गोखले ह्यांच्या सुवर्णतुला ह्या नाटकाचा पहिला प्रयोग १० ऑक्टोबर १९६० ला झाला. ह्या नाटकात त्यांनी काम केलं होतं. आणि त्यातल्या पदांना संगीतही त्यांनी दिलं होतं. सौभद्र, विद्याहरण, मानापमान, मृच्छकटिक आणि संशयकल्लोळ ह्या नाटकांतूनच त्यांनी पंचविसांहून अधिक वर्षे प्रमुख भूमिका केल्या. १९७८ मध्ये त्यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला.
सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणं ही त्यांच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या असामान्य गानकौशल्यामुळे ‘स्वरराज छोटा गंधर्व’ हे नामाभिधानही त्यांना लाभलं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी संजोग, गुणिकंस, नंदबसंत, कौशी बहार, बसंती, शंकरा यासारख्या नवीन रागांच्या संकल्पना केल्या. ‘गुनरंग’ या नावानं त्यांनी बंदिशी लिहिल्या. शृंगार, सृष्टीवर्णन, ईशस्तुती, अध्यात्म असे विविध विषय त्यांच्या चिजांमध्ये आढळतात. नाट्यसंगीतासाठी शास्त्रीय संगीताची बैठक आवश्यक असून संगीतातल्या सर्व प्रकारचं सौंदर्य नेमकेपणानं टिपता आलं पाहिजे. नाटकातल्या पदाचा आरंभ अन् त्याची अखेर आकर्षक असली पाहिजे. नाट्यसंगीतासाठी क्लिष्ट रागांची योजना करू नये. प्रेक्षकांच्या अंत:करणापर्यंत सहजपणे भिडतील अशा संगीतरचना कराव्यात, अशी त्यांची मतं होती. छोटा गंधर्व यांच्याबरोबर संशयकल्लोळमध्ये रेवतीची भूमिका करणाऱ्या इंदू तुळपुळे ह्यांच्याशी त्यांनी १९३७ साली विवाह केला. सुलभा सौदागर या त्यांच्या कन्या. मुंबईत १९८० साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता. छोटा गंधर्व यांचं पुण्यात ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झालं. 

Saturday, 28 June 2025

'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ'...!

"मुंबई अन् महाराष्ट्रातला 'ठाकरे ब्रँड' संपविण्याचा ईर्षेनं, जिद्दीनं भाजप, शिंदेसेना पेटलेत. त्यांच्यामागे दिल्लीतली महाशक्ती उभी आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झाल्यानंतर त्यासाठी चळवळ उभारणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं अस्तित्व तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसनं संपवलं. लढाऊ मराठी माणूस पुन्हा नागवला. पण बाळासाहेब ठाकरे उभे ठाकले. आधी साप्ताहिक मार्मिक आणि नंतर शिवसेना स्थापन झाली. अस्वस्थ मराठी माणूस त्यांच्यामागे उभा राहिला. त्यामुळं मराठी माणूस टिकला. मुंबईची सत्ता हाती राखली. आज मात्र त्या शिवसेनेची शकलं दिल्लीश्वरांनी केली. आता ठाकरे अन् त्यांच्यामागचा मराठी माणूस हुसकावून लावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झालाय. साठ वर्षापूर्वीची मराठी माणूस, महाराष्ट्र यांची तेव्हाची स्थिती, शिवसेनेची निर्मितीची कारणं अन्  ठाकरेंनी केलेली त्यासाठीची घोषणा 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ' याचा घेतलेला धांडोळा...!"
--------------------------------------------
*नु*कताच साजरा झालेला शिवसेनेचा ५९ वा स्थापना दिन, राज्यातल्या रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं शिवसेना, मराठी माणूस, त्याची मुंबईवरची मजबूत पकड, त्यासाठी उभा ठाकलेला 'ठाकरे ब्रँड', सोन्याचं अंडं देणाऱ्या मुंबईवर कब्जा मिळविण्याचा भाजपचा, दिल्लीश्वर महाशक्तीचा हरेक प्रयत्न, त्याविरोधात ठाकरे बंधू एकत्र येण्याची होत असलेली चर्चा, मराठीवर कुरघोडी करण्यासाठी पहिलीपासून हिंदी लादण्याचा होत असलेला प्रयत्न, त्याविरोधात व्यक्त होणारा सार्वत्रिक संताप, महाराष्ट्र, मराठीभाषा, शिवसेनाच नाहीतर एकूणच विरोधीपक्ष संपविण्याचा होत असलेला प्रयत्न यासारख्या घटनांनी गेले काही दिवस राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यानिमित्तानं शिवसेनेच्या निर्मितीचीही चर्चा होतेय. ह्या चर्चेचा अधिकाधिक भर तत्कालीन परिस्थिती बरोबरच बाळासाहेबांच्या 'खास ठाकरी' शैलीतल्या वक्तृत्वावर आणि शिवसैनिकांच्या राडा संस्कृतीवर होतेय. खरंतर शिवसेनाच्या निर्मितीसाठी आणि संघटना बांधण्यासाठी विचारांचीही भक्कम मांडणी त्यावेळी झालेली होती. १३ ऑगस्ट १९६० रोजी 'मार्मिक' व्यंगचित्र साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला; आणि 'मार्मिक'च्या माध्यमातून 'मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी झगडणाऱ्या' शिवसेनेची१९ जून १९६६ रोजी स्थापना झाली. 'मार्मिक' अन् 'शिवसेना' ही दोन्ही नावं 'प्रबोधन'कार केशव सीताराम ठाकरे यांनी ठेवली. नावांसारखीच ती पुढे गाजत राहिली. तथापि, प्रबोधनकारांनी केवळ 'नाव' ठेवण्यापुरतंच काम केलं नव्हतं, तर त्याची वैचारिक जडणघडण केली होती. शिवसेनाची स्थापना प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांच्या दादरच्या 'टू रूम किचन'च्या घरात झाली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत, ३० ऑक्टोबर १९६६ च्या संध्याकाळी दोन लाखांच्या लोकगर्दीत मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा ऐतिहासिक 'पहिला दसरा मेळावा' झाला. यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 'मार्मिक' मधली व्यंगचित्र, लेख-अग्रलेखांतून शिवसेना निर्मितीची भूमिका मांडली होती. तशीच मुंबई, ठाण्यासह इतरत्रही बाळासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभा, भाषणं, दौरे करून शिवसेनेची आवश्यकता किती आणि कशी आहे याचं महत्व महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवली होती. 
ह्याच काळात प्रबोधनकार ठाकरेंनी 'मार्मिक'च्या अंकात मराठी माणसांवर कसा अन्याय अत्याचार होतोय हे सांगणारे सलग १२ लेख लिहिले होते. यावेळी प्रबोधनकारांनी वयाची ऐंशी ओलांडली होती. तरीही त्यांच्या प्रत्येक शब्दांनी विशेषकरून त्यावेळच्या तरुणांच्या बुद्धीचा ठाव घेतला आणि कृतिशील विचाराचा, अन्यायाला भिडणारा अंगार  त्यांनी फुलवला. या बारा लेखांची शीर्षकंच पाहा... 'स्वाभिमानी लागवड', 'नंगेसे खुदाभी डरता है', 'गोळीला जनता पोळीला पुढारी', 'आम्हीच आमचे मित्र आणि शत्रू', 'महाराष्ट्र राज्याचे पाणी जोखले', 'मऱ्हाठों शैतान की औलाद है', 'महाराष्ट्राचा वाली कुणी नाही', 'मराठा तितुका मेळवावा', 'गलबला बुद्धी नासवतो', 'प्रतापे सांडली सीमा', 'झुणका भाकरीच्या आड येऊ नका' आणि 'मारिता मारिता मरावे!' ही त्यापैकी काही मथळे. 'स्वाभिमानाची लागवड' या पहिल्या लेखात प्रबोधनकारांनी कट्टर धर्म, जातीवादाची कठोर शब्दांत चिरफाड केलीय. हिंदू-मुस्लिमातल्या दंग्यांना 'जातीय दंगे' म्हणण्याची फॅशन कशी पडलीय, ते सांगताना प्रबोधनकार लिहितात, 'जातीय शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द म्हणजे कम्युनल; आणि जमात या शब्दालाही तोच प्रतिशब्द. इथं कास्ट अन्  कम्युनिटी या दोन शब्दांचा अकरमाश्या संबंध जोडून, वरचेवर लोकांच्या मनात गोंधळ उडवण्याचा खटाटोप नेहमी चालू असतो. हिंदू-मुसलमान दंग्याच्या बातम्या देताना, अमुकतमुक ठिकाणी दोन जमातीत दंगा झाला, असा मोघम उल्लेख करण्यात येत असतो. मुसलमानाचं नाव घ्यायला सरकार, त्यांच्या वृत्तसंस्था का बिचकतात आणि घाबरतात, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे...!' आजही ह्यात फरक झालेला नाही. त्याची वहिवाट ब्रिटिश सरकार काळापासून कशी अन् का चालू आहे, ह्याची माहिती प्रबोधनकार देतात. अशाचप्रकारे 'आम्ही जातपात, धर्म मानत नाही,' असं म्हणणाऱ्यांची 'शिखण्डी'त गणना करून प्रबोधनकार लिहितात, 'असे शिखण्डी हिंदुंतच फार सापडतात. आई, बाप, बायको मेल्यावर, हे पांढरी कॉलरवाले पांढरपेशे दाढीमिशा डोके भादरून, नासिकच्या रामकुंडावर मयताची राख-हाडे मोक्षाला पोचविण्यासाठी मुकाटतोंडी जाताना कुणी पाहिलेच नाहीत? वाणी-करणीचा व्यभिचार करणाऱ्या या करंट्यांना इतर जबरदस्तांची पायताणे चाटूनच जगण्याचा बांका वखत आला, तर त्यांची काय म्हणून कोणी कीव करावी? मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, बोहरी इत्यादी हिंदूंतेर जातीत असला कोडगेपणा तुम्हाला आढळणार नाही. स्वाभिमानशून्यांनाच आपली जात आणि धर्म ठणकावून सांगण्याची हिंमत होत नाही....!' 
हे प्रबोधनकारांनी धर्म आणि जातीवादाचं समर्थन करण्यासाठी लिहिलेलं नाही. तर सेक्युलॅरिझम हे कसं ढोंग आहे आणि 'सर्व भारतीय एक' हे कसं थोतांड आहे, ते प्रबोधनकारांनी कठोर शब्दांत दाखवून दिलंय. अशाचप्रकारे त्यांनी कम्युनिस्ट आणि सोशॅलिस्ट विचारांचा आणि काँग्रेसच्या सत्ताकेंद्री विचारांचा इतर लेखांतून समाचार घेतला आहे. अशा पक्ष-विचारांच्या दावणीला बांधलेल्या कार्यकर्त्यांच्या अतिरेकी निष्ठेबद्दल प्रबोधनकार लिहितात, 'गोळी-लाठीला जनता, आणि पोळीला नि हारतुऱ्याला पुढारी महाशय असले देखावे अनेक आंदोलनांत लोकांनी पाहिले आहेत. तरीही त्यांच्या भजनी लागलेल्या लोकांना हे संत-महंत कसल्या मसाल्याच्या मनोवृत्तीचे आहेत, याचा शोध आणि बोध घेण्याइतका विचाराचा मगदुरही उरलेला नाही. स्वाभिमानाला मुकलेल्यांची मने अशीच गुलाम नि परस्वाधीन बनतात....!' अशी इष्ट-निष्ठ कार्यकर्त्यांची दुर्दशा आजही केवळ सर्व पक्ष-संघटनांतच नाही; तर सद्‌गुरू-बुवा-महाराजांच्या दरबारींमध्येही दिसते. प्रबोधनकारांनी मुंबईतल्या परप्रांतीयांची घुसखोरी, त्यांची शिरजोरी, पूर्वी काँग्रेसी आणि आता भाजपेयी राज्यकर्त्यांची दिल्लीपुढची शिरजोरी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इतिहास, समाजकारण आणि राजकारणातले बारकावे त्यांनी नेमक्या शब्दांत सांगितलेत. महाराष्ट्राच्या, देशाच्या पुनरुत्थात पुण्याला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यापासून विशेष असं स्थान होतं. त्यात बदल कसा अन् कशामुळे घडून आला, ते प्रबोधनकार सांगतात, लोकमान्य टिळकांच्या अवसानानंतर उगवलेल्या महात्मा गांधी युगाने पुण्याच्या त्या माहात्म्याचे पेकाट मोडले. टिळक युगात त्यांच्या उपरण्याच्या दशा करून मिरवणारी सारी कलदार चलनी नाणी बद्द वाजू लागली. गांधी युगाच्या पहिल्या झपाट्याने त्यांच्या रेशमी पगड्या उडवल्या आणि खादीची थाबडी त्यांच्या मस्तकावर चढली. दिडाण्याच्या खादी टोप्यांनी पागोटी, पगड्या, फेटे पदच्युत केले. बाहेरचे वेषांतर बेमालूम झाले, तर अंतरंगातील राजकारण मतमतांतराच्या आकार-प्रकारांना कालोचित कलाटणी देण्याची समयोचित अक्कलच कोणाजवळ नसल्यामुळे, भले बुद्धी सागर-आगर म्हणून मिरवणारी बामण मंडळी बोलबोलता गांधी युगाच्या पचनी पडून समाजकरणातली आणि राजकारणातली बेकार चिपाड चोथा बनली. एकेकाळच्या या मूठभर चाणक्यांची महात्मा गांधींना फारशी किंमत वाटली नाही नि जरूरही भासली नाही....!' यामागे महात्मा गांधींचं दूरदृष्टीचं धोरण कसं होतं, ते सांगताना 'आम्हीच आमचे मित्र नि शत्रू' या लेखात प्रबोधनकार लिहितात, 'विराट संख्येचा महाराष्ट्रातला बामणेतरी बहुजन समाज माझ्यामागे आला, तर हां हां म्हणता मी इकडची दुनिया तिकडे करीन असे महात्मा गांधींनी जाहीरपणे बोलून दाखवले....!' त्यानुसार गांधीजींनी करून दाखवलं. इतकंच नव्हे तर लोकमान्य टिळकांनी हयातभर सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीला विरोध केला, त्यांच्या पश्चात त्यांच्या 'गायकवाड वाडा'मधून ब्राह्मणेतर चळवळ चालवण्याचा पराक्रम खुद्द टिळकांच्या मुलाने-श्रीधरपंताने केला. हे परिवर्तन प्रबोधनकारांनीच घडवून आणलं होतं, हे विशेष! 
महाराष्ट्रात समाज-राजकारणातल्या वहिवाटीच्या खाचाखोचा सांगितल्यावर मराठी, महाराष्ट्राभिमानी म्हणून संघटित निर्माण करण्याचं मार्गदर्शन करताना प्रबोधनकार लिहितात, 'मऱ्हाठ्यांना महाराष्ट्रातल्या अठरापगड स्थानिक जमातींनी एकजीव, एकजिव्ह एकवटूनच आपल्या जीवनाचे गुंते सोडवले पाहिजेत, महाराष्ट्रातला मऱ्हाठा म्हणून आपल्याला ताठ मानेने जगायचे आहे. छाती काढून निर्धोकपणे समाजात नि व्यवहारात वागायचे आहे. तेखदार मराठबाण्याने आपल्या वाजवी हक्कांसाठी जागच्या जागी थांबून लढे द्यायचे आहेत. जगायचे तर मर्दासारखे नि मरायचे तेही मर्दाच्या मरणाने, तर पहिल्या प्रथम वैयक्तिक, कौटुंबिक, जातीय, ग्रामीण यच्चयावत सर्व भेदांवर निखारे ठेवून अभेद एकवटणीचा श्रीगणेशा काढला पाहिजे....!' शिवसेनेच्या विचाराची बैठक पक्की करणारी प्रबोधनकारांची ही लेखमाला होती. पण या लेखमालेचं पुस्तक व्हायला, मात्र आणखी सात वर्ष उलटावी लागली. ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार झालेले नारायण आठवले यांनी आपल्या 'आराधना प्रकाशन'तर्फे या लेखांचा संग्रह 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...!' या नावानं प्रकाशित केला. तो १९ सप्टेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांच्या ८८ व्या वाढदिवशी. 'माझी जीवनगाथा' या प्रबोधनकारांच्या आत्मकथनासह प्रकाशित झाला. या लेखसंग्रहाच्या मुखपृष्ठावरचा वाघ हा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी चितारलेला आहे. इतिहासाचं दणकट संचित घेऊन भविष्याकडे झेप घेण्याच्या तयारीतला हा वाघ आहे. शिवसेनाप्रमुखांना तसाच शिवसैनिक हवा होता; आणि प्रबोधनकारांना तसा समस्त मराठी समाज हवा होता; एवढाच काय तो फरक ! आज तसाच मराठी माणूस उभा राहण्याची तीच अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठी भाषेबरोबरच मराठी अस्मिता, मराठी माणूस अडचणीत सापडलाय.
लेखणी, वाणी, विचार आणि कृती या चारहीतही प्रबोधनकारांच्या कडव्या मऱ्हाठी विचार-संस्कृतीचं तेज ठळकपणे दिसतं. 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...!' हा लेखसंग्रह त्याला अपवाद नाही. प्रबोधनकारांच्या विचार आणि लेखन सौष्ठवाचा हा खास नमुना आहे. राज ठाकरे यांनी १९ वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्माण करण्याचा विचार पक्का करण्यासाठी 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...'ची पारायणं केली होती, इतका ह्या पुस्तकातला विचार उपयुक्त आहे. तो सर्वांसाठी मुक्त आहे. हा लेखसंग्रह दुर्मिळ होता. शिवसेनेच्या निर्मिती काळात कोणते मुद्दे आणि अपेक्षा मांडल्या गेल्या, हे समजण्यासाठी 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...!' आवश्यक असताना, त्याची गेल्या ५० वर्षांत दुसरी आवृत्ती का निघाली नाही, हे एक कोडंच आहे. आता 'नवता बुक वर्ल्ड' तर्फे 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ'...! हे पुस्तक प्रकाशित झालंय. विचाराची उपयुक्तता आणि टिकाऊपणा लेखकाचा मोठेपणा दाखवत असतो. तो 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...'तल्या प्रत्येक  वाक्यात ते आहे. म्हणूनच 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...'तल्या विचारांना आणि मार्गदर्शनाला आजही मोल आहे. तथापि, 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ...' या हाकेनं निर्माण झालेली शिवसेना गेली काही वर्ष महाराष्ट्राचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यातली भाजपच्या साथीनं साडेचार वर्ष मनोहर जोशीचं सरकार, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अडीच वर्षे काँग्रेसच्या साथीनं सत्ताधारी पक्षही होता. शिवसेनेच्या गेल्या ५९ वर्षाच्या वाटचालीत भारतीय संसदेत पाच पन्नास खासदार झालेत; शिवसेनेचे काही केंद्रीय मंत्री झाले; मनोहर जोशी तर लोकसभेचे अध्यक्ष झाले; तरीही मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरात परप्रांतीयांचे लोंढे, हे अवघड जागीचं दुखणं आज दिवसागणिक वाढतंय; मराठी टक्क्याची घसरण सुरूच राहावी, मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढाई चालूच राहावी आणि दिल्ली दरबारात सह्याद्रीचे वारे घुमण्यापुरतं दिसावं, हे वर्तमान अभिमानास्पद नाही? हे असं का व्हावं? 'लोकसभेत किंवा राज्यसभेत खासदारकीची आणि विधिमंडळात आमदारकीची ऊबदार धाबळ फर्स्टक्लास जंटलमन म्हणून पांघरायला मिळते. मगजबाज जित्या माणसाला याहून अधिक ते काय हवं असतं हो...!' हे प्रबोधनकारांचं म्हणणं खरं ठरलं म्हणायचं. असो. या लेखसंग्रहातल्या मराठी-महाराष्ट्राच्या दुखण्याचा तपशील-संदर्भ वेगळे असले, तरी वर्तमानाच्या दुरुस्तीसाठी प्रबोधनकारांचाच मुद्याचा गुद्दा प्रभावी ठरणारा आहे. त्याचं वाचन प्रत्येक मराठी माणसांनी करून, आज-उद्याच्या या समस्यांना भिडलं पाहिजे. साठ वर्षापूर्वीची राज्यातली राजकीय स्थिती, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस पुन्हा एकदा अडचणीत आलाय. त्याच्या अस्तित्वाचा झगडा उभा राहिलाय. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईसाठी मराठी माणसांनी रक्त सांडलंय, हे विसरलं जातंय. आज तीच 'मराठी मुंबई' परप्रांतीय त्यातही विशेषतः गुजरातींना हस्तगत करायचीय. मराठी माणसांना इथून हुसकावून लावायचंय. सत्ताभ्रष्ट करून त्यावर कब्जा मिळवायचाय. त्यासाठी दिल्लीश्वरांनी हालचाली आरंभल्यात. महाराष्ट्रातला कृतघ्न भाजप आणि सत्तालोभी शिंदेसेना साम, दाम, दंड, भेद अशी सारी हत्यारे परजत महाराष्ट्र अन् मुंबई दिल्लीश्वराच्या हाती सोपविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याविरोधात मुंबई वाचविण्यासाठी, मराठी स्वाभिमान शाबूत राखण्यासाठी पुन्हा एकदा मराठी माणसांकडून तीच अन् तशीच डरकाळी उठायला हवीय, 'ऊठ मऱ्हाठ्या ऊठ'....! 
हरीश केंची
९४२२३१०६०९



Thursday, 26 June 2025

दलितांचा मसिहा.... कांशीराम

कांशीराम हे नाव घेतलं की डोळ्यासमोर सर्वांत आधी येतो तो उत्तर प्रदेश. पण अनेकांना हे बहुधा माहिती नसेल की, ज्या कांशीरामांनी उत्तर प्रदेशात बहुजनांच्या राजकारणाचा पाया रचला ते कांशीराम मूळचे पंजाबचे होते. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांशीराम यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रातून केली होती. तरीही महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ कांशीरामांपासून अंतर राखून का आहे? स्वतःचं मूळ राज्य पंजाब सोडून कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात निवडणुकीचं राजकारण का केलं? पंजाबमध्ये त्यांचं राजकारण का फळलं नाही? पंजाबमध्ये त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या खूपआधी बिंद्रनवालेंना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला होता का?
--------------------------------------------
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कांशीराम यांचं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन एकच होतं, पण मार्ग मात्र वेगळे होते, घटना पुण्यातली आहे. १९५७ मध्ये कांशीराम पुण्यातल्या संरक्षण विभागाच्या आयुधं निर्मिती करणाऱ्या कारखान्यात रिसर्च असिंस्टंट म्हणून कामाला लागले. तिथं पाच वर्षं काम केल्यानंतर घडलेल्या घटनेनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. कारखान्यात आधी बुद्ध जयंती आणि आंबेडकर जयंतीला सुट्टी मिळायची. पण प्रशासनाकडून त्यात बदल करण्यात आला. या सुट्ट्या कायम राहाव्यात यासाठी त्यांनी युनियनला हाताशी धरून लढा उभारला. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि या सुट्ट्या पुन्हा लागू केल्या. याच काळात पुण्यात कांशीराम यांचा संबंध महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याशी आला.
देशातली सत्ता ही फक्त १५ टक्के असलेल्या तथाकथित उच्चजातीच्या हाती एकवटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे चित्र बदलायचं असेल तर ८५ टक्के लोकांची एकजूट आवश्यक आहे, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आलं. झालं, मग कांशीराम यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली.
१९७८ मध्ये त्यांनी बामसेफची स्थापना केली, तर १९८२ मध्ये त्यांनी डीएस-4 दलित शोषित संघर्ष समिती ची स्थापना केली. पुण्यात कामाला असलेल्या कांशीराम यांनी महाराष्ट्रातूनच राजकीय संघर्ष सुरू केला. महाराष्ट्रात आधीपासून असलेली आंबेडकरी चळवळ त्यांच्यासाठी पूरक ठरली. त्याकाळी जॉर्ज फर्नांडिसांसारखे युनियन लीडर महाराष्ट्रात येऊन राजकारण करत असताना कांशीराम यांनी मात्र तसं केलं नाही. असं काय घडलं की कांशीराम यांनी महाराष्ट्रात निवडणुकीचं राजकारण केलं नाही. याचं कारण असं होतं की, ते जातीने चांभार होते. महाराष्ट्रातला आंबेडकरी विचारांचा सर्वांत मोठा वर्ग होता बौद्ध लोकांचा, म्हणजे पूर्वाश्रमीचे महार. हा समाज इतर कुणाचं नेतृत्व स्वीकारत नाही. त्यामुळे कांशीराम याचं नेतृत्व इथं सर्वमान्य होण्याची शक्यता नव्हती. त्यातच १९७६ च्या औरंगाबाद विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांनी घेतलेल्या भूमिकेनं त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय परिघापासून दूर केलं.मराठवाडा विद्यापीठ नामंतराच्या आंदोलनात कांशीराम यांनी विरोधी भूमिका घेतली. हे आंदोलन म्हणजे ब्राह्मण वर्गाची चाल आहे, अशी त्यांनी भूमिका घेतली. जी लोकांना अजिबात पटली नाही. नामांतर आंदोलनावेळी दलित समाजावर झालेले अन्याय आणि अत्याचार पाहाता ती चळवळ अधिक तीव्र करावी असं आम्हाला वाटत होतं. पण कांशीराम यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे हळूहळू कांशीराम महाराष्ट्रातल्या लोकांच्या नजरेतून उतरत गेले.
हे सगळं घडत असताना पंजाब आणि उत्तर प्रदेशात मात्र त्यांनी त्याच्या राजकारणाचा जम बसवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आता बहुजनांच्या हाती सत्ता हवी तर डीएस-4 आणि बामसेफ पुरेसं नव्हतं हे कांशीराम यांच्या लक्षात आलं होतं. परिणामी त्यांनी राजकारण करण्यासाठी १४ एप्रिल १९९४ मध्ये स्वत:ची बहुजन समाज पार्टी काढली. 'जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी हिस्सेदारी.' आणि 'जो बहुजन की बात करेगा, वो दिल्ली पर राज करेगा,' असे नारे कांशीराम यांनी दिले. आता पक्ष काढला तर निवडणुका लढवणं आलंच. १९८४ मध्ये पक्षाची स्थापना झाली आणि त्याचवर्षी लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली. बसपाने ९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक लढवली. या निवडणुकीत पक्षाला १० लाख मतं मिळाली. त्यातली ६ लाख मतं एकट्या उत्तर प्रदेशातून मिळाली होती. राम मंदिर आंदोलनाच्या आधीच्या आणि मंडल आयोगाच्या काळात हे सगळं घडत होतं. हीच खरी संधी आहे हे कांशीराम यांनी हेरलं आणि उत्तर प्रदेशात काम सुरू केलं.
उत्तर प्रदेशातल्या प्रोफेसर बद्रीनारायण यांनी कांशीराम यांचं चरित्र लिहिलं आहे.  त्यात त्यांनी लिहिलंय की, "उत्तरप्रदेश का निवडलं याचं उत्तर स्वतः कांशीराम देत असत. ते सांगत हे महाराष्ट्रातलं रोपटं आम्ही उत्तर प्रदेशातल्या मातीत रुजवलं आहे. उत्तरप्रदेशात दलितांचं दमन पंजाबपेक्षा जास्त आहे. एक दलित असून पंजाबमध्ये मी एवढे दलित अत्याचार कधी पाहिले नव्हते जेवढे मला यूपीत दिसतात, असं ते सांगत. शिवाय मंदिर आंदोलनाच्या आधीचा हा काळ होता. तेव्हा त्यांना त्यांचं राजकारण प्रस्थापित करण्यासाठी संधी मिळाली. त्यासाठी त्यांनी रामायण आणि महाभारताच्या कथांचा प्रतिवाद तयार केला. या कथांमध्ये अत्याचार झालेल्या व्यक्तींमध्ये त्यांनी दलितांची प्रतीकं आणि आदर्श शोधले. कारण त्यांना हे माहिती होतं की यूपीत राजकारण करण्यासाठी हे सर्व फार महत्त्वाचं आहे. या भागाला लोक आर्यवर्त म्हणतात. पण मी याभागाला चांभारवर्त करेल असं ते कायम म्हणायचे. आणि त्यांनी ते केलं सुद्धा...!" मायावतींसारख्या दलित महिलेला त्यांनी ४ वेळा मुख्यमंत्री केलं. तेही त्या राज्यात तिथं कमलापती त्रिपाठींसारख्या मुख्यमंत्र्यांची परंपरा होती. खरंतर कांशीराम आणि आंबेडकर यांचं मिशन एकच होतं. पण दोघांचे मार्ग मात्र वेगवेगळे होते. आंबेडकरांनी बहुजनांना राज्यकर्ती जमात व्हा असं सांगितलं होतं. तर कांशीराम यांना मात्र बहुजनांनी सत्ताधारी जमात व्हावं असं वाटत होतं. कांशीराम कायम सांगत की, आंबेडकरांनी पुस्तकं एकत्र केली मी लोकांना एकत्र केलं. आंबेडकर चिंतन करत लेखन करत त्यांनी खूप लिखाण केलं आहे. पण कांशीराम यांनी मात्र फक्त 'द चमचा एज' (The Chamcha Age) हे एकच पुस्तक लिहिलं. पण त्यांनी चळवळ उभी केली, समाजाला एकत्र आणलं. निवडणुकीचं राजकारण केलं. त्यात यश मिळवलं पण आंबेडकरांना मात्र ते फारसं मिळालं नाही...!असं बद्रीनारायण यांनी लिहिलंय. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ मध्ये पंजाबात झाला होता. तर त्यांचं निधन ९ ऑक्टोबर २००६ मध्ये दिल्लीत झालं.
कांशीराम यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचे बहीण-भाऊ आज देखील पंजाबमध्येच राहतात. कांशीराम यांचे २००६ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांवरुन वाद झाला होता. कांशीराम आजारी असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांना आपल्यासोबत ठेवू इच्छित होते. मात्र न्यायालयाने त्यांनी केलेली याचिका फेटाळून लावत मायावती यांच्या देखरेखीखाली कांशीराम यांना ठेवण्यास मंजूरी दिली. त्यांचे खरे बहीण-भाऊ आता कुठे आहेत?, काय करत आहेत?, त्यांनी राजकारणात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला का? यावर आपण नजर टाकणार आहोत. खूप वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत राहणं सोडलं होते. शेवटच्या दिवसांमध्ये ते खूप आजारी होते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आपल्याकडे पाठवण्यासाठी न्यायालाकडे मदत मागितली होती. त्यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचे बहीण-भाऊ आज देखील पंजाबमध्येच राहतात. कांशीराम यांचे २००६ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांवरुन वाद झाला होता. कांशीराम आजारी असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांना आपल्यासोबत ठेवू इच्छित होते. मात्र न्यायालयाने त्यांनी केलेली याचिका फेटाळून लावत मायावती यांच्या देखरेखीखाली कांशीराम यांना ठेवण्यास मंजूरी दिली. कांशीराम यांच्या कुटुंबातील काही सदस्य आतासुद्धा पंजाबमधील आनंदपूर साहिब जिल्ह्यातील पृथ्वीपूर गावामध्ये राहतात. त्यांच्या एका भावाने मागच्या निवडणुकीत आपले समर्थन काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांना दिले होते. पण कांशीराम याचे छोटेभाऊ हरबंससिंग त्याविरोधात उभे राहिले. त्यांनी निर्णय घेतला होता की, 'ते राजकारणी लोकांच्या हातातील निवडणूकीत कळसूत्री बाहुली होणार नाहीत.'
कांशीराम यांची बहीण स्वर्णकौर पृथ्वीपूर गावामध्येच राहतात. त्यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, 'मी एका पक्षाच्या रुपाने बसपाला समर्थन देते. कारण त्यांनी माझ्या मोठ्या भावाला राजकारणात उच्चपद मिळवून दिलं. पण आता मी कोणत्याही इतर पक्षाचे समर्थन करत नाही. कारण जी लोकं बसपामध्ये आहेत त्यांना फक्त माझ्या भावाच्या नावानं मतं मिळवायची आहेत. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वर्ण कौर यांना संपर्क करत आपच्या तिकीटावर निवडणूक लढवा असं सांगितल होते पण स्वर्ण कौर यांनी नकार दिला. आनंदपूर साहिबमध्ये दलितांची मोठी लोकसंख्या आहे. त्यांच्यावर कांशीराम यांच्या कुटुंबीयांचा प्रभाव देखील आहे. त्यामुळे निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष कांशीराम यांच्या कुटुंबियांना आपल्या सोबत ठेवू इच्छितात. २०१४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कांशीराम यांचे छोटे भाऊ दरबारा सिंग यांनी अकाली दलाचे उमेदवार प्रेम सिंग चंदूमाजरा यांना पूर्ण समर्थन दिले होते आणि ते निवडणूक जिंकले होते. पण २०१९ मध्ये दरबार यांचे समर्थन काँग्रेसकडे गेले. कांशीराम यांचे छोटे भाऊ दरबारा सिंग यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलं होतं की, 'आमचं नातं मायावती यांच्याशी चांगलं नाही. आम्ही तोपर्यंत बसपाला समर्थन करणार नाही जोपर्यंत त्या स्वत:हून आमच्याकडे मदत मागत नाहीत.' कांशीराम यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे मायावती यांच्यासोबत नातं खूपच कडू झालं. दरबारा सिंग यांनी २००८ मध्ये आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली. या पक्षाचे नाव बहुजन संघर्ष पार्टी असे ठेवण्यात आले होते. या पक्षाने उत्तर प्रदेशमध्येही उमेदवार उभे केले होते. पण हे सर्व लवकरच संपुष्टात आलं.
‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागेदारी’ ही घोषणा कांशीराम यांची. त्यांनी उत्तर प्रदेशसह देशभरातल्या राजकारणात दलितांना सत्तास्थानी पोहचवलं. या प्रवासात त्यांच्या समोर अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले. त्यापैकी एक किस्सा जो आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल. भाजप आणि बसप या परस्परविरोधी टोकाची विचारधारा असणारे पक्ष. भारतीय जनता पार्टीचे बडे नेते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बहूजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती. हा प्रस्ताव नाकारत ते म्हणाले होते की, “मला राष्ट्रपती नाही पंतप्रधान पद हवं आहे....” हा किस्सा बऱ्याचदा चर्चला गेला आहे. पण वाजपेयींना कांशीराम राष्ट्रपती म्हणून का हवे होते? याचा सवाल कुणी विचारत नाही. राजकारणात विरोधकाला प्रसन्न करणं हा त्याला कमजोर करण्याचा प्रयत्न असतो. वाजपेयी राजकारणाचा हा नियम शिताफिन वापरत असतील ही. परंतू जाणकारांच्या मते कांशीराम यांना पुर्णपणे समजण्यात वाजपेयींनी चुक केल होती. त्यांना कांशीरामांबद्दल पुर्ण परिकल्पना असती तर त्यांनी कधीच हा प्रस्ताव कांशीराम यांच्यासमोर ठेवला नसता वाजपेयींचा प्रस्ताव नाकारणाऱ्या कांशीराम यांची ही कृती त्यांच्या आयुष्याचे ध्येय अधोरेखित करते. वर्षानूवर्षे गुलामी करणाऱ्या दलित समुदायाला सत्तास्थानी पोहचवणं त्यांच ध्येय होतं. दलितांना ‘फर्स्ट अमंग्स द इक्वल्स’ बनवनं. मायवतींच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट करुन दाखवली. त्यांच्यावर नेहमी आरोप करण्यात आले की कोणत्याच आघाडीशी ते प्रामाणिक राहीले नाहीत. त्यांनी कॉंग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टीसोबत आघाडी केली. स्वतःच्या ध्येय धोरणां पायी त्यांनी या आघाड्या घडवून आणल्या. याबद्दल टिकाकारांनी नेहमी त्यांच्यावर टीका केली. कांशीराम यांनी या आरोपांवर एका मुलाखतीत उत्तर देताना म्हणलं होतं, “मी त्यांना राजकीय पक्षांना खुश करण्यासाठी राजकारण करत नाहीये.’ राजकीय आणि सामाजिक संघर्षावेळी कांशीराम यांनी ब्राम्हणवादाशी संबंधीत प्रत्येक गोष्टीचा विरोध केला. मग ते महात्मा गांधी असतो की राजकीय पार्टी की माध्यमं की दलित नेते त्यांना कांशीराम ‘चमचा’ म्हणायचे. दलितांच्या स्वातंत्रता संघर्षाला किनार देऊन पहिल्यापासूनच भाजप आणि कॉंग्रेसचे मंडलीक झालेले नेते चमचे आहेत असे ते वारंवार सांगायचे. कांशीराम मानायचे की जेव्हा जेव्हा दलित संघर्ष मनुवादाला अभुतपुर्ण आव्हान द्यायचा तेव्हा ब्राम्हण वर्चस्व असणारे राजकीय पक्ष, ज्यात कॉंग्रेसही सामील आहे, त्यांनी दलित नेत्यांना हाताशी धरुन आंदोलन कमजोर करण्यात धन्यता मानली. जेव्हा ही कोणती लढाई, संघर्ष, योद्धांकडून या पक्षांना धोका नसतो तेव्हा त्यांना चमच्यांची गरज भासत नाही. परंतू नंतर जेव्हा दलित वर्गाला खऱ्या सशक्त आणि प्रबळ नेतृत्त्व लाभत तेव्हा या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये चमच्यांची चलती असते.
१९५८ साली कांशीराम यांनी पुण्यातून पदवीचं शिक्षण घेत ‘डीआरडीओ’मधून सहाय्यक वैज्ञानिकाच काम केलं. या दरम्यान आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टीच्या मुद्द्यावरुन झालेल्या संघर्षामुळं त्यांचं मन परिवर्तन झालं. पुढं संपूर्ण आयुष्य दलितांना राजकीय आणि सामाजिक स्थान देण्यासाठी त्यांनी खर्ची घातलं. त्यांचे सहयोगी डी.के. खरपडे यांच्यासोबत मिळून सरकारी नोकरीला लागलेल्या दलितांची मजबूत संघटना बांधली नाव दिलं ‘बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लोयीज फेडरेशन’ म्हणजेच बामसेफ. पुढं चालून सातत्याच्या संघर्षातून त्यांनी मायावतींना उत्तर प्रदेशच्या खुर्चीवर मुख्यमंत्री म्हणून बसवलं. या प्रवासात लाखो लोकांना त्यांनी एकत्रित केलं. शेकडो किलोमीटर त्यांनी सायकलवरुन प्रवास केला. त्यांच्या आयुष्यात असे ही संघर्ष आले की त्यांनी फाटके कपडे घालून दलितांचं नेतृत्त्व केलं परंतू माघार घेतली नाही. निळ्या किंवा पांढऱ्या शर्टा शिवाय इतर रंगाचे कापड त्यांनी संपूर्ण आयुष्यात क्वचितच परिधान केलं असेल. ९० च्या दशकात कांशीराम यांची अवस्था बिघडायला लागली. त्यांना मधूमेह आणि रक्तदाबासारख्या समस्या होऊ लागल्या. १९९४ ला त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला. २००३ ला ब्रेन स्ट्रोक आणि २००६ साली हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. भारतातल्या दलित राजकारणाला त्यांनी सत्तेपर्यंत पोहवण्याच काम केलं. भारतीय राजकारणात कांशीराम यांचं मोठंपण त्यांनी बहुजन समाजात निर्माण केलेल्या राजकीय जागृतीमुळं आहे. त्यासाठीच्या त्यांच्या स्वतःच्या कमालीच्या मिशनरी वृत्तीत आहे. कांशीराम यांना राजकारण काही स्वतःच्या "पिढीजात वारश्यातून" मिळालेलं नव्हतं. ते त्यांनी स्वतःची मेहनत, जनसंपर्क, भारतभर प्रवास, कार्यकर्त्यांच्या क्षमता ओळखून त्याचा चळवळीसाठी उपयोग करून त्यांच्याशी असणारा सततचा जैविक असा सकारात्मक संवाद यातून मिळवलं होतं. जैविक अशा कार्यकर्त्यांचं त्यांनी प्रयत्नपूर्वकरित्या बांधलेलं प्रचंड नेटवर्क यातून उभं केलं होतं.! हे सगळं करताना त्यांनी लॅडर्स-शिड्या निर्माण केल्या नाही तर हेतुपूर्वक उद्याची चळवळ चालवतील असे लीडर्स घडवले. मायावती, दाऊराम रत्नाकर, फुलसिंह बैरय्या, डॉ. सुरेश माने, सिद्धार्थ पाटील यासारखे अनेक लीडर्स घडवले. नंतरच्या काळात मायावतींनी या सर्व लीडर्सना ओव्हरकम करत बाकीचे लीडर्सना प्रयत्नपूर्वक संपवलं आणि सगळं काही स्वतःच्या कब्जात घेतलं, हा भाग वेगळा.! कांशीराम यांनी राजकारणाला कुठलाच भपकेबाजपणा कधीही येऊ दिला नाही. अगदी त्यांनी कधीही इतर राजकारण्यांसारखा कुर्ता, पायजमा, जॅकेट असला भपकेबाज पेहरावही कधी केला नाही. कायम साधा हाफ शर्ट आणि पॅन्ट! अगदी पायातील चप्पलसुद्धा साध्या रबर टायरची असायची! त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता आणि हा साधेपणा कधीच दिखाऊ नव्हता आणि त्या साधेपणाचा त्यांना कधी "नैतिक अहंकार" ही नव्हता. त्यामुळेच त्यांना कधीच कोणाबद्धल "तुच्छता" वाटली नाही. आपलं राजकारण कोणताही आणि कोणाबद्धल ही तुच्छता न दाखवता ही यशस्वीपणे करता येतं हेच सिद्ध करून दाखवलं होतं!
लोकांच्या राजकीय इच्छा, आकांक्षेपासून जसे ते दूर राहिले नाहीत. तसेच लोकांच्या व्यक्तिगत सुखदुःखापासूनही कधी वेगळे झाले नाहीत. आपलं राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन यामध्ये त्यांनी कधी अंतर केलं नाही. "समाज म्हणून समाजाची ज्या भावभावना, आशा, अपेक्षा असतील, त्याच नेता म्हणून माझ्याही असतील! असच ते कायम जगले! त्यांनी कधीही आपल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांपासून ही अंतर ठेवले नाही. कसलाच आणि कोणाबद्धलही तुच्छतावाद कधीही या माणसाच्या मनाला शिवला नाही. ते अगदी सहज त्यांच्यासोबत उठबस करीत असत. जेवण्यापासून झोपण्यापर्यंत बरोबरीचं वर्तन करीत असत! याबाबतच्या अनेक आठवणी त्यांच्या सोबत काम केलेली अगदी साधीसुधी माणसं सांगतात. गंगाखेडमध्ये "रायभोळे" नावाचे एक पेंटर आहेत. ते ९० च्या दशकात बसपासाठी वॉलपेंटिंगचे काम करत असत. बसपाच्या कुठल्या तरी दिल्लीत होणाऱ्या रॅलीसाठी त्यांना दिल्लीत वॉलपेंटिंग करण्यासाठी नेलं होतं. रात्रीच्यावेळी ते आणि त्यांचा एक सहकारी दिल्लीत काही भिंती रंगवत होते. तेंव्हा त्यांना असा एक स्पॉट दिसला की, तिथं पेंटिंग केलं तर खूप लोकांना दिसणार होतं. पण त्या उंचशा स्पॉटला नीटपणे पेंटींग करता येईल असा हात पुरेनासा झाला. ते एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून ते पेंटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्यांच्या उंचीमुळे त्यांना ते नीटपणे करता येत नव्हतं. तेवढ्यात त्या ठिकाणी एक कार येऊन थांबली आणि त्या कारमधून सहा, साडेसहा फुटाचा भला मोठा माणूस हे उतरून आमची धडपड पाहू लागला आणि शेवटी जवळ येऊन मला म्हणाला, "मेरे खंदे पै चढ। तेरा काम हो जायेगा...!" आणि पुढचा अर्धा तास मी त्यांच्या खांद्यावर उभा राहून पेंटिंग पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी सगळ्या देशभरातून आलेल्या पेंटिंग स्कॉडची मिटिंग होती आणि त्या मिटींगला कांशीराम उपस्थित राहिले तेंव्हा माझ्या लक्षात आलं की, रात्री ज्या माणसाच्या खांद्यावर उभे राहून आपण पेंटिंग केलं ते खुद्द कांशीरामच होते!
कांशीरामजी यांना विनम्र अभिवादन ..!!

Friday, 20 June 2025

मुंबईवर कब्जा आणि भाऊबंदकी...!

"राज ठाकरे-फडणवीस भेटीनं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. उद्धव यांच्याशी युती होणार असं वातावरण निर्माण झाल्यानं मराठी माणसांमध्ये, कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. पण अचानक सारे संदर्भ बदलले. सर्व्हेतून ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना ५१.९ टक्के मतं मिळतील, भाजपला ३२ तर शिंदेसेनेला ६ टक्के मतं पडतील असं समोर आलं. राज्यातल्या, दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही हा जबर धक्का होता. अद्यापि मुंबईत 'ठाकरेब्रँड' शिल्लक असल्याचं समोर आल्यानं राजभेटीचा घाट घातला गेला. आर्थिक राजधानी मुंबईवर कब्जा, उध्दवसेनेला संपवणं, शिंदेंना त्यांची जागा दाखवणं, लाडक्या अदानीला पायघड्या घालणं, दिल्लीश्वरांच्या चरणी मुंबईला समर्पित करणं यासाठीच भाजपने राज ठाकरे यांचं बुजगावणं उभं केलंय. यासाठी भाजप आता काहीही करायला सिद्ध झालीय!"
--------------------------------------------------
मुंबईत अमित शहा यांची भेट नाकारून उद्धव ठाकरे यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानकपणे आपल्या धरसोड स्वभावाला जागून भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करणार असं एका मुलाखतीत सांगून आश्चर्याचा धक्का दिला. आपण १९ वर्षातले वादविवाद, वैर, विरोध, मतभेद टाळून सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगून मराठी मतदारांमध्ये सहानुभूती मिळवली. शिवाय राजकीय सौदेबाजीत आपलं महत्व वाढवलं. हे दोघे भाऊ एकत्र आले तर मात्र राजकीय वेगळा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली. एकही लोकप्रतिनिधी नसताना निवडणुकीच्या राजकारणात आपलं घोडं दामटण्याचं कौशल्य राज ठाकरे यांनी दाखवलं. सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं जाहीर करताच राज पुन्हा एकदा भाजपच्या दिशेनं लवंडलेत. त्यांनी विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरवरही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळं राज ठाकरे आता भाजपच्या विरोधात जाणार असं चित्र निर्माण झालं होतं. पण तो विरोध क्षणभंगुर ठरला. आपल्या त्या वागण्यानं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'भाजप नेत्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना भेटू नये...!' अशी इच्छा प्रदर्शित केली होती. तीला ठोकरून उद्धव यांच्या त्या मतांशी आपण सहमत नाही हे दाखवून दिलंय. पर्यायानं युतीसाठी पुढे केलेला हात त्यांनी मागे घेतल्याचं दिसलं. खरंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. उद्धवसेना आणि मनसे कार्यकर्ते एकत्र यायला सुरुवात झाली होती. मुंबई, ठाणे आणि इतर परिसरातल्या मराठी मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत होतं. प्रसिद्धीमाध्यमातून याच युतीवर चर्चा सुरू झाल्या होत्या. काहींनी त्यासाठी सर्व्हे करायला सुरुवात केली होती. त्यातून जे काही समोर आलं त्यानं सत्ताधाऱ्यांना धक्का बसला. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर ५१.९ टक्के मतं या दोघांना पडतील भाजपला ३२ तर शिंदेसेनेला ६ टक्के मतं पडतील असं समोर आलं. राज्यातल्या आणि दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही हा जबर धक्का होता. मुंबईमध्ये 'ठाकरे ब्रँड' अद्याप चालतो हे लक्षात आल्यानं एक ठाकरे आपल्याकडे हवेतच, असा संदेश दिल्लीश्वरकडून आला. प्रारंभी टिंगल टवाळी करणारे फडणवीस मग राज यांना जवळ घेण्यासाठी प्रयत्नशील बनले. राजभेटीने अस्वस्थता निर्माण झाली ती शिंदे यांच्या गटात. शिंदेसेनेची मुंबई आणि सभोवतालच्या इतर महापालिका जिंकण्यात कोणतीच मदत होणार नाही हे वास्तव भाजपला जाणवलं. मुंबई आपल्याकडे येणार असं वातावरण भाजपमध्ये निर्माण झालं होतं. जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आपला स्वप्नभंग होईल अशी स्थिती निर्माण झाल्यानं राजभेट झालीय. भाजपसोबत उद्धव ठाकरे येणं शक्यच नाही, त्यासाठी मग राज यांना हाताशी धरायला हवं ते सोबत आल्यास यश सहजसाध्य होईल. या उद्देशाने अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात राज ठाकरे यांच्या भेटीचा घाट घातला गेला. त्याला राज यांनी नकार दिल्यानं संभ्रम निर्माण झाला. अखेर शिंदे नाराज झाले तरी चालेल पण राज सोबत आल्यास दिल्लीकर खुश होतील अन् मुंबई महापालिका हाती येऊ शकेल. याचसाठी फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालीय.
राज ठाकरे यांनी मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता यासाठी वैयक्तिक मतभेद दूर सारून एकत्र येण्यास मी तयार आहे. असं मत महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्यानं ठाकरेबंधु एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी 'महाराष्ट्र, मराठी द्रोही भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी होत असलेल्या भेटी राज यांनी टाळल्या तर एकत्र येण्यात कोणतीही अडचण येणार नाही...!' असं मतप्रदर्शन केलं. त्यावर राज यांनी तेव्हा काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं शिवसेनेत आनंदाचं वातावरण निर्माण झालं. उद्धव यांनी तर महाराष्ट्रातल्या मनातली बातमी देईन....! असं सांगितल्यानं शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांनी त्याला पूरक असे फलक लावायला सुरुवात केली. राज-उद्धव आणि आदित्य-अमित यांचे एकत्रित फोटो झळकायला लागले होते. पण राज यांच्या फडणवीस भेटीनं त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मनसे आणि राज ठाकरे यांच्या दृष्टीनं विचार करता त्यांना भाजपसोबत जाणं ही एक सुवर्णसंधी दिसतेय. शिवसेनेचेच अनुकरण करणाऱ्या मनसेनं ज्याप्रकारे शिवसेनेने तीस वर्षांपूर्वी भाजपशी युती केली होती तशी युती करण्याचा मानस कदाचित राज यांचा असावा. राज यांनी जर भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला तर राजकीय पक्ष म्हणून मनसेला तो निर्णय फायदेशीर ठरेल. उद्धवसेनेने जरी राज यांना प्रतिसाद दिला असला तरी ते प्रत्यक्षात ते येणं आजतरी अवघड दिसतंय. 'मराठी माणसांच्या भल्यासाठी...!' असं म्हणत राज ठाकरे लवकरच भाजपसोबत युती करू शकतात. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीने नवीन अटकळांना उधाण आलंय. या भेटीनंतर राज्यात नवी समीकरणे तयार होताहेत. कार्यकर्त्यांमध्ये राज अन् उद्धव यांच्यात युतीची चर्चा होती, तर आता राज अन् फडणवीस यांच्या भेटीने राजकीय दिशा बदललीय. त्यामुळं पुन्हा शिवसैनिकांमध्ये आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. आधी राज-उद्धव, नंतर राज- शिंदे यांच्याशी युतीची चर्चा होती. राज यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेत्यांची बैठक 'शिवतीर्थ' या आपल्या निवासस्थानी घेतली. यात राज यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, प्रवक्त्यांना  कसलीही जाहीर टिप्पणी न करण्याचे निर्देश दिलेत. राज यांच्याकडून सद्यस्थिती अन् कार्यकर्त्यांमधली चर्चा यांचा आढावा घेतला जातोय. यासोबतच, राज  आणि त्यांचे सहकारी भाजपसोबत युती झाल्यास होणाऱ्या संभाव्य परिणामांचाही विचार करताहेत. राज ठाकरे भाजपसाठी योग्य का असू शकतात यामागे काही कारणे दिली जात आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मनसे आणि भाजपमध्ये युती झाल्यास त्याचा परिणाम केवळ मुंबईवरच नाही तर ठाणे, नाशिक, पुणे यासह इतर महापालिकांच्या समीकरणांवरही होईल. या युतीमुळं राज यांना राजकीय ताकद मिळू शकते आणि अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचीही संधीही. दीर्घकालीन दृष्टिकोनातून, भाजपसोबतची युती राज ठाकरेंसाठी फायदेशीर ठरू शकते. अल्पसंख्यांक, हिंदीभाषिक परप्रांतीयांची मातांसाठी मात्र भाजपला अडचणी निर्माण होतील. हे भाजपला माहितीये की, राजमुळे मराठी मतविभागणी झाली तर उद्धव अन् शिंदे यांच्या जागा घटू शकतात अन् मुंबईवर कब्जा मिळू शकतो. 
मनसेची उद्धवसेनेसोबत युती झाल्यास, उद्धवसेनेची सध्याची ताकद आणि मुंबई-ठाणे कल्याण डोंबिवली वगळता इतर ठिकाणी त्यांचा असलेला प्रभाव हा मनसेला फायदेशीर नाही. शिंदेंसेनेसोबतच्या युतीला हाच तर्क लागू होतो. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या तीनही पक्षांची नाळ ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेली आहे. मर्यादित प्रादेशिक ताकद असलेल्या पक्षांशी युती करण्यापेक्षा, राष्ट्रीय पक्ष भाजपशी युती करणं हे मनसेच्या पक्ष विस्तारासाठी उपयुक्त ठरू शकते. ज्याप्रकारे शिवसेनाप्रमुखांनी भाजपशी युती करून पक्ष विस्तार केला होता. त्यामुळंच राज हे भाजपशी युती करण्यास अनुकूल असू शकतात. शिवाय मुंबईत दीडशे जागा मागणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठीही राज यांचा पर्याय भाजपला उपयोगी पडू शकतो. राज्यात राज यांची ताकद मर्यादित आहे. त्यांचा उपद्रव असणार नाही. शिंदेंची अवास्तव मागणी फेटाळण्यासाठी राज यांचा प्यादं म्हणून उपयोग होऊ शकतो. भाजपला उद्धव यांच्या ताब्यात गेली अनेक वर्षे असलेली मुंबई कोणत्याही परिस्थिती हवीय. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशी सर्व आयुधं वापरली जाणार आहेत. भाजपच्या गुजराती नेत्यांना मुंबई गमावल्याचं जुनं दुखणं आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मुंबई गुजराथ्यांना हवी होती. त्यावर त्यांनी दावा सांगितला होता. मात्र १०५ हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिलीय. याचं शल्य त्यांना सतत सलत असतं. त्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आपल्याला हवी असा चंग त्यांनी बांधलाय. मुंबई आणि परिसरात आजमितीला ९ महापालिका आहेत तर अख्ख्या गुजरातमध्ये केवळ ६ महापालिका आहेत. त्यामुळे मुंबई पाठोपाठ ह्याही आपल्याकडे हव्यात असा निर्धार भाजपने केलाय. त्यासाठीच राजभेट झालीय. गेल्या काही वर्षात राजकारणाचा जो खेळखंडोबा झालाय तो केवळ एकच गोष्टीसाठी ते म्हणजे  मुंबईचा डॉन कोण...?
मुंबई....सोन्याचं अंड देणारी कोंबडी....! देशात सत्ता असली तरी आर्थिक राजधानी मुंबई हातात नाही हे दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना सहन होत नाहीये. आर्थिक स्थिती नाजूक असताना अवैध धंद्यांनी अक्राळविक्राळ पाय पसरलेत. गुजरातेत दिवसागणिक ड्रगचे साठे उतरताहेत. उद्योगधंदे भुईसपाट होताहेत मात्र बॉलीवूड, आयपीएल, मादक ड्रगव्यवसाय आणि राजकारण्यांच्या आर्थिक स्थितीत मात्र भरभराट होतेय. यामागचं गौडबंगाल काय आहे? या साऱ्यांच्या नाकदूऱ्या काढण्यासाठी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारच्या पोलीस, सीबीआय, ईडी, एनसीबी, एनआयए, कस्टम, एक्साईज एवढंच नाही तर इकॉनॉमिक्स ओफेन्स ब्युरो अशा तमाम तपास यंत्रणांनी इथं मुंबईत तळ ठोकलेला असतो. इथं संघर्ष पेटलाय तो मुंबईवरच्या वर्चस्वाचा...! सध्या राज्यातल्या राजकीय संघर्षाला मुंबईवर वर्चस्व कुणाचं, कुणाचा कब्जा राहणार. याची किनार आहे. राजकारणी, बॉलिवूड, आयपीएल आणि ड्रगच्या अवैध धंद्याच्या चौकडीकडून होणाऱ्या कमाईशी हे सारं निगडित आहे, त्यावरच्या कब्जासाठी ही लढाई आहे. गेल्या चार-पांच वर्षात देशाची आर्थिकस्थिती डबघाईला आलीय. औद्योगिक क्षेत्र पुन्हा नीट उभं राहू शकलेलं नाही. बेरोजगारीचा आगडोंब उसळलाय. कार्पोरेट जगत हळूहळू ढासळू लागलंय. पण जगात तिसरी अर्थव्यवस्था निर्माण झालीय असं सांगत असतानाच ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. एकीकडं ही उतरण सुरू असताना मात्र बॉलिवूड, आयपीएल, ड्रगबाजाराची भरभराट होतेय. इतकंच नाही तर राजकारणीही गब्बर होताहेत.  ह्या साऱ्या बाबी मुंबईत केंद्रित झालेल्या आहेत. हे सारं समजून घेण्यासाठी आपण सत्तांतराचं वर्ष म्हणजे २०१४ पासूनचा विचार करू या. राजकारणाला इथं वेगळं वळण लागलं. या सत्तांतरानंतरच मुंबई, महाराष्ट्र, शिवसेना, शरद पवार, त्यांचं प्रांतीय राजकारण, त्यांचं केंद्रीय सत्ताधाऱ्यांना असलेलं आव्हान, गुजराती-मराठी वाद, उद्योग व्यापार जगतावर असलेलं गुजरातींचं वर्चस्व, याच्या माध्यमातून या सुप्त संघर्षाला सुरुवात झालीय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरात राज्याच्या राजकारणातून थेट देशात सत्तेवर आलेत. आता सत्तेची सारी सूत्रं त्यांच्या हाती आहेत. त्यामुळं हा संघर्ष गुजराती व्यापारी, उद्योगपती यांना सोबत घेऊन त्याचबरोबर भाजप आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तांच्या साथीनं मराठी माणसांनाच आव्हान देण्यासाठी, ठाकरे ब्रँड संपविण्यासाठी उभा ठाकलाय! त्यासाठी भाजपने आधी शिवसेना फोडून शिंदेंना हाती घेतलं, मग राष्ट्रवादीची शकलं करून अजित पवारांना घेतलं आता राज यांना घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ महापालिकेच्या सत्तेसाठी नाही तर वर उल्लेखलेल्या मुंबईतल्या बॉलिवूड, आयपीएल, ड्रग उद्योगावर जम बसविण्यासाठी, त्याचबरोबर गुरगुरणाऱ्या शिवसेनेला संपविण्यासाठी हे सगळं केंद्रीय भाजप सत्तेनं आरंभलंय! 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा तपशील बाहेर आला नसला आणि राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली नसल्याने ते भावासोबत जाणार की, भाजपसोबत याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागलाय. वातावरण ढवळून निघालंय. त्यातच उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच राज ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेत सस्पेन्स वाढवलाय. राज यांनी १९ वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. सुरुवातीला मोठं यशही मिळालं. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले. मात्र, त्यांचा हा करिष्मा नंतर फारसा चालला नाही. राज ठाकरे यांनी २०२४ साली लोकसभा निवडणूक न लढता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीच्या प्रचारार्थ सभाही घेतल्या. मात्र महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज यांनी स्वबळावर उमेदवार उभे केले. पुत्र अमित ठाकरे यांच्यासह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी एका मुलाखतीत शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याला उद्धव ठाकरेंनी भाषणातून प्रतिसाद दिला. त्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या गटाकडून दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येणार असल्याचे बॅनर झळकले. त्यातच गुरुवारी राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. महायुतीसोबत युती केल्यास राज ठाकरे यांना आर्थिक आणि संघटनात्मक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपचा आपला विशिष्ट मतदार आहे. त्याचा मनसेला फायदा होऊ शकतो. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबत युती केल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल, ज्यामुळे मनसेला अधिक जागा जिंकण्याची संधी मिळू शकते. मात्र, सध्या तरी महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी असल्याने याठिकाणी मनसेसाठी फारशी जागा असण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढली तर भाजपचा फायदा होईल मात्र दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एका सर्वेक्षणानुसार, ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्यांना ५२.१ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे यांचा मराठी मतदारवर्ग मोठा आहे. युतीमुळे मराठी मतांचे विभाजन टाळता येईल. दोन्ही पक्षांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी एकमेकांची गरज आहे. युतीमुळे दोघांचाही प्रभाव वाढू शकतो. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या २० वर्षांचं राजकीय हाडवैर विसरुन 'मातोश्री' आणि 'शिवतीर्था'ला एकत्र येण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका हातातून जाऊ न देण्यासाठी मोठी खेळी रचली. विधानसभा निवडणुकीत दीडशेच्या वर उमेदवार देऊन, तगडा प्रचार करुन एकही आमदार निवडून येण्याची नामुष्की ओढवलेल्या राज ठाकरेंशी जुळवुन घेण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली.
हरीश केंची 
९४२२३१०६०९
चौकट
सारं काही अदानी साठी...!
देशाची सत्ता अन् अर्थव्यवस्था सध्या गौतम अदानी यांच्याभोवती फिरतेय. प्रत्येक उद्योगधंद्यासाठी  अदानीला पायघड्या घातल्या जाताहेत. यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी दोघेही तत्पर असतात. असं गमतींना म्हटलं जातं की, 'भाजप आणि राष्ट्रवादी यांचा गौतम अदानी कृष्ण आहे. पवार हे गौतमचे ‘देवकी’ तर मोदी हे गौतमचे ‘यशोदा’ आहेत. बारामती मथुरा तर वडनगर वृंदावन आहे...!' असं असल्यानं मुंबईत त्यांना विमानतळापासून धारावी पुनर्विकास प्रकल्पसारखे अनेक प्रकल्प दिले गेलेत. त्यासाठी शेकडो एकर जमीन दिली गेलीय. यापूर्वी देशाच्या विकासात टाटा बिर्ला यांसारख्या अनेक उद्योगपतींचा हातभार लागलाय. त्यासाठी त्यांना भारतरत्न, महाराष्ट्रभूषण दिलं गेलंय. मात्र वादग्रस्त अदानीना हिंडनबर्ग अहवालातून, सेबीच्या गैरप्रकारातून अमेरिकेच्या न्यायालयातल्या दाव्यातून अदानी यांचा कारभार उघड झालाय. तरीही अदानीना आणखी पायघड्या घालण्यासाठी मुंबईवर कब्जा हवाय, त्यासाठी भाजप सारंकाही करायला सिद्ध झालीय. याचीही किनार ही राजभेटीमागे आहे!

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...