मीनाक्षी नटराजन यांना मार्च २०२२ मध्ये पोचमपल्लीला पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा त्या 'राजीव गांधी पंचायत राज मिशन'च्या अध्यक्ष होत्या. पोचमपल्ली ते सेवाग्राम अशी 'सर्वोदय संकल्प यात्रा' निघाली होती. तेलंगणातल्या पोचमपल्ली येथे विनोबांना रामचंद्र रेड्डी यांच्याकडून पहिलं भूदान मिळालं होतं. भूदान आंदोलनाची सुरूवात तिथून झाली. गागोद्याचं 'विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठान' आणि 'राजीव गांधी पंचायत राज मिशन' दोघांनी संयुक्तपणे पदयात्रेचं आयोजन केलं होतं. हर्षवर्धन सकपाळ तेव्हा 'राजीव गांधी पंचायत राज मिशन'चे उपाध्यक्ष होते. तेही पदयात्रेत सामील झाले होते. विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठानतर्फे विजय दिवाण, नीला आपटे, माधव सहस्त्रबुद्धे आणि इतर मंडळी होती. महाराष्ट्रातले सर्वोदयी कार्यकर्ते सामील झाले होते.
मीनाक्षी नटराजन लेखकही आहेत याची मला कल्पना होती. 'अपने अपने कुरूक्षेत्र....' ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. '१८५७ - भारतीय परिप्रेक्ष्य...' हे त्यांचं संशोधनात्मक पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे. पदयात्रेला सुरूवात होताना त्यांच्याशी औपचारिक ओळख झाली होती.
पुढे तेलंगणाच्या वेगवेगळ्या गावांमधून जाताना त्यांचे स्थानिकांशी होणारे संवाद ऐकत होतो. त्यांच्याशी बोलतही होतो. बारीक अंगकाठीच्या, सुती साडी-चष्मा-खांद्यावर शबनम असा साधा, प्राध्यापकी पेहराव असलेल्या 'मीनाक्षीदीदी' अगदी सौम्य आणि मृदू दिसतात; पण त्या बोलायला लागल्या की त्यांची 'कमांड' जाणवायला लागते. त्या भागातल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा, विशेषतः जमिनीशी संबंधित प्रश्नांचा, त्यांचा चांगलाच अभ्यास होता. मला विशेष वाटल्या त्या दोन गोष्टी. त्या दर सोमवारी की मंगळवारी मौन पाळायच्या आणि नियमित सूतकताई करायच्या. मौन ही एक ग्रेट गोष्ट आहे याचा शोध मला गेल्या वर्षी विपश्यना केल्यापासून लागला. आणि गांधी विचारांच्या परिवारातला असूनही हे आपल्याला आधी का कळलं नाही याची थोडी खंतही वाटली. संपूर्ण पदयात्रेत मीनाक्षीदीदींनी ठरलेल्या दिवशी कसोशीने मौन पाळलं होतं.
पदयात्रेदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी सूतकताई हा एक नियमित कार्यक्रम असायचा. माधवदादा सूतकताईतले उस्ताद. मीनाक्षी नटराजन, माधवदादा, नीला, विजयकाका, सरिताताई, इतर सहकारी सूत कातायला लागले की लोक गोळा व्हायचे. त्यातून एक डायलॉग सुरू व्हायचा. पण मला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होण्याला आणखी एक, वेगळंच कारण घडलं. आणि ते म्हणजे सिनेमा! एकदा संध्याकाळी गप्पा मारताना कुठूनतरी सिनेमाचा विषय निघाल्यावर त्या भरभरून बोलायला लागल्या आणि मी चाटच पडलो! अमिताभ बच्चनच्या सिनेमांवर वगैरे बोलत होतो आम्ही! गांधी आणि सिनेमा अशी दोन म्हटलं तर विजोड टोकं धरलेली माणसं मला जाम आवडतात. इथे एक सांगायला पाहिजे. सर्वोदयी मंडळींमध्येदेखील रसिकता नसते असा एक समज आहे. पण विजय त्याला अपवाद आहेत. विनोबांइतकाच जुनी हिंदी गाणी, चित्रपट, मराठी साहित्य हा त्यांचा वीक पॉईंट आहे. त्याबद्दल एकदा वेगळं लिहावं लागेल. त्यामुळे मीनाक्षीदीदींचं सिनेमाप्रेम हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. आणि अर्थातच ते नुसतं प्रेम नव्हतं. सिनेमा आवडणं हा एक भाग झाला. सिनेमा बहुतेक सगळ्यांनाच आवडतो. पण त्याबद्दल आपलं काहीतरी म्हणणं असणं, आपण सिनेमाबाबत चिकित्सक असणं महत्त्वाचं. मीनाक्षीदीदी त्या पंथातल्या आहेत.
अलीकडे त्यांचा राज्यसभेची उमेदवारी अर्ज फेटाळल्या गेल्यानंतर पदयात्रेतल्या आठवणी जाग्या झाल्या. राजकारणात अशी एक अंतर्बाह्य साधी, खऱ्या अर्थाने गांधीविचार आत्मसात केलेली आणि कलासक्त व्यक्ती असू शकते यावर आज विश्वास ठेवणं कठीण आहे. पण मीनाक्षी नटराजन म्हणजे याचं चालतं-बोलतं उदाहरण आहे.
बाकी त्यांच्याबाबत जे झालं त्याबद्दल वेगळं बोलावं असं काही नाही. जिथे सत्तावीस लाख मतदारांचा मतदानाचा हक्क डावलला जातो आणि 'ते पुढच्या वेळी मतदान करतील' हे ऐकवलं जातं, निवडणूक आयोग उघडपणे सत्ताधारी पक्षाला फायद्याचं होईल असं ट्वीट करतो तिथे मीनाक्षी नटराजन यांचं ऐकलं जाईल ही आशा व्यर्थ आहे. काही वेगळं घडलं तरच आश्चर्य!
मीनाक्षी नटराजन १९९९ ते २००२ एनएसयूआयच्या अध्यक्ष होत्या. २००२ ते २००५ मध्य प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. २००८ मध्ये एआयसीसीच्या सचिव होत्या. २००९ ते २०१४ लोकसभा खासदार होत्या. नंतर काँग्रेसमध्ये कुठल्या ना कुठल्या रोलमध्ये होत्याच. त्यांची वैचारिक कमिटमेंट दांडगी आहे आणि फिल्डवरची तयारीही. त्यामुळे आज भारतात लोकशाही किती उरली आहे माहीत नाही; पण मीनाक्षी नटराजन नावाच्या बाई उभ्या असणार आहेत आणि पुरून उरणार आहेत. आणि हे खूप आहे!
No comments:
Post a Comment