Monday, 6 July 2026

राम नाम जपना, पराया माल अपना...!

"कोट्यवधींचं दान, दागिने, चांदीच्या, सोन्याच्या, जडजवाहीराच्या विटा अयोध्येच्या राम मंदिरातून गायब झाल्यात. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र सूत्रधाराला अजून हात लावला गेला नाही. हे जर विरोधकांच्या काळात झालं असता तर आगडोंब उसळला असता. चर्चेचा, आरोपांचा धुरळा उडाला असता. अगणित दान चोरीचा एवढा बभ्रा झाला पण सगळ्यांना अचानक न्यायिक प्रक्रियेची आठवण झालीय. अगदी प्रभू रामसुद्धा वर बसून विचार करत असतील, बंधूंनो, तुम्ही माझ्या नावाने निवडणुका लढवल्या, रथयात्रा काढल्या, संसदेत भाषणे दिली आणि टीव्हीवर चर्चा केली, पण आता जेव्हा मला अर्पण केलेल्या देणग्यांचा हिशोब विचारला जातोय, तेव्हा सगळ्यांचा आवाज का गेलाय? प्रभू रामाची मूर्ती बोलत नाही. जर ती बोलली असती, तर तिनेच सर्वात आधी विचारलं असतं, भक्तांचे पैसे कुठे गेले? पण आपले नेते भाग्यवान आहेत की मूर्ती प्रश्न विचारत नाहीत, फक्त जनताच विचारतेय. आणि जनतेचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्याकडे प्रवक्ते, निवेदक, आयटी सेल, ट्रोल आर्मी, राष्ट्रवाद, परकीय कट, शहरी नक्षलवादी, तुकडे तुकडे गँग सगळं काही आहे. फक्त एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे हिशेब!"
................................................
*क*बीराच्या नावानं एक दोहा सांगितला जातो
लूट सके तो लूट ले, राम नाम की लूट।
पाछे फिर पछताओगे, प्राण जाहि जब छूट॥
राम नाम की लूट है, लूट सके तो लूट।
अंतकाल पछतायेगा, जब प्राण जायेंगे छूट॥
अरे, रामाच्या नावानं लूट चालली आहे, यात हात धुवून तू देखील लुटून घे. मरायला टेकशील, तेव्हा आपण पुढच्या पिढ्यांना मालामाल करण्यात कसूर केली असं जाणवून तुला पश्चात्ताप होईल! तसंही याला समर्थन म्हणून अलीकडच्या इतिहासात कवी अंजान म्हणून गेले आहेतच, 
आपका तो लगता है बस यही सपना।
राम नाम जपना, पराया माल अपना॥
चोर हुशार होते. त्यांना अचानक होणाऱ्या झडतीचा आधीच सुगावा लागला होता. त्या दिवशी, त्यांनी एकेक करून नोटांचे बंडल पिशवीत लपवण्यासाठी शौचालयात प्रवेश केला. अयोध्येतल्या प्रसिद्ध रामलल्ला मंदिराच्या स्वच्छतागृहात एका सफाई कर्मचाऱ्याला नोटांच्या बंडलांनी भरलेली एक बॅग सापडल्यावर ही चोरी उघडकीस आली आणि पैशांचे बंडल कसे लाटले जात होते, याबद्दल धक्कादायक खुलासे आता समोर आले आहेत. यात शंका नाही की ते चोर एका टोळीचा भाग म्हणून काम करत होते आणि लुटलेला माल आपापसात वाटून घेत होते. ते हुशार आणि चलाख होते, आणि अचानक झडती घेण्याचे आदेश दिल्यास पकडले जाण्यापासून कसं वाचायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. या चोरीच्या कथेची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. दानपेटी मोजणीसाठी एक मोठी खोली आहे, जिथं मंदिरातल्या दानपेट्या उघडल्या जातात आणि चार टेबलांवर चलनी नोटा अन् नाणी टाकली जातात. तिथं चार खुर्च्या असलेले एक मुख्य टेबल आहे, ज्यावर मोजणी कर्मचारी चलनी नोटा मोजण्यासाठी, त्यांचे ढीग आणि गठ्ठे बनवण्यासाठी बसतात. इथेच दान मोजणी कर्मचारी नोटांची बंडल, गठ्ठे आपल्या खिशात आणि अगदी मोज्यांमध्येही कोंबत असत. इथं एका पाळीत बावीस जण काम करतात मात्र  कोणाचीही झडती घेतली जात नव्हती. ते दुहेरी खिसे असलेले शर्ट आणि पॅन्ट घालून येत असत. हिशोब ठेवणं्यासाठी असलेल्या खोलीत खाण्याचे पदार्थ आणण्यासाठी मनाई असताना आणले जात होते. सरावलेले चोर झपाट्याने श्रीमंत होत होते. इथं पहिल्या दिवसापासूनच सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. कार्यपद्धती अशी होती...! प्रत्येक कर्मचाऱ्याची दररोज झडती, खिसे असलेले कपडे घालण्यावर बंदी, मोजणीच्या खोलीत खाण्यावर बंदी, मोजणी चालू असताना खोलीबाहेर जाण्यास मनाई असे नियम आहेत.पण प्रत्येक नियम इथं धुडकावून लावला गेला. दानमोजणीवर देखरेख करण्याची जबाबदारी असलेले सुभाष श्रीवास्तव यांनीच सर्वात आधी हा नियम मोडला. पहिल्याच दिवशी, जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची झडती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते त्यांच्यावर ओरडले, 'आम्ही स्वयंसेवक आहोत, आमच्यावर संशय कसा घेऊ शकतो?' चंपत राय यांनी मग ते नियमच तातडीने बदलले. त्यांनी निर्देश दिले की, दररोज झडती घेतली जाणार नाही. झडती घेणं हे अयोध्यातल्या पोलिसांचे काम होतं, परंतु पोलिसांना या अर्पण नाणीे मोजणी कक्षाजवळ येऊ दिलं नाही. मोजणी कक्ष वगळता, मंदिराच्या परिसरातले सारे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आलेत. दान पेटीतल्या नोटा, अर्पण वस्तू यांची मोजणी सुरळीतपणे पार पडावी हे अनिल मिश्रा यांचं कर्तव्य होतं. मोजणी करणारे सारे कर्मचारी अनिल मिश्रा यांचे नातेवाईक आणि चंपत राय यांचे उजवे हात असलेले टिन्नू यादव होते. यांना कुणाची अन् कोणतीही भीती नव्हती. सूत्रधारांचे ते जवळचे नातेवाईक होते. नोटांचे ढीग मोजून त्यांचे गठ्ठे बनवले जात असताना चोर एक-दोन गठ्ठे आपल्या पॅन्टमध्ये, अगदी मोज्यांमध्येही सरकवत असत. ते सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेत याची त्यांनी पर्वा केली नाही. मग ही चोरी लक्षात कशी आली? तर जूनच्या पहिल्या आठवड्यात, हिशोब विभागातला एक कर्मचारी हा सारा प्रकार उघडकीस आणणारा ठरला. त्याने चंपत राय यांच्याकडे दान चोरी, पैशांची अफरातफर होत असल्याची तक्रार केली. चंपत राय यांनी मोजणी कक्षात अचानक झडती घेण्याचं ठरवलं. चोर हुशार होते. त्यांना या अचानक झडतीचा आधीच सुगावा लागला होता. त्या दिवशी, त्यांनी नोटांचे बंडल पिशवीत ठेवून त्या पिशव्या शौचालयात लपवल्या. या झडतीत त्यांना काहीही आढळलं नाही. चंपत राय यांनी माहिती देणाऱ्याला फटकारले. त्याने सांगितलं की, मोजणी करणारे कर्मचारी त्यांच्या खिशात नोटा कोंबत असल्याचं त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. नेमकं तेव्हाच सफाई कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये लपवलेली नोटा असलेली पिशवी सापडली आणि हे सगळं मोठे प्रकरण उघडकीस आलं. चंपत राय यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं; त्यात त्यांना दिसलं की, मोजणी करणारे कर्मचारी अनेक वेळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या टप्प्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते. तसंच, दोन-चार जण बंडलं खिशात कोंबत होते. ते पाहून चंपत राय थक्क झाले. त्यांनि सुरक्षारक्षकांना सोबत घेतलं, आणि एका मोजणी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन ११०० अमेरिकन डॉलर्ससह जवळपास ८० लाख रुपयांची रोकड, त्यांच्या बँक खात्यांमधून २० लाख रुपये जप्त केले. एकूण एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली. चंपत राय संतप्त झाले, चिंतित आणि निराशही होते. पण तरीही ते हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करण्यास तयार नव्हते. चंपत राय यांनी कबूल केलं की, या लोकांनी गुन्हा केलाय, पण जर हे प्रकरण पोलिसांकडं सोपवलं गेलं तर त्यांचं करिअर खराब होईल. राय यांचा युक्तिवाद असा होता की, आता पैसे परत मिळाले आहेत, त्यामुळे या लोकांना माफ करून त्यांना दुसरं काहीतरी काम दिलं पाहिजे.
तोपर्यंत या घटनांची बातमी सार्वजनिक झाली होती. या दानचोरीचा बोभाटा झाला होता. मग मोठ्या दबावानंतर चंपत राय एसआयटी चौकशीसाठी सहमत झाले. एसआयटीने शक्य तितके पुरावे गोळा केले. सुभाष श्रीवास्तव, टिन्नू यादव आणि इतर जवळपास ७० जणांची चौकशी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एसआयटीला सत्य समजलं. त्यानंतर लगेचच, ट्रस्टला महागडे दागिने, देणग्या दान केलेल्या देणगीदारांच्या तक्रारींबद्दल टीव्ही चॅनलवर बातम्या येऊ लागल्या. राजू मनवाणी म्हणाले की, त्यांनी जागतिक सिंधी  असोसिएशनच्या वतीने २०० चांदीच्या विटा दान केल्या आहेत. ऑल इंडिया बुलियन ट्रेडर्स असोसिएशनचे उत्तर भारत प्रमुख अनुराग रस्तोगी म्हणाले की, त्यांनी चंपत राय यांना एक चांदीचा दिवा आणि चांदीच्या विटा दान केल्या आहेत. दुसऱ्या भक्त अनिता भारद्वाज यांनी चांदीची कागभूषुंडी दान केली होती, तर हैदराबादचे श्रीनिवास शास्त्री यांनी ट्रस्टला चांदीच्या चरण पादुका, चांदीच्या विटा आणि सोन्याचा मुलामा दिलेले चांदीचे धनुष्य दान केल्याचं सांगितलं.
दानपेट्यांची जागा लहान असल्यामुळे, या देणग्या वैयक्तिकरित्या सुपूर्द करण्यात आल्या. पण त्याची नोंद झालेली दिसत नाही. राम मंदिरात एक काउंटर आहे जिथे अशा देणग्या स्वीकारल्या जातात. एसआयटीला काही महागडे दागिने चंपत राय यांच्या निवासस्थानी सापडले. त्याच्याकडे त्या अर्पणांची यादीही होती. पण बाकीच्या भेटवस्तू कुठे ठेवल्या आहेत हे त्याला आठवत नव्हतं. चंपत राय यांनी जप्त केलेली ८० लाख रुपयांची रोकड आपल्या तिजोरीत ठेवली होती. तोपर्यंत चोरांनी पैसे कसे चोरले हे कबूल केलं होतं. आता प्रश्न असा आहे की, किती रोख रक्कम आणि दागिन्यांचा हिशोब अजून लागलेला नाही? जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यावर चोऱ्या वाढल्या पर्यवेक्षकच चोरांशी संगनमत करत असल्यामुळे बऱ्याच काळापासून चोरी सुरू होती. मौल्यवान सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे मूल्यांकन मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून केलं जाणार होतं. मिंटिंग कॉर्पोरेशनचे कर्मचारी आले ते ४५ दिवस याच परिसरात राहिले. त्यांनी चांदी वितळवून मूल्यांकन केलं, परंतु मिंटिंग कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना नियुक्त करणं खर्चिक ठरेल अशी तक्रार चंपत राय यांनी केली आणि हे अधिकारी अयोध्या सोडून निघून गेले. खरं तर, चंपत राय यांना मंदिराच्या आवारात मिंटिंग कॉर्पोरेशन, पोलीस, बँकेचे अधिकारी किंवा कोणताही सीईओ नको होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ३६ महिन्यांपूर्वी चंपत राय यांना एक योग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करण्याचा सल्लाही दिला होता, पण चंपत राय आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांना आता जाणवलंय की, चंपत राय यांची समजूत घालण्यात वेळ वाया घालवायला नको होता, पण त्यांना तो संदेश कठोरपणे पोहोचवण्याचं धाडस कोणामध्येच नव्हतं. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे बहुतेक सदस्य वयोवृद्ध असल्यामुळे चंपत राय यांची हुकूमशाही सुरूच राहिली. संस्थापक सदस्य, ज्येष्ठ वकील के. परासरन हे ट्रस्टचे सदस्य आहेत. ते ९९ वर्षांचे असून सभांना उपस्थित राहू शकत नाहीत. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास ८८ वर्षांचे आहेत. अयोध्येत राहतात, पण ते ट्रस्टच्या कामात क्वचितच हस्तक्षेप करतात. एकाण्णव वर्षीय स्वामी परमानंदजी हे हरिद्वारमध्ये राहतात, पण ते प्रवास करू शकत नाहीत. स्वामी वासुदेवानंद सरस्वती, जे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत, प्रयागराजमध्ये राहतात. ते देखील नियमितपणे सभांना उपस्थित राहू शकत नाहीत. कर्नाटकातील पेजावर मठाचे प्रमुख स्वामी विश्वप्रसन्न तीर्थ हे उडुपी येथे राहतात. खजिनदार, स्वामी गोविंद देव जी महाराज, पुण्यात राहतात आणि त्यांनी बहुतांश आर्थिक काम हे या वादळाच्या केंद्रस्थानी असलेल्या अनिल मिश्रा यांच्यावर सोपवलंय. केवळ चंपत राय, अनिल मिश्रा आणि निर्मोही आखाड्याचे प्रमुख स्वामी दिनेंद्र दास हे तीन विश्वस्त अयोध्येत राहतात. स्वामी दिनेंद्र दास आजारी असतात. ट्रस्टची संपूर्ण जबाबदारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर पडली. त्यांना जे आवडलं ते ठरवलं; त्यांनी आपल्या आवडीनिवडी आणि लहरीनुसार नियम बदलले. ज्यांनी प्रभू रामाचा पैसा चोरून पाप केलं, न्यायालयाकडून त्यांच्या योग्यतेनुसार शिक्षा मिळेल. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते आता जागे झाले असून, उद्या सोमवारी ६ जुलै रोजी होणाऱ्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या जागी नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. अयोध्येच्या माजी सत्ताधारी घराण्यातील विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांचे निधन झाले असून त्यांचे पद रिक्त झाले आहे. तीन नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली जाईल.  बँकिंग, वित्त आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तींना विश्वस्त म्हणून नियुक्त करणं अधिक चांगलं होईल. राम मंदिराला कामकाज सांभाळण्यासाठी एका व्यावसायिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची-सीइओची सुद्धा गरज आहे. तिरुपती तिरुमला देवस्थानममध्ये देणगीच्या रकमेची मोजणी बँकेचे कर्मचारी आणि निवृत्त बँक अधिकारी करतात. मोजणीच्या वेळी त्यांना एकच धोतर परिधान करण्याची परवानगी असते आणि ही मोजणी सर्वांच्या उपस्थितीत केली जाते. राम मंदिरालाही अशाच प्रणालीची गरज आहे. मंदिरात एक मुख्य दक्षता अधिकारी असावा, जो स्वतंत्र असावा आणि ज्याच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होता कामा नये. प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची अजिबात कमतरता नाही.
असं म्हटलं जातं की, रामराज्यात राजा रामाने एका धोब्याच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं होतं. कलियुगाच्या या नव्या रामराज्यात लाखो भक्त प्रश्न विचारताहेत आणि प्रत्युत्तरादाखल त्यांना टीव्हीवरची चर्चासत्रे, पत्रकार परिषदा, राष्ट्रवादाचे पॅकेज दिलं जातंय. प्रकरण अगदी सोपे आहे. त्या भक्ताला वाटलं होतं की, त्याने अर्पण केलेली शंभर रुपयांची नोट, त्याच्या वृद्ध आईच्या गल्ल्यातले दहा रुपयांचे नाणे आणि मुलीच्या खिशातले खाऊचे पैसे प्रभू रामजींच्या चरणी पोहोचतील. सुरुवातीला नेते म्हणाले, हे राम मंदिर आहे, इथं प्रश्न विचारू नका! मग, जेव्हा प्रश्न वाढले, तेव्हा ते म्हणाले, हा हिंदूंच्या श्रद्धेवर हल्ला आहे! जेव्हा त्याचाही उपयोग झाला नाही, तेव्हा ते म्हणाले, चौकशी होऊ द्या! दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, तुम्ही प्रश्न विचारले तर, आधी तुम्हाला देशद्रोही, मग जातीयवादी अन् शेवटी एक सहनशील नागरिक ठरवलं जातं. सर्वात गमतीशीर गोष्ट ही की, जे लोक कालपर्यंत गल्लीबोळात, वस्तीत नैतिकतेचा व्यापार करत होते, ज्यांनी स्वतःला हिंदू धर्म, राम आणि राम मंदिराचे संरक्षक घोषित केलं होतं, ते अचानक कायद्यात इतके पारंगत झालेत की, ते प्रत्येक वाक्याची सुरुवात 'चौकशी पूर्ण होऊ द्या!' या वाक्याने करतात. हे तेच लोक आहेत जे, एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या घरातून जुनी ब्रीफकेस जरी सापडली, तरी संध्याकाळपर्यंत त्याला अब्जावधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार घोषित करतात. जर असे गंभीर आरोप एखाद्या विद्यापीठावर, कामगार संघटनेवर, अल्पसंख्याक संस्थेवर वा विरोधी पक्षावर झाले असते, तर नेत्यांनी 'चौकशीची वाट पाहण्याचा' सल्ला दिला असता का? की त्यांनी सर्वत्र गोंधळ घातला असता? आरोपीला आतापर्यंत जमावाने मारलंही असतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय की, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत आरोपांना तथ्य मानलं जाऊ नये. हे तत्त्व योग्य आहे. पण जेव्हा पूर्ण चौकशी न करता विरोधी नेत्यांना भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हणून हिणवलं गेलं, तेव्हा हे तत्त्व कुठं होतं? आंदोलनादरम्यान लोकांना तुरुंगात टाकलं गेलं का? पण इथली परिस्थिती वेगळी आहे. 
हरीश केंची,
९४२२३१०६०९.








No comments:

Post a Comment

राम नाम जपना, पराया माल अपना...!

"कोट्यवधींचं दान, दागिने, चांदीच्या, सोन्याच्या, जडजवाहीराच्या विटा अयोध्येच्या राम मंदिरातून गायब झाल्यात. त्याची चौकशी सु...