Monday, 30 March 2026

बाबासाहेबांचे बॉडीगार्ड मडकेबुवा

प्रबोधनकार ठाकरे यांनी दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दलितांच्या हातून गणपतीची पूजा करावी म्हणून जे आंदोलन केलं होतं त्यावेळी ज्यांच्या हस्ते पूजा केली ते हे मडकेबुवा....!
गणपत महादेव जाधव तथा मडकेबुवा यांचा जन्म - १८८५ तर निधन २८ मार्च १९४८. डॉ.बाबासाहेबांचे बॉडीगार्ड मडकेबुवा यांचं संपूर्ण नाव जरी गणपत महादेव जाधव असलं तरी ते 'मडकेबुवा' म्हणूनच प्रसिद्ध होते. हे नाव पडण्याचं कारण म्हणजे ते आधी माळकरी बुवा होते आणि भगवी वस्त्रे वापरत. ते उत्कृष्ट मेकँनिक होते त्यामुळे एका गोऱ्या साहेबाने त्यांना १९२८ साली आफ्रिकेला नेलं आणि बॉयलर मेकर म्हणून ४०० रुपये दरमहा नोकरीला लावलं. पण गोऱ्या लोकांबरोबर न पटल्याने १९२९ मध्ये ते भारतात परतले आणि मडकी विकण्याचा धंदा सुरु केला म्हणून ते 'मडकेबुवा' म्हणून प्रचलित झाले. अशिक्षित परंतु प्रचंड संघटन कौशल्य, आपले नेते डॉ.आंबेडकर आणि त्यांनी चालविलेल्या चळवळीवर पराकोटीची प्रखर निष्ठा असलेला निधड्या छातीचा धडाडीचा, करारी नेता होते. डॉ.आंबेडकरांचे ऑफिस असलेल्या दामोदर हॉलला लागून असलेल्या चाळीतल्या पहिल्या मजल्यावर मडकेबुवांचं बिऱ्हाड होतं. त्यामुळे डॉ.आंबेडकरांशी मडकेबुवांचा स्नेह जुळला. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९३४ साली राजगृहात राहायला जाण्यापूर्वी याच दामोदर हॉलच्या ऑफिसात बसून बाबासाहेब आपल्या समता प्रस्थापनेच्या आणि दलित मुक्तीच्या चळवळीच्या रोजच्या रोज बैठकीतून आणि चर्चेतून मोर्चेबांधणी करत, त्यात अर्थातच मडकेबुवाही उत्साहाने भाग घेत असत. मडकेबुवा जरी अशिक्षित होते तरी त्यांची विचारसरणी अत्यंत प्रगल्भ आणि पुरोगामी होती. ते मराठीत सही करायला शिकले होते पण तीदेखील गिरवून करत असत. त्यांची रहाणी अत्यंत साधी पण टापटीप असे.
 डोक्यावर मखमलीची नक्षीदार काळी टोपी, तलम धोतर, पायात मोजे अन् बूट असा थाटाचा पेहराव ते करत. मडकेबुवांची आंबेडकरी चळवळीवरची निष्ठा, त्याग नि धडाडी प्रत्येक कसोटीवर तावून सलाखून निघालेली होती. पुणे करारापूर्वी गांधीजींच्या आमरण उपोषणाने साऱ्या देशाचे लक्ष बाबासाहेबांवर केंद्रित झालं होतं. बाबासाहेब आपल्या कोट्यावधी बांधवांच्या हक्कांवर पाणी सोडायला नव्हते. गांधीजींची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. बाबासाहेबांना धमक्यांची पत्रे येत होती; पण बाबासाहेब न डगमगता आपल्या नित्य कार्यात मग्न होते. त्यांच्या जीविताला फार मोठा धोका होता. अशा बिकटप्रसंगी मडकेबुवा बाबासाहेबांना न कळत त्यांच्या पाठीशी सावलीसारखे वावरत असत. प्रत्येक बिकट प्रसंगी बाबासाहेबांच्या जीविताचे रक्षण करण्याचं कार्य मडकेबुवांनी आपल्या जीवाची बाजी लावून लावून केलं. त्यामुळेच 'बाबासाहेबांचे बॉडीगार्ड' म्हणून ते प्रसिद्ध होते. मुंबईत बाबासाहेबांची सभा वा कोणताही कार्यक्रम असला म्हणजे मडकेबुवा अध्यक्ष किंवा स्वागताध्यक्ष असणार हे ठरलेलंच असायचे. १९३४ साली डॉ.आंबेडकरांनी स्थापलेल्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे ते स्वतः अध्यक्ष तर मडकेबुवा सहचिटणीस होते. बाबासाहेबांशी असलेली मडकेबुवांची जवळीक अनेकांच्या डोळ्यात खुपत असे. परंतु मडकेबुवांनी बाबासाहेबांच्या मनात जे अढळ स्थान निर्माण केलं होतं ते आपल्या त्यागाने आणि निःस्वार्थ कार्याने निर्माण केलं होतं. त्यांच्याबद्दल म्युनिसिपल अधिकारी, कार्यकर्ते आणि नेते यांना आदरयुक्त दरारा वाटत असे. बाबासाहेबांवरच्या निष्ठेने आणि अंगीकृत निःस्वार्थ कार्याने त्यांचा तसा दरारा इतरांना वाटत असे. बाबासाहेबांच्या कामगार संघटनेचे ते प्रमुख संघटक आणि प्रचारक होते. म्युनिसिपल कामगार चळवळीतले मडकेबुवा म्हणजे प्रचंड शक्ती होती. मुंबईत अनेक पदवीधर सुशिक्षित कार्यकर्ते असतानाही डॉ.बाबासाहेबांनी मडकेबुवांची मुंबई प्रदेश शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली होती. यातूनच मडकेबुवांची क्षमता आणि पात्रता काय होती याची कल्पना येईल. हाी त्याची निष्ठेची, त्यागाची नि कार्याची बाबासाहेबांनी दिलेली पावतीच होय. १९४१ च्या सुरुवातीला डॉ. आंबेडकरांनी मुंबईच्या राज्यपालांची भेट घेऊन महार हाी लढवय्यी जमात असून ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी फार मोठी सेवा केली आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी उभारलेली पलटण सरकारने आर्थिक कारणे दाखवून बंद केली, तेव्हा महारांची एक पलटण दुसऱ्या जागतिक युद्धात प्रत्यक्ष भाग घेण्यासाठी उभारावी, अशी त्यांना विनंती केली. त्याचा परिणाम होऊन महार सैनिकांची एक बटालियन उभारण्याचे निश्चित केलं. "महारांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी या संधीचा फायदा घेऊन सैन्यात भरती व्हावे...!" असं डॉ.आंबेडकरांनी महार तरुणांना आवाहन केलं. लवकरच 'महार रेजिमेंट' उभारण्यात आली. काहींची सैन्यभरती करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली. त्यात मडकेबुवांची नेमणूक करण्यात आली होती.
मुंबईतले बाबासाहेबांचे जाहीर कार्यक्रम, सभा बैठका, त्यांची स्थळे आणि वेळ हाी मडकेबुवांच्याच मध्यस्थीने आणि पसंतीने ठरत असत. मडकेबुवांच्या विनंतीला बाबासाहेब सहसा नकार देत नसत. मडकेबुवांचे मुंबईत २८ मार्च १९४८ रोजी पहाटे राहत्या घरी हृदयविकाराने वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी वरळी स्मशानभूमीत झाला. त्यावेळी बाबासाहेब कायदेमंत्री होते. तसेच घटना निर्मितीच्या कामात व्यस्त होते. मडकेबुवांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांना अतिशय दुःख झालं आणि व्यथित मनाने त्यांनी शोक संदेश पाठविला तो असा, "बुवांच्या निधनाची वार्ता ऐकून धक्काच बसला. अस्पृशांचा एक मोठा कार्यकर्ता, कामगारांचा एक ट्रेड युनियानिस्ट आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा एक प्रभावी संघटक नाहीसा झाला आहे. मी अशी इच्छा व्यक्त करतो की, हा संदेश बुवांच्या प्रेतयात्रेच्या लोकसमूहात वाचून दाखविण्यात यावा. बुवांच्या निधनाने ओढवलेल्या आपत्तीत मी सहभागी असल्याचे त्यांच्या पत्नीला कळवा...!" वरळी स्मशानभूमीत प्रेतयात्रा सायंकाळी ७ वाजता पोहोचली. त्यावेळी बाबासाहेबांनी दिल्लीहून पाठविलेल्या हा शोक संदेश वाचून दाखविण्यात आला. मडकेबुवा मुंबई प्रदेश शे.का.फे. तसेच समता सैनिक दलाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिव देहाला समता दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
'समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर...!' या संपादक विजय सुरवाडे यांच्या पुस्तकातून साभार

No comments:

Post a Comment

बाबासाहेबांचे बॉडीगार्ड मडकेबुवा

प्रबोधनकार ठाकरे यांनी दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दलितांच्या हातून गणपतीची पूजा करावी म्हणून जे आंदोलन केलं होतं त्यावेळी ज्...