पुण्यातील श्रीमंत (देशमुख) मराठा कुटुंबात झाला. मारुतराव जेधे यांचे ते धाकटे पुत्र होते. देशमुख कुटुंबातील सदस्य सत्यशोधक समाजाच्या विचाराचे होते आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. जेधे कुटुंबाचा त्या काळात स्वतःचा पितळाच्या भांड्यांचा कारखाना होता आणि त्यांनी मुख्यतः त्यांच्या मालकीच्या पितळ कारखान्यातून त्यांची संपत्ती मिळवली जो कारखाना त्यांचे मोठे भाऊ बाबुराव जेधे देशमुख चालवत होते. बाबुराव देखील ब्राह्मणेत्तर चळवळीत सक्रिय होते तसेच कोल्हापूर संस्थानचे शासक राजर्षी शाहू महाराज यांचे निकटचे सहकारी देखील होते. १९२२ मध्ये शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर केशवराव आणि ब्राह्मणेत्तर पक्षाचे आणि सत्यशोधक समाजाचे नेतृत्व स्वीकारले. ब्राह्मण वर्चस्वातून गणपती उत्सव आणि शिवजयंती असे उत्सव ताब्यात घेणे हे जेधे आणि त्यांच्या साथीदारांचे सुरुवातीचे ध्येय होते. ब्राह्मणेत्तर पक्षाचे ध्येय म्हणून त्यांनी राष्ट्रवादाची कास धरली आणि वर्ण वर्चस्व वादाला विरोध केला. १९३५ मध्ये काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स्वदेशी प्रदर्शनाची सुरुवात केली. ज्यातून आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू स्थानिक कारागीरांकडूनच घेतल्या जाव्यात आणि स्थानिक पैसा स्थानिकच राहिला पाहिजे असा त्यांचा उद्देश होता. सामाजिक चळवळींमध्ये भाषण करताना त्यांनी ब्राह्मणेत्तर बांधवांना स्वतःचा वापर केवळ मनुष्यबळ म्हणून करू देण्यापेक्षा राजकीय चळवळीमध्ये सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले. केवळ काही मंत्रीपदे घेऊन ब्राह्मणेत्तरांनी समाधान मानू नये राजकीय सत्ता केंद्रे ताब्यात घ्यावीत असे ते म्हणत. केशवरावांनी पुणे आणि सासवड येथे सत्याग्रह देखील केला होता.
केशवराव जेधे यांनी १९२० च्या दशकात काँग्रेस पक्षात विलीन होईपर्यंत ब्राह्मणेत्तर पक्षाचे नेतृत्व केले. त्यांनी आपल्या आयुष्यातील बारा वर्षे नॉन ब्राह्मण मुव्हमेंट साठी घालवली. या काळात त्यांनी एनबीएम चे नेतृत्व करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या समता आणि अस्पृश्यता हटाव मोहिमेत देखील भाग घेतला.
सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेत्तर पक्षाने सातारा जिल्हा कोल्हापूर राज्य आणि इतर भागातील इतर ठिकाणीही उपक्रम राबवले जे ब्राह्मणेत्तर समाजाला त्यांचे हक्क मिळवण्यासाठी व अन्याय दूर करण्यासाठी ओळखले जात होते. विसाव्या शतकात सत्यशोधक समाजाच्या अनुयायांमध्ये केशवराव जेधे यांच्या व्यतिरिक्त कर्मवीर भाऊराव पाटील, खंडेराव बागल आणि माधवराव बागल यांचा समावेश झाला. १९३० च्या दशकापर्यंत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या जनआंदोलनाचे स्वरूप पाहता केशवराव जेधे काँग्रेसमध्ये सामील झाले आणि दुर्दैवाने सत्यशोधक समाजाची कामे मागे पडली. १९३० च्या दशकात जेथे यांनी ब्राह्मणेत्तर पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण केले. आणि काँग्रेसला उच्चवर्णीय वर्चस्व असलेल्या संस्थेतून अधिक व्यापक आधार असलेल्या परंतु पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मराठा बहुल पक्षात रूपांतरित केले. केशवराव जेधे यांनीच खऱ्या अर्थाने मागे पडलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि नोव्हेंबर १९३४ च्या बॉम्बे प्रेसिडेन्सी विधान परिषदेसाठी लागलेली पहिली निवडणूक जिंकली. १९३८ मध्ये केशवराव प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि जेधे हवेली हे त्या काळात चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. १९४० च्या दशकात जेधे यांनी काँग्रेसमध्ये शेतकरी लीग सुरू केली ज्याला काहींनी बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन मराठी आणि गुजराती ब्राह्मण नेतृत्वाला आव्हान म्हणून पाहिले. पुण्यातील काँग्रेस भवन बांधण्यात केशवराव जेधे यांचा मोलाचा वाटा होता. १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतर जेधे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेसाठी काँग्रेस पक्ष सोडला आणि १९ ची पहिली लोकसभा निवडणूक त्यांनी पुण्यातून त्यांचेच मित्र असलेल्या एन व्ही गाडगीळ यांच्याविरुद्ध लढली. त्यात त्यांना हार पत्करावी लागली. पुढे शेतकरी कामगार पक्षाच्या इतर नेत्यांच्या डावीकडे झुकलेल्या धोरणामुळे मतभेद होऊन केशवराव जेधे ऑगस्ट १९५२ मध्ये काँग्रेसमध्ये परतले आणि १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बारामतीतून लोकसभेवर निवडून देखील आले.केवळ केशवरावांमुळेच आपण काँग्रेसमध्ये आलो असे यशवंतरावांनी देखील अनेकदा मान्य केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांच्या निर्मितीचे वचन जनतेला दिले होते परंतु राज्य पुनर्रचना समितीने महाराष्ट्र आणि गुजरात साठी द्विभाषिक राज्याची शिफारस केली. ज्याची राजधानी मुंबई असेल असे सुचवले. एक नोव्हेंबर १९५६ रोजी त्याचे उद्घाटन झाल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आणि केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सर्वपक्षीय बैठक झाली. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईतील बारा जागांसह १३३ पैकी १०१ जागा मिळवून काँग्रेसचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. तत्कालीन गुजरात, मराठवाडा आणि विदर्भाच्या पाठिंब्यावरच काँग्रेसला सरकार स्थापन करता आले. पुढे यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
एस एम जोशी, एस ए डांगे, एन जी गोरे, पी के अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी अथक लढा दिला. अनेक लोकांच्या प्राणाची आहुती देऊन शेवटी महाराष्ट्राचे वेगळे राज्य व्हावे हे काँग्रेस नेत्यांना पटवून देण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला यश आले. पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन अर्थमंत्री सी डी देशमुख यांच्या राजीनाम्याने सरकार दबावात येऊन अखेर केंद्र सरकारने १ मे १९६० रोजी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश चा समावेश असलेल्या राज्याची स्थापना केली.
*जेधे हवेली- काँग्रेसच्या चळवळीचे दुसरे केंद्र*
जेधे हवेली ९०७ शुक्रवार पेठ पुणे हे केशवराव जेधे यांचे घर होते. जे एकेकाळी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात पुणे आणि महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र म्हणून उदयास आले. जेधे हवेली १८८५ मध्ये केशवरावांच्या वडिलांनी म्हणजेच मारूतराव बाबाजी जेधे यांनी बांधली होती. याच ठिकाणी राहून केशवराव जेधे यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुमारे ४० वर्षे सामाजिक आणि राजकीय चळवळींचे नेतृत्व केले. केशवरावांच्या नेतृत्वामुळे पुणे ब्राह्मणेत्तर चळवळीचे केंद्र बनले आणि पुणे भौगोलिक आणि समाजशास्त्रीय रेषेनुसार पूर्व आणि पश्चिम भागात विभागले गेले. केसरी वाड्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पश्चिम पुण्यावर ब्राह्मणांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे वर्चस्व होते तर पूर्व पुण्याचे प्रतिनिधित्व जेधे हवेली आणि केशवरावांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाजाने केले होते. केशवराव जेधे यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण जेधे कुटुंबाचा महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीवर विश्वास होता. त्याचबरोबर केशवरावांचे थोरले बंधू दादासाहेब जेधे आणि बाबुराव जेधे हे कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे जवळचे सहकारी होते जे सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व करत होते. शाहू महाराज पुण्यात असताना जेधे हवेलीला आवर्जून भेट देत असत. १९२० च्या दशकात जेधे हवेली बहुजन समाजातील अनेक तरुणांसाठी एक राजकीय आणि सामाजिक शाळा म्हणून उदयास आली. सर्व जेधे बंधू एकत्र राहत असल्याने कुटुंबाला मोठ्या खटल्याचे स्वरूप होते.
असे म्हटले जाते की, त्याकाळी जेधे कुटुंबियांव्यतिरिक्त दररोज कमीत कमी ५० ते ६० लोक हवेलीवर जेवण करत असत. सत्यशोधक चळवळीतील सामान्य कार्यकर्ता पुण्यात येतात थेट जेधे हवेली कडे जात असे. सामान्य कामगारांव्यतिरिक्त कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, काकासाहेब गाडगीळ, दिनकरराव जवळकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा दिगजांसाठी जेधे हवेली हक्काचे घर होते. महाराष्ट्रातील या दिग्गज नेत्यांनी व्यतिरिक्त पंडित मोतीलाल नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, सेनापती बापट, भाऊसाहेब हिरे, शंकरराव देव अशा देश पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांनी देखील जेधे हवेलीला भेट दिली. महात्मा गांधी देखील दोन वेळा जेधे हवेलीत आले होते.
१९३४ पर्यंत जेधे हवेली हे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य आणि सामाजिक चळवळीचे केंद्र होते याच काळात महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा बसवण्यासारखे अनेक वाद पाहिले. जेधे हवेली येथे समाजविघातक आणि संरक्षणवादी कृतींशी लढा देण्यासाठी रणनीती आखण्यात आली होती. त्याचबरोबर १९५६ मध्ये गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांच्यासारख्या आंदोलनावर अनेक बैठका जेधे हवेलीवर होत असत. केशवराव जेधे यांनी पुणे आणि सासवड येथे केलेल्या सत्याग्रहामुळे त्यांना भारताच्या संरक्षण नियमांतर्गत त्यांच्या निवासस्थानी अटक करून येरवाड्याला नेण्यात आले आणि १८ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. केशवराव जेधे यांच्या जीवनाचा शेवट १२ नोव्हेंबर १९६० रोजी पुण्यात झाला. पुण्यातील स्वारगेट येथील प्रसिद्ध चौकाला केशवराव जेधे यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्या आहेत.
No comments:
Post a Comment