Wednesday, 25 March 2026

दिनकरराव जवळकर

दिनकरराव जवळकर हे एक समाज सुधारक आणि ब्राह्मणेत्तर चळवळींचे नेते होते. केशवराव जेधे यांच्या समवेत प्रथम पुण्यातील ब्राह्मणेत्तर चळवळीचे तरुण नेते म्हणून उदयास आले आणि त्यांनी नंतर त्यांच्या देशाचे दुश्मन या पुस्तकात बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यव्यापी ख्याती मिळवली. महात्मा फुलेंचे तत्त्वनिष्ठ अनुयायी म्हणून सामाजिक कार्याची सुरुवात केलेले दिनकरराव जवळकर पुढे साम्यवादाकडे वळले. सत्यशोधक चळवळीची शिकवण व साम्यवाद यांची तत्वे एकत्र करून आपले कार्य पुढे नेण्याचे काम केले.
जवळकर यांचा जन्म १८९८ मध्ये पुण्याजवळील चोराची आळंदी येथील मराठा शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाकडे फक्त पाच-सहा एकर जमीन होती जी त्यांना १९२६ मध्ये विकावी लागली. 
त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले इतर कोणत्याही स्थिर उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय त्यांची उपजीविका मुख्यतः लेखन आणि आश्रय यावरच अवलंबून होती.
दिनकरराव जवळकर यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. पुढे त्यांचा संपर्क कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज यांच्याशी आला. जवळकारांच्या उत्कट लेखनाने आणि वक्तृत्वाने शाहू महाराज प्रभावित झाले आणि त्यांनी जवळकरांना कोल्हापूरला येण्याचे आमंत्रण दिले. कोल्हापुरात जवळकरांनी तरुण मराठा हे वृत्तपत्र चालवले. 
१९२१ मध्ये ते कोल्हापूर सोडून पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी प्रमुख ब्राह्मणेत्तर नेते असलेल्या केशवराव जेधे यांच्या समवेत काम करण्यास सुरुवात केली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे पुणे सनातनी पुराणमतवादी आणि सुधारकांमध्ये विभागलेले होते. सुधारक गटाचे नेतृत्व सत्यशोधक समाजाच्या विविध नेत्यांनी केले. ज्यात प्रामुख्याने राजर्षी शाहू महाराज होते. परंपरावादी नेत्यांचे नेतृत्व बाळ गंगाधर टिळक हे करत होते. परंपरावादी सामाजिक सुधारणांच्या कोणत्याही उपाययोजनांना विरोध करीत असत. यातून परंपरावादी आणि सुधारकांमध्ये उभी फुट पडलेली पाहायला मिळाली. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला तर १९२२ मध्ये शाहू महाराजांचा. या दोघांच्या मृत्यूनंतर देखील दोन्ही गटांनी एकमेकांवर तीव्र टीका करणे सोडले नाही. १९२४ मध्ये पुणे नगरपालिकेने शहरामध्ये टिळक आणि चिपळूणकर या दोन प्रमुख ब्राह्मण व्यक्तींचे पुतळे उभारले. या पार्श्वभूमीवर ब्राह्मणेत्तर गटाने महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा शहरात सुयोग्य सार्वजनिक ठिकाणी बसविण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला ब्राह्मण गटाने कडाडून विरोध केला भाला हे वृत्तपत्र चालवणारे प्रख्यात ब्राह्मण बी. बी. भोपटकर त्यावेळी म्हणाले होते की जोतिराव फुले यांनी पुण्याची अशी काय सेवा केली की त्यांचे स्मारक पुण्यात उभारले जावे? ज्योतिराव फुले हे सार्वजनिक व्यक्तिमत्व नव्हते तर पंथीय व्यक्तिमत्व होते. अशा सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक जुलै १९२५ मध्ये लिहिले. 
हे पुस्तक केशवराव जेधे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आणि आर एन लाड यांनी हे पुस्तक छापले. पुस्तकाची प्रस्तावना केशवराव बागडे या ब्राह्मणेतर वकिलांनी लिहिली होती. हे पुस्तक टिळक आणि चिपळूणकर यांच्यावर तीव्र टीका करणारे होते. पुस्तकातील भाषा ज्वलंत होती. टिळक आणि चिपळूणकर हे राष्ट्रीय नायक नसून देशाचे शत्रू आहेत असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की ब्राह्मणांना जनमाणसात फूट पाडून आणि त्यांना जन्मताच श्रेष्ठत्व आणि कनिष्ठतेच्या कल्पनांमध्ये अडकवून त्यांची सत्ता आणि जातीय श्रेष्ठता मजबूत करायची होती. त्यांनी सर्व हिंदूंना ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीतून आणि जातीय व्यवस्थेच्या साखळीतून मुक्त व्हावे असे आवाहन करून पुस्तकाचा समारोप केला. जे ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ समजणे सोडून देह रक्ताने जनतेशी एकजूट करतात त्यांनाच मित्र मानले पाहिजे असेही त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले.
त्यांनी ब्राह्मण जातीवर जोरदार टीका केली असली तरी त्यांनी त्या काळातील आगरकर, गोखले, रानडे अशा पुरोगामी ब्राह्मण नेत्यांबद्दल या पुस्तकात अनुकूलपणे लिहिले आहे हे विशेष.
केशव सिताराम ठाकरे यांच्यासारख्या काही ब्राह्मणेत्तर नेत्यांनी या पुस्तकाचे कौतुक केले असले तरी त्यामुळे ब्राह्मण गटात मात्र खळबळ उडाली. सप्टेंबर १९२५ मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे पुतणे श्रीकृष्ण माधव चिपळूणकर यांनी जवळकर, जेधे, लाड आणि बागडे यांच्या विरुद्ध त्यांच्या कुटुंबाची बदनामी केल्याबद्दल खटला दाखल केला. सप्टेंबर १९२६ रोजी शहर दंडाधिकारी यांच्या समोर हा खटला चालवला गेला. जवळकर आणि लाड यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. जेधे आणि बागडे यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली या चौघांनाही न्यायालयाने आर्थिक दंड ठरवला या सर्वांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
जवळकर आणि इतरांनी १९२६ मध्ये उच्च न्यायालयात अपील केले. अपिलात डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी जवळकर यांच्या बाजूने केस लढवली आणि खटला जिंकला. चारही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. डॉक्टर आंबेडकरांनी लढवलेल्या खटल्यांपैकी "देशाचे दुश्मन" हा खटला प्रमुख खटला म्हणून नोंदवला गेला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे कायदामंत्री देखील झाले.
राजकारणातील सहभाग
१९१९ मध्ये माँटेग्यू चेम्स फोर्ड च्या निकालांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये ब्राह्मणेत्तर जातींसाठी सात जागा राखीव ठेवल्या होत्या. याच काळात काही ब्राह्मणेत्तर नेते ज्यांची कामे पूर्वी सामाजिक कार्यापुरतीच मर्यादित होती त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेण्यास सुरुवात केली. या काळात जवळकरांनी बराच प्रवास केला मे १९२७ मध्ये त्यांनी जेथे यांच्यासह मध्य प्रांत आणि बेरारचा दौरा केला आणि अनेक ठिकाणी भाषणे दिली. त्याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाड सत्याग्रहाला पाठिंबा जाहीर केला आणि मनुस्मृति जाळण्यास ही भाग नोंदवला. १९२७ मध्ये ब्रिटिश सरकारने भारतीयांना अधिक राजकीय अधिकार देण्याचा विचार करण्यासाठी सायमन कमिशन नेमले. आयोगात भारतीय सदस्य नसल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह ब्राह्मणेत्तर पक्षांनी या आयोगावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तथापि नैराश्यग्रस्त समुदायांच्या नेत्यांनी आयोगाच्या कामकाजात सहभागी व्हावे आणि त्यांच्या सदस्यांवर दबाव आणावा असा पर्यायी विचार देखील काहींनी केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर १९२८ मध्ये आयोगासमोर साक्ष दिली जवळकरांनी आयोगाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यामुळे त्यांचे आणि त्यांचे दीर्घकाळचे सहकारी केशवराव जेधे यांच्यात तेढ निर्माण झाली. १९२७ मध्ये जवळकर यांनी मराठी वृत्तपत्र कैवारीचे संपादन भास्करराव जाधव यांच्याकडून स्वीकारले ते दुसरे ब्राह्मणेत्तर नेते आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी चे विधानसभेचे सदस्य होते. जाधव यांना निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होण्यासाठी जेधे यांचा विरोध होता. जाधव यांच्याबरोबर सहकार्य केल्याने जेधे आणि जवळकर यांच्यात आणखी मतभेद निर्माण झाले तथापि कैवारी या वृत्तपत्रातील त्यांच्या कामामुळे त्यांना मुंबईतील गिरणी कामगारांचा पाठिंबा मिळाला. 
त्यांनी कामगार संघटनेला सक्रिय पाठिंबा दिला आणि ब्रिटिश सरकार आणि भांडवलशाही या दोघांविरुद्ध कामगारांनी समान संघर्ष केला पाहिजे असे मत नोंदवले. जवळकर यांनी ब्राह्मणेत्तर चळवळीला पुढे नेण्यासाठी १९२९-३० ला इंग्लंडला भेट दिली. भारतात परतल्यावर जेधे यांच्या नेतृत्वाखालील ब्राह्मणेत्तरांच्या गटाने जाधव यांच्याशी युती केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात होती. इंग्लंडच्या भेटीमुळे जवळकरांमध्ये राष्ट्रवादी भावना तीव्र झाल्या आणि त्यातून ते ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले. १९३० मध्ये एक राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी म्हणून भारतात परत आले ते समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी तसेच कट्टरपंथी व भांडवलशाही विरोधी चळवळ करण्यासाठी आणि राष्ट्रवादी शेतकरी चळवळ तयार करण्यासाठीच. ब्राह्मणेत्तर पक्षाने आपले जात प्रदर्शन करणारे नाव बदलून शेतकरी पक्ष हे नवीन नाव धारण करावे असा प्रस्ताव  त्यांनी त्यावेळी मांडला.
इंग्लंडहून परत आल्यावर देखील जवळकर यांनी लेखन सुरू ठेवले. क्रांतीचे रणशिंग नावाचे पुस्तक लिहिले जे मराठीतील सुरुवातीच्या मार्क्सवादी पुस्तकांपैकी एक आहे. या पुस्तकात त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रारंभ बिंदू म्हणून विचार केला आणि धार्मिक बंधने तोडल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचले. भारतीय शेतकऱ्यांनी समाजवादाच्या तत्त्वानुसार एकत्र येऊन शेतकरी स्वराज्य निर्माण केले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. दिनकरराव जवळकर यांनी १९३१ मध्ये तेज या वृत्तपत्राचे काही महिने संपादन देखील केले. त्यांचे लेखन समाजवादाकडे अधिक वळले आणि त्यांचा सुर अधिक क्रांतिकारक झाला. तेज वृत्तपत्रांमध्ये त्यांनी शेतकरी सैन्याची उभारणी आणि स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाची तयारी असे काही मूलगामी लेख लिहिले जेथे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की भांडवलशाही, सरंजामशाही आणि साम्राज्यवाद हे जनतेचे तीन प्रमुख शत्रू आहेंत. जवळकर यांनी आपल्या लेखनातून व भाषणातून ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेची त्यांच्या काळातील इतर कम्युनिस्ट नेत्यांनी इतका मजबूत संबंध निर्माण केला होता. भ्रमण्यतर पक्षांतर्गत एक सुव्यवस्थित राज्यघटना भांडवलशाही विरोधी विचारसरणी आणि त्यांचे चिन्ह म्हणून नांगर असलेला नवाच गट तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
आजारपण आणि मृत्यू
इंग्लंडहून परतल्यावर जवळकर बहुतेक आजारीच असत. दरम्यान त्यांचे दौरे आणि भाषणे मात्र सुरूच होती. मार्च १९३१ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी ब्राह्मणेत्तर चळवळीच्या निमंत्रणावरून नागपूरला भेट दिली. ते नागपूरला आजारी पडले. परत येताना त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहात भाग घेतला नाशिक येथे त्यांची तब्येत आणखीनच खालावली आणि ते पुण्यात परत आले जेथे त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. ३ मे १९३२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी इंदुताई आणि मुलगा शिवाजीराव होते. जवळेकरांनी ब्राह्मणेत्तर पक्षांतर्गत सुसंघटित शेतकरी संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जरी त्यांच्या प्रयत्नाला त्यांच्या जीवनात अपेक्षित यश आले नाही तरी त्यांच्या मृत्यूनंतर दीड दशकांनंतर शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली गेली. पुढे दिनकरराव जवळकर समग्र वाड्मय नावाने लेखक संपादक य दि फडके यांनी दिनकर रावांच्या साहित्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले.

No comments:

Post a Comment

ऐसे कैसे झाले भोंदू...!

'प्लेबॉय' म्हणून शोभेल अशा लीला करणारा भोंदू, रुपाली चाकणकर यांचा 'पांडुरंग', कथित ज्योतिषी अशोक खरा...