"गुरुवारी गांधी जयंती, धम्म परिवर्तन दिन, संघाची शताब्दी, शिवसेनेचे मेळावे, शिवाय भगवानगड अन् नारायणगडावरचे मेळावे, या साऱ्या कोलाहलात गांधी अन् त्यांचे विचार हरवून गेले. 'मनुस्मृती नाही तर भीमस्मृतीनं देश चालेल...!' असं सांगितलं गेलं तरी वास्तवात ते दिसत नाही. गांधीं मार्गानं आंदोलनकर्त्याना देशद्रोही ठरवण्याची अहमहमिका भक्तांमध्ये लागलीय. अशांना आंदोलनजीवी म्हटलं गेलं. पण मूळ प्रश्नांशी भिडण्याची हिंमत राजसत्तेला नाही. राजसत्तेचा दूजाभाव जनता अनुभवतेय. जगातल्या ७८ देशात गांधीचा विचार जोपासला जातोय, इथं मात्र नत्थुरामाचा जागर केला जातोय.  आज असंतोष खेड्यापाड्यातून वाढतोय. पुन्हा गांधी शेतातून, गावातून अंकुरतांना दिसतोय! निदान शेतकऱ्यांची पोरं तरी आता चूप बसणार नाहीत, असं वातावरण निर्माण झालंय...! तीसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी पुन्हा गांधी परतून येतोय..!"
----------------------------------------------------
*तु*म्ही जर मराठी असाल तर तुमच्या आयुष्यात अत्रे आणि पु. ल. कधी आले, हे कळतसुद्धा नाही. भारतीय असाल तर गांधी कधी आले हे लक्षातही राहत नाही. मला अंधुकपणे पु. ल. कधी आले हे आठवतंय. शि. द. फडणीसांचं पुस्तक खूप लहानपणी चाळलं. काहीच कळत नव्हतं तेव्हा. त्याच सुमारास महाबली वेताळ वगेरे कॉमिक्स वाचायचो. तेव्हा एक कॉमिक्स चक्क गांधींचं होतं. एका संध्याकाळी मी ते कॉमिक्स वाचलं. गांधीजींनी घरातलं सोन्याचं कडं विकल्याची गोष्टच तेवढी त्यातली आठवतेय. गांधीजींचा धडा अभ्यासक्रमात होता, ज्यामध्ये त्यांना कोणीतरी जॉन रस्किनच ‘अन टू द लास्ट’ हे पुस्तक वाचायला दिलं अन् त्यांनी ते वाचलं, असा उल्लेख होता. ‘माझे सत्याचे प्रयोग’ मधला तो भाग असावा. त्यानंतर गांधींविषयक कितीतरी पुस्तकं वाचली. पण अलीकडंच माझ्या हातात ‘गांधी ऑन नेहरू’ नावाचं एक लठ्ठ पुस्तक पडलं. त्याबद्धल लिहायलाच हवंय. गांधीजीनी विपुल लेखन केलंय. ’यंग इंडीया’, ‘ओपिनियन’, ’हरिजन’, यातून ते नियमित लिहित. शिवाय त्यांनी हजारोंनी पत्रं लिहिलीत. शेकडो भाषणं केलीत. या साऱ्याचं नीट दस्तावेजीकरण करण्याचं श्रेय १९२० पासून त्यांचे सहायक म्हणून काम पाहणारे महादेवभाई देसाई आणि त्यांचे सहकारी प्यारेलाल यांना जातं. १९४२ साली महादेवभाईंचं निधन झाल्यावर गांधीजीच्या निधनापर्यंत ही जबाबदारी प्यारेलाल यांनी सांभाळली. यातूनच पुढं इंग्लिश, हिंदी मग मराठीतून त्यांची भाषणं, पत्रं, लेख इतकंच काय प्रसंगी जे काही केलं यांचं संकलन सुरु झालं. या संकलनाच्या आधारे अनेकांनी गांधी विचारांचा परामर्श घेतला किंवा चरित्रासाठी उपयोग केला. 'गांधी ऑन नेहरू' हे असंच एक पुस्तक आहे. गांधीजींचं नेहरूंवर विलक्षण प्रेम होतं. नेहरुंनीही गांधीजींच्या सहवासात आल्यावर आपली संपत्ती अन् करियरचा त्याग करून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. हा इतिहास सर्वांना माहितीय. हे नातं केवळ परस्पर कौतुकाचं नव्हतं तर वेळप्रसंगी विरोधाचं आणि मतभेदाचंही होतं. जवळपास ७०९ पानात दोघांचंही एकमेकांबद्धलचं उदगार किंवा त्यांच्या संदर्भातल्या गोष्टी संपादक आनंद हिंगोरानी यांनी केलंय. नेहरू वयाच्या २२ व्या वर्षी गांधीजींच्या प्रभावाखाली आले. लाहोर इथं भरलेल्या काँग्रेस अधिवेशनापासून त्यांनी गांधीजींचं शिष्यत्व पत्करलं. १९३० पासून ते साबरमती आश्रमात राहू लागले. काही काळ त्यांनी गांधीजींचे सहाय्यक म्हणूनही काम केलं. त्यांनी सतत गांधींविषयक कागदपत्रं जमवायचा ध्यास घेतला होता. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच गांधीजींचं हे उदगार नमूद केले आहेत की, 'जवाहर हा खरंच माणसांमधला हिरा आहे. ज्या मातीत तो जन्माला आला ती भाग्यवानच....!' आणि नेहरू गांधींबद्धल काय म्हणतात हे ही दिलंय.
‘गांधीजींची जी लोकशाही कल्पना आहे त्याचा संबंध आकड्यांशी किंवा बहुमताशी नाही. प्रतिनिधित्वाचा जो नेहमीचा अर्थ अभिप्रेत आहे, त्याच्याशीही नाही. त्यांची लोकशाही ही सेवा, त्याग आणि नैतिक दडपण यावर आधारलेली आहे....!' ते सांगतात की, ‘मी लोकशाही तत्त्वाला म्हणूनच जन्मलो. त्यांचं म्हणणं असं आहे की, मी दावा करू शकतो की, मी गरीबातल्या गरीब माणसाशी तद्रूप होऊ शकतो. तो जसा जगतो, त्यापेक्षा वेगळं मला जगायचं नाही. त्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी माझी जी काही क्षमता आहे ती मी सगळी पणाला लावतो...!' 
गांधीजी लोकशाहीवादी असोत वा नसोत. मात्र ते या देशातल्या गरीब समूहाचं प्रतिनिधित्व करतात, हे मानावंच लागेल. कोट्यवधी लोकांच्या इच्छा, आकांक्षा, मन याच्याशी ते एकरूप झालेलेत. आणि हे काहीतरी प्रतिनिधित्वापेक्षा खूप वेगळंय. या कोट्यवधी लोकांच्या इच्छा-आकांक्षेला त्यांच्या रुपात शरीर मिळालेलंय. अर्थातच ते काही सामान्य माणूस नाहीत. तीव्र बुद्धिमत्ता, विलक्षण दृष्टी, प्रत्येक गोष्टीत रस, कायम उच्च तत्वानं सगळ्यांशी पाहणं आणि मानवीवृत्ती हे सारं त्यांच्यात एकवटलेलंय. हा असा ऋषी आहे की, ज्यानं आपल्या इच्छा, आकांक्षा, भावना दाबून टाकल्या. त्यांचा आध्यात्मिक दृष्टीनं चँनेलाइज केल्या. एक विलक्षण व्यक्तिमत्व जे चुंबकाप्रमाणं लोकांना खेचून घेतं. त्यांना स्वत:शी जोडायला लावतं. त्याच्या साऱ्या निष्ठा आपल्यावर एकवटायला लावतो. हे सारं अशिक्षित सामान्य माणसाला आढळून येणारं नाहीत. पण तरीही ते सामान्यातले सामान्य आहेत. त्यांच्याकडं पाहिल्यावर देशातल्या सामान्य खेडूताला पाहतोय असंच वाटतं. हा खेड्यातला माणूस जसा अनेक गोष्टींकडं दुर्लक्ष करतो तसंच तेही करतात. पण भारत हा खेड्यात राहणाऱ्यांचा देश आहे. त्यामुळंच ते या देशाला चांगलंच ओळखतात. त्याचे छोटेसेही आघात, त्याच्या परिस्थितीची वळणं ही सारी त्यांना अंतर्ज्ञानानं जणू माहित होतात. त्यांची कृती ही मानसशास्त्रीयदृष्ट्या चालायला योग्य प्रतिसाद देणारी असते. तर दुसरीकडं ते म्हणतात, ‘या छोट्या चणीच्या माणसात काहीतरी पोलादाचं तत्व आहे. काहीतरी कठीण खडकासारखं, त्यामुळंच कुठल्याही शारीरिक ताकदीपुढं तो झुकत नाही. मग ती ताकद कितीही मोठी असो. जरी शरीर सामान्य वाटलं, वा त्याचं साधे कपडे, उघडं शरीर तरीही त्यामध्ये एक राजेशाही थाट आहे. एखाद्या सम्राटासारखी ताकद आहे. त्यामुळंच त्यांच्या इच्छेखातर इतरेजन पाहिजे ते करायला तयार होतात. जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक ते साधं, हंबल राहतात. पण त्यांच्यामध्ये ताकद, अधिकार पूर्णपणे एकवटलेलंय. त्यांना याची जाणीव आहे. अनेकदा ते जी आज्ञा देतात त्या पाळणं इतरांना भागच असतं. त्यांचे शांत, अर्थगर्भ डोळे आपल्या समोरच्याचाच वेध घेतात. त्याच्यात खोलवर शिरतात. त्यांचा आवाज स्पष्ट अन् जुनाट वाटला तरी तो तुमच्या हृदयात शिरतो..!' गांधी नेहरूंनी मध्यमवर्गाला काय दिलं तर, सामुदायिक नीतीमत्तेचं महत्त्व, सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, राजकारण आदर्शवाद यांचा परस्परसंबंध या तीन तत्वांना स्वीकृती. बुद्धीनिष्ठ, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा, पश्चिमात्य मापदंडानं मोजता येईल असा आधुनिक औद्योगिक भारत. गोरगरिबांबद्धल सामाजिक कणव, समाजानं, देशानं गरीबांच्या उन्नतीसाठी झटावं ही श्रद्धा. भारतासारख्या गरीब देशात संपत्तीच्या ओंगळ प्रदर्शनावर प्रतिबंध. असं प्रदर्शन हीन अभिरुचीचं द्योतक ही भावना. स्वावलंबन या ध्येयाचा स्वीकार. भारताच्या अंगभूत आर्थिक शक्तीबद्धल आशावाद. देशबाह्य दडपणापासून स्वत:चा बचाव करण्याची राजकीय निवड. देशातल्या धार्मिक दुफळीवर मात करणारी धर्मनिरपेक्ष राजवट...! जगात एक बलशाली, सर्वसंपन्न राष्ट्र व्हावं म्हणून गांधी, नेहरूंनी ध्यास घेतला होता. आज मात्र भारतीयांच्या मनातून त्यांना पुसून टाकण्याचा प्रयत्न होतोय. 
गांधीजी नेहमीच नेहरू कुटुंबियांच्या संपर्कात असत. ही अर्थातच खूप श्रीमंतीत वाढलेली मंडळी होती. लहानपणीच्या आठवणीत दंड न भरल्यानं ब्रिटीशांनी कसं घरातलं फर्निचर नेलं ते इंदिराजींच्या आठवणींच्या छोटेखानी पुस्तकात आढळतं. अलाहाबादला ‘आनंदभवन’ या अलिशान घरात ते राहत. ते घरही मोतीलाल नेहरूंनी राष्ट्राला देऊन टाकलं. तेव्हा त्यांनी देशाला खूप काही दिलंय. त्यात विटा, सिमेंट कशाला? असं, गांधीजींनी म्हटलंच. पण आपण मोतीलालजींच्या त्यागाला आश्वासक असं वागुयात, असं देशवासियांना आवाहन केलंय. देश स्वतंत्र झाल्याझाल्याच गांधीजींचा खून झाला तेव्हा नेहरू म्हणाले, आपल्या साऱ्यांच्या आयुष्यातून उजेड निघून गेलाय...!' पण सावरून नंतर या खंडप्राय देशाचं नेतृत्व करताना शांत, निधर्मवाद, गरिबांच्या हिताचा समाजवाद अशा गोष्टींची कास धरली. जागतिक राजकारणात कुठल्याही एका महासत्तेकडं झुकण्याचं त्यांनी टाळलं. विज्ञान, प्रगती, आधुनिकता, अहिंसा या गोष्टींचा कायम आग्रह राखला. गांधींजींचं सारं काही त्यांना मान्य नव्हतं. पण जे मान्य होतं त्याची कास ते धरून राहिले. गांधीच्या राजकारणाचा तेव्हा फार बोलबाला होता. पण त्याबद्धल नेहरूंना काही शंका होत्या. याबाबत ते आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ’फार वर्षापासून मी या गोष्टीवर विचार करतोय की, ज्या गरिबांबद्धल गांधीना एवढा कळवळा आहे, त्यांना चिरडणाऱ्या, अन्याय्य अशा समाजव्यवस्थेला गांधी का बरं टिकवू इच्छितात? गांधींना अहिंसा प्यारी आहे ना? मग सध्याची समाजव्यवस्था ही केवढ्या घोर हिंसेवर, पाशवी बळावर उभी आहे हे त्यांना दिसू नये? गांधीना ही अन्याय्य व्यवस्था टिकवून ठेवायची आहे असं म्हणता येणार नाही. कदाचित त्यांनी ती व्यवस्था मुकाट्यानं स्वीकारली मात्र आहे...!' या अन्याय्य व्यवस्थेबद्धल १९३५ च्या सुमारास नेहरू स्पष्टपणे म्हणाले, ’गेल्या सतरा वर्षात कॉंग्रेसला ज्या नेतृत्वानं दिशा दिली, ते सगळे मध्यमवर्गीय पार्श्वभुमीतून आले होते. काँग्रेसवाले काय किंवा स्वत:ला उदारमतवादी म्हणवून घेणारे काय, दोघांची सांस्कृतिक पार्श्वभूमी, सामाजिक जीवन, लोकसंपर्क, मैत्री इ. चे. जग एकमेकांपासून फार भिन्न नव्हतं. वरवर बघता या दोन गटांच्या राजकीय आदर्शांमध्ये तफावत दिसत असली, तरी तो आदर्श मूलत: ‘बूर्झ्वा’च होता..!' कॉंग्रेसकडं कनिष्ठ मध्यमवर्गाचा ओढा होता, हे नेहरू मान्य करतात. पण याबाबतीत आपला अंतिम निष्कर्ष देताना ते म्हणतात, ‘असं जरी असलं तरी कॉंग्रेसमध्ये उच्च मध्यमवर्गाचेच प्राबल्य होतं. हे निर्विवाद. काँग्रेस संघटनेत संख्येनं भलेही कनिष्ठ मध्यमवर्गाचं प्राबल्य असो, पण या संघटनेचं नेतृत्व उच्च मध्यम वर्गाच्याच हाती होतं. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही...!' स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गांधी हे देशाचे सर्वात मोठे नेते होते. नेहरू घराणं स्वातंत्र्याच्या लढाईत अग्रभागी होतं. पंडित मोतीलाल नेहरू पासून जवाहरलाल नेहरू देखील अनेक वर्षे जेलमध्ये होते. स्वतःची संपत्ती नेहरू घराण्यानं देशासाठी दान केली होती. नेहरू-गांधींना बदनाम करणारे लोक इंग्रज धार्जिणे किंवा त्यांचे वैचारिक वारस आहेत. अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन हे जरा वेगळे होते. ते असे कारस्थानी नव्हते. हिंसक नव्हते. अडवाणी मात्र मोदींची पहिली आवृत्ती होती. आता स्वतःच्या कर्माची फळं ते भोगताहेत. आज गांधीही नाहीत, नेहरुही नाहीत, डॉ. बाबासाहेबही नाहीत! पण राजसत्ता नत्थुराम गोडसेच्या विचारांचं आहे! त्यांच्या भक्तांचं आहे. शिवाजीमहाराज, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा जप करणारं, त्यांचा वारसा सांगणारे या राजसत्तेत सहभागी आहेत. देशाचं दुर्दैव असं, की गांधीचा, नेहरूंचा विरोध करणाऱ्यांना या राजसत्तेच्या काळात चांगले दिवस आलेत. कळत नकळत संघाच्या सुरात सूर मिसळून गांधींचा विरोध करणारांची मोठी गर्दी जमा झालीय. वैचारिक मतभेद वेगळे, त्याचं स्वागत केलंच पाहिजे. पण द्वेष वेगळा हेही समजून घेतलं पाहिजे. गांधींचा द्वेष हाच काही लोकांच्या पोटापाण्याचा धंदा आहे. देशाला पुन्हा एकदा गांधींची गरज आहे.  
आज राजसत्तेची दहशत आहे. सगळीकडे लूट सुरू आहे. एकेक अवयव विकणं सुरू आहेत. एवढ्या वर्षांच्या त्यागातून, नियोजनातून, समर्पणातून हा देश उभा राहिलाय. तो पुन्हा मातीत घालण्यासाठी हे प्राणपणानं कामाला लागलेले आहेत. आपण काय करतो आहोत, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. एकजात सारे वैचारिक दिवाळखोर बनलेत. राजसत्ता कुणाचंही ऐकत नाहीत. राजसत्तेतल्या मोदी-शहा यांचा इतिहास माहीत असल्यामुळं भाजप अन् संघातले नेतेमंडळी कोमात गेलेले आहेत. त्यांची जुनी पापं आता त्यांच्याच बोकांडी बसलीत. अशी भीती त्यांना वाटतेय. न्यायालये व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांनाही ऑक्सीजन हवाय. देश संकटात आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारखानदार, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, छोटे दुकानदार, मोजके आणि इमानदार पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सारे सारे दहशतीखाली आहेत. अकरा वर्षातल्या तुघलकी कारभारामुळं लोक बर्बाद झालेत. कर्जामुळं आता व्यापारी, उद्योगपती, डॉक्टर, प्राध्यापक यासारखे लोक सुद्धा सहकुटुंब आत्महत्या करायला लागलेत. सारा पैसा देशाबाहेर जातोय. मागोमाग मोठमोठे उद्योगपती सहकुटुंब देशाबाहेर जाताहेत. भाजपचे सारे खासदार, नेते शेपट्या टाकून नव्हे, तर शेपट्या कापून बसलेत, असं वाटावं अशी स्थिती झालेलीय. मिळेल ते बिस्कीट खाऊन दिवस काढताहेत. या देशाला मंत्रिमंडळ आहे याच्या खुणाही फारशा कुठं दिसत नाहीत. राजसत्तेचा, मोदी-शहांचा काहीही करून निवडणुका जिंकणं, हाच जणू त्यांचा धर्म बनलाय. तोच त्यांचा अजेंडा आहे. त्याशिवाय मोदी-शहा यांना पर्याय देखील नाही. असं चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत. त्यांचे पराक्रम एवढे आहेत, की जर त्यांच्या हातातून राजसत्ता गेली, तर आपलं काय होईल, या भीतीनं त्यांना झोप येत नसावी. 
अशा परिस्थितीत मानसिक संतुलन राखणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. तोच त्यांचा प्रॉब्लेम आहे. अर्थात, संघाला, भाजपेयींना याची आता पूर्ण कल्पना आलेलीय. ते बोलत नसले तरी आतून मात्र हादरलेत. २०१४ नंतर त्यांनी अन् अंधभक्तांनी देशात जेो धुमाकूळ घातलाय, त्यामुळं आता त्यांना आपली भूमिका कशी बदलायची ही अडचण झालीय. आंधळे भक्त असोत की भक्तिनी, साऱ्यांनीच मर्यादा ओलांडून टाकल्या होत्या. आता त्यांची गोची झालीय. कुणाला सांगताही येत नाही अन् सोसवतही नाही. मात्र ही कोंडी फोडावी लागेल. झालेल्या चुका विसरून एकमेकांना समजून घ्यावं लागेल. प्रमाण कमी जास्त असू शकतं, पण अतिरेक दोन्ही बाजूंनी झालाय. दोन्ही बाजूंनी चुका झाल्यात. त्याची फळं आपण सारेच भोगतो आहोत. सर्वांनीच प्रायश्चित घेण्याची गरज आहे. यावेळी संघ आणि भाजपेयींची भूमिका ऐतिहासिक आहे तशीच ती महत्वाची आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांनी देखील गांभीर्यानं एकत्र आलं पाहिजे. काही लोकांनी आपलं उठवळ राजकारण अशावेळी बाजूला ठेवलं पाहिजे. देश अस्वस्थ आहे. आधी देश वाचवला पाहिजे. यातलं वास्तव पहायला हवंय. संघ, भाजपमध्ये तशा हालचाली देखील सुरू झालेल्यात. अलीकडं गडकरी ॲक्टिव झालेले दिसतात. आणखीही काही लोक नजीकच्या काळात बोलायला लागतील. न्यायालयं नव्या जोमानं हिम्मत करायला लागलीत. काँग्रेस देखील ॲक्शन मोडमध्ये आलीय. मात्र भाजपमधून एखादा स्वाभिमानी नेता पुढं आला तरच हे शक्य आहे. ज्याला कुणाला वाटत असेल त्यानं हिम्मत करायला हवी. पण हे होणं नाही. सर्वांनी शहाणपणा दाखवून एकत्र यावं. आज असंतोष खेड्यापाड्यातून वाढतोय. पुन्हा गांधी शेतातून, गावातून अंकुरतांना दिसतोय! निदान शेतकऱ्यांची पोरं तरी आता चूप बसणार नाहीत, असं वातावरण निर्माण झालंय...! दुसऱ्या की तीसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी पुन्हा गांधी परतून येतोय..!
हरीश केंची,
९४२२३१०६०९
 
No comments:
Post a Comment