Saturday, 25 October 2025

कबूतर जा... जा.... जा


अरेबियन नाईटस् कथांमधील निरोप्याचं काम करणारी कबुतरं मुंबईत राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली आहेत. दोन महिन्यांपूर्वी भूतदयावादी जैन बांधवांनी दादर कबुतरखान्यावर आच्छादलेल्या ताडपत्र्या, चाकू-कात्र्या घेऊन, कापून काढल्या होत्या, त्यामध्ये महिला आघाडीवर होत्या. सर्वत्र टीका झाल्यावर त्यांच्यावर महानगरपालिकेनं गुन्हे नोंदवलेले होते. त्यानंतर परम अहिंसक मुनींनी सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिलं होतं. न्यायालयाचा निर्णय मानणार नाही. असा पवित्रा घेतला होता. अध्यात्म कायद्याचं राज्य मानत नाही. याला असं म्हणावं काय? पण कायद्याचं राज्य तर ,सर्वच धर्मांना, गुण्यागोविंदानं नांदण्याचं स्वातंत्र्य देतं. कायद्याला न जुमानणाऱ्या मुनींमधील अहंकार किती पराकोटीचा आहे. हे त्यांच्या ताज्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे.
"एखाद-दुसरा माणूस मेला तरी हरकत नाही,पण कबुतर जगलं पाहिजे" असं प्रवचन देणाऱ्या मुनींनी आपलेही पाय मातीचेच आहेत, याची कबुली दिली आहे. धर्म तर्कशास्त्र मानणारा आहे, विज्ञानवादी आहे, असं समजलं जातं. ते खरंही असेल पण सध्या मुंबईत जे काही चाललं आहे, त्यावरुन ही जैनबुध्दी नसून राजकारणासाठी दुसराच मेंदू सध्या मुंबईत फिरत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवलेल्या होत्या. त्या आता जानेवारीपर्यंत उरकावयाच्या आहेत. गेली पाचसहा वर्षे महाराष्ट्राच्या दूषित राजकारणाचा गळू फुटून वाहात आहे. त्याचे ओघळ एका मुनीच्या बैठकीखाली वाहात आलेले आहेत. त्याच्या संसर्गानं मुनीची सगळी तपश्चर्या वाया घालवली आहे. मुंबईतील सगळेच जैन बांधव मुनींच्या मतांचे नाहीत. हे इथं ध्यानात घ्यावं लागेल. काही डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात हे सिद्ध केलेलं आहे की, कबुतरांच्या विष्ठेमुळं आणि पंखातील विषाणूंमुळं श्वसनाचे विकार होऊन फुफ्फुसे निकामी होतात. यावर मुनींनी डॉक्टरांना मूर्ख म्हणून आगपाखड केली आहे. त्यामध्ये जैन डॉक्टरांचाही समावेश आहे. जैन प्रॅक्टिशनर अधिक तर होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. कांदा-लसूण या उग्रांचं वावडं असल्यानं, सात्विकता म्हणून होमिओपॅथी प्रॅक्टिस करीत आहेत. पण बोलणं आणि कृती यांमध्ये जी ठासून भरलेली हिंसा आहे. ती होमिओपॅथी साबुदाणा गोळ्यांनाही दाद देत नाही. एका बाजूला व्यापारातून आर्थिक शोषण करायचं. दुसऱ्या बाजूला कबुतरांना दाणे टाकून पापक्षालन करायचं.
जर्दा-गुटक्याची लत लाऊन अन् कॅंसरचं इस्पितळही खोलायचं आणि पुण्यात्मा म्हणून मिरवूनही घ्यायचं. चोवीस तिर्थंकरांच्या शिकवणुकीवर पार बोळा फिरवला आहे.
कबुतरांबद्दल आकस असण्याचं काही कारण नाही, इतर पक्षांमुळंही असं होऊ शकतं. पण कबुतर माणसांच्या घराच्या आसपास सतत गिरक्या घेत असतात. वळचणीला त्यांनी संसार थाटलेला असतो. त्यामुळं कबुतरांच्या उपद्रवाचा अनुभव आला आहे. म्हणूनच कबुतरांबद्दल बोललं जातं. इतर पक्षांचा अनुभव आला तर, त्याबद्दलही बोललं जाईल. "जगा आणि जगू द्या" या वचनाला हरकत असण्याचं काही कारण नाही. पण कबुतरं जगविण्यासाठी माणसं मेली तरी हरकत नाही. असं म्हणणारे मुनी म्हणजे अहिंसेतही स्पृश्यास्पृश्य मानणारे म्हणावे लागतील. आपण कोणत्या थराला जात आहेत याचं भान त्यांनाही नाही. असो.
मुंबई हा देशाचा खजिना आहे. त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न अनेक दशकं चाललेला आहे. पण यश आले नाही. अनेकांनी,शंका व्यक्त केली आहे की, मुंबईतील काही राजकारण्यांनी ठरवलेलं आहे की, मुंबई बिगर मराठी माणसांनीताब्यात घेऊन पालिकेत ठराव करायचा की, मुंबईला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यायचा. कालांतरानं मुंबई गुजरातला जोडून घ्यायची. शंका व्यक्त करणाऱ्यांना हे ठाऊक नाही की, मुंबईसाठी मराठी माणसांनी जे रक्त सांडले होते त्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वाभिमानाची परंपरा आहे. सुरतेवर हल्ला करुन सुरतेला तेव्हाच इशारा दिला होता की, मराठी माणसांच्या नादी लागू नका. नाहीतर बद-सुरत करु.
वास्तविक कबुतर पालनाचा या राजकारणाशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्रात एकेकाळी, कबुतरांच्या अनेक ढाबळी होत्या. पण कालौघात जागेचं अपुरेपण शहारांची महानगरं बनली माणसांनाच खुराडी अपुरी पडू लागली आहेत, तेथे कबुतरांवर गंडांतर येणारच दाट लोकसंख्येच्या घनतेमुळं रोगराई लवकर पसरते. औद्योगिक मुंबई चोवीस तास जागी असते. त्यामुळं आसपासचं पक्षी जगतही जागं असतं. माणसांच्या सवयी पाखरांनाही लागतात. उडणाऱ्या पक्षांना वळचणीसाठी सातबाराच्या दाखल्याची आवश्यकता नसते. माणसांसारखी हाव पक्षांना नसली तरी निवाऱ्याला वळचण लागतेच. मानवी वस्तीत अन्नाची गरज भागते. हे त्यांना माहित झालं आहे. पण कबुतरांची गरज माणसांना नाही म्हणून निर्मनुष्य ठिकाणी कबुतरांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा आहे. जैनांना जे काही पुण्य कमवायचं आहे. ते त्या ठिकाणी जाऊन कमवावं. पण मतांसाठी माणसांचे बळी घेऊ नयेत. एकाच पक्षावर लक्ष्य केंद्रित करुन राजकीय पक्ष काय साधणार आहेत ? राजकीय सत्तेसाठी मतांची अशी गोळाबेरीज होणार असेल तर भारताचा प्रमुख उद्योग राजकारण आहे. तो घरांघरात चालत आहे. या कुटिरोद्योगापायी, नितीमत्ता हा शब्दही लुप्त होईल. तेव्हा पंचविसावे तीर्थंकर अवतरतील.

No comments:

Post a Comment

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...