प्रबोधन हे नाव खर्या अर्थानं सार्थ झालं ते 'प्रबोधन' पत्रामुळं. 'प्रबोधन'च्या माध्यमातून 'प्रबोधन'कार ठाकरे यांनी संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारचे ज्ञानचक्षू अर्थात बुद्धीचे डोळे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हे काम करताना ते कोणत्याही दडपणाला बळी पडले नाहीत. तसेच त्या काळात बुद्धिप्रमाण्यवादाचा किल्ला एकहाती लढवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम सांगता येईल.
'प्रबोधन'कार केशव सीताराम ठाकरे यांनी शंभर वर्षांपूर्वी 'प्रबोधन' नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं. या शताब्दीच्या निमित्तानं 'प्रबोधन'मधल्या प्रबोधनकारांच्या लेखांचा त्रिखंडात्मक ग्रंथ 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'नं प्रकाशित केला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं संपादन सचिन परब यांनी केलं. खरं तर 'प्रबोधन'कार ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री अशी आहे. प्रबोधनकारांच्या संस्कारात, तालमीतच बाळासाहेब ठाकरे लहानाचे मोठे झाले. इतकंच नव्हे, तर शिवसेना स्थापन करण्यामागची प्रेरणा बाळासाहेबांना प्रबोधनकारांकडूनच मिळाली होती. सचिन परब हे गेली कित्येक वर्षं सातत्यानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं 'रिंगण' नावाचा अंक प्रकाशित करतात, त्यादृष्टीनं त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. विशेष म्हणजे, दहा-बारा वर्षांपूर्वी त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंवर वेबसाईट स्वतः पुढाकार घेऊन केली होती. तेव्हापासून त्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचा ध्यास घेतला होता. त्यांनी संपादित केलेलं हे काम एक प्रकारचा कलशाध्यायच म्हणावा लागेल. कारण, 'प्रबोधन'चे अंक वाचकांसाठी कुठं उपलब्ध नव्हते. हे अत्यंत दुर्मीळ असे अंक सचिन परब यांनी मिळवले. या अंकातले प्रबोधनकारांचे लेख या त्रिखंडात समाविष्ट करण्यात आलेत. या खंडाचं नुकतंच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
अत्यंत परखड, स्पष्ट वक्ते, निर्भीड, निस्पृह पत्रकार अशी प्रबोधनकारांची महाराष्ट्राला ओळख आहे. समोरचा प्रतिस्पर्धी किती मोठा आहे, याचा विचार न करता सत्याचा पाठपुरावा करणं हे आपलं काम आहे, असं समजून प्रबोधनकारांनी लेखन केलं. भाषणं केली. त्यांचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होतं. ते नट होते. दिग्दर्शक होते. नाटककार होते. संशोधक होते. इतिहास संशोधक होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वक्तृत्वशास्त्रावरील पुस्तकानं झाली. हे पुस्तक मुद्रणालयात छापलं जात असताना काही कारणानिमित्त लोकमान्य तिथं आले होते. त्यांच्या नजरेस हे पुस्तक पडलं. त्यांनी ते चाळलं. तेव्हा प्रबोधनकार विशीच्या आसपास होते. या पुस्तकाचं कौतुक लोकमान्य टिळकांनी केलं होतं. त्यानंतरचं प्रबोधनकारांचं महत्त्वाचं काम वि. का. राजवाडे यांच्या संदर्भानं सांगता येतं. वि. का. राजवाडे यांनी केलेल्या संशोधनाचं महत्त्व खुद्ध प्रबोधनकारांनाच माहीत होतं. राजवाडे गेल्यानंतर प्रबोधनकारांनी लिहिलेल्या मृत्युलेखात राजवाड्यांच्या कामाचा यथोचित गुणगौरव केलाय.
पुढचा राजवाडे जन्माला येण्यासाठी काही शतकं लागतील, असं त्यांनी म्हटलं होतं. गुणगौरव केला, तशी राजवाड्यांवर टीकाही त्यांनी केली. राजवाडे चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी सांगू लागले. त्यांच्या सांगण्यामध्ये काही जातींचा अधिक्षेप कारण नसताना झाला, तेव्हा मात्र प्रबोधनकारांनी राजवाड्यांच्या संशोधनाची अक्षरशः चिरफाड केली. तसेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या आपल्या जातीचा किल्ला एकहाती लढवला. त्यांच्या या कामाचं मोल फार आहे. त्यांची ही कीर्ती राजर्षी शाहू महाराज यांच्यापर्यंत पोहोचली. मग शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना बोलावून घेतलं. शाहू महाराज अनेक बाबतींमध्ये प्रबोधनकारांना सल्ला देत. नंतरच्या काळात त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला. 'प्रभात'कार वा. रा. कोठारी, 'जागृती'कार भगवंतराव पाळेकर, श्रीपतराव शिंदे अशी किती तरी नावं सांगता येतील. त्याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक' सुरू केलं होतं. मुकुंदराव पाटील यांचं 'दीनमित्र' हे वर्तमानपत्रही चालायचं. त्याच काळात जहाल पत्रकार म्हणून ओळख असलेले दिनकरराव जवळकर हेही उदयाला येत होते. 'प्रबोधन'मध्ये ब्राह्मणेतर चळवळीचा प्रचार होता. आपल्याच ज्ञाती बांधवांचं जागरण करावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांच्यातल्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्यालाही दूर लोटावं, या पद्धतीनं त्यांनी 'प्रबोधन' हे पत्र चालवलं. त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळीला बुद्धिप्रामाण्यवादाचं अधिष्ठान लाभलं. ते देण्यात प्रबोधनकार ठाकरे यांचं योगदान फार आहे. ब्राह्मणांच्या देवांऐवजी आपल्या देवांची स्थापना करा किंवा त्यांच्या धर्मइतिहासाऐवजी आपला धर्म इतिहास लिहा, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये ते अडकले नाहीत. त्यापुढं जाऊन हिंदू धर्मासह एकूणच धर्मसंस्थेतल्या उणिवांवर प्रहार केले. धर्मात असलेल्या मध्यस्थावर कडाडून प्रहार केले.
त्या काळातल्या महाराष्ट्राचं वर्णन 'प्रबोधनयुग' असं केलं जातं. प्रबोधन हे नाव खर्या अर्थानं सार्थ झालं ते 'प्रबोधन' पत्रामुळं. 'प्रबोधन'च्या माध्यमातून प्रबोधनकारांनी संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रकारचे ज्ञानचक्षू अर्थात बुद्धीचे डोळे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, हे काम करताना ते कोणत्याही दडपणाला बळी पडले नाहीत. तसेच त्या काळात बुद्धिप्रामाण्यवादाचा किल्ला एकहाती लढवणं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम सांगता येईल. बर्याच लोकांना वाटायचं की, राजर्षी शाहू महाराज यांच्या गुडबुक्समध्ये प्रबोधनकार आहेत. याचा अर्थ शाहू महाराजांची प्रत्येक गोष्ट प्रबोधनकारांना मान्य होती, असं नाही. ज्या वेळेला प्रबोधनकारांनी आपलं विरोधी मत दर्शवलं त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांच्या मताचा आदरच केला आहे. माझ्या दृष्टीनं महाराष्ट्रातली ही फार महत्त्वाची जोडी होती. दुसरी जोडी अर्थातच कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांची. कर्मवीरांसाठी प्रबोधनकार हे गुरुतुल्य स्नेही होते. कर्मवीरांमुळंच प्रबोधनकारांनी मुंबईत सुरू केलेलं 'प्रबोधन' सातार्याला न्यायचं ठरवलं. पुढं त्यांनी 'खरा ब्राह्मण' नावाचं नाटक लिहिलं. संत एकनाथ यांच्या जीवनावर आधारित हे नाटक होतं. त्याचे खूप प्रयोग झाले. हे नाटक गाजलंही. आपल्या जातीवर टीका आहे, म्हणून काहीजणांनी कोर्टात जाऊन त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. प्रबोधनकारांनी गाडगे महाराजांचं, रंगो बापूजींचं चरित्रही लिहिलं. १८५७ च्या उठावात रंगो बापूजींचा फार मोठा सहभाग होता. त्यांचं चरित्र लिहावं, अशी शाहू महाराजांची इच्छा होती. प्रबोधनकारांनी ते लिहून शाहू महाराजांची इच्छा पूर्ण केली. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे, असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी 'शेतकर्यांचे स्वराज्य' लिहिलं. पुढं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या नेत्यांच्या बैठका प्रबोधनकारांच्या घरीच होत. त्यात श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी असे अनेक मोठमोठे लोक होते. या सगळ्या बैठकांमधूनच चळवळीनं आकार घेतला, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या अर्थानं प्रबोधनकारांनी कोणती संघटना बांधली नाही. त्यांनी स्वतःचा असा अनुयायी वर्ग केला नाही. त्यामुळं एरव्ही त्यांच्या विचारांचा तितका गौरव होेऊ शकला नाही. वास्तविक, त्यांनी केलेल्या कामाला श्रेय हे मिळायलाच हवं होतं. परंतु, इतिहास कधी तरी न्यायाधीश होतो आणि होऊन गेलेल्या लोकांचं मूल्यमापन करतो. त्याला काव्यगत न्याय म्हणायलाही हरकत नाही. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेले हे तीन खंड या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत.
हे सगळं साहित्य इंग्रजीत येणं ही गोष्टही महत्त्वाची आहे. या खंडांचं वाचकांच्या दृष्टीनं मोल काय आहे, तेही थोडक्यात सांगता येईल. एक तर महाराष्ट्राच्या इतिहासाची महत्त्वाची बाजू जी एरव्ही मुख्य प्रवाहात येत नाही, ती समजून घेण्यासाठी हे खंड वाचण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा की, १९२० ते १९३० हे दशक महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं एक केऑस आहे. नेतृत्वाच्या दृष्टीनं महाराष्ट्र या काळात चाचपडत होता. कारण, दोन महत्त्वाचे नेते एक राष्ट्रवादी लोकांचे नेते लोकमान्य टिळक आणि ब्राह्मणेतर पक्षाची बाजू लढवणारे शाहू महाराज दशकाच्या सुरुवातीलाच कालवश झाले होते.
त्यामुळं त्यांच्या अनुयायांसमोर चांगला नेता नव्हता. या काळात प्रबोधनकार ठाकरे पुढं येऊन महाराष्ट्रासमोरची वैचारिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यादृष्टीनं या त्रिखंडात्मक ग्रंथाचं महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रबोधनकारांचं या खंडात दडलेलं विचारधन वाचणं आवश्यक आहे.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावणारी थोर व्यक्तिमत्वं विसाव्या शतकात होऊन गेली, त्यातलं एक महत्त्वाचं नाव. महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरितींविरुद्ध उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, जातनिष्ठ इतिहास लेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्याने फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी वयाच्या सत्तरीत तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान, याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, विक्रेते, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व शब्दांत पकडणं कठीण आहे.
प्रबोधनकारांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३ चा. त्यांना ८८ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. हा बहुरंगी माणूस एका आयुष्यात अनेक आयुष्य जगला. पण त्यात त्यांची ओळख बनलं ते त्यांनी संपादित केलेलं 'प्रबोधन` हे नियतकालिक. १६ ऑक्टोबर १९२१ ला `प्रबोधन`नियतकालिकाचा पहिला अंक मुंबईहून प्रकाशित झाला. त्याला २०२१ च्या १६ ऑक्टोबरला शंभर वर्षं होतील. `प्रबोधन`चा शेवटचा अंक मार्च १९३० ला प्रसिद्ध झाला. या दरम्यान साधारण सहा प्रकाशन वर्षांत एकूण ९५ अंक प्रसिद्ध झाले. त्यापैकी ९१ अंक आज अभ्यासकांनी शोधून काढलेत.`प्रबोधन` नियतकालिकाने घडवलेली जागृती हा महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या, समाज सुधारणेच्या आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा फार महत्त्वाचा भाग आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीयुगाला सामोरं कसं जावं याविषयी महाराष्ट्र गोंधळलेला होता. त्याचबरोबर वेदोक्त प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद टोकाला गेल्याने महाराष्ट्र हादरलेला होता. या पार्श्वभूमीवर `प्रबोधन`चा जन्म झाला. त्यानंतरच्या म्हणजे १९२० च्या दशकातल्या जवळपास नऊ वर्षांच्या महत्वाच्या नोंदी `प्रबोधन`मध्ये आहेत. किंबहुना `प्रबोधन` हा या सगळ्या सामाजिक आणि राजकीय घुसळणीचा एक भाग आहे. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका आणि जपान यांचा महासत्ता म्हणून होणारा उदय, असहकार आंदोलन, मोपल्यांचा मलबार येथील हिंसाचार, खिलाफत चळवळ या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, तसंच १९२३ ची प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतल्या हालचाली, ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांच्या कारवाया, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांमुळे झालेले वाद, मुळशी सत्याग्रह, या महाराष्ट्रातल्या घडामोडींवर प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या महाराष्ट्रभर उत्तम जनसंपर्क असलेल्या अभ्यासू संपादकाने केलेली भाष्यं हा आज एक ऐतिहासिक दस्तावेज आहे.
त्यापेक्षाही महाराष्ट्रातल्या सामाजिक संघर्षाचा तपशीलवार पट `प्रबोधन`मधून उभा राहतो, तो महत्त्वाचा आहे. `मराठी वृत्तपत्रांचा इतिहास` या ग्रंथात रा. के. लेले म्हणतात, `ठाकरे यांच्या `प्रबोधन` पत्राची कारकीर्द अवघी पाचसहा वर्षांचीच होती. पण तेवढ्या अल्पावधीत त्याने केलेली वृत्तपत्राच्या आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रांतील कामगिरी न विसरता येण्यासारखी आहे. ठाकरे ह्यांच्या पत्राचे स्वरूप राजकीय प्रश्नांवर भर देणारे नव्हते. आगरकरांप्रमाणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे हे पत्र होते. आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा पाया अत्यंत शास्त्रशुद्ध होता. पण त्यांनी ज्या सुधारणांचा पुरस्कार केला, त्या पांढरपेशा वर्गापुरत्याच मर्यादित होत्या. त्यांच्या सुधारणावादाचे आवाहन बहुजन समाजापर्यंत पोचले नाही. त्यांनी म. जोतीराव फुले यांनी प्रसृत केलेले विचार आणि केलेले कार्य ह्यांची दखल घेतल्याचेही आढळत नाही. या दृष्टीने पाहीले तर ठाकरे ह्यांनी प्रबोधनाद्वारा ज्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला त्या अधिक व्यापक होत्या. या दृष्टीने ह्यांचे `प्रबोधन` आगरकरांच्या पुढे काही पावले गेलेले होते.`
`प्रबोधन`ने त्याच्या प्रकाशनकाळात महाराष्ट्रावर कसा प्रभाव टाकला, हे आचार्य अत्रेंच्या या उताऱ्यावरून लक्षात येऊ शकतं, `अच्युतराव कोल्हटकर यांच्या `संदेश` या पत्राने महाराष्ट्रात जी जागृती आणि खळबळ केली, तशाच प्रकारची खळबळ ठाकरे यांच्या `प्रबोधन`ने करून सोडली, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. सदर मासिकामध्ये पाच सहा वर्षेपर्यंत निरनिराळ्या सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर खळबळीत लेखमाला आणि निबंध लिहून ठाकरे यांनी बहुजन समाजाचे अक्षरशः `प्रबोधन` केले, यात संशय नाही. भिक्षुकी वृत्तीच्या आणि सनातनी दृष्टीच्या ब्राह्मण समाजावर अनेक निकराचे हल्ले त्यांनी आपल्या या पाक्षिकात चढविले, त्यामुळे `कोदण्डाच्या टणत्कारा`पासून ब्राह्मण विद्वानांत अप्रिय झालेले त्यांचे नाव अधिकच तीव्रतेने त्या समाजाच्या डोळ्यांत सलू लागले. तथापि, सनातनी भिक्षुक समाजात हे जितके अप्रिय ठरले, तितकेच ब्राह्मणेतर समाजामध्ये ते लोकप्रिय होऊन बसले....!`
प्रबोधनकारांनी मराठी समाजातले अनेक दोष १०० वर्षांपूर्वी दाखवलेले आहेत, जे आजही जसेच्या तसे आहेत. हुंड्याच्या विरोधात त्यांनी आंदोलनही केलं. पण आजही हुंडा थांबलेला नाही. भिक्षुकशाहीच्या विरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकलं होतं. पण आज जुनीच भिक्षुकशाही नवे मुखवटे घालून तसंच शोषण करते आहे. महाराष्ट्रातला इतिहास अजूनही स्वजातिभिमानाच्या चिखलात रुतून बसलाय. महिला सक्षमीकरणाची प्रबोधनकार सांगत असलेली निकड अजूनही कायम आहे. पूर्वीइतकी तीव्र अस्पृश्यता उरली नसली तरी जातिभेदाचे दुष्परिणाम महाराष्ट्र अजूनही भोगतोच आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाला `मानसिक गुलामगिरीविरुद्ध बंड` करण्याची ताकद आजही `प्रबोधन`कारांचे हे लेख देऊ शकतात. बहुजनवाद, हिंदुत्ववाद, गांधीवादच नाही तर कम्युनिझमविषयी आजच्या संदर्भात विचार करताना त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.
इंग्रजी शाळेत असतानाच प्रबोधनकारांनी इंग्रजीतून मराठीत अनुवाद केलेले दोन लेख करमणूक या आघाडीच्या साप्ताहिकात छापून आले होते. त्यांनी घरात दाबयंत्र तयार करून विद्यार्थी नावाचं हौशी साप्ताहिक चालवलं होतं. `प्रबोधन`कारांचं जन्मगाव पनवेलमध्ये पहिलं साप्ताहिक हे १९५० च्या सुमारास निघालं. तेही अल्पायुषी निघालं. १९६७ ला किल्ले रायगड हे दीर्घकाळ चाललेलं पहिलं साप्ताहिक पनवेलमधून सुरू झालं. हे लक्षात घेता एकोणिसाव्या शतकातच प्रबोधनकारांनी केलेला साप्ताहिक विद्यार्थीच्या प्रयोगाचं मोल लक्षात येतं. १७-१८ व्या वर्षी ते मुंबईच्या प्रसिद्ध तत्त्वविवेचक छापखान्यात असिस्टंट प्रूफरिडर म्हणून काम केलं. नंतर ते अनेक नियतकालिकांत सातत्याने लिहित होते. वयाच्या विशीत सांगलीकर नाटक मंडळीत असतानाच्या पंढरपूर आणि विजापूर अशा दोन शहरांतल्या मुक्कामांचं वर्णन त्यांनी केलंय. त्या दोन्ही ठिकाणी अनोळखी असणारे त्यांचे चाहते वाचक त्यांना शोधत आल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या नियतकालिकांत लिखाणाचा एक चाहतावर्ग तयार झाला होता. जळगावात असताना प्रबोधचंद्रिका साप्ताहिकाचे संपादक नारायण नरसिंह उर्फ नानासाहेब फडणीसांनी `प्रबोधन`कारांमधला संपादक नेमका हेरला आणि त्यांना एक सारथी नावाचं मासिक सुरू करायला लावलं. ते वर्षभर चाललं. प्रबोधनकारांच्या नोंदीनुसार हे सगळं १९०६-०७ मध्ये घडत होतं. याचा अर्थ प्रबोधनकार अवघ्या २१-२२व्या वर्षी संपादक बनले.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या वर्षाच्या अहवालात कायस्थदीप या पुस्तकावर एक २२ पानी लेख छापला. त्यात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजाची कुळी हीन असल्याचा आरोप केला. प्रबोधनकारांनी राजवाडेंचं संशोधन खोडून काढणारं पुस्तक लिहायचं ठरवलं. त्याचं कारण ते सांगतात, `एका काळच्या सत्तामदाने शिरजोर झालेले ब्राह्मण पंडित, इतिहास संशोधनाच्या किंवा आखणी कसल्या तरी फिसाटाच्या पांघरुणाखाली कायस्थादी ब्राह्मणेतरांवर आणि अनेक चित्पावनेतर ब्राह्मणांवरही हल्ले चढवायला सवकलेले आहेत. त्यांचा एकदा कायमचा पुरा बंदोबस्त केलाच पाहिजे या हिरीरीने मी कोदण्डाचा टणत्कार हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले.` कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी हे तडाखेबंद पुस्तक १७ नोव्हेंबर १९१८ ला प्रकाशित झालं. या ग्रंथाच्या सहा हजार प्रती अवघ्या पंधरा दिवसात संपल्याचा दावा प्रबोधनकारांनी केला आहे. कारण प्रबोधनकारांचा हा प्रतिवाद फक्त सीकेपींचा उरलेला नव्हता, तर तो ब्राह्मणी संशोधकांच्या बदनामी मोहिमांमुळे अस्वस्थ असलेल्या सगळ्याच ब्राह्मणेतरांचा झाला होता. याच दरम्यान वेदोक्त प्रकरण गाजत होतं. जातवर्चस्ववादाचं हिडीस रूप महाराष्ट्र बघत होता. त्यातून `प्रबोधन`कारांचंही विचारचक्र सुरू होती. त्यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोचले, ब्राह्मणेतर समाजाची पहिली गरज ही भिक्षुकशाहीच्या सापळ्यातून मुक्तता ही आहे. दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने सत्यशोधकी नियतकालिके सुरू करण्याचा धडाका सुरू होता. प्रबोधनकारांचा तर त्यांच्याशी आत्मीय स्नेह निर्माण झाला होता. त्यातून प्रबोधनकारांनी १९२१ च्या सप्टेंबर महिन्यात स्वतःचं वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला. `प्रबोधन`चा पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२१ ला प्रसिद्ध झाला
प्रबोधन`च्या कामासाठी प्रबोधनकारांनी दादर मधल्याच खांडके बिल्डिंगमध्ये एक ब्लॉक भाड्याने घेतला होता. तिथे अनेक तरुण `प्रबोधन`कारांकडे ओढले गेले. अभ्यास करण्यासाठी ते दिवसभर तिथेच असत. त्यातून स्वाध्यायाश्रम नावाची संस्था सुरू झाली. या तरुणांनी हुंडा विध्वंसन संघ स्थापन करून मुंबईत एक वादळच निर्माण केलं होतं. या संघटनेने प्रामुख्याने सीकेपी समाजातली हुंडा घेऊन होणारी लग्नं उधळून लावली. हुंडा निषेधाची गाणी गात मोठ्या मिरवणुका काढल्या. गाढवाच्या वराती घेऊन लग्नाच्या ठिकाणी हल्लाबोल केला. १९२२ -२३ च्या लग्नसराईत २०-२५ लग्नात हुंडा विध्वंसन संघाने धुमाकूळ घातला होता. या आंदोलनाला `प्रबोधन`चा सक्रिय पाठिंबा होता. खरं तर `प्रबोधन`च्याच नेतृत्वात हे सुरू होतं. हुंडा विरोधामागचा विचार `प्रबोधन`नेच समजावून सांगितला होता. हुंडा घेऊन लग्न करणाऱ्यांची नावं `प्रबोधन`मध्येच प्रसिद्ध होत.
याच काळात प्रबोधनकारांनी सरकारी नोकरी सोडली. त्यासाठी प्रबोधनकारांच्या आईचा विशेष आग्रह होता. त्या नेहमी सांगत की वेळ आली तर भीक माग पण इंग्रज सरकारची नोकरी करू नकोस. सरकारने परवानगी दिल्यामुळे `प्रबोधन` सुरू ठेवण्यात तांत्रिकदृष्ट्या अडचण काहीच नव्हती. पण प्रबोधनकारांच्या मनाला ते पटत नव्हतं. ते लिहितात, `एकीकडे नोकरी नि दुसरीकडे बहुजन समाज जागृतीचे कार्य, अशा परस्पर विरुद्ध दोन टोकांवरच्या डगरीवरचा कसरती खेळ माझ्या स्वभावाला पटेनासा झाला. सद्सद्विवेकबुद्धी सारखी टोचण्या देऊ लागली. सभांतून सरकारी धोरणांवर टीका करायची आणि प्रबोधनात मानसिक दास्याविरुदध बंड या विषयावर स्पष्टोक्तीची लेखमाला लिहायची हे मला सहन होईना...!` केवळ आपले विचार आणि कृती यात तफावत राहू नये, यासाठी अडीचशे रुपये मासिक पगाराची नोकरी सोडून पुन्हा गरिबीत उडी घेणारा संपादक विरळाच. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाची दखल मात्र इतिहासाने हवी तशी घेतलेली नाही.
`प्रबोधन`ला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांना `प्रबोधन`ची पानं आणि प्रती वाढवण्याची इच्छा होती. स्वतंत्र छापखाना नसल्यामुळे त्यांच्या या मनसुब्यात अडचणी येत होत्या. साताऱ्यातले उद्योजक धनजीशेठ कूपर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना `प्रबोधन`कारांकडे पाठवले. साताऱ्याजवळच्या पाडळी या गावात छापखाना उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्याला भुलून प्रबोधनकारांनी `प्रबोधन`चा कारभार साताऱ्याला हलवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या दरम्यान प्रबोधनकारांनी कूपर यांच्या गटातले भास्करराव जाधव यांच्याविरोधात भूमिका घेतली. तसंच त्यांनी `अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावधान` असं स्फुट प्रबोधनात लिहून बॉम्ब टाकला होता. परिणामी या दोघांच्या विरोधात कूपरने षडयंत्र रचायला सुरवात केली. त्यामुळे प्रबोधनकारांनी त्यात सगळा हिशेब देऊन कफल्लकपणे सातारा सोडला. `प्रबोधन`प्रेमी रामचंद्र उर्फ बापूसाहेब चित्रे यांनी पुण्यात कर्जात बुडालेला एक छापखाना विकत घेतला होता. त्याचा व्यवहार करण्यासाठी छापखान्याचा मालक, ज्याचा उल्लेख प्रबोधनकार गायतोंड्या भट असा करतात, सातारा रोडला प्रबोधनकारांना भेटायला आला होता. तो आला त्याच दिवशी `प्रबोधन`कारांची एका मुलीचं डायरियाने अचानक निधन झालं. तिचे अंत्यसंस्कार करत असतानाच घाईत असलेल्या छापखाना मालकाशी जड हृदयाने व्यवहाराच्या गोष्टीही करत होते. ते बघून प्रबोधनकारांच्या पत्नीने त्यांना सुनावलं, `प्रबोधनापुढे पोटच्या गोळ्याची सुद्धा यांना तिडीक येत नाही...!` तो उद्वेग स्वाभाविक असला तरी तो एका संपादकाच्या निष्ठेचा सन्मानही होता.
साताऱ्यातून प्रकाशित झालेल्या तिसऱ्या वर्षाच्या १७ व्या अंकातच पुढचा अंक पुण्यातून प्रकाशित होणार असल्याची घोषणा झाली. त्यानुसार सदाशिव पेठेत घर आणि बुधवार पेठेत छापखाना असा संसार त्यांनी थाटला. पण पुण्यातल्या काही सनातनी ब्राह्मणांनी मूळ मालकाला छापखाना प्रबोधनकारांना न देण्यासाठी उचकवलं. त्याला बळी पडून त्याने छापखान्याला टाळं लावलं. सनातन्यांनी `प्रबोधन`च्या नावाची पाटीही भररस्त्यात जाळली. वर पुण्यात `प्रबोधन`ला जाळून खाक करू अशी शेखी मिरवली. त्यामुळे पुण्यातच `प्रबोधन`चा छापखाना उभारण्याची प्रतिज्ञा प्रबोधनकारांनी केली. तोवर `प्रबोधन`चा तिसऱ्या वर्षाचा शेवटचा एकच अंक प्रकाशित होऊ शकला. प्रबोधनकारांनी नव्या छापखान्यासाठी कर्ज आणि देणग्या मिळवल्या. त्यातून सदाशिव पेठेत छापखाना उभा करण्याची तयारी झाली. पण प्रबोधनकारांनी मुंबईतून विकत घेऊन पाठवलेलं ट्रेडल मशीनचं चाक रेल्वेने पुण्यात पोहचेपर्यंत तुटलं. तरीही धीर न सोडता प्रबोधनकारांनी भांडवल उभं करण्यासाठी धावाधाव सुरूच ठेवली. त्यासाठी मुंबईत असताना धावपळीमुळे ते आजारी पडले. त्यातून बाहेर यायला चार महिने लागले. अर्धी मशिनरी पुण्यात, उरलेली अर्धी मुंबईत दुरुस्त होतेय, कारागिरांचे पगार थकलेत, उपचारासाठीही पैसे नाहीत अशी भयंकर परिस्थिती होती. पण यातून बाहेर येत १९२५ च्या जानेवारीत ते कसेबसे पुण्याला पोचले. पुन्हा `प्रबोधन` उभं करण्याच्या प्रयत्नांना लागले. पुढच्या चार महिन्यांत मशीन सातवेळा तुटलं. इतरही अडचणी येतच राहिल्या.
या सगळ्या अडचणींतून मार्ग काढत ९ महिन्यांच्या खंडानंतर `प्रबोधन` १९२५ च्या एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा सुरू झाला. `प्रबोधन`ला देवाज्ञा झाली अशी टीका करणाऱ्यांना `प्रबोधन`ने नव्याने सुरुवात करून उत्तर दिलं. चौथ्या महिन्याचा पहिला अंक हा आता पाक्षिक नसून मासिक होता. पानांची संख्या ४० होती. पुढे नोव्हेंबर १९२७ पर्यंत ३२ महिन्यांत मासिक `प्रबोधन`चे २२ अंक निघाले. त्याचसोबत प्रबोधनकारांनी ३१ ऑगस्ट १९२७ पासून लोकहितवादी हे नवीन साप्ताहिकही सुरू केलं. त्याचा शेवटचा तेरावा अंक पुण्याहूनच डिसेंबर १९२७ ला निघाल्याचा उल्लेख शनिमहात्म्य या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे जून १९२४ ला पुण्यात आल्यापासून नोव्हेंबरमध्ये मुंबईत परतेपर्यंत प्रबोधनकार अडचणींवर मात करत सनातन्यांच्या नाकावर टिच्चून `प्रबोधन` जगवत राहिले.
प्रबोधनकार पुण्यात होते त्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद अगदी टोकाला पोहोचला होता. ब्राह्मणेतर पक्षाचे नेते केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर त्यांना भेटण्यासाठी जवळपास दररोज `प्रबोधन` कचेरीत येत. शिवाय लोकमान्य टिळकांचे सुपुत्र रामभाऊ आणि श्रीधरपंत हेही असत. त्यामुळे या सगळ्याचे सूत्रधार प्रबोधनकारच असल्याचा समज पुण्यात पसरला होता. विशेषतः देशाचे दुष्मन हे पुस्तक प्रबोधनकारांनीच लिहिलं असल्याचं अनेकांना वाटत होतं. प्रबोधनकारांचा छापखाना अगदी ब्राह्मणी वस्तीमध्ये असल्याने त्यांना या सगळ्याचा त्रास भोगावा लागत असे. एका सभेवरून घरी जाणाऱ्या सनातन्यांनी `प्रबोधन`च्या छापखान्यावर जाऊन जवळपास दोन तास शिव्याशाप दिले. कारखान्याच्या नावाचा फलक खाली पाडला. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात ते पर्वतीजवळ फिरायला गेले असताना तीन चार जणांनी लाठीहल्ला केला. पण प्रबोधनकारांनी वॉकिंग स्टिकमधली गुप्ती बाहेर काढल्याने ते पळून गेले. खोटी निमंत्रणपत्रिका बनवून छापखान्याला पोलिसी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्नही केला गेला. गोडबोले नावाचा एक गुंड प्रबोधनकारांना भेटायला आला. छापखान्यातल्या कामगारांमुळे तो काही करू शकला नाही. पुढे पोलिसांना सांगून त्याचा बंदोबस्त करावा लागला. त्यांच्या लिखाणाला प्रक्षोभक ठरवून कोर्टात जाण्याचेही प्रयत्न केले. छापखान्यात आगीचा गोळा टाकून कागदाच्या थप्प्यांना आगही लावण्यात आली. शिवाय मेलेली कुजलेली कुत्री दारासमोर फेकण्यात आली. एकदा तर मेलेलं गाढवही टाकण्यात आलं. अनेकदा पैसे देऊनही छपाईसाठी चांगला कागद मिळून दिला जात नसे. तसंच पुण्यातल्या ब्राह्मण एजंटांनी `प्रबोधन`वर बहिष्कारही घालून बघितला. `प्रबोधन`चे अंक विकलात तर केसरी, ज्ञानप्रकाशचे अंक मिळणार नाहीत, असा दबाव त्यांनी विक्रेत्यांवर आणला. पण `प्रबोधन` छापखान्यातल्या कामगारांनी चौकाचौकात विकून त्यावर मात केली. तसंच चांगलं कमिशन दिल्याने विक्रेतेही नरम पडले. अनेकदा तर अंक वाचकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी एकगठ्ठा विकतही घेतले जात. या सगळ्या अडचणींवर मात करत प्रबोधनकार पुण्यात `प्रबोधन` चालवत होते. एका मोठ्या जातीचा, सत्ताधाऱ्याचा किंवा चळवळीचाही थेट पाठिंबा नसताना पुण्यात भिक्षुकशाहीच्या विरोधात संघर्ष करणं महाकठीण होतं. त्यासाठी प्रबोधनकारांसारखा वीर योद्धाच हवा होता. खुद्द सदाशिवपेठेत राहून ब्राह्मणेतरी विचारांचे `प्रबोधन`चे २२ आणि लोकहितवादीचे १३ अंक प्रकाशित करणं, यासाठीची हिंमत कळण्यासाठी तो काळ समजून घ्यावा लागेल.
चौथ्या वर्षाच्या काळात प्रबोधनकारांनी इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांना खुनी ठरवणाऱ्या बावला मुमताज प्रकरणावर आपली लेखणी जोरात चालवली. त्यातल्याच `टेम्प्ट्रेस` या लेखात `द बॉम्बे क्रॉनिकल` या वर्तमानपत्राचे प्रख्यात ब्रिटिश संपादक बी. जी. हॉर्निमन यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे चिडून त्यांनी प्रबोधनकारांच्या विरोधात मुंबईतल्या कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. त्यासाठी वकील द्यायला प्रबोधनकारांकडे पैसे नव्हते. त्यामुळे `प्रबोधन`चे अनेक प्रेमी मदत करण्यासाठी पुढे आले. याच खटल्यासाठी ७ नोव्हेंबर १९२७ला मुंबईत आल्यावर प्रबोधनकार पुन्हा एकदा गंभीर आजारी पडले. ते एकटेच नाहीत तर पत्नी, मुली आणि मुलगा असं संपूर्ण कुटुंबच वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झाले. त्यामुळे मुंबईत अडकलेले प्रबोधनकार पुन्हा `प्रबोधन` चालवण्यासाठी पुण्यात जाऊ शकले नाहीत.
`प्रबोधन` जवळपास दोन वर्ष बंद होतं. त्यानंतर ते १९२९ च्या दसऱ्याला पुन्हा सुरू झाला. तो क्रांन्त्यंक असं नाव होतं. किल्ल्यातून बाहेर येणारा वाघ त्यावर दिसत होता. प्रबोधनकार नावाच्या वाघानेही नव्याने डरकाळी फोडली होती. नोव्हेंबर १९२९ पासून मार्च १९३० पर्यंत `प्रबोधन`चे पाच अंक निघालेले दिसतात. त्यानंतर `प्रबोधन`चा अंक सापडत नाही. `प्रबोधन` बंद करण्यात येत असल्याची घोषणा केलेली नाही. माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी `प्रबोधन`शी संबंधित इतर घडामोडींची तपशीलवार चर्चा आहे. पण त्यात `प्रबोधन` मुंबईतून पुन्हा कसं सुरू केलं आणि ते सहा अंकात कसं बंद पडलं, याच्याविषयी काहीही सांगितलेलं नाही. फक्त उदरनिर्वाहासाठी `प्रबोधन`चा छापखाना आधी भाड्याने दिल्याचा आणि नंतर विकल्याचा उल्लेख आहे. पण या व्यवहारात मित्रांनी फसवल्यामुळे प्रबोधनकारांच्या हातात काहीच लागलं नाही. या काळात प्रबोधनकारांनी `शनिमहात्म्य` आणि `शेतकऱ्यांचे` स्वराज्य ही दोन महत्त्वाची पुस्तकं लिहिली. दोन्ही पुस्तकं त्या काळात अत्यंत लोकप्रिय झाली होती. शिवाय दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवातले ब्राह्मणी वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत चालवलेली चळवळ आणि त्यातून सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात या त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या महत्त्वाच्या घडामोडी `प्रबोधन`च्या याच टप्प्यात झाल्यात.
`प्रबोधन`च्या शेवटच्या पर्वात म्हणजे नोव्हेंबर १९२७ ते मार्च १९३० या दरम्यान `प्रबोधन`चे फक्त सहाच अंक निघालेले आहेत. पण त्यात वेगळे प्रबोधनकार दिसतात. `प्रबोधन`ची सुरवात ईशस्मरणाने करणारे प्रबोधनकार नोव्हेंबर १९२९ च्या अंकात नवी सुरुवात करताना लिहितात, `कोणत्याही कार्याच्या प्रारंभी – मग ते बॉम्ब फेकण्याचे असो नाहीतर बोंब मारण्याचे असो – कोणत्या तरी देवदेवतेचे नामस्मरणपूर्वक वन्दन करण्याचा हिन्दुजनांचा शिष्ट संप्रदाय आहे. यापूर्वीच्या माझ्या प्रत्येक ग्रंथारंभी हा शिष्ठाचार मी भक्तीपूर्वक इमानेइतबारे पाळलेला आहे… पण प्रागतिक मनुष्याने मतांच्या ठरावीकपणाला चिकटून बसण्याइतका मनाचा दुबळेपणा दाखविणे म्हणजे जगात जगण्याची आपली नालायकी सिद्ध करण्यासारखे आहे. कालपर्यंत मी देवदेवतांचे अस्तित्व मानणारा होतो. आज मी देवविषयक सर्व भावनांच्या छाताडावर बॉम्ब फेकणारा लालबुंद क्रान्तिकारक बनलो आहे.` मार्च १९३० च्या शेवटच्या अंकात ते लिहितात, `प्रबोधन निरीश्वरवादी आहे. त्याचे सत्यशोधन सत्यशोधक समाजाच्याही पुढे गेलेले आहे. देव मानवात दलाल नको, या काथ्याकुटापेक्षा देवालाच उखडला तर दलाल उरतोच कोठे?` इथे `प्रबोधन`च्या लिखाणाचं एक वर्तुळ पूर्ण होतं.
No comments:
Post a Comment