Sunday, 27 July 2025

नाट्य, चित्र, साहित्यिक डॉ. तानिकेला भरणी..

लेखक, अभिनेता, कवी आणि तत्वज्ञानी तनिकेला भरणी यांना जवळून पाहण्याचा आणि वैयक्तिक संपर्क साधण्याचा प्रयत्न मित्राच्या माध्यमातून हैदराबादमध्ये झाला. त्यांची एक प्रकट मुलाखत सुरू होती. मित्राच्या ओळखीनं तिथं प्रवेश मिळाला. त्या अभ्यासपूर्ण संभाषणात, डॉ. तानिकेला भरणी यांनी त्यांची साहित्य कारकिर्द, त्यांचा नाट्यसृष्टीतला प्रवेश, नाट्य आणि चित्रपटसृष्टीतला अनुभव अन् कलांमध्ये सामाजिक जबाबदारीचे महत्त्व याबद्दल प्रामाणिकपणे विचार मांडले. त्यांनी ८०० हून अधिक चित्रपटातून कामे केली आहेत. त्यात त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेत, ते त्यांच्या बुद्धिमत्तेनं आणि कलात्मकतेने इतरांना नेहमी प्रेरणा, मार्गदर्शन देत असतात. तेलुगू साहित्यावरचं त्यांचं प्रेम आणि अभिनयाप्रती त्यांची अविचल वृत्ती त्यांना इतर सगळ्या बाबींपासून अलग करते. तेलुगू अभिनेते डॉ. तनिकेला भरणी यांनी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात त्यांच्या अद्भुत, अनोख्या अभिनयानं नेहमीच त्यांचे आदर्श उंचावले आहेत. त्यांच्या कामावरील त्यांची निष्ठा, श्रद्धा आणि प्रेमामुळेच सांस्कृतिक क्षेत्रात आज सर्वोच्च स्थानावर ते पोहोचलेत. हा अभिनेता आपल्या कामात समर्पित आहे हे पाहून भरणी यांना एस आर विद्यापीठाने साहित्यिक, कला विषयात मानद डॉक्टरेट हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे. हैदराबाद इथला हा कार्यक्रम अन् त्यानंतर पुण्यातल्या आंध्र असोसिएशनच्या वर्धापन दिनाच्या समारंभासाठी आले असताना त्यांच्याशी अधिक बोलण्याची संधी मिळाली, निश्चितच तासभराचा त्यांच्या सानिध्यातला काळ हा आपल्याला त्यांच्या अनुभवसंपन्न जीवनाची अनुभूती देऊन गेला. त्यांच्याशी झालेल्या अत्यंत मनमोकळ्या गप्पा अन् त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरं ही त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी, बहुगुणी व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.
• लेखक म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
• माझे पणजोबा, दिवाकरला तिरुपती शास्त्री यांच्याकडून आमच्या कुटुंबाकडे साहित्यिक प्रतिभेचा वारसा आलाय. या वारसानं माझ्यातल्या कवी अन् लेखकावर संस्कार केलेत अन् प्रभाव पाडलाय. माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या, इंटरमिजिएटच्या काळात, माझे जवळचे मित्र, सहाध्यायी देवरकोंडा नरसिंह कुमार, ज्यांचं आता निधन झालंय, त्यांनी मला कविता लिहिण्यास प्रेरित केलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळंच माझ्या कविता ह्या आदरणीय कवी पुराणम सुब्रह्मण्यम शर्मा यांच्या संपादकत्वाखालील लोकप्रिय मासिक 'आंध्र ज्योती' मध्ये प्रकाशित झाल्या. वयाच्या २३ व्या वर्षी माझी कविता छापून येणं हा माझ्या जीवनातला एक रोमांचक क्षण होता, जणू पुरस्कार जिंकण्यासारखा! त्याआधी आणि नंतरही वारंवार मिळणाऱ्या 'साभार परत...!' अशा नकारांना तोंड देऊनही, मी टिकून राहिलो आणि माझ्या प्रतिभेनं मला यश मिळालं. 'भैरव मीना' या टोपणनावानं मी एका मल्याळम कथेचा तेलुगू भाषेत अनुवाद केला, जो नंतर प्रकाशितही झाला, या यशामुळं मला कवितांबरोबरच लेखन सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळाली, त्यानंतर मग मी कथा आणि व्यक्तीचित्रणं लिहिण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षण बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, माझे गुरू रल्लापल्ली गारू म्हणजे रल्लापल्ली नरसिंह राव, जे एक प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य अभिनेते होते, त्यांनी मला एका नव्या साहित्यप्रकारात म्हणजे नाटकं लिहायला प्रोत्साहित केलं. आणीबाणीच्या काळात, मी माझं पहिलं नाटक लिहिलं, गर्दभांडम म्हणजे गाढवाचं अंडं या नावाचं एक राजकीय व्यंग नाट्य रूपात रेखाटलं होतं, ज्यात साम्यवादावर, समाजवादावर टीका करण्यात आली होती. हे नाटक यशस्वी झालं, त्याचे आंध्र प्रदेशात १०० हून अधिक प्रयोग सादर झाले आणि त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. यातून माझ्या रंगभूमीवरच्या प्रवासाला सुरुवात झाली. नाट्यक्षेत्रात यश मिळतंय हे पाहून मग मी पाश्चात्य रंगभूमी तंत्रांमध्ये पदव्युत्तर पदविका घेतली, ज्यामुळे माझी नाट्यकला अधिक प्रगल्भ, समृद्ध झाली.
•  तुम्ही लिहिलेल्या 'गर्दभांडम' नाटकात तुम्ही भूमिका केली होती का?
•  हो, मी त्यात एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली होती...खलनायकाची! माझ्या त्या पहिल्याच भूमिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नाट्यक्षेत्रात मिळालेल्या या यशानंतर मग मी मागं वळून पाहिलंचं नाही. हे यश माझ्या चित्रपट कारकिर्दीतही कायम राहिलं, जिथं मी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. त्यामुळं चित्रपटसृष्टीतही
खलनायक म्हणून माझी कारकिर्द गाजली.
•  चित्रपटांमधल्या तुमच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली?
•  स्वाभाविकच, रंगभूमीशी मी संबंधित असल्यानं, आणि माझ्या नाटकांना पुरस्कार मिळत असताना माझ्याकडं लक्ष्य वेधलं जाऊ लागलं. लोकांना माझं काम लक्षात येऊ लागलं. अशाच एका व्यक्तीचं नाव दमराजू हनुमंत राव होते, ज्यांनी माझं एक नाटक पाहिलं आणि मला चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला माझा पहिला चित्रपट लिहिण्यासाठी चेन्नईला नेलं, ज्यामध्ये सुमन म्हणजे शिवाजी या रजनीकांत यांच्या चित्रपटातील खलनायक तो त्या चित्रपटाचा हिरो होता. त्यानं मला एक कॅसेट दिली, अन् मला बजावलं की, ही कॅसेट अत्यंत महत्वाची आहे, हा इंग्रजी चित्रपट आहे. तो आम्हाला तेलुगू भाषेत तयार करायचा आहे. पण चित्रपटाची कथा आणि त्याची बातमी कुठेही लीक होता कामा नये अशी विनंती केली. मग त्यांनी एडिटोरियमचे दरवाजे बंद केले आणि आम्ही कॅसेट पाहू लागलो, माझ्या लक्षांत आलं की, ती दुसरी तिसरी कोणती नव्हे तर ती 'एंटर द ड्रॅगन'ची कॅसेट होती. मी त्यांना सांगितलं की, मी हा चित्रपट आधीच १० वेळा पाहिलाय. अशाप्रकारे चित्रपटसृष्टीतला माझा प्रवास सुरू झाला, कथानकात थोडे बदल आणि रूपांतरांसह 'एंटर द ड्रॅगन'चं आम्ही वेगळ्या आवृत्तीत भाषांतर केलं. चित्रपट यथातथाच चालला. मला रंगभूमीवर वावरणं हे अत्यंत आवडीचं असल्यानं शिवाय त्यात पारंगत असल्यानं आणि माझ्या कामाचा मला अभिमान असल्यानं, चित्रपट उद्योगातला ढोंगीपणा, कृत्रिम, कछकड्याप्रमाणे असलेलं वातावरण मला तेव्हा फारसं आवडलं नाही, तिथं मला अगदी गुदमरल्यासारखं झालं, तिथं गुलाम असल्यासारखं वाटायचं. मग मी तिथून लगेच परतण्याचा निर्णय घेतला. कदाचित दैवाच्या मनात काही वेगळचं होतं. चित्रपटातला संवादलेखन करणारा विभाग पाहणाऱ्या एका संपादकानं मला आणखी एक संवादलेखनाची संधी दिली. यावेळी ते मौली आणि सुहासिनी यांच्यासोबत 'पटणम पिल्ला पल्लेटूरी चिन्नोडू' नावाच्या चित्रपट तयार करत होते तो सिनेमा मात्र १०० दिवस चालला. यश मिळूनही, मला तिथलं वातावरण अजूनही आवडलेलं नव्हतं. आणि संवादलेखनाचा जो मोबदला ठरला, जेवढे पैसे देण्याचे वचन दिलं होतं, तेवढं त्यांनी मला दिलंच नाही. त्यांनी सांगितलं की, ते संपूर्ण चित्रपटासाठी पांच हजार रुपये देऊ, पण त्यापैकी त्यांनी फक्त दोन हजारच दिले. फसवणूक झाल्यासारखं वाटल्यानं मी त्यांच्यावर रागावलो आणि तिथून निघून गेलो. नंतर, चेन्नईमध्ये स्थायिक झालेल्या रल्लापल्ली यांनी माझी ओळख दिग्दर्शक वंशी यांच्याशी करून दिली. त्यांना चित्रपटातले काही सीन लिहून हवे होते, त्यांनी ते मला लिहायला सांगितले. त्यासाठी त्यांनी मला सात दिवसाचा अवधी दिला, पण त्यापेक्षा मी तिथं मला स्वतःला सिद्ध करण्यास उत्सुक होतो, म्हणून मी त्या संध्याकाळपर्यंत सात सीन लिहून पूर्ण केले. मी ते इतके लवकर लिहिले, हे पाहून ते आश्चर्यचकित तर झालेच तसंच लेखनशैलीनं प्रभावितही झाले. मग ज्यामुळं मला राजेंद्र प्रसाद अभिनीत 'लेडीज टेलर' या विनोदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, जो चित्रपट १०० दिवस चालला. त्यानंतर मात्र मी त्या दिवसापासून मागे वळून पाहिलंच नाही, राम गोपाल वर्मांचा पहिला चित्रपट 'शिवा' यासह ५२ चित्रपटांसाठी मी लेखन केलं.
•  तुमच्या कुटुंबानं तुम्हाला या साऱ्या कामासाठी पाठिंबा दिला का? त्यांची प्रतिक्रिया काय होती?
•  कधीच नाही...! अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांप्रमाणे, माझ्या कुटुंबानंही मला रंगभूमीवर करिअर करायला प्रोत्साहन दिलं नाही; खरं तर, त्यांनी ते करायला नकारच दिला. विरोध केला. माझ्या वडिलांनी तर चक्क मला घराबाहेर काढलं. त्यानंतर, मी माझे गुरु रल्लापल्ली यांच्याकडे राहायला गेलो, जे एक महान सज्जन, सच्छिल गृहस्थ होते. त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिलं. 'लेडीज टेलर' नामक चित्रपट सुपरहिट झाला, ऑफर्सचा ओघ स्वाभाविकपणे सुरू लागला. यशाबरोबर मी अधिक पैसेही मागू लागलो आणि जसजसं माझं करिअर विस्तारीत गेलं तसतसं माझ्या संधीही वाढत गेल्या. शिवाय संपूर्ण भारतात खळबळ उडाली. मला आठवतं की, चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी राम गोपाल वर्मा यांनी मला नानाजींची भूमिका साकारताना पाहिलं आणि मला सांगितलं, 'तू तुझी लेखणी खाली ठेवू शकतोस; तू एक चांगला अभिनेता होशील...!' आणि त्याचा तो होरा अगदी बरोबर ठरला, मी आतापर्यंत ८०० हून अधिक चित्रपटांतून काम केलंय.
•  आता तुम्हाला लिहिण्याची आठवण येते का?
•  मी गेल्या काही वर्षांपासून विविध विषयांवर लक्ष केंद्रित करून लिहितोय. मी 'एंदोरो महानभावुलु' मध्ये संगीतकारांच्या तात्विक जीवनाचा इतिहास आणि 'नक्षत्र दर्शनम' नावाचा कविता संग्रह लिहिलाय, जो कलेच्या महान दिग्गजांवर प्रतिबिंबित करतो. एकूण, मी १२ ते १३ पुस्तके लिहिलीत. १० नाटकं लिहिलीत, त्यापैकी अनेक नाटकं लोकप्रिय झालीत. सर्वकाही लेखनापासून सुरू झालंय आणि तो आता माझ्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनलाय.
•  तुम्हाला थिएटर आणि सिनेमा दोन्हीचा अनुभव आहे. यापैकी तुम्हाला कोणतं क्षेत्र आवडतं?
•  मी नेहमीच म्हणतो की, चित्रपटक्षेत्र माझ्या आर्थिकबाबींचं तसंच खिशाचं समाधान करतात, तर रंगभूमीच्या कामात आणि कवितांतून माझ्या मनाला समाधान मिळतं. 
•  सिनेमासाठी पटकथा लिहिताना कोणत्या प्रमुख आव्हानांना तोंड द्यावं लागलं?
•  एक मोठं आव्हान म्हणजे माझ्या थिएटर तंत्रांना सिनेमातंत्राशी जुळवून घ्यायला लागलं. ६० आणि ७० च्या दशकात, थिएटर बहुतेकदा मेलोड्रॅमॅटिक असायचं, त्यात जड मेकअप, विस्तृत प्रकाशयोजना आणि मोठ्या कलाकारांचा समावेश असायचा. पाश्चात्य रंगभूमीचा अभ्यास केल्यानंतर, मला हॉलिवूड चित्रपटांसारखा अधिक वास्तववादी दृष्टिकोन आणायचा होता. यामुळं मी जटिल मेकअप, पोशाख आणि संगीत यासारख्या महागड्या घटकांना वगळून निर्मिती सोपी केली, त्याऐवजी मी कमीत कमी काळा-पांढरा पोशाख निवडला आणि खर्च कमी केला. मी सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित करणारी पथनाट्ये समाविष्ट करायला सुरुवात केली आणि शिक्षण व्यवस्थेवरचं व्यंगनाट्यचित्र "पेड्डा बाल शिक्षा" आणि पाश्चात्य रंगभूमीचे रूपांतर "गोग्रहणम" सारखी प्रहसन लिहिली. तथापि, या वास्तववादी आणि किमान दृष्टिकोनांचं चित्रपटात रूपांतर करणं कठीण झालं, कारण चित्रपट उद्योग अजूनही मेलोड्रॅमॅटिक शैलींमध्येच रुजलेला होता.
•  तुम्ही आज अनेकांची प्रेरणा आहात. पण तुमची प्रेरणा कोण आहे?
•  माझी प्रेरणा माझ्या साहित्यिक कौटुंबिक पार्श्वभूमीतून येते. हे फक्त एका व्यक्तीचं काम नाही; मी श्री श्री आणि तेलुगूतल्या बाळ गंगाधर टिळक या सारख्या कवींकडून प्रेरणा घेतो. तुम्ही साम्यवादाचा, समाजवादाचा उल्लेख 'गाढवाचे अंडे' असा केलाय आणि श्री श्रींना प्रेरणास्थान म्हणून उद्धृत केलंय. याबद्दल तुम्ही अधिक तपशीलवार सांगू शकाल का? श्री श्री हे एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची बंडखोर भावना माझ्या सर्जनशीलतेच्या दृष्टिकोनाशी जुळते. आणीबाणीच्या काळात मी 'गर्द भांडम' वर काम करत असताना, त्याच्या टीकात्मक भूमिकेसाठी मला अटक होण्याची खरोखरच भीती निर्माण झाली होती. कलाकार म्हणून, सरकार आणि सामाजिक नियमांच्या विरोधात असणं हे अनेकदा त्रासदायक असतं. ही बंडखोर भावना मला श्री श्रींच्या कामात दिसते. जेव्हा मी पदव्युत्तर पदवी घेतली तेव्हा मला पाश्चात्य रंगभूमीच्या विस्तृत जगाची ओळख झाली, ज्यामुळं मला माइमसह प्रयोग करायला भाग पाडले. माइममध्ये कोणतेही विस्तृत सेट नसतात; त्याऐवजी, आम्ही ताजमहालचे प्रतिनिधित्व करण्यासाठी साध्या टॅगसारखे कमीत कमी प्रॉप्स वापरतो. मी मधू फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये माइम व्याख्याता म्हणून माझ्या कामात आणि माझ्या लघुपटांमध्ये ही शैली समाविष्ट केली. जरी अशी प्रायोगिक तंत्रे आर्थिक अडचणींमुळं व्यावसायिक चित्रपट उद्योगात बसत नसल्या तरी, त्यांना माझ्या लघुपटांमध्ये त्यांचं स्थान मिळालं, जसं की 'द लास्ट फार्मर', ज्याला लोकप्रियता मिळाली.
•  टॉलिवूडमधल्या तरुण चित्रपट निर्मात्यांना तुमचा काय सल्ला आहे?
•  सर्वप्रथम, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, दर आठवड्याला मोठ्या संख्येनं चित्रपट प्रदर्शित होतात, परंतु खरोखरच काही उल्लेखनीय असतात. सध्याचा ट्रेंड 'बाहुबली' सारख्या उच्च-बजेट चित्रपटांच्या यशाचा पाठलाग करत असल्याचं दिसतं, परंतु मोठ्या बजेटवरचं हे लक्ष अनेकदा लहान, अर्थपूर्ण प्रकल्पांना बाजूला ठेवतं. असं असूनही, 'बालागम' सारखे चित्रपट हे दाखवून देतात की चित्रपटातला कथा आशय अजूनही प्रशंसा आणि आर्थिक यश दोन्हीही मिळवू शकतो. माझा सल्ला असा आहे की, बजेटपेक्षा आशयाला प्राधान्य द्या. कलाकृतीचा प्राथमिक उद्देश भावना जागृत करणं हा आहे. मग ती आपल्याला रडवणारी असो किंवा हसवणारी असो. ' मायाबाजार' प्रसिद्ध राहतो कारण ती दोन्ही साध्य करते. प्रेक्षकांना आकर्षित केवळ स्टारडम नाहीतर कंटेंटची गुणवत्ता यशाची ही व्याख्या करते. ' महानटी'सारखे चित्रपट त्यांच्या आकर्षक कथांमुळं यशस्वी होतात, कारण ते केवळ स्टारडम आहेत म्हणून नाही. खरंतर आपण इतर चित्रपट उद्योगांकडूनही प्रेरणा घेतली पाहिजे. मल्याळम आणि तमिळ चित्रपट अनेकदा कमी बजेटमध्ये उत्कृष्ट चित्रपट तयार करतात, जे दाखवतात की, प्रभावी कथाकथनासाठी मोठ्या संसाधनांची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ, माझा स्वतःचा चित्रपट ' मिथुनम' जो २० दिवसांत, फक्त दोन पात्रं आणि एकाच लोकेशनवर बनवला गेला होता, तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला अन् त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं हे सिद्ध होतं की अर्थपूर्ण सामग्री कमीत कमी संसाधनांमध्ये तयार केली जाऊ शकते आणि ती प्रदर्शित झाल्यानंतरही बराच काळ टिकून राहते.
•  तुम्ही 'मिथुनम' सारखे आणखी चित्रपट का बनवत नाही ?
•  त्यादृष्टीनं आणखी काही चित्रपट बनवण्याची माझी योजना आहे. तथापि, चित्रपट निर्मितीचा खर्च आताशी लक्षणीयरीत्या वाढलाय; एका सामान्य चित्रपटासाठीही किमान ५ कोटी रुपये लागतील. अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक निर्माते शोधणं आव्हानात्मक असू शकतं.
परिणामी, मी माझ्या चित्रपटांमध्ये कलात्मक मूल्य आणि व्यावसायिक व्यवहार्यता दोन्ही समाविष्ट करण्यासाठी मी माझा दृष्टिकोन बदललाय. या पैलूंचा समतोल साधून, मी माझे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहेत याची खात्री करू शकतो आणि त्याचबरोबर माझ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कलात्मक अखंडतेनं पालन करू शकतो. या धोरणामुळं भविष्यातल्या प्रकल्पांना पाठिंबा देण्यास इतर निर्माते देखील इच्छुक असतील अशी शक्यता वाढू शकते.
•  ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल तुमचं काय मत आहे?
•  ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. सुरुवातीला ते एक आशादायक माध्यम होते, परंतु आता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रौढ विषयांवर आणि गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंटेंटकडे कल आहे. कथा, कलात्मक खोलीपेक्षा सनसनाटीवर भर दिला जात असल्याचं दिसून येतं. या उद्योगात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून, माझा असा विश्वास आहे की, सर्जनशीलता आणि कलात्मकता एकाच अर्थाच्या आशयापर्यंत किंवा ट्रेंडपर्यंत मर्यादित करता येत नाही. खऱ्या कलात्मकतेमध्ये बदलती परिस्थिती असूनही, संघर्ष सहन करणं आणि स्वतःच्या सर्जनशील दृष्टिकोनाशी एकनिष्ठ राहणं समाविष्ट असतं. खऱ्या, अर्थपूर्ण कामासाठीची ही वचनबद्धता हीच एका महान कलाकाराची व्याख्या करत राहते. 'मी नेहमीच नकारात्मक भूमिकांकडे आकर्षित होतो...!'
•  तुमचा आवडता प्रकार कोणता ? तुम्ही तुम्हाला दिलेलं पात्र कसं विकसित करता?
•  मध्यमवर्गीय जीवनाचा शोध घेणाऱ्या कथा मला विशेषतः आकर्षित करतात. मी स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आहे, त्यामुळं मला त्यांच्या आकांक्षा, आव्हानांची खोलवर समज आहे. मध्यमवर्गीय ढोंगीपणाची गतिशीलता, लोक स्वतःला त्यांच्या खऱ्या स्वभावाविरुद्ध कसं सादर करतात, याचं मला आकर्षण वाटत राहिलंय. माझ्या कथांमध्ये हा अनेकदा एक मध्यवर्ती विषय असतो. मध्यमवर्गीय नायक आणि नायिका लिहिणं मला आवडतं कारण त्याचं जीवन विरोधाभासांनी भरलेलं असतं. श्रीमंतांसाठी, बहुतेकदा समस्या जास्तीचं व्यवस्थापन करण्याची असते, तर गरिबांसाठी, ती पुरेशी मिळवण्याची असते. तथापि, मध्यमवर्गीय पात्रांना एक वेगळा संघर्ष करावा लागतो. ते बहुतेकदा त्यांच्या आकांक्षेच्या, अपेक्षांच्या अर्ध्याच गोष्टी साध्य करतात. इच्छा आणि असणं यातला हा सततचा ताणतणाव आणि त्यांना मिळालेलं काही गमावण्याची भावना, कथाकथनासाठी एक समृद्ध आधार प्रदान करते. एकदा तुम्ही काहीतरी साध्य केलं की, समाधान क्षणभंगुर असतं या सार्वत्रिक सत्याचं हे प्रतिबिंब आहे.
•  चित्रपट उद्योगात घडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणांबद्दल तुमचं काय मत आहे?
•  हा मुद्दा अनेकदा संबंधित व्यक्तींचा वैयक्तिक प्रश्न म्हणून पाहिला जातो. तथापि, परिस्थिती कधीकधी खळबळजनक बनू शकते. मुंबईसारख्या ठिकाणी, ड्रग्जचा वापर फळांच्या वाट्या घेण्याइतकाच सामान्य असू शकतो. परंतु ड्रग्जच्या समस्यां व्यतिरिक्त, आजच्या पिढीला प्रभावित करणाऱ्या अधिक चिंताजनक समस्या आहेत. उदाहरणार्थ, मी एकदा एका नऊ वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ पाहिला ज्यात त्याच्या आजीनं त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळं त्याचं संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. अशा टोकाचं वर्तन हल्ली अधिक सामान्य होतंय आणि ते एका व्यापक संकट प्रतिबिंबित करतात. आपल्या पिढीच्या विपरीत, जिथं आपल्याला आपल्या पालकांना आणि मार्गदर्शकांना भीती वाटत होती, आजचं जग बदललंय आणि तरुण पिढी काय करेल याबद्दलची चिंता वाढतेय. 
•  तुमच्या लेखनात तुम्ही असा उल्लेख करता की, 'जगानं लाल गालिचा अंथरलाय पण मी रस्त्यावरून चाललोय...!'. जगानं लाल गालिचा कोणासाठी अंथरलाय आणि रस्त्यावर कोण चाललंय? मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की, संधी प्रत्येकासाठी उपलब्ध असतात, परंतु त्या प्रत्येकानं मिळवणं हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. जे यशस्वी होतात आणि जे यशस्वी होत नाहीत त्यांच्यातला फरक त्यांच्या शारीरिक गुणांमध्ये नाही तर ते त्यांना मिळालेल्या संधींचा कसा वापर करतात यात आहे. जग अशा लोकांसाठी लाल गालिचा देते, जे त्यांचा फायदा घेण्यास तयार आहेत आणि इच्छुक आहेत, तर इतरांना अधिक आव्हानात्मक मार्गावर चालताना आढळू शकते. मी नेहमीच पुढच्या पिढीला त्यांच्या सुरुवातीच्या काळात कठोर परिश्रम करण्याचा आणि संघर्ष करण्याचा सल्ला देतो, कारण यामुळं दीर्घकालीन यश आणि समाधान मिळेल. उलट, जर तुम्ही आता आराम आणि सहजता निवडली तर तुम्हाला आयुष्यभर संघर्षांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून, समर्पण आणि प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत.
•  अथाडू चित्रपटातलं तुमचं पात्र खूप लोकप्रिय आहे आणि 'वडु मगडू रा बुज्जी' हा संवाद एक मीम बनलाय. तुम्ही या लोकप्रिय संस्कृतीकडे कसं पाहता?
•  जेव्हा माझ्या संवादाची शंभर वेळा पुनरावृत्ती होते तेव्हा मी रोमांचित होतो अन् हसतो. हा संवाद त्रिविक्रमनं लिहिला होता आणि तो चित्रपट निर्मितीच्या सहयोगी स्वरूपाचा पुरावा आहे. सिनेमाचं सौंदर्य असं आहे की, तो एक सामूहिक प्रयत्न असतो आणि यश सर्व सहभागींमध्ये वाटून घेतलं पाहिजे.
•  चित्रपटांमध्ये सामाजिक जबाबदारी असायला हवी असं तुम्हाला वाटतं का?
•  हो, त्यांनी तसं करायला हवं. सध्या चित्रपटांमध्ये अनेकदा बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करणारे खलनायक दाखवले जातात आणि त्यांना शिक्षा होत असल्याचं दाखवलं जातं, परंतु हे चित्रण वरवरचं असू शकतं. अशा गंभीर समस्यांना खऱ्या वचनबद्धतेनं आणि गांभीर्यानं न हाताळता वारंवार दाखवणं हे लज्जास्पद आहे. चित्रपटासह कला, सामाजिक जबाबदारीची भावना बाळगून आणि अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याची उद्दिष्टं ठेवली पाहिजेत. चित्रपटांद्वारे व्यक्त होणाऱ्या भावना आणि संदेश पडद्याच्या पलीकडे प्रतिध्वनित झाले पाहिजेत.
•  तुम्हाला कोणतं पात्र आवडतं? चित्रपटांमध्ये तुम्ही साकारलेलं तुमचं आवडतं पात्र कोणतं?
•  मी नेहमीच नकारात्मक पात्रांकडे आकर्षित होतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुसंगत राहणाऱ्या चांगल्या पात्रांपेक्षा वेगळं, खलनायक भावनिक आणि मानसिक गुंतागुंतीची श्रेणी देतात. तुम्ही वेगवेगळ्या बोलीभाषा, देखावे आणि संवादांसह प्रयोग करू शकता. नकारात्मक पात्रे चढ-उतारांची गतिमान श्रेणी देतात, अगदी आलेखाप्रमाणे, ज्यामुळं सूक्ष्म आणि स्तरित कामगिरी मिळते.
•  तुम्ही एखादी कविता सांगू शकाल का? आणि ती लिहिण्यामागचं कारण सांगू शकाल का?
•  जेव्हा मी माझे वडील गमावले, जे सुमारे ९३ वर्षांचे होते, तेव्हा मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी एक ओळीची कविता लिहिली. ते स्वातंत्र्यापूर्वी पश्चिम गोदावरीतून इथं आले होते, सुरुवातीला शिक्षक म्हणून आणि नंतर रेल्वेमध्ये सामील झाले होते. कविता अशी आहे: 'एन्नो भांडावयानी कुट्टी सुदी ला जरीपोयाडू नन्ना...!'. ही ओळ माझ्या नुकसानाची भावना आणि माझ्या जीवनावर त्यांचा खोलवरचा प्रभाव प्रतिबिंबित करते.
•  आजकाल प्रतिभावान लेखक नाहीत. तुम्हाला असं वाटतं का? त्याचं कारण काय?
•  पूर्वी लेखकांना खूप कमी पैसे दिले जात होते. तथापि, आज एक तेलुगू लेखक सुमारे १ कोटी रुपये मानधन घेऊ शकतो, जे दिग्दर्शकांच्या कमाईच्या बरोबरीचे आहे. या बदलामुळे अनेक लेखक दिग्दर्शक बनण्याची आकांक्षा बाळगू लागलेत, कारण त्यांना जास्त कमाई आणि जास्त ओळख दोन्ही हवी आहे. दुर्दैवाने, या बदलाचा अर्थ असा आहे की लेखकांची नावे चित्रपटाच्या पोस्टरमधून अनेकदा वगळली जातात, तर हिंदी चित्रपटसृष्टीत, चित्रपटाच्या सुरुवातीला सलीम-जावेद सारखी नावे ठळकपणे दाखवली जातात. या ओळखीचा अभाव अनेक लेखकांना आर्थिक कारण आणि वैयक्तिक प्रसिद्धी दोन्हीसाठी दिग्दर्शनाच्या भूमिका करण्यास भाग पाडतो.
•  तुम्ही म्हणालात की आम्ही मल्याळम आणि तमिळ समांतर चित्रपट पाहतो आणि त्यांचे कौतुक करतो. त्यामागील मुख्य कारण काय आहे?
•  मुख्य फरक म्हणजे आपण व्यावसायिकीकरणावर भर देतो आणि त्याचबरोबर पैसे कमावताना कलात्मक मूल्यावरही भर देतो. उदाहरणार्थ, मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' हा लिंग भूमिकांबद्दल एक सामाजिक व्यंगचित्र सादर करतो, ज्यामध्ये स्वयंपाकघरात स्त्रीचे स्थान दर्शविले जाते. चित्रपटाच्या या वास्तववादी चित्रणाने माझ्यावर अनेक महिने कायमची छाप सोडली. शेवटी, जेव्हा चित्रपटाचा विषय आकर्षक आणि चांगल्या प्रकारे सादर केला जातो तेव्हा तो कथेचा खरा नायक बनतो, ज्यामुळे तो वेगळा दिसतो. जाणवतो.
•  तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी आणि भावनिक क्षणांपैकी एक शेअर करू शकाल का?
•  माझ्या कविता प्रवासाच्या सुरुवातीच्या काळातला माझा सर्वात आनंदाचा आणि भावनिक क्षण होता. २६ जानेवारी रोजी एका महाविद्यालयीन कार्यक्रमात सुमारे १०० तरुण कवींना आमंत्रित करण्यात आले होते. माझी पाळी ९८ व्या क्रमांकावर होती आणि वातावरण कवितेने भरलेले होते. प्रमुख पाहुणे उथपाल सत्यनारायण चार्युलु हे कवितेचे विश्लेषण आणि कौतुक करण्यासाठी आले होते. जेवणानंतर, माझी पाठांतर करण्याची पाळी होती. मी 'हलम थप्पा अंगुलम पोलम लेनी वडू, कलाम थप्पा विसामेथु बालम लेनी वडू' अशा ओळी असलेला एक तुकडा सादर केला. माझी कविता सर्वांना भावली. माझ्या वाचनानंतर, प्रमुख पाहुण्यांनी त्यांना सादर केलेली शाल घेतली आणि मला दिली, ज्यामुळे मला नोबेल पारितोषिक मिळाल्यासारखे वाटले. कवी म्हणून माझ्या प्रवासात हा एक मोठा प्रोत्साहन आणि एक महत्त्वाचा क्षण होता.
•  तुमच्या तरंगलांबीशी जुळणारा एखादा दिग्दर्शक आहे का? तुमचा आवडता दिग्दर्शक कोण आहे?
•  प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची वेगळी शैली असते आणि कोणीही त्याच्याशी जुळत नसले तरी, प्रत्येकजण काहीतरी मौल्यवान घेऊन येतो. उदाहरणार्थ, मोहन कृष्णाची सौम्य दिग्दर्शन शैली मला भावते आणि मी त्याच्या दृष्टिकोनाचे कौतुक करतो. त्रिविक्रमची ताकद त्याच्या संवादांमध्ये आहे; त्याच्या शब्दांद्वारे प्रत्येक दृश्य सुंदर बनवण्याची त्याची उल्लेखनीय क्षमता आहे. दसरी नारायण रावची नाट्यमय प्रतिभा ही आणखी एक ताकद आहे जी मी कौतुकास्पद मानतो. मी वंशीगारू 
सोबत काम केले आहे आणि मला विशेषतः ' मातृ देवो भवा' तील माझी भूमिका खूप आवडली. त्या चित्रपटात मी एका क्रूर खलनायकाची भूमिका केली होती, ज्याने एका पात्राला अशाप्रकारे मारले की त्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, एक भाजी विक्रेता माझ्याकडे आला आणि माझ्या पात्राच्या अभिनयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. असे क्षण चित्रपटाचा त्याच्या प्रेक्षकांवर किती खोल परिणाम होऊ शकतो हे अधोरेखित करतात.
•  जे पालक आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत नाहीत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
•  मी पालकांना हे समजून घेण्याचा सल्ला देईन की, शिक्षण हे शैक्षणिक ग्रेडच्या पलीकडे जाते. अनेक पाश्चात्य देशांमध्ये, औपचारिक शालेय शिक्षणानंतर शिक्षणात कला किंवा खेळांवर लक्ष केंद्रित केले जाते. या दृष्टिकोनामुळे व्यक्तींना आवडीच्या विशिष्ट क्षेत्रात प्रभुत्व मिळवता येते. मुलाच्या कलात्मक किंवा क्रीडा प्रतिभेचे संगोपन करणं हे पारंपारिक शिक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे हे ओळखून, या मॉडेलला अनुकूल केल्याने आपल्या शैक्षणिक व्यवस्थेला फायदा होईल.
•  तुमचे आवडते नाट्य, नाटक किंवा नाट्यलेखक कोण आहेत आणि का?
•  हो, मी नेहमीच जुन्या क्लासिक्सचे कौतुक केले आहे जसे की गुरजादाचे ' कन्यासुलकम', जे मी १०० हून अधिक वेळा वाचले आहे. अशा कालातीत लेखनाने मला अजूनही कसे आकर्षित केले आहे हे उल्लेखनीय आहे. गेल्या काही वर्षांत, मी २७ वर्षांपासून रवुलापलम इथं नाट्य महोत्सव आयोजित केलेत, जिथं मी मानद अध्यक्ष म्हणून काम करतो. आम्ही महत्त्वपूर्ण बक्षिसे स्थापित केली आहेत. सर्वोत्तम पटकथेसाठी ३ लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी २ लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १ लाख रुपये. दुर्दैवाने, मोठ्या गुंतवणुकीनंतरही, आम्हाला दर्जेदार पटकथा शोधण्यात संघर्ष करावा लागलाय. तथापि, भविष्यात ते भरभराटीला येईल या आशेने आम्ही सर्जनशील कार्याला प्रोत्साहन, समर्थन देत राहतो.
•  तुम्ही कधी राजकारणात येण्याचा विचार केला आहे का? राजकारणाबद्दल तुमचे काय मत आहे?
•  तर, मी आनंदी राहावे असे तुम्हाला वाटत नाही का? (हसत) राजकारण हे माझे जेवणाचे ब्रेड बटर नाही. त्यासाठी कृत्रिमतेची एक पातळी लागते जी मला आवडत नाही. मला जे आवडते ते करण्यात मी समाधानी आहे आणि राजकारणापासून दूर राहणं पसंत करतो. तथापि, खऱ्या वचनबद्धतेने राजकारणात येणाऱ्या तरुण पिढ्यांचे मी खरोखर कौतुक करतो. पवन कल्याण यांनी समाजासाठी केलेल्या समर्पणाबद्दल आणि त्यागाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.
•  सिनेमा विकसित होत आहे, तुम्हाला काय समस्या आहेत असं वाटते?
•  समस्या अशी आहे की, लोक वास्तविक जीवनातील परिस्थितींबद्दल संवेदनशीलता गमावून बसलेत. अनेकांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या अपघातांची जाणीवही नसते; त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाची काळजी असते. तरुण पिढ्या सूर्योदय प्रत्यक्ष अनुभवण्याऐवजी पडद्यांवरून पाहतात. जीवन यांत्रिक बनलेय, खऱ्या भावना आणि आसक्तींपासून वंचित आहे. ही अलिप्तता नातेसंबंधांपर्यंत पोहोचते, विवाह कधीकधी फक्त आठवड्याच्या कार्यक्रमासारखे वाटतात. जेव्हा प्रत्येकाला समान अहंकार असतो आणि खऱ्या संबंधांचा अभाव असतो, तेव्हा जगणं आव्हानात्मक बनतं.
•  तुम्ही कोणत्या नवीन प्रकल्पांवर काम करत आहात?
•  मी सध्या काही रोमांचक प्रोजेक्ट्समध्ये गुंतलोय. मी मणिरत्नमसोबत 'ठग लाईफ' नावाच्या चित्रपटात काम करतोय. यापूर्वी मी ' पोन्नियिन सेल्वन' चे तेलुगूमध्ये रूपांतर केले होते. नुकतंच मी प्रभाससोबत एका पीरियड फिल्मसाठी साइन केलंय आणि रवी तेजा अभिनीत 'मिस्टर बच्चन'मध्ये वडिलांची भूमिका देखील केलीय. एकूणच, मी १० ते १५ प्रोजेक्ट्समध्ये सध्या व्यस्त आहे.
•  तुम्हाला अलिकडेच मिळालेल्या डॉक्टरेटबद्दल बोलू शकाल का?
•  मला नुकतीच एसआर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. हा एक अनपेक्षित सन्मान होता. वरंगल इथं हा समारंभ झाला, ज्यामुळं दुर्दैवाने बरेच जण उपस्थित राहू शकले नाहीत. या कामगिरीबद्दल सर्वांना माहिती व्हावी यासाठी, एक सांस्कृतिक संघटना एक कार्यक्रम आयोजित करतेय, जेणेकरून सर्वांना कळेल की मी डॉक्टर झालोय ... तेही औषधाशिवाय!
•  माध्यमांबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे?
•  माध्यमे ही चाकूसारखी असतात. ती दुधारी शस्त्र म्हणावं लागेल. ती फळे तोडण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. ते एक शक्तिशाली हत्यार आहे जे काळजीपूर्वक वापरली पाहिजेत. शिवाय माध्यमांनी दया आणि संतुलन राखले पाहिजे; ते चांगल्या कामाचे कौतुक करू शकते परंतु अनेकदा नकारात्मक पैलू वाढवते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येकात त्रुटी असतात आणि माध्यमांचे कव्हरेज कधीकधी अप्रमाणित असू शकते.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...