Sunday, 27 July 2025

सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण...!


"संसदेच्या इतिहासात प्रथमच उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा झालाय. त्यांनी दिलाय की, त्यांच्याकडून घेतलाय हे लवकरच समजेल. ह्या राजीनामानाट्यानं सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण मात्र झालंय. धनखड यांनी ममता बॅनर्जीना काबूत आणण्यासाठी जी भूमिका बजावली, त्याची बक्षिसी म्हणून उपराष्ट्रपतीपद मिळालं. पण त्या पदाची प्रतिष्ठा, गरिमा, गांभीर्य सांभाळलं नाही, सत्तारूढ अन् विरोधक यांचं संतुलन केलं नाही. विरोधकांशी दूजाभाव तर सत्ताधाऱ्यांना गोंजारत पाठीशी घालण्याचा लोचटपणा केला. पण अचानक धनखड मूळ स्वभावावर गेले. कृषिमंत्र्यांना आश्वासनांचा जाब विचारणं. राहुल गांधींचं कौतुक करणं, न्या.वर्मावर महाभियोगाचा विरोधकांचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांशी सल्लामलत न करता स्वीकारणं. त्याची परिणती धनखड यांचं राजकीय हौतात्म्यात झालंय!"
-----------------------------------------
*पू*र्वी तरुण तरुणींसाठी 'सोळावं वरीस' धोक्याचं म्हटलं जाई; आता 'अवघे पाऊणशे वयमान' म्हाताऱ्यांसाठी धोक्याचं म्हणायला हवंय. धनखड, मोदी, मोहनराव भागवत आणखी काहीजण आता पाऊणशे गाठताहेत. जयदीप धनखड यांच्यावर हे गंडांतर आलंय की आणलं गेलंय हे समजत नसलं तरी त्यांची गच्छंती झालीय हे खरं! धनखड यांना ना निरोप समारंभानं निवृत्त केलं, ना त्यांच्या कार्याचं कौतुक केलं गेलं. उलट त्यांची मानहानी कशी होईल हेच पाहिलं गेलं असं दिसून आलंय. त्यांनी राजीनामा देताना 'प्रकृती अस्वस्थ' असल्याचं म्हटलं. अशावेळी खरंतर त्यांच्या निवासस्थानी भाजप मंत्री, खासदार, नेते यांची विचारपूस करण्यासाठी गर्दी व्हायला हवी होती, पण तसं काहीच घडलं नाही. उलट त्यांचं ते  निवासस्थान रिकामं करण्याबाबत त्यांना सांगितलं गेलंय. संसदेच्या लोकसभा, राज्यसभा खासदारांनी निवडलेल्या धनखड यांचं राजकीय जीवन संपुष्टात आलंय. त्याचबरोबर त्यांना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व इतर हे जसं काहीच बोलत नाहीत. तसं मौन पाळण्यासाठी अनंत काळासाठी 'पाऊणशे वयमान क्लब'मध्ये सोडून दिलंय. राजीनामामुळं त्यांच्यावर राजकीय मरण ओढवलंय! राज्यसभेत ते खूप, नको तेवढं बोलत, विरोधकांना गप्प करत, रागावत, तोंडसुख घेत असत. दुसरीकडे मात्र सत्ताधाऱ्यांना गोंजारत, त्यांना पाठीशी घालत. सर्व विरोधी खासदारांना सभागृहाबाहेर काढण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. ही त्यांची स्वामिनिष्ठा इथं मात्र कामाला आली नाही. त्यांच्या त्या पक्षपाती वागण्यानं विरोधकांनी प्रथमच सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. हे कसं विसरणार? मग आता अचानक काय झालं? राजीनामा देण्यापूर्वी आणि नंतरही बोलघेवडे सभापती जयदीप धनखड यांच्याकडून एकही शब्द का उच्चारला गेला नाहीये. धनखडजी, तुम्हाला असं कोणतं दुःख, दर्द, पीडा, आजार अचानक झालाय, तुम्ही आयसीयूतही नाही,  अत्यवस्थ स्थितीत तर नाहीच. अत्यवस्थ माणूस देखील डोळ्यानं खुणावत बोलतो. मग तुम्ही मूग गिळून का गप्प बसला आहात? नेमकं काय घडलं ते देशाला सांगा ना, पण ते सांगणार नाहीत. कारण त्याचं वागणंच त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरलंय.
लोकशाहीत उपराष्ट्रपती ही शक्तीशाली, प्रभावशाली दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती! ती काही तासापूर्वी राज्यसभेचं संचालन करत होती, अन् अचानक काही तासातच एका ओळीत 'प्रकृती अस्वस्थ' कारण देत आपल्या पदाचा राजीनामा देऊन निघून गेली! हे सर्वसामान्य भारतीयांच्या पचनी पडत नाहीये. इथं आठवण येतेय ती अशोक लवासा या सनदी अधिकाऱ्याची! त्यांनी राजीनामा दिला नसता तर ते मुख्य निवडणूक आयुक्त झाले असते. पण त्यांनी एक चूक केली. निवडणूकी दरम्यान त्यांनी मोदींना एक नोटीस बजावली होती. मग काय 'हमारी बिल्ली हमीसे माऊ...!' म्हणत त्यांच्या घरी बुलडॉग दाखल आले. इन्कमटॅक्स, ईडी, सीबीआयच्या धाडी झाल्या. मग सारं कुटुंब उध्वस्त झालं. अखेर भीतीपोटी अशोक लवासा जे मुख्य निवडणूक आयुक्त होणार होते त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. अन् गायब झाले. सध्या कधीमधी टीव्ही चॅनल्सवर चर्चेत दिसतात. असो. केवळ भाजपचेच नाहीतर काँग्रेसमधून भाजपवासी झालेले अनेक वाचाळवीर गप्प, मुक्यामाणसांसारखं चुपचाप पडून राहिलेत. हिटलरच्या काळात त्याची गुप्त पोलिस यंत्रणा होती. 'गॅसटेपो' ती लोकांना अशाचप्रकारे त्रास देत, मारत होती, पण लोक हू की चू करत नव्हते. केजीबीचीही अशीच दहशत होती. भारतात आज ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यासारख्या तपास यंत्रणा आहेत, ज्यांची चाल, चरित्र, अन् चेहरा असा आहे की, त्यांना जेव्हाकधी वाटेल तेव्हा ते माणसाची धरपकड करू शकतात, पण माणसं त्या विरोधात काहीच बोलू शकत नाहीत. नुकतंच न्यायालयानं त्यावर ताशेरे ओढलेत. दुष्यंत यांचा एक शेर आहे...
'मौत ने तो धर दबोचा एक चिते की तरह 
जिंदगी ने जब छुआ तब फासला रखकर छुआl' 
अशी स्थिती भारतात आहे. देशाचा उपराष्ट्रपती, ताकदवान माणूस अचानकपणे कोणाशीही न बोलता, तोंडातून ब्र काढता राजीनामा देऊन निघून जातो. यावरून असं दिसतं की, मोदी सरकारमध्ये जे काही चाललंय तो सत्ता संघर्षाचा एक नमुना आहे. याचे पडसाद आगामी काळात दिसून येईल! 
उपराष्ट्रपती जयदीप धनखड हे जाट समुदायातून येतात. सुप्रीम कोर्टात ते सिनिअर वकील होते. ते लोकदल, जनता पक्ष, काँग्रेस असा पक्षप्रवास करत ते भाजपत स्थिरावले. जम्मू काश्मीरचे सतपाल मलिक आणि धनखड हे दोघे जाट भाजपत होते. मलिक यांची आज काय अवस्था आहे ते आपण पाहतोय. मलिक राज्यपाल असताना त्यांनी मोदी सरकारवर पुलवामा हल्ल्याबाबत अन् संघाचे प्रवक्ते राम माधव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर मालिकांची अशीच उचलबांगडी झाली. आज मात्र मलिक यांचीच ईडीची चौकशी सुरू आहे. असहाय मलिक आज रुग्णालयात उपचार घेताहेत. मोदी सरकार सर्वांचा लेखाजोखा बाळगत असतात. जेव्हा धनखड बंगालचे राज्यपाल होते. तेव्हा 'प्रो ॲक्टिव्ह' राज्यपाल होते. ममता बॅनर्जीना काबूत ठेवण्यासाठी त्यांना दिल्लीहून बंगालमध्ये पाठवलं होतं. तिथं ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याची एकही संधी धनखड सोडत नव्हते. तिथं ते राज्यपाल कमी आणि भाजप नेते अधिक जाणवत होते. एवढं करूनही भाजपला तिथं यश मिळालं नाही. पण त्यांनी मोदींची मर्जी संपादन केली. हा माणूस आपल्या कामाचा आहे, शिकलेला, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारा आहे. म्हणून मग त्यांना दिल्लीत बोलावून थेट उपराष्ट्रपती बनवलं. त्यानंतर त्यांनी भाजपची इमाने इतबारे सेवा केली. राज्यसभेत विरोधकांना टोलवून भाजपच्या मंत्र्यांचे, नेत्यांचे पाठीराखे बनले. पदाची प्रतिष्ठा, गरिमा, गांभीर्य सांभाळलं नाही, संसदेत सत्तारूढ अन् विरोधक यांच्यात संतुलन राखायला हवं ते त्यांनी केलं नाही. विरोधकांशी दूजाभाव, सत्ताधाऱ्यांना गोंजारत पाठीशी घालण्याचा लोचटपणा केला.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही पदं प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानपदाच्या वरची असली तरी संविधानिक पातळीवर कार्यकारी प्रमुख म्हणून पंतप्रधानांना जे अधिकार आहेत किंवा मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, ते राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींना नाहीत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याच्या आधारे राष्ट्रपतींनी कारभार करायचा आणि उपराष्ट्रपतींनी राज्यसभेचे सभागृह निस्पृहपणे चालवायचं ही त्यांची राज्यघटनेने नेमून दिलेली कामं आहेत. धनखड उपराष्ट्रपती पदावर असताना अनेकदा न्यायव्यवस्थेविरोधात बोललेत. राजकीय मतं व्यक्त करताना मोदी सरकार अस्वस्थ होईल, असं भाष्य त्यांनी केलंय. त्यांनी स्वतःच्या पद्धतीने प्रोटोकॉलचे अर्थ लावले. 'प्रोटोकॉल मधला सन्मान' आणि 'प्रोटोकॉल मधले अधिकार' या दोन भिन्न गोष्टी पण त्यांनी त्यांची सरमिसळ केली. पंतप्रधानांपेक्षा आपण कार्यकारी पातळीवर वरच्या दर्जाचे आहोत, असा भ्रम त्यांनी स्वतःमध्ये केल्याची चर्चा होती. त्यामुळं केंद्र सरकार आणि उपराष्ट्रपती यांच्यातले संबंध सहज, सुरळीत न राहता ते टप्प्याटप्प्याने असहज होत गेले. थोडक्यात अस्वस्थ होत गेले. म्हणून उपराष्ट्रपतींची 'राजकीय तब्येत' बिघडली असावी. धनखड यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे सांगितली जात असली तरी त्यांची सरकारशी पंगा घेण्याची राजकीय वृत्ती ही समाजवादी विचारातून आली असावी. धनखड हे काही मूळचे संघ विचाराचे किंवा भाजपचे नाहीत. ते मूळ समाजवादी, जनता दलाचे. त्यांनी पंतप्रधान चंद्रशेखर मंत्रिमंडळात संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केलं होतं. १९९० च्या दशकात ते जनता दलाचे खासदार आणि आमदार राहिलेत. अर्थातच त्यांची मूलभूत राजकीय प्रवृत्ती ही जुन्या समाजवादी विचारांशी राहिलीय. त्यामुळंच मोदी सरकारनं उपराष्ट्रपती पदासारख्या उच्चतम पदावर बसवूनही मूलभूत विचारसरणी बदलली नाही.
धनखड यांची गच्छंती अत्यंत अपमानास्पदरित्या झालीय. त्यांनी राजीनामा दिलेला नाही तर त्यांच्याकडून घेतला गेलाय हे आताशी स्पष्ट झालंय. गेल्या काही काळात त्यांच्या वागण्यात बदल होत गेलाय. त्यांना सरकारमधून, पक्ष पातळीवर फारसं महत्व दिलं जात नाही असं त्यांना जाणवायला लागलं होतं. त्यामुळंच त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकवत विरोधकांना गोंजारायला सुरुवात केली होती. त्यांनी काँग्रेसचे राज्यसभेतले नेते मल्लिकार्जुन खरगे, आपचे अध्यक्ष केजरीवाल, संजयसिंग अन्य पक्षाच्या खासदारांना बोलावून त्यांच्याशी सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशाच एका स्नेहभोजनाच्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं. 'राहुल गांधी भले, सरळ, हुशार आणि दूरदृष्टीचे नेते आहेत. पण त्यांच्यात राजकारण्याकडे जी खुनशी प्रवृत्ती लागते ती त्यांच्याकडे नाही. त्यामुळं मोदींसमोर त्यांचा निभाव लागत नाहीये!' असं धनखड म्हणाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री यांना शेतकऱ्यांच्या संपानंतर जे तीन काळे कायदे मागे घेतले तेव्हा जी आश्वासनं दिली आहेत त्याचं काय झालं याचा जाब त्यांनी जाहीर सभेत त्यांच्या समक्ष विचारला. त्यामुळं त्यांची कुचंबना झाली. न्या. यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोगाबाबत राज्यसभेत ६८ विरोधी खासदारांच्या स्वाक्षरीची नोटीस धनखड यांनी सोमवारी दुपारी स्वीकारली. त्यात न्या.वर्मा यांना हटवण्याची मागणी होती. आपण ती नोटीस स्वीकारत आहोत असे धनखड यांनी घोषित केलं, त्याच क्षणी सरकारच्या कपाळावर आठ्या पडल्या. प्रत्यक्षात इथंच संवादाचा अभाव होता. त्यांनी संसदीय कार्य मंत्र्यांना याची माहिती त्यांनी द्यायला हवी होती पण ती त्यांनी दिली नाही. त्यामुळं सरकार अडचणीत आलं. त्यानंतर मग भाजपनं ठरवलं की,  धनखड यांचा राजीनामा घ्यायचा. धनखड यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यानंतर तर्क वितर्क लढविले गेलेत. राजीनामा दिल्यानंतर १२ तासांनी पंतप्रधान मोदींनी ट्विट करून त्यांना शुभकामना दिल्यात. त्यापलीकडे कुणी काही सांगितलं नाही. पण त्याचवेळी राजीनाम्याबाबत त्यांचे सरकारशी असलेले मतभेद इथपासून ते त्यांची तब्येत इथपर्यंत अनेकांनी वेगवेगळे दावे केलेत. राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात खासदारांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्याचाही दावा केला गेला. राज्यसभेचे नेते जे. पी. नड्डा यांनी धनखड यांना बाजूला सारून 'स्वतः म्हणतील तेच रेकॉर्डवर जाईल...!' असं म्हटल्याचं दिसून आलं. प्रत्यक्षात आपण काढलेले उद्गार हे गोंधळ करणाऱ्या विरोधी खासदारांच्यासाठी होते. ते राज्यसभा अध्यक्षांना उद्देशून नव्हतं, असा खुलासा नड्डा यांनी केला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून संशय आणखी वाढविला. धनखड हे राजीनामा दिल्यानंतर  मलिक यांच्यासारखेच मोदी यांच्या विरोधात आग ओकू लागतील, असे भाकीत अनेकांनी केलं, पण अद्याप त्यांनी मौन पाळलेलंय. 
ज्या भाजपनं आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं त्यांना ७५ टक्के मतांनी उपराष्ट्रपतीपदावर निवडून आणलं होतं, त्याच सरकार विरोधात धनखड जर काही डावपेच खेळत असतील तर ते सरकार त्यांना त्या खुर्चीवर टिकवून ठेवेल याची शक्यताच नव्हती. अर्थातच धनखड यांना बाजूला व्हावं लागलं. यामध्ये विरोधकांची बाजू उचलून धरणाऱ्या माध्यमांनी मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीची कितीही खिल्ली उडवली तरी उपराष्ट्रपतीपदा सारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या धनखड यांनी विद्यमान सरकारशी राजकीय दृष्ट्या जुळवून घेतलं नाही. सरकार आणि विरोधक यांच्यातलं संतुलन सांभाळलं नाही हे नजरेआड करून कसं चालेल? धनखड यांनी आपल्या दालनातल्या सर्व माजी उपराष्ट्रपतींच्या तसबिरींवर एक नजर जरी टाकली असती, तरी त्यांना उपराष्ट्रपती पदावरच्या व्यक्तीनं नेमकी कशी वर्तणूक ठेवावी, याची आदर्श उदाहरणं सापडली असती. त्यात भाजपचे भैरोसिंह शेखावत यांचं उदाहरण दिसलं असतं. ते २००२ मध्ये उपराष्ट्रपती झाले. २००७ मध्ये सन्मानाने निवृत्त झाले. यातली दोन वर्षे वाजपेयी यांच्या सरकारची, तर उरलेली तीन वर्षे डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारची होती. शेखावत यांनी या कालावधीत आपल्या उपराष्ट्रपती पदाचा आब, प्रतिष्ठा, रुबाब, गरिमा आणि रुतबा  वाढविला. वाजपेयी आणि मनमोहन सिंग या परस्पर विरोधी पक्षांच्या पंतप्रधानांबरोबर त्यांचे अतिशय मधुर संबंध राहिले. वाजपेयी हे तर त्यांचे मित्रच होते, पण मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधान असून देखील त्यांचे उत्तम राजकीय संबंध टिकून राहिले होते. उपराष्ट्रपती पदावर म्हणजेच राज्यसभेच्या अध्यक्षपदावर बसून शेखावत यांनी सत्तारुढ आणि विरोधी यांच्यातलं संतुलन साधलं होतं. ते संतुलित वर्तन ढळू दिलं नाही. तसं जर धनखड यांनी सभागृह चालवलं असतं, संतुलन सांभाळलं असतं, तर राजीनाम्याची वेळ आली नसती. वास्तविक धनखड यांच्यासमोर प्रणव मुखर्जीचाही आदर्श होता. प्रणव मुखर्जी काँग्रेसी होते. तरी देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलं होतं. तत्त्वांशी कुठेही तडजोड केली नव्हती. दोघांचे संबंध अतिशय मधुर होते. प्रणव मुखर्जी यांचं हे राजकीय कौशल्य धनखड यांना आत्मसात करता आलं नाही. उलट त्यांनी समाजवादी विचाराच्या नेत्यासारखे वागले. त्यांनी सरकारी धोरणांशी सुसंगत वागण्यापेक्षा सरकार विरोधी वागण्यावर भर दिला, पण इथं मोदी सरकारचं नुकसान झालं नाही, तर त्याचं राजकीय जीवन संपुष्टात आलं.
इथल्या सत्तासंघर्षाची जाणीव होऊ लागलीय. एक संकट उभं ठाकलंय ते उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक! तोवर राज्यसभा ही उपराष्ट्रपती आणि सभापती विहिन असेल. अनेकांची नावं चर्चेत आहेत पण मलिक, धनखड यांचा अनुभव आल्यानं आता भाजप अशा कोणत्याच बिगर भाजप, बाहेरून आलेल्यांना हे पद दिलं जाणार नाही. संघ आणि भाजपशी एकनिष्ठ व्यक्तीलाच उपराष्ट्रपती करतील हे निश्चित! धनखड यांचा राजीनामा ही फार मोठी राजकीय घटना घडू द्यायची नाही, असा चंग मोदी सरकार मधल्या सगळ्या वरिष्ठ मंत्र्यांनी बांधला. त्यामुळंच धनखड यांचा निरोप समारंभ झाला नाही की, कोणताही मंत्री, नेता त्यांना भेटायला गेलेला नाही. शिवाय त्यावर प्रतिक्रियाही देत नाहीत. जे व्हायचं ते घडून गेलंय. भाजप नव्या भैरोसिंह शेखावत यांच्या शोधात आहे. एकाच वेळी पक्षाशी निष्ठा आणि त्याचवेळी संतुलित राजकीय वर्तन ही कसरत सांभाळणारा नेता हवाय. पण मोदी  शहांच्या या नव्या भाजपमध्ये असं नेतृत्व मिळेल का?
हरीश केंची,
९४२२३१०६०९




नाट्य, चित्र, साहित्यिक डॉ. तानिकेला भरणी..

लेखक, अभिनेता, कवी आणि तत्वज्ञानी तनिकेला भरणी यांना जवळून पाहण्याचा आणि वैयक्तिक संपर्क साधण्याचा प्रयत्न मित्राच्या माध्यमातून हैदराबादमध्ये झाला. त्यांची एक प्रकट मुलाखत सुरू होती. मित्राच्या ओळखीनं तिथं प्रवेश मिळाला. त्या अभ्यासपूर्ण संभाषणात, डॉ. तानिकेला भरणी यांनी त्यांची साहित्य कारकिर्द, त्यांचा नाट्यसृष्टीतला प्रवेश, नाट्य आणि चित्रपटसृष्टीतला अनुभव अन् कलांमध्ये सामाजिक जबाबदारीचे महत्त्व याबद्दल प्रामाणिकपणे विचार मांडले. त्यांनी ८०० हून अधिक चित्रपटातून कामे केली आहेत. त्यात त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेत, ते त्यांच्या बुद्धिमत्तेनं आणि कलात्मकतेने इतरांना नेहमी प्रेरणा, मार्गदर्शन देत असतात. तेलुगू साहित्यावरचं त्यांचं प्रेम आणि अभिनयाप्रती त्यांची अविचल वृत्ती त्यांना इतर सगळ्या बाबींपासून अलग करते. तेलुगू अभिनेते डॉ. तनिकेला भरणी यांनी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात त्यांच्या अद्भुत, अनोख्या अभिनयानं नेहमीच त्यांचे आदर्श उंचावले आहेत. त्यांच्या कामावरील त्यांची निष्ठा, श्रद्धा आणि प्रेमामुळेच सांस्कृतिक क्षेत्रात आज सर्वोच्च स्थानावर ते पोहोचलेत. हा अभिनेता आपल्या कामात समर्पित आहे हे पाहून भरणी यांना एस आर विद्यापीठाने साहित्यिक, कला विषयात मानद डॉक्टरेट हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे. हैदराबाद इथला हा कार्यक्रम अन् त्यानंतर पुण्यातल्या आंध्र असोसिएशनच्या वर्धापन दिनाच्या समारंभासाठी आले असताना त्यांच्याशी अधिक बोलण्याची संधी मिळाली, निश्चितच तासभराचा त्यांच्या सानिध्यातला काळ हा आपल्याला त्यांच्या अनुभवसंपन्न जीवनाची अनुभूती देऊन गेला. त्यांच्याशी झालेल्या अत्यंत मनमोकळ्या गप्पा अन् त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरं ही त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी, बहुगुणी व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.
• लेखक म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
• माझे पणजोबा, दिवाकरला तिरुपती शास्त्री यांच्याकडून आमच्या कुटुंबाकडे साहित्यिक प्रतिभेचा वारसा आलाय. या वारसानं माझ्यातल्या कवी अन् लेखकावर संस्कार केलेत अन् प्रभाव पाडलाय. माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या, इंटरमिजिएटच्या काळात, माझे जवळचे मित्र, सहाध्यायी देवरकोंडा नरसिंह कुमार, ज्यांचं आता निधन झालंय, त्यांनी मला कविता लिहिण्यास प्रेरित केलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळंच माझ्या कविता ह्या आदरणीय कवी पुराणम सुब्रह्मण्यम शर्मा यांच्या संपादकत्वाखालील लोकप्रिय मासिक 'आंध्र ज्योती' मध्ये प्रकाशित झाल्या. वयाच्या २३ व्या वर्षी माझी कविता छापून येणं हा माझ्या जीवनातला एक रोमांचक क्षण होता, जणू पुरस्कार जिंकण्यासारखा! त्याआधी आणि नंतरही वारंवार मिळणाऱ्या 'साभार परत...!' अशा नकारांना तोंड देऊनही, मी टिकून राहिलो आणि माझ्या प्रतिभेनं मला यश मिळालं. 'भैरव मीना' या टोपणनावानं मी एका मल्याळम कथेचा तेलुगू भाषेत अनुवाद केला, जो नंतर प्रकाशितही झाला, या यशामुळं मला कवितांबरोबरच लेखन सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळाली, त्यानंतर मग मी कथा आणि व्यक्तीचित्रणं लिहिण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षण बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, माझे गुरू रल्लापल्ली गारू म्हणजे रल्लापल्ली नरसिंह राव, जे एक प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य अभिनेते होते, त्यांनी मला एका नव्या साहित्यप्रकारात म्हणजे नाटकं लिहायला प्रोत्साहित केलं. आणीबाणीच्या काळात, मी माझं पहिलं नाटक लिहिलं, गर्दभांडम म्हणजे गाढवाचं अंडं या नावाचं एक राजकीय व्यंग नाट्य रूपात रेखाटलं होतं, ज्यात साम्यवादावर, समाजवादावर टीका करण्यात आली होती. हे नाटक यशस्वी झालं, त्याचे आंध्र प्रदेशात १०० हून अधिक प्रयोग सादर झाले आणि त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. यातून माझ्या रंगभूमीवरच्या प्रवासाला सुरुवात झाली. नाट्यक्षेत्रात यश मिळतंय हे पाहून मग मी पाश्चात्य रंगभूमी तंत्रांमध्ये पदव्युत्तर पदविका घेतली, ज्यामुळे माझी नाट्यकला अधिक प्रगल्भ, समृद्ध झाली.
•  तुम्ही लिहिलेल्या 'गर्दभांडम' नाटकात तुम्ही भूमिका केली होती का?
•  हो, मी त्यात एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली होती...खलनायकाची! माझ्या त्या पहिल्याच भूमिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नाट्यक्षेत्रात मिळालेल्या या यशानंतर मग मी मागं वळून पाहिलंचं नाही. हे यश माझ्या चित्रपट कारकिर्दीतही कायम राहिलं, जिथं मी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. त्यामुळं चित्रपटसृष्टीतही
खलनायक म्हणून माझी कारकिर्द गाजली.
•  चित्रपटांमधल्या तुमच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली?
•  स्वाभाविकच, रंगभूमीशी मी संबंधित असल्यानं, आणि माझ्या नाटकांना पुरस्कार मिळत असताना माझ्याकडं लक्ष्य वेधलं जाऊ लागलं. लोकांना माझं काम लक्षात येऊ लागलं. अशाच एका व्यक्तीचं नाव दमराजू हनुमंत राव होते, ज्यांनी माझं एक नाटक पाहिलं आणि मला चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला माझा पहिला चित्रपट लिहिण्यासाठी चेन्नईला नेलं, ज्यामध्ये सुमन म्हणजे शिवाजी या रजनीकांत यांच्या चित्रपटातील खलनायक तो त्या चित्रपटाचा हिरो होता. त्यानं मला एक कॅसेट दिली, अन् मला बजावलं की, ही कॅसेट अत्यंत महत्वाची आहे, हा इंग्रजी चित्रपट आहे. तो आम्हाला तेलुगू भाषेत तयार करायचा आहे. पण चित्रपटाची कथा आणि त्याची बातमी कुठेही लीक होता कामा नये अशी विनंती केली. मग त्यांनी एडिटोरियमचे दरवाजे बंद केले आणि आम्ही कॅसेट पाहू लागलो, माझ्या लक्षांत आलं की, ती दुसरी तिसरी कोणती नव्हे तर ती 'एंटर द ड्रॅगन'ची कॅसेट होती. मी त्यांना सांगितलं की, मी हा चित्रपट आधीच १० वेळा पाहिलाय. अशाप्रकारे चित्रपटसृष्टीतला माझा प्रवास सुरू झाला, कथानकात थोडे बदल आणि रूपांतरांसह 'एंटर द ड्रॅगन'चं आम्ही वेगळ्या आवृत्तीत भाषांतर केलं. चित्रपट यथातथाच चालला. मला रंगभूमीवर वावरणं हे अत्यंत आवडीचं असल्यानं शिवाय त्यात पारंगत असल्यानं आणि माझ्या कामाचा मला अभिमान असल्यानं, चित्रपट उद्योगातला ढोंगीपणा, कृत्रिम, कछकड्याप्रमाणे असलेलं वातावरण मला तेव्हा फारसं आवडलं नाही, तिथं मला अगदी गुदमरल्यासारखं झालं, तिथं गुलाम असल्यासारखं वाटायचं. मग मी तिथून लगेच परतण्याचा निर्णय घेतला. कदाचित दैवाच्या मनात काही वेगळचं होतं. चित्रपटातला संवादलेखन करणारा विभाग पाहणाऱ्या एका संपादकानं मला आणखी एक संवादलेखनाची संधी दिली. यावेळी ते मौली आणि सुहासिनी यांच्यासोबत 'पटणम पिल्ला पल्लेटूरी चिन्नोडू' नावाच्या चित्रपट तयार करत होते तो सिनेमा मात्र १०० दिवस चालला. यश मिळूनही, मला तिथलं वातावरण अजूनही आवडलेलं नव्हतं. आणि संवादलेखनाचा जो मोबदला ठरला, जेवढे पैसे देण्याचे वचन दिलं होतं, तेवढं त्यांनी मला दिलंच नाही. त्यांनी सांगितलं की, ते संपूर्ण चित्रपटासाठी पांच हजार रुपये देऊ, पण त्यापैकी त्यांनी फक्त दोन हजारच दिले. फसवणूक झाल्यासारखं वाटल्यानं मी त्यांच्यावर रागावलो आणि तिथून निघून गेलो. नंतर, चेन्नईमध्ये स्थायिक झालेल्या रल्लापल्ली यांनी माझी ओळख दिग्दर्शक वंशी यांच्याशी करून दिली. त्यांना चित्रपटातले काही सीन लिहून हवे होते, त्यांनी ते मला लिहायला सांगितले. त्यासाठी त्यांनी मला सात दिवसाचा अवधी दिला, पण त्यापेक्षा मी तिथं मला स्वतःला सिद्ध करण्यास उत्सुक होतो, म्हणून मी त्या संध्याकाळपर्यंत सात सीन लिहून पूर्ण केले. मी ते इतके लवकर लिहिले, हे पाहून ते आश्चर्यचकित तर झालेच तसंच लेखनशैलीनं प्रभावितही झाले. मग ज्यामुळं मला राजेंद्र प्रसाद अभिनीत 'लेडीज टेलर' या विनोदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, जो चित्रपट १०० दिवस चालला. त्यानंतर मात्र मी त्या दिवसापासून मागे वळून पाहिलंच नाही, राम गोपाल वर्मांचा पहिला चित्रपट 'शिवा' यासह ५२ चित्रपटांसाठी मी लेखन केलं.
•  तुमच्या कुटुंबानं तुम्हाला या साऱ्या कामासाठी पाठिंबा दिला का? त्यांची प्रतिक्रिया काय होती?
•  कधीच नाही...! अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांप्रमाणे, माझ्या कुटुंबानंही मला रंगभूमीवर करिअर करायला प्रोत्साहन दिलं नाही; खरं तर, त्यांनी ते करायला नकारच दिला. विरोध केला. माझ्या वडिलांनी तर चक्क मला घराबाहेर काढलं. त्यानंतर, मी माझे गुरु रल्लापल्ली यांच्याकडे राहायला गेलो, जे एक महान सज्जन, सच्छिल गृहस्थ होते. त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिलं. 'लेडीज टेलर' नामक चित्रपट सुपरहिट झाला, ऑफर्सचा ओघ स्वाभाविकपणे सुरू लागला. यशाबरोबर मी अधिक पैसेही मागू लागलो आणि जसजसं माझं करिअर विस्तारीत गेलं तसतसं माझ्या संधीही वाढत गेल्या. शिवाय संपूर्ण भारतात खळबळ उडाली. मला आठवतं की, चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी राम गोपाल वर्मा यांनी मला नानाजींची भूमिका साकारताना पाहिलं आणि मला सांगितलं, 'तू तुझी लेखणी खाली ठेवू शकतोस; तू एक चांगला अभिनेता होशील...!' आणि त्याचा तो होरा अगदी बरोबर ठरला, मी आतापर्यंत ८०० हून अधिक चित्रपटांतून काम केलंय.
•  आता तुम्हाला लिहिण्याची आठवण येते का?
•  मी गेल्या काही वर्षांपासून विविध विषयांवर लक्ष केंद्रित करून लिहितोय. मी 'एंदोरो महानभावुलु' मध्ये संगीतकारांच्या तात्विक जीवनाचा इतिहास आणि 'नक्षत्र दर्शनम' नावाचा कविता संग्रह लिहिलाय, जो कलेच्या महान दिग्गजांवर प्रतिबिंबित करतो. एकूण, मी १२ ते १३ पुस्तके लिहिलीत. १० नाटकं लिहिलीत, त्यापैकी अनेक नाटकं लोकप्रिय झालीत. सर्वकाही लेखनापासून सुरू झालंय आणि तो आता माझ्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनलाय.
•  तुम्हाला थिएटर आणि सिनेमा दोन्हीचा अनुभव आहे. यापैकी तुम्हाला कोणतं क्षेत्र आवडतं?
•  मी नेहमीच म्हणतो की, चित्रपटक्षेत्र माझ्या आर्थिकबाबींचं तसंच खिशाचं समाधान करतात, तर रंगभूमीच्या कामात आणि कवितांतून माझ्या मनाला समाधान मिळतं. 
•  सिनेमासाठी पटकथा लिहिताना कोणत्या प्रमुख आव्हानांना तोंड द्यावं लागलं?
•  एक मोठं आव्हान म्हणजे माझ्या थिएटर तंत्रांना सिनेमातंत्राशी जुळवून घ्यायला लागलं. ६० आणि ७० च्या दशकात, थिएटर बहुतेकदा मेलोड्रॅमॅटिक असायचं, त्यात जड मेकअप, विस्तृत प्रकाशयोजना आणि मोठ्या कलाकारांचा समावेश असायचा. पाश्चात्य रंगभूमीचा अभ्यास केल्यानंतर, मला हॉलिवूड चित्रपटांसारखा अधिक वास्तववादी दृष्टिकोन आणायचा होता. यामुळं मी जटिल मेकअप, पोशाख आणि संगीत यासारख्या महागड्या घटकांना वगळून निर्मिती सोपी केली, त्याऐवजी मी कमीत कमी काळा-पांढरा पोशाख निवडला आणि खर्च कमी केला. मी सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित करणारी पथनाट्ये समाविष्ट करायला सुरुवात केली आणि शिक्षण व्यवस्थेवरचं व्यंगनाट्यचित्र "पेड्डा बाल शिक्षा" आणि पाश्चात्य रंगभूमीचे रूपांतर "गोग्रहणम" सारखी प्रहसन लिहिली. तथापि, या वास्तववादी आणि किमान दृष्टिकोनांचं चित्रपटात रूपांतर करणं कठीण झालं, कारण चित्रपट उद्योग अजूनही मेलोड्रॅमॅटिक शैलींमध्येच रुजलेला होता.
•  तुम्ही आज अनेकांची प्रेरणा आहात. पण तुमची प्रेरणा कोण आहे?
•  माझी प्रेरणा माझ्या साहित्यिक कौटुंबिक पार्श्वभूमीतून येते. हे फक्त एका व्यक्तीचं काम नाही; मी श्री श्री आणि तेलुगूतल्या बाळ गंगाधर टिळक या सारख्या कवींकडून प्रेरणा घेतो. तुम्ही साम्यवादाचा, समाजवादाचा उल्लेख 'गाढवाचे अंडे' असा केलाय आणि श्री श्रींना प्रेरणास्थान म्हणून उद्धृत केलंय. याबद्दल तुम्ही अधिक तपशीलवार सांगू शकाल का? श्री श्री हे एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची बंडखोर भावना माझ्या सर्जनशीलतेच्या दृष्टिकोनाशी जुळते. आणीबाणीच्या काळात मी 'गर्द भांडम' वर काम करत असताना, त्याच्या टीकात्मक भूमिकेसाठी मला अटक होण्याची खरोखरच भीती निर्माण झाली होती. कलाकार म्हणून, सरकार आणि सामाजिक नियमांच्या विरोधात असणं हे अनेकदा त्रासदायक असतं. ही बंडखोर भावना मला श्री श्रींच्या कामात दिसते. जेव्हा मी पदव्युत्तर पदवी घेतली तेव्हा मला पाश्चात्य रंगभूमीच्या विस्तृत जगाची ओळख झाली, ज्यामुळं मला माइमसह प्रयोग करायला भाग पाडले. माइममध्ये कोणतेही विस्तृत सेट नसतात; त्याऐवजी, आम्ही ताजमहालचे प्रतिनिधित्व करण्यासाठी साध्या टॅगसारखे कमीत कमी प्रॉप्स वापरतो. मी मधू फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये माइम व्याख्याता म्हणून माझ्या कामात आणि माझ्या लघुपटांमध्ये ही शैली समाविष्ट केली. जरी अशी प्रायोगिक तंत्रे आर्थिक अडचणींमुळं व्यावसायिक चित्रपट उद्योगात बसत नसल्या तरी, त्यांना माझ्या लघुपटांमध्ये त्यांचं स्थान मिळालं, जसं की 'द लास्ट फार्मर', ज्याला लोकप्रियता मिळाली.
•  टॉलिवूडमधल्या तरुण चित्रपट निर्मात्यांना तुमचा काय सल्ला आहे?
•  सर्वप्रथम, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, दर आठवड्याला मोठ्या संख्येनं चित्रपट प्रदर्शित होतात, परंतु खरोखरच काही उल्लेखनीय असतात. सध्याचा ट्रेंड 'बाहुबली' सारख्या उच्च-बजेट चित्रपटांच्या यशाचा पाठलाग करत असल्याचं दिसतं, परंतु मोठ्या बजेटवरचं हे लक्ष अनेकदा लहान, अर्थपूर्ण प्रकल्पांना बाजूला ठेवतं. असं असूनही, 'बालागम' सारखे चित्रपट हे दाखवून देतात की चित्रपटातला कथा आशय अजूनही प्रशंसा आणि आर्थिक यश दोन्हीही मिळवू शकतो. माझा सल्ला असा आहे की, बजेटपेक्षा आशयाला प्राधान्य द्या. कलाकृतीचा प्राथमिक उद्देश भावना जागृत करणं हा आहे. मग ती आपल्याला रडवणारी असो किंवा हसवणारी असो. ' मायाबाजार' प्रसिद्ध राहतो कारण ती दोन्ही साध्य करते. प्रेक्षकांना आकर्षित केवळ स्टारडम नाहीतर कंटेंटची गुणवत्ता यशाची ही व्याख्या करते. ' महानटी'सारखे चित्रपट त्यांच्या आकर्षक कथांमुळं यशस्वी होतात, कारण ते केवळ स्टारडम आहेत म्हणून नाही. खरंतर आपण इतर चित्रपट उद्योगांकडूनही प्रेरणा घेतली पाहिजे. मल्याळम आणि तमिळ चित्रपट अनेकदा कमी बजेटमध्ये उत्कृष्ट चित्रपट तयार करतात, जे दाखवतात की, प्रभावी कथाकथनासाठी मोठ्या संसाधनांची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ, माझा स्वतःचा चित्रपट ' मिथुनम' जो २० दिवसांत, फक्त दोन पात्रं आणि एकाच लोकेशनवर बनवला गेला होता, तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला अन् त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं हे सिद्ध होतं की अर्थपूर्ण सामग्री कमीत कमी संसाधनांमध्ये तयार केली जाऊ शकते आणि ती प्रदर्शित झाल्यानंतरही बराच काळ टिकून राहते.
•  तुम्ही 'मिथुनम' सारखे आणखी चित्रपट का बनवत नाही ?
•  त्यादृष्टीनं आणखी काही चित्रपट बनवण्याची माझी योजना आहे. तथापि, चित्रपट निर्मितीचा खर्च आताशी लक्षणीयरीत्या वाढलाय; एका सामान्य चित्रपटासाठीही किमान ५ कोटी रुपये लागतील. अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक निर्माते शोधणं आव्हानात्मक असू शकतं.
परिणामी, मी माझ्या चित्रपटांमध्ये कलात्मक मूल्य आणि व्यावसायिक व्यवहार्यता दोन्ही समाविष्ट करण्यासाठी मी माझा दृष्टिकोन बदललाय. या पैलूंचा समतोल साधून, मी माझे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहेत याची खात्री करू शकतो आणि त्याचबरोबर माझ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कलात्मक अखंडतेनं पालन करू शकतो. या धोरणामुळं भविष्यातल्या प्रकल्पांना पाठिंबा देण्यास इतर निर्माते देखील इच्छुक असतील अशी शक्यता वाढू शकते.
•  ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल तुमचं काय मत आहे?
•  ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. सुरुवातीला ते एक आशादायक माध्यम होते, परंतु आता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रौढ विषयांवर आणि गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंटेंटकडे कल आहे. कथा, कलात्मक खोलीपेक्षा सनसनाटीवर भर दिला जात असल्याचं दिसून येतं. या उद्योगात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून, माझा असा विश्वास आहे की, सर्जनशीलता आणि कलात्मकता एकाच अर्थाच्या आशयापर्यंत किंवा ट्रेंडपर्यंत मर्यादित करता येत नाही. खऱ्या कलात्मकतेमध्ये बदलती परिस्थिती असूनही, संघर्ष सहन करणं आणि स्वतःच्या सर्जनशील दृष्टिकोनाशी एकनिष्ठ राहणं समाविष्ट असतं. खऱ्या, अर्थपूर्ण कामासाठीची ही वचनबद्धता हीच एका महान कलाकाराची व्याख्या करत राहते. 'मी नेहमीच नकारात्मक भूमिकांकडे आकर्षित होतो...!'
•  तुमचा आवडता प्रकार कोणता ? तुम्ही तुम्हाला दिलेलं पात्र कसं विकसित करता?
•  मध्यमवर्गीय जीवनाचा शोध घेणाऱ्या कथा मला विशेषतः आकर्षित करतात. मी स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आहे, त्यामुळं मला त्यांच्या आकांक्षा, आव्हानांची खोलवर समज आहे. मध्यमवर्गीय ढोंगीपणाची गतिशीलता, लोक स्वतःला त्यांच्या खऱ्या स्वभावाविरुद्ध कसं सादर करतात, याचं मला आकर्षण वाटत राहिलंय. माझ्या कथांमध्ये हा अनेकदा एक मध्यवर्ती विषय असतो. मध्यमवर्गीय नायक आणि नायिका लिहिणं मला आवडतं कारण त्याचं जीवन विरोधाभासांनी भरलेलं असतं. श्रीमंतांसाठी, बहुतेकदा समस्या जास्तीचं व्यवस्थापन करण्याची असते, तर गरिबांसाठी, ती पुरेशी मिळवण्याची असते. तथापि, मध्यमवर्गीय पात्रांना एक वेगळा संघर्ष करावा लागतो. ते बहुतेकदा त्यांच्या आकांक्षेच्या, अपेक्षांच्या अर्ध्याच गोष्टी साध्य करतात. इच्छा आणि असणं यातला हा सततचा ताणतणाव आणि त्यांना मिळालेलं काही गमावण्याची भावना, कथाकथनासाठी एक समृद्ध आधार प्रदान करते. एकदा तुम्ही काहीतरी साध्य केलं की, समाधान क्षणभंगुर असतं या सार्वत्रिक सत्याचं हे प्रतिबिंब आहे.
•  चित्रपट उद्योगात घडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणांबद्दल तुमचं काय मत आहे?
•  हा मुद्दा अनेकदा संबंधित व्यक्तींचा वैयक्तिक प्रश्न म्हणून पाहिला जातो. तथापि, परिस्थिती कधीकधी खळबळजनक बनू शकते. मुंबईसारख्या ठिकाणी, ड्रग्जचा वापर फळांच्या वाट्या घेण्याइतकाच सामान्य असू शकतो. परंतु ड्रग्जच्या समस्यां व्यतिरिक्त, आजच्या पिढीला प्रभावित करणाऱ्या अधिक चिंताजनक समस्या आहेत. उदाहरणार्थ, मी एकदा एका नऊ वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ पाहिला ज्यात त्याच्या आजीनं त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळं त्याचं संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. अशा टोकाचं वर्तन हल्ली अधिक सामान्य होतंय आणि ते एका व्यापक संकट प्रतिबिंबित करतात. आपल्या पिढीच्या विपरीत, जिथं आपल्याला आपल्या पालकांना आणि मार्गदर्शकांना भीती वाटत होती, आजचं जग बदललंय आणि तरुण पिढी काय करेल याबद्दलची चिंता वाढतेय. 
•  तुमच्या लेखनात तुम्ही असा उल्लेख करता की, 'जगानं लाल गालिचा अंथरलाय पण मी रस्त्यावरून चाललोय...!'. जगानं लाल गालिचा कोणासाठी अंथरलाय आणि रस्त्यावर कोण चाललंय? मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की, संधी प्रत्येकासाठी उपलब्ध असतात, परंतु त्या प्रत्येकानं मिळवणं हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. जे यशस्वी होतात आणि जे यशस्वी होत नाहीत त्यांच्यातला फरक त्यांच्या शारीरिक गुणांमध्ये नाही तर ते त्यांना मिळालेल्या संधींचा कसा वापर करतात यात आहे. जग अशा लोकांसाठी लाल गालिचा देते, जे त्यांचा फायदा घेण्यास तयार आहेत आणि इच्छुक आहेत, तर इतरांना अधिक आव्हानात्मक मार्गावर चालताना आढळू शकते. मी नेहमीच पुढच्या पिढीला त्यांच्या सुरुवातीच्या काळात कठोर परिश्रम करण्याचा आणि संघर्ष करण्याचा सल्ला देतो, कारण यामुळं दीर्घकालीन यश आणि समाधान मिळेल. उलट, जर तुम्ही आता आराम आणि सहजता निवडली तर तुम्हाला आयुष्यभर संघर्षांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून, समर्पण आणि प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत.
•  अथाडू चित्रपटातलं तुमचं पात्र खूप लोकप्रिय आहे आणि 'वडु मगडू रा बुज्जी' हा संवाद एक मीम बनलाय. तुम्ही या लोकप्रिय संस्कृतीकडे कसं पाहता?
•  जेव्हा माझ्या संवादाची शंभर वेळा पुनरावृत्ती होते तेव्हा मी रोमांचित होतो अन् हसतो. हा संवाद त्रिविक्रमनं लिहिला होता आणि तो चित्रपट निर्मितीच्या सहयोगी स्वरूपाचा पुरावा आहे. सिनेमाचं सौंदर्य असं आहे की, तो एक सामूहिक प्रयत्न असतो आणि यश सर्व सहभागींमध्ये वाटून घेतलं पाहिजे.
•  चित्रपटांमध्ये सामाजिक जबाबदारी असायला हवी असं तुम्हाला वाटतं का?
•  हो, त्यांनी तसं करायला हवं. सध्या चित्रपटांमध्ये अनेकदा बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करणारे खलनायक दाखवले जातात आणि त्यांना शिक्षा होत असल्याचं दाखवलं जातं, परंतु हे चित्रण वरवरचं असू शकतं. अशा गंभीर समस्यांना खऱ्या वचनबद्धतेनं आणि गांभीर्यानं न हाताळता वारंवार दाखवणं हे लज्जास्पद आहे. चित्रपटासह कला, सामाजिक जबाबदारीची भावना बाळगून आणि अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याची उद्दिष्टं ठेवली पाहिजेत. चित्रपटांद्वारे व्यक्त होणाऱ्या भावना आणि संदेश पडद्याच्या पलीकडे प्रतिध्वनित झाले पाहिजेत.
•  तुम्हाला कोणतं पात्र आवडतं? चित्रपटांमध्ये तुम्ही साकारलेलं तुमचं आवडतं पात्र कोणतं?
•  मी नेहमीच नकारात्मक पात्रांकडे आकर्षित होतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुसंगत राहणाऱ्या चांगल्या पात्रांपेक्षा वेगळं, खलनायक भावनिक आणि मानसिक गुंतागुंतीची श्रेणी देतात. तुम्ही वेगवेगळ्या बोलीभाषा, देखावे आणि संवादांसह प्रयोग करू शकता. नकारात्मक पात्रे चढ-उतारांची गतिमान श्रेणी देतात, अगदी आलेखाप्रमाणे, ज्यामुळं सूक्ष्म आणि स्तरित कामगिरी मिळते.
•  तुम्ही एखादी कविता सांगू शकाल का? आणि ती लिहिण्यामागचं कारण सांगू शकाल का?
•  जेव्हा मी माझे वडील गमावले, जे सुमारे ९३ वर्षांचे होते, तेव्हा मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी एक ओळीची कविता लिहिली. ते स्वातंत्र्यापूर्वी पश्चिम गोदावरीतून इथं आले होते, सुरुवातीला शिक्षक म्हणून आणि नंतर रेल्वेमध्ये सामील झाले होते. कविता अशी आहे: 'एन्नो भांडावयानी कुट्टी सुदी ला जरीपोयाडू नन्ना...!'. ही ओळ माझ्या नुकसानाची भावना आणि माझ्या जीवनावर त्यांचा खोलवरचा प्रभाव प्रतिबिंबित करते.
•  आजकाल प्रतिभावान लेखक नाहीत. तुम्हाला असं वाटतं का? त्याचं कारण काय?
•  पूर्वी लेखकांना खूप कमी पैसे दिले जात होते. तथापि, आज एक तेलुगू लेखक सुमारे १ कोटी रुपये मानधन घेऊ शकतो, जे दिग्दर्शकांच्या कमाईच्या बरोबरीचे आहे. या बदलामुळे अनेक लेखक दिग्दर्शक बनण्याची आकांक्षा बाळगू लागलेत, कारण त्यांना जास्त कमाई आणि जास्त ओळख दोन्ही हवी आहे. दुर्दैवाने, या बदलाचा अर्थ असा आहे की लेखकांची नावे चित्रपटाच्या पोस्टरमधून अनेकदा वगळली जातात, तर हिंदी चित्रपटसृष्टीत, चित्रपटाच्या सुरुवातीला सलीम-जावेद सारखी नावे ठळकपणे दाखवली जातात. या ओळखीचा अभाव अनेक लेखकांना आर्थिक कारण आणि वैयक्तिक प्रसिद्धी दोन्हीसाठी दिग्दर्शनाच्या भूमिका करण्यास भाग पाडतो.
•  तुम्ही म्हणालात की आम्ही मल्याळम आणि तमिळ समांतर चित्रपट पाहतो आणि त्यांचे कौतुक करतो. त्यामागील मुख्य कारण काय आहे?
•  मुख्य फरक म्हणजे आपण व्यावसायिकीकरणावर भर देतो आणि त्याचबरोबर पैसे कमावताना कलात्मक मूल्यावरही भर देतो. उदाहरणार्थ, मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' हा लिंग भूमिकांबद्दल एक सामाजिक व्यंगचित्र सादर करतो, ज्यामध्ये स्वयंपाकघरात स्त्रीचे स्थान दर्शविले जाते. चित्रपटाच्या या वास्तववादी चित्रणाने माझ्यावर अनेक महिने कायमची छाप सोडली. शेवटी, जेव्हा चित्रपटाचा विषय आकर्षक आणि चांगल्या प्रकारे सादर केला जातो तेव्हा तो कथेचा खरा नायक बनतो, ज्यामुळे तो वेगळा दिसतो. जाणवतो.
•  तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी आणि भावनिक क्षणांपैकी एक शेअर करू शकाल का?
•  माझ्या कविता प्रवासाच्या सुरुवातीच्या काळातला माझा सर्वात आनंदाचा आणि भावनिक क्षण होता. २६ जानेवारी रोजी एका महाविद्यालयीन कार्यक्रमात सुमारे १०० तरुण कवींना आमंत्रित करण्यात आले होते. माझी पाळी ९८ व्या क्रमांकावर होती आणि वातावरण कवितेने भरलेले होते. प्रमुख पाहुणे उथपाल सत्यनारायण चार्युलु हे कवितेचे विश्लेषण आणि कौतुक करण्यासाठी आले होते. जेवणानंतर, माझी पाठांतर करण्याची पाळी होती. मी 'हलम थप्पा अंगुलम पोलम लेनी वडू, कलाम थप्पा विसामेथु बालम लेनी वडू' अशा ओळी असलेला एक तुकडा सादर केला. माझी कविता सर्वांना भावली. माझ्या वाचनानंतर, प्रमुख पाहुण्यांनी त्यांना सादर केलेली शाल घेतली आणि मला दिली, ज्यामुळे मला नोबेल पारितोषिक मिळाल्यासारखे वाटले. कवी म्हणून माझ्या प्रवासात हा एक मोठा प्रोत्साहन आणि एक महत्त्वाचा क्षण होता.
•  तुमच्या तरंगलांबीशी जुळणारा एखादा दिग्दर्शक आहे का? तुमचा आवडता दिग्दर्शक कोण आहे?
•  प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची वेगळी शैली असते आणि कोणीही त्याच्याशी जुळत नसले तरी, प्रत्येकजण काहीतरी मौल्यवान घेऊन येतो. उदाहरणार्थ, मोहन कृष्णाची सौम्य दिग्दर्शन शैली मला भावते आणि मी त्याच्या दृष्टिकोनाचे कौतुक करतो. त्रिविक्रमची ताकद त्याच्या संवादांमध्ये आहे; त्याच्या शब्दांद्वारे प्रत्येक दृश्य सुंदर बनवण्याची त्याची उल्लेखनीय क्षमता आहे. दसरी नारायण रावची नाट्यमय प्रतिभा ही आणखी एक ताकद आहे जी मी कौतुकास्पद मानतो. मी वंशीगारू 
सोबत काम केले आहे आणि मला विशेषतः ' मातृ देवो भवा' तील माझी भूमिका खूप आवडली. त्या चित्रपटात मी एका क्रूर खलनायकाची भूमिका केली होती, ज्याने एका पात्राला अशाप्रकारे मारले की त्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, एक भाजी विक्रेता माझ्याकडे आला आणि माझ्या पात्राच्या अभिनयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. असे क्षण चित्रपटाचा त्याच्या प्रेक्षकांवर किती खोल परिणाम होऊ शकतो हे अधोरेखित करतात.
•  जे पालक आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत नाहीत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
•  मी पालकांना हे समजून घेण्याचा सल्ला देईन की, शिक्षण हे शैक्षणिक ग्रेडच्या पलीकडे जाते. अनेक पाश्चात्य देशांमध्ये, औपचारिक शालेय शिक्षणानंतर शिक्षणात कला किंवा खेळांवर लक्ष केंद्रित केले जाते. या दृष्टिकोनामुळे व्यक्तींना आवडीच्या विशिष्ट क्षेत्रात प्रभुत्व मिळवता येते. मुलाच्या कलात्मक किंवा क्रीडा प्रतिभेचे संगोपन करणं हे पारंपारिक शिक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे हे ओळखून, या मॉडेलला अनुकूल केल्याने आपल्या शैक्षणिक व्यवस्थेला फायदा होईल.
•  तुमचे आवडते नाट्य, नाटक किंवा नाट्यलेखक कोण आहेत आणि का?
•  हो, मी नेहमीच जुन्या क्लासिक्सचे कौतुक केले आहे जसे की गुरजादाचे ' कन्यासुलकम', जे मी १०० हून अधिक वेळा वाचले आहे. अशा कालातीत लेखनाने मला अजूनही कसे आकर्षित केले आहे हे उल्लेखनीय आहे. गेल्या काही वर्षांत, मी २७ वर्षांपासून रवुलापलम इथं नाट्य महोत्सव आयोजित केलेत, जिथं मी मानद अध्यक्ष म्हणून काम करतो. आम्ही महत्त्वपूर्ण बक्षिसे स्थापित केली आहेत. सर्वोत्तम पटकथेसाठी ३ लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी २ लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १ लाख रुपये. दुर्दैवाने, मोठ्या गुंतवणुकीनंतरही, आम्हाला दर्जेदार पटकथा शोधण्यात संघर्ष करावा लागलाय. तथापि, भविष्यात ते भरभराटीला येईल या आशेने आम्ही सर्जनशील कार्याला प्रोत्साहन, समर्थन देत राहतो.
•  तुम्ही कधी राजकारणात येण्याचा विचार केला आहे का? राजकारणाबद्दल तुमचे काय मत आहे?
•  तर, मी आनंदी राहावे असे तुम्हाला वाटत नाही का? (हसत) राजकारण हे माझे जेवणाचे ब्रेड बटर नाही. त्यासाठी कृत्रिमतेची एक पातळी लागते जी मला आवडत नाही. मला जे आवडते ते करण्यात मी समाधानी आहे आणि राजकारणापासून दूर राहणं पसंत करतो. तथापि, खऱ्या वचनबद्धतेने राजकारणात येणाऱ्या तरुण पिढ्यांचे मी खरोखर कौतुक करतो. पवन कल्याण यांनी समाजासाठी केलेल्या समर्पणाबद्दल आणि त्यागाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.
•  सिनेमा विकसित होत आहे, तुम्हाला काय समस्या आहेत असं वाटते?
•  समस्या अशी आहे की, लोक वास्तविक जीवनातील परिस्थितींबद्दल संवेदनशीलता गमावून बसलेत. अनेकांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या अपघातांची जाणीवही नसते; त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाची काळजी असते. तरुण पिढ्या सूर्योदय प्रत्यक्ष अनुभवण्याऐवजी पडद्यांवरून पाहतात. जीवन यांत्रिक बनलेय, खऱ्या भावना आणि आसक्तींपासून वंचित आहे. ही अलिप्तता नातेसंबंधांपर्यंत पोहोचते, विवाह कधीकधी फक्त आठवड्याच्या कार्यक्रमासारखे वाटतात. जेव्हा प्रत्येकाला समान अहंकार असतो आणि खऱ्या संबंधांचा अभाव असतो, तेव्हा जगणं आव्हानात्मक बनतं.
•  तुम्ही कोणत्या नवीन प्रकल्पांवर काम करत आहात?
•  मी सध्या काही रोमांचक प्रोजेक्ट्समध्ये गुंतलोय. मी मणिरत्नमसोबत 'ठग लाईफ' नावाच्या चित्रपटात काम करतोय. यापूर्वी मी ' पोन्नियिन सेल्वन' चे तेलुगूमध्ये रूपांतर केले होते. नुकतंच मी प्रभाससोबत एका पीरियड फिल्मसाठी साइन केलंय आणि रवी तेजा अभिनीत 'मिस्टर बच्चन'मध्ये वडिलांची भूमिका देखील केलीय. एकूणच, मी १० ते १५ प्रोजेक्ट्समध्ये सध्या व्यस्त आहे.
•  तुम्हाला अलिकडेच मिळालेल्या डॉक्टरेटबद्दल बोलू शकाल का?
•  मला नुकतीच एसआर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. हा एक अनपेक्षित सन्मान होता. वरंगल इथं हा समारंभ झाला, ज्यामुळं दुर्दैवाने बरेच जण उपस्थित राहू शकले नाहीत. या कामगिरीबद्दल सर्वांना माहिती व्हावी यासाठी, एक सांस्कृतिक संघटना एक कार्यक्रम आयोजित करतेय, जेणेकरून सर्वांना कळेल की मी डॉक्टर झालोय ... तेही औषधाशिवाय!
•  माध्यमांबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे?
•  माध्यमे ही चाकूसारखी असतात. ती दुधारी शस्त्र म्हणावं लागेल. ती फळे तोडण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. ते एक शक्तिशाली हत्यार आहे जे काळजीपूर्वक वापरली पाहिजेत. शिवाय माध्यमांनी दया आणि संतुलन राखले पाहिजे; ते चांगल्या कामाचे कौतुक करू शकते परंतु अनेकदा नकारात्मक पैलू वाढवते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येकात त्रुटी असतात आणि माध्यमांचे कव्हरेज कधीकधी अप्रमाणित असू शकते.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

क्रांतीची झाली फुले....

'गुलामगिरीची युगायुगाची, बेडी तोडू चला चला ! मनुष्याचा खरा दागिना, शिक्षण आहे घ्या चला !' 
अशा 'बावनकशी' निश्चयानं भारतातल्या देशी शाळेतल्या पहिल्या विद्यार्थिनी आणि शिक्षिका मुख्याध्यापिका अशी ओळख असणाऱ्या सवित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं काही वर्षापूर्वी घेतला आणि या निर्णयानुसार, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नामविस्तार सुरू झालाय. सावित्रीबाई या महात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी; तशाच जोतीरावांच्या सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतिकारी कार्यात बरोबरीनं काम करणाऱ्या सहकारी, सावित्रीबाईचा १८४० मध्ये जोतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. साताराच्या नायगावमधून त्या पुण्यात आल्या. त्यावेळी सावित्रीबाईंचं वय नऊ वर्ष आणि जोतिरावांचं वय तेरा वर्ष होतं. जोतिरावांना लहानपणापासून आईचं प्रेम लाभलं नाही. त्यांचा सांभाळ सगुणा आऊ या मावसबहिणीनं केला. ह्या सगुणाऊ पुण्यात एका इंग्रज अधिकाऱ्याकडे त्यांची मुलं सांभाळण्याचं काम करत. त्यामुळं सगुणाऊंना इंग्रजी कळायचं; पण बोलता येत नसे. पण त्यांनी आपल्या ज्ञान माहितीचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. त्यानं जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. दरम्यान, सावित्रीबाईही लग्नापूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेलं एक इंग्रजी पुस्तक सोबत घेऊन सासरी आल्या होत्या. त्या पुस्तक वाचनानं जोतिरावांना सामाजिक कार्यासाठी नवा मार्ग सापडला. तो होता शिक्षणाचा; आणि ते देव-धर्माच्या नावानं भट-ब्राह्मणशाहीनं बंद केलेले शिक्षणाचे मार्ग सर्वांसाठी खुलं करण्यासाठी तयार झालं. स्वतः शिकून त्यांनी सावित्रीबाईंनाही शिकवलं. या कामात सगुणाऊदेखील होत्या. या दोघींबरोबर फातिमाबिबीनींही रीतसर शिक्षण घेतलं. १ मे १८४७ रोजी सावित्रीबाईनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत शाळा काढून दिली. ही जोतिराव सावित्रीबाईची पहिली शाळा. ह्या शाळेत सगुणाऊ आनंदानं शिकवू लागल्या. परंतु, ही शाळा थोड्याच दिवसांत बंद पडली. पण जोतिराव-सावित्रीबाईंनी आपले प्रयत्न थांबवले नाहीत. त्यांनी सहाच महिन्यांत १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही ब्रिटिश भारतातल्या भारतीय व्यक्तीनं सुरू केलेली पहिलीच मुलींची शाळा. या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम पाहात होत्या. सुरुवातीला ह्या शाळेत सहाच विद्यार्थिनी होत्या; पण वर्षभरात ही संख्या ४६ विद्यार्थिनींपर्यंत पोहोचली. ह्या प्रतिसादामुळं जोतिराव आणि सावित्रीबाईंनी पुण्याच्या इतर भागातही मुलींसाठी तीन शाळा सुरू केल्या. तथापि, जोतिराव सावित्रीबाई यांच्या या शैक्षणिक कार्याला कर्मठ, सनातनी ब्राह्मणांनी देव-धर्माची साक्ष काढत विरोध केला. मागास जातीचे लोक शिक्षण घेऊ लागले... 
महिलाही शिकू लागल्या... 
त्याने धर्म बुडाला ! 
आता जग बुडणार! कली आला! 
अशी बोंब त्यांनी ठोकली. जोतिरावांच्या वडिलांना गोविंदरावांना त्यांनी 'तुझ्या मुलानं आणि सुनेनं मागासांना आणि महिलांना शिक्षण देण्याचं काम थांबवलं नाही, तर वाळीत टाकू...!' अशी धमकी दिली. पण जोतिराव आणि सावित्रीबाई आपल्या कार्याबद्दल ठाम राहिल्यानं त्यांना गोविंदरावांचं घर सोडावं लागलं, तरीही सावित्रीबाईंचा छळ संपला नाही. सावित्रीबाई शाळेत शिकण्या-शिकवण्यासाठी जाताना भट-ब्राह्मण आणि भटीपाशात फसलेले लोक सावित्रीबाईंची हेटाळणी करीत. अर्वाच्च बोलत. त्यांच्या अंगावर थुंकत. शेण-गोटे मारत, जोतिराव-सावित्रीबाईना धडा शिकवण्याची भाषा करत. हा सारा मारा सोसत सावित्रीबाई त्यांना शांतपणे ऐकवत, 'माझ्या भावांनो, मी जे काम करते, ते तुमच्याच माय-बहिणींसाठी आहे, ते तुमच्याही भल्यासाठी आहे. त्याची किंमत तुम्हाला आज नाही, पण उद्या कळेल....!' स्त्री शिक्षणाचं कार्य करतात, म्हणून ज्या पुण्यात सावित्रीबाईची अवहेलना झाली; त्याच पुणे विद्यापीठला सावित्रीबाईंचं नाव दिलंय. पण त्यासाठी सावित्रीबाईच्या मृत्यूनंतर १२५ वर्ष जावी लागली. सनातनी नीचपणा संपला नसल्याची ही साक्ष आहे.
बाराखडी जोतिबा-सावित्रीची
जोतिरावांच्या ऐतिहासिक कार्यामुळंच शिक्षण भटीपाशातूनच नाही; तर सोवळ्यातूनही सुटलं आणि सावित्रीबाईंनी प्रचंड छळ सोसूनही आपलं कार्य सुरू ठेवलं, म्हणूनच आज असंख्य तरुणी-महिला मोठ-मोठ्या हुद्यांवर काम करताना दिसतात. कुणी वैज्ञानिक आहेत, पायलट आहेत, लष्करी अधिकारी आहेत, उद्योजिका आहेत. शिक्षिका-प्राध्यापिका तर भरपूर आहेत. देशाचं सर्वोच्च अधिकार स्थान असलेलं राष्ट्रपती पदही महिलेनं प्रतिभा पाटील यांनी भूषवलंय, कल्पना चावलानं तर थेट अंतराळात भरारी मारली होती. भारतीय वंशाच्या सुनीता विलियमनं तर अंतराळात सर्वाधिक काळ राहाण्याचा विक्रम केलाय. या मिळून साऱ्याजणींना सावित्रीबाईंचं कार्य ठाऊक असेलच, ह्याची खात्री देता येत नाही. कारण वर्तमान विपरीत आहे. ते दाखवण्याचा प्रयत्न 'जिंकू या दाहीदिशा.....' या नाटकात केलाय. हे नाटक छत्रपती शिवराय, जिजामाता, महात्मा फुले, सावित्रीबाई, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज आले, तर काय बोलतील, या कल्पनेवर बेतलेलंय. या नाटकातला तरुण सावित्रीबाईंची ओळख होताच, तो वरीलप्रमाणे त्यांच्या कार्याची महती सांगतो, तेव्हा त्या तरुणाला रोखत सावित्रीबाई म्हणतात, 'हो, हो! पण सुनीता विलियम सुखरूप परत यावी, यासाठी शहरातील सुशिक्षित, सुसंस्कृत महिलांनी होम केला होता ना....?'
तरुणः (खाल मानेने) हो हो, बाई!
सावित्रीबाईः (त्रासिकतेने) अरे, देशातील पहिली विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून तुम्ही माझं नाव घेता बन्याच जणी स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवतात. (अस्वस्थपणे) पण ही सावित्री शिकण्या आणि शिकवण्यासाठी शाळेत कशी जात होती, ठाऊक आहे? ...शाळेत जाताना माझ्या काखोटीला पुस्तकं पाटी, आणि एक लुगडं असायचं. वाटेवरची लोकं कुत्सित नजरेने पाहात. अभद्र बोलत. कुणी माझ्या दिशेने धुंकत. कुणी शेणगोळे, तर कुणी दगड-गोटे मारत. जखमा व्हायच्या. शाळेत गेल्यावर आडोशाला जायचे. अंगावरचं खराब झालेलं लुगडं बदलायचे. सोबत आणलेलं लुगडं नेसून शिकायचे आणि शिकवायचे. अरे, ज्या सावित्रीने शिक्षणासाठी माथ्यावर धोंडे खाल्ले; त्या सावित्रीला, देव देव म्हणत धोंड्यावर डोकं आपटून घेण्यासाठी केलेली तरुणी स्त्रियांची गर्दी पाहून कसा आनंद होईल?
ती अस्वस्थच असणार !
तरुणः पण सुशिक्षित स्त्रियांनी तरी...
सावित्रीबाईः सुशिक्षित? ... कोण सुशिक्षित? सुशिक्षितांना शिक्षणाचा खरा अर्थ कळला असता, तर त्यांनी आयुष्यातील बहुमूल्य वेळ पोथ्यावाचनात आणि देवळापुढच्या रांगांत वाया घालवला नसता.
तरुणः पण शिक्षकांनी तरी...
सावित्रीबाईः (रोखत) ते काय! तुमच्यासारखेच !... मार्कापुरते शिकलेले आणि शिकवणारे!
तरुणः मग, तुमची शिक्षणाची पद्धत कशी होती?
सावित्रीबाईः (हसून) त्याची मजा आहे. जोतिरावांचं गरीब-अस्पृश्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू झालं होतं. एक दिवस घरासमोरच्या अंगणात आम्ही बोलत बसलो होतो. अचानक जोतिरावांनी डोळे मोठ्ठाले करीत मला सांगितलं, आत जा आणि काठी घेऊन ये. मी घाबरले. काय झालं ते कळेना. भीत भीत काठी घेऊन आले. त्या काठीने त्यांनी मातीच्या जमिनीवर एक आकार काढला. तसाच आकार मलाही काढायला सांगितला. पहिल्याच दमात मला ते जमलं.... जोतिराव खूष झाले. मी त्यांना विचारलं, हा आकार कसला आहे? तर ते म्हणाले, हा आकार नाही. हे अक्षर आहे. ह्याला म्हणतात 'ग'!... पण या 'ग'ची ओळख काय सांगितली, माहीतेय?
तरुणः (उत्साहात) त्यात काय? 'ग' रे गणपतीतला! अशीच सांगितली असणार!
सावित्रीबाईः छ्या! ... त्यांनी सांगितलं 'ग'... रे गवतातला! मातीचं आणि मतीचं नातं जोडणारी 'ग'ची ओळख त्यांनी सांगितली. त्यांचा 'ज्ञ'ही यज्ञातला नव्हता. तर ज्ञानातला होता!
तरुणः म्हणजे, तुमची बाराखडीच वेगळी होती!
सावित्रीबाईः ती तशी होती, म्हणूनच मी तुझ्यासमोर अशी हिंमतीनं खडी आहे! या हिंमतीनेच आम्ही सांगू लागलो-
नसे बुद्धी ज्याला, नसे ज्ञान काही 
अशा मानवाला, कधी सुख नाही!
तरुणः बाई, कुणाचं काव्य हे?
सावित्रीबाईः माझं ! मी शिकले, आणि लिहू-बोलूही लागले. माझ्यासारखीच फातिमा बिबीही होती. आमच्या ताराबाई शिंदेंनी तर 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथच लिहिला. या लेखनातून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक चिकित्सा करण्यापर्यंत मजल मारली. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही झटत होतो. या कार्याआड येणाऱ्यांना ठणकावून सांगत होतो- 
अविचार, अज्ञान; मूर्खत्व जेथे !
कसे काय राहील, धर्मत्व तेथे ?

गोपाळकाला फोडण्याचा उद्योग
सावित्रीबाईंचं कार्य केवळ स्त्री शिक्षणापुरतंच मर्यादित नाही. तेव्हाच्या काळी सत्तर वर्षांचा नवरा आणि बारा वर्षांची नवरी असे जरठ-बाला विवाह व्हायचे. परिणामी, अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षीही विधवा व्हायच्या. अशांचे पुनर्विवाह होत. मात्र, ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाहास अजिबात मान्यता नव्हती. अशा विधवा मुलींना पती निधनानंतर सती जावं लागे; अथवा केशवपन करून 'बोडकी' केलं जात असे. ह्या केशवपनाविरोधात गोपाळ गणेश आगरकरांनी चळवळ सुरू केली; तेव्हा जोतिराव फुले यांनी न्हाव्यांचा संप घडवून त्यांना पाठिंबा दिला होता. पण जोतिराव तेवढ्यावरच थांबले नाहीत. 'बोडकी' झालेल्या मुलीने लाल रंगाचं लुगडं म्हणजे आलवण नेसलं पाहिजे; देवपूजेतच गुंतवून घेतलं पाहिजे, असा नियम असायचा. पण असा कितीही बंदोबस्त केला, तरी शरीराची स्वतःची म्हणून गरज असतेच! ही गरज ओळखून तिच्या असहाय्यतेचा फायदा उठवला जात असे. त्यात घरातलेच सासरे वा दीरही असायचे. कधी-कधी सत्संगाला आलेल्या बालविधवेचा भक्तिभाव पाहून लंपट पुराणिकबोवाही गोपालकाला उरकायचे. पण मग निसर्ग आपल्या नियमानुसार वागू लागला की, हे संधिसाधू नामानिराळे होत. या प्रकारानंतर पोटात वाढणारा जीव स्वतःसह आईला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करायचा. अशा असहाय्य महिलांसाठी जोतिरावांनी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केलं. या असहाय्य महिलांचं बाळंतपण सावित्रीबाई स्वतः करीत. सगळं ठीकठाक झाल्यावर त्या महिला लेकरांना सावित्रीबाईंकडे सोपवून घरी परतत. अशा बऱ्याच मुलांना सावित्रीबाई आणि जोतिरावांनी वाढवलं. त्यातील ठाणे इथल्या काशीबाईंचा मुलगा यशवंताला त्यांनी दत्तक घेतला. त्याला शिकवलं. डॉक्टर केलं, त्याच्या नावावर दोघांनी सगळा जमीन जुमलाही करून दिला. दोघांच्या कार्याला यशवंतानीही साथ दिली. जोतिराव फुले आणि सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाजच्या कामात आणि पुनर्विवाहाचा कायदा होण्यासाठीच्या प्रयत्नात सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुलेंच्या निधनानंतर १८९० ला त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाला अग्नी देण्याला दत्तकपुत्र म्हणून यशवंताला विरोध केला. तेव्हा सावित्रीबाई स्वतः अग्नी देण्यासाठी पुढे झाल्या. ह्याच हिंमतीनं त्यांनी महात्मा फुलेंच्या पश्चात 'सत्यशोधक समाज'ची जबाबदारी घेतली. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी लेखन केलं. 'काव्य फुले' आणि 'बावनकशी सुबोध रत्नाकार' हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यात फुला-चंद्रावर कविता नाहीत. त्यात समाजाच्या वेदना-संवेदना सांगणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या कविता आहेत. सावित्रीबाईंची 'भाषणंही उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसनं, कर्ज अशा विषयांवर असत. उद्योगाचंही त्यांनी 'विचारी उद्योग व विचार नसलेला उद्योग,' असं वर्गीकरण केलं होतं. 'अभ्यास करणे, हा विचारी उद्योग आहे. या उद्योगात डोळे, कान, बुद्धी या इंद्रियांची जरुरी असते. उलटपक्षी, दे ग माई भाकरी मला... असं ओरडत फिरणे, हाही उद्योगच आहे, पण तो विचार नसलेला उद्योग आहे,' असं सावित्रीबाई म्हणतात. 'उद्योग हा ज्ञानस्वरूप असून, आळस हा दैवाचा मित्र आणि दरिद्रीपणाचं लक्षण आहे,' अशी सुभाषितं त्यांच्या भाषणांत आहेत. 'सदाचरण, हे मनुष्यास अधिक सुख प्राप्त करून घेण्याचं व्रत आहे. या व्रतामुळे सर्व संसार दुःखांचा नाश होतो,' असं त्या 'सदाचरण' ह्या विषयीच्या भाषणात सांगतात. कर्ज काढून व्यर्थ उधळपट्टी करणं, खोट्या श्रीमंतीचा देखावा करणं, हे किती चुकीचं आहे, ते सावित्रीबाईंनी आपल्या कवन-लेखनातून स्पष्ट केलंय. त्या म्हणतात-
शेटजीचे कर्ज घेई, तयाचे सुख दूर जाई। 
संकटाने हैराण होई, बेजार होई कर्जदार ।। 
कर्जाने लागतसे चिंता, घालवी सारी मालमत्ता । 
संसारात वाढवी गुंता, आली अहंता ऋणकोची ।।

अर्थकारणाचा आणि आपला फारसा संबंध नाही; त्यातलं फारसं कळत नाही, असं बोलणाऱ्या सुशिक्षित, नोकरदार महिलांची संख्या आजही कमी नाही. नवऱ्याचा आर्थिक व्यवहार कळत नाही, असंही त्या म्हणतात. तो समजून घ्यावा यासाठी सावित्रीबाईनी हे १२५ वर्षांपूर्वी 'कर्ज-कवन' लिहिलं. ते सर्वांनीच समजून उमजून घेऊन त्यानुसार वागलं पाहिजे. फरक इतकाच, सावित्रीबाईंच्या काळात लोकांना कर्जात फसवणारे शेटजी-सावकार होते; आता लोन-स्कीमचा फंडा आहे.

विद्यापीठाचे व्हावे विचार-कृतिपीठ
सावित्रीबाईंनी १८९६ मधल्या दुष्काळात लोकांना सहकार्याचा आदर्श घालून दिला. केवळ अन्नासाठी शरीर विक्रयाला तयार झालेल्यांना दुष्टांच्या कब्जातून सोडवून त्यांना सत्यशोधक कुटुंबाच्या घरात आश्रयाला पाठवलं. ह्या कार्यातली सावित्रीबाईंची तळमळ लक्षात घेऊन बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी आणि पंडिता रमाबाई यांच्या संस्थेने भरघोस मदत पाठवली. दुष्काळानंतर वर्षभरात पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. ह्या संसर्गजन्य रोगाने अनेकांचे जीव फटाफट जाऊ लागले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने संभाव्य रोगी हुडकून त्यांचं स्थलांतर करण्याचा खबरदारीचा उपाय अंमलात आणला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळच्या ससाणे येथे मुलगा-डॉ. यशवंतच्या सहकार्याने दवाखाना सुरू केला. तिथे त्या प्लेग रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचं काम करीत होत्या. त्यातच प्लेगबाधा होऊन १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाईंचं निधन झालं. काळाने डाव साधला. पण त्यांचं कार्य काळालाही पुरून उरलंय. कारण ते कार्य काळाच्या पुढे होतं. जोतिरावांसारखा महात्मा पती असूनही त्यांच्या सावलीत सावित्रीबाई वावरल्या नाहीत. त्या क्रांतिज्योत बनून आपलं तेज दाखवत राहिल्या. १९९५पासून सावित्रीबाईंचा ३ जानेवारी हा जन्मदिन राज्यात 'बालिका दिन' म्हणून साजरा होतो. त्यांच्या नावाने सरकार आणि अनेक संस्था-संघटना पुरस्कार देतात. त्यांच्या नाव-चित्राचं केंद्र सरकारने टपाल तिकीटही काढलंय. त्यांच्यावरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. सावित्रीबाईंचं कार्य ऐतिहासिक असूनही डोंबिवली येथील नाट्यगृहाला त्यांचं नाव देताना बराच वाद झाला. या नाट्यगृहासाठी डोंबिवलीला राहाणारे पु. भा. भावे आणि शं. ना. नवरे (हयात असताना) यांची नावं नाटककार म्हणून पुढे आली होती. तेव्हा मी मत मांडलं होतं-सावित्रीबाई नाटककार नसल्या तरी त्यांच्यावर शेकडो नाटक चित्रपट, कथा-कविता-कांदबऱ्या होतील, एवढं त्यांचं कार्य थोर आहे. एवढी थोरवी भावे-नवरे यांच्या नावे आहे का? शेवटी सावित्रीबाईंचं नाव डोंबिवलीच्या नाट्यगृहाला देण्यात आलंय. पुणे विद्यापीठालाही सावित्रीबाईंचं नाव सहजासहजी देण्यात आलेलं नाही. गेली १० वर्ष डॉ. बाबा आढाव आणि 'सत्यशोधक विद्यार्थी परिषदे'चे किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी आपल्या सहकारी व पुरोगामी संघटनांसह पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करीत होते. ह्या कामात 'समता परिषद'चे कृष्णकान्त कुदळे, हनमंत उपरे, भिंगारे ह्यांचाही पुढाकार होता. सावित्रीबाईंच्या नावाला 'पुणे विद्यापीठ'च्या सिनेटने ऑक्टोबर २०१३मध्ये मान्यता देऊन आवश्यक त्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे नामविस्ताराचा ठराव पाठवला होता. त्याला राज्य शासनाने आता मान्यता दिलीय. या नामविस्ताराबरोबर पुणे विद्यापीठाची उरली सुरली सोवळी ओळखही मिटली पाहिजे. 'सावित्रीबाई फुले विचार-कृतिपीठ' अशी त्याची ओळख झाली पाहिजे. सावित्रीबाईनी स्वतंत्र ओळख निर्माण केली, तरी त्या म्हणत होत्या-
माझ्या जीवनात । जोतिबा सानंद 
जैसा मकरंद । कळीतला ।। 
मानवाचे नाते । ओळखती जे ते
सावित्री वदते । तेच संत ।।



Thursday, 24 July 2025

संघाचे समन्वयीवादी नेते मदनदास देवी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राबवलेली पूर्णवेळ प्रचारकाची संकल्पना परिवारातली एक महत्त्वाची संघटना अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुरू झाली ती मदनदास देवींच्या रूपानं...! ते साल होतं १९६९. देवी हे मूळचे सोलापूरजवळच्या करमाळ्याचे. माझे मित्र वसंतभाई देवी यांच्या ते नात्यातले. त्यांच्यामुळेच माझी त्यांच्याशी पहिल्यांदा ओळख झाली होती. नंतर माझा भाचा अभाविपचा पूर्णवेळ कार्यकर्ता. त्याच्यामुळेही ही ओळख वाढत गेली. पुणे विद्यापीठातून आधी वकिली आणि नंतर सनदी लेखापालाची परीक्षा उत्तीर्ण झालेले मदनदास देवी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ म्हणून काम करू लागले आणि या संघटनेचा देशभर विस्तार झाला. अर्थात यात इतरांचाही वाटा होता, पण देवी या सर्वाचे आदर्श होते. सुमारे वीस वर्षांनंतर देवींनी परिवारापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त केली ती भाऊराव देवरसांजवळ. तेव्हा परिवारातून संघात परत जाण्याची प्रथा पडलेली नव्हती. हेच कारण देऊन गोविंदाचार्याना संघात परत घेतलं नव्हतं. मात्र कायम समन्वयवादी भूमिकेत वावरणाऱ्या देवींना संघात स्थान देण्याचं सूतोवाच भाऊराव आणि बाळासाहेब देवरस या दोघांनी करताच मोठी खळबळ उडाली. विचारप्रवाह एक असला तरी संघात लवचीक आणि ताठर भूमिका घेणारे दोन मतप्रवाह आधीपासून अस्तित्वात आहेत. त्यातल्या ताठरांनी देवींच्या आगमनाला विरोध केला तर लवचिकांनी स्वागताची तयारी दर्शवली. ज्यानं बाहेरचं जग अनुभवलं, त्याला आत घेतलं तर फायदाच होईल असा युक्तिवाद यामागे होता. तत्पूर्वी अभाविपत असतानाच देवींनी संघ परिवारातून सुरू झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. मोरोपंत पिंगळे हे या आंदोलनाचे शिल्पकार तर देवी नियोजनकार अशी ओळख निर्माण झाली ती त्याच काळात. पडद्यामागे राहून सर्वाशी समन्वय ठेवण्याची देवींची ही हातोटी लक्षात घेऊन १९९८ ला नागपुरात झालेल्या संघाच्या चिंतन बैठकीची जबाबदारी त्यांना देण्यात आली. ती त्यांनी आणि शेषाद्रींनी उत्तमरीत्या पार पाडली. यानंतर त्यांच्याकडं भाजप आणि संघात समन्वय राखण्याचं काम देण्यात आलं. २००२ ला सुदर्शन सरसंघचालक झाले तेव्हा देवींना सरकार्यवाह करावं असा रज्जूभैय्या, शेषाद्रींचा आग्रह होता. वाजपेयींनाही हेच हवं होतं. मात्र दत्तोपंत ठेंगडी, मा.गो. वैद्य, अशोक सिंघल आदींच्या विरोधामुळं देवींना सहकार्यवाह पदावर समाधान मानावं लागलं. समन्वयवादी भूमिकेमुळं हे घडलं याची सल देवींना अखेरपर्यंत होती पण संघातली शिस्त पाळत त्यांनी याची जाहीर वाच्यता कधीही आणि कुठेही केली नाही. तेव्हा मदनदास देवींसह ज्यांचं नाव चर्चेत होतं ते मोहन भागवत सरकार्यवाह झाले. 
परिवारातली संघटना आणि संघ यांची संघटनात्मक ताकद समान पातळीवर आणायची असेल तर परिवारातून नेतृत्व विकसित झालेल्या व्यक्तींना संघात आणणं गरजेचं आहे असा युक्तिवाद देवी हे संघाच्या अंतर्गत वर्तुळात सतत मांडत राहिले. नंतर बऱ्याच वर्षांनी भागवतांनी दत्तात्रय होसबळे आणि सुनील आंबेकर यांना संघात घेऊन, देवींचं म्हणणं किती योग्य होतं हेच सर्वाना दाखवून दिलं. वाजपेयी प्रधानमंत्री असतानाच्या काळात भाजप आणि संघात अनेकदा खटके उडाले. या वादानं जाहीर स्वरूप घेतलं. वाजपेयींच्या काही निर्णयांमुळं संघात नाराजीची भावना निर्माण झाली. संघातला लवचिकांचा गट हा वाद वाढू नये या मताचा होता तर ताठर गटाला हे मान्य नव्हतं. या अंतर्गत मतविभाजनाचा फटका भाजपला बसू नये म्हणून देवींनी बरेच प्रयत्न केले पण व्हायचं तेच झालं आणि २००४ च्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. हे सारं घडलं ते ‘इगोक्लॅश’मुळं असं नंतर देवींनी खासगीत अनेकांकडं बोलून दाखवलं. संघ आणि परिवारात साधारणपणे एखाद्यानं क्षेत्र त्यागलं की आधी केलेल्या कामाच्या ठिकाणी लुडबुड करायची नसते असा अलिखित नियम आहे. देवींनी तो कटाक्षानं पाळला पण मार्गदर्शन मागणाऱ्या कुणालाही कधी निराश केलं नाही. उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरी वा व्यवसाय करून भरपूर पैसे कमावण्याची संधी सोडून त्यांनी त्या काळात खडतर म्हणून ओळखलं जाणारं प्रचारकाचं जीवन स्वीकारलं. तेव्हा डाव्या आणि काँग्रेस विचाराच्या विद्यार्थी संघटनांचा देशभर बोलबाला होता. अशा कठीण स्थितीत त्यांनी अभाविपचा विस्तार केला. ही संघटना केवळ अभिजनांसह बहुजन, मागास अशा सर्वाची आहे हा विचार राष्ट्रीय पातळीवर रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. संघ असो वा परिवार, त्याचा विस्तार करायचा असेल तर सर्वसमावेशक धोरणाशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे असं ते सतत सांगायचे. मोहन भागवतांच्या नेतृत्वात नव्या चमूनं संघाची धुरा हाती घेतल्यावर ते दैनंदिन कामातून थोडसं बाजूला झाले. त्यांचा ८० वा वाढदिवस अभाविप आणि इतर संघटनांनी साजरा केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्याचं निधन झालं. आणि त्यांच्या मृत्यूनं संघ परिवारातल्या एका समन्वयवादी पर्वाचा अस्त झालाय. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन....!

Monday, 21 July 2025

दुष्यंतहो, सावधान.... शरीरसंबंध हा विवाहच...!

*नारी यौन शोषणाची पुराण कथा....!*
"दुष्यंतहो, सावधान शकुंतलेला न्याय देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेलाय. लैंगिक संबंधांची मजा घ्यायची पण त्याची जबाबदारी टाळायची हा राजा दुष्यंताचा वारसा एकविसाव्या शतकातही कायम आहे. म्हणूनच आजही अनेक शकुंतला देशाच्या विविध न्यायालयात आपला पत्नीपदाचा दर्जा सिद्ध करण्यासाठी झगडताहेत. अशा स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना दिलासा देणारा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने मागे दिला होता. पण अशाप्रकारचे संबंध कमी होण्याऐवजी वाढताहेत. यात राजकारणी मोठ्याप्रमाणात दिसून येतात! राष्ट्रीय राजकारणातले काँग्रेसचे जे नंतर भाजपमध्ये गेले, असे नारायण दत्त तिवारी यांच्या अनौरस मुलानं आणि त्याच्या आईनं कोर्टातून आपला हक्क मिळवला. तब्बल तीस वर्षाच्या लढ्यानंतर कोर्टानं डीएनए चाचणीचा आदेश दिल्यानंतर त्यांनी त्या मुलाचा आणि पत्नीचा स्वीकार त्यांनी केला होता. हे नमूद करायला हवं! यंदाचा 'गावगाथा' चा दिवाळी अंक हा नाते संबंधावर आहे. पुराण काळापासून आजतागायत नारी यौन शोषणाचे प्रकार सुरूच आहेत. पवित्र असं नाते संबंध उध्वस्त करणाऱ्या घटना दररोज घडताहेत. त्याला आळा घालण्याचा न्यायालयाचा निर्णयाची आणि सामाजिक जाणिवा असलेल्यांच्या मतांचा हा धांडोळा...!"
---------------------------------------
*मृ* गयेसाठी वनात आलेल्या राजा दुष्यंताचं कण्व मुनींच्या आश्रमात आगमन झालं. मुनी आश्रमात नव्हते. त्यामुळं त्यांची मानस कन्या शकुंतला ही दुष्यंत राजाच्या स्वागतासाठी पुढे झाली. राजा दुष्यंत अल्लड शकुंतलेच्या प्रेमात पडला. शकुंतलाही राजावर मोहित झाली. प्रेमाच्या आणाभाकांबरोबरच दुष्यंतानं शकुंतलेशी गांधर्वविवाह केला. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर त्यांचा शरीरसंबंध आला. यथावकाश राजा दुष्यंत आपल्या राज्यात निघून गेला. इकडं शकुंतला गरोदर राहिली. तिला पुत्रप्राप्ती झाली. पण शकुंतलेला न्यायला राजा दुष्यंत काही आला नाही. शेवटी कण्व मुनींनी शकुंतलेची पाठवणी केली. पण दरबारात आपल्या मुलासह उभ्या असलेल्या शकुंतलेला ओळखायलाच राजानं नकार दिला. ज्या भरत राजाच्या नावावरून आपला हा देश 'भारत' म्हणून ओळखला जातो त्याच्या जन्माची महाभारतातली कथा ही अशी आहे. संस्कृत नाटककार कालिदासानं आपल्या 'अभिज्ञान शाकुंतलम्' नाटकातल्या दुष्यंत शकुंतलेच्या कथेत हरवलेल्या अंगठीचं उपकथानक जोडून खुणेसाठी राजानं शकुंतलेला दिलेली अंगठी तिनं हरवल्यानं राजा तिला विसरला, असं सांगत राजाला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केलाय. पण मूळ महाभारतात राजानं हात झटकण्याचाच प्रयत्न केलाय. करून सवरून हात झटकण्याची ही पुरुषी प्रवृत्ती महाभारतापुरती मर्यादित नाही. राजा दुष्यंताचे वारस प्रत्येक शतकात होते, आजही आहेत. उद्याही असतील. लैंगिक संबंधांची मजा घ्यायची, पण त्याची जबाबदारी टाळायची, असे संबंध म्हणजे विवाह नाही, असं म्हणत पळवाट शोधायची हा दुष्यंती वारसा आजवर अनेक पुरुषांनी अवलंबलेलाय. समाजाच्या अगदी अंगवळणी पडलेली ही बाब झालीय. म्हणूनच आजही अनेक शकुंतला देशाच्या विविध न्यायालयांमध्ये न्याय मागत उभ्या आहेत.
दहाबारा वर्षापूर्वीची ही घटना आहे. कोईम्बतूरमधली आयेशा ही अशीच एक शकुंतला होती. तिच्या अर्जावर निकाल देताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कर्नन यांनी 'सज्ञान स्त्री-पुरुषांनी परस्पर संमतीनं ठेवलेला शरीरसंबंध हा विवाहच समजला पाहिजे...!' असं सांगत समाजातल्या वाढत्या 'दुष्यंतगिरी'ला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. न्या. कर्नन यांच्या या निकालावर देशभरातल्या विविध माध्यमांतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. काहींना हा निर्णय मॉरल पोलिसिंग करणारा, नैतिकतावादी वाटला; तर काहींना तो स्वैर लैंगिक संबंधांना अधिकृतता देणारा, पर्यायानं विवाहसंस्था, तिचं पावित्र्य धोक्यात आणणारा वाटला. न्या. कर्नन यांच्यावर पवित्रतावादी अन् मुक्त लैंगिकतावादी अशा दोन्ही गटांकडून टीका झाली. मुळातच आपल्याकडे लैंगिक संबंधांबाबत कोणतीही भूमिका घेतली, तरी ती वादग्रस्तच ठरते. ज्या देशाच्या भूमीत कामसूत्र लिहिलं गेलं, जिथं लैंगिक शिल्प असलेलं खजुराहो सारखे प्रणयक्रीडा चितारलेले शेकडो मंदिर आहेत तिथंच लैंगिकतेबाबत समाज अत्यंत दुटप्पी, ढोंगी भूमिका घेतो. विवाहाच्या बंधनात होणारे लैंगिक संबंध पवित्र, विवाहबाह्य लैंगिक संबंध हे अपवित्र अशा पवित्रतावादी भूमिकेतूनच कुमारी माता, रखेल, वेश्या असे स्त्रियांचे समूह तयार होतात, तर जन्माला येणाऱ्या मुलांमध्येही औरस-अनौरस असे भेद तयार होतात. या अशा समाजात शरीरसंबंधांना विवाहाच्या व्याख्येत न्यायालयानं बसवलं. त्यामुळं साहजिकच गदारोळ होणं अपेक्षित होतं. हा गदारोळ समजून घेण्याआधी या विवादनाट्याचं मूळ कथानक समजून घेणं आवश्यक आहे. 
कोईम्बतूर इथं राहाणाऱ्या आयेशाचं आणि ओझीर हसनचं लग्न झालं होतं. १९९४ ते १९९९ या काळात एकत्र संसारात त्यांना दोन मुलंही झाली. त्यानंतर १९९९ मध्ये हसननं बायको-मुलींना सोडलं. इतकंच नाही तर ही माझी बायको नाही, या माझ्या मुली नाहीत, अशी विश्वामित्री भूमिका घेत त्यांची आर्थिक जबाबदारीही टाळण्याचा प्रयत्न केला. म्हणून मग आयेशा स्थानिक कौटुंबिक न्यायालयात गेली. तिथं तिनं पोटगीचा दावा केला. पण तिथं तिला आपल्या विवाहाचा कोणताही पुरावा सादर करता आला नाही. पुरावा नाही म्हणजे विवाह सिद्ध होत नाही आणि विवाह नाही म्हणजे पोटगीचा अधिकार नाही, असं म्हणत न्यायालयानं आयेशाचा पोटगीचा दावा फेटाळला. फक्त मुलींच्या खर्चासाठी मासिक पाचशे रुपये देण्याचा आदेश दिला. पण आयेशानं हार मानली नाही. तिनं उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. आपलं आणि आयेशाचं लग्न झालेलं नाही. त्यामुळं आपण तिला पोटगी देणं लागत नाही, अशी भूमिका इथं हसननं घेतली होती. विवाहाच्या पुराव्याअभावी हसनची भूमिका न्यायालयासमोर मान्य होत होती. इथंच हायकोर्टानं वेगळी भूमिका घेतली. फोटो, लग्नपत्रिका यासारखा विवाहाचा पुरावा नसला तरी दोन्ही अपत्यांच्या जन्म दाखल्यात हसनचं नाव वडील म्हणून होतं. शिवाय दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या वेळी सिझेरियन करण्यासाठीच्या वैद्यकीय अर्जावर त्याची सही होती. ते दोघे काही वर्षं एकत्र एका घरात राहात होते. हा सगळा परिस्थितीजन्य पुरावा स्वीकारत हायकोर्टानं आयेशाचा पोटगीचा अधिकार मान्य केला. पर्यायनं तिला अधिकृत पत्नीचा दर्जा देखील दिला.
यासंदर्भात न्यायालय सांगतं, 'कोणाही तिसऱ्या व्यक्तींच्या अधिकाराला धक्का न पोहोचवता या केसमधले वादी आणि प्रतिवादी हे जोडपं म्हणून एकत्र राहिलेत. त्यांनी दोन अपत्यांना जन्मही दिलाय. त्यामुळं हा नातेसंबंध इललिजिटिमेट अनैतिक आहे असं म्हणता येत नाही. धार्मिक विधीपूर्वक विवाह ही केवळ एक रूढी आहे, ती सक्ती नाही. त्यामुळं या प्रकरणातले वादी आणि प्रतिवादी यांना हे कोर्ट परस्परांचे जोडीदार समजतं. मुलाला जन्म देण्यापूर्वी वादी महिला आणि प्रतिवादी पुरुष हे दोघेही अविवाहित होते. एका छताखाली त्यांनी वैवाहिक जीवन व्यतीत केलं. त्यामुळं वादी महिलेला पत्नीचा आणि प्रतिवादी पुरुषाला पतीचा दर्जा देणं क्रमप्राप्त आहे...!' कोर्ट पुढं म्हणतं, 'त्यामुळंच त्यांना झालेली मुलंही औरस आहेत आणि वादी ही प्रतिवादीची औरस पत्नी आहे. हे कोर्ट असं सांगतं की, वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या महिलेनं जर वयाची २१ वर्ष पूर्ण झालेल्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गरोदर राहिली, तर ती महिला त्या पुरुषाची पत्नी आणि तो पुरुष त्या महिलेचा पती समजला जाईल. अशा संबंधांतून ती महिला गरोदर राहिली नाही, परंतु असे संबंध असल्याचा पुरेसा पुरावा उपलब्ध असेल, तर अशा जोडप्याला पती-पत्नी समजावं. विवाहाशी संबंधित धार्मिक विधी किंवा रजिस्ट्रारकडे ते नोंदवणं हे केवळ समाजाच्या समाधानासाठी असतात. विवाहयोग्य वयाच्या दोन व्यक्तींमध्ये असलेले लैंगिक संबंध हे त्यांना पती-पत्नी समजण्याला पुरेसे आहेत...!'
कोर्टाच्या या निकालपत्रानं आयेशाला पत्नीचा दर्जा आणि पोटगीचा अधिकार मिळाला पण आज देशभरातल्या विविध न्यायालयांमध्ये अनेक आयेशा आपला पत्नीचा दर्जा सिद्ध करण्यासाठी पर्यायानं पोटगीच्या अधिकारासाठी झगडत आहेत. आज देशभरात परित्यक्ता महिलांची संख्या मोठी आहे. या अशा टाकलेल्या, सोडलेल्या बायकोला पोटगी द्यावी लागू नये म्हणून अनेकदा पुरुषांकडून ही माझी बायको नाही, आमचं लग्नच झालेलं नाही अशी भूमिका घेतली जाते. बायकोला घराबाहेर काढतेवेळी सगळी कागदपत्रं पुरुषाच्या ताब्यात असतात किंवा आधीपासूनच त्यानं ते पुरावे नष्ट करायला सुरुवात केलेली असते. त्यामुळं बऱ्याचदा स्त्रीजवळ आवश्यक पुरावे नसतात. या अशा स्थितीत 'तो मी नव्हेच...!' हा पुरुषाचा दावा कोर्टात मान्य होतो. उच्च न्यायालयाच्या निकालानं या दुष्यंतगिरीला पायबंद घालण्याचं पाऊल उचललं गेलं.

स्त्रीवादी चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांना, आणि स्त्रीहक्कांसाठी लढणाऱ्या वकिलांना कोर्टाचं हे पाऊल महत्त्वाचं वाटतं. यासंदर्भात महिला हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणाल्या, '१२५ कलमांतर्गत पोटगीच्या केसेस लढवताना सगळ्यात मुख्य अडथळा हा विवाहाच्या पुराव्याचा असतो. अनेक स्त्रियांकडे हा पुरावा नसतो, अशावेळी रजिस्ट्रार केस दाखल करून घ्यायलाच नकार देतो आणि स्त्री ही ती केस लढण्याआधीच हरते. त्यामुळं न्या. कर्नन यांचा हा निकाल या अशा महिलांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. विवाहाचा पुरावा नसला तरी परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्या दोघांचे शरीरसंबंध आल्याचं सिद्ध होत असेल, तर अशा स्त्रीचं पत्नीपण आणि मुलांचं पितृत्व संबंधित पुरुषाला नाकारता येणार नाही, हेच ह्या निकालानं स्पष्ट केलंय....!' विवाहाचे धार्मिक विधी, तत्संबंधी पुरावे यापेक्षा स्त्री-पुरुष नात्याचा किंबहुना विवाहाचा जो मुख्य पाया आहे त्या शरीरसंबंधानाच न्या. कर्नन सर्वाधिक महत्त्व दिलं आणि हेच महत्त्वाचं वाटतं. 'आपल्याकडे विविध जातीधर्मानुसार विवाहाच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. कायदा विवाहाची छापील लग्नपत्रिका पुरावा म्हणून मागतो. पण ग्रामीण भागात अशी पत्रिका काहीवेळा छापतातच असं नाही. छापली तरी लग्नानंतरची दहा-वीस वर्ष ती कोणी जपून ठेवत नाही. अनेक जातींमध्ये केवळ अक्षता वाटून विवाहाचं आमंत्रण देण्याची पद्धत आहे. तिथं पत्रिका छापलीच जात नाही. आज मोबाईल आलेत त्यात फोटो सहज काढता येतात. पण पूर्वी फारसे फोटोही काढले जातातच असं काही नाही. काढले तरी ते नवऱ्याच्या ताब्यात असतात. शिवाय अनेक जातींमध्ये विधवा, परित्यक्ता स्त्रियांचं दुसरं लग्न मोजक्या माणसांच्या उपस्थितीत साधेपणाने लावलं जातं. याला पाट लावणं असं म्हणतात. या लग्नाचे कागदोपत्री पुरावेही स्त्रीजवळ नसतात. लग्नानंतर विवाहाची कायदेशीर नोंद करण्याची सजगता अजून शहरी भागातही नाही. ग्रामीण भागात तर अनेकांना त्याची माहितीही नसते. जोवर लग्न सुरळीत सुरू असतं तोवर अशा पुराव्याची आवश्यकता भासत नाही. पण जेव्हा पुरुष विवाह नाकारतो त्यावेळी योग्य पुराव्याअभावी अनेक स्त्रिया आपलं पत्नीपद सिद्ध करू शकत नाहीत, त्यांची मुलं अनौरस ठरतात. अशावेळी शरीरसंबंधांचा पुरावा ग्राह्य मानणं हे पाऊल महत्त्वाचं आहे....!' झालेला विवाह नाकारणं, पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरा विवाह करणं आणि कालांतरानं दुसऱ्या पत्नीला सोडणं, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही काळ एकत्र राहिल्यानंतर असा संबंध नाकारणं, अशा संबंधांतून झालेल्या अपत्यांची जबाबदारी टाळणं असे प्रकार समाजात लक्षणीय प्रमाणात होत असल्यानं अशा एका निकालाची आवश्यकता होती असंच स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्यांना वाटतं. आतापर्यंत या अशा केसेससाठी 'कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्या'ची मदत घ्यावी लागत होती. कारण पोटगीचं १२५ कलम थेट पुरावा मागतं. मात्र हा निकाल शरीरसंबंधांचा पुरावा मान्य करतो. मात्र काहीजणांचा यालाच विरोध होतं असतो. एकदा झालेल्या शरीरसंबंधांनाही तुम्ही विवाह म्हणणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. आज शहरी भागात उच्चभ्रू वर्गामध्ये कॅज्युअल सेक्सचं, परस्पर संमतीनं होणाऱ्या शरीरसंबंधांचं प्रमाण वाढलंय. इथं दोघांनाही लग्नाचं बंधन नको असतं. तसंच शरीरसंबंधांभोवती परंपरागत नीतिमत्तेचे, योनिशुचितेचे जे पहारे उभे केले आहेत ते मोडायला हवेत, लैंगिक संबंध आणि विवाह यांची सांगड मोडीत काढायला हवी, असंही अनेक परिवर्तनवादी, पुरोगामी मंडळींना वाटतं. 
यासंदर्भात सेक्स वर्करसाठी काम करणाऱ्या  स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्या म्हणाल्या, 'लैंगिक संबंध आणि योनिशुचिता यांची सांगड मोडायला हवी हे खरं आहे. किंवा दोन सज्ञान स्त्री-पुरुषांना लग्न न करता परस्पर संमतीनं शरीरसंबंध ठेवण्याची मुभा हवी, त्यावर नैतिक-अनैतिकतेचे शिक्के मारणं थांबवलं पाहिजे, हे सगळं खरं आहे. पण ज्या समाजात स्त्री-पुरुष समानता आहे, तिथंच हे सगळं प्रत्यक्ष वास्तवात कोणावरही अन्याय न होता घडू शकतं. पण आपल्या समाजात अशी स्थिती नाही. स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहाणं, काही काळ तिला वापरणं आणि मग फेकून देणं, त्या संबंधांची, त्या संबंधातून जन्माला आलेल्या मुलांची जबाबदारी न घेणं ही पुरुषी वर्चस्वाची वृत्ती आजही कायम आहे. त्यामुळं मग लैंगिक संबंधांचा वेगळा विचार करावा लागतो. न्या. कर्नन यांच्या निकालात तो तसाच केला गेलाय....!' प्रत्येक शरीरसंबंध हा विवाह असणार नाही; पण प्रत्येक विवाहामध्ये शरीरसंबंध हाच मुख्य पाया असतो. जगात अशी अनेक जोडपी आहेत. ज्यांचे शरीरसंबंध आहेत पण त्यांनी विवाह केलेला नाही, पण असा एकही विवाह नाही की ज्यात जोडप्याचे शरीरसंबंध आलेले नाहीत. त्यामुळंच जिथं विवाहाबाबत निर्णय द्यायचाय तिथं शरीरसंबंधांचा मुद्दा पुरावा म्हणून ग्राह्य मानणं यात गैर काय आहे? असा प्रश्नही महिला हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते विचारतात.
मुळात शरीरसंबंधांचं, लैंगिक संबंधांचं नियंत्रण करण्यासाठी जगाच्या पाठीवर विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विवाहांची निर्मिती झाली. भारतीय संस्कृतीत विवाहाचे आठ प्रकार सांगितलेत. त्यात राक्षसविवाह, गांधर्वविवाह या पद्धतींना देखील मान्यता आहे. राक्षसविवाह म्हणजे मुलीला पळवून नेऊन जबरदस्तीनं विवाह करणं. आज विवाहाची ही पद्धती मान्य होणार नाही, पण ज्या काळात युद्धात स्त्रीला जिंकणं ही पद्धत रूढ होती, आवडत्या स्त्रीला पळवून नेणं हे पुरुषाच्या शौर्याचं प्रतीक मानलं जात होतं. समाजधुरिणांना अशा काळात या अशा पळवलेल्या स्त्रीची व्यवस्था लावणं, तिला त्या पुरुषाच्या पत्नीचा दर्जा देणं आवश्यक वाटलं असावं आणि यातनं राक्षसविवाहाला मान्यता मिळाली असावी. गांधर्वविवाह म्हणजे स्त्री-पुरुष दोघांनी स्वमर्जीनं ठेवलेले शरीरसंबंध असंच त्याचं स्वरूप होतं आणि हे शरीरसंबंध उघडकीला आल्यावर त्याला गांधर्वविवाह म्हणून मान्यता मिळत होती. दुष्यंत-शकुंतलेचा विवाह हा याच प्रकारातला होता. फक्त जगासमोर दुष्यंतानं हा विवाह नाकारल्यामुळं शकुंतलेची फसगत झाली. आजचे प्रेमसंबंध, लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणं हे सगळे प्रकार हे एक प्रकारे गांधर्वविवाहच आहेत. हायकोर्टाच्या निर्णयानं गांधर्वविवाहांना देखील मान्यता मिळालीय. हा निर्णय देताना कोर्टानं एक महत्त्वाचा निर्देश केला. लग्नामध्ये मंगळसूत्र घालण्यापासून जे विविध विधी केले जातात किंवा विवाहाची नोंदणी केली जाते या गोष्टी समाजाच्या समाधानासाठी असतात. कोर्टाचं हे म्हणणं 
पारंपरिक मानसिकतेला न आवडणारं आहे. आज समाजात विवाहित स्त्रीनं मंगळसूत्र घालणं, लाल रंगाचं कुंकू किंवा टिकली लावणं याला अतोनात महत्त्व दिलं जातं. स्त्रीच्या विवाहितपणाच्या या खुणांना चक्क तिचं सौभाग्य म्हणून गौरवलं जातं. इतकंच नाही, तर तिच्या नावाच्या आधीही सौभाग्यवती असं बिरुद चिकटवलं जातं. वैवाहिक विधींना, वैवाहिक चिन्हांना हे असं अवास्तव महत्त्व दिल्यामुळंच ज्या स्त्रीच्या पतीचं निधन होतं, तिला 'अमंगल' मानलं जातं. घटस्फोटित, परित्यक्ता स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. या अशा स्थितीत विवाहविधी सभोवतालच्या मांगल्याच्या फुग्याला न्या. कर्नन यांनी सामाजिक समाधानाची बाब म्हणत टाचणी लावली. विवाहाची कायदेशीर नोंदणी झालेली नसली, तरी एखाद्या दुष्यंताला आपल्या प्रेमसंबंधांची जबाबदारी नाकारता येणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र दुष्यंतगिरीचं वाढतं प्रमाण पाहाता प्रत्येक स्त्रीनं आपल्या विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्याची दक्षता घ्यायला हवी, हेही तितकंच खरं.
आज शतकानुशतकं शरीरसंबंधाला विवाहाचा पाया मानण्यात आलं आहे. न्या. कर्नन यांनी तीच बाब अधोरेखित करत तो विवाहाचा पुरावा म्हणून स्वीकारला. 'या निर्णयाचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. आज मुक्त लैंगिक संबंधांच्या नावाखाली किंवा वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये स्त्रियांचं लैंगिक शोषण होतेय. प्रेमसंबंधांमध्ये बहुतेक वेळा पुरुषाचा हेतू सेक्स हाच असतो, तर स्त्री भावनिकदृष्ट्या गुंतलेली असते. या अशा फसगत झालेल्या स्त्रियांना दाद मागण्याची मुभा या निकालामुळं मिळाली. मात्र या निर्णयातली उणीव अशी आहे की, त्या दोघांचे शरीरसंबंध आले होते हे प्रत्येकवेळी तुम्ही सिद्ध कसं करणार? या कोर्टासमोरच्या केसमध्ये संबंधित स्त्रीला मुलं होती त्यामुळं हे सिद्ध करणं शक्य झालं. पण अपत्य झालेली नसतील तर तुम्ही हे संबंध कसे सिद्ध करणार? कोर्टानं यासंबंधीही काही मार्गदर्शक तत्त्व द्यायला हवी होती....!' असं महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनं म्हटलंय. थोडक्यात, बेडरूममधले शरीरसंबंध प्रत्येकवेळी कोर्टरूममध्ये सिद्ध करणं शक्य नाही. त्यामुळंच असे प्रेमसंबंध जेव्हा फसतात, तेव्हा तरुणीकडून त्या मुलावर रेप केल्याचा आरोप ठेवला जातो. बलात्काराच्या अनेक प्रकरणांमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. लग्नाचं आमिष दाखवून त्यानं मला फसवलं, हाच या अशा प्रकरणातला मुख्य आरोप असतो. आज विवाहपूर्व सेक्सचं प्रमाण वाढलेलंय. सेक्सचा मुक्त अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या तरुणाईला त्यावर विवाहाची, सामाजिक मान्यतांची बंधनं नकोत. ही आमची खासगी बाब आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. एक अभिनेत्री म्हणाली, 'हायकोर्टाच्या निर्णयाबाबत मी वर्तमानपत्रात वाचलं तेव्हा मला हसू आवरलं नाही. हे तर असं झालं की, हम तुम इक कमरे में बंद हो... और शादी हो जाय... लिव्ह इन रिलेशनशिपच्या दृष्टिकोनातून हायकोर्टाचा निर्णय महत्त्वाचा आहे. सध्या देशातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा पुरस्कार केला जातोय. दिल्ली हायकोर्टाने एका निर्णयात असं म्हटलं होतं की, रिलेशन्स आर मोर लाईक अ वॉक-इन अँड वॉकआऊट रिलेशनशिप विथ नो स्ट्रिंग्ज अॅटॅच्ड, या निर्णयानं बेजबाबदार संबंधांना आळा बसेल हे खरं आहे पण मला असं म्हणायचंय की, आजची फेसबुक-ट्विटर- व्हॉट्सॲप जनरेशन समजूतदार आहे. त्यांना आपण काय करतोय ते चांगलं माहीतीय. लग्न न करता ते एकत्र राहताहेत मग अशावेळी ब्रेक अप झाल्यावर बोंबाबोंब करण्यात काय अर्थ आहे...?'
अभिनेत्रीच्या मते मागाहून होणारी बोंबाबोंब मान्य नाही तर अशी नंतरची पश्चात बुद्धी होऊ नये अशारीतीनेच निर्णय घ्यावा. 'विधीवत लग्न केल्यावरही फक्त ५ ते १० टक्के सिक्युरिटी असते. एकमेकांचा कितीही त्रास झाला तरी समाजाला घाबरून वेगळं होण्याचा निर्णय चटकन घेतला जात नाही. तरीही डिव्होर्सचं प्रमाण वाढतेय. पण लग्न न करता लैंगिक संबंध ठेवण्यात एक प्रकारचं फ्रीडम असतं. एकमेकांचं पटलं नाही, की आपण आपल्या मार्गानं जाऊ शकतो. जे लोक स्वतःच्या पायावर उभे असतात, खंबीर असतात तेच अशा रिलेशनशिपचा स्वीकार करतात. पण तरीही अशा संबंधात पडताना मुलींनी मुलाबाबत पूर्ण खात्री असेल तरच अशा संबंधांना मान्यता द्यावी. नाहीतर फसगत होण्याचा धोका असतो....!'
थोडक्यात, आज समाजात मुक्त लैंगिक संबंध, विवाहपूर्व लैंगिक संबंध अस्तित्वात आहेत. ते नाकारता येणार नाहीत. त्यांना नैतिक-अनैतिकतेच्या घोळात घोळवणं तरुणाईला मान्य नाही. मात्र तरीही याबाबत वैचारिक स्पष्टता असणं आवश्यक आहे, 'तरुणाईसाठी आज सेक्स हा ताबू नाही. पण सेक्सचा अनुभव घेतल्यावर त्याच जोडीदाराबरोबर रिलेशन मेंटेन करताना मात्र त्यांना त्या नात्याचं ओझं वाटतं. कोणत्याही नात्यात सहवास, संवाद या गोष्टी महत्त्वाच्या असतात; पण त्याच गोष्टीया गोष्टी तरुणाईला साधत नाहीत. मग प्रेमसंबंधांमधल्या ब्रेकअपचं प्रमाण वाढतं. तुम्हाला मुक्त सेक्स हवा असला तरी तो सेक्सही जबाबदार हवा. त्यात जोडीदाराबरोबर प्रामाणिकपणा हवा. नंतरचे परिणाम स्वीकारण्याची तुमची तयारी हवी. तुम्हाला कोणतीही कमिटमेंट न ठेवता केवळ आनंदासाठी सेक्स हवा असेल, तर त्याची पूर्ण कल्पना जोडीदाराला द्यायला हवी, जोडीदाराची त्याला संमती हवी. तुम्हाला लग्न न करता एकत्र राहायचं असेल, तरी त्यात एकमेकांची जबाबदारी घेणं, हा भाग येतोच. पण ही मॅच्युरिटी आजच्या पिढीत दिसत नाही. त्यांना स्वातंत्र्य हवं आहे, जबाबदारी नको! अशा बेजबाबदारांना त्यांची जबाबदारी दाखवून देण्याचं काम न्या. कर्नन यांचा निकाल करत आहे. आजवर या अशा संबंधांतनं जन्माला आलेलं मूल हे समाजात अनौरस म्हणून ओळखलं जायचं. पाश्चात्त्य समाजात लव्ह चाइल्ड म्हणून त्यांची संभावना केली जाते. पण जगातलं प्रत्येक मूल हे शरीरसंबंधातनं, स्त्रीबीज आणि पुरुषबीजाच्या संयोगातूनच जन्माला येतं. त्यामुळं कोणतंच मूल हे अनौरस असत नाही. मूल जन्माला घालणाऱ्या शरीरसंबंधाला विवाहाचा दर्जा दिल्यानं असा अनौरस शिक्का पुसला जाईल.
आजवर शरीरसंबंधासाठी विवाह असं समाजाचं समीकरण होतं. न्या. कर्नन यांनी त्यातच थोडी उलटापालट करून विवाहासाठी शरीरसंबंध असं म्हटलं. जोवर स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होत नाही, स्त्री ही पुरुषासाठी उपभोग्य वस्तू म्हणूनच शिल्लक राहाते तोवर विवाह आणि शरीरसंबंध यांची सांगड अटळ आहे. विवाह आणि शरीरसंबंध यांची ही सांगड मोडायची असेल, तर आपला प्रवास समानतेच्या दिशेने, सन्मानाच्या आणि प्रामाणिकपणाच्या वाटेवर व्हायला हवा.
चौकट
रिस्पॉन्सिबल सेक्शुअल बिहेव्हिअर महत्वाचं
सेक्सॉलॉजिस्ट यांचं मत.
तुम्ही विवाहाचं बंधन माना किंवा नका मानू, पण जेव्हा लैंगिक संबंधाची गोष्ट येते तेव्हा असे संबंध जबाबदारच असले पाहिजेत, असं सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांना वाटतं. ते सांगतात, 'एखाद्या व्यक्त्तीशी तुम्ही लैंगिक संबंध ठेवणार असाल, तर त्याची जबाबदारी स्वीकारणं, हे तुमचं कर्तव्य आहे. आपल्याकडे मुक्त लैंगिक संबंध म्हणजे संबंध ठेवून नंतर जबाबदारी झटकणं, असा त्याचा अर्थ काढला जातो. म्हणूनच रिस्पॉन्सिबल सेक्शुअल बिहेव्हिअर ही बाब महत्त्वाची आहे. यात नंतर स्त्रीला गर्भधारणा झाली तर त्याची जबाबदारी घेणं, लैंगिक संबंधातनं होणारा आजार झाला; तर त्याची जबाबदारी घेणं, जोडीदारावर एखादा आघात झाला तर त्याची जबाबदारी घेणं, अशा सगळ्या गोष्टी येतात. लग्न करा, न करा तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही. या अशा पद्धतीच्या जबाबदारी शिकवणाऱ्या सेक्स एज्युकेशनची आपल्याकडे गरज आहे.'
बेजबाबदार पुरुषाला त्याचा कृत्याच्या परिणामांची, झालेल्या मुलांची जबाबदारी घ्यायला लावणं या दृष्टीने कोर्टाचा हा निर्णय महत्त्वाचा वाटतो. मात्र त्यांनी शरीरसंबंधाला विवाहाचं जे लेबल लावलंय, ते गैर वाटतं. कारण समजा त्या पुरुषाचा आधी एक विवाह झालेला असेल तर मग तुम्ही काय करणार? किंवा ती स्त्री विवाहित असेल तर? शरीरसंबंध हा विवाह आहे, असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक शरीरसंबंधाच्या परिणामांची जबाबदारी तुम्ही घ्यायलाच हवी, असं म्हटलं असतं तर ते अधिक प्रगल्भ झालं असतं, असं वाटतं.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट
एन.डी. तिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी वर बनले, डीएनए चाचणीतून ३३ वर्षांच्या मुलानं खुलासा केला होता. २०१७ मध्ये, एनडी तिवारी, त्यांचा मुलगा रोहित आणि पत्नी उज्ज्वला यांच्यासह, दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांना भेटताना, थरथर कापत आणि थक्क होत असताना दिसले, त्यांनी त्यांचा मुलगा आणि पत्नीला धरले. राजकारणातला हा त्यांचा शेवटचा प्रसिद्ध फोटो होता. एनडी तिवारी यांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या राजकीय जीवनाइतकेच प्रसिद्ध होते. १९५४ मध्ये त्यांनी सुशील तिवारीशी लग्न केले. या लग्नातून त्यांना मूल झाले नाही. दरम्यान, तिवारी ७० च्या दशकात जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री असलेले प्रोफेसर शेरसिंग राणा यांची मुलगी उज्ज्वला यांच्या प्रेमात पडले. त्यांचे प्रेम फुलले आणि त्यांच्या नात्यातून रोहित शेखरचा जन्म झाला. एनडी तिवारी यांनी सुमारे ४० वर्षे उज्ज्वलासोबतचे त्यांचे नाते नाकारले. परंतु २००८ मध्ये जेव्हा त्यांचा मुलगा रोहित शेखर न्यायालयात गेला तेव्हा न्यायालयाने डीएनए चाचणीच्या आधारे एनडी तिवारी यांना रोहित शेखरचा जैविक पिता म्हणून घोषित केले. न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच, एनडीने १४ मे २०१४ रोजी उज्ज्वलाशी लग्न केले आणि रोहितला आपला मुलगा म्हणून जाहीरपणे कबूल केले.








Sunday, 20 July 2025

मराठींचं वागणं ! मराठीचं जगणं...!!

"जिथून परप्रांतीयांचा मराठीच्या विरोधात मोर्चा निघाला होता तिथूनच, मीरा भाईंदरमधल्या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा आग्रह धरला. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र हे 'मराठी राज्य' असेल असं म्हटलं होतं, त्याच मराठी राज्याचे मुख्यमंत्री आज मात्र 'हिंदीची सक्ती होणारच...!' अशी वल्गना मराठीचा स्वाभिमान ठेचण्यासाठी करतात. हे कशासाठी? दिल्लीतल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी की, बिहारच्या आणि महाराष्ट्रातल्या होऊ घालेल्या निवडणुकांसाठी इथल्या हिंदी भाषिकांना चुचकारण्यासाठी की, मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी? या साऱ्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांचं जगणं आणि वागणं महत्वाचं ठरणार आहे. भाषा जगली तरच माणूस सन्मानानं जगू शकेल. सोलापूर हे बहुभाषिक असतानाही सर्व भाषाभगिनी सामाजिक सौहार्दानं इथं नांदतात. याचं अनुकरण व्हायला राज्यभर व्हायला हवंय!"
-------------------------------------
*म* राठी हा कुठेही असो, बाणा मराठी जपे सदा l
पर्वा नसे कुणाचीही, गाणे मराठीचे गाई सदा ll
अशी मराठी माणसाची आणि भाषेची ओळख सांगितली जाते. 'अमृताते पैजा जिंके' अशी मराठीची कौतुक कीर्ती संत ज्ञानेश्वरांनी सांगितलीय. तर, मराठी अमृतापेक्षाही सरस कशी आहे, ते सांगताना कवी सोपानदेव चौधरी म्हणतात-
अमृतास काय उणे? सांगतसे मी कौतिके l
माझी मराठी बोलकी, परी अमृत हे मुके !!
मराठी भाषेची आणि माणसाची ही कीर्ती महती अमृताहून श्रेष्ठ असली, तरी वास्तव मराठी भाषेप्रमाणेच मराठी माणसाच्याही मुळावर उठणारं आहे. याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसं लक्ष वेधलं होतं. तसं आज राज अन् उद्धव ठाकरे लक्ष वेधताहेत. भाषा ही व्यक्तीचीच नव्हे, तर त्याच्या विचार-संस्कृतीची, प्रांताची, देशाची ओळख सांगत असते. ही ओळख टिकवण्यासाठीच भारतात स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना होऊन नवी राज्यं निर्माण झाली. महाराष्ट्रात मुंबई राखण्यासाठी मराठींना लढावं, मरावं लागलं. शिवसेनाप्रमुखांच्या शब्दात सांगायचं तर, 'मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यापासून मराठी भाषेचा अभिमान अधिकच वाढीस लागला. परंतु, परप्रांतीयांचे लोंढे जसजसे मुंबईवर आदळताहेत, तसतशी अभिमान दाखवणारी माणसंही संख्याबळ कमी झाल्याने विरघळू लागलीत. आता शिल्लक राहिला आहे, तो आरडाओरडा....!' बाळासाहेबांनी नेमक्या शब्दांत मराठी भाषा आणि मराठी माणसाची हालत सांगितली होती. ही पीछेहाट मुंबईपुरतीच मर्यादित नाही. तर ती महाराष्ट्रव्यापी आहे. पुण्यासारख्या पक्क्या मराठमोळ्या शहरातही अमराठींची संख्या तीस टक्क्यांच्या दरम्यान झालीय. ही अमराठींची वाढती टक्केवारी राजकारणातही कुरघोडी करू लागल्यामुळे मराठींमध्ये त्याविरोधी खदखद वाढू लागलीय. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांनी या चिडीला वाट मोकळी करून देताच, त्यांना सर्वच पक्षांतल्या मराठी नेत्यांनी दुजोरा दिला. तो तेव्हा राजकारण टाळण्यासाठी आवश्यकही होता. तथापि, मराठी भाषेविषयी आग्रह धरताना शिवसेनाप्रमुखांनी आपल्या विचारात जो बदल केला होता, तो तेव्हा बऱ्याच जणांच्या लक्षात आलेला नव्हता. मराठी माणूस हे शिवसेनेच्याच निर्मितीचं बीज आहे. मराठी माणसाचा कैवारी हीच शिवसेनेची खरी ओळख होती आणि आहे. ही ओळख हिंदुत्व परिधान करूनही बदलवू शकली नाही. परंतु, मराठी माणूस आणि मराठी भाषा हे विषय शिवसेनेच्या लेखी कायम वेगळेच राहिलेत. आज तीच भूमिका घेऊन राज आणि उद्धव ठाकरे मराठीच्या प्रश्नावर एक होताना दिसताहेत. शासकीय कामात मराठीचा वापर, दुकानांवरच्या पाट्या मराठीत, अथवा मराठी नाटक-चित्रपटांना सहाय्य यापलीकडे शिवसेनेचा मराठी भाषा आग्रह पूर्वी गेलेला नाही. पण आज वातावरण बदललंय हिंदी भाषेची सक्ती करूच असा हट्ट सरकारनं केलाय. शिवसेनेच्या स्थापनेनंतर गेल्या ५७ वर्षांत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापने नंतर गेल्या २० वर्षात मराठी भाषा संवर्धनाचा विषय अनेकदा चर्चेला आला. साहित्यिकांनी आणि भाषा अभ्यासकांनी मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. शिवसेनेनं, ठाकरेंनी या विषयाकडे लक्ष द्यावं, यासाठी चिमटे काढत का होईना, विनंती केली गेली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले पत्रकार स्वर्गीय अरुण साधू यांनी तर 'मराठींनी मराठीतच बोलावं, यासाठी शिवसेनाप्रमुखांनी आता फतवा काढावा...!' असा आग्रह धरणारं जाहीर पत्र लिहिलं होतं. या साऱ्याची बोळवण बाळासाहेब ठाकरे यांनी 'मराठी माणूस राहिला, तर मराठी भाषा आणि तुमचं साहित्य, पुस्तकं राहतील. आमच्या दृष्टीने मराठी माणूस महत्त्वाचा आहे...!' अशी बोळवण केली होती. त्याचे परिणाम आता दिसू लागलेत. 
परप्रांतीयांमुळे मराठी टक्का तर घटलाच; पण त्यापेक्षा अधिक टक्का मराठी बोलणाऱ्यांचा घसरलाय. हा मराठींवर झालेला इंग्रजी आणि हिंदी भाषेचा प्रभाव आहे. बाळासाहेबांचा इंग्रजी माध्यमाला विरोध नव्हता तसा तो राज आणि उद्धव यांचाही नाहीये. त्यांची मुलं, नातवंड इंग्रजी माध्यमात शिकतात, पण घरात सर्वांनी मराठीच बोलावं, असा आपला आग्रह असल्याचं ते सांगतात. त्यांचं म्हणणं, 'डॅडी काय नि मम्मी काय, दोघांनाही इंग्रजीच्या गंधाचा टिळा लागलेला नसतो. मग कशासाठी ही डॅडी-मम्मीची मस्ती? मराठीतले आई-बाबा, हे शब्द वाईट आहेत काय? मराठी भाषेचे खरे खुनी मराठी माणसंच आहेत...!' त्यांचा हा संताप मराठी माणूस राहिला तर मराठी भाषा राहील ह्या त्यांच्याच म्हणण्याचं विरुद्ध दुसरं टोक होतं. ते अधिक टोकदार करण्यासाठी त्यांनी मराठींना 'आजपासून शपथ घ्या, यापुढे मी आयुष्यात मराठी भाषेचाच वापर करीन. ज्याला मराठी येत नाही, त्याला अडाणी समजून मग हवं तर हिंदीमध्ये बोलावं. पण आपण मराठी असून सुरुवातीलाच मराठी भाषेचा अभिमान बाजूला ठेवून अडाणीपणा स्वतःकडे घेऊ नये,...!' अशी नम्र प्रार्थना केली होती. यामागील भावना, आग्रह मराठीचा जाज्वल्य अभिमान सांगणारा होता. परंतु, शपथा घालून, अभिमान दाखवून, कुठल्याही भाषेची घसरण थांबत नाही. तशीच भाषा गगनचुंबी केल्याने अथवा तिच्या अट्टाहासी वापराने टिकत नाही. भाषा व्यापक होते, सर्वसमावेशक होते, इतर प्रगतिशील भाषेतल्या विचारांना, शब्दांना स्वतःत सामावून घेते, तेव्हा ती टिकते; अधिक प्रवाही आणि प्रभावी होते. मराठी भाषाही अशीच टिकली, वाढली. मराठी ही ज्ञानभाषा असेलही. पण सध्या जमाना विशेष ज्ञानाचा म्हणजे विज्ञानाचा आहे. ह्या विज्ञानानेच जगाला जवळ आणून त्याचं खेडं केलंय. पूर्वी प्रांतानुसार भाषा बदलायची. आता वस्ती-हौसिंग सोसायटीगणिकच नव्हे, प्रत्येक घरानुसार भाषा आणि राहाणीमान बदलतंय. पण हा स्वतंत्रपणा दाराबाहेर पडल्यावर वितळतो. तो वितळावा लागतो. त्याने भाषिक सरमिसळ होते. ती आज आवश्यक ठरलीय. त्याशिवाय समाज-व्यवहार होणार नाही. सामाजिक व्यवहार हा एखाद्या भाषेच्या अट्टहासाने होत नाही. असा व्यवहार जी भाषा उपयुक्त आहे, त्या भाषेत होत असतो. हा व्यवहार मराठी भाषेत व्हावा, असं वाटत असेल, तर तो मराठी वळवावी तशी वळते असा शाब्दिक खेळ करून होणार नाही. त्यासाठी मराठी भाषा व्यावहारिक आणि इतर भाषांना सामावून घेणारी करावी लागेल. तिला अर्थसत्ता प्राप्त करून द्यावी लागेल. त्यासाठी भाषाशुद्धतेची सोवळी फेकून द्यावी लागतील. विचारांची शुद्धता आणि व्यावहारिक सहजता मराठीत वाढवावी लागेल. हे काम मराठीची बरोबरी अमृताशी करून अथवा डॅडी-मम्मी कल्चरची मापं काढून होणार नाही. त्यासाठी भाषेचं जगणं आणि मरणं कशात आहे, ते समजून घ्यावं लागेल. अमृतापुढचा 'अ' जर भाषेच्या मर्यादेमुळेच गळून पडणार असेल, तर ती उणीव मराठीच्या नावाने गळे काढून भरून निघणार नाही. सध्या जन्मदात्या आई-बापाला वृद्धाश्रमात अथवा मास्टर रूममध्ये अडकवून निकालात काढायचा जमाना आहे. अशा वातावरणात मायमराठीची अवस्था वेगळी कशी असेल?
संयुक्त महाराष्ट्रची चळवळ जोरात होती, तेव्हाचा हा प्रसंग आहे. चळवळ विचाराने चालावी; पटतील असे मुद्दे लोकांपुढे यावेत, यासाठी मराठी आणि गुजराती भाषिक विद्वानांची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर भरली होती. प्रचंड गर्दीसमोर दोन्ही बाजूंचे विद्वान मुंबई आमच्याच भाषिकांची कशी ते ठासून सांगत होते. मराठी विद्वान मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी, आगरींच्या वास्तव्याचे दाखले देत होते. ऐतिहासिक वास्तूंचे दाखले आणि साहित्यातले संदर्भ सांगत होते. गुजराती विद्वान आपल्या लोकांनी आर्थिक उलाढाल करून मुंबईची कशी भरभराट केली, मोठमोठ्या वास्तूंची कशी उभारणी केली, कारखानदारी वाढवून कष्टकऱ्यांना आधार कसा दिला, त्याची माहिती देत होते. या अटीतटीच्या मुद्यांना त्यांच्या भाषा-भाईकडून दाद मिळत होती. पाच तास उलटले तरी वादाचा निकाल लागत नव्हता. तेवढ्यात एक गावंढळ वेशातला माणूस मंचाजवळ आला. त्याने दोन मिनिटं भाषण करण्याची विनंती संयोजकांना केली. आधी त्याला हुसकावून लावण्यात आलं. पण सभा अध्यक्ष कॉम्रेड डांगे यांनी त्याला पाहाताच भाषणाला परवानगी दिली. खणखणीत आवाजात भाषण सुरू झालं. 'आम्ही म्हणतो, मुंबई आमचीच, मराठींची, महाराष्ट्राचीच आहे. गुजराती विद्वान म्हणतात, मुंबईत आम्ही पैसा टाकला, व्यापार केला, कारखाने उभारले, मुंबई किमती केली, म्हणून मुंबई आमची, गुजरातींची, गुजरातची आहे...! आम्ही ते मान्य कसं करायचं हो...! काय हो, मूल गुटगुटीत व्हावं; त्यानं चांगलं बाळसं धरावं म्हणून त्याला आपण डोंगरे ग्राइप वॉटर पाजतो. मूल मोठं होतं. धट्टकट्ट दिसतं. गावात नाव कमावतं. म्हणून त्याचे आई-बाप हे पोर डोंगरेचं बरं... असं कधी बोलतात का? आणि डोंगरेही आमचं ग्राइप वॉटर पितात, ती सगळी मुलं आमचीच...! असं कधी म्हणतो का...?' या प्रहारासरशी गर्दीतल्या मराठी आणि गुजराती भाषिकांनी संयुक्तपणे टाळ्यांचा गडगडाट केला. बोलणाऱ्याने दोन मिनिटं मागितली होती. पण केवळ एक मिनिटात त्याने 'मुंबई मराठींची, महाराष्ट्राची...' कशी ते पटवून दिलं. सभा संपली. हा साक्षात्कार घडवून आणणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं, सातारा आणि सांगली परिसरात ब्रिटिशांच्या उरावर बसून सहा वर्षं प्रतिसरकार चालवणारे क्रांतिवीर नाना पाटील. महाराष्ट्र मुंबईवरचा हक्क सोडणार नाही, हे दाखवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभरातून एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईत आणला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत इतर नेत्यांप्रमाणे नाना पाटील यांचं योगदानही मोठं आहे. मुंबई महाराष्ट्राची झाली. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यासाठी १०५ हुतात्मे झाले. हजारो कायमचे जखमी, जायबंदी झाले. मुंबई महाराष्ट्राची झाली. पण ती मराठींची राहिली आहे का? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर अवघ्या पाच वर्षांत शाहीर साबळे यांनी ह्याच प्रश्नावर 'आंधळं दळतंय..!' हे नाटक लिहिलं. मुंबईत मराठीची पिछेहाट आणि अवहेलना कशी होते याचं मर्मभेदी चित्रण या नाटकात होतं. या नाटकाचं तेव्हा समीक्षण करताना प्रमोद नवलकर यांनी लिहिलंय. 'शिवसेनेच्या प्रसूती वेदना शाहीर साबळेंच्या आंधळं दळतंय या नाटकात आहेत...!' मराठी, मुंबईकरांची दुर्दशा दाखवताना शाहीर एका गाण्यात म्हणतात,
अरब पाहुणा घरात शिरला, 
उंट त्याने आत दडपला, 
मालक दारी रडे, मराठी पाऊल मागे पडे...! 
हे चित्र बदलण्यासाठी शिवसेना सजली. सत्तेच्या मेण्यात काही काळ बसली तरीही परप्रांतीयांच्या लोढ्यांच्या नावानं मराठीचं भोकाड पसरणं सुरूच आहे. ह्याला कारण सत्तेसाठी राजकीय पक्षांनी केलेल्या कुरघोड्या हे जसं आहे तसंच मराठी माणसाची उदासीनता, बेपर्वाई, बेजबाबदारपणा, आपल्याच माणसाला कमी लेखण्याची वृत्ती ही आहे.
मध्यंतरी मालवणी भाषेत नाटकं सादर करणारे मच्छिंद्र कांबळी यांनी 'भैय्या हात पाय आणि मराठी माणूस भोकाड पसरी...!' हे नाटक रंगमंचावर सादर केलं होतं. हे नाटक अस्वस्थ करणारं होतं. गुरु ठाकूर यांचं मार्मिक लेखन आणि संतोष पवार यांचं वास्तव ठळक करणारं दिग्दर्शन यांनी प्रेक्षक अन् कलाकार यांच्यातला सीमाभेद पुसून टाकला होता. रंगमंचावर जे घडतंय ते प्रत्यक्षात घडतंय, असं वाटत होतं. ह्या कलारंगात मच्छिंद्र कांबळी, संजीवनी जाधव, संतोष मयेकर आणि सहकाऱ्यांनी अभिनयाने कमालीचा जिवंतपणा आणला होता. संतोष मयेकरांचा भैया चीड आणत होता, त्याचवेळी मराठींची नालायकीही उघडी पाडत होता. ती मराठींना सुधारण्यास चालना देणारी होती. हे नाटक परप्रांतीय गुजराती, मारवाडी वा भैया-उत्तर भारतीयांविरोधी नव्हतं. तर ते मराठींच्या उदासीनतेच्या विरोधात होतं. हा अवगुण मुंबईतल्या मराठीपणाला आटवणारा ठरल्याचं दिसून येतंय. मोठ्या घराचं स्वप्न पाहाताना मराठी कुटुंबं आपली राहाती जागा विकून अधिक पैशाचं, जागेचं आमिष दाखवणाऱ्या अमराठी विकासकाच्या जाळ्यात कशी सापडतात; त्यासाठी मराठींचाच माध्यम म्हणून कसा वापर करतात; हे दाखवण्यासाठी रंगमंचाच्या ताकदीचा पूर्ण वापर या नाटकात करण्यात आला होता. त्यामुळं नाटक काळजाला भिडतं जात होतं. अखेरीस तर मच्छिंद्र कांबळी यांचा प्रत्येक शब्द मुंबई मराठींचीच करण्याचा निश्चय निर्माण करतो. जय जय महाराष्ट्र माझा....या गीताने नाटकाचा पडदा पडतो, प्रेक्षक मच्छिंद्र कांबळींच्या लोकजागृतीला उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना देत असत. फार थोड्या कलाकारांना हा मान मिळतो. मराठी लोक त्याबाबतीत चिकित्सक आहेत, ते स्वतःच्या विकासाबरोबर मुंबई-महाराष्ट्रातला मराठीपणा टिकवून ठेवण्यासाठी चिकित्सक राहावेत, हा नाटकाचा हेतू होता. ह्याच हेतूने शाहीर साबळेंनी साठ वर्षांपूर्वी 'आंधळ दळतंय...!' नाटक रंगमंचावर आणलं होतं. त्या नाटकाचा प्रारंभ 'जय जय महाराष्ट्र' ने व्हायचा. त्याच गीताने 'भैया हातपाय पसरी' चा शेवट होत असे. हा महाराष्ट्र गौरव मराठी बाण्याला साजेसं काही निर्माण करणारा हवा होता. तसा तो झाला नाही हे वास्तव आहे. सत्ताधाऱ्यांना मतं देणारी परप्रांतीय मंडळी जवळची वाटायला लागली, त्यासाठी त्यांनी कमकुवत होत चाललेल्या मराठींची अवहेलना चालवलीय. आता तर अगदी पहिलीपासून हिंदी सक्तीची करून त्यांनी आगीत तेल ओतलंय. त्यामुळं राज आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा आवाज काढण्याची संधी मिळालीय. मराठी माणूस एकवटलाय. तो आगामी काळात किती एकसंघ राहतो हे महत्वाचं आहे. अन्यथा ते भैयाच्या, गुजराथ्यांच्या, मारवाड्यांच्या, परप्रांतीयांच्या नावाने मराठींचं भोकाड पसरणं ठरणार ! असं चित्र निर्माण होऊ शकतं. मराठीचा अभिमान मराठी माणसात कसा भिनलाय, त्याचं दर्शन घडवताना कवी ना.गो. नांदापूरकर माझी मराठी या कवितेत लिहितात-
आम्ही मराठी, हिचे पुत्र लोकी 
कधी भ्यावयाचे ना, मुळी ना कुणा ! 
आकंठ प्यालो, हिचे दूध अंगी 
पहा रोमारोमांतुनी, या खुणा!
तोडा वा चिरा, दुग्धधाराच येती 
रक्त न वाहे, शरीरातुनी !
'माझी मराठी, मराठीच मीही' 
असे शब्द येतील, हो त्यातुनी !
पण हा मराठी बाणा व्यवहारात उपयुक्त ठरतो का?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

बंधुत्वाची जिथे प्रचिती....!

"राज-उद्धव 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील का?
हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा शनिवारी ५ जुलैला झालाय. त्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता पण राज आणि उद्धव ठाकरे यासाठी एकाच मंचावर आले होते. यापूर्वी मोर्चाचा निर्णय झाला तेव्हा संजय राऊत यांनी राज आणि उद्धव यांचा फोटो पोस्ट करत एक फेसबूक पोस्ट केली होती. दरम्यान, राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याबाबत काही वक्तव्य केली होती. त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करून शक्यता आणि परिणाम याबाबतचा आढावा."
--------------------------------------
"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही तपासून पाहत आहोत. मी तुम्हाला फक्त संदेश नाही, तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात काहीही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ....." उद्धव ठाकरेंचं हे सूचक वक्तव्य आहे राज ठाकरेंच्या मनसेसोबतच्या युतीबद्दलचं. गेल्या अनेक वर्षांपासून राज आणि उद्धव एकत्र येतील असं बोललं जातं होतं. तशा चर्चाही रंगल्या होत्या. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला. कारण, दुसरं तिसरं कोणी नाही, तर थेट राज आणि उद्धव या दोघांनी तसे संकेत दिले होते.
१९ एप्रिलला राज ठाकरे यांनी सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं. राज म्हणाले, "कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत, महाराष्ट्र फार मोठा आहे. या महाराष्ट्र, मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळं एकत्र येणं- एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. परंतु हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा...!" असं राज ठाकरे म्हणाले. या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ उत्तर दिलं होतं. "किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. परंतु, एकीकडे भाजपला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड, विरोध करणं असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत-स्वागत करणार नाही. त्याच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा. मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली, पण आधी हे ठरवलं पाहिजे. माझ्यासोबत हिंदुत्वाचं हित होणार की भाजपसोबत हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे. चोरांना गाठीभेटी, कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची, मग टाळी दिल्याची हाळी द्यायची," असं उद्धव म्हणाले होते. याशिवाय पत्रकार परिषदेत "संदेश कशाला आम्ही जी काही द्यायची ती थेट बातमीच देऊ", असं म्हणून पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्याबद्दल सूचक वक्तव्य केलं. दोघांनाही आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर दोघांनाही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. या दोघांच्या एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षांतल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. याशिवाय मुंबई महापालिकेत देखील मराठी मतांचं होणारं विभाजन टळू शकतं.
दोघांचं एकत्र येणं दोघांसाठी फायद्याचं ठरेल. मात्र, त्याचे काही तोटे देखील असतील. कारण, काही बाबतीत राज आणि उद्धव दोघांच्या भूमिका परस्परविरोधी आहेत. त्यामुळे एकमेकांकडे गेलेले मतदार दोघं एकत्र आल्यानं, मतं एकमेकांकडे वळतील का? हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे मधल्या काळात त्यांच्यासोबत काही लोक जोडली गेली आहेत. त्या लोकांना या दोघांचं एकत्र येणं कितपत रुचेल हा देखील प्रश्न आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्याविरोधात जी भूमिका घेतली त्याचा फटका बसू शकतो. काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत नसेल, तर काँग्रेसमुळे जी मतं जोडली गेली ती त्यांच्याकडे परत जाऊ शकतात. राज ठाकरेंसोबत जशी मतं येतील तशी काही मतं जातील सुद्धा. त्यामुळे कशासाठी किती गमवायचं याचा विचार त्यांना करावा लागेल. राज ठाकरेंनी मुस्लिमांविरोधात घेतलेली भूमिका ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसारखी होती, ती फक्त पाकिस्तानातल्या मुस्लिमांना विरोध करणारी होती हे राज ठाकरे मतदारांना पटवून देऊ शकले, विरोध करायचा, तर फक्त भोंग्यांच्या आवाजाला कशाला सगळेच आवाज बंद करा असा नरेटीव्ह राज ठाकरेंनी मांडला, तर या युतीचा नक्कीच मुंबईत फायदा होईल. कारण, मुस्लीम मतदारांना सुद्धा कुठे जायला पर्याय उरणार नाही. आज काँग्रेसची ताकद उरलेली नाही. काँग्रेस फारशी सक्रीय दिसत नाही. दोघंही किंतु-परंतु न ठेवता एकत्र आले तर फायदा होईल. पण, तो निर्णायक असेल का? राज ठाकरे यांच्याविषयी बोलणारे नेते म्हणून अनेकांना आकर्षण वाटतं. पण, नेता म्हणून भरोसा वाटत नाही. तो एकाएकी होऊ शकेल की नाही हे कठीण आहे.दोघांची विश्वासार्हता आणि दोघांचं मतदारांना होणारं अपील हे खूप कमी झालंय. एक अधिक एक दोन अशी बेरीज होईल का? अशी शंका आहे.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची इतकी ताकद दिसत नाही. त्यामुळे ही युतीची चर्चा चाललीय ती फक्त मुंबई महापालिकेतील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली आहे, असं बोललं जातंय. कारण, मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मा आहे आणि शिवसेनेनं मुंबईवर इतकी वर्षं सत्ता गाजवली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातून निसटू द्यायची नाही यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय. त्याचाच भाग म्हणून या युतीकडे बघितलं जात आहे. मात्र, हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर मुंबईतलं राजकीय समीकरण कसं बदलेल? मराठी आणि मुस्लीम मतं एकत्र कशी ठेवायची यासाठी या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित अजेंडा जनतेसमोर मांडला, तर ही सगळी मतं मिळून फायदा होईल.
महाराष्ट्राला १८ वर्षांपूर्वी एक दु:स्वप्न पडलं होतं ठाकरे कुटुंबात फुट पडली. ते ही हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या हयातीतच. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसंच एकाच जंगलात दोन वाघ राज्य करू शकत नाहीत हे सिद्ध झालं होतं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र असले तरी त्यांच्यात राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. एक जागतिक दर्जाचा छायाचित्रकार राजकारणात रमेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. १९९५ पर्यंत तरी उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय नव्हते. ते आपल्या जाहिरात संस्थेतून प्रचाराची धुरा सांभाळत होते. २००३ साली मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचार यंत्रणेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी सुरूवात झाली. वाढत्या वयामुळं बाळासाहेबांना उत्तराधिकारी कोण असावा? याची चिंता वाटत होती. राज ठाकरे हे तेव्हा शिवसेनेत सक्रिय होते. त्यांची राजकीय कारकिर्द १९९० पासून सुरू झाली. त्याचं वागणं, बोलणं, चालणं, देहबोली, वक्तृत्व आणि भाषाशैली ही अगदी बाळासाहेबांसारखीच होती. शिवाय ते एक उत्कृष्ट राजकीय व्यंगचित्रकारही होते. बाळासाहेबांचं जणू प्रतिरूपच वाटत होते. बाळासाहेब यांच्यानंतर कोण? याची जेव्हा जेव्हा दबक्या आवाजात चर्चा होत असे तेव्हा "राज ठाकरे" हेच सर्वांचे उत्तर असे. त्याचं नेतृत्व भारतीय विद्यार्थी सेनेतून उदयास आलं होतं. तेव्हा ते युवकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. राज ठाकरे हे जहाल भाषाशैली, स्पष्टवक्तेपणा आणि ठाकरी बाण्यामुळे लोकप्रिय होते. लाखांची गर्दी खेचण्याची किमया त्यांच्यात अजूनही आहे. दैनिक सामना १९८९ साली सुरू झाला तेव्हा सामनाच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग मोठा होता. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सूर्यपुत्र असले तरी तेव्हा त्यांच्यात सूर्याचे तेज नव्हते. ते लाजरे बुजरे आणि मवाळ स्वभावाचे होते. सुरूवातीला तर त्यांच्या वक्तृत्वातही जोम नसे. कालांतरानं त्यांनी वक्तृत्वात बाजी मारली परंतू त्याला ठाकरी भाषेचा बाज नव्हता. त्यामुळं बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणून राज ठाकरेंना असलेली पसंती कायम राहीली. शिवसेना भाजपची सत्ता असताना किणी प्रकरणामुळं राज ठाकरे अडचणीत आले. त्यांची प्रतिमा डागाळल्यासारखी झाली.
बाळासाहेबही आपला उत्तराधिकारी नेमण्याच्या मन:स्थितीत होते. उद्धव की राज यातून निवड करणं बाळासाहेबांनाही अवघड होतं.अखेर महाबळेश्वर इथल्या शिबीरात त्यांनी आपला उत्तराधिकारी नेमण्याचा सर्वाधिकार शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला. स्वतः बाळासाहेब त्यावेळी उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत हा निर्णय घ्यायचा होता. पडद्यामागे काय घडलं सांगता येत नाही मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कार्याध्यक्ष म्हणून नेमण्याचा ठराव मंजूर झाला.तो ठराव राज ठाकरे यांनीच मांडला होता. याचं तेव्हा आजही शिवसैनिकांना त्यातलं गुपित कळलेलं नाही. अशाप्रकारे राज ठाकरे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून उदय झाला. पक्षनेतृत्व दोघांमध्ये विभागलं जावं अशी अनेकांची इच्छा होती. बाळासाहेब ही त्यास अनुकूल होते. परंतू 'मुंबई माझ्याकडे हवी..! किमान पुणे आणि नाशिक तरी द्या...!' असा आग्रह राज ठाकरेंनी धरला. त्यामुळं ती संकल्पना साकार होऊ शकली नाही. तेव्हा पासून गृहकलह म्हणा वा भाऊबंदकी सुरू झाली. राज ठाकरेंना डावललं जाऊ लागलं. 'माझ्या पांडूरंगाला बडव्यांनी घेरलंय...!' अशी खंत राज ठाकरे उघडपणे व्यक्त करू लागले. राज ठाकरे हा स्वाभिमानी हट्टी माणूस. रोखठोकपणा हा ठाकरी बाणा अंगात मुरलेला. त्यांची पक्षांतर्गत कोंडी होऊ लागली. अखेर त्याचा स्फोट होऊन राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच २००६ साली बंड करून आपला 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' हा पक्ष निर्माण केला. त्या पाठोपाठ राज ठाकरे यांना मानणारे हजारो शिवसैनिक आणि शेकडो पदाधिकारी राज ठाकरेंसोबत गेले. शिवसेनेनं यापुर्वी अनेक बंडं पचवली होती. अगदी बंडू शिंगरे यांच्यापासून छगन भुजबळ, नारायण राणे ते गणेश नाईकांपर्यंत. परंतू यावेळी अभेद्य मानल्या जाणाऱ्या मातोश्रीच्या बालेकिल्याला सुरूंग लागला होता. मात्र राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारखी गद्दारी केली नाही. पाठीत खंजीरही खुपसला नाही. फोडाफोडीचे राजकारण तर अजिबात केले नाही. बाळासाहेबांना  पुर्वकल्पना देऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच पक्ष सोडला. राज ठाकरे यांचे नेतृत्व मानणारे लोक त्यांच्यासोबत आले त्यांनाच त्यांनी सोबत घेतले. शिंदेसारखी त्यांनी बाळासाहेबांच्या नाव, पक्ष वा चिन्हावर दावा केला नाही. स्वतःच्या बळावर आपला पक्ष निर्माण केला आणि तो टिकवला. यामुळंच राज ठाकरे यांच्या बंडाला कोणी गद्दारी म्हणू शकले नाही. त्यांनी कधीही शिवसेना संपवण्याची भाषा केली नाही. म्हणून आजपर्यंत राज ठाकरे यांना मानणारे लाखो शिवसैनिक आहेत. जे राज ठाकरेंसोबत गेले तेही १९ वर्ष निष्ठेनं राज ठाकरे यांच्यासोबत प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहीले. राज आणि उद्धव यांच्यातल्या मतं विभाजनाचा फायदा भाजपलाच झाला. भाजपनं मनसेचा वापर शिवसेनेची मत विभाजनासाठी केला. त्याचा फटका  दोन्ही सेनांना बसला. भाऊबंदकीमुळं दोघांचं जितकं नुकसान झालं नसेल त्यापेक्षा शतपटीनं महाराष्ट्र आणि मराठी जनतेचे नुकसान झालं. आज उशीरा का होईना या ठाकरे बंधुंना साक्षात्कार झाला आणि ते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले. तो महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी सुवर्ण कांचन योग मानावा लागेल. राज आणि उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक ईगो बाजूला ठेऊन एकदिलानं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. 
हरीश केंची 
९४२२३१०६०९

राजसत्तेची कोंडी...!

"देशात 'मतचोरी'च्या आरोपामुळं वातावरण ढवळून निघालंय. अनेक बाबी उघड झाल्यात. हरियाणातला ईव्हीएम घोटाळा सर्वोच्च न्या...